गुरुवार, 26 दिसंबर 2013

चारीमुंड्या चीत !


चारीमुंड्या चीत !  ( पर्व दुसरे -भाग ११६ वा )


असे म्हणतात जो पर्यंत एखादा व्यसनी त्याच्या व्यसनासमोर ... स्वतच्या सर्व क्षमतांची ..शक्तींची ..हार झालीय हे मान्य करत नाही तो पर्यंत त्याचे व्यसन बंद होणे कठीण असते ..मी हारलो ..हे कबुल करून ती हार त्याला सतत मनात जपून ठेवावी लागते ..तेव्हा आपोआप व्यसनाचे मनातील आकर्षण कमी होण्यास मदत होते ..मला व्यसनाधीनते मुळे जेल मध्ये लागले होते ...तेथेही मी काही ना काही क्लृप्ती करून बाहेर पडण्याच्या बेतात होतो ..माझा प्लान जवळ जवळ यशस्वी झालाच होता ....अगदी शेवटच्या क्षणी ...माझ्या कुटुंबीयांनी कठोर भूमिका घेवून तो प्लान हाणून पडला होता ...अगदी मी मेलो तरी बेहत्तर असा त्यांनी घेतलेला पवित्रा ..माझ्यासाठी धक्कादायक होता ....मला प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारा होता ...आमच्याकडे उपचारांसाठी दाखल असलेल्या व्यसनी व्यक्तींच्या पालकांना मी नेहमी सांगत असतो कि जो पर्यंत तुम्ही त्याच्या व्यसनाधीनतेमुळे त्याचे आणि इतर कुटुंबियांचेही झालेले नुकसान परखडपणे त्याच्या समोर मांडत नाही ..तो पर्यंत तो प्रामाणिक पणे आत्मपरीक्षण करणे कठीण असते ....जो पर्यंत एखाद्या व्यसनी व्यक्तीला पालक घाबरतात ....तो पर्यंत तो त्रास देत राहतो ..एकदा का घरच्या मंडळीनी घाबरणे बंद केले ..की मगच व्यसनी व्यक्ती स्वतच्या वागण्यात बदल करण्याची शक्यता वाढते .. इतके नुकसान होऊनही ..माझे फारसे काही बिनसले नाही ..मी परत सगळे लवकरच ठीक करीन असा खोटा आत्मविश्वास प्रत्येक व्यसनीला वाटत असतो ..मी त्याला अपवाद नव्हतो ...म्हणूनच तर इतके नुकसान होऊनही पुन्हा पुन्हा मन व्यसनाकडे आकर्षित होत होते ....जेल मधून बाहेर पडायचे सगळे प्रयत्न फसल्यावर ..एकदम आत्महत्येचे विचार मनात येणे हा अजून एक मूर्खपणा होता ..त्याऐवजी माझ्यावर ही वेळ का आली ? याबाबत जर आत्मपरीक्षण केले असते तर अधिक योग्य झाले असते ...माझ्यावर पहारा करण्यासाठी हॉस्पिटल मध्ये असलेल्या शिपायांची देखील मी नाराजी ओढवून घेतली होतो ...ते आता अजिबात माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते ..म्हणूनच त्यांनी अतिशय निर्दयपणे मला 'इन्फेक्शन वार्ड ' मध्ये आणून टाकले होते ...

' इन्फेक्शन ' वार्ड मध्ये क्षयरोग ..धनुर्वात ..रँबीज ..अश्या प्रकारच्या आजाराचे रुग्ण ठेवलेले होते .. तेथील सगळ्या सिस्टर्स नेहमी तोंडाला रुमाल बांधून असत ...या वार्ड मध्ये खास जेल मधून उपचारांसाठी आलेल्या धोकादायक कैद्यासाठी एक गज असलेलली खोली होती ...एका वेळी दोन कैदी तेथे ठेवण्याची सोय केलेली ..बाहेरून ते गजांचे दार बंद राहत असे नेहमी ..आत अगदी छोट्याश्या जागेत संडास कम बाथरूम अशी जागा ..कोंदट असलेल्या त्या खोलीतील माझ्या बाजूच्या बेडवर असलेला कैदी .. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला ..म्हातारा ...अपघातात त्याने एक पाय गमावलेला..नंतर घरगुती भांडणातून दोन खून केले म्हणून जन्मठेपेची शिक्षा झालेली ..जेल मध्ये शिक्षा भोगत असताना क्षयरोगाची लागण झाली म्हणून त्याला येथे उपचारांसाठी आणले होते ..माझ्या आधीपासून तो या खोलीत होता ..अतिशय उग्र चेहरा ..तितकाच खरखरीत आवाज ...काळाभिन्न ..भरगोस झुबकेदार मिश्या ..असे त्याचे रूप ...मला शिपायांनी ज्या अवस्थेत स्ट्रेचर वरून आणले त्यावरून मी देखील कोणातरी खतरनाक कैदी आहे असा त्याचा समज झालेला .. .. खून ..हाफ मर्डर ..यापैकी कोणतातरी गुन्हा मी केला असावा असे त्याला वाटत होते ...सकाळ झाली होती ..रात्रपाळीच्या सिस्टर घरी जायला निघालेल्या ..तसेच वार्डात नातलगांची वर्दळ सुरु झालेली होती ..मी हतबलपणे एक पाय बेडीने पलंगाला अडकवलेल्या अवस्थेत आत्मपरीक्षण करत होतो ..स्वतच्या गुन्ह्यांचा आलेख तपासत होतो ....शेवटी एकाच उत्तर येत होते ..ते म्हणजे निसर्गाने सर्व काही चांगले देवूनही मी केवळ माझ्याच कर्तुत्वाने सगळे शून्य केले होते ...माझी कर्तव्ये ..जवाबदा-या समर्थपणे पार पाडण्यास मी नालायक ठरलो होतो ..एक चांगला मुलगा ..चांगला भावू ..चांगला पती ..चांगला पिता ... समाजातील एक सुजाण नागरिक बनू शकलो नव्हतो ...

बाहेर फटाक्यांचे आवाज ऐकू येत होते ..ऐन दिवाळीत मी अश्या अवस्थेत होतो ..बाहेर लोक दिवाळीच्या आनंदात असतील ..नवी खरेदी ..नवी स्वप्ने ..नवा उत्साह ..मी मात्र या वर्षी कुटुंबियांची देखील दिवाळी खराब केलेली होती ...लग्नानंतर मी सासरी दिवाळ सणाला गेलो होतो ते आठवले ..किती आनंदी दिसत होती मानसी ....हातात फुलबाजी घेवून ती फिरवताना ..तिच्या चेहऱ्यावर असलेली चमक मी डोळ्यात साठवून घेतली होती ..नवा शालू नेसून चाललेली तिची लगबग ..सासू ..सासरा ..मेहुणा यांचे अगत्य ...आता मानसी कुठे असेल या विचाराने काळजात खड्डा पडला ..बिचारी लहानग्या सुमितला घेवून एका कोपऱ्यात बसून असेल ..नवे कपडे ...गोडधोड ..सगळे तिला नकोसे झाले असेल ....मी व्यसनी होतो हे सांगूनही ....मझ्याशी लग्न करण्याचा तिने घेतलेला धाडसी निर्णय तिच्या अंगलट आला ...माझ्या सारखे बेभरवश्याचे ..कंगाल ..सौभाग्य ! आईची तब्येत आता कशी असेल ....मी समजायला लागलेल्या वयापासून म्हणजे सुमारे वयाच्या १३ व्या वर्षापासून आईला केवळ मनस्तापच दिला होता ....भांडणे ..मारामा-या ..खोड्या ..व्यसने .हेच केले होते ..प्रत्येक वेळी तिने वात्सल्याने ..मला पाठीशी घातले होते ...माझ्या चुकांवर पांघरून घालून मला वाचवण्याचा तिचा प्रयत्न असे ....मी मात्र सर्वांच्या प्रेमाचा केवळ गैरफायदा घेतला होता ..शेवटी माझ्यामुळे आईवर आत्महत्या करण्याची वेळ येवून ठेपली ....आता घरची दिवाळी कशी असेल या कल्पनेने पुन्हा मला रडण्याचा उमाळा आला ..कांबळे तोंडावर घेवून तो उमाळा दाबण्याचा प्रयत्न करत होतो ..तरी देखील हुंदके सुरूच राहिले ..सगळे शरीर हुंदक्यांनी हालत होते ..

( बाकी पुढील भागात )

=======================================================

पुन्हा जेल ! ( पर्व दुसरे -भाग ११७ वा )

माझे सगळी योजना फिस्कटल्यावर आता पांगळेपणाचे नाटक सुरु ठेवण्यात काही अर्थ नव्हता ....आपोआप बरा झालोय असे दाखवणेही जरा विचित्र वाटले असते सर्वाना..नेमके त्यावेळी सिव्हील हॉस्पिटल मधील एक्सरे मशीन बंद् पडले होते ...सुमारे चार दिवस लागतील ते दुरुस्त व्हायला असे समजले ..तो पर्यंत मला हॉस्पिटल मध्ये ठेवावे असा निर्णय झाला होता ....टर्की जरा कमी झालेली ....काहीतरी उपचार म्हणून मला सिस्टर पेन किलरच्या गोळ्या देत होत्या सकाळ संध्याकाळ .. टर्की मुळे माझे जेवण जवळ जवळ बंदच होते ..म्हणून दिवसातून दोन वेळा सिस्टर मला सलाईन लावत असत ...इन्फेक्शन वार्ड मध्ये मला शिपाई फक्त लघवी ..संडास ..जेवण यासाठी पायाची बेडी काढून काही काळ मोकळा सोडत असे ..मात्र खोलीचे गजांचे दार तो कुलुपबंद ठेवण्यास विसरत नसे ...बुडावर सरकून माझी पँट खराब झाली होती त्यामुळे ..मला त्यांनी वार्डात पेशंटला देण्यात येणाऱ्या सरकारी कपड्यातील एक पांढरा पोटऱ्या पर्यंत असणारा झगा घालायला दिला होता ...दाढी वाढलेली ..अंगावर तो पांढरा झगा ..या अवस्थेत मी कसा दिसत होतो देव जाणे ..एकदा मला सलाईन लावायला आलेली सिस्टर गमतीने म्हणाली ..तू हा पांढरा झगा आणि दाढी वाढलेल्या अवस्थेत एखाद्या चर्च मधील फादर सारखा दिसतो आहेस ... या वेषात माझ्या चेहऱ्यावर तिला विरक्तीचे भाव दिसले असावेत असे वाटले उगाच ..अर्थात ही विरक्ती पराभूत पणाच्या भावनेने आलेली होती ..सर्व काही असताना आलेली विरक्ती अध्यात्मिक असते तर ..सर्व काही गमावल्यावर आलेली विरक्ती हा नाईलाज असतो ...

पांगळेपणाचे नाटक सोडायचे म्हणून आधी मी हळू हळू उभे राहण्यास सुरवात केली ..नंतर आधाराने चालू लागलो ..तीन दिवसांनी मी व्यवस्थित चालू लागलो ..माझ्या खोलीतील माझा साथीदार ..फारसा माझ्याशी बोलत नसे ..बहुतेक वेळ तो झोपून राही .. त्याचा कोणीतरी नातलग त्याला एक बिडी बंडल आणून देत असे ..क्षयरोगामुळे त्याची तब्येत खूप खालावली होती ..जागा असला की सारखा खोकत राही ..मूड असला की मला आपणहून विडी देई ..एकदा रात्री ..खोकता खोकता त्याच्या तोंडातून विचित्र आवाज येवू लागले ..दम कोंडल्यासारखे ..थंडीचे दिवस ..त्यात क्षयरोगी ..खोकता खोकता तो एकदम निपचित झाला ..बाहरेच्या ट्युबलाईटच्या अंधुक उजेडात त्याचे डोळे अर्धवट उघडे आहेत असे मला दिसले ..मी त्याला दोन वेळा हाक मारली ..त्याचा खरखरीत आवाजातील प्रतिसाद ऐकू आला नाही ..मग मी बाहेर ड्युटीवर असलेल्या शिपायाला हाक मारली ..शिपायाने ..सिस्टरला बोलावून गजांचे दार उघडले ..खोलीच्या आतला मंद दिवा लावला ..मग समजले की तो बेशुध्द झालाय ..अगदी मंद श्वास सुरु होता ....हा खपणार लवकरच असे सिस्टर बडबडली ..त्याला ताबडतोब आपत्कालीन विभागात नेण्यात आले . तो गेल्यावर मी एकटाच होतो त्या खोलीत ...त्याला नेल्यावर त्याच्या गादीखाली हात खालून चाचपडले तर त्याचा अर्धवट संपलेला बिडी बंडल मिळाला ...मी पटकन तो काढून माझ्या गादीखाली लपवला ....मेल्या मढ्याच्या टाळूवरचे लोणी यालाच म्हणत असावेत बहुतेक ...

सहाव्या दिवशी निरोप मिळाला की एक्सरे मशीन सुरु झालेय ...मला हातात बेडी अडकवून शिपायांनी खुर्चीवर बसवून एक्सरे काढायला नेले ..मुळात काही झालेच नव्हते ..फक्त माझ्या पांगळेपणाच्या नाटकाला पूर्णविराम मिळण्याची शेवटची प्रक्रिया होती ..दुसर्या दिवशी रिपोर्ट नॉर्मल आहे ..काहीही इजा झालेली नाहीय पाठीच्या मणक्याला हे कळले ..मग पुन्हा माझी रवानगी जेल मध्ये झाली ..या वेळी मला दुसर्या सर्कल मध्ये ठेवण्यात आले ..जेमतेम आठ दिवस काढावे लागणार होते जेलमध्ये ..मला मिळालेल्या न्यायालयीन कस्टडी पैकी उरलेले ...टर्की संपली होती तरी अशक्तपणा मात्र जाणवत होता ..माझ्या आजारपणाच्या काळात जेलच्या हॉस्पिटल मध्ये माझे सरकारी सामान पडले होते ते पुन्हा घ्याला गेलो ...तर त्यातील काथ्या भरलेली उशी गायब झालेली होती ....कोणीतरी हंडी साठी जाळली असेल असे उत्तर मिळाले म्हणजे आता उशी शिवाय दिवस काढावे लागणार होते ..नव्या बराकमध्ये गेल्यावर तेथील वार्डनने मला कोणती केस असे विचारल्यावर मी ४९८ सांगितले ..त्याने क्षणाचाही विलंब न लावता ..मला बराकच्या संडासजवळ झोपण्यास जागा दिली ...अगदी कोपरा होता ..तेथे सारखा संडासचा दर्प येत असे ..मी त्याला जेव्हा विनंती केली की मध्यभागी जागा दे ..तेव्हा म्हणाला ' कौनसा बडा तीर मार के यहां आया है तू ? ..साले अपने बिबी को सताना मर्दानगी नही होती ' ..नंतर कळले की घरगुती हिंसाचाराच्या गुन्ह्यांना जेलमध्ये तुच्छ समजले जात होते ..अश्या कैद्यांना इतर कैदी चांगली वागणूक देत नसत ..त्यांच्या बाहेर चोऱ्या..दरोडे ...खून वगैरे ठीक होते ..मात्र स्वत:च्या कुटुंबियांना त्रास देवून घरी आतंक माजवणे म्हणजे लुक्खेपणा होता ...अश्या कैद्याची लायकी संडासजवळ झोपायची असते असे त्यांचे मत होते ...मला स्वतःबद्दल खूप वाईट वाटले ....

( बाकी पुढील भागात )

===============================================================


भिकारी ???? ( पर्व दुसरे -भाग ११८ वा )

मला दिलेल्या संडासजवळच्या जागेत रात्री सतरंजी टाकून पडून राहिलो ..उशी नसल्याने पायातील जुनाट स्लीपर्स डोक्याखाली घेवून झोपण्याचा प्रयत्न सुरु होता माझा ...खूप थंडी वाजत असल्याने सतरंजी खालची फरशी गारढोण झालेली ....तो गारवा थेट हाडात पोचत होता ..त्यात इतर कैद्यांची सारखी संडासला जाण्यासाठीची वर्दळ ..दर दहा पंधरा मिनिटांनी कोणी न कोणी माझ्या पायाजवळून संडासकडे जात होते ..चालताना चारपाच जणांचे पाय लागले माझ्या पायाला ..कदाचित एखादा मुद्दामही पाय लावून जात होता ...मग पाय पोटाशी घेवून पडून राहिलो ..माझ्या मनगटावरची जखम भरत आलेली होती ..तरीही थंडीमुळे जखम तडतडत होती ....रात्रभर जागाच होतो ...गिनती झाल्यावर मग चहाचे वेध लागले ..बंदी खुलल्या बरोबर चहाच्या लाईनीत जावून बसलो ..अर्धा तास थंडीत कुडकुडत चहाची वाट पाहिल्यावर कोमट चहा मिळाला ..आता मनाची तयारी केली होती .. अजून एक आठवडा काढावा लागणार आहे आपल्याला इथे ....चहा घेवून झाल्यावर अंगावर उन पडण्याची वाट पाहत बसलो बराकीच्या व्हरांड्यात ..सिव्हील हॉस्पिटलहून माझ्या खोलीतील मित्राचा मी काढून घेतलेला अर्धा बिडी बंडल बराच साथ देत होता ..अर्धी बिडी पिवून झाली की विझवून ठेवत होतो ..ती पुन्हा दुसऱ्या वेळी कामाला येई ..अंगावर उन आले तसे छान वाटले ..एक उबदार भावना सर्व शरीरात पसरली ...कोवळी उन्हे छान शेक देत होती ..मस्त डोळे मिटून उन खात बसून राहिलो ..तितक्यात कानावर भजनाचा आवाज ऐकू आला ..चक्क लता मंगेशकरांचा आवाज..' मोगरा फुलला ..मोगरा फुलला ...फुले वेचिता बहरू कळीयासी आला .." बहुतेक जेलच्या कार्यालयात भोंगे लावून अभंग लावले होते ...मग ...' पैल तो गे काऊ कोकताहे ..शकून गे माये सांगताहे ' सुमारे तासभर संत ज्ञानेश्वर ..संत तुकाराम ..संत एकनाथ वगैरेंचे अभंग लागले होते ...छान वेळ गेला ते ऐकण्यात ..एकाग्रतेने ते अभंग ऐकत मनातल्या मनात त्यांच्या शब्दांचा अर्थ शोधत बसलो ...लहानपणी रेडीओ वर ऐकायला मिळत असत हे अभंग ..नंतर वयात आल्यावर फिल्मी गाणी ..भावगीते ..विरहगीते यातच रस घेतला होता ....तुकारामांचा एक अभंग लागला ..' हाची नेम आता ..न फिरे माघारी ..बैसले शेजारी गोविंदाचे ' ..लता मंगेशकरांनी हे अभंग आपल्या सुरेल आवाजाने अमर केले आहेत .. न फिरे माघारी ऐकताना भरून आले मला ...संत तुकाराम ..विठ्ठलाच्या भक्तीत इतके लीन झालेत की जणू त्यांनी आता परत संसारात परतायचे नाही असा निश्चय स्वता:शी केलाय ...असा अर्थ होता गाण्याचा ..मी देखील तसाच निश्चय करायला हवा होता ..पुन्हा व्यसनांकडे न वळण्याचा ...

माझ्या सारखेच अनेक कैदी उन खात आजूबाजूला बसलेले होते .. काही सरकारी वेशात ..तर काही माझ्या सारख्या घरच्या कपड्यात ..बहुतेकांनी अंगावरचे शर्ट काढलेले होते .. ते त्या शर्टावर बारीक नजरेने झाडी करत होते ..मग काहीतरी सूक्ष्म सापडल्या सारखे ते बोटात पकडून नखांवर घेवून चिरडत होते ..बराच वेळ हा काय प्रकार असावा याचा विचार केला पण समजेना ..शेवटी शर्ट काढलेल्या एकाच्या अगदी जवळ जावून बसलो ..बारकाईने तो नेमके काय करतोय ते पाहू लागलो ..तरीही समजले नाही ..शेवटी तो कैदी माझ्याकडे पाहत म्हणाला ..साली जूवें ..ना जाने कहासे आ जाती है ..रातभर सोने नही देती .. सगळा प्रकार ध्यानात आला ..तो शर्टवरवरून पांढर-या रंगाच्या ऊवा शोधून काढून त्या नखावर घेवून मारत होता ....बहुतेक सगळ्यांचाच हा ऊवा मारायचा सामुदायिक कार्यक्रम सुरु होता ..जेलच्या बराकीत तीन चार दिवसांच्या वर कोणी मुक्काम केला की ..या पांढऱ्या रंगाच्या उवा आपोआप त्याच्या कपड्यात गोळा होता असत ..वर्षानुवर्षे पाणी न लागलेल्या जेलच्या कांबळात बहुधा या ऊवा तयार होत असाव्यात ...ते कांबळे पांघरले की त्या आपोआप अंगावरच्या कपड्यात शिरत असत .. जेथे जेथे कापडाची शिवण असेल तेथे त्या लपून बसत ...रात्री अंगभर चावत असत ..त्यामुळे खाज सुटत असे अंगाला ..मेंटल हॉस्पिटल मध्ये ढेकुण होते ..तर येथे पांढऱ्या ऊवा ...माझ्याशी बोलता बोलता त्या कैद्याने एक जू पकडली ...त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता ..पटकन त्याने ती नखावर घेतली आणि चिरडली ..मग समाधानाने पुन्हा त्याचा शोध सुरु झाला .. जू चिरडतांना मी त्याच्याकडे निरखून पाहत आहे हे लक्षात आल्यावर मला म्हणाला ' तीन चार दिनो के बाद तेरेको भी ये करना पडेगा ..' मला कसेसेच झाले ते ऐकून ..मी असा अंगावरचा टीशर्ट काढून उन्हात ऊवा मारत बसलोय ही कल्पनाही करवेना ..मात्र तसेच झाले ..नंतर दोन दिवसांनी मला देखील टीशर्ट काढून बसावे लागले उवा मारत ..आधी शर्ट मग पँट ..आणि दर दोन दिवसांनी ही सफाई करावी लागे .. उवा आपल्या कपड्यात येवू नयेत म्हणून वार्डन ..जेलमधले रंगदार कैदी ..बराकीत सगळे कैदी झोपतात ..त्यापासून सुमारे दहा फुट अंतर ठेवून स्वतची झोपायची जागा निवडतात ..इतर कैद्यांपासून दूर असा हा कंपू असतो ..त्यांचे कांबळे वेगळे असते ..तसेच ते शक्यतो इतर कैद्यांच्या कांबळांच्या संपर्कात येत नाहीत ....उलट कोणी कैदी त्यांच्या जवळ फिरकला तर त्याला मार देतात ..मला बहुतेक पहिल्या दिवशी याच कारणावरून मारहाण झाली असावी ...

सकाळी साडेसहाला पहिला चहा ..साडेदहा वाजता जेवण ..त्यात तीन जाड चपात्या आणि एखादी उकडलेली पाणीदार भाजी .. तूर ..मुग ..हरबरा..या डाळींचे वरण..असे जेवण मिळे..सांयकाळी जेवणात एक मुद भात.. दोन चपात्या ..पाणीदार भाजी ..वरण ...असे जेवण असे ...सुरवातीच्या दोन दिवसानंतर मला कडाडून भूक लागू लागली ...त्यामुळे मला ते जेवण पुरेनासे झाले ....मेंटल हॉस्पिटल मध्ये असताना जेवणाबद्दल असलेली माझी सगळी नाटके संपली होती ..चव कशीही असो ..रंग कसाही असो ..आवड निवड न ठेवता खायचे हे शिकलोच होतो ..त्यामुळे मला चवीची काहीही समस्या येत नव्हती ..फक्त जेवण पुरत नसे इथे...सगळ्यांना जेवण वाटून झाल्यवर वार्डन उरलेल्या किरकोळ चपात्या कैद्यांना वाटत असे त्यात नंबर लागावा म्हणून आशाळभूत पणे वार्डनच्या हालचालींकडे लक्ष ठेवावे लागे ..जेवण वाटून झाले की तो उरलेल्या चपात्या हातात घेवून ओरडे '..चलो ..रोटी ..' वार्डन असे ओरडला की माझ्या सारखे अनेक जण वार्डनकडे हात पसरत असत ..दयनीय चेहरा करून त्याचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असत ..त्यात धक्काबुक्की होई ..मग वार्डन मनाला येईल त्या कैद्याला एक एक चपाती देत असे ..कधी कधी हवेत आपल्या दिशेने फेकलेली चपाती मध्ये दुसराच कोणीतरी हात घालून बळकावत असे ....आपण भिकारी आहोत असे वाटे ..थोडे अपमानास्पद वाटे ..मग विचार केला ..जगात सगळेच तर भिकारी आहेत ..फक्त भिकेचे प्रकार वेगवेगळे ..कोणी नोकरीची भिक मागतोय..कोणी पैश्यांची ..कोणी मतांची ..कोणी सत्तेची ..कोणी प्रेमाची ..आणी विरक्ती आली की मुक्तीची ! 

( बाकी पुढील भागात )

===============================================================

भेटी लागी जीवा ...... ! ( पर्व दुसरे -भाग ११९ वा )

दोन तीन दिवसात मी जेलचा सराईत रहिवासी असल्यासारखा वागू लागलो ....रोज सकाळी सुमारे दोन तास मोठ्या आवाजात अभंग लागत असत ..ते ऐकून त्या अभंगांच्या शब्दांचा नेमका अर्थ मनातल्या मनात शोधणे ..हा एक चांगला विरंगुळा होता ....तो अभंग लिहिण्यामागे असलेली संतांची भूमिका समजून घेण्यास मदत मिळे ..सर्व संतांचे अभंग ऐकल्यावर एक गोष्ट मात्र लक्षात येत होती ..की या सर्वांची प्रत्यक्ष न पाहिलेल्या परमेश्वरावर अतूट अशी श्रद्धा होती ...त्या शक्तीला भेटण्यासाठी ...तिला अनुभवण्यासाठी ....त्यांनी सारी शक्ती पणाला लावून भक्ती केली होती ..हा भवसागर तारून नेण्यास त्याची सोबत असली की सगळी दुखः ..वेदना ..सहनीय होतात ..तसेच तोच यातून मुक्ती देऊ शकतो असा बहुतेक अभंगांचा अर्थ होता ...काही अभंगात तर त्याच्या भेटी साठी संत मंडळी इतकी व्याकूळ झालेली आढळली की त्यांनी शब्दबद्ध केलेल्या अभंगात लता मंगेशकरांनी आर्तता ओतून तो अभंग व्याकुळतेच्या सर्वोच्च बिंदूवर नेवून ठेवला आहे ..भेटी लागी जीवा ..लागलीसे आस ..पाहे रात्रींदिवस वाट तुझी ...तसेच ..अगा करुणा करा ...करीतसे धावा ...या मज सोडवा लवकरी करुणाकरा .....अगदी मग्न होऊन मी गाणी ऐकत असे ...पुरोगामी विचारसरणी नुसार परमेश्वर वगैरे सगळे झुठ आहे अशी माझी मनोधारणा होती .. तरीही हे अभंग ऐकताना मात्र मी पुन्हा पुन्हा स्वतःशीच वाद घालत बसे ...वाटे की आपण परमेश्वरावर श्रद्धा ठेवली नाही म्हणून तर कदाचित आपल्या जीवनात इतकी वादळे आली नसतील ? पण मग श्रद्धा ठेवावी तरी कशी ? पुन्हा लहानपणी पडणारे प्रश्न मनात घोंगावत असत ..परमेश्वर आहे तर मग विविध भेदभाव का ? दारिद्र्य ..अन्याय ..अपघात ..आजार ...हे सगळे निर्माण करून त्याने काय साधले ? सर्वाना हवे तसे सुख का मिळत नाही ..सुख म्हणजे नक्की काय ? मुक्तीची नेमकी कल्पना काय असावी ? जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती ..संसारातून मुक्ती ..विकारातून मुक्ती ..की दुखा:तून मुक्ती ? उत्तराच्या जवळपास पोचता येत नव्हते ...माझी बुद्धी तोकडी पडत होती ....पुढे कधीतरी नक्की हा शोध सुरु ठेवायचा असे मनात पक्के बसले होते ...भोळी भाबडी माणसे फारसा विचार न करता पुराणांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात....त्याचा लबाड प्रवृत्तीची माणसे गैरफायदा घेतात ..अनेक बुद्धिमान माणसे विश्वास ठेवताना सावध राहतात ....परमेश्वर आहेही आणि नाहीही या गोंधळात अडकतात ...ठाम मताची आणि फक्त स्वताच्या बुद्धीवर विश्वास असलेली माणसे या कल्पनेला विरोध करतात ..शास्त्रीय दृष्टीकोन बाळगणारी माणसे ..षडरिपूने ग्रस्त माणसांनी ...इतर दुबळ्या ..अशक्त ..असहाय जीवांना लुटू नये ..म्हणून पाप पुण्याची ..परमेश्वराची कल्पना मांडली गेली आहे असे सांगतात ..एकंदरीत काय तर सगळ्यांचे मूळ एका जीवाने आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्या जीवांना त्रास देवू नये हे नक्की !

माझ्या सर्व त्रासांचे मूळ हेच होते बहुतेक ..मी अतिशय स्वार्थी मनोवृत्तीचा होतो ..लहानपणापासून मला हवे तसे कसे घडेल याच विवंचनेत असायचो ...खाण्याचे पदार्थ ..खेळणी ..इतर माणसांकडून हवे असणारे प्रेम ..मान सन्मान ..यश ..या सगळ्या गोष्टी मला माझ्या मनाप्रमाणे आणि माझ्या मार्गाने मिळाल्या पाहिजेत असा माझा अट्टाहास असे ..त्याच नादात मी मला जे आवडेल ते करत गेलो ..कोणतेही नियम पाळले नाहीत ..कोणतीही बंधने घालून घेतली नाहीत ..वर ' आपुन अपने मर्जी के मलिक है ' हा अहंकार बाळगून राहिलो .. आईवडील ..भावंडे ...प्रेयसी ...पत्नी ..नातलग कोणाच्याच भावनांची पर्वा केली नाही ..हु केअर्स ..या अविर्भावात जगलो ..बंडखोरी म्हणून मुद्दाम वेगळ्या गोष्टी केल्या ..समाजात अमान्य असलेल्या गोष्टी करण्यात रस घेतला ...आणि जेव्हा जेव्हा मनाविरुद्ध घडले ...मी असहाय झालो ...तेव्हा नशेचा सहारा घेतला ..स्वतचे अपयश ..निराशा ..वैफल्य ..मनाचा कमकुवतपणा ..सगळे पचवणे जड होत गेले तस तसा व्यसनात अधिक अधिक अडकत गेलो ..जगात सर्वांच्याच मनाविरुद्ध काही ना काही घडत असते ..प्रत्येकाला दुखः भोगावे लागते ...कोणालाही हवे तसे सुख हव्या त्या पद्धतीने कधीच मिळत नाही म्हणून तर समर्थांनी म्हंटले आहे ' जगी सर्व सुखी असा कोण आहे ' मी मात्र फक्त माझ्या आणि माझ्याच सुखाचा विचार करताना इतरांची दुखः नजरेआड केली ....एकीकडे मनात सतत कुरतडत असणारी.. स्वतच्या वर्तना बद्दलची खंत ..आणि दुसरीकडे सतत सुख मिळविण्याची धडपड या कात्रीत सापडून ...पुन्हा पुन्हा व्यसने करत गेलो ...स्वतच्या चुकांचे समर्थन करत इतरांच्या चुका शोधल्या ...कधी प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण केले नाही .

जेल मधले वास्तव्य मला आत्मपरीक्षण करण्यास प्रेरित करत होते ...कारण इथे माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नव्हते ..त्रागा करून ..बंडखोरी करूनही.. काही फायदा होणार नव्हता ...चांगलाच कचाट्यात सापडलो होतो ..कदाचित त्यामुळेच हतबल होऊन स्वतःचे प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करत होतो ..सायंकाळी बंदी झाली की वेळ घालवण्यासाठी कैदी गाणी वगैरे म्हणत असत ..मी त्यांच्यात सामील झालो ...इतके व्यसने करूनही माझा आवाज अजूनही चांगला राहिला होता ..बराकमध्ये लवकरच मी गायक म्हणून प्रसिद्ध झालो ..मग कैदी मला गाण्यांच्या फर्माईशी करत असत ..येथे कव्वाल्या जास्त आवडत कैद्यांना ..तसेच विरहगीताना देखील पसंती होती ....' चिट्ठी आयी है ..आई है चिट्ठी आयी है ..या गाण्याची रोज फर्माईश होई ..त्या बदल्यात ज्या कैद्यांकडे भरपूर बिड्या असत ते मला बिड्या देत ....येथे धार्मिक गाणी देखील आवडत सर्वाना ..त्यात ' अजमेर जाना जरूर ख्वाजा ..अजमेर कितनी दूर ' ' सुख के सब साथी ..दुख मे ना कोय ...' शिर्डी वाले साईबाबा आया है तेरे दरपे सवाली..' वगैरे गाणी असत ...जेवणाची थाळी घेवून त्यावर ठेका धरून किवा हाताने टाळ्या वाजवत ठेका धरला जाई ..सायंकाळी तीनचार तास असे मजेत जात असत ..,आता थंडीलाही सरावलो होतो ..पाय पोटाशी घेवून का होईना झोप लागत होती ...तीन चार दिवसांनी वार्डनने संडासजवळची जागाही मला बदलून दिली ....गाण्याच्या कलेमुळे मला जेलमध्ये चांगल्या प्रकारे स्थिरावण्यास मदत झाली . 

( बाकी पुढील भागात )

=================================================================

रोटी ..हंडी ..!  ( पर्व दुसरे -भाग १२० वा )

मला दिलेल्या मँजिस्ट्रेट कस्टडीचा कालावधी संपत आला .... फक्त दोन दिवस बाकी होते माझ्या सुटकेला ...आता शरीर पूर्ण नॉर्मल झाले होते ..त्यामुळे भुकेचे प्रमाण वाढतच चालले होते ..व्यसनी व्यक्ती व्यसनाच्या काळात ... भरपूर ..पोटभर असे जेवत नाहीत ..कारण आधीच नशेने पोट भरलेले असते ..एकदा शरीरातून व्यसनाचे विष बाहेर पडले की शारीरिक त्रास कमी होऊन ....पचनक्रिया सुरळीत होते ..जास्त प्रमाणात भूक लागू लागते ..इतकेच नाही तर पूर्वी खाल्लेले खाण्याचे एक से एक रुचकर ..स्वादिष्ट पदार्थ आठवू लागतात ...वेगवेगळे पदार्थ खावेसे वाटतात ..माझेही तसेच होत होते ..जेवणाच्या वेळी लोणचे ..चटणी .. कोशिंबीर यांची आठवण होई ..तर इतर वेळी ..जेवणात छान मसालेदार भाज्या असाव्यात ..गरम गरम मउसुत अशी घडीची चपाती ..टोमँटो घातलेले वरण ..वगैरे गोष्टी आठवत ..मध्येच आईच्या हातच्या निरनिराळ्या पदार्थांची आठवण होऊन मन व्यथित होई ....घरी आई आग्रह करून करून वाढे ते आठवे ..इथे तर पोटभर जेवण मिळायची मारामार होती . काही कैदी भिशीत ( जेलचे स्वैपाक घर ) मदत करायला जात असत ..ते तेथून येताना सोबत लपवून चपात्या तसेच मीठ ..तिखट ..घेवून येत ..असे कैदी बराकीतील मित्रांना लपवून आणलेल्या चपात्या देत ..एक असाही प्रकार पाहायला मिळाला की जे रंगदार ..म्हणजे दादागिरी करणारे कैदी आहेत ते ..वार्डनशी ..जेलच्या सरकारी वर्दीतील शिपायाशी संधान बांधून असत ..अश्या कैद्यांना शिपाई जास्त चपात्या देई ..इतक्या जास्त की खाता खाववणार नाहीत ..प्रत्येक बराकीत असे तीनचार रंगदार कैदी असत ..ते वार्डन जवळ इतर कैद्यांपासून अंतर ठेवून झोपत असत ..इथे जरी पैसे जवळ बाळगायला परवानगी नसली तरी ..अनेक कैद्यांजवळ लपवलेले पैसे होते ..त्या पैश्यांच्या जोरावर सरकारी यंत्रणा वाकवता येत होती ..

' हंडी ' नावाचा एक प्रकार समजला .. रंगदार कैदी वार्डनशी अथवा शिपाई ज्यांना जेलमध्ये ' बाबा ' असे म्हणत ..यांच्याशी संधान बांधून असत .. ..असे कैदी ..जेलमध्ये मिळणारे जेवण जास्त रुचकर व चविष्ट नसते म्हणून त्या भाजीवर व वरणावर वेगळी प्रक्रिया करून ..ते पुन्हा नव्याने फोडणी देवून खात असत ...अशी फोडणी देण्यासाठी चुलीची गरज लागे ..बराकीत विटेचे छोटे तुकडे लपवलेले असत ..ही मंडळी सायंकाळी पाच वाजता मिळणारे जेवण घेवून ठेवत ..रात्री सात आठच्या सुमारास लपवून ठेवलेले विटेचे तुकडे काढून त्याची मांडणी करून चूल पेटवली जाई ..जेलच्या अल्युमिनियमची थाळी वाकवून.. त्याचे खोलगट आकाराचे भांडे फोडणी देण्यासाठी तयार केलेले असे ..जळण म्हणून बंदी नसताना बाहेरून गोळ्या केलेल्या वाळक्या काड्या ..कधी कधी नव्या कैद्यांचे चोरलेले कांबळे ..चादर ..उशीमधला काथ्या.. अशा वस्तू वापरल्या जात ..म्हणूनच मला पहिल्या दिवशी कांबळ.. सतरंजी..उशी देताना शिपायाने बजावले होते ..या वस्तू जपून ठेव पुन्हा मिळणार नाहीत ..म्हणजे माझी चोरी गेलेली उशी अश्या हंडीत जळाली होती तर ...चूल पेटली की ...घेवून ठेवलेली भाजी ..वरण यांना थोडे तेल ...तिखट ..मसाले घालून वेगळी फोडणी दिली जाई..मग ते लोक जेवण करत असत ..बाकीचे कैदी अशी हंडी पेटली की ..मंगल कार्यालयाच्या बाहेर जसे भिकारी ..त्यांची दयनीय पोरे समारंभाला आलेल्या लोकांकडे ..जेवणावळीकडे असूयेने ..आशाळभूतपणे पाहतात तसे पाहत असत .. ' हंडी ' हा प्रकार म्हणजे जेलमधील जेवणाची ..चहाची .... एक प्रकारची चैन होती ...वार्डनकडे चहाची भुकटी आणि साखर असे ..हंडी पेटवून त्यावर अधून मधून चहा देखील बनवला जाई ..मोजक्या चार पाच लोकांसाठी ..या हंडीत शक्यतो ठरलेले ..रंगदार ..पैसेवाले सदस्य असत ..त्यांचे मदतनीस म्हणून एक दोन किरकोळ लोचट कैदी असत ...मदतनीस कैदी जळण गोळा करून ठेवणे ...नवीन कैद्यांची कांबळे ..उश्या ..वैगरे चोरून हंडीसाठी जमवणे तसेच रंगदार कैद्यांची खरकटी भांडी धुणे ..त्यांचे कपडे धुणे ..रात्री त्यांची मालिश करणे वगैरे कामे करत असत ..त्या बदल्यात त्यांना बिड्या ..हंडीत बनवलेला पदार्थ ..चहा थोडासा मिळे ..हे मदतनीस कैदी देखील आपल्या धन्याच्या जोरावर नवीन कैद्यांवर दादागिरी करत असत ..

एकदा सकाळी मी उन खाण्यासाठी म्हणून बराकीच्या मागील बाजूस जावून बसलो होतो ..आसपास आठदहा कैदी बसले होते इकडे तिकडे ..मला समोर सतरंजीवर सुमारे तीस चाळीस चपात्या मांडून ठेवलेल्या दिसल्या ..उन्हाळ्यात जसे पापड वगैरे करून वाळवायला ठेवतात ..तशा त्या चपात्या पसरून ठेवलेल्या होत्या ..हा काय प्रकार असेल बरे ? इथे बाकी कैद्यांना पोटभर चपात्या मिळण्याची मारामार इतक्या चपात्या अशा वाळवत ठेवलेल्या ? ..मी बराच वेळ विचार करत बसलो होतो ..त्या चपात्यांच्या जवळपास कोणी नव्हते ...आसपास बसलेले कैदी देखील त्या चपात्यांकडे फिरकत नव्हते ..शेवटी यातील एकदोन चपात्या आपण उचलून घ्याव्यात या हेतूने जवळ गेलो ..तर त्या चपात्या जरा बुरसटलेल्या वाटल्या ..तरीही मनाचा हिय्या करून खाली वाकून दोन चपात्या उचलल्या ..मी चपात्या घेवून वळणार तोच ..एका बराकीच्या खिडकीतून ..' रुक.. रुक ..साले ..अजून दोन शिव्या ऐकू आल्या ..दोनच मिनिटात एक किरकोळ वाटणारा कैदी माझ्या अंगावर धावून आला ..शिव्या ऐकून माझी सटकली होतीच ...तो अंगावर येत आहे पाहून मी देखील त्याच्यावर हल्ला केला ..दोघेही खाली जमिनीवर पडलो ...किरकोळ मारामारी जुंपली ..इतर कैद्यांनी आम्हाला सोडवले ..मग कळले की त्या चपात्या भिशीतून मुद्दाम जास्त प्रमाणात आणल्या गेल्या होत्या..आमच्या समोरच्या बराकीत असलेल्या वार्डन व रंगदार कैद्यांच्या मालकीच्या होत्या त्या चपात्या ..त्या चपात्या वाळवून ..एकदम कडक झाल्या की हंडीत जळणासाठी वापरल्या जाणार होत्या ..जळणासाठी चपात्या ? माझे डोके सुन्न झाले ...देशात जशी मुठभर लोकांकडे अमाप संपत्ती आहे ..ती संपत्ती बँकेत ..दागिन्यांच्या रुपात ...पडून आहे ..जी केवळ मौजमस्ती ..चैन ..करण्यासाठी वापरली जाते ..तसेच होते हे ..त्याच वेळी बहुसंख्य लोक दोन वेळच्या जेवणासाठी महाग...

( बाकी पुढील भागात )

रविवार, 22 दिसंबर 2013

कैदी नंबर ....!



कैदी नंबर ....! ( पर्व दुसरे -भाग १११ )


सेन्ट्रल जेल समोर ऑटो थांबला ..जेलच्या त्या मोठ्या दरवाजासमोर आम्ही उभे होतो ..सायंकाळचे पाच वाजत आलेले होते ....माझ्या सोबतच्या एका पोलिसाने दरवाजा जवळ जावून त्याच्या हातातील कागदपत्रे तेथील पहारेकऱ्याला दाखवली ..त्याच्या हाती सुपूर्द केली ..म्हणजे आता माझे हस्तांतर होत होते ..महाराष्ट्र पोलिसांकडून जेलच्या पोलिसांकडे ..मग मला त्या गेटच्या आत नेण्यात आले ...बाहेरचे जग पाठीमागे पडले ...आत हत्यारबंद शिपाई होते ...एक छोटेसे टेबल मांडून त्यापाशी एक वयस्कर व्यक्ती बसलेली ...माझी कागदपत्रे त्यांनी व्यवस्थित पहिली ..मग ' ४९८ काय रे ' ...असे म्हणत माझ्याकडे उपहासाने पहिले ..म्हणाला ' साल्या तुझ्या .....दम असेल तर ....बाहेर दाखव तुझी मस्ती ... मोठ्या गुंडांना दे त्रास ..घरच्या लक्ष्मीला काय सतावतोस ? ' मी निमुटपणे खाली मान घालून त्याच्या शिव्या ऐकत राहिलो ....डोळ्यात पाणी तरळले ..ते पाहून परत ओरडला माझ्यावर ' ही रडण्याची नाटकं कोणाला दाखवतोस ? घरची बाई रडली तेव्हा आली का रे भडव्या तुला तिची दया ' त्याला काही उत्तर देणे म्हणजे मार खाणे हे मी उमगलो ..गुपचूप तसाच उभा राहिलो ..मग त्याने माझी झडती घेतली ..खिश्यात असलेल्या चारपाच बिड्या माचीस काढून त्याच्या टेबलावर ठेवली ..तब्येत बरीच खालावलेली असल्याने सैल होत असलेल्या पँटला मी पट्टा लावला होता ..तो पट्टा काढून घेतला त्याने ..पट्टा काढताच पँट कमरेखाली घसरू लागली ..ते पाहून म्हणाला ' हालत बघ काय झालीय तुझी ' स्वतःशीच हसला ..मी केविलवाणा चेहरा करून त्याला पट्टा राहू द्या माझ्याकडेच अशी विनंती केल्यावर ..त्याने मला पट्टा परत केला ..मी बिड्या देखील मागुन घेतल्या ....माचीस मात्र त्याने दिली नाही ...त्याच्या जवळील रजिस्टरवर माझ्या नावाची नोंद केली .. तेथून एकाने मला आत नेले ...आत खूप विस्तीर्ण परिसर गेटच्या आतल्या बाजूने ..उंच भिंताला लागून तीन चार खोल्या होत्या ..त्यातील एका खोलीत मला नेले गेले ..तेथे एकाने माझ्या हातात एक अल्युमिनियमची खोलगट थाळी ..एक तसाच अल्युमिनियमचा धरायला दांडी असलेला मग दिला...बाजूला व्यवस्थित रचून ठेवलेल्या सतरंज्या आणि कांबळी यांच्या ठीग होता ..त्यातून एक सतरंजी ..एक जाडसर कांबळ दिले ...त्या सगळ्या वस्तू हातात धरताना माझी तारांबळ होत होती ..तेव्हा ' गांडो ..असे नाही नीट धर ' म्हणत एकाने ती साधारण दोन फुट रुंद साडेपाच फुट लांब सतरंजी खाली मला जमिनीवर पसरायला लावली .. त्यावर ते कांबळे नीट पसरून ठेवायला लावले ..एक काथ्या भरलेली टोचणारी उशी माझ्या हाती देवून ..त्यावर ठेवायला लावली .. ती गुंडाळी करून घ्यायला सांगितले ..म्हणजे बेडींग करतात तसे .. गुंडाळी माझ्या काखेत धरायला लावली ..त्याच हातात थाळी पॉट कसा धरायचा ते शिकवले ...म्हणाला '' या वस्तू सांभाळून ठेवायच्या ..हरवल्या तर परत मिळणार नाहीत ' मी होकारार्थी मान हलवली तेथून आमची वरात निघाली पुढे ....

एका ठिकाणी मध्यम उंचीची भिंत असलेला अजून एक दरवाजा लागला ..त्यावर सर्कल नंबर १ असे लिहिले होते ..दरवाजा अर्धवट उघडाच होता ..त्यातून आम्ही आत शिरलो ..आत समोर मोकळी जागा ..आणि बाजूने दोन मोठ्या बैठ्या इमारती ...त्याला बँरक ( बराक ) म्हणता हे नंतर समजले ..त्यातील एका बराक मध्ये लोखंडी जाड गजांच्या बंद दाराजवळ जावून त्याने हातातील दांड्याने त्या दारावर वाजवले ..आतून एक कैद्याचा परंतु जरा वेगळा वाटणारा ड्रेस घातलेल्या एका माणसाने दाराला आतून लावलेली कडी काढली ..मला आत घेतले ..आत मध्ये सुमारे पन्नास साठ सध्या वेशातील कैदी भिंतीला उकिडवे टेकून बसलेले .. दार उघडणाऱ्याने ( त्यांना वार्डन म्हणतात हे नंतर समजले ) मला इशारा करून एका भिंतीपाशी त्या कैद्यांसारखेचे उकिडवा बसायला सांगितले ..मी निमुटपणे बसून राहिलो ..माझी बँरक मध्ये रवानगी झाल्यावर माझी जेल प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली असावी ..कारण दार परत बंद झाले ..यावेळी ते दार मला घेवून येणाऱ्या शिपायाने बाहेरून कुलुपबंद केले होते ..बहुतेक कैदी माझ्या सारखेच नवखे असावेत असे वाटले ..कारण ते सारे अगदी केविलवाणे चेहेरे करून बसलेले ..मला जाणवले की मेंटल हॉस्पिटल मध्ये नवख्या पेशंटना सर्वात आधी जसे आँबझर्व्हेशन वार्ड मध्ये ठेवतात तसे हे होते ..नंतर दोन तीन दिवसांनी मला दुस-या ठिकाणी हलवले जाईल ..आता सगळ्या घडल्या घटनांचा विचार करत बसलो ..सगळे काही अनपेक्षित झाले होते ..काय घडतेय याचा नीट विचार करेपर्यंत मी जेलमध्ये पोचलो होतो ..घरचे लोक अशी भूमिका घेतील हे कधी स्वप्नात देखील वाटले नव्हते मला ..अर्थात त्यांच्या नाकापर्यंत पाणी आल्यामुळेच त्यांनी हे केले असावे यात शंकाच नव्हती ..खाजगी दवाखाना ..मेंटल हॉस्पिटल ..व्यसनमुक्ती केंद्र ..असे सगळे प्रयत्न माझ्या सुधारणेसाठी करून झाल्यावर देखील मी पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करत होतो ..दिवसेंदिवस माझे नैतिक अधःपतन वाढतच चालले होते ..पोलिसांची मदत घेणे हा एकमात्र पर्याय उरला होता त्यांच्याकडे ..चूक माझीच आहे हे मनाला पटत होते ..पण ते पचवता येत नव्हते ..मला एकदा तरी त्यांनी सावध करायला हवे होते ..असे उगाच वाटत राहिले ..

थंडीचे दिवस असल्याने बाहेर लवकर अंधारले होते ..बराकीच्या पाच फुट उंच भिंतीच्या वरच्या बाजूला लावलेल्या गजातून थंड वाऱ्याचे झोत आत येत होते..आतले बहुतेक कैदी आता आपापला बिछाना पसरून त्यावर कांबळे पांघरून बसलेले ..मी देखील माझे बेडींग ( बिस्तर ) उघडले ..सतरंजी भिंतीला टेकून पसरली ..कांबळे पांघरून भिंतीला टेकून बसून राहिलो ..बराकीच्या एका मोठ्या भागात सगळे कैदी ..तर साधारण पाच फुट अंतर सोडून उरलेल्या भागात विशेष वेषातील दोन वार्डन आणि त्यांच्या सोबत इतर चार जण बसलेले होते ..जरा वेळाने एका वार्डनने हातावर काहीतरी घेवून ते जरा निवडल्यासारखे केले ..मग चिलीम काढली ..माझे डोळे चमकले ..बहुतेक गांजा ओढणार होते ते लोक ..तसेच झाले ..चिलीम भरून पेटवली गेली ..दम मारणे सुरु झाले ..गांजाच्या वास पसरला सगळीकडे ....मला टर्की सुरु झालेलीच होती ..वाटले आपणही यांच्याकडे एक दम मागवा गांजाचा ..हळूच उठून मी त्यांच्याजवळ जावू लागताच त्यांच्यातील एक जण उठला ..माझ्याजवळ आला माझ्या एक मुस्कटात लावली ..' माद..... खबरदार आपल्या जागेवरून उठलास तर .' त्याने मला खास शिव्या हासडल्या ..आई वरून शिवी ऐकून माझे टाळके सटकले ..मी त्याला भिडलो ..तेवढ्यात त्याचे अजून साथीदार पुढे आले ते सगळे मला भिडले ...लाथाबुक्यांनी तुडवू लागले मला ..शेवटी माझा प्रतिकार संपला ..तसाच निपचित पडून राहिलो ..माझी कीव आल्यावर त्यांनी मला सोडले ..' फिर हमारे पास आया तो और मार खायेगा ' अशी धमकी देवून पुन्हा त्यांच्या जागेवर जावून गांजा ओढत बसले ..अपमानित झालो होतो खूप ..उठून सरकत पुन्हा माझ्या जागेवर गेलो ..भिंतीला टेकून बसलो ..

( बाकी पुढील भागात )

================================================================

पांगळा ? ? ?  ( पर्व दुसरे -भाग ११२ वा )

रात्रभर तसाच भिंतीला टेकून बसून राहिलो ..थंडी होती म्हणून कांबळे गुंडाळून घेतले होते अंगाला ....वार्डन आणि त्याचे मित्र बराच वेळ ..गांजा ओढत होते ..नंतर ते देखील झोपले ..त्यांच्यातला एक फक्त जागा राहिला बराक मधील कैद्यांवर पहारा ठेवण्यासाठी ..टर्की सुरु असल्यामुळे ...मी प्रचंड अवस्थ होतो ....त्यात काल वार्डन कडून विनाकारण मार खाल्ल्यामुळे झालेला अपमान टोचत होता ..घरच्या मंडळींचा प्रचंड राग येवू लागला होता ..मला कधी असे अडकवले जाईल असे वाटले नव्हते ..कसेही करून इथून सुटका करून घेतली पाहिजे असा विचार मनात सुरु होता ..पण आत येताना असलेले पहारेकरी ..प्रचंड मोठ्या भिंती ..सगळा कडेकोट बंदोबस्त होता ..कसे बरे बाहेर पडावे ..मला पँपिलाँन कादंबरीतील हेन्री आठवला ..त्याने जेलमधून पळून जाण्यासाठी केलेल्या एकेक युक्त्या आठवल्या ...काहीतरी कल्पना करत ..बिड्या ओढत टाइम पास करत होतो खरा ...येथे जेव्हा एखाद्या कैद्याला रात्री लाघवी किवा संडासला उठायचे असे तेव्हा तो ..आधी बसल्या जागेवरून पहारा करणाऱ्याकडे पाहून जोरात ओरडून सांगे ..पेशाब ..किवा संडास ..असे सांगितले नाही तर तो पहारेकरी लगेच दंड्याने फटके देत असे ..कारण तुम्ही असे उठण्याचे कारण न सांगता आपल्या जागेवरून निर्हेतुक उठूण्यास सक्त मनाई होती ...पहाटे पहाटे एकदम बाहेरून ' जय श्रीराम ' ..बजरंगबली की जय ' अशा मोठ्याने दिलेल्या घोषणा ऐकू आल्या ..नंतर थोड्याच वेळात ..' अल्ला हो अकबर ' अशा ही घोषणा ऐकू आल्या ....बराच वेळ असे घोषणा युद्ध सुरु राहिले ..मग वार्डन साडेपाचला उठल्यावर त्याने गिनती असा पुकारा केला ..तसे सगळे कैदी एकमेकांचा हात धरून जोडीने खाली बसले ..मी पण एकाचा हात पकडला होता ..बाहेरून कुलूप काढल्याचा आवाज आला ..गरम ओव्हरकोट घातलेले दोन शिपाई आत आले ..त्यांनी सगळे कैदी मोजले ..मग ते बाहेरून कुलूप लावून गेले ...बराकमधील सगळे कैदी आपापले बिस्तर गुंडाळून कांबळे पांघरून भिंतीला टेकून बसले ....बाहेर थोडे फटफटत असताना बाहेरून कुलूप काढले गेले ....सगळे कैदी बाहेर पडले ..बंदी खुलली होती ..जेल मध्ये सकाळी ६ ते दुपारी ११ पर्यंत बराक बाहेरच्या पटांगणात कैदी मोकळे असतात ..त्या वेळात ..चहा ..जेवण ..अंघोळी ..कपडे धुणे वगैरे कामे करण्यासाठी मोकळे सोडले जाई ..नंतर ११ ते ३ सगळे बराक मध्ये बंद ... पुन्हा दुपारी ..३ ते सायंकाळी ५ पर्यंत बंदी खुलत असे ..५ नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ पर्यंत बराक बंद ..असे टाईम टेबल आहे हे एकाने मला सांगितले ..बराक उघडल्यावर मी कांबळे गुंडाळून बाहेर आलो ..बाहेरच्या पटांगणात एक साधारण तीस फुट लांब आणि सहा फुट मोठा असा पाण्याचा कालवा होता ..म्हणजे त्या सिमेंटने बांधलेल्या खोलगट भागात ....मोठ्या नळाने पाणी सोडले जाई ..त्याच्या दोन्ही बाजूला काळ्या दगडांनी बांधकाम होते ज्यावर कैदी बसून खाली वाकून त्या कालव्यातून वाहणारे पाणी घेवून तोंड धुणे ..बादलीत पाणी भरून घेवून अंघोळी करणे वगैरे कामे करत असत ..त्याला हौद म्हणतात हे समजले ..

सगळे कैदी हौदावर तोंड धुवत होते ..तितक्यात बाजूच्या बराकीतून एकदम एक मोठा घोळका बाहेर पडला ..सुमारे १०० तरी लोक असावेत ..सगळे तरुण होते ..त्यांनी बाहेर पडल्यावर '' जय श्रीराम ' अशा घोषणा सुरु केल्या ...त्यांच्या घोषणा सुरु झाल्यार बाजूच्या सर्कल मधून 'अल्ला हो अकबर ' असा पुकारा सुरु झाला ....जरा चौकशी केल्यावर कळले की काल रात्री पासून मालेगाव मध्ये हिंदू -मुस्लीम दंगल सुरु झाली होती ... दंगलखोर लोकांना पकडून रात्री पासून येथे आणले जात होते ..घोषणा बाजीने वातावरण जरा वेळ तंग झाले होते ..मला बाहेर जास्तच थंडी वाजू लागली तसा मी पुन्हा बराक मध्ये जावून बसलो ....माझ्या बाजूला एक जण येवून बसला ...माझी विचारपूस करू लागला ..त्याने बहुधा रात्री मी मार खाल्लेला पहिला असावा ..बहोत मारते हे साले ..अशीच सुरवात केली त्याने ..पुढे म्हणाला ...मेरेको भी मारा था ..गप्पा मारताना कळले की तो कलकत्त्याचा होता ..ड्रायव्हर ...अपघाताच्या केसमध्ये बंद झाला होता ..त्याचा मालक लवकरच त्याचा जामीन करून त्याला सोडवणार होता ...मला मात्र जामीन मिळण्याची काहीही व्यवस्था नव्हती ..कारण घरच्या मंडळींनीच ..माझ्यावर केस केलेली ..जामीन देणार कोण ? हताशपणे बसून होतो ..बाहेर चहाचा पुकारा झाला ..तसा बाहेर जावून रांगेत उभा राहिलो ..दोन कैदी एका मोठ्या अल्युमिनियमच्या पातेल्यातून चहा वाटत होते ..जेमतेम कोमट असा चहा ..मगमध्ये चहा घेवून पुन्हा बराकीत ...येथून बाहेर कसे पडावे हाच विचार मनात होता ..एकाला विचारले की इथे जर कोणी आजारी वगैरे पडला ..किवा काही गंभीर अपघात झाला तर कैद्याला कुठे नेतात ? तेव्हा त्याने सांगितले की येथेच जेलचे हॉस्पिटल आहे दुसऱ्या सर्कल मध्ये ...तेथे नेतात ..आणि तेथे जर उपचार होण्यासारखा नसेल तर कैद्याला बंदोबस्त देवून बाहेर सिव्हील हॉस्पिटल मध्ये पाठवतात ..मला हीच माहिती हवी होती ....कसेही करून इथून बाहेर पडू ..नंतर पुढचे पाहू ....मी बराक मधील संडासचे निरीक्षण करून आलो होतो मघाच ..तेथे जमिनीवर पाणी सांडलेले होते ...एकच संडास होता ...एकूण ६० लोकांना मिळून ..मात्र स्वच्छ ..जरी सिरेमिकचे भांडे मोडके होते तरी संडास मात्र चांगलाच स्वच्छ वाटला ...पन्हा संडास जवळ गेलो ..आत कोणीतरी बसले होते ..आतील व्यक्ती बाहेर येण्याची वाट पाहत उभा राहिलो ..तो बाहेर पडतानाच पाय घसरून पडल्यासारखे नाटक करून त्याच्या अंगावरच पडलो ..तो एकदम घाबरला ..बाजूला सरकला ..मी खाली पडलो ..आणि मोठ्याने विव्हळू लागलो ...माझे ओरडणे ऐकून वार्डन आला संडासात ...मला हात देवून उठवू लागला ..मात्र मी मोठ्याने विव्हळत होतो ..उठताच येत नाही असे भासवत होतो ..मग मला दोघांनी ओढत बाहेर आणले ...मी जणू कमरेखाली पांगळाच झालोय असे नाटक करत होतो ...फक्त बसता येत होते ..बाकी उठून उभे राहणे ..चालणे तर अशक्यच ...

वार्डनचा चेहरा जरा चिंतीत झाला ...मी विव्हळत त्याला सांगितले की माझे पाठीच्या मणक्याचे आँपरेशन झाले होते ...तेथेच मार लागला आहे परत ..त्याने माझ्या पाठीवर पहिले ..टाके घातल्याची खुण होतीच ...तरीही त्याला खात्री वाटत नव्हती ..' होगा ठीक एक दो घंटेमे असे म्हणत त्याने मला तसाच ओढत भिंतीला टेकवून बसवले ..आता जेलचे डॉक्टर येवून मला तपासतील ..पाठीच्या मणक्याचे नाजूक काम असल्याने सी टी स्कँन किवा एक्स रे काढण्यासाठी मला बाहेरच्या हॉस्पिटल मध्ये न्यावेच लागेल यांना ..असा माझा अंदाज होता ..त्यानुसार समस्येची गंभीरता वाढावी म्हणून मी सारखा विव्हळत होतो ..मध्ये एकदा लघवीला जायचे म्हणून तसाच बुडावर सरकत सरकत पांगळ्यासारखा संडासकडे गेलो ...माझ्या कडे पाहून इतर कैदी हळहळत होते ..ज्यांनी काल रात्री मला मारताना पहिले होते ..त्यांना वाटे कालच्या रात्रीच्या मारामुळेच असे झाले असावे याला ..त्यापैकी एक म्हणाला ..अभी जमादार और डॉक्टर आयेगा तो ये वार्डन ने मारा है ऐसा बताओ ...मी नुसताच विव्हळत होतो ..माझी अवस्था पाहून रात्री मला मारणाऱ्या वार्डनने मला स्वतः पुन्हा थोडा चहा आणून दिला ..बिडी देखील पाजली ..बहुधा तो घाबरत असावा की मी पांगळा होण्याला त्याला जवाबदार ठरविन की काय ? मला हळूच म्हणाला देखील तो ..रातको तो हमने जादा नाही मारा था ....ये कमर का लफडा तो सबेरे तू गिर गया इसलिये हुवा है ' ...माझा प्लान चांगलाच प्रभावी ठरत होता ...

( बाकी पुढील भागात )

=====================================================================

जेलचे रुग्णालय ! ( पर्व दुसरे -भाग ११३ वा )

माझे कमरे खाली अधू झाल्याचे नाटक मी सुरूच ठेवले ..दुपारी दोन वाजेपर्यंत चार वेळा मुद्दाम संडासकडे बुडावर सरकतच गेलो ..तेथे खालची जमीन ओली होती .. पँट त्यामुळे सगळी मागून ओली झालेली ..मला पोलिसांनी अंगावरच्या कपड्यासहित घरातून उचलले होते ..तेथून थेट कोर्ट ..सेन्ट्रल जेल .असा प्रवास झाला असल्याने ..माझ्याकडे अंगावरच्या एक पँट ..बनियन ..अंडरवेअर ..टीशर्ट ..या खेरीज दुसरे कपडे नव्हतेच ..मँजिस्ट्रेट कस्टडी मिळालेल्या कैद्याला घरचे कपडे वापरता येतात ..ज्यांना आरोप सिद्ध होऊन शिक्षा सुनावली जाई त्यांना मात्र जेलचे कैद्याचे कपडे घालावे लागत ..पँट आणि आतून अंडरवेअर देखील बुडावर सरकत पाण्यात गेल्याने पूर्ण ओली झालेली होती ..त्यामुळे खूप अवस्थ वाटत होते ..अवघडल्या सारखे झाले होते ..त्यात टर्की सुरु ..प्रचंड उलघाल होत होती शरीरमनाची .. बदलायला दुसरे कपडेही नव्हते . माझे नाटक उत्तम वठण्यासाठी मला तसेच बुडावर सरकत राहणे भाग होते ..सध्या आमच्या सेंटरला दाखल झाल्यावर काही व्यसनी सुरवातीच्या काळात ..कसेही करून घरी जायला मिळावे म्हणून ..तब्येत खराब झाल्याची ..छातीत दुखत असल्याची ..वगैरे नाटके करतात ..त्यांना वाटते आपल्याला लगेच हे लोक व्यसनमुक्ती केंद्रातून काढून हॉस्पिटलला नेतील ..घरच्या मंडळींची भेट घालून देतील ..मग शपथा ..वचने ..इमोशनल ब्लँकमेलिंग ..वगैरे करून आपण डिस्चार्ज घेवू ..माझी गाठीला व्यसनी व्यक्ती किती नाटके करू शकतो या बद्दल स्वतचा चांगलाच अनुभव असल्याने ..मी त्यांची डाळ शिजू देत नाही ...

बराकमधील सगळे कैदी वार्डनला ...बेचारे को जल्दी दवाखानेमें ले जावो असा आग्रह करत होते ...त्याला ही तसेच वाटत होते ..मात्र मी त्याने रात्री मला साथीदारांसोबत मारहाण केल्याची तक्रार करीन बाहेर पडल्यावर अशीही त्याला भीती वाटत असावी ...तो सारखा मला बिडी देवून ..मी रात्रीची घटना विसरावी इतके चांगले वागत होता माझ्याशी ..शेवटी दुपारी तीन वाजता ...मला एका चादरीवर ठेवून ..ती चादर चार कैद्यांनी उचलून मला बराक मधून बाहेर काढले ..तशीच चादरीची झोळी उचलून मला सुमारे शंभर मीटर दूर ..उंच भिंतीच्या आतच असलेल्या जेलच्या रुग्णालयात नेले ..तेथे अँप्रन चढवलेल्या एका डॉक्टरने मला तपासले .... पालथा करून पाठीच्या जखमेवरची खुण तपासली ..कसा पडलास वगैरे प्रश्न विचारले ..मी रात्रीच्या मारहाणीचा अजिबात उल्लेख न करता ..संडासात पडलो असे सांगितले ..तेव्हा सोबत आलेल्या वार्डनला सुटल्यासारखे वाटले ..डॉक्टरने गंभीर चेहरा करून मला हॉस्पिटलला दाखल करून घेतले ..मला तेथे सोडून जाताना बराकच्या वार्डनने मला त्याचे नाव सांगितले नाही याचे बक्षीस म्हणून एक बिडी बंडल माचीस दिले ...जेलच्या रुग्णालयात सगळे पलंग भरलेले असल्याने मला तात्पुरते ..जमिनीवरच जागा मिळाली ..चला इथपर्यंत तर सगळे मनासारखे घडत होते ..बिडी बंडल देखील मिळाला होता ..आता इथून लवकरात लवकर बाहेरच्या उंच भिंती बाहेरच्या दवाखान्यात कसे जाता येईल याचे विचार सुरु होते माझ्या मनात ..पांगळेपणाचे नाटक डॉक्टरच्या देखरेखी खाली उत्तम वठायला हवे होते ..चौकशी करत असताना मी ब्राऊन शुगरचा व्यसनी आहे हे डॉक्टरला सांगितले होते ..त्यामुळे मला टर्की होत असणार हे तो जाणून होता ..त्याने मला एक फोर्टविन चे इंजेक्शन दिले ..पेन किलर म्हणून आणि टर्की कमी व्हावी म्हणून ...ती रात्र जरा बरी गेली ..फोर्टविनच्या इंजेक्शनमुळे जरा गुंगीत होतो ..टर्की फारशी जाणवली नाही ..मात्र झोप अजिबात्र लागली नाही ..रात्री पुन्हा ..तशीच संडासकडे बुडावर सरकत जाण्याची कसरत दोन वेळा केली ..

दुसऱ्या दिवशी सकाळी तसाच बुडावर सरकत हॉस्पिटलच्या व्हरांड्यात येवून उन खात बसलो ..हॉस्पिटल मधील इतर आजारी कैदी माझ्याकडे सहानुभूतीने पाहत होते..एकाने तर स्वतचा पलंग मला देवू केला ..मात्र मी नाकारले ..बसल्या जागेवर चहा मिळाला ..याला बिचाऱ्याला लवकर बाहेरच्या दवाखान्यात नेले पाहिजे ..तरच काहीतरी ऑपरेशन होवून हा नीट होईल ..नाहीतर जन्मभराचा पांगळा होईल असे त्या कैद्यांना वाटत होते ....बाहेर चोऱ्या ..मारामाऱ्या..दरोडे ..असे गंभीर गुन्हे करणाऱ्यांच्या मनात असा माणुसकीचा ओलावा पाहून मला गम्मत वाटली मानवी मनाची ...एकाने तर मला जेल प्रशासनाच्या बद्दल त्याच्या मनात राग असल्याने ...मला लवकर बाहेरच्या हॉस्पिटल मध्ये न्यावे यासाठी एक भलतीच आयडिया सुचवली... आता जेव्हा दहा वाजता जेलर राउंडला हॉस्पिटलला येतील तेव्हा ..माझ्या जवळील चहाच्या पाँट मध्ये संडास मधील मैला भरून तो पाँट मी जेलरच्या अंगावर फेकावा असे त्याचे म्हणणे होते ...आयडिया जरी अफलातून असली तरी मी तसे करणे नाकारले ..कारण त्यानंतर जेलर नेमकी काय भूमिका घेईल या बाबत मी साशंक होतो ...दहा वाजता जेलर राउंडला आल्यावर मी मुद्दाम बुडावर सरकत त्याच्या जवळ गेलो ..काय झाले असे त्याने विचारले ..तेव्हा संडासात पडलो ..पूर्वी ऑपरेशन झाले आहे वगैरे सांगितले ..ठीक आहे ..पाहू इतकेच म्हणून जेलर पुढे गेला ..मला वाटले होते तो मला सिव्हील हॉस्पिटलला नेण्याबाबत सूचना देईल ..मात्र ते घडले नाही ..मी जरा निराश झालो ..मात्र पांगळेपण सुरूच ठेवायचे पक्के केले ..कधी ना कधी ..त्याला कीव येईलच माझी ..एकाने सांगितले की तुझ्याकडे पैसे असतील तर ..तुला बाहेर हॉस्पिटलला लगेच जाता येईल ..इथे बाहेरच्या हॉस्पिटलला रेफर करण्याचे पैसे घेतात ..कोणीही कैदी.. डॉक्टर ..जेलर वगैरेना पैसे खाऊ घालून ..आजाराचे निमित्त करून ..काही दिवस बाहेरच्या जगात जावून येतो ..मग तेथे ..नातलगांच्या भेटी गाठी घेतो ..सर्व इच्छा पूर्ण करून परत आत येतो ..माझ्याकडे फुटकी कवडी नव्हती ....त्यामुळे हा मार्ग मला लागू होत नव्हता ..बाहेरच्या हॉस्पिटल मध्ये रेफर करण्याचा त्यावेळचा रेट पाचशे रुपये आहे ही माहिती पुरवली त्याने .. जेल मध्ये जरी सर्वसाधारण कैद्यांना पैसे जवळ ठेवण्यास मनाई होती ..तरीही अनेक भाई लोकांकडे खूप पैसे असतात ..ते मदत करतात एखाद्या कैद्याला ..बाकीचे कैदी हा व्यवहार नातलगांमार्फत बाहेर जेलरची किवा डॉक्टरची भेट घडवून करतात ...जो खरोखर आजारी असेल त्याला देखील हे लोक चाचपडून पाहतात ..पैसे मिळाले तरच बाहेरच्या दवाखान्यात पाठवतात ..अन्यथा मग कोर्टाकडून आदेश मिळाला तर यांचा नाईलाज होतो ..किवा अगदीच एखादा मृत्यू पंथाला असेल तर त्याच्यावर लवकर कृपा करतात अशी माहिती मिळाली ..म्हणजे एकंदरीत इथून बाहेरच्या हॉस्पिटल मध्ये जाणे दिव्यच होते तर ...!

( बाकी पुढील भागात )

=====================================================================

दुर्दशा ! ( पर्व दुसरे -भाग ११४ वा )


जेलर ..डॉक्टर ..यांनी एकंदरीत माझ्या समस्येकडे दुर्लक्ष करून ..माझी जिद्द वाढवली होती ..कसेही करून जेलच्या बाहेरच्या हॉस्पिटल मध्ये जायचेच हा निर्धार झाला ..दिवसभर मी तसाच बुडावर सरकत ..विव्हळत ..कण्हत ...घालवला ..टर्की सुरु असल्याने भूक लागण्याचा प्रश्नच नव्हता ..दोन वेळा चहा मिळाला ....सायंकाळी बंदी झाल्यावर ...मी कंबर जास्तच दुखते आहे असे भासवू लागलो ..मोठ्याने विव्हळू लागलो ...माझे असे करुण विव्हळणे हॉस्पिटल मधील इतर कैद्यांना त्रासदायक होऊ लागले होते ..आठ वाजता एक जमादार राउंडला आला ..मेंटल बहुधा त्याची रात्रपाळी होती ..मेंटल हॉस्पिटल मध्ये जसे ओव्हरसीयर रात्रपाळी करून दर दोन तासांनी प्रत्येक वार्ड मध्ये राउंड मारतात तसेच हे होते ...माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून तो जमादार माझ्याजवळ आला ....माझी चौकशी करून माहिती घेतली ..तुला पाठवू एकदोन दिवसात सिव्हील हॉस्पिटलमध्ये असे आश्वासन दिले ..तो पर्यंत शांत राहा ..उगाच ओरडून सगळ्यांची झोप खराब करू नकोस असे मला बजावले .....मला झोप लागावी म्हणून रात्रपाळीच्या डॉक्टरकडून त्याने मला दोन कंम्पोझ च्या गोळ्या आणून खायला घातल्या ..ब्राऊन शुगरच्या व्यसनीला ..टर्कीत असताना सर्व साधारण झोपेची औषधे दिली तर तो हँलुस्नेशन मध्ये जातो ..असा माझा अनुभव होता ...परंतु दोन गोळ्या माझ्या हातावर देवून जमादार ..समोरच उभा राहिला ...त्यामुळे त्या गोळ्या घेणे मला भाग पडले ...त्या गोळ्या घेतल्यानंतर देखील माझे विव्हळणे सुरूच होते ..दोन तासांनी पुन्हा राउंडला आल्यावर त्या जमादाराने वैतागून मला अजून दोन गोळ्या आणून दिल्या ..कसेही करून माझा आवाज बंद करायचा होता त्याला ..एकूण चार झोपेच्या गोळ्या पोटात गेल्यावर ..जरा बरे वाटले ..थोडीशी गुंगी वाटली ..म्हणून भिंतीला टेकून.. डोळे मिटून जरा वेळ बसून राहिलो ..

बहुतेक रात्रीचे दहा वाजून गेला असतील ...नंतर चार पाच तास काय घडले ते मला आठवत नाही ....परंतु एक अंधुक आठवते ..की पलंगावरचा एक कैदी ..मला पुस्तक वाचायला देण्यासाठी त्याच्या जवळ बोलवत होता ..मी बुडावर सरकत सरकत त्याच्याजवळ गेलो ..नंतर माचीस संपली म्हणून एक दोन कैद्यांकडे माचीस मागत होतो ...हे सगळे उद्योग बुडावर सरकतच चालले होते माझे ....अचानक कोणीतरी फाडकन माझ्या गालात लावली ..मी डोळे उघडले तर समोर वार्डन त्रासिक मुद्रेने उभा ..काय प्रकार आहे ? मला याने असे अचानक का मारले असावे ते समजेना .... तो म्हणाला ..' साले एक जगह पे बैठे रहेना ..यहां वहां क्यू घूम रहा है ..लोगोके बिस्तर के नीचे हात डाल रहा है ...कितना मार खायेगा और ' ..माझ्या भोवती बरेच कैदी घोळक्याने उभे होते ..मग मला जाणवले ..मी बहुतेक हँलुस्नेशन मध्ये गेला असणार ..त्या भ्रमाच्या अवस्थेत मी उगाच इकडे तिकडे बुडावर सरकत फिरत होतो ..माचीससाठी पलंगावर झोपलेल्या कैद्यांच्या गादीखाली हात घालत होतो ..मी काही चोरतोय की काय असे वाटून ..तो पलंगावरचा कैदी मला दोन थोबाडीत मारत होता ..शरमून ..जरा वेळाने तेच तेच करत होतो ..मध्येच आईच्या ..मानसीच्या नावाने जोरजोरात हाक मारत होतो ..असे उद्योग जवळ जवळ तीन तास सुरु असावेत माझे ..मी हात जोडून वार्डनला सांगितले ..' वो निंद के गोली की वजह से मुझे ऐसा हो रहा है ..' खबरदार अभी अपनी जगह से हिला तो ..बांधके रखेंगे अशी त्याने ताकीद दिली ..मी गुपचूप भिंतीला टेक्न बसलो ..मला स्वतच्या अंतर्मनाचे खूप आश्चर्य वाटले ....हँलुस्नेशन मध्ये गेल्यावर स्थळ ..काळाचे भान हरपते ..कानात आवाज ऐकू येतात ...डोळ्यासमोर काही भ्रम निर्माण होतात ..हे खरेच आहे ..मात्र मी कमरेखाली अधू झालो असून मला चालता येत नाहीय ..हे मी करत असलेले नाटक ..हँलुस्नेशनच्या काळात देखील सुरु होते ..म्हणजे मी अंतर्मनाला दिलेली पांगळेपणाची सूचना अंतर्मनाने ..हँलुस्नेशन च्या काळात देखील लक्षात ठेवली होती ..त्या भ्रमाच्या अवस्थेतही ..जरी स्थळ ..काळ..व्यक्तींची ओळख याचे माझे भान हरपले होते ..तरीही सगळे उद्योग मी बुडावर सरकतच करत होतो ..पांगळेपणाचे नाटक काही विसरलो नव्हतो ..मानवी मन हे खरोखर अतिशय शक्तिशाली आहे ..हे पुन्हा पटले ..जर त्या मनाला सकारात्मक विचारांचे खाद्य देत राहिले तर ..ते नक्कीच सगळे व्यक्तिमत्व बदलविण्यास कारण बनते ..आणि नकारात्मक विचार करत राहिल्यास .. जीवनाची दुर्दशाही करते .

आता पुढे काय ..मी एकदम त्रासून गेलो होतो ..एकतर सारखे बुडावर सरकून कपडे खराब झालेले ..जमिनीवर हात टेकवून बुडावर सरकावे लागे ..त्यामुळे हात देखील दुखत होते ..टर्की ..थंडी ..संपत आलेल्या बिड्या ...वैताग होता नुसता ..सगळे शरीर गलीतगात्र 
झालेले ..मनात एक कल्पना चमकली ...मी कमरेच्या पँटला लावलेला चामडी पट्टा झडती घेताना तेथील शिपायाने मला पँट सैल होते म्हणून परत केला होता ..तो पट्टा मी काढला आणि गळ्याभोवती आवळला ..दोन्ही हातानी पट्ट्याची दोन टोके जोरात ताकद लावून विरुद्ध दिशेला ओढू लागलो ..गळ्याला फास बसत होता ..श्वास कोंडल्या सारखे झाले ..खरे तर असे स्वतच्या हाताने स्वतःला फास लावून घावून मरणे शक्य नसते..कारण जरा जास्त वेळ श्वास कोंडला गेला की हात आपोआप सैल पडतात ..फासाची ओढ कमी होते ..मात्र मी नेटाने प्रयत्न करतच होतो ..श्वास कोंडला गेला की गळ्यातून विचित्र घुसमटल्याचे आवाज येत होते ..खोकला येत होता ..हे सगळे जरा दूर बसलेला एक कैदी पाहत होता ..तो एकदम मोठ्याने ओरडला ..' अरे ..अरे . ..बचावो ..मार जायेगा ये ' ..त्याने अशी बोंब ठोकल्यावर पुन्हा सगळे कैदी उठले ....वार्डन माझ्याजवळ आला .. माझ्या हातातील पट्टा काढून घेतला ..यावेळी त्याने मला मारले नाही ..त्यालाही माझी दया आली असावी ' तू खुद भी तकलीफ मे है ..और दुसरो को भी तकलीफ मे डाल रहा है ..' त्याने मग त्याच्या साथीदार कैद्यांच्या मदतीने एक पलंग रिकामा करून मला पलंगाला बांधले ...म्हणजे पुन्हा मी आत्मघात करू नये ..

( बाकी पुढील भागात )


हँलुस्नेशन म्हणजे नेमके काय ते माहित करून घेण्यासाठी खालील लिंक पहा !

=====================================================================

सुटका ????  ( पर्व दुसरे -भाग ११५ वा )

मला जेमतेम दोन वेळा लघवी..संडास साठी सोडावे असा आदेश जमादाराने दिला होता ...पहाटेचे बहुतेक पाच वाजत आलेले असावेत ..पलंगावर बांधलेल्या अवस्थेत मी पडून होतो ...वार्डन उठला होता ..इतक्या पहाटे उठून स्नान वगैरे करून तो ..त्याचा बिस्तर असलेल्या कोपऱ्यात मांडी घालून डोळे मिटून बसला होता ..मला वाटले काहीतरी बैठे काम करत असेल ..नीट निरखून पहिल्यावर जाणवले तो डोळे मिटून ध्यानस्थ बसला होता ..अगदी निश्चल ...मग जाणवले तो ध्यान करतोय ..मी थक्कच झालो ..इथे जेलमध्ये कोणी ध्यान करणारा सापडेल असे स्वप्नातही वाटले नव्हते मला ..सुमारे तासाभराने बंदी उघडण्याच्या सुमारास तो उठला ..मला चहा हवा का विचारू लागला ..मी त्याला विचारलेच ' आपण आता ध्यान करत होता का ? ' तो हसला आणि म्हणाला ध्यान नाही त्याला ' विपश्यना ' म्हणतात ..म्हणजे 'विपश्यना ' इथेही पोचली होती तर ..त्याची चौकशी केल्यामुळे त्याला जरा बरे वाटले ..मला त्याने पाँट मध्ये चहा आणून दिला ..सांगू लागला ..मागच्या वर्षी इथे जेल मध्ये 'विपश्यना ' चे शिबीर झाले होते ..अनेक कैद्यांनी त्यात भाग घेतला होता ..तेव्हा मी हे शिकलो ..त्या शिबिरासाठी किरण बेदी यांनी पुढाकार घेतला होता....मला आठवले ..किरण बेदी यांनी ' तिहार ' जेल मध्ये जेलर असताना तेथे ' विपश्यना ' शिबीर घेतल्याचे वाचले होते वर्तमान पत्रात ..पुढे अशी शिबिरे त्यांनी देशभरातल्या सर्व कारागृहात घेण्यासाठी आग्रह केला होता .. तो वार्डन पुढे सांगू लागला ...खूप शांत वाटते यामुळे ...मी फार रागीट होतो पूर्वी ..रागाच्या भरात त्याच्या हातून खुन झाल्यामुळे त्याला सक्तमजुरीची शिक्षा झाली होती .. ..दीर्घकालीन शिक्षा झालेल्या कैद्यांना त्यांची जेलमध्ये चांगली वागणूक असेल ..तर वार्डन करण्यात येते ..म्हणजे त्यांना विशिष्ट पगार दिला जातो ..त्यांचा वापर बराकीत व्यवस्थापन करण्यासाठी ..जेलच्या आतच ..इतर सरकारी कामात मदत करण्यासाठी केला जातो ..पिवळी विजार आणि पांढरा शर्ट ..कमरेला पट्टा असा त्यांचा वेष असे ...वार्डन म्हणजे थोडक्यात कैदीपोलीस असे म्हणता येईल ...मी त्याला मला सिव्हील हॉस्पिटल मध्ये केव्हा नेणार असे विचारले तेव्हा म्हणाला ' कल रातको तुने जो लफडा किया ..उसके बाद अब तेरेको यहां रखना खतरा है ऐसा डॉक्टर साहब बोल रहे थे ..शायद आज भेज देंगे तुझे ' बरे वाटले ते ऐकून ..बाहेरच्या हॉस्पिटल मध्ये नेले की तेथून सोबत असलेल्या शिपायाला पटवून त्याला घरी फोन करायला लावू ..माझी अवस्था खूप वाईट आहे असा निरोप द्यायला लावू त्याला ..म्हणजे मग भाऊ लवकर जमीन करून मला सोडवेल ही अशा होती मला..किवा संघी मिळाली तर सरळ पळून जायचे तेथून मुंबईला .असे माझ्या मनात होते .

वार्डन ने सांगितले तसेच घडले ..त्या दिवशी सकाळी जेलर राउंडला आल्यावर माझ्या जवळ आला म्हणाला ..आज पाठवू तला हॉस्पिटल मध्ये ...त्यानुसार दुपारी दोन वाजता ..मला पलंगावरून सोडले गेले ..एका स्ट्रेचर वर झोपवून ते स्ट्रेचर कैद्यांनी उचलून बाहेर जेलच्या मोठ्या दारापाशी आणून ठेवले ..सुमारे तासभर तसाच दारापाशी स्ट्रेचरवर पडून होतो ..मग गेटबाहेर गाडी लागलीय असा निरोप आल्यावर मला उचलून बाहेर गाडीत आणून ठेवले गेले ...चला ..एकदाचा बाहेर पडलो जेलच्या ..तीन दिवसात मी क्लृप्ती करून बाहेर येण्यात यशस्वी झालो याबद्दल स्वतची पाठ थोपटली ..मोठ्या निळ्या गाडीत अजून तीन चार कैदी चार शिपाई बसले होते ..त्या कैद्यांना देखील हॉस्पिटल मध्ये नेण्यात येणार असावे .. तासाभरात पोचली गाडी सिव्हील हॉस्पिटल मध्ये ..ताबडतोब मला स्ट्रेचर वरून उचलून ' आपत्कालीन विभाग ' अशी पाटी असलेल्या वार्ड मध्ये नेले गेले ....तेथे पलंग सज्ज होते ..एका पलंगावर मला झोपवून डॉक्टरांनी तपासले ..उद्या एक्सरे काढून नक्की काय ते समजेल ..असे म्हणाले ..मग मला सलाईन लावले गेले ...माझ्यापाशी एक शिपाई थांबला होता पहारा म्हणून ..गेल्या तीन दिवसात पोटात चहा खेरीज काहीही नव्हते ..टर्की सुरु असल्यामुळे भूक लागलीच नव्हती ..त्या वार्डमध्ये एकूण २० पलंग असावेत ..त्यापैकी जेमतेम पाच पलंग भरलेले होते ..बाकी वार्ड रिकामाच होता ..बाहेर अंधारले होते ..माझ्या योजनेचा पुढील भाग म्हणून मी माझ्या सोबत थांबलेल्या शिपायाला पटवण्यास सुरवात केली ...

त्याला म्हणालो ' ये मेरे ससुराल वालो की चाल है ..मुझे गलात फसाया है उन्होने '...वगैरे ' तो नुसताच हम्म ..ह्म्म्म करत होता ..पुढे म्हणालो अभी मेरे घरवालोको मै ऐसी तकलीफ मे हु ऐसा पता चला तो वो तुरंत मिलने आयेंगे ..मेरा जामीन करायेंगे ...तो माझ्या बोलण्यात अडकतोय असे जाणवत होते मला ..माझ्याबद्दल दया उत्पन्न होत होती त्याच्या मनात ..शेवटी म्हणालो ..आप अगर मेरे घर को एक फोन करके ..उन्हे बतायेंगे के मै यहां बिमार हु ..तो वो तुरंत आयेंगे ..वो आनेके बाद मै आपको खुश करुंगा ..वगैरे ..त्याच्या मनात लालूच उत्पन्न झालीच ..कितने पैसे देगा मेरेको ? त्याने विचारले .. मी त्याला तुला दोनशे रुपये देईन असा सांगितले ..शेवटी तो तयार झाला ... पैश्याच्या लालचेने सहजगत्या विकली जाणारी माणसे भरपूर सापडतात... नितीमत्तेपेक्षा पैश्यांना जास्त महत्व प्राप्त झालेय..त्या जोरावरच तर अनेक राजकारणी ..भ्रष्टाचारी ..समाजकंटक राजरोस वावरत आहेत समाजात ...जेथे पैसा काम करत नाही तेथे ..सहानुभूती ..करुणा ..दया या मानवी भावना नेमक्या नकारात्मक कारणांसाठी वापरता येतात ...तो शिपाई फोन करण्यास तयार झाला ..जरा वेळाने जेव्हा इतर कैद्यांना दुसऱ्या विभागात घेवून गेलेला त्याचा साथीदार परत आला तेव्हा ..साथीदाराला माझ्यापाशी थांबवून तो माझ्याकडून घरचा फोन नंबर घेवून गेला फोन करायला .. पंधरा मिनिटांनी तो परत आला... थोडा चिडलेला..म्हणाला तेरा भाई तो बहोत कडक बात किया मेरेसे ..बोला ..वो हमारे लिये मर गया है ..उसके मरनेके बाद हमे खबर करो ..हे ऐकून मी जरा हादरलो ..त्याला म्हणालो ..आपने भाई से नही मेरी मां से बात करनी चाहिये थी..यावर म्हणाला ' मुझे सब बात दिया है उन्होने ..मग मराठीत म्हणाला ' साल्या तू गर्दा पितोस ..घरच्यांना खूप त्रास देतोस असे मला समजलेय ..तुझा भाऊ म्हणाला की तो खूप नाटकी आहे ..त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका ..यापुढे आमच्याकडे फोन केलात तर मी तक्रार करीन ...वगैरे !..माझा सगळा प्लान फसला ...आता पुढे काय ..खूप निराश झालो होतो....मी घरच्यांसाठी मेलोय असा निरोप ऐकून खूप रडू येवू लागले ..माझ्या व्यसनापायी ..हट्टीपणापायी ..गेल्या पंधरा वर्षात मी काय काय त्रास दिलाय ते आठवू लागले ..प्रत्येकवेळी आता तरी हा सुधारेल या आशेने घरच्या लोकांनी मला मदतच केली होती ..शेवटी जेव्हा आईच्या जीवावर बेतले ..त्यातही मी आईची पाटली काढून विकली ..हे सर्व म्हणजे नीचपणाचा कळसच होता माझ्या ...थोडासा आनंद ..तणावमुक्ती ..गम्मत ..म्हणून जीवनात आलेले व्यसन आता सगळ्या कुटुंबियांना जीवघेणे ठरले होते ..मी एकदाचा मेलो तरच बरे असे त्यांना वाटत होते ..माझी हुशारी ..चतुराई ..बुद्धी ..सगळ्या क्षमता मी वापरून माझाच विनाश करत होतो ...स्वतः बद्दल घृणा वाटू लागली मला ..

तो शिपाई मला निरोप देवून .. बाहेर जावून उभा राहिला ...जाताना त्याने आठवणीने खिश्यात लोंबकळणारी बेडी काढून ..माझा एक पाय बेडीने पलंगाच्या दांडीला अडकवला होता ..उठून पळून जाणे शक्यच नव्हते ..आता खरोखर आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे काहीही पर्याय नव्हता ..मी सावधपणे आसपास नजर फिरवली ..माझा पलंग एका खिडकीपाशी होता ..थोडी मान वर करून मागे वळून पहिले ..डोक्याच्या मागे असलेल्या खिडकीत ..इंजेक्शनची छोटी वायल कापण्यासाठी किवा इतर कापाकापी साठी वापरली जाणारी एक सर्जिकल ब्लेड पडली होती ..बहुतेक ए वापरून झाल्यावर ती फेकण्याऐवजी कोणीतरी खिडकीत ठेवली असावी ..हळूच हात मागे करून मी ती सर्जिकल ब्लेड उचलली ..या वेळी नेमकी शीर कापली गेली पाहिजे ..तरच मृत्यू येईल ..मी ती ब्लेड घेवून मनगटावर चालवणार तोच एकदम एका स्त्रीचा ओरडण्याचा आवाज आला ..सिस्टर वार्डात आली होती .... ब्लेड उचलण्याच्या नादात माझे तिच्याकडे लक्षच नव्हते ..मात्र तिने पहिले मी काय करणार होतो ते ..तिचे ओरडणे ऐकून ..शिपाई धावत आला माझ्याजवळ ..माझ्या हातातून ब्लेड हिसकावून घेतली ..जर मी कापून घेतले असते ..काही बरेवाईट झाले असते ..तर त्याची नोकरी गेली असती ..कर्तव्यात कसूर केला म्हणून बाराच्या भावात गेला असता तो ..खूप चिडला होता तो शिपाई ..त्याने सरळ मला येथे ठेवणे धोक्याचे आहे हे जाहीर करून ..डॉक्टरला सांगून माझी ट्रान्स्फर ' इन्फेक्शन वार्डात ' करून घेतली ..जेथे जेलच्या कैद्यांना ठेवण्यासाठी छोटी गज असलेली खोली होती ..मला स्ट्रेचरवर घालून ..जोरात रागारागाने स्ट्रेचर पळवत ' इन्फेक्शन वार्ड ' कडे मला घेवून निघाले ..मी वाटेत मोठ्या मोठ्याने..आकांताने ओरडत होतो ..मला मारून टाका ..मला मरू द्या ..मला जगायचे नाहीय ..मी खूप वाईट आहे वगैरे ..!

( बाकी पुढील भागात )


शनिवार, 14 दिसंबर 2013

बिंग फुटले !


बिंग फुटले ! ( पर्व दुसरे - भाग १०६ वा )


आईला ओळखत असणाऱ्या त्या काकूंना मी विसरून गेलो होतो ..अविकडे जावून सावकाश ब्राऊन शुगर वगैरे ओढून सायंकाळी पाच वाजता ..सुमित सोबत घरी पोचलो तर ..दर उघडताच मानसीने सुमितला माझ्या कडून ओढून स्वतच्या कडेवर घेतले ...तिचे डोळे रडून लाललाल झालेले ..थोडे सुजलेले ..मला पाहताच आई म्हणाली ..आता पोराला विकायचे तेव्हढेच बाकी ठेवले आहेस ..मी मुद्दाम ' त्या गावचा नसल्यासारखा ' चेहरा करून .. ..काय झाले ? ..असे का म्हणतेस ? वगैरे प्रश्न विचारू लागलो ...तेव्हा आई म्हणाली ..माझी मैत्रीण आली होती दुपारी घरी ..ती सांगत होती ..तू म्हणे सुमितला घेवून तिच्या घरी गेला होतास ..तेथे ..सुमितला हृदयात समस्या आहे ..त्याला अष्ट विनायक यात्रा घडवून आणायची आहे असे सांगून तिच्याकडे वर्गणी मागत होतास ..मी थक्कच झालो ..त्या मैत्रिणीचा राग आला ..तिने अगदी खास घरी येवून सांगायची काय गरज होती वगैरे विचार मनात आले ....आईच पुढे सांगू लागली ..ती बिचारी सकाळी सुटे पैसे नव्हते म्हणून हळहळत होती ..दुपारी खास पैसे सुटे केल्यावर आपल्याकडे आली होती ..तू मागितलेली वर्गणी द्यायला ..जबरदस्ती १०० रुपये देत होती आमच्या जवळ ..शेवटी आता पैसे जमलेत वगैरे सांगून तिची रवानगी केली ..आईने असे सांगितल्यावर सगळे बिंग कसे फुटले ते आले माझ्या लक्षात ..तेव्हा पासून सुमितला माझ्या सोबत बाहेर फिरायला पाठवणे बंद केले त्यांनी ..तेव्हापासून सुमित आणि मानसीला घेवून एकदा तरी अष्टविनायक यात्रा करून गणपतीची माफी मागावी असे मनात आहे ..मानसी अतिशय धार्मिक असल्याने तिच्या मनाला ते फारच लागून राहिले आहे ..कधी कधी सुमित आजारी पडला ..की ती अजूनही ते बोलून दाखवते ..म्हणते आपण अष्टविनायक यात्रा केली की सुमितवर काही संकट येणार नाही ...तुम्ही पत्यक्ष देवाचा अपमान केला आहे ..ते देखील मुलाला मध्ये घालून .



झटपट पैसे मिळवण्याचा माझा मार्ग बंद झाला ...पुन्हा अनिल साहेबांची नोकरी ..दांड्या ..कामावरील पैश्यात किरकोळ अफरातफर..घरात वाद असे सुरु राहिले ..त्याच काळात माझ्या डोक्यात लेखनाचा किडा वळवळत होता ...एखाद्या वर्तमान पत्रात काहीतरी लेखन करावे असे वाटत होते ..खूप आधीपासून मला लिखाणाची आवड आहे ...पूर्वी मुक्तांगणला प्रथम उपचार घेवून ..नाशिकला तीन वर्षे चांगला होतो त्या काळात ..दैनिक सकाळचे संपादक श्री . उत्तम कांबळे यांच्याशी परिचय झाला होता ..त्यांना मी व्यसनमुक्त राहात आहे याचे खूप कौतुक होते ..ते नेहमी मला तुम्ही आपले अनुभव लिहा असे म्हणत ...मला प्रेरणा देत असत लेखनासाठी ..मात्र तेव्हा ते राहून गेले होते ..नंतर माझ्या वारंवार झालेल्या रीलँप्स मुळे श्री . उत्तम कांबळे यांच्याशी संपर्क तुटला होता .. माझा शाळकरी मित्र शैलेंद्र तनपुरे हा ' दैनिक गावकरी ' या वर्तमान पत्रात संपादक आहे ही माहिती मिळाली होती ..त्यावरून एकदा त्याला भेटायला गेलो ..आम्ही खूप वर्षांनी भेटत होतो ..कॉलेजला असताना मी बिघडत गेलो ..त्या नंतर आमचा संपर्क नव्हता ..मला पाहून त्याला आनंद झाला ..मी त्याला.. सध्या चांगला आहे ..व्यसनमुक्त आहे ..लग्न केले..मुलगा आहे वगैरे माहिती सांगितली ..त्याल विनंती केली की काही लेखन करायचे आहे ..तू छापशील का ? त्याने त्वरित होकार दिला ..त्या नुसार त्याच्याकडे ..' ताण तणावांशी सामना ' हा लेख दिला ..' जिज्ञासा ' प्रकल्पासाठी मिळालेले प्रशिक्षण लेख लिहिताना कामी आले ..लवकरच छापून येईल गावकरी मध्ये असे त्याने सांगितले ..त्याच काळात नाशिक मध्ये ' दैनिक लोकमत ' सुरु झाला होता ..पाहता पाहता लोकमतने घरोघरी प्रवेश केला होता ..नाशिक मध्ये आधी पासून असलेली दैनिके म्हणजे गावकरी ..देशदूत ..सकाळ ....लोकमतने या तिन्ही दैनिकांवर अल्पकाळातच मात केली होती ..


एकदा असाच नशेत असताना ..लोकमतच्या अल्पावधीत लोकप्रिय होण्याची करणे मनात शोधात बसलो ...तेव्हा अनेक बाबी ध्यानात आल्या ...वाटले आपण जर शैलेंद्र तनपुरेच्या लक्षात या गोष्टी आणून दिल्या तर ..तो नक्कीच खुश होईल ..गावकरी मध्ये असे बदल करू शकेल ..मला पत्रकार होण्याची पूर्वीपासून इच्छा होती ..मात्र व्यसनामुळे राहूनच गेले होते ..माझी पत्रकार होण्याची हौस या निमित्ताने भागवून घेता आली असती ...मी लोकमतच्या यशाचा तुलनात्मक आढावा घेवून ते लिखाण घेवून शैलेंद्र तनपुरेला भेटलो ..त्याने मला गावकरीचे व्यवस्थापक ..मालक श्री . वंदन पोतनीस यांना भेटायाल सांगितले ..त्या प्रमाणे मी वेळ ठरवून श्री . वंदन पोतनीस यांची भेट घेतली ..लोकमतच्या यशाचा तुलनात्मक आढावा त्यांच्यासमोर ठेवला ..त्यांना विनंती केली की मी सांगतो ते बदल आपण गावकरी मध्ये केले तर नक्कीच गावकरी त्याचे गमावलेले एक नंबरचे स्थान पुन्हा मिळवेल ..त्यांनी ते सर्व शांतपणे वाचले ..मग म्हणाले ..हे तुम्ही काही आडाखे बांधून लिहिले आहे ..काही मुद्दे छान आहेत ..मात्र याच्यावर एक सविस्तर सर्व्हे व्हायला हवा ..तुम्ही जवाबदारी घेत असाल तर ..घरोघरी जावून असा सर्व्हे करण्याचे काम मी तुमच्याकडे सोपवतो ..सर्व्हेसाठी त्यांनी मला एक प्रश्नावली तयार करण्यास सांगितले ..मी त्या प्रमाणे घरोघरी जावून दैनिक वर्तमान पत्रात लोकांना काय काय वाचायला आवडते ..काय काय असले पाहिजे ..अशा प्रकारचे प्रश्न तयार केले ..ती प्रश्नावली श्री . वंदन पोतनीस यांना दाखवली ..त्यांनी हिरवा कंदिल दाखवला ..मला म्हणाले एका सर्व्हेचे मी तुम्हाला पन्नास रुपये देईन ..तुम्ही विविध भागातील ..विविध गटातील ..किमान एक हजार लोकांच्या घरी जावून ही प्रश्नावली भरून घ्या ..नंतर आपण निष्कर्ष काढून ..आवश्यक ते बदल नक्कीच करू आपल्या दैनिकात ..त्या नुसार माझा काम सुरु झाले ..दिवसाला किमान पाच घरी मी सर्व्हेसाठी जावू लागलो ..माझी नशा ..नशेकारिता पैसे..वगैरे भानगडी सांभाळून सर्व्हे साठी जास्त वेळ देणे कठीणच होते ..मात्र मला आशा होती ..की मी जर यशस्वीपणे हा सर्व्हे केला ..तर मला नक्कीच गावकरी मध्ये पत्रकार होण्याची संधी मिळणार होती ..

( बाकी पुढील भागात )

===================================================================

शेवटचा गंभीर गुन्हा !  ( पर्व दुसरे -भाग १०७ वा )


( सर्वांची माफी आधीच मागतोय )



वाचकांच्या सर्व्हेचे काम झाले की दर आठवड्याला मी ते सर्व्हेचे रिपोर्ट्स श्री .वंदन पोतनीस यांना दाखवत असे ..मग मला ठरल्यानुसार प्रत्येकी पन्नास या प्रमाणे सर्व्हेचे पैसे मिळत असत ..अनिल साहेबांच्या नोकरीवर अनियमित जावू लागलो ..दोन तीन वेळा मोठा भाऊ तेथे ऑफिसात आला तेव्हा ..माझे डोळे पाहून काय ते समजला ..त्याने नंतर घरी येवून माझ्याशी कटकट केली ..म्हणाला ' तू कधीही सुधारणार नाहीस असे वाटतेय ....अनिल साहेब काही बोलत नाहीत याचा गैरफायदा घेवू नकोस ...केवळ माझ्याकडे पाहून तुझी नोकरी टिकून आहे ...मी देखील नेहमीप्रमाणेच त्याच्याशी वाद घातला ...तुझा स्वभावच संशयी झालाय ....माझ्या कोणत्याही गोष्टींचे तुम्हाला कौतुक नाही ..लहानपणापासून तुम्ही असे वागत आलात ..म्हणूनच मी व्यसनी झालो मला कोणीच समजून घेत नाही ..वगैरे . भावू वैतागून निघून गेला ..जाता जाता आईला म्हणाला ..' आई तू याचे कितीही केलेस तरीही ..याला कोणाची पर्वा नाही ..आता वर लग्न करून बसलाय ..म्हणजे अजून जवाबदारी वाढवून घेतली आपण ..' आई बिचारी काय बोलणार ? ..भावाचे म्हणणे तसे पहिले तर अगदी बरोबरच होते ...मला सुधारण्यासाठी त्यानेही खूप प्रयत्न केले होते ...अगदी सुरवातीला खाजगी हॉस्पिटल ..नंतर मेंटल हॉस्पिटल ....मुक्तांगण ...सगळे सुरळीत व्हावे या हेतूने माझे लग्नही करून दिले घरच्यांनी ..इतके सगळे करूनही ...मला स्वतचे भले कशात आहे ते कळत नव्हते ..हा तद्दन वेडेपणाच होता माझा ..वर घडल्या गोष्टींचा दोष मी त्यांनाच देत होतो .


पुढच्या आठवड्यात सर्व्हे करून गेल्यावर ..गावकरीच्या ऑफिस मध्ये श्री .पोतनीस भेटले नाहीत ..त्यामुळे पैसे मिळू शकले नाहीत ..असे समजले की ते दोन तीन दिवसांनी येतील ..माझा भ्रमनिरास झाला होता ..कसेतरी जेमतेम एका पुडी पुरते पैसे जमले होते जवळ ..वैतागत एक पुडी घेवून घरी आलो ..सायंकाळचे सात वाजले होते ..सगळ्या जगावर डोके सरकले होते ..वाटले आपण गर्भश्रीमंत असतो तर किती बरे झाले असते ..राजरोस पैसा उडवता आला असता .. ..आपल्यावर निसर्गाने ....आणि सर्वानीच अन्याय केलाय असे वाटत होते ..अनघाशी आपले लग्न झाले असते तर ..पुढे इतके रामायण घडलेच नसते ..तेव्हाच मी सुधारलो असतो ..त्यावेळी कुटुंबीयांनी माझी किती निराशा केली ..अशी वैफल्याची भावना मनात घर करून होती ..एका पुडी पिण्यासाठी संडासात कशाला जायचे म्हणून ..घरात पुढच्या खोलीत जेथे आई ..सुमित ..मानसी बसले होते तेथेच उकिडवा बसून ब्राऊन शुगर ओढू लागलो ...आईला आणि मानसीला हे पाहून धक्काच बसला ...इतके दिवस मी लपून छपून पीत होतो ...मी सोडलीय कधीच ..किवा नक्की सोडणार आहे ..असे म्हणत असे ..आज राजरोस घरातच आई आणि मानसी समोर ब्राऊन शुगर ओढत बसलो होतो ..वर म्हणत होतो की ..तुम्ही कटकट करता म्हणून मला जास्त ब्राऊन शुगर प्यावी लागते ..एकंदरीत आता माझे व्यसन घरच्या मंडळीनी कोणतीही कुरबुर न करता स्वीकारावे ...मला माझ्या मनाप्रमाणे जगू द्यावे असे माझे म्हणणे होते ..आईला म्हणालो ..रोज सकाळी एक पुडी आणि संध्याकाळी एक पुडी इतकेच मी घेणार ..तुम्ही काहीही आडकाठी करायची नाही ..रोज शंभर रुपये इतकाच माझा खर्च राहील ..तुम्ही आडकाठी करता ..त्यामुळे माझी नशा उतरते .. जास्त प्यावी लागते ....माझे महिना तीन हजार यात खर्च होताल ..ते पैसे मी तात्पुरते घरून घेईन ..नंतर कुठूनही आणून तुम्हाला परत करेन ..तुम्ही अजिबात मध्ये बोलायचे नाही ...प्रत्येक व्यसनीला वाटत असते की आपले व्यसन घरच्यांनी निमूटपणे स्वीकारले तर ..आपणही कंट्रोल मध्ये व्यसन करू शकतो ..घरच्यांच्या कटकटीमुळेच जास्त भानगडी होतात ....खरेतर व्यसनाधीनता अशी कधीच कमी होत नाही ..उलट वाढतच जाते असा घरच्या मंडळींचा अनुभव असतो ..म्हणून तर ते विरोध करतात .

त्या दिवशी माझी मजल पाहून आई निशब्द् झाली ..काहीही न बोलता स्वैपाक घरात निघून गेली ..तिची घोर निराशा झाली होती ..मी बिघडल्यापासून प्रत्येक वेळी ..मला ती मदत करत आली होती ..मला वाचण्यासाठी माझी ढाल बनली होती ..सगळे नातलग अनेकदा तिला म्हणत की तुमच्या लाडामुळे हा बिघडला आहे ...माझ्या वर्तनामुळे अनेकदा तिला अपमान सहन करावे लागले होते ...भावू ..वडील ..नातलग ...वाहिनी ..मानसी ..या सर्वांच्या रोषाला बळी पडावे लागले होते ते केवळ माझ्यामुळे ...आणि आता मीच राजरोस व्यसन करीन म्हणत ..घरातच ब्राऊन शुगर ओढत बसलेलो होतो ..तिचा सारा त्याग ...व्यर्थ ठरत होता ..इतके दिवस किमान मी सुधारणार आहे नक्की सोडणार आहे असे म्हणत होतो ..आता सगळे लाथाडून मी व्यसन काहीही झाले तरी सुरूच ठेवणार हा माझा पावित्रा तिला खूप दुखः देत असावा ..त्या दिवशी रात्री आम्ही नेहमी प्रमाणे झोपी गेलो ....झोपताना मनात होते ..की आता घरच्यांना सरळ सरळ सांगितलेच आहे ..तेव्हा उद्यापासून आईकडून राजरोस पैसे घ्यायचे ..आपले कामाचे पैसे मिळाले की आईला परत करायचे ..वगैरे अविवेकी विचार करतच झोपी गेलो ..सकाळी सकाळी सहा वाजता मानसीने मला घाबऱ्या घाबऱ्या उठवले ..म्हणाली ' अहो आई ..आज सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला गेल्या नाहीत ..अजून झोपूनच आहेत ..मी मच्छरदाणी बाहेरून आवाज दिला त्यांना ..पण काहीच उत्तर देत नाहीयेत ..मी पटकन उठून आतल्या खोलीत गेलो ..मच्छरदाणी बाजूला करून पहिले ..तर आई उताणी झोपलेली ..तोंड उघडे ठेवून मोठ्याने घोरत होती ..तिच्या तोंडातून थोडा फेस येत होता ..मी हाक मारल्या ..तिला हलवून पहिले ..मात्र ती उठेना ..अगदी गाढ झोपली होती ..तितक्यात बाजूला लक्ष गेले तर तेथे एक छोटी रिकामी बाटली पडलेली ....ही बाटली माझ्या ओळखीची होती ..वडील गेल्यावर ....त्यांच्या उरलेल्या औषधाच्या गोळ्या आईने त्या बाटलीत भरून ठेवलेल्या मला माहित होत्या ..त्यात कॉम्पोझ ..लारपोझ..व वडिलांना आजारी असताना सुरु असलेल्या रक्तदाबाच्या गोळ्या एकत्र करून ठेवल्या होत्या आईने ...सुमारे तीस चाळीस गोळ्या होत्या एकंदरीत ..पटकन बाटली उघडून पहिले तर रिकामी ..माझ्या छातीत धस्स... झाले ...म्हणजे आईने त्या सगळ्या गोळ्या खाल्ल्या की काय ?..शंकाच नव्हती ..नक्कीच आईने त्या गोळ्या खावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता ..मानसीला आईच्या हाताखाली एक चिट्ठी सापडली ..त्यात ..मी सर्व बाजूनी पराभूत झाले आहे ....जीवनाला कंटाळून जीवन संपवीत आहे ..त्यासाठी कोणालाही जवाबदार धरू नये ..सुहासने मानसी व सुमितचा नीट सांभाळ करावा वगैरे लिहिले होते ..माझ्याबद्दल काहीच उल्लेख नव्हता ..,,मी ताबडतोब मानसीला भावाकडे फोन करण्यास सांगितले ....आठवणीने बजावले की ..मी काल घरत ब्राऊन शुगर प्यायलो असे भावाला सांगू नकोस ..नाहीतर तो मलाच जवाबदार धरेल .

( बाकी पुढील भागात )

======================================================================

( कालचे प्रकरण वाचून वाचकवर्ग माझ्यावर नाराज होईल हे माहित असूनही मी नेटाने लिहिले ..आज त्यापेक्षा भयंकर प्रकार आहे ..ही लेखमाला प्रबोधन म्हणून लिहित असल्याने ...सगळे काही खरे खरे लिहायचे हे आधीच ठरवलेय ...यातील काही गोष्टी मी आपल्या पासून लपवूही शकलो असतो ..किवा मला सगळे लिहिलेच पाहिजे असलेही बंधन नव्हते ..मात्र तरीही वाचकांचा रोष पत्करून मी हे लिहित आहे ..कारण मी केलेले कृत्य जरी सगळ्यांपासून लपले तरी त्या सर्वसाक्षी परमेश्वरापासून काहीही लपलेले नाही ..त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून लिखाण करतोय . माझे हे निंदनीय कृत्य अजून पर्यंत माझ्या कुटुंबीयांकडे कबुल केले नव्हते ..अर्थात त्यांना सगळे माहितच होते ..तरीही मी कबुल केले नव्हते ..त्यांचा मोठेपणा असा की नंतर आईनेही आणि इतर कोणीही मला पुन्हा त्याबद्दल काही विचारले नाही ..की माझ्या व्यसनमुक्तीच्या काळात कधीही माझ्या दुष्कृत्यांची आठवण करून दिली नाही ..हा माझा एक प्रकारे कबुली जबाबच आहे )

संघर्ष ..समर्थन ..!  ( पर्व दुसरे - भाग १०८ वा )

मानसी भावाला फोन करायला गेली ..मी पटकन जवळच राहणाऱ्या डॉक्टरकडे गेलो ..त्यांना घेवून आलो आईला तपासण्यासाठी ..तो पर्यंत भावू आलेला होता ...हे कसे घडले वगैरे विचारात होता ..मानसी घाबरून जमेल तशी उत्तरे देत होती ..त्याचा मुख्य प्रश्न होता ..रात्री आईशी तुषार भांडला का ? ..दुसरे काही भांडण झाले का ? मानसी नुसतीच नकारार्थी मान हलवत होती ..काल रात्री मी केलेला प्रकार त्याला सांगू नकोस असे मी तिला आधीच बजावले होते ..डॉक्टरांनी आईला तपासून जाहीर केले की जास्त परिणाम झालाय ..ताबडतोब हॉस्पिटल मध्ये न्यावे लागेल ..स्टमकवॉश देखील द्यावा लागेल ...ऑक्सिजन वगैरे लागेल ..ताबडतोब भावू खालच्या मजल्यावरच्या परिचितांकडे गेला ..त्यांच्याकडे कार होती ..त्यांनी लगेच गाडी काढली ..आईला बेशुद्धावस्थेत उचलून चारपाच जणांनी मिळून गाडीत टाकले ..तो पर्यंत सुमित उठला .त्याला कळेना काय प्रकार चाललाय ते ..तो गडबड पाहून रडू लागला ..आईला घेवून आम्ही हॉस्पिटलकडे निघालो ..भावू गाडीत पुढे बसला होता ..तर मागे मी ...आईचे डोके माझ्या मांडीवर होते ..अजूनही तसेच उघडे तोंड .. जोरजोरात घोरणे ..मला आईच्या चेहऱ्याकडे पाहून कसेसेच झाले ..रडू येवू लागले ..लहानपणापासून आईचा लाडका असणाऱ्या माझ्यामुळेच आईवर हा प्रसंग गुदरला होता ..आईचे शेपूट म्हणून मला लहानपणी चिडवत असत ..ते आठवले ...अकस्मात हे सगळे कल्पनातीत असे घडले होते .

काल रात्री प्यायलेल्या ब्राऊन शुगरचा परिणाम सकाळी संपला होता ..त्यामूळे टर्की सुरु झालेले होती ....शारीरिक आणि मानसिक अवस्थता देखील वाढली होती माझी ..आता सोबत ब्राऊन शुगर असती तर बरे झाले असते असे वाटले ..तसेच आता आज दिवसभर ब्राऊन शुगर मिळण्याचे वांधे होतील हे जाणवले ..कारण माझ्याकडे काहीच पैसे शिल्लक नव्हते ..माझी ATM असणारी आई ..अशा अवस्थेत ..भावू मला पैसे देणार नाही हे नक्की ..शिवाय आता दिवसभर आईसोबत घालवावा लागणार ..टर्की होणार .. तेथे हॉस्पिटलला सगळे नातलग जमणार..प्रश्न विचारून मला भंडावून सोडणार ..छे...कसेही करून ब्राऊन शुगर मिळवली पाहिजे ...या सगळ्या परिस्थितीला तोंड द्यायला मला मानसिक आणि शारीरिक शक्ती केवळ ब्राऊन शुगर मुळेच मिळणार होती ..मी हताशपणे आईच्या चेहऱ्याकडे पाहत होतो ..माझ्या डोळ्यातून ओघळलेले थेंब गालावरून ओठाशी येवून त्याची खारट चव जाणवत होती ..वाटले रात्रीच आईकडून पैसे घेवून ठेवले असते तर बरे झाले असते ..आईला हॉस्पिटल मध्ये सोडून लगेच ब्राऊन शुगर आणायला जाता आले असते ..पैसे कसे मिळतील त्याचा विचार डोक्यात वेगाने सुरु होता ..त्याच वेळी माझे लक्ष आईंच्या हाताकडे गेले ..तिच्या हाताच्या बोटात सोन्याची अंगठी चमकली ..माझे डोळेही चमकले ...मनात चमकून गेलेल्या विचाराने मी दचकलो ...ती अंगठी काढून घ्यावी हा विचार मनात थैमान घालू लागला ..तो विचार पळवून लावण्यासाठी मी स्वतःचीच निर्भत्सना सुरु केली ..किती हलकटपणा आहे हा ..आई वर हा प्रसंग तुझ्यामुळेच आलाय ..त्याही अवस्थेत आईच्या हातातील सोन्याची अंगठी काढणे म्हणजे नीचपणा आहे ..खूप मोठे पाप आहे ..वगैरे ..स्वतःला दटावत होतो ..तर दुसरीकडे आईच्या हातातील अंगठी पाहून चमकलेले मन ..टर्की वाढवत होते ..ब्राऊन शुगरची लालच अनिवार होत होती ..मग नेहमीप्रमाणे माझ्या मदतीला माझ्या चुकांचे समर्थन करणारा माझ्या मनाचा दुष्ट ..धूर्त ..हुशार वकील आला ..तो म्हणू लागला ..तुषार हे वाईट आहे हे मान्य ..पण तुला ब्राऊन शुगर मिळविण्याचा दुसरा पर्याय आहे का आत्ता ? शिवाय आईचे काही बरे वाईट झाले तर हे सोने नंतर तुलाच मिळणार आहे ..ते तू आधीच काढून घेतलेंस इतकेच ..आणि आई यातून आई सुखरूप बाहेर पडली ..तिने तुला अंगठी बदल जाब विचारला तर ..नाहीतरी तू लवकरच व्यसन सोडणारच आहेस ..तेव्हा आईला नंतर यापेक्षा जास्त किमतीची अंगठी करून दे ...मनात संघर्ष सुरु झाला ..पाहू तर खरी अंगठी सहज निघते का बोटातून असे मनाशी म्हणत मी हळूच आईच्या बोटातून अंगठी काढण्याचा प्रयत्न केला ..तर अंगठी बोटात घट्ट बसलेली ..क्षणभर निराश झालो ..!

पुन्हा स्वतःला सावरले ...मनाच्या लालची वकिलाला दटावले ..आज सहन करू टर्की ..आपण काही मारणार नाही ब्राऊन शुगर मिळाली नाही तर ..मात्र ब्राऊन शुगरसाठी चटावलेले मन स्वस्थ बसू देईना ..वारंवार नजर तिकडेच जात होती ..अंगठी निघत नाही म्हंटल्यावर माझे लक्ष आईच्या हातातील सोन्याच्या पाटल्यांकडे गेले ..हळू हळू मनाचा संघर्ष संपुष्टात येत होता ..मनातील व्यसनाधीनतेच राक्षस पूर्ण जागा झाला होता ..कसेही करून ब्राऊन शुगर हवी म्हणून मागे लागला ..सारासार विवेकाला समर्थनाच्या वकिलाने केव्हाच पळवून लावलेले ...शेवटी मी धीर करून आईच्या एका हातातील पाटली काढून हळूच खिश्यात ठेवली .संभाविता सारखा चेहरा करून बसलो ..हॉस्पिटल आले ..पटकन खाली उतरून स्ट्रेचर मागवले..चार वार्डबॉयनी आईला स्ट्रेचरवर ठेवून ते स्ट्रेचर लिफ्ट मध्ये ठेवू लागले ..मी देखील लिफ्ट मध्ये शिरलो ..वरच्या मजल्यावर गेल्यावर आईला सरळ ऑपरेशन थियेटर मध्ये नेण्यात आले ..तसा मी भावाजवळ जावून म्हणालो ..मी जरा माझ्या मित्रांना फोन करून येतो परत ..तेथून सटकलो ..सरळ अविनाशकडे गेलो ..त्याच्या सोबत त्याच्या ओळखीच्या एका सराफाच्या घरी जावून त्याला ती पाटली दिली ..त्या वेळच्या सोन्याच्या भावाप्रमाणे दहा मिनिटातच त्याने माझ्या हातावर आठ हजार पाचशे रुपये ठेवले ...तेथून सरळ अड्ड्यावर ..ब्राऊन शुगर घेवून अविनाशच्या रूमवर ओढत बसलो दोघे ..ब्राऊन शुगर ओढता ओढता रडतही होतो ..स्वतःला दोषही देत होतो ..आईची महती आठवत होतो ..पोटभर ब्राऊन शुगर पिवून झाल्यावर पुन्हा हॉस्पिटलकडे गेलो.. हॉस्पिटलच्या दारातच भावू माझी वाट पाहत उभा होता ..मला पाहताच त्याने पहिला प्रश्न केला ..आईच्या हातातील एक पाटली कुठे आहे ? मी नकार देवू लागलो ..म्हणालो घरातच कुठेतरी असेल ..तर म्हणाला.. आईला ऑपरेशन थियेटर मध्ये नेल्यावर सिस्टरनी आईच्च्या अंगावरचे दागिने काढले ..त्यात एकाच पाटली मिळाली ...दुसरी कुठे गेली ..मी मानसीला फोन करून विचारले घरात आहे का ? मानसीने नकार दिलाय ...त्याचा रोख सरळ सरळ माझ्याकडे होता ..मी ठाम नकार देत होतो ..मला जाणवले की भावू कदाचित माझी झडती घेईल ..मग खिश्यात असलेले पैसे पाहून त्याला सगळे समजेल ..म्हणून मी भावावर चिडण्याचे नाटक केले ..म्हणालो ...तुला नेहमीच माझा संशय येतो ..प्रत्येक वेळी मलाच जवाबदार धरतोस तू ..वगैरे ..रागारागाने तेथून सटकलो ...पुन्हा अविनाशच्या रूमवर आलो . 

( बाकी पुढील भागात )

========================================================================


अपराधीपणाची होरपळ !
( पर्व दुसरे -भाग १०९ वा )


हॉस्पिटलमधून अवीच्या रूमवर ..पुन्हा ब्राऊन शुगर ....सारखा स्वतःला दोषही देत होतो ...भरपूर ब्राऊन शुगर पिणेही सुरु होते ..दुपारी आईला एकदा पहावे म्हणून हॉस्पिटलला गेलो ..गेट मधूनच बाहेर उभा असलेला भाऊ ..वाहिनी ..मानसी ..जवळपास राहणारे नातलग दिसले ..वाटले या सर्वांसमोर आत जाणे म्हणजे भावाशी भांडणाला आमंत्रण आहे ..कारण त्याने तोच विषय काढला असता ..सर्वांसमोर माझी चोरी उघड झाली असती .. आत गेलोच नाही ..बाहेरूनच परतलो ..वाटेत एका एसटीडी बूथवरून ....टेलिफोन डिरेक्टरीतून त्या हॉस्पिटलचा नंबर घेतला .. तेथूनच हॉस्पिटलला फोन केला ...आपल्याकडे दाखल झालेल्या श्रीमती पुष्पा नातू यांची तब्येत आता कशी आहे हे विचारले ...रिसेप्शनिस्ट मुलीने चौकशी करून सांगितले ..अजून त्या बेशुद्ध आहेत ..आज रात्रभर जीवाला धोका आहे ..पुन्हा अवीच्या रूमवर येवून नशा ...जवळ भरपूर पैसे होतेच ..दर दोन तासांनी हॉस्पिटलला फोन करत होतो ..शेवटी त्या रिसेप्शनिस्टने विचारलेच ..आपण त्यांचे कोण आहात ..कुठे असता वगैरे ..सांगितले की मी त्यांचा मुलगा आहे ..मात्र बाहेरगावी असतो ..रात्रभर जागाच होतो ..केलेल्या कृत्याबद्दल प्रचंड अपराधीपणा वाटत होता ..पहाटे पाचलाच उठून हॉस्पिटलजवळ गेलो ..तर बाहेर माझा भाचा उभा ..मला पाहून म्हणाला ..मामा मी होतो रात्रभर इथे ..आजी अजून शुद्धीवर आलेली नाहीय ..मात्र आधा धोका टळला आहे असे डॉक्टर म्हणाले ..त्याने हळूच मला पाटली बद्दल विचारले .. त्याला म्हणालो हे लोक उगाच माझ्यावर संशय घेत आहेत ..भाच्याशी माझे संबंध मित्रासारखेच आहेत ..म्हणाला ..मामा तू कितीही सांगितलेस तरी तुझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही ..मी खरोखरच पाटली घेतली नाहीय ..माझ्या जवळ काहीच पैसे नाहीत ..असे भासवण्यासाठी त्याला म्हणालो ..कालपासून मी उपाशी आहे ..मला चहा पाज ...त्यासोबत चहा घेतला वरून पाच रुपये घेतले मुद्दाम ..तो इथेच थांब म्हणून आग्रह करत होता ..पण दिवसा इतर नातलग येतील म्हणून थांबलो नाही ..आईच्या जीवाचा धोका टाळला होता ही त्यातल्या त्यात आनंदाची बाब होती ..


खिश्यात पैसे उरले आहेत तो पर्यंत आपणही एखाद्या दवाखान्यात दोन तीन दिवस दाखल होऊन तेथे टर्की काढावी ..आणि व्यसन बंद करावे असे मनाशी ठरवून ..अविसोबत पंचवटीत असलेल्या आयुर्वेदिक दवाखान्यात जाऊन तेथे दाखल झालो ..मात्र जवळ माल होता तो पर्यंत तिथे थांबलो ..दुसऱ्या दिवशी सकाळी माल संपल्यावर टर्की सुरु झाली तसा ..कोणालाही न सांगता तेथून सटकलो .....अवीच्या रूमवर आलो खिश्यात जेमतेम दोन हजार रुपये शिल्लक होते ..म्हणजे मी तीन दिवसात सहा हजार रुपये उडवले ...आई शुद्धीवर येवून तिला आजच डिस्चार्ज मिळणार होता हे समजले होते ..संध्याकाळी आता आईला घरी नेले असेल ..तसेच घरच्या लोकांच्या मूडचा अंदाज घ्यावा म्हणून भावाकडे फोन केला ..माझ्या मोठ्या बहिणीने तो उचलला .. ती आईची अशी बातमी समजल्यावर अकोल्याहून आली असावी ...फोनवर माझा आवाज ओळखून मला रागवायला सुरवात केली ..तुला लाज वाटायला हवी ..असा नीचपणा केलास कसा ?..यापुढे तू आम्हाला मेलास असे म्हणू लागली ..ते ऐकून वैतागलो ..फोन मानसीला दे म्हणालो तर म्हणाली ..या पुढे मानसी तुझ्यासोबत राहणार नाही असे आम्ही ठरवलेय ..तुझी लायकी नाहीय बायको मूल सांभाळायची ..हे ऐकून मात्र मी उखडलो ..तिला म्हणालो तुम्ही माझ्या संसारात ढवळाढवळ करू नका ..मानसीला जर तुम्ही माझ्यापासून दूर केलेत तर मी सर्वांचा बदला घेईन . ..या पूर्वी असेच अनघाला तुम्ही माझ्यापासून हिरावून घेतले आहे..त्याचाच परिणाम म्हणून मी अजून सुधारलो नाहीय ..वगैरे ..फोन वर सर्वाना शिव्या घालू लागलो ..माझी बडबड ऐकून ताईने घाबरून फोन ठेवून दिला ...माझेही डोके फिरले होते .. अपराधीपणाची भावना वाढली होती ..त्यात रागाचीही भर पडली ....अवीच्या रूमवर जावून खूप दारू प्यायलो ..वर ब्राऊन शुगर ..जवळ आता फक्त १०० रुपये शिल्लक होते आणि पाच पुड्या ..आत्महत्या करावी असा विचार मनात घर करू लागला ..द्कानातून एक नवी ब्लेड विकत घेतली ..मरायचेच तर भावाच्या घरासमोर जावून मरू असा विचार केला ..रात्री अकरा वाजता ..खूप दारू प्यायलेल्या अवस्थेत ..भावाच्या घराची बेल वाजवली ...कोणी दार उघडण्यापूर्वीच ब्लेडने डाव्या हाताच्या मनगटावर मोठी चीर मारली ..रक्त बाहेर पडू लागले ...भळभळ वाहू लागले ..खाली जमिनीवर रक्ताचे थारोळे जमत होते ..वाहिनींनी दार उघडले ..त्यांचे लक्ष आधी जमिनीवर पडलेल्या रक्ताच्या थारोळ्याकडे गेले ..त्या मोठ्याने किंचाळल्या ...तसे घरातून भावू ..मोठी बहिण वगैरे बाहेर आले ..मला पाहून भावू म्हणाला ..तू इथे कशाला आलास ..आता तरी आम्हाला सुखाने जगू दे ..तू ताबडतोब इथून निघून जा नाहीतर मी आत्ताच्या आता पोलिसांना बोलावतो ..ते ऐकून तेथे थांबलो नाही ...तसाच रक्ताळलेला हात घेवून ...,रस्त्यावर आलो ..सगळे रक्त वाहून गेल्याशिवाय आपल्याला मरण येणार नाही हे माहित होते ....तेथून मेरीच्या बस स्टॉप वर येवून बसलो ....अंधारातच खिश्यातील उरलेली क्वार्टर लावली ..एक पुडी प्यायलो ..सुमारे तासभर थांबून पुन्हा भावाच्या घरी गेलो ..ब्लेडने कापल्यावर खोल जखम झाली होती हाताला मात्र नेमकी शीर कापली गेली नव्हती ..त्यामुळे आता रक्त कमी येत होते ..या वेळी माझ्या भाच्याने दार उघडले ..त्याने सरळ मला आत बोलाविले ..म्हणाला आधी हाताच्या जखमेवर मलमपट्टी तरी कर ...मला पाहून मानसीने रडणे सुरु केले ....आई बहुधा आतल्या खोलीत होती ..भाच्याने जखमेत हळद भरली ..काहीतरी बडबड करत नशेत मला झोप लागली ..


सकाळी उठल्यावर आधी खिश्यात उरलेल्या ब्राऊन शुगरच्या तीन पुड्या शिल्लक आहेत की नाही याची खात्री करून घेतली ..मानसीला म्हणालो ..मी इथे थांबू इच्छित नाही ..तू पण माझ्याबरोबर आपल्या घरी चल..तेव्हा वाहिनी म्हणाल्या या पुढे मानसीला आणि सुमितला आम्ही तुमच्या सोबत राहू देणार नाही ..तुम्ही त्यांचा जीव घ्यायला देखील कमी करणार नाही ..भावू देखील विरोध करू लागला ..मानसीला विचारले की तुझे काय म्हणणे आहे ? तर ती काहीही न बोलता नुसतीच रडू लागली ..मग म्हणालो ..माझी बायको आणि माझा मुलगा आहे ..ते माझ्या सोबतच राहतील ..मी समर्थ आहे त्यांना पोसायला ..वगैरे बडबड करत पुन्हा भावावर आरोप करणे सुरु केले ..सगळे वेड्या सारखेच चालले होते माझे ..शेवटी मानसी आणि सुमितला घेवून ऑटो करून आमच्या घरी आलो ..मानसी सारखी रडत होती ..तिला समजावत होतो ...शपथा घेत होतो ...मनगटाच्या जखमेतून बरेच रक्त गेल्यामुळे मला अशक्तपणा जाणवत होता ..दोन पुड्या मारून पुन्हा झोप लागली ...दुपारी तीन वाजता ..उरलेली शेवटची ब्राऊन शुगरची पुडी संडासात ओढत बसलो असताना दाराची बेल वाजली ..मानसीने दार उघडण्याचा आवाज आला ..मग संडासा बाहेरून मला म्हणाली ..तुमच्याकडे कोणीतरी आलेय ...मला काही अंदाज येईना कोण असेल ते ..एखादा मित्र असेल या विचाराने पुडी संपवून बाहेर आलो ..तीनचार अनोळखी माणसे बसलेली...मला पाहून त्यातील एकाने उठून माझ्या खांद्यावर हात ठेवला ...मला म्हणाला ..तुमच्या आईने आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्याबद्दल चौकशीसाठी तुम्हाला पंचवटी पोलीस स्टेशनला साहेबांनी बोलावले आहे ..एकदम भानावर आलो ..म्हणजे हे पोलीस होते तर ..डोक्यात पटकन विचारचक्र फिरू लागले ..सुटका कशी करावी ..पाणी पिण्याच्या निमित्ताने आत स्वैपाक घरात जावू न आणि सरळ गँस सिलेंडरची नळी काढून सगळे पेटवून देईन अशी धमकी द्यावी असा विचार पक्का झाला ..त्यांना म्हणालो जरा पाणी पिवून येतो मी ..ते पोलीस पक्के होते ..अजून एकाने उठून माझ्या कमरेत हात घातला ..म्हणाले ..आता पाणीबिणी काही नाही ..सरळ चल आमच्या सोबत चौकीत ..माझा नाईलाज झाला ..मला धरून त्यांनी बाहेर आणले ..मानसीच्या कडेवरचा सुमित आणि मानसी देखील रडत होती ..त्याच्याकडे पाहून क्षणभर जीव गलबलला माझा ..जिना उतरून खाली आल्यावर त्यांनी मला ऑटोत बसवले .


( बाकी पुढील भागात )

===================================================================


सेन्ट्रल जेल ! ( पर्व दुसरे -भाग ११० वा )

ऑटोत बसता बसता माझे बाहेर लक्ष गेले ..एका कोपऱ्यात घाबरलेल्या मुद्रेने मानसीचा धाकटा भाऊ उभा होता ..म्हणजे हे महाशय देखील आले होते तर येथे .. ..ऑटो पंचवटी पोलीस स्टेशनला न थांबता ..पुढे सरळ सीबीएस कडे जाऊ लागली तेव्हा मी त्या पोलिसांना विचारले ....पंचवटी पोलीस स्टेशन मागे पडले ..तुम्ही मला नक्की कुठे नेताय ? त्यातला जरा वयस्कर वाटणा-याने उत्तर दिले ..आपण कोर्टात जात आहोत ..तेथे साहेब भेटतील तुला ..कोर्टाच्या आवारात खाली उतरून पुन्हा एकाने माझा हात पकडला ..एकाने खांद्यावर हात टाकला ..हळूच कानात म्हणाला ..खबरदार जर काही गडबड केलीस तर ..गुपचूप त्यांच्या सोबत चालू लागलो ...वरच्या मजल्यावर पाटी होती ..न्यायदंडाधिकारी वर्ग १ ..बाहेर बरीच गर्दी होती त्या खोलीच्या ...एकाने आत जावून काहीतरी माहिती घेतली ..मी व्हरांड्यातून खालच्या आवारातील गर्दी पाहत असताना ..माझा मोठा भाऊ देखील दिसला मला तिथे ..तो आमच्याच दिशेला पाहत होता ...प्रकरण हळू हळू ध्यानात येत होते ..म्हणजे बहुतेक पोलीस स्टेशनला माझी तक्रार ..मी काल संध्याकाळी बहिणीला फोन वर भांडून धमक्या दिल्यावरच केली गेली असावी ...मग व्यवस्थित मी घरी निवांत आहे अशी बातमी पोलिसांना कळविल्यावरच पोलीस घरी आले असावेत ..म्हणजे मानसीला हे सगळे माहित होते तर ..पण ती माझ्यापासून काहीच लपवत नाही कधीच ..हे मात्र माझ्यापासून लपवले गेले होते ..तरीच मानसी सकाळपासून सारखी रडत होती ..तिला बरेचदा रडण्याचे कारण विचारले .सांगितले नव्हते तिने ....तिला माहित होते मला पोलीस पकडून नेणार आहेत ते ..म्हणून रडत होती ..मात्र मला सांगितले तर मी पळून जाईन म्हणून मला सांगत नव्हती ..


अर्ध्या तासाने माझ्या नावाचा पुकारा झाला ..तसे त्या पोलिसांनी मला आत धरून नेले ..सरळ उभा राहा म्हणाले ..समोर एक तिशीची स्त्री न्यायधीश होती ..तिने तिच्या समोरच्या कागदपत्रावर एक नजर टाकली ...मग मला विचारले ..' तुला पोलिसांनी मारहाण वगैरे केली का ? तसे काही घडले नव्हते ..म्हणून मी नकारार्थी मान हलवली ..मग जामीन आणलाय का असे विचारले ? मी पुन्हा नकारार्थी मान हलवली.. तिने समोरच्या एका कागदावर सही केली .. मला बाहेर आणले गेले ..बाहेर आल्यावर पोलिसांनी माझ्याकडे दोन कागद दिले ..कुतूहलाने मी माझ्यावर कोणती केस लावली गेली ते पाहत होतो ..एका कागदावर शुद्ध मराठीत टाईप केले गेला होते ..त्यात अर्जदार म्हणून सौ .मानसी तुषार नातू असे नाव होते ..पुढे माझे पती श्री .तुषार पांडुरंग नातू ..हे मला रोज पैसे मागतात ..मला मानसिक व शारीरक त्रास देतात ..अशा प्रकारचा मजकूर होता ..खाली मानसीची सही ..दुसऱ्या कागदावर माझ्यावर भारतीय दंड विधान कलम ४९८ अन्वये गुन्हा दाखल करणायत येवून मला चौकशीसाठी १५ दिवस न्यायालयीन कस्टडी सुनावली होती ..म्हणजे आता पंधरा दिवस मला सेन्ट्रल जेल मध्ये राहावे लागणार होते तर ..एकदम सुन्न झालो ..दुपारी पोलिसांनी नुसतेच साहेबांनी चौकशीला बोलावले आहे असे सांगितले होते मला ..मला वाटले होते साहेबांकडे चौकशी झाली कि मला सोडून देतील ..माझ्या हुशारीने मी साहेबाना बरोबर पटविन वगैरे ...आता सगळे उघड झाले होते ..अतिशय व्यवस्थित प्लान करून सगळे झाले होते ..मी आईला ..भावाला पैसे मागून नेहमी त्रास देत होतो हे खरे होते ..मानसी नोकरी करत नव्हती किवा माहेरहून देखील ती पैसे आणून मला देईल अशी स्थिती नव्हती ..त्यामुळे मी तिला पैसे मागतो ..शारीरिक- मानसिक छळ करतो वगैरे गोष्टी मला अमान्य होत्या ..परंतु बहुधा ..स्त्री अत्याचाराची केस अधिक मजबूत होते म्हणून मानसीवर सर्व कुटुंबीयांनी दबाव आणून तीला माझ्याविरुद्ध फिर्याद करण्यास भाग पाडले असावे ..तसेच त्या केस मध्ये साक्षीदार म्हणून माझा भावू ..वाहिनी ..खालच्या मजल्यावर राहणारे एक वृद्ध जोडपे यांच्या सह्या होत्या ..सगळेच माझ्या विरुद्ध होते तर ..सगळे फासे उलटे पडले होते ...


पोलीस मला खाली प्रांगणात घेवून आले ... मला टर्की सुरु होत होती ..दुपारी प्यायलेल्या शेवटच्या पुडीचा परिणाम कमी होत आला होता ..कोर्टातून बाहेर पडत असताना ..समोर भावू आला ...त्याचा चेहरा जरा घाबरलेलाच होता ..पोलीस त्याला म्हणाले ..१५ दिवस सेन्ट्रल जेल ..त्याला पाहून लगेच मी म्हणालो ..' किती दिवस ठेवणार जेलमध्ये ..कधीतरी बाहेर येईनच ..मग पाहतो तुमच्या सगळ्यांकडे ' ..मी त्याला सरळ सरळ धमकी देत होतो ..ते पाहून एका पोलिसाने माझ्या पाठीत एक जोरदार गुद्दा मारला ..गुपचूप चल म्हणाला .. ..सीबीएस वरून ऑटो करून आमची वरात निघाली नाशिकरोड सेन्ट्रल जेलकडे ..पूर्वी पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल मध्ये असताना ..आम्ही जिमखाना ग्राउंड वर क्रिकेट खेळायला वगैरे जात असू तेव्हा सेन्ट्रल जेल वाटेत लागे ..ते मोठे गेट बाहेरून अनेकदा पहिले होते ..कुर्बानी सिनेमाचे शुटींग तिथेच झाले होते ..त्यावेळी ते शुटींग पाहायला देखील गेलो होतो ..तेव्हा त्या उंच भिंतीमागे आत कसे जग असेल याचे कुतूहल होते मला ..आता ते कुतूहल देखील पूर्ण होणार होते तर ...मला मुख्य भीती होती ती टर्कीची ..कारण गेल्या पाच सहा दिवसात पाटली विकून मिळालेल्या पैश्यात भरपूर ब्राऊन शुगर प्यायलो होतो ..त्याचा सगळा त्रास होणार होता ..


( बाकी पुढील भागात )