रविवार, 26 मई 2013

एक वेगळे अनुभवविश्व


सामाजिक कृतज्ञता निधी ! ( पर्व दुसरे - भाग ११ वा )


एकदाचा २६ जून हा आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ विरोधी दिन आम्ही मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आणि लोकशाही मित्र यांच्या वतीने सुंदर रीतीने नाशिक मध्ये पथनाट्य व शोभायात्रा काढून साजरा केला ...पाटील साहेबांची यात खूप मोलाची मदत झाली होती ..तसेच लोकशाही मित्र चे सर्व कार्यकर्ते मनापासून झटले होते ...शालीमार चौकात झालेल्या पथनाट्याची मित्राने मोफत बनवून दिलेली व्ही.डी.ओ कॅसेट घेवून दुसऱ्याच दिवशी मी सगळ्या कार्यक्रमाचा आणि माझ्या फॉलोअपचा अहवाल देण्यासाठी मुक्तांगणला गेलो ...तेथे सर्वांनी माझे तोंडभरून कौतुक करावे ही अपेक्षा मनात होतीच ...बहुधा प्रत्येक व्यक्तीला आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल इतरांनी तोंडभरून कौतुक करावे अशी अपेक्षा असतेच ...मुक्तांगणला गेल्यावर सगळ्यात जास्त उत्स्फुर्तपणे बंधू ने माझे अभिनंदन केले .. लगेच उत्साहाने वार्ड मधील उपचार घेणाऱ्या मित्रांसाठी माझी व्हिडीओ कॅसेट दाखवण्यासाठी मँडम कडून परवानगी काढली व टी.व्ही हॉल मध्ये सर्वाना गोळा करून कॅसेट लावली सुद्धा .. कॅसेट सुरु झाल्यावर मी सर्व समुपदेशकांच्या केविन मध्ये जाऊन त्यांना कॅसेट पाहायला दोन वेळा आमंत्रित करून आलो .. मात्र बहुधा ते इतर कामात व्यस्त असल्याने येवू शकले नाहीत .. मँडम मात्र आवर्जून आल्या ... पाच मिनिटे हॉल मध्ये थांबल्या आणि मग माझ्याकडे एक कौतुकाची ..समाधानाची नजर टाकून परत गेल्या ...इतर समुपदेशक आले नाहीत या बद्दल माझ्या मनात उगाचच त्यांच्या बद्दल अढी बसली ... मी इतके मरमर करून कार्यक्रम केला ...दिवसरात्र एक करून तो एकट्याच्या बळावर यशस्वीपणे पार पाडला..आणि या समुपदेशकाना त्याचे काही कौतुक नाही ... असे अविवेकी विचार मनात येवू लागले ...स्वाभाविकच मग मला मिळणारे मानधन आणि त्यांना मिळणारे मानधन याची तुलना झाली मनात ... हे जेमतेम पाच सहा तास केबिन मध्ये बसून भरपूर मानधन घेतात ..आणि मी तिथे उन्हातानात सायकल वर फिरून काम करतो ...मलाही जास्त मानधन मिळायला हवे वगैरे नकारात्मक तुलना सुरु झाली ... मी बंधुजवळ हे बोलून दाखवले तेव्हा त्याने माझी समजूत काढली ..म्हणाला " अरे .. तू जे केलेस ते झोकून देवून केलेस ..त्यात तुला खूप आनंद मिळाला ..एक अनुभव मिळाला .. आणि मुख्य म्हणजे तुझ्यावर सोपविलेली जवाबदारी तू उत्तम पणे पार पाडलीस ही सार्थकतेची भावना बळावली... इतके तुझ्यासाठी पुरेसे नाही का ? .. शिवाय ज्यांनी तुझ्यावर ही जवाबदारी सोपविली होती त्या मँडम आल्या होत्या की कॅसेट पाहायला .. त्यांनी तुला नजरेने शाबासकी दिली हे जास्त महत्वाचे आहे .. बाकीचे समुपदेशक कदाचित दुसऱ्या महत्वाच्या कामात असावेत .. शिवाय तुषार ने केले म्हणजे चांगलेच असणार त्यात पहायचे ते काय ? किवां नंतरही पाहता येईल असा विचार असेल त्यांचा " बंधू जेव्हा मस्त मूड मध्ये असतो तेव्हा त्याचे समुपदेशन अतिशय सुंदर असते ... सगळे मुद्दे तो खूप छान उलगडून बोलतो .

नंतर मडमन भेटायला गेल्यावर मँडमनी एक आनंदाची बातमी सांगितली मला.... त्यांनी सांगितले की महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात... पूर्णवेळ सामाजिक कार्य करणाऱ्या लोकांना ..' सामाजिक कृतज्ञता निधी ' या न्यासा मार्फत दरमहा एक निश्चित मदत म्हणून थोडे मानधन दिले जाते .. बाबा ( डॉ. अनिल अवचट ) देखील त्या न्यासाचे सदस्य आहेत .. या वर्षीपासून व्यसनमुक्तीचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून तुला ते मानधन मिळण्यासाठी बाबांनी न्यासा कडे तुझे नाव सुचविले आहे .. या न्यासाचे सध्या डॉ . श्रीराम लागू हे अध्यक्ष आहेत .. साताऱ्याचे बाबांचे मित्र डॉ . नरेंद्र दाभोलकर हे चिटणीस आहेत .. तर निळू फुले .. डॉ . बाबा आढाव .. प्रा . पुष्पा भावे .. विदर्भातील डँडी देशमुख ..वगैरे जेष्ठ मंडळी ... सदस्य आहेत .. तुला या पुढे दरमहा पाचशे रुपये वेगळे मानधन या न्यासातर्फे मिळेल .. त्यासाठी तुला तुझी सर्व माहिती असलेला एक फॉर्म भरायचा आहे ..तसेच एक प्रतिज्ञापत्र भरून द्यायचे आहे .. ज्यात तू कोणत्याही राजकीय संघटनेशी संबंधित नाहीस .. कोणत्याही धार्मिक अथवा जातीय संस्थेशी बांधील नाहीस वगैरे मुद्दे आहेत .. शिवाय तुला दर सहा महिन्यांनी तुझ्या कामाचा अहवाल या न्यासाकडे पाठवायचा आहे ...हा प्रस्ताव मला खूप आवडला म्हणजे आता मी व्यसनमुक्तीच्या कार्याने.. महाराष्ट्रातील जेष्ठ कार्यकर्ता मंडळींशी जोडला जाणार होतो .. तसेच मुक्तांगण कडून मिळणारे तीनशे आणि हे नवीन पाचशे असे एकूण माझे मानधन आठशे होणार होते .. मी फॉर्म भरून दिला .. ! पुढे मँडम नी माझी जवाबदारी अधिकच वाढल्याची जाणीव करून दिली ..आणि शुभेच्छा देवून निरोप दिला . आता मी फक्त मुक्तांगण च कार्यकर्ता नव्हतो तर एका सामाजिक बांधिलकीतून उभ्या राहिलेल्या प्रतिष्ठीत अशा ' सामाजिक कृतज्ञता निधी ' या न्यासाचा मानधन प्राप्त पूर्णवेळ कार्यकर्ता देखील होतो .. त्यावेळी श्रीमती मेधा पाटकर यांना देखील हे मानधन मिळत होते . 

आनंदातच मी नाशिकला परतलो .. पाटील साहेबांकडे जेव्हा नेहमीसारखा भेटायला गेलो तेव्हा तेथे एक गोरे पस्तीशीचे ..टक्कल पडलेले रुबाबदार गृहस्थ बसलेले होते ..पाटील साहेबांनी मला थांबवून त्यांच्याशी ओळख करून दिली ..... ते डॉ . रमेश गौड होते .. नाशिकमधील ' सर्व्हिस ऑफ सोसायटी ' या संस्थेचे संस्थापक .. ' एड्स ' या महाभयंकर संकटा बद्दल प्रबोधन करण्याचे कार्य करत होते .. डॉ. गौड यांनी मला आपले व्हिजिटिंग कार्ड दिले व त्यांच्या ऑफिस मध्ये भेटायला बोलाविले .. त्यांना ' एड्स ' बद्दल जनजागृती करण्यासाठी पथनाट्य बसवायचे होते . 

( बाकी पुढील भागात )


======================================================

  "एड्स" चे भयावह वास्तव ! ( पर्व दुसरे -भाग १२ वा ) 



डॉ . रमेश गौड यांनी भेटायला बोलावल्या नुसार मी दुसऱ्या दिवशीच सकाळीच त्यांचा पत्ता शोधत कॅनडा कॉर्नर येथे असलेल्या त्यांच्या कार्यालयात गेलो .. एड्स बद्दल थोडे फार ऐकून होतो ..म्हणजे हेच की एड्स कोणत्या कारणांनी होतो ..बचाव करण्यासाठी काय करावे ...वगैरे . माझ्या मनात अनेक प्रश्न होते ... मुळात हा विषाणू आला कोठून ? ... इतके प्रगत शास्त्र इतक्या सूक्ष्म विषाणूला नष्ट का करू शकत नाही ? आणि मुख्य म्हणजे उपाय योजना नेमक्या काय केल्या जात आहेत ? ... भारतीय संस्कृतीला अध्यात्मिक बैठक आहे तरीही भारतात याचे वाढते प्रमाण ..हे देखील एक कोडेच होते माझ्या दृष्टीने .. आणि उपाय योजनांबाबत म्हणाल तर ..सरळ सरळ सगळे वेश्यांचे अड्डे बंद केले पाहिजेत सरकारने .. तसेच सक्तीने सर्वांची तपासणी करायची ..जे जे कोणी एड्स बाधित सापडतील त्यांना समाजापासून दूर ठेवायचे असे माझे मत होते ... डॉ . गौड यांनी प्रसन्न मुद्रेने माझे स्वागत केले .. ' उमिया अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावर डॉ. गौड यांच्या ' सर्व्हिस ऑफ सोसायटी ' या संस्थेचे कार्यालय होते ..तेथेच त्यांची लेबोरेटरी देखील होती ..जेथे रक्त गट तपासण्यापासून ते इतर सर्व आजारांच्या तपासण्या होत होत्या .. सुरवातीला गौड सरांनी मला एड्स बाबत काय माहिती आहे असे विचारले तेव्हा ..मी त्यांना एक महाभयंकर असा जीवघेणा आजार आहे हे सांगितले .. तसेच माझ्या मनातील अनेक प्रश्न बोलून दाखवले .. उपाय योजनांबाबत देखील माझ्या कल्पना त्यांच्या समोर ठेवल्या .. बोलत असताना जेव्हा मी ' वेश्या ' हा शब्द वापरला तेव्हा त्यांनी मला थांबवले आणि सांगितले की ' वेश्या ' हा शब्द बहुधा घाणेरड्या अर्थाने किवा चरित्रहीन स्त्री करिता वापरला जातो ..तसेच हा शब्द इतका बदनाम आहे की चार चौघात त्याचा उच्चार करायला देखील लोक घाबरतात ...त्यामुळे ' वेश्या ' हा शब्द वापरू नकोस तर त्या ऐवजी ' कमर्शियल सेक्स वर्कर ' किवा मराठीत ' शरीर विक्रय करणाऱ्या महिला ' असा शब्द वापरलास तर अधिक चांगले .. मला आश्चर्यच वाटले .. मग त्यांनी पुढे समजावून सांगितले की तो एक पारंपारिक व्यवसाय आहे आणि जसे लोक विविध वस्तू विक्रींची दुकाने उघडतात .. काही लोक नृत्य ..गायन ..चित्रकला .. अभिनय .. किवा पोटापाण्याचा इतर व्यवसाय करतात ....तसाच शरीर तात्पुरते भाड्याने देण्याचा असा हा व्यवसाय आहे असे मानता येणार नाही का ? मी बुचकळ्यात पडलो ... एकंदरीत गौड सरांना या शरीर विक्रय करणाऱ्या महिलांचा बराच कळवला दिसला .. !

सर पुढे बोलत राहिले .. आज देशात एड्स च्या वाढत्या प्रमाणाला सर्वच जण या शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना जवाबदार ठरवीत आहेत ..मात्र सगळे हे विसरले आहेत ... जर हा व्यवसाय अस्तित्वात नसता तर आपल्या आया बहिणींना रस्त्यावर फिरणे कठीण झाले असते .. रोटी ..कपडा आणि मकान या मूळ गरजांसारखीच शारीरिक भूक किवा लैंगिक तृप्ती ही देखील मानवी गरज आहे .. ही उर्मी दाबून ठेवून जगणे सर्व सामान्य माणसाना अतिशय कठीण किवा अशक्यप्राय आहे .... जे अध्यात्मिकते कडे वाटचाल करतात अश्या लोकांना देखील त्यांचा भावना असह्य होऊन त्यांचा तेजोभंग झाल्याची अनेक उदाहरणे पुराणात आहेत ..अश्या वेळी .. जे या सुखापासून वंचित आहेत त्यांची गरज भागविण्याची जर या महिला सोय करून देतात तर त्या बदफैली किवा वाईट कश्या ? सरांचा प्रश्न मला निरुत्तर करणारा होता .. मी त्यांना विचारले पण सर आपल्या संस्कृतीत ...भोगापेक्षा त्यागाला जास्त महत्व आहे त्याचे काय ? ' मी वापरलेल्या ' संस्कृती ' या शब्दावर गौड सर हसले .. म्हणाले संस्कृती हा खूप छान शब्द आहे ..मात्र तो शब्द फक्त आपल्या मनाच्या समाधानासाठी ठीक आहे ..प्रत्यक्ष व्यवहारात तसे जर पाळले गेले असते तर ..आपल्या देशात एड्स चे वाढते प्रमाण नोंदविले गेले नसते ..पुढे ते सांगू लागले की मी 'एड्स ' जनजागृती साठी व्याख्यान देतो ..अशी व्याख्याने आपल्या महाविद्यालयात आयोजित करा म्हणून जेव्हा मी एखाद्या प्राचार्याना भेटायला जातो तेव्हा ते लोक देखील ' संस्कृती ' हा शब्द माझ्यावर फेकतात व सरळ सरळ म्हणतात की आमच्या महाविद्यालयात असले प्रकार होत नाहीत ..आम्ही मुलांवर चांगले संस्कार करतो ..वगैरे ..मग मला त्यांना लैंगिकता ही कशी महत्वाची गरज आहे .. मानसिक आरोग्य राखण्यात देखील या गरचेचा मोठा सहभाग आहे .. ज्या लैंगिकतेला आपण नावे ठेवतो आहोत त्यातूनच आपणा सर्वांचा जन्म झाला आहे ... जे लोक काही कौटुंबिक अडचणी ..जवाबदा-या मुळे लग्न करू शकत नाहीत ..विधुर आहेत ..त्यांच्यासाठी लैंगिकता भागवण्याचे साधन उपलब्ध झाले नाही तर त्यांचे आणि पर्यायाने समाजाचेही स्वास्थ्य धोक्यात येईल .. आणि जर लैंगिकता ही महत्वाची गरज मानली तर मग सुरक्षित पद्धतीने लैंगिकतेचा आंनद घेण्यासाठी... खबरदारीचे मार्ग सुचविण्यात काय गैर आहे वगैरे काथ्याकुट करावा लागतो तेव्हा कुठे परवानगी मिळते .. काहीजण तर मला निरोपच देतात एकदम .. सर खूप महत्वाची माहिती सांगत होते .. मी ती माहिती ऐकण्यात मग्न होऊन गेलो ..त्यांनी सांगितलेली एकंदरीत माहिती ..आकडेवारी खूप भयावह होती .. !

त्यांचा या विषयावरील गाढा आभ्यास .. मुद्दे मांडण्याची हातोटी उत्कृष्टच होती .. मग मलाही सरांसमोर ' वेश्या ' हा शब्द उच्चारण्यास संकोच वाटू लागला ... शरीर विक्रय करणाऱ्या महिला त्या वस्तीत असण्याला कोणीतरी पुरुषच जवाबदार आहे हे पटू लागले .. देवदासी प्रथा .. दारिद्र्य .. प्रेमात झालेली फसवणूक .. वगैरे पद्धतीने बहुतेक महिला तेथे होत्या .. नाईलाजाने या व्यवसायात होत्या ... त्यांना सगळ्यांना देखील एक सुरक्षित घर हवे होते ... पती ..मुले ..संसार याची ओढ त्यांनाही होती .. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे हे ध्यानात आले माझ्या ..दुसऱ्या दिवशी गौड सरांचे एका महाविद्यालयात 'एड्स ' वर व्याख्यान होते ..तेथे त्यांनी मला देखील ऐकायला बोलाविले .. तेथे सर्व तरुण मुलेच होती ...त्यांनी मुलांना ' वेश्या ' हा शब्द कसा चुकीचा आहे हे पटवून देण्यासाठी एक छान उदाहरण दिले .. त्यांनी एका मुलाला पुढे बोलाविले आणि त्याला काही प्रश्न विचारले ... तुला कोण अभिनेत्री आवडते ? त्या मुलाने लाजत लाजत एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे नाव सांगितले ..पुढे सर त्याला म्हणाले ..जर समजा तुला या तुझ्या आवडत्या अभिनेत्री सोबत शरीर संबंध करण्याचीस संधी दिली तर ..तू काय करशील .. तो मुलगा अधिकच लाजला ..इतर मुलेही चेकाळली आणि हसू लागली .. सरांनी नेटाने विचारल्यावर त्याने खाली मान घालून ... अशी संधी मिळाली तर मी नक्की शरीर संबंध करीन अशी होकारात्मक मान हलविली ...पुढे सर त्याला म्हणाले समजा परत एक तासानी तुला त्याच किवा दुसऱ्या सुंदर आवडत्या अभिनेत्री सोबत संबंध करण्यास सांगितले गेले तर ? ..तो मुलगा चालेल ..म्हणाला ..नंतर पुन्हा एक तासांनी अशी संधी मिळाली तर ? या प्रश्नावर तो मुलगा स्तब्ध झाला .. विचार करू लागला .. माणसाच्या काही शारीरिक मर्यादा असतात शरीर संबंध ठेवण्याच्या .. त्या नुसार लागोपाठ तीन तासात ...तीन वेळा शरीर संबंध ठेवणे सोपे काम नाही ..कारण नंतर उत्तेजना येणे कठीण असते .. सर त्याला म्हणाले तू कितीही नाही म्हणाला तरी ..जर तुझ्या डोक्यावर पिस्तुल टेकवून तुला कोणी तिसऱ्या वेळी ..चौथ्या वेळी ..पाचव्या वेळी तुला शरीर संबंध ठेवायला लावला तर .. तो मुलगा नाही नाही अशी मान हलवत राहिला .. सर मग पुढे म्हणाले .. जर आपल्या आवडत्या अभिनेत्री सोबत देखील तीन वेळा संबंध केल्यानंतर आपण नकार देवू ..मग जी स्त्री तिला निवडीला काहीही वाव नसताना दिवसातून किमान दहा ते बारा लोकांशी पोटासाठी .. जगण्यासाठी .. शरीर संबंध ठेवते तिची शारीरिक आणि मानसिक अवस्था काय होत असेल याची कल्पना करा .. या व्यवसायातील बहुतेक स्त्रिया नाईलाजाने तेथे आहेत .. वेगवेगळी व्यसने करणाऱ्या ..किवा काही वेळा विकृत असणाऱ्या... कोणत्याही व्यक्तीशी त्यांना केवळ तो पैसे देतो आहे म्हणून संबंध ठेवावे लागतात .. अश्या स्त्रियांना जरी आपण पुनर्वसनात काही मदत करू शकलो नाही तरी मनातून त्यांच्याबद्दल कणव असली पाहिजे ... वेश्या ..रांड .. रंडी ..वगैरे शब्द वापरून आपण त्यांचा एक प्रकारे अपमानच करतो आहोत .. सरांचे बरेचसे म्हणणे मला पटत होते .. मी खूप प्रभावित झालो होतो .

( बाकी पुढील भागात )

======================================================

सरकारी खाक्या ! (पर्व दुसरे - भाग १३ वा )



शरीर विक्रय करणाऱ्या महिला आधी एक मानव आहेत ..त्यांना देखील एक संवेदनशील मन असू शकते ..त्यांचा पोट भरण्याच्या व्यवसाय जरी अनैतिक मानला गेला असला तरी .. तो व्यवसाय समाजाची गरजही आहे ..वगैरे गोष्टी माझ्या मनावर चांगल्याच ठसल्या ..त्या दिवशीच्या गौड सरांच्या व्याख्यानाला त्यांच्यासोबत एक हसतमुख तरुण होता .. जरा अंगाने चांगलाच भरलेला .. त्याची सरांनी माझ्याशी ओळख करून दिली ...अमित श्रीवास्तव म्हणून हा तरुण .. अतिशय हुशार .. निर्व्यसनी .. मोठे बोलके डोळे .. उत्तर भारतीय असूनही जाणीवपूर्वक मराठी बोलणारा .. अमित मला प्रथम दर्शनीच आवडला .. हा बाहेरून कॉलेजचे शिक्षण करून ..आवड म्हणून गौड सरांच्या सामाजिक कार्यात सहभागी झाला होता .. त्याच्या डोळ्यात नेहमी एक निर्व्याज असा भाव असे .. मी पूर्वाश्रमीचा व्यसनी व्यक्ती आहे हे त्याला समजल्यावर त्याला माझ्याबद्दल खूप कुतूहल जाणवले असावे .. अनेक प्रश्न विचारले त्याने मला अमली पदार्थांबद्दल .. त्याची आणि माझी लवकरच चांगली गट्टी जमली .. गौड सरांनी सुरु केलेले ' एड्स ' विरोधी जनजागृतीचे कार्य अत्यंत मोलाचे होते यात वादच नाही ... मी नियमित त्यांना भेटायला जावू लागलो तेव्हा या कार्याच्या अनेक बाजू उलगडू लागल्या .. काही लोकांनी या आजाराला सर्वात आधी शरीर विक्रय करणाऱ्या महिलांना जवाबदार ठरविले ..मात्र ते हे विसरले की या महिलांना हा प्रसाद कोणत्यातरी ग्राहका कडूनच मिळाला होता .. लैंगिक संबंधांबाबत असलेल्या अज्ञानामुळे ..असुरक्षित लैंगिक संबंधामुळे तो विषाणू हळू हळू सगळीकडे पसरू लागला .. नाशिक मधील एका सरकारी आरोग्य अधिकाऱ्याला एकदा अचानक उपरती झाली आणि त्याने मागचा पुढचा विचार न करता .. नाशिक मध्ये शरीर विक्रय व्यवसाय चालणाऱ्या ' सफेद गल्ली ' या भागात पोलिसांसह धाड टाकली ..तेथील शरीर विक्री करणाऱ्या एकूण ७२ महिलांची रक्त तपासणी करण्यात आली ..त्या पैकी २९ महिला या एच .आय .व्ही बाधित निघाल्या .. ताबडतोब या अधिकाऱ्याने त्या महिलांची नावेही वस्तीत जाहीर करून टाकली ..लोकांनी सावधगिरी बाळगावी म्हणून .. मात्र तो हे विसरला की या महिलांचे पोटच या व्यवसायावर अवलंबून आहे .. त्यांची नावे उघड करून त्या अधिकाऱ्याने त्यांचे पोटच हिरावून घेतले ..कारण नंतर कोणीही ग्राहक त्या मुलींकडे जायला तयार होईना .. त्याच्यावर उपाशी राहायची वेळ आली ..शेवटी त्यापैकी अनेक वस्ती सोडून दिघून गेल्या .. किवा दुसऱ्या वस्तीत जावून व्यवसाय करू लागल्या ..एकीने तर आत्महत्याच केली .

सरांनी सांगितलेली ही माहिती धक्कादायक होती ..कारण खरे तर एखाद्या व्यक्तीच्या पूर्वपरवानगी खेरीज त्याची अशी रक्त तपासणी करण्यास कायद्याने बंदी आहे .. त्यामुळे सावधगिरीच्या सूचना आणि प्रबोधनच जास्त महत्वाचे आहे.. या आजाराबाबत काळजी घेतली जावी म्हणून सरकारी रुग्णालयातून मोफत ' निरोध ' देण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी कर्मचारी वर्गाच्या हलगर्जी पणामुळे ..कामचुकार पणामुळे अथवा ' निरोध ' या शब्दाला असलेल्या वलयामुळे म्हणा .. हे मोफत वाटपाचे काम योग्य प्रकारे झालेच नाही .. अनेक सरकारी रुग्णालयातून .. प्राथमिक आरोग्य केंद्रातून लाखो निरोध पडून राहिले .. अक्षरशः रस्त्यावर फेकले गेले...निरोध बनविण्याचे कंत्राट देताना देखील गैरव्यवहार झाले ... वगैरे माहिती हलगर्जी पणाचा उत्तम नमुना होती ..सध्या जसा लाखो टन गहू सरकारी गोदामातून सडून जातोय तसेच ... शिवाय समाजात असलेले अज्ञान ..गैरसमज ..लैंगिक अंधश्रद्धा ..असे अनेक कंगोरे होते या विषयाला .. बहुसंख्य लोकांना तर ' निरोध ' शास्त्रीय पद्धतीने कसा लावावा याचे देखील ज्ञान नाहीय आपल्या देशात .. हे सांगताना सरांनी आम्हाला एक निरोध हलक्या हातानी ..नख न लागू देता .. कसा चढवला जातो हे देखील प्रात्यक्षिक दाखविले ... तेव्हा माझ्या लक्षात आले की मी देखील या बाबत अनभिज्ञच होतो ..एच .आय .व्ही चा संसर्ग होण्याचे मार्ग निश्चित आहेत ... त्या बाबत योग्य ती काळजी घेवून आपण बिनधास्त अश्या रुग्णासोबत वावरू शकतो ...त्याला स्पर्श करू शकतो .. त्याच्यासोबत जेवू शकतो .. त्याचे कपडे देखील वापरू शकतो ..तरीही अज्ञानामुळे बाधित रुग्णाच्या वाट्याला तिरस्कार ..उपेक्षा .. येते त्याला एक प्रकारे वाळीतच टाकले जाते .. शरीर विक्री करणाऱ्या महिलाबाबत बोलताना सरांच्या बोलण्यात नेहमी ' फिल्ड ' हा शब्द येत असे .. त्या विशिष्ट वस्तीला ते ' फिल्ड ' म्हणजेच सामाजिक कार्य करण्याचे क्षेत्र अश्या अर्थाने संबोधत होते .. अश्या वस्तीला भेट देण्याचे माझे कुतूहल जागृत झाले होते .. पूर्वी मित्रांसोबत तेथून घाबरत घाबरत फेरफटका मारला होता मी .. पण त्या वेळी मनातले भाव वेगळे होते ..तारुण्यसुलभ भावना मनात होत्या .. 

एकदा सरांनी आम्हाला ' फिल्ड ' मध्ये सोबत नेण्याचे ठरविले .. त्या आधी त्यांनी आम्हला सावधगिरीची महत्वाची सूचना दिली की तेथे उगाच कसले निरीक्षण करण्याच्या फंदात पडायचे नाही .. या स्त्रिया अतिशय चाणाक्ष असतात ..मुळातच स्त्री काही विशिष्ट बाबतीत चणाक्ष असतेच .. एखाद्याची ' नजर ' चांगली नाही हे ती उपजत प्रेरणेमुळे लगेच ओळखते फक्त प्रत्येकवेळी ती तसे बोलून दाखवत नाही किवा तुम्हाला जाणवू देत नाही.. मात्र योग्य तितके अंतर राखून असते .. ' फिल्ड ' मध्ये असणाऱ्या स्त्रिया तर त्यांच्या अनुभवातून अधिकच हुशार असतात .. तुम्ही कार्यकर्ता म्हणून तेथे जाता तेव्हा तुमचे मन अतिशय साफ असले पाहिजे .. त्या स्त्रिया कदाचित तुमची परीक्षा घेतील .. उगाचच पदर पाडणे .. हात उंचावून आळस देणे .. लक्ष वेधून घेणाऱ्या मादक हालचाली करणे वगैरे प्रकार करू शकतील त्या .. तेव्हा आपण लक्ष द्यायचे नाही .. एकदा का तुम्ही त्यांच्या परीक्षेत पास झालात कि मग त्या तुमच्यावर विश्वास ठेवतात .. स्वतची दुखः .. व्यथा मोकळेपणी तुमच्याजवळ बोलतात ..आपण खरोखर त्यांना मदत करू इच्छितो याची त्यांची खात्री पटते आणि त्या तुमचा आदरही करतात ..मग हा आदर टिकवण्याचे काम आपलेच असते . नाशिक शहरात असलेल्या ' फिल्ड मध्ये आम्हाला सरांनी नेण्याचे ठरविले होते ..

( बाकी पुढील भागात )

======================================================

त्या कोवळ्या फुलांचा... बाजार पहिला मी ! ( पर्व दुसरे- भाग १४ वा )



दुसऱ्या दिवशी दुपारी गौड सरांनी आम्हाला फिल्ड मध्ये नेले .. मी.. अमित ..गौड सर असे तिघेच होतो आम्ही .. माझ्या मनात प्रचंड कुतूहल होते .. या मुली सर्रास शिव्या देतात .. दारू पितात .. वेळप्रसंगी एखाद्याचा हात ओढून आपल्याकडे ' बसायला ' लावतात ..अश्या गोष्टी मी ऐकल्या होत्या .. लहानपणी रेल्वे क्वार्टर्स मध्य राहताना .. एक अशी बाई आम्ही नेहमी पाहत असू .. ती अंगाने जाडी होती ..सतत चेहरा रंगवलेला .. हातात एक ट्रांझिस्टर असे तिच्या .. तो कानाशी धरून ती रेल्वे स्टेशन वर फिरे .. तिचे राहणे रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या पार्सल विभागातील फलाटावर होते ..जेमतेम दोन तीन बारदाने लावून बनविलेले ते पाल म्हणजे तिची व्यवसायाची जागा होती ... असे आम्ही ऐकून होतो ... कुटुंबीयांसोबत जेव्हा आम्ही रेल्वे स्टेशन ओलांडून जात असताना ती बाई दिसली की आई आम्हाला तरातरा हात धरून ओढत असे .. तिच्या कडे पाहू नका असे सांगत असे .. अगदी लहान असताना ती बाई नेमकी काय व्यवसाय करते ते समजले नव्हते ..नंतर मोठा होऊन रेल्वे स्टेशन वर मवालीपणा करायला लागल्यावर समजले सगळे .. दिवसेंदिवस ती म्हातारी होत होती ..तरीही मेकअप मात्र केलेलाच असे .. एकदा रात्री १ वाजता आम्ही ' अनुराधा ' थेटर मध्ये सिनेमा पाहून परत येत असताना .. अचानक बाजूने आर्टिलरी सेंटरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून कोणीतरी अंधारात पळत येताना दिसले .. आम्ही थबकून पाहत होतो .. सिनेमा पाहून रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणारी बरीच गर्दी पण थांबली .. अतिशय वेगाने .. धापा टाकत ही बाई अक्षरशः निर्वस्त्र पळत येत होती .. वेगाने ती आमच्या समोरून धावत पुढे गेली .. काय प्रकार आहे ते समजेना आम्हाला .. दुसऱ्या दिवशी आम्हाला आमच्या रेल्वे स्टेशनवर खाद्यपदार्थ विकणाऱ्या मित्रांनी आम्हाला जी माहिती सांगितली ती सुन्न करणारी होती .. त्या बाईला म्हणे आर्टिलरी सेंटर च्या काही जवानांनी जास्त पैश्याचे आमिष दाखवून आपल्या भागात नेले होते .. तेथे . अनेक लोकांनी सामुहिक पणे तिचा उपभोग घेतला होता ..तिने पैसे मागताच तिला मारहाण करून तिचे कपडे हिसकावून घेवून तिला हाकलले होते ..त्या दिवसानंतर ती बाई पुन्हा कधी रस्त्यावर रेडीओ घेवून फिरताना दिसली नाही .. फलाटावर एका कोपऱ्यात ती खिन्न बसून राही ..तिचे चाहते तिचा जुना नूर आठवून तिला खायला काहीतरी आणून देत असत .. पुढे एक दोन वर्षांनी ती गायबच झाली ..कोणी म्हणे तिने आत्महत्या केली ..कोणी सागे वेड लागून कुठेतरी निघून गेली .

गौड सरांसोबत त्या वस्तीत जाताना या सगळ्या गोष्टी झरझर मन:पटला वर तरळल्या ..शालीमार स्टॉप च्या मागील बाजूने एक पायवाट . कब्रस्तानाकडून होऊन ' सफेद गल्ली ' या वस्तीत जाते .. त्या वाटेने आम्ही गल्लीत शिरलो ..अगदी गालीच्या टोकालाच एक सार्वजनिक मुतारी होती ...काही आंबटशौकीन त्या मुतारीपाशी थांबून गल्लीतील बायका निरखीत होते ..बहुधा त्यांच्यात पुढे जाण्याची हिम्मत नव्हती ..किवा पुरेसे पैसे नव्हते .. हे नुसते नेत्रसुख घेणारे लोक आहेत असे सर आम्हाला हसून म्हणाले .. यांच्या मनावरील पांढरपेशे संस्कार यांना आत जाण्यापासून रोखून आहेत .. इथे उघडपणे प्रवेश करायला बहुधा लोक घाबरतात .. कोणी पहिले तर .पोलिसांची धाड आली तर वगैरे भीती असते ...असे आंबटशौकीन लोक पंचवटीत रामकुंड ..गंगाघाट .. वगैरे ठिकाणी नेहमी दिसतात .. तेथे गोदावरी नदीवर कपडे धुवायला आलेल्या स्त्रियांना निरखणे .. .. तीर्थस्थळ म्हणून रामकुंडात स्नानाला आलेल्या यात्रेकरू स्त्रियांना अंघोळ करताना पाहणे असे उद्योग चालत त्यांचे ... गौड सर आत्मविश्वासाने चालत होते .. त्यांना पाहून तेथे असलेल्या चहाच्या टपरीवाल्याने अदबीने नमस्कार गेला .. चहा घ्या असे म्हणाला .. नंतर येतो असे सांगून सर पुढे चालत राहिले .. एक छोटासा सीमेंटचा बनवलेला रस्ता आणि त्याच्या दोन्ही बाजूला वसलेली हि साधारण १०० घरांची वसाहत होती .. रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला भडक मेकअप करून बायका उभ्या होत्या ..काही बायका रस्त्याच्या कडेला कोंडाळे करून बसलेल्या ..वस्तीत शिरतातच सगळ्यात आधी जाणवला तो एक कुबट वास .. अगदी दाटीवाटीने ती झोपडीवजा घरे होती ...आम्ही बिचकतच निघालो होतो सरांच्या मागे .. आजूबाजूला नीट निरीक्षण करून पाहण्याची हिम्मत होत नव्हती माझी .. अर्थात मी दारू प्यायलो असतो तर मात्र मी नक्कीच बिनधास्त आत शिरलो असतो .. वेळप्रसंगी भांडलोही असतो ..आता मात्र सभ्य माणसासारखा चालत होतो ... 

सरांना पाहून रस्त्यावर थट्टामस्करी करणाऱ्या दोन तीन जणी स्तब्ध झाल्या ..लाजून आत पळाल्या.. सरांना तेथे बहुतेक स्त्रिया ओळखत असाव्यात .. तसेच त्यांच्याबद्दल आदरही बाळगून होत्या हे जाणवले .. एका घरात सर वाकून आत शिरले .. त्यांच्यामागोमाग आम्हीही शिरलो .. तेथे अगदी छोट्याश्या जागेत पाच सहा जणी बसलेल्या होत्या .. खोलीचे दोन भाग करून एक भाग पडद्याने झाकलेला आढळला .. सरांना पाहून त्यापैकी एक ओरडली .. ' चलो बस हो गया ' मला समजेना टी हे कोणाला उद्देशून म्हणाली ते .. मग पाच मिनिटात पडद्या आडून एक राकट माणूस बाहेर पडला .. त्याच्या मागून एक अगदी कोवळ्या वयाची मुलगी ..म्हणजे हे पडद्याआड होते तर .. त्या माणसाने मुलीच्या हातात दहा रुपये बक्षिस म्हणून ठेवले .. निघून गेला ..ती मुलगी संकोचानेच बाजूला उभी राहिली .. ' कैसा चल रहा है ? ..मैने जो बताया वो सब करते है ना ? सरांचा प्रश्न बहुधा त्यांना कळला होता .. त्या सगळ्याच एकदम बोलू लागला ..एकाच कल्ला झाला .' .एक एक करके बोलो ' असे सांगितल्यावर मग एक म्हणाली ' डॉक्टर साहब ..आप जी कहेते है वो बहुत कठीण है .. हर आदमी बगैर कंडोम के बैठना चाहता है ..बोलते है ..के कंडोम लगानेसे मजा नाही आता .. या फिर अगर कंडोम के लिये जिद किया तो दुसरी के पास जाता है ... " माझ्या लक्षात आले की गौड सरांनी या स्त्रियांना त्यांच्या आरोग्याचे महत्व पटवून देवून प्रत्येक वेळी कंडोम लावायचा आग्रह करा ...असे सांगितले होते ..मात्र लैंगिक अंधश्रद्धेमुळे ...कंडोम ने मजा येत नाही वगैरे करणे सांगून लोक कंडोम लावू देत नसत त्यांना .. मला आश्चर्य वाटले ..म्हणजे या स्त्रिया नक्कीच योग्य ती काळजी घेण्याबाबत जागरूक होत्या .. मग एकमेकींच्या तक्रारी करणे सुरु झाले त्यांचे ..सर सगळ्यांना हसत उत्तरे देत होते ..एखादीला अधिकाराने रागावत देखील होते .. !

( बाकी पुढील भागात )
=====================================================

इन्ही लोगोने ले लीना दुपट्टा मेरा ! (पर्व दुसरे -भाग १५ वा )



त्या सगळ्या जणी त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी सरांना सांगत होत्या ..सरांच्या सोबत त्यांची औषधांची बँग होती ..त्यातून ते एकेकीला औषध काढून देत होते..बहुतेकींच्या तक्रारी ..अपचन .. अँसीडीटी .. डोकेदुखी .. अंगदुखी अश्या होत्या .. काही जणींना गुप्तरोगाची लागण झालेली होती .. तरीही ...अतिशय वेदनादायक अवस्था असताना ही त्या व्यवसाय करतात म्हणून सर त्यांना रागावले .. तेव्हा त्यांचा सरळ प्रश्न होता ' जर आम्ही व्यवसाय केला नाही ..तर पोट कसे भरणार ..घरमालकीणीला रोज पैसे द्यावे लागतात ' त्यांच्या मिळकती पैकी सुमारे तीस टक्के भाग घरमालकीण घेई .. उरलेल्या पैकी पन्नास टक्के जेवण... प्रसाधने यात खर्च होई ..कधी पोलिसांना पैसे द्यावे लागत .. काही जणी तर आपल्या कमाईतून पैसे साठवून ..दूर असलेल्या आपल्या घरी ते पैसे पाठवत असत .. घरच्या गरिबीला ठिगळे लावण्याचा त्यांचा हा प्रयत्न केविलवाणा होता .. ऐरवी रस्त्यावर बेफिकीरीने चालणारी .. बिनधास्त .. मादक इशारे करणारी .. भांडणास सज्ज असलेली .. ही स्त्री वास्तवात किती असहाय आहे ..दयनीय आहे ..याची जाणीव होत होती मला .. तितक्यात तेथे एक म्हातारी भिकारीण आली ... प्रत्येकीने त्या भिकारणीला भिक म्हणून काही पैसे दिले .. एखाद्या श्रीमंतांच्या वस्तीत देखील जितकी भिक मिळाली नसती तितकी भिक तिला या वस्तीत मिळाली ..कारण येथे माणुसकी होती .. तेथून निघून आम्ही दुसऱ्या घरात शिरलो ..तेथेही तीच परिस्थिती .. गी-हाईकाचा कंडोम लावायला नकार .. आरोग्याच्या तक्रारी ..दुसऱ्या ठिकाणी एक जण गरोदर होती ..दिवस भरत आलेले असावेत तिचे ... मला याबाबत जरा आश्चर्य वाटले कारण असा व्यवसाय करताना हिने काळजी का घेतली नाही ? त्या होणाऱ्या पोराचा बाप कोण ? त्याचे भविष्य काय ? वगैरे प्रश्न मनात आले .. मग समजले की येथे असणाऱ्या जवळजवळ प्रत्येक स्त्री ला एक दादला होता ..म्हणजे प्रत्यक्ष लग्न करून मिळालेला नाही तर ..त्या स्त्री ने जीव लावलेला..तिचे प्रेम बसलेला एक गुंड प्रवृत्तीचा माणूस ..किवा एखादे आवडते ..नेहमीचे गी-हाइक तिने दादला म्हणून निवडले असे ... या व्यक्तीशी ती स्त्री पत्नी सारखे वागे .. तो जरी हिच्यासोबत रहात नसला तरी ..तिने मनोमन त्याला आपला पती मानलेला असे .. त्याचे बाळ वाढविण्याची जवाबदारी तिनेच घेतलेली असे .. तो हिच्याकडे फुकट बसे ..बहुधा असा दादला दारुड्या ..व्यसनी असे ..तरी देखील ती स्त्री त्याच्यावर जीव लावून राही ..कदाचित स्वतची मातृत्वाची ..संसाराची ..वैवाहिक जीवनाची सारी स्वप्ने पूर्ण करण्याची ही धडपड असावी ... ! 

आणखी एका ठिकाणी एक तरुण मुलगी रडत बसलेली दिसली ... दिपाली तिचे नाव ..तिच्या कपाळावर टेंगुळ आलेले दिसत होते .. सरांनी तिला विचारले ' आज फिर मारा क्या तुम्हे ? क्यू मार खाती रहेती हो ? ' एकंदरीत सरांना तिच्या रडण्याचे कारण माहित असावे असे दिसले .. सरांनी मग सांगितले की हीचा दादला दारुड्या आहे ..दर दोन चार दिवसांनी तो येतो .दारूला पैसे मागतो .. दिले नाही तर भांडतो ..शिवीगाळ करतो ..मार झोड करतो हिला ..मात्र ही सगळे मुकाट सहन करते ..म्हणे त्याच्यावर प्रेम आहे हिचे .. मारझोड सहन करून ..कष्टाचे पैसे त्या दारुड्याला देवून .. रडून .. नशिबाला दोष देवून .. कायम असणारे तिचे प्रेम दिव्यच म्हणायचे ....तितक्यात एक जण कोल्ड्रिंक्स च्या बाटल्या घेवून आला आमच्यासाठी .. आम्ही मागीविले नसताना हे कसे आणले असा विचार माझ्या मनात आला .. सर म्हणाले या बायकांनी आपल्यासाठी मागवलेय हे कोल्ड्रिंक ..आपण जर नकार दिला तर त्यांना वाईट वाटेल .. आम्ही कोल्ड्रिंक घेतल्यावर सर पाकिटातून पैसे काढून त्याला देवू लागले तश्या त्या स्त्रिया सरांना विरोध करू लागल्या ..' हमारी तरफसे है ये डॉक्टरसाहब ..पैसे हम देंगे .. ' असा आग्रह करू लागल्या ..सर म्हणाले ' पिछली बार आपने पैसे दिये थे ..इस बार मेरी बारी है .. अगली बार फिर आप देना ' कोणतेही नाते नसताना चाललेला हा संवाद अतिशय आपुलकीचा होता ..या स्त्रिया बिचाऱ्या अक्षरशः जीव पणाला लावून त्यांचा व्यवसाय करत होत्या ..अश्या कष्टातून मिळवलेल्या पैश्यानी त्यांनी आपल्याला कोल्ड्रिंक पाजणे सरांना योग्य वाटत नव्हते .. तर ही माणसे इतकी आवर्जून आमची विचारपूस करतात ..सन्मानाने वागवतात .. वेळप्रसंगी औषधे देतात आम्हाला ..अश्या लोकांना आपल्या घरी आल्यावर पाहुणचार म्हणून काहीतरी दिलेच पाहिजे अशी त्यांची भावना ...!

सायंकाळचे पाच वाजत आले तसे सर म्हणाले आता आपण निघुयात ..यांची खरी धंद्याची वेळ होईल आता .. अश्या वेळी आपण येथे थांबलो तर त्यांना संकोच वाटेल .. आताचे यांचे रूप आणि धंद्याला उभे राहिल्यावर असणारे यांचे रूप यात जमीन अस्मानाचा फरक असतो ...त्यांना तश्या अवस्थेत आपण पाहू नये अशी त्यांची इच्छा असते .. आम्ही जायला निघालो तश्या सगळ्या जणी भोवती जमल्या पुन्हा या असे आमंत्रण देवू लागल्या .. आता या पुढे नक्की कंडोम चा आग्रह धरू असे म्हणू लागल्या .. आम्ही जड अंतकरणाने गल्लीच्या बाहेर पडलो ..वाटेत सर सांगू लागले ..या सर्व मजबुरीने या धंद्यात आहेत .. कोणत्याही स्त्री ला मनापासून हे आवडत नाही ..प्रत्येकीला आपल्याला घर संसार असावा असे वाटते ...दुर्दैवाने त्यांना हे मिळू शकले नाहीय .. या पैकी काही जणी प्रियकराबरोबर लग्न करायला म्हणून घरून पळून आलेल्या आहेत ..वाटेत प्रियकराने सोडून दिल्यावर भरकटत येथे पोचल्या ... आता घरचे दरवाजे बंद झालेत त्यांच्यासाठी .. शिवाय घरी परत गेल्या तर गावकरी सगळ्या कुटुंबाला वाळीत टाकतील भीती आहे ..काही जणींना घराच्या दारिद्र्यामुळे आईबापानी विकले आहे ..काहीजणी देवदासी प्रथेच्या बळी आहेत .. एकंदरीत सारा समाजच जवाबदार आहे त्यांच्या या अवस्थेसाठी ..!

( बाकी पुढील भागात )

शनिवार, 25 मई 2013

प्रशिक्षण


दिल्लीचे प्रशिक्षण ! (पर्व दुसरे -भाग सहावा )


दिल्लीला प्रशिक्षणासाठी माझी व मिलिंद या माझ्या मित्राची निवड झाली म्हणून आम्ही खूप आनंदात होतो ..मिलिंद मुळचा साताऱ्याचा ..त्याला दारूचे व्यसन होते ..माझ्यासोबतच तो मुक्तांगण मध्ये दाखल होता .. अंगाने किरकोळ होता ..बाकी अस्सल सातारी ...बोलण्यास तिखट ..त्यानेही व्यसनमुक्तीचे दीड वर्ष पूर्ण केले होते व तो अजूनही मुक्तांगण मध्येच निवासी कार्यकर्ता म्हणून राहत होता ..दोन दिवस आधी मी मुक्तांगण मध्ये गेलो ...दिल्लीला जाण्याची आमची सगळी तयारी झाल्यावर जाण्याच्या आदल्या दिवशी मँडम ने आम्हाला भेटायला बोलाविले ....आम्हाला एकंदरीत प्रशिक्षणाचे स्वरूप सांगितले ..जास्तीत जास्त माहिती घ्या ..मुक्तांगणचे नाव मोठे करा ...आपण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहोत हे विसरू नका ..वगैरे सूचना दिल्या ..शेवटी तेथे पंधरा दिवस खर्च करायला म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये दिले ..संस्थेचे पैसे आहेत हे ..या पैश्यांचा नीट हिशोब ठेवा असा बजावले ..अगदी शेवटी त्यांनी स्वतच्या पर्स मधून पाचशे रुपये काढून आम्हाला दिले व म्हणाल्या हे पैसे माझ्यातर्फे तुम्हाला खर्च करायला देत आहे ..याचा हिशोब नाही दिलात तरी चालेल ...त्यांचे बोलणे ऐकून आमच्या डोळ्यात पाणीच आले ..किती सूक्ष्म विचार केला होता त्यांनी ... मुलांना व्यक्तिगत खर्च करायला पैसे द्यायला हवेत हे समजून घेवून ..स्वतःजवळचे पैसे त्यांनी आम्हाला दिले होते तसेच त्या पैश्यांचा हिशोब दिला नाहीत तरी चालेल असे सांगून आमच्यासारख्या व्यसानींवर गाढ विश्वास दर्शविला होता ...आमचे रेल्वेचे जाण्यायेण्याचे आरक्षण आधीच करून ठेवले होते संस्थेतर्फे ...दुसऱ्या दिवशी सर्वांचा निरोप घेवून आम्ही निघालो ..माझी आत्या पूर्वी दिल्लीला राहत होती ..त्यामुळे पूर्वी माझे दिल्लीला दोन तीन वेळा गेलो होतो ..दिल्ली दर्शन करून झाले होते पूर्वीच .. यावेळी मात्र जाण्याचे कारण वेगळे होते .


आम्ही दिल्लीत प्रशिक्षणाच्या आदल्या दिवशी रात्रीच पोचलो ..स्टेशनजवळच एका होटेल मध्ये रात्री मुक्काम करून ..दुसऱ्या दिवशी सकाळी ' नँशनल युथ सेंटर '... रिंग रोड . या पत्त्यावर पोचलो ...तेथेच आमची सर्व प्रशिक्षणार्थी लोकांची राहायची सोय होती ..प्रशिक्षण देखील तेथेच होणार होते ..मध्यप्रदेश ..महाराष्ट्र ..राजस्थान ..गुजरात .. हरियाणा ..दिल्ली ..उत्तरप्रदेश या ठिकाणाहून मिळून सुमारे २० जण प्रशिक्षणासाठी आलेले होते .. एकमेकांच्या ओळखी झाल्यावर लक्षात आले की ते सगळे लोक ' मुक्तांगण ' बद्दल ऐकून होते ..तसेच सर्वात जास्त पेशंटची संख्या आणि यशस्वी केंद्र म्हणून मुक्तांगणचा दबदबा होता ...छान सोय केली होती सर्वांची राहण्या -जेवण्याची .. व्यसनाधीनता या आजाराबद्दल आणि उपचारांबद्दल वेगवेगळ्या तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन मिळणार होते आम्हाला .. राहून राहून एक प्रश्न मनात येत होता ... गुजरात मध्ये दारूबंदी असूनही तेथे व्यसनमुक्ती केंद्र कसे ? सरकार देखील या केंद्राला मंजुरी देवून अनुदान देतेय ..म्हणजे दारूबंदी फक्त कागदोपत्री आहे हे सरकारला देखील मान्य आहे तर .. एकीकडे दारूचे नवीन परवाने द्यायचे ...दारू उत्पादकांना हव्या त्या सवलती देवून मदत करायची आणि दुसरीकडे व्यसनमुक्ती केंद्राना अनुदान द्यायचे हे गौडबंगालच होते ...खरे तर खरोखर केंद्र सरकारने मनावर घेतले तर दारू आणि इतर मादक पदार्थ बंद करणे नक्कीच शक्य झाले असते ... अगदी १०० टक्के नाही तरी बराच फरक पडला असता .. तेथे वारंवार एक गोष्ट सांगितली गेली जोपर्यंत प्रत्यक्ष व्यसनी व्यक्ती मनावर घेत नाही तोवर त्याला व्यसनमुक्त राहणे शक्य नसते ..हे मात्र पटले ..परंतु त्याच्या परवानगी खेरीज त्याला व्यसनमुक्ती केंद्रात सक्तीने दाखल करण्यास मनाई असते हा मुद्दा पटला नाही ... कारण दारू पिणाऱ्या व्यक्तीला स्वतचे भले बुरे समजत असते तर तो मुळात व्यसनी झालाच नसता ..अनेक जण मला असे माहित आहेत की दारू अथवा अन्य व्यसनांमुळे त्याचे व त्याच्या कुटुंबियांचे अतोनात नुकसान होतेय .. अगदी जीव जायची पाळी आलीय ..तरीही व्यसानीच्या मानसिक व शारीरिक गुलामीमुळे तो व्यसनमुक्ती केंद्रात स्वतःहून जाण्यास तयार होत नाहीय .. पालकदेखील हतबल झालेत अश्या वेळेस देखील आपण त्याच्या उपचार घेण्याच्या इच्छेची वाट पाहायची का ?


प्रशिक्षणाला आलेल्या काहीजणांना तर व्यसनाधीनता हा एक मनोशारीरिक आजार आहे याची देखील कल्पना नव्हती असे दिसले .. त्यांच्याकडे काहीच थेरेपीज होत नसत ..दिवसभरातून फक्त एकदा योगाभ्यास करायचा आणि दिवसभर टी.व्ही . कँरम व इतर मनोरंजन करायचे असा दिनक्रम होता उपचार घेणाऱ्या व्यसनी लोकांसाठी ... मला मुक्तांगणचा आणि बाबा व मँडम चा खूप अभिमान वाटला की त्यांनी व्यसनाधीनता हा व्यक्तिमत्वाला जडलेला आजार आहे हे ओळखून व्यसनी व्यक्तीच्या सर्वांगीण बदलासाठी योग्य असे उपचार देण्याची व्यवस्था केली होती ...समूह उपचार ..व्यक्तिगत समुपदेशन ...पालकांचे समुपदेशन ..पाठपुरावा अशा सर्व अंगाने उपचार देवून मुक्तांगण व्यसनी व्यक्तीला केवळ व्यसनमुक्तीच नव्हे तर एक आदर्श व्यक्ती म्हणून जगण्यास प्रेरणा देत होते ....अल्कोहोलिक्स अँनॉनिमस या संघटनेच्या सुधारणेच्या १२ पायऱ्यांवर आधारित असेच उपचार मुक्तांगण देत होते .. ज्यात व्यसनमुक्ती व आत्मिक विकास .. समाधान ..प्रसन्नता .. नैतिक मूल्याधिष्ठित अशी जीवनपद्धती अंगीकारण्यास मदत केली जाई ...प्रशिक्षणाच्या दरम्यान आम्हाला एकदोन ठिकाणी जनजागृती कार्यक्रम करण्यास देखील नेले होते ..जनजागृती कार्यक्रम म्हणजे एका सुसज्ज व्हँन मधून एखाद्या झोपडपट्टीत जावून ..व्यसनाधीनतेमुळे होणारे दुष्परिणाम दर्शविणारी फिल्म दाखवणे ... त्याच दरम्यान एकदा मिलिंद व मी सायंकाळी लाल किल्ला पाहायला गेलो असताना तेथे बाहेर उभ्या असलेल्या बसेसच्या खाली अनेक गर्दुल्ले मला ब्राऊन शुगर ओढताना दिसले ..माझे कुतूहल जागृत झाले .. दिल्लीत माल किती रुपयांना मिळतो ..कसा असतो वगैरे प्रश्न त्या मुलांना विचारावेसे वाटले ..मी मिलिंदला तसे म्हंटले तर तो घाबरला ..त्याला वाटले मला आँब्सेशन आले की काय ... तो मला त्या मुलांशी बोलण्यास मनाई करू लागला व परत युथ सेंटरला जाण्याची घाई करू लागला .. कदाचित त्याला वाटले असावे की न जाणो तुषार या मुलांमध्येच पीत बसला तर ?.. तो माझी किती काळजी घेतोय या विचाराने बरेही वाटले ...


( बाकी पुढील भागात )

=====================================================

सरकारी दृष्टीकोन ! ( पर्व दुसरे - भाग सातवा )



मिलिंदने मला लाल किल्ल्याजवळ अजिबात थांबू दिले नाही जवळ जवळ हात धरूनच बसची वगैरे वाट न पाहता ऑटोत बसवले आणि आम्ही युथ सेंटरला परतलो . या प्रशिक्षणाच्या दरम्यान शेवटच्या दोन दिवशी दिल्लीतील काही व्यसनमुक्ती केंद्राना भेटी देण्यास आम्हाला सर्वाना नेले .. त्यातील मा . किरण बेदी यांचे ' जिवनज्योती ' हे केंद्र देखील पहिले .. पोलीस मुख्यालयाच्या वरच्या मजल्यावर हे केंद्र होते .. दिल्लीत जेव्हा ब्राऊन शुगरने थैमान घातले तेव्हा गुन्हेगारी वाढली .. त्या वेळी व्यसनाधीनता आणि पर्यायाने गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी म्हणून हे केंद्र सुरु केले गेले .. किरण बेदी यांनी वेळीच संकट ओळखून शक्य ती उपाय योजना केली होती ..तसेच व्यसनी व्यक्तीकडे एक गुन्हेगार म्हणून न पाहता आजारी व्यक्ती म्हणून पाहण्याचा व आवश्यक ते उपचार देण्याचा दृष्टीकोन बाळगला होता .. किरण बेदी स्वतः या केद्रात लक्ष घालतात असे कळले .. त्यांच्या या संवेदनशीलतेमुळे त्यांच्या बद्दलचा आदर वाढला ..पुढे त्यांनी तिहार जेल मध्ये देखील हाच दृष्टीकोन बाळगून गुन्हेगारांना पुन्हा माणसात आणण्यासाठी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत ... शेवटच्या दोन दिवसात जरा गम्मत झाली ..युथ सेंटरला आमचे प्रशिक्षण संपल्यानंतर एक दुसरे प्रशिक्षण होणार होते वेगळ्या विषयाचे ..त्यासाठी दोन दिवस आधीच भोपाळहून दोन मुली आल्या होत्या ..व त्यांनी देखील दोन दिवस आमच्यासोबत आमच्या सेशन मध्ये भाग घेतला ..गंमतीचा भाग असा की इतके दिवस सर्वाना जरा रुक्ष वाटणारे प्रशिक्षण या दोन मुलींच्या प्रवेशाने एकदम छान वाटू लागले ..सर्वांची विनोदबुद्धी जागृत झाली ...हलके फुलके विनोद होऊ लागले .. एरवी कोणताही प्रश्न न विचारता चूप बसणारे सदस्य देखील ... आपल्या चौकसपणाचा प्रत्यय देवू लागले ...याच काळात एक तद्दन फालतू अंधश्रद्धा देखील समजली .. आमच्या सोबत लखनौ येथील व्यसनमुक्ती केंद्राचे दोन सदस्य होते .. प्रशिक्षणाच्या चौथ्या दिवशी त्या पैकी एकाने अंघोळ करून बाहेर व्हरांड्यात वाळत घातलेली त्याची अंडरवेअर व बनियान हे कपडे वा-याने उडून गेले ..आम्ही खाली शोध घेतला पण काही ते कपडे सापडले नाहीत ... आता नवीन अंडरवर व बनियान घ्यावे लागणार होते ..मात्र सतत तीन दिवस त्यांना काही बाजारात जाता आले नाही ..आश्चर्य म्हणजे ज्याचे कपडे हरवले होते त्या वल्लीने तीन दिवस अंघोळच केली नाही ..जेव्हा मी त्याला अंघोळ न करण्याचे कारण विचारले तेव्हा तो म्हणाला ... ' हम नहाते समय सारा कपडा निकलते नही है ... और अगर अभी जो अंडरवेअर पहेना है वो गिली हो गई तो मुसिबत हो जायेगी .. बडा पाप होता है ' म्हणजे अंघोळ करताना स्वतचे शरीर अनावृत्त पाहणे हे त्याच्या दृष्टीने पाप होते .. लहान पणापासून त्याने स्वतःला असे अनावृत्त कधी पहिले नव्हते .. बापरे ... म्हणजे हा याच्या शरीराच्या सर्व अंगांची स्वच्छता कशी करत असणार ? शेवटी जेव्हा नवी अंडरवेअर बाजारातून विकत आणली तेव्हाच त्याने अंघोळ केली ... .


आम्हाला सर्वाना या दरम्यान व्यसनमुक्ती या विषयावर एक चित्र काढण्यास सांगितले गेले .. चित्रकलेत मला अजिबात गती नाही ..येथे कलेपेक्षा चित्राच्या कल्पनेला आणि त्यातून दिल्या जाणाऱ्या व्यसनमुक्तीच्या संदेशाला जास्त महत्व होते .. आमच्या सोबत पटना येथून रेडक्रॉस सोसायटी तर्फे प्रशिक्षणाला आलेला राजेश म्हणून एक उत्साही तरुण होता त्याची चित्रकला छान होती ..मग सर्व जण माझे चित्र काढून दे म्हणून त्याच्या मागे लागले ..बिचा-याने कसलीही कुर कुर न करता आम्हाला आमच्या कल्पनेनुसार चित्रे काढून दिली ..मी भारत देशाचा नकाशा काढून त्यातून दोन हात बाहेर आले आहेत ..आणि एका पाठमोऱ्या तरुणाला ते हात आपल्या मिठीत घेत आहेत असे चित्र काढायला सांगितले .. चित्राच्या वर एक वाक्य लिहिले होते .. ' देश को आपकी जरुरत है " म्हणजे व्यसनाधीन झालेल्या तरुणांना हा संदेश होता की तुम्ही कुचकामी नाही आहात ..तर देशाला तुमची गरज आहे .. व्यसनमुक्त होऊन आपले कर्तव्या बजावा ... मिलिंद ने असे चित्र सांगितले की जमिनीवर एक जाळे पसरले आहे .. त्या जाळ्यात .दारू ..चरस ..गांजा ..ब्राऊन शुगर वगैरे मादक पदार्थ ठेवले आहेत ... वरून आकाशातून एक पक्षांचा थवा उडतोय .. त्या पक्षांची तोंडे माणसांची काढली होती .. आणि त्या चित्रा वर लिहिले होते ' ये जाल हमारी बरबादी है ' .. मिलिंदच्या चित्राला पहिले तर माझ्या तिसरे बक्षिस मिळाले ..बक्षिस म्हणजे आम्हाला रविंद्रनाथ टागोरांची दोन पुस्तके भेट मिळाली .. आता त्यांची नावे आठवत नाहीत ... .


एकंदरीत प्रशिक्षण छानच झाले .. उपचारांबद्दल तसेच समुपदेशना बद्दल बरीच नवी माहिती मिळाली ..मुक्तांगण अगदी योग्य पद्धतीने उपचार देते याची खात्री पटली मला ...अगदी शेवटच्या समारोपाच्या दिवशी सर्वाना आपले मनोगत व्यक्त करायला सांगितले गेले ..त्या भोपाळ च्या मुली होत्याच ..मग काय सर्वांच्या बोलण्याला बहार आला होता .. हे प्रशिक्षण घेवून कृतकृत्य झालो .. आयुष्यातील सर्वात चांगले क्षण .. आता सारा देश व्यसनमुक्त करू .. असल्या आशयाचे सर्व बोलू लागले .. एक दोघांनी राहण्याच्या व्यवस्थेबाबत तक्रार केली .. अंडरवेअर हरवलेल्या व्यक्तीने कपडे सुखानेकी अच्छी व्यवस्था होनी चाहिये असे सुचवले .. मी सर्वाना हलके चिमटे काढत बोललो .. मग गाणी म्हणणे झाले .. अर्थात गाण्यात मी बाजी मारली .. प्रसंगाला साजेसे असे गाणे म्हंटले...गाण्याला वन्स मोअर मिळाला .. हेमंतकुमारचे ' ना तुम हमे जानो ..ना हम तुम्हे जाने ..' हे गाणे म्हंटले होते .. शेवटी प्रमाणपत्रे वाटप झाले . प्रशिक्षण घेतल्यावर व्यसनमुक्ती कार्यकर्ता म्हणून काम करण्यास एक वेगळा आत्मविश्वास मिळाला ..अर्थात प्रमाणपत्रामुळे व्यक्तिमत्वाचे थोडे वजनही वाढले .. त्याचा अहंकार होऊ द्यायचा नव्हता ही जवाबदारी माझी होती . 


( बाकी पुढील भागात )

=====================================================

रोटरी क्लब हॉल …. गंजमाळ ! (पर्व दुसरे - भाग आठवा ) 



प्रशिक्षण यशस्वी पणे पूर्ण करून मिलिंद आणि मी मुक्तांगणला परतल्यावर … आमचा आत्मविश्वास वाढलेला होता … अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे व्यसनमुक्ती खूप अनमोल गोष्ट आहे हे देखील लक्षात आली होती ….माझ्या अनेक क्षमता केवळ व्यसनामुळे मी वापरू शकत नव्हतो … सर्व व्यक्तिमत्वच व्यसनामुळे शून्य झाले होते ..... आता नव्याने सर्व क्षमता वापरून जीवन उभे करायचे आव्हान होते माझ्यापुढे … नाशिकला परत जाताना मला सांगितले गेले की आता नाशिकमध्ये सर्व डिस्चार्ज झालेल्या मित्रांना आठवड्यातून एकदोन वेळा भेटण्यासाठी एखादी चांगली जागा आपल्याला मिळवायची आहे…. त्यासाठी नाशिकच्या रोटरी क्लबचे सदस्यांनी उत्सुकता दाखविली आहे … नशिकच्या रोटरी क्लबच्या स्थानिक सदस्यांना भेटून पुढची कार्यवाही मला करायची होती … त्या नुसार…. मी रोटरीचे स्थानिक अध्यक्ष श्री . भालचंद्र गाडगीळ यांना भेटलो …. साधारण सत्तरीचे असणारे गाडगीळ साहेब पूर्वी उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत होते असे समजले होते मला … जरा भीत भीतच त्यांना भेटलो … खरे तर हे रोटरी क्लब …… लायन्स क्लब … जेसीज वगैरे समूहांच्या बाबतीत माझा असलेला गैरसमज गाडगीळ साहेबांच्या भेटीमुळे दूर झाला ……हे सगळे पैसेवाले लोक उगाचच टाईमपास करण्यासाठी …… तसेच आपण काहीतरी सामाजिक कार्य करतो आहोत असे स्वतचे समाधान करून घेण्यासाठी म्हणून…असल्या संस्थामधून सदस्य होऊन … एखाद्या …… सामाजिक समस्येसाठी काहीतरी किरकोळ मदत करतात …. मात्र मारे फोटोबिटो काढून त्या मदतीची वर्तमानपत्रातून जाहिरात करतात आणि स्वतःचीच पाठ थोपटून घेतात …असा माझा समज होता ……. शिवाय हे लोक स्वतच्या नावापुढे लायन श्री. ………रोटरी श्री . ……. असे जे बिरुद लावतात … त्याचीही मला गम्मत वाटत असे … थोडक्यात काय तर काम कमी आणि गवगवा जास्त करतात असे मला वाटे …

गाडगीळ साहेबाना भेटल्यावर माझा गैरसमज दूर झाला … सगळ्यात महत्वाचे हे की वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी लोकांना देखील समाजासाठी आपण काहीतरी करावे असे वाटणे ही मोठी गोष्ट आहे …. शिवाय हे लोक राजकीय संघटनांपासून स्वतःला दूर ठेवतात हि एक चांगली बाब होती … ते जे कार्यक्रमाचे फोटो वगैरे काढतात आणि वर्तमानपत्रात छापून आणतात ते सारे त्यांच्या वार्षिक अहवालासाठी गरजेचे असते म्हणून कारण जे सदस्य क्लब ची नियमित वर्गणी भरतात त्यांना आपण दिलेल्या पैश्यांचा योग्य विनियोग होतोय याची खात्री पटवण्यासाठी हे फोटो काढणे असते …. तसेच आठवड्यातून किमान एक तास तरी आपण सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक समस्या सोडवण्यासाठी थोडाफार हातभार लावला पाहिजे ही त्यांची इच्छा असते … अशी माहिती मला गाडगीळ साहेबांकडून मिळाली … हे समजल्यावर अश्या संस्थांबद्दल असलेला माझा सुप्त राग कमी होऊन आदर वाटू लागला . गाडगीळ साहेब अतिशय मोकळेपणे माझ्याशी बोलले … पूर्वी मी देखील व्यसनात अडकलेला होतो हे एकून तर त्यांना माझे अधिकच कौतुक वाटले असावे असे जाणवले … नाशिक मध्ये गंजमाळ भागात रोटरी क्लबच्या तर्फे एक हॉल बांधण्याचे काम सुरु होते … व ते आता पूर्णत्वाला पोचले होते … या हॉलचा उपयोग … रोटरी क्लबच्या मिटींग्स … सदस्यांच्या कडील समारंभ वगैरेंसाठी वापरला जाणार होता …. तसेच काही सामाजिक उपक्रमांसाठी देखील हा हॉल विनामुल्य उपलब्ध करून देण्याचे ठरले होते …त्या नुसार गाडगीळ साहेबांनी मुक्तांगण मध्ये उपचार घेवून परतलेल्या नाशिकच्या लोकांसाठी …. पाठपुरावा मिटींग्स व व्यसनमुक्ती सल्ला केंद्र म्हणून उपयोग करण्यासाठी रोटरी हॉल आठवड्यातून दोन वेळा देण्याचे मान्य केले … नंतर रोटरी क्लबचे चिटणीस म्हणून काम करणाऱ्या श्री. खुशालभाई पोद्दार यान देखील भेटलो …. ते देखील अतिशय मनमिळावू आणि हसतमुख होते त्यांनीही शक्य ती सगळी मदत करण्याची खात्री दिली मला . 

रोटरी क्लब हॉल वर मुक्तांगण चे ' व्यसनमुक्ती सल्ला व पाठपुरावा केंद्र ' सुरु होणार असल्याची बातमी मी दैनिक गावकरी …दैनिक देशदूत …सकाळ वगैरे वर्तमानपत्रात दिली… आणि एकदाचे पाठपुरावा केंद्र सुरु झाले … वर्तमानपत्रात बातमी वाचून अनेक पालक चौकशी करण्यासाठी येवू लागले …. बुधवार व शनिवार असे आठवड्यातून दोन दिवस सायंकाळी ७ ते ९ अशी सल्ला केंद्राची वेळ असणार होती … आता या वेळात मला नियमित हॉल वर उपस्थित लागणार होते . मी ज्या ज्या ठिकाणी होम व्हीजीटस केल्या होत्या तेथे ही माहीती दिली …. व्यसनमुक्ती सल्ला केंद्राचे कामकाज पाहणारा कार्यकर्ता म्हणून माझेही नाव वर्तमान पत्रात छापुन आले होते …पहिल्याच बुधवारी एक पालक सल्ला घेण्यासाठी आले … ते रविवार कारंजा भागात राहणारे होते … त्यांचा भाचा हा दारूच्या आहारी गेला होता …. तो स्वतः व्यसनी झाल्याचे मान्य करतच नव्हता आणि कोठेही उपचार घेण्यास देखील तयार नव्हता … मी त्याला त्याच्या घरी जावून भेटावे आणि त्याला उपचार घेण्यास तयार करावे अशी त्याच्या मामांची इच्छा होती … शिवाय त्याला मामा पुढाकार घेत आहेत हे देखील कळता कामा नये असे त्यांचे म्हणणे होते …. नाहीतर नंतर तो त्यांच्यावर रागावेल किवा आपण व्यसनी असल्याचे इतरांना सांगितले म्हणून भांडेल अशी भीती त्यांना वाटत होती … हे जरा अवघड काम होते … खरेतर मामा त्याच्या भल्याचाच विचार करत होते … तरीसुद्धा त्यांना भीती वाटत होती व्यसनी व्यक्तीची नातलागांमध्ये किती दहशत असते हे जाणवले मला … मला त्यांची समजूत घालावी लागली कि नातलग जर असे व्यसनी व्यक्तीला घाबरले तर तो सुधारण्याची शक्यता खूप कमी असते … त्याला घाबरण्यापेक्षा आम्ही तुला मदत करत आहोत आणि ते तुझ्या भल्याचे आहे असे त्याच्या मनात ठसविले पाहिजे … तसेच कितीही भांडलास … रागावलास तरी आम्ही तुला असे बरबाद होऊ देणार नाही हे त्याला गोडीगुलाबीने किवा जरा ठासून सांगितले पाहिजे वगैरे … तरी ते मामा घाबरतच होते शेवटी मी त्यांना तुम्ही मला किमान त्या भाच्याकडे घेवून तरी चला असा आग्रह केला … ते कसेतरी तयार झाले रात्री नऊ वाजता मी त्यांच्या सोबत सिडको येथे राहणाऱ्या त्यांच्या भाच्याकडे गेलो … त्याचे वडील गेलेले होते … घरात आई , लहान भाऊ व लहान बहिण होती … हे महाशय अजून घरी परतले नव्हते … जर वेळ ओळख वगैरेत गेला … खूप हुशार आहे … स्वभावाने पण खूप चांगला आहे परंतु व्यसनामुळे बिघडला वगैरे नेहमीचेच बोलत होते नातलग … सुमारे अर्ध्या तासाने तो घरी आला … मीच पुढाकार घेवून त्याला माझी ओळख करून दिली व मोकळेपणी गप्पा मारू म्हणत त्याला गच्चीवर घेवून गेलो … किरकोळ शरीरयष्टी… गोरा… मध्यम उंची …डोळ्यावर चष्मा … त्याचे नाव अभय होते … मी त्याला माझ्या व्यसनाच्या पूर्व इतिहासाबद्दल थोडक्यात सांगितले … त्याच्याशी एकदम दोस्तीखात्यात बोललो ते त्याला आवडलेले दिसले … त्याला सरळ म्हणालो की तुला जर आता दारू पिणे हि तुझी समस्या आहे असे वाटत असेल … तर मी तुला नक्की मदत करीन … माझे बोलणे बहुतेक प्रभावी असावे … कारण त्याने त्याला दारूची समस्या असल्याचे कबुल केले … तसेच येत्या शनिवारी रोटरी हॉल वर येण्याचे मान्य केले … पुढे त्याला हे देखील सांगितले कि जमले तर शनिवारी मला भेटायला येताना दारू न पिता ये … त्याने ते देखील मान्य केले . 

( बाकी पुढील भागात )

======================================================

मादक द्रव्ये विरोधी दिन ! ( पर्व दुसरे - भाग नववा )



अभय खरोखरच शनिवारी रोटरी हॉल वर मिटिंगला आला शिवाय त्याने दोन दिवसांपासून दारू प्यायली नाही हे देखील सांगितले… मला खूप आनंद झाला…. व्यसनमुक्ती सल्ला केंद्र सुरु झाल्यावर माझ्याकडे आलेली पहिलीच केस होती अभयची … सुरवात तर चागली झाली होती म्हणायची… सल्ला केंद्रावर दर बुधवार आणि शनिवारी किमान चार पाच जण तरी येवू लागले नियमित हे चांगली बाब होती … मेरीतील लोकशाही मित्र मंडळाचे काम देखील छान सुरु झाले होते …. मी लोकशाही मित्र च्या वार्ता फलकावर नियमित काहीतरी लिहू लागलो होतो … शिवाय उन्हाळ्यात बस थांब्यावर थांबलेल्या तसेच रस्त्यावरून ये जा करणाऱ्या लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून लोकशाही मित्र तर्फे आम्ही वर्गणी काढून दोन मोठे रांजण आणले होते …. त्यात रोज ताजे पाणी भरून आम्ही ' पाणपोई ' देखील सुरु केली होती …… सुरवातीला रांजणात पाणी रोज कोण भरणार हो प्रश्न होता …थोडे दुरून म्हणजे जवळजवळ २०० फुटावर असलेल्या नळाचे पाणी बादलीने भरून रांजणात आणून टाकायचे काम आधी मी एकट्यानेच सुरु केले … मी कोणताही संकोच न ठेवता …. हे पाणक्याचे काम चार पाच दिवस नेमाने केल्यावर इतर तरुण सदस्यांना हुरूप आला … ते देखील मला मदत करू लागले ….माझे पूर्वायुष्य विसरून पूर्णपणे नवीन जीवन सुरु करण्याच्या प्रयत्नात होतो मी … त्याकाळात मी दाढी वाढवली होती …. अर्थात ही दाढी प्रेमभंग झाला म्हणून नव्हती … तर काहीतरी वेगळेपण म्हणून वाढवली होती …. जीन्स , खादीचा झब्बा , गळ्यात शबनम पिशवी आणि पायात कोल्हापुरी चपला असा … माझा एखाद्या पत्रकारासारखा वेश असे … प्रथम दर्शनी छाप पाडणारा हा वेश माझ्या कामाच्या स्वरूपाला साजेसा होता … अनघाची कधी कधी तीव्रतेने आठवण होई …तेव्हा मन काही काळ उदास होत असे … वाटे कसेही करून तिची भेट घ्यावी … तर कधी कधी मनात खूप वाईट असे विचार देखील येत असत …ते इथे सांगण्यासारखे नाहीत … कारण ते विचार ज्याचे आपल्या प्रेयसीशी लग्न होऊ शकले नाही त्या प्रत्येकाच्या मनात येत असावेत … त्यात कसेही करून ती आपली व्हावी हाच निष्कर्ष असे …मानवी मन हा एक सदैव अभ्यासाचा विषय राहिला आहे … मनात येणारे विचार … कधी कधी खूप विध्वंसक असतात … तटस्थपणे त्या विचारांचे परीक्षण न करता त्यात वाहवत गेले तर …कोणाचेच भले होत नाही …जाऊ दे अनघा जेथे कुठे असेल तेथे ती सुखी राहो … आनंदी राहो … हा विचार करून मी मनाला समजावत असे. 

पाटील साहेबांशी आता माझ्या छान गप्पा होत असत … ते जेव्हा एकटे असतील तेव्हा मला बसवून घेत …सामाजिक समस्या … गुन्हेगारी … वाढती व्यसनाधीनता वगैरे सगळे विषय असत त्यांच्या बोलण्यात … अतिशय संवेदनशील मनाचा हा गृहस्थ पोलिस दलात कसा रमला हे कोडेच होते … कधी कधी त्यांच्या बोलण्यातून जाणवत असे की पोलिसांनी मनात आणले तर ते बरेच काही करू शकतात मात्र … त्यांच्या कामात असणारा राजकीय हस्तक्षेप हि मोठी अडचण होती . एकदा पाटील साहेबांनी मला सांगितले पुढच्या महिन्यात म्हणजे २६ जून या दिवशी आंतरराष्ट्रीय मादक द्रव्ये विरोधी दिन आहे … जागतिक आरोग्य संघटनेच्या सुचने नुसार … या दिवशी मादक द्रव्यांचे दुष्परिणाम जास्ती जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी … चर्चा सत्रे … व्याख्याने … पथनाट्ये… शोभायात्रा काढून हा दिवस पाळायचा असतो …. तू देखील येथे नाशिकमध्ये या दिवशी मुक्तांगण तर्फे काहीतरी जन जागृती कार्यक्रम करावेस असा तुला बाबांनी निरोप दिला आहे …. पाटील साहेब त्यासाठी लागणारे पैसे व इतर सहकार्य करण्यास तयार होते … मी संध्याकाळी लोकशाही मित्र च्या मित्रांसोबत चर्चा केली …. सर्वांनी ती कल्पना उचलून धरली … मग आम्ही एक पथनाट्य बसवायचे ठरवले … तसेच एक छोटीशी शोभायात्रा देखील काढायचे ठरले … त्या नुसार मी काही तरुणांना हाताशी धरून पथनाट्य बसविण्यास सुरवात केली …. मी इतर सर्व व्यवस्था पाहणार होतो म्हणून पथनाट्यात भूमिका करणार नव्हतो … एक तरुण मुलगा मित्रांच्या नादाने कसा व्यसनात अडकत जातो … सुरवातीला आनंद देणारे व्यसन नंतर त्याच्या आयुष्यात कसा विध्वंस घडवते … आणि शेवटी व्यसनमुक्ती केंद्रात जावून तो उपचार घेतो … अशी मध्यवर्ती कल्पना होती पथनाट्याची …. यात व्यसनी तरुण… त्याचे आईवडील… बहिण … मित्र अश्या चार पाच भूमिका होत्या …. आईची भूमिका करण्यासाठी प्रशांतची आई तयार झाली … इतर भूमिकांसाठी देखील मुले मिळाली … प्रश्न होता बहिणीच्या भूमिकेचा त्यासाठी एखादी तरुण मुलगी तयार व्हायला हवी होती … शेवटी वैजयंती नावाची एक कॉलेजची तरुणी तयार झाली ……फ़क्त तिच्या वडिलांची एक अट होती ती अशी की वैजयंतीला… पथनाट्याची तालीम व इतर वेळी सुरक्षित सोबत हवी … मी ती जवाबदारी स्वीकारली …. हे नाजूक काम होते … पथनाट्यात काम करणाऱ्या … लोकशाही मित्रच्या कार्यकर्त्यांनी काही चूक करू नये … तसेच वैजयंतीला कोणताही त्रास होऊ नये म्हणून बारीक लक्ष ठेवावे लागणार होते … 

शेवटी एकदाचे पथनाट्य बसले … पाटील साहेबांनी वेळोवेळी मला मदत केली …शोभायात्रेसाठी लागणारे कापडी फलक …. रंगविण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ त्यांनी विनासायास पुरवले सिन्नर फाटा … शालीमार चौक … मेरी … भद्रकाली … आणि त्र्यंबकेश्वर अश्या पाच ठिकाणी पथनाट्ये सादर करायचे ठरले … त्र्यंबकेश्वर यासाठी की त्र्यंबकेश्वर येथे ब्राउन शुगरच्या तसेच दारू , भांग , गांजा वगैरेच्या व्यसनींचे प्रमाण लक्षणीय होते … या निमित्ताने आम्ही मेरी परीसरातील नागरिकांसाठी एक निबंध स्पर्धा देखील आयोजित केली होती … विषय होता … ' व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम ' बक्षीस म्हणून रोख रक्कम जाहीर केली होती …एकंदरीत जय्यत तयारी झाली होती । या काळात मी खूपच व्यस्त झालो होतो …. दिवस अगदी भुर्रकन संपे … पथनाट्यातील कलाकारांचे मूड सांभाळणे … बाकी कार्यकर्त्यांचा उत्साह टिकवणे … व इतर सर्व कामे पाहणे यात कधी कधी माझी चीड चीड होई… वैताग येई सगळ्याचा … त्यावेळी अनघाची तीव्रतेने आठवण येई … सारे त्रास … सगळ्या व्यथा … उमाळे … मोकळेपणी व्यक्त करण्यासाठी एखादे हक्काचे ठिकाण असणे किती छान असते … ते आपल्याला नाही याची खंत वाटे … ' आपके पहेलु में आ कर रो दिये … दास्ताने गम सुनाकर रो दिये ' हे गाणे ऐकत वेळ निभावून नेत होतो . 

( बाकी पुढील भागात )

======================================================

२६ जून १९९२ ! (पर्व दुसरे - भाग दहावा ) 



एकाच दिवसात शोभायात्रा … आणि एकंदर पाच पथनाट्ये करणे थोडे अवघडच होते … कारण पथनाट्याची ठिकाणे एकमेकांपासून जवळ नव्हती …. म्हणून दि. २५ रोजी दोन आणि २६ जून रोजी तीन पथनाट्ये करावीत असे आम्ही ठरवले होते त्या नुसार दि . २५ जून रोजी … त्रंबकेश्वर यथे सायंकाळी पाच वाजता …. कुशावर्त चौक येथे आम्ही पहिले पथनाट्य सदर केले … मुक्तांगण मध्ये उपचार घेवून चांगल्या राहणाऱ्या काही मुलांच्या पालकांनी आम्हाला त्यासाठी मदत केली … पथनाट्या सुरु असताना नेमका पाउस आला … रिमझिम असा पाउस सुरु असताना … आम्ही भिजत नेटाने पथनाट्य करत होतो …त्यामुळे जमलेले लोक देखील पावसात भिजतच पथनाट्य पाहत होते … ते संपल्यावर लगेच पुन्हा सगळे बसने नाशिकला आलो …. भद्रकाली मध्ये दुसरे पथनाट्य होते … भद्रकाली मध्ये जुन्या थांब्याच्या समोरच्या मोकळ्या जागेत आम्ही हे पथनाट्य सदर केले होते…. दारू … मटका … व इतर सगळे कुप्रकार सर्रास चालतात अश्या भागात आमचे पथनाट्य असल्याने … पाटील साहेबांनी आमच्या सोबत दोन पोलिस दिले होते … खूप गर्दी जमली होती भोवताली … सगळ्या लोकांना गोलाकार उभे करण्यासाठी लोकशाही मित्रचे कार्यकर्ते आणि पोलिसांची चांगली मदत झाली … आमच्या सोबतचा एक कार्यकर्ता ढोलकी चांगली वाजवत असे ।त्यने आध ढोलकी वाजवून लोकांना आकर्षित करायचे… आम्ही व्यसनमुक्तीपार घोषणा देवून पथनाट्य सदर करीत असू …. घोषणा … सुरवातीचे निवेदन … शेवटी समारोपचे बोलण्याची जवाबदारी मी घेतली होती …. गर्दीत वाहनांचा आवाज बघ्यांचा गलबला …. या सर्वांच्या वरताण करणारा आवाज पाहिजे म्हणून मी मोठ्याने बोलत होतो … भद्रकालीचा प्रयोग फारच सुंदर झाला … नंतर आम्ही सर्व कलाकार व कार्यकर्ते … भद्रकाली पोलिस स्टेशनला पाटील साहेबाना भेटण्यास गेलो … त्यांना त्यांच्या माणसांकडून प्रयोग सुंदर झाल्याची माहिती आधीच मिळालेली दिसली …. सर्व कलाकारांचे अभिनंदन करून त्यांनी आमच्यासाठी चहा मागवला …. चहा घेत असतानाच … एक उघडी पोलिस जीप तेथे आली … सगळे पोलिस पटापट सलाम मारू लागले …. एक तरुण गोरेपान … साधारण सहा फुटांच्या वर उंची असलेले एक रुबाबदार पोलिस जीपमध्ये बसलेले होते …. पटकन तडफदार पणे उडी मारून ते जीपच्या बाहेर पडून सरळ पाटील साहेबांच्या केबिन मध्ये शिरले … पाटील साहेबानीही उठून साल्युट केला … ते खुर्चीवर बसल्यावर पाटील साहेबांनी त्यांच्याशी माझी ओळख करून दिली … ते नव्याने बदलून आलेले सहायक पोलिस आयुक्त श्री . मकरंद रानडे साहेब होते …. वय साधारण तिशीचे … अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व …. पाटील साहेबांनी माझी ओळख करून देताना मी पूर्वीचा ब्राउन शुगरचा व्यसनी असून आता मुक्तांगण तर्फे येथे व्यसनमुक्तीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो असे सांगितल्यावर त्यांना जर आश्चर्य वाटले … आमच्या कामाला त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या… मला एकदा निवांत भेटू असे सांगितले !

२ ६ जून ला सकाळपासूनच माझी धावपळ सुरु होती …आम्ही सकाळी दहा वाजता नाशिकरोड च्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन शोभायात्रेची सुरवात करणार होतो …. सुमारे पंचवीस जणांचा आमच्या समूह हातात कापडी फलक घेवून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून …. मादक पदार्थविरोधी घोषणा देत …सिन्नर फाटा येथे पोचला … माझे बालपण …. व्यसनाधीनतेचा बराच काळ सिन्नरफाटा येथे गेल्याने …. तेथील माझे बरेच व्यसनी मित्र जमले होते …सर्वाना मला व्यसनमुक्त पाहून नवल वाटत होते … तेथील प्रयोग देखील छान झाला … मग परत आम्ही बसने मेरी ला आलो …तेथे बसथांब्यावर पथनाट्य केले … सर्व स्थानिक कलाकार पथनाट्यात होते त्यामुळे त्यांचे नातलग मित्र अशी बरीच गर्दी होती …सायंकाळी देखील एक शोभायात्रा पंचवटी कारंजा ते शालीमारचौक अशी काढणार होतो … पाटील साहेबांनी सायंकाळच्या शोभायात्रेसाठी आमच्या सोबत बंदोबस्त म्हणून पोलिसांची मोठी निळी गाडी दिली होती …. आम्ही पुढे आणि गाडी मागे असा सर्व लवाजमा घोषणा देत मेनरोड वरून शालीमारला पोचला … तेथे शेवटचे पथनाट्य होते … शालीमार चौक नेहमी गर्दीने फुललेला असतो … हा प्रयोग देखील छान झाला . विशेष म्हणजे मेरी तील एका व्ही डी ओ शुटींग करणाऱ्या मित्राने आमच्या शालीमार चौकातील प्रयोगाची मोफत व्हि.डी .ओ शुटींग करून दिली . एकंदरीत सर्व कार्यक्रम निर्विघ्न पार पडला . या कार्यक्रमानंतर अनेक व्यसनी लोक व्यसनमुक्ती सल्ला केंद्रावर बुधवारी आणि शनिवारी चौकशीसाठी जमू लागले …

( बाकी पुढील भागात )

मंगलवार, 7 मई 2013

व्यसनमुक्ती कार्यकर्ता

माझा वाढदिवस !  ( पर्व दुसरे ..भाग पहिला )


' प्रिय तुषार , हार्दिक अभिनंदन ...पाहता पाहता तुझे व्यसनमुक्तीचे १ वर्ष पूर्ण होतेय .. कळविण्यास खूप आनंद होतोय की येत्या २६ जानेवारी रोजी ..नेहमी प्रमाणे ..मुक्तांगण मध्ये उपचार घेवून जीवनाची नव्याने सुरवात करणाऱ्या सर्व मित्रांचा ' भेटी गाठी ' हा कार्यक्रम सकाळी ९ वाजता ..मुक्तांगण येथे आयोजित केला आहे ..त्याच प्रमाणे व्यसनमुक्तीच्या वाढदिवसाचा देखील समारंभ होणार आहे ...तू व्यसनमुक्तीच्या मार्गावर यशस्वी पणे वाटचाल करीत आहेस .. यात ..तुझ्या कुटुंबियांचा देखील मोठा वाटा आहे .. तेव्हा या प्रसंगी तू आपल्या कुटुंबियांसमवेत मुक्तांगणला यावे ..हे आग्रहाचे निमंत्रण आहे ! ' ..पत्राच्या खाली डॉ . अनिता अवचट अशी मँडमची सही ... वाचून क्षणभर माझा स्वतच्या डोळ्यावर विश्वास बसेना ...चक्क मी व्यसनमुक्तीचा ..पुनर्जन्माचा वाढदिवस साजरा करणार होतो .. मुक्तांगण मधून परत आल्यावर .. मी निर्धाराने व्यसनमुक्त राहण्यास सुरवात केली होती .... अकोल्याहून परत आल्यावर मी ' क्राँम्पटन ग्रीव्हज ' या कंपनीत तात्पुरती ठेकेदारीवर नोकरी स्वीकारली होती .. ५० रुपये रोज असा पगार होता माझा ..अकुशल कामगार म्हणून माझी नेमणूक झाली होती .. जरी अकुशल कामगार म्हणून नेमणूक असली तरी ..आठवडाभरातच मी तेथे वरिष्ठांची मने जिंकून घेतली होती ..त्यामुळे मला मग स्टोअर किपरचा सहायक म्हणून काम दिले गेले ...५ ऑक्टो.१९९१ ला मी ' न्यूआँन ' घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला..त्याला तीन महिने उलटून गेले होते ..जुन्या मित्रांना अजिबात भेटत नव्हतो ..पहाटे ४.३० ला उठून तयार होऊन ...बसने पंचवटी पर्यंत आणि मग तेथून बसने सातपूरला कंपनीत नोकरीवर ..दुपारी तेथून २ ला सुटी झाली की चार वाजेपर्यंत घरी .. सायंकाळी ' मेरी ' च्या वाचनालयात एक चक्कर .. मग जरावेळ तेथीलच एक कटिंग सलून मध्ये नवीन मित्रांबरोबर टाईम पास ..रात्री ९ च्या आत घरी ..असे माझे रुटीन सुरु झाले होते . घरात देखील आता छान वातावरण झाले होते .. माझे सुरळीत सुरु असलेले पाहून सर्वांनाच आनंद झाला होता ..पुण्याला जायला अजून ४ दिवस बाकी होते ..आई देखील माझ्या वाढदिवस समारंभाला येणार होती ...मात्र ती एक दिवस आधीच पुण्याला एका नातलगांच्या कडे जाणार होती ..!


मुक्तांगणचा योगा हॉल छान फुलांनी सजविलेला होता .. भिंतीवर ' भेटी गाठी ' असे झेंडूच्या फुलांनी लिहिले होते ..फळ्यावर हार्दिक अभिनंदन म्हणून व्यसनमुक्तीचा वाढदिवस साजरा करणाऱ्यांची नावे लिहिली होती ..त्यात असलेले माझे नाव मी पुन्हा पुन्हा वाचत होतो ...छान वाटत होते .. त्या दिवशी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पूर्वी ठाणे मेंटल हॉस्पिटलचे अधीक्षक असलेले डॉ . पा. ठ. लव्हात्रे यांना बोलाविले होते .. लव्हात्रे साहेब आता पुण्याला अधीक्षक म्हणून बदलून आलेले होते ..माझ्या व्यसनमुक्तीच्या वाढदिवसाला त्यांचे उपस्थित असणे आणि त्याच्या हातून मी व्यसनमुक्तीचे मेडल स्वीकारणे हा सुंदर योग होता ..कारण पूर्वी मी ठाण्याला असताना त्यांनी मला खूप मदत केली होती .. मी व्यसनमुक्त व्हावे यासाठी मनापासून प्रयत्न केले होते ..मात्र मीच पुन्हा पुन्हा चुका केल्या होत्या . ..नेहमी प्रमाणे कार्यक्रम सुरु झाल्यावर ' हर नया दिन ' हे व्यसनमुक्ती गीत झाले ..नंतर बाबांनी सर्वाना प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली .. वाढदिवसाच्या समारंभाचे महत्व सांगितले .. मग व्यसनमुक्तीचा वाढदिवस साजरा करण्याऱ्या २० जणांची नावे वाचून दाखविली गेली .. सर्वानी टाळ्या वाजविल्या ..आई देखील मागे खुर्ची वर इतर नातलगांबरोबर बसली होती .. मँडम देखील उपस्थित होत्या ..आता त्यांची तब्येत चांगली दिसत होती ..त्या नियमित मुक्तांगण मध्ये येत होत्या ... एकेकाला बोलावून आपले मनोगत व्यक्त करण्यास सांगितले गेले ..माझे मनोगत व्यक्त करताना आधी मला काही सुचतच नव्हते .. नुसतेच सर्वांचे आभार मानले .. डोळे भरून आले होते माझे ... नंतर जेव्हा मँडम कडे पहिले तेव्हा त्यांनी इशाऱ्याने अजून बोल असे सुचविल्यावर घडाघडा बोलू लागलो .. थोडक्यात माझी व्यसनाची पार्श्वभूमी ..झालेले नुकसान ..व्यसनमुक्तीसाठी केलेले प्रयत्न .. मला केली गेलेली मदत वगैरे बोललो ..शेवटी बाबांनी मला प्रश्न विचारला ' तुषार ..तुझ्या या व्यसनमुक्तीच्या वाढदिवसाचे श्रेय तू कोणाला देणार ? ' मी जरा गांगरलो ... व्यसनाधीनता हा एक मनो -शारीरिक आजार आहे हे मला मुक्तांगणमध्ये आल्यावरच समजले होते ..तसेच व्यसनमुक्तीचे शास्त्रीय उपचार देखील येथेच मिळाले होते ..परंतु त्या आधी अनेकांनी मला त्यांच्या परीने मदत करण्याचा प्रयत्न केला होता .. त्या सर्वांचे योगदान देखील महत्वाचे होते .. मी सांगितले की ..माझे नातलग ..माझे हितचिंतक ..मेंटल हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ . लव्हात्रे साहेब ..तेथील कर्मचारी वर्ग .. मुक्तांगण मधील सारे समुपदेशक .. माझे निवासी कर्मचारी मित्र ..या सगळ्यांचा सहभाग आहे माझ्या व्यसनमुक्तीत .. माझे हे उत्तर सर्वाना खूप आवडले ..लव्हात्रे साहेबांनी माझी पाठ थोपटली ..


कार्यक्रम संपल्यावर सर्वांची जेवणे झाली ..त्या दिवशी आलेल्या पाहुण्यांसाठी आणि उपचार घेणाऱ्या मित्रांसाठी खास जेवण असते .. जेवण झाल्यावर आई पुण्यातच असणाऱ्या माझ्या चुलत बहिणीकडे गेली ..मी अजून दोन दिवस मुक्तांगणमध्येच थांबणार होतो ..कारण मी माहेरी आलो होतो .. दुसऱ्या दिवशी सकाळी मँडम आल्यावर त्यांनी मला भेटायला बोलाविले .. माझे अभिनंदन करून मग म्हणाल्या ..तू छान व्यसनमुक्त राहतो आहेस .. त्यावरून आता आम्हाला असे वाटते आहे की तू या व्यसनमुक्तीच्या कार्याला देखील थोडा हातभार लावला पाहिजे ..जेणेकरून तुझी व्यसनमुक्ती अजून बळकट होईल .. आणि इतरांनाही मदत होईल .. पूर्वी नाशिकमधून आपल्याकडे उपचार घेऊन परत घरी गेलेल्या मित्रांचा पाठपुरावा करण्याचे काम करायला तुला आवडेल का ? ..मी आनंदाने हिकार दिला .. मग त्या म्हणाल्या ..नाशिक मध्ये भद्रकाली भागाचे पोलीस निरीक्षक श्री . सुरेंद्र पाटील हे बाबांचे चांगले मित्र आहेत ..ते देखील या कार्यात मदत करतात .. तू परत गेल्यावर त्यांची भेट घे .. मी त्यांना सांगते तुझ्या बद्दल फोन करून .. तू रोज सुरेंद्र पाटील साहेबाना भेटायचे आणि दिवसभर केलेल्या कामाचा थोडक्यात अहवाल द्यायचा त्यांना .. तसेच महिन्यातून एकदा महिन्याभराचा अहवाल लिहून मुक्तांगणला पाठवायचा .. या कामाचे मानधन म्हणून तुला महिना तीनशे रुपये मिळतील ..मात्र ही रक्कम तुला एकदम हातात मिळणार नाही ..तर रोज सकाळी सुरेंद्र पाटील साहेब तुला १० रुपये देतील तसेच पाठपुरावा करायला तुला फिरावे लागेल त्यासाठी एक सायकल देखील ते तुला उपलब्ध करून देतील .. . तू हे काम सांभाळून एखादी नोकरी देखील करू शकतोस म्हणजे आर्थिक दृष्ट्या अधिक स्वावलंबी होशील ..म्हणजे आता मी मुक्तांगणचा अधिकृत कार्यकर्ता होणार होतो तर .. मला हा प्रस्ताव खूप आवडला .. फक्त ते पोलीस निरीक्षक सुरेंद्र पाटील यांना रोज भेटण्याचे काही पटले नाही .. पण त्यामागे मँडमचा हेतू असा होता ..की मी सतत त्यांना भेटलो की माझी व्यसनमुक्ती बळकट राहण्यास मदत झाली असती मला .. मी गुपचूप जरी पुन्हा व्यसन सुरु केले असते तर पोलीस निरीक्षक असल्याने त्यांना ते आधी समजले असते .. या कामाच्या निमित्ताने माझा व्यसनी व्यक्तींसोबत वारंवार संपर्क होणार होता .. त्यातून मला काही धोका होऊ नये ..माझी स्लीप होऊ नये म्हणून सुरेंद्र पाटील यांना मध्ये घातले होते त्यांनी .
======================================================

सामाजिक कार्यकर्ता ! ( पर्व दुसरे ..भाग दुसरा )



मुक्तांगण मध्ये रहात असतानाच खरे तर मला तेथेच कार्यकर्ता म्हणून राहायचे होते ..परंतु त्यावेळी मँडम ने माझ्या पुनर्वसनाची वेगळी योजना बनविली होती ..मी खरे तर त्यांच्याकडे माझ्या मनातील इच्छा बोलून दाखवायला हवी होती ..परंतु कदाचित आपल्याला नकार दिला जाईल अशी भीती मनात होती .. ऐरवी एक व्यसनी खूप बोलका असू शकतो ..मात्र योग्य वेळी ..योग्य व्यक्तीजवळ तो मनातले व्यक्त करू शकत नाही हा देखील त्याचा कमकुवतपणा असतो ..समोरची व्यक्ती काय म्हणेल हे तो स्वतच गृहीत धरतो व बोलणे टाळतो .. आता मुक्तांगणचा कार्यकर्ता म्हणून नाशिक मध्ये पाठपुरावा करण्याचे काम मला दिले गेल्यावर मला खूप आनंद झाला होता .. माझ्या मनासारखे घडले होते ..मँडम म्हणाल्या .. ' इतके दिवस फक्त स्वतः व्यसनमुक्त राहण्याची जवाबदारी होती तुझी ..आता त्या सोबतच इतरांना व्यसनमुक्तीसाठी मदत करण्याची देखील जवाबदारी आहे तुझ्यावर त्यामुळे तू तुझ्या वागण्यात ..बोलण्यात ..आकलन शक्तीत बदल करणे गरजेचे आहे ..अनेक प्रकारची पथ्ये पाळावी लागतील तुला .. सामाजिक कार्यकर्ता म्हंटले की समाज त्याच्याकडे एका वेगळ्या आदर्शवादी दृष्टीकोनातून पाहतो ..आपण लोकांचा भ्रमनिरास करता काम नये .. आता तू मुक्तांगणचे प्रतिनिधित्व करणार आहेस... तुझ्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत .. अशा सूचना देत मँडमनी मला ... नाशिकहून मुक्तांगण मध्ये गेल्या ५ वर्षात दाखल होऊन उपचार घेवून आपल्या घरी परत गेलेल्या सुमारे ३०० लोकांची नावे आणि पत्ते असलेली छापील यादी दाखवली ... 


आता नाशिकला गेल्याबरोबर या यादीतील रोज किमान ५ लोकांच्या घरी तू जावून आता ते कसे आहेत ? पुन्हा व्यसन तर करत नाहीत ? याबाबतची माहिती घेवून त्याचा अहवाल बनवायचा आहे ..महिनाभरात तू अशा प्रकारे सुमारे १०० ते दीडशे लोकांना भेटशील .. दर महिन्याला हा अहवाल आम्हाला पाठवायचा आहे तसेच ..दोन महिन्यातून किमान एकदा तरी प्रत्यक्ष मुक्तांगणला भेट द्यायची आहे .. तुझे जाण्यायेण्याच्या भाड्याचे पैसे पाटील साहेब तुला देतील ..हे अगदी सोपे काम होते माझ्या दृष्टीने ..पुढे मँडमनी एक अतिशय सावधगिरीची सूचना दिली ..ती अशी की ..तू ज्या व्यसनी व्यक्तीच्या घरी त्याला भेटायला जाशील तेथे तो व्यसनी व्यक्ती घरी नसेल तर जास्त वेळ थांबायचे नाही अजिबात ..मला हे जरा विचित्र वाटले .. असे का ? म्हणून विचारले तर म्हणाल्या ...व्यसनी व्यक्तीचे पालक त्याच्या व्यसनाला इतके कंटाळलेले असतात की आपल्या माणसाला कोणी व्यसनमुक्तीसाठी मदत करू इच्छितो आहे असे म्हंटल्यावर ते अशा माणसाला खूप मान देतात ..आपली दुखः मनमोकळे पणे त्या मदत करणाऱ्या माणसाजवळ सांगतात ..त्याच्यावर प्रचंड विश्वास ठेवतात ..या बाबतीत घरातील स्त्रिया अधिक हळव्या असतात .. तू तरुण आहेस .. शिवाय स्वतच्या भावनांवर तुझे पूर्ण नियंत्रण नाहीय .. भावनेच्या भरात तुझ्याकडून कोणतीही चूक होऊ नये म्हणून ही काळजी घ्यायची ..समजले ना ? असे मनात मँडमनी माझ्याकडे रोखून पहिले ..त्यांचा मुद्दा थोडाफार लक्षात आला होता ....पुढे त्या म्हणाल्या दुसरे असे की व्यसनी व्यक्ती हा त्याच्या मनावर झालेल्या व्यसनांचा दुष्परिणाम म्हणून संशयी स्वभावाचा होतो ..त्याच्या अनुपस्थितीत असा कोणी दुसरा माणूस घरी येवून गेला तर ..घरातील लोकांनी त्याला आपल्या चुगल्या सांगितल्या असतील .. त्यानेच घरच्या लोकांना फितवले असेल माझ्याविरुद्ध ....वगैरे प्रकारचे संशय त्याला येवू शकतात व त्यामुळे तो तुला चांगले सहकार्य करणार नाही . तुला आता जे काम सोपवतो आहोत ते काम पूर्वी नाशिक मध्ये संजय नावाचा कार्यकर्ता करत असे ..त्याची देखील तुला मदत घेता येईल ...मँडमनी अजून एक काम सांगितले ते असे की दर महिन्याला नाशिकमधील उपचार घेवून ..पुन्हा व्यसन सुरु झालेल्या किमान पाच लोकांचा एक वेगळा अहवाल मला दाखवायचा ..या अहवालात ..ती व्यक्ती पुन्हा व्यसन सुरु करण्याची तुला वाटणारी कारणे .. त्याच्या कुटुंबियांची ..पालकांची तुला जाणवलेली मानसिकता .. आणि त्याला व्यसनमुक्त ठेवण्यासाठी नेमकी कोणती मदत करता येईल याबद्दलचे तुझे मत ..हे असेल . आणि सर्वात महत्वाचे हे की हे काम करून तू कुणावर उपकार करत नाहीस हे सतत लक्षात ठेव .. सर्व करत असताना तू तुझ्या घरातील जवाबदा-या देखील योग्य रीतीने पार पडल्या पाहिजेत .. तुझ्या सुरक्षित भविष्यासाठी चांगली नोकरी शोधणे .. बँकेत पैसा साठविणे ... घरच्या लोकांना तू दिलेला त्रास भरून काढण्यासाठी त्यांना आवश्यक वेळ देणे ....वगैरे सांगून मँडमनी ..तीनशे लोकांचे नाव पत्ते असलेली यादी माझ्याकडे देवून मला निरोप दिला .


नाशिकला गेल्यावर मी ही बातमी आईला आणि भावाला सांगितली तेव्हा त्यांना प्रथम ही भीती वाटली की म्हणजे हा पुन्हा त्या व्यसनी व्यक्तींना भेटणार ..कदाचित याचे व्यसन परत सुरु झाले तर ? पुढे पोलीस निरीक्षक सुरेंद्र पाटील यांना रोज भेटावे लागणार हे ऐकून त्यांना जरा धीर आला .. सुरेंद्र पाटील यांना भेटायला जाताना मी जरा मनात घाबरलोच होतो .. भद्रकाली परिसर म्हणजे जेथे सर्व वाईट धंदे चालतात असा परिसर होता ..हिंदू -मुस्लीम अशी मिश्र वस्ती ..अतिशय संवेदनशील असा हा परिसर ..या ठिकाणी पोलीस निरीक्षक असणारी व्यक्ती नक्कीच कडक असणार अशी माझी खात्री होती .. मी सकाळी ११ वाजता सुरेंद्र पाटील यांना भेटायला पोचलो .. त्यांच्या प्रशस्त केबिन मध्ये ते दोनचार लोकांसोबत बोलत होते .. मी बाहेरच्या शिपायाला तसा निरोप दिला .. त्याने आत माझा निरोप दिल्या बरोबर लगेच ..साहेबांनी मला आत बोलाविले ..मी बिचकत आत गेलो ..प्रसन्न हसून त्यांनी मला बसायला सांगितले . त्यांच्या टेबलसमोर ..आठ दहा खुर्च्या ठेवलेल्या होत्या ..मागे एका खुर्चीवर बसलो .. त्यांच्या समोर चार पाच माणसे बसलेली होती ..त्याच्या सोबत साहेबांची चर्चा सुरु होती ..ते लोक कसल्यातरी मिरवणुकीची परवानगी मागायला आलेले होते .. मी बसल्या बसल्या पाटील साहेबांचे आणि केबिनचे निरीक्षण करत होतो .. एका भिंतीवर गुन्हे आलेख असा तक्ता होता ... तसेच नेहरू ..गांधी ..शिवाजीमहाराज .. डॉ .बाबासाहेब आंबेडकर ..लोकमान्य टिळक वगैरे थोर व्यक्तींचे फोटो टांगलेले होते ..प्रत्येक फोटोवर तो फोटो पोलीस स्टेशनला भेट देणाऱ्या मंडळाचे किंवा व्यक्तीचे नाव आवर्जून लिहिले होते ...पाटील साहेबांचा रंग सावळा ..मध्यम बांधा .. सधारण पन्नाशीचे ... बाहेर न सुटलेले पोट म्हणजे त्यांच्या शरीर स्वास्थ्याची ग्वाही होती .. सगळ्यात प्रभावी गोष्ट म्हणजे त्यांच्या मोठ्या झुबकेदार मिशा ..आणि भेदक डोळे ..त्या माणसांना निरोप दिल्यावर ..पाटील साहेब माझ्याशी बोलू लागले .. मँडनी मला फोन करून सांगितले आहे तुझ्या बद्दल .. तू संध्याकाळी परत ये तेव्हा मी तुला सायकल देतो एक .. मग त्यांनी एका शिपायाला बोलाविले व त्याला माझ्याकडे बोट करून सांगितले की हे तुषार नातू ..मुक्तांगण चे कार्यकर्ते आहेत .. त्या शिपायाने मला अदबीने नमस्कार केला .. पुढे त्याला सांगितले की याच्या नावाची एक डायरी बनवायला सांगा ठाणे अंमलदार यांना ..त्या डायरीत रोजची तारीख टाकून यांना आपण दहा रुपये द्यायचे आहेत ..पैसे दिले की घेतल्याची यांची सही घ्या .. मी नसलो तरी यांचे काम अडता कामा नये .. ! शिपाई साहेबाना कडक सँल्यूट मारून निघून गेला ..असे जाता येत कडक सँल्यूट मारण्याची गम्मत वाटली मला ...मग साहेबांनी माझी व्यक्तिगत चौकशी केली..आणि मला शुभेच्छा देवून ..संध्याकाळी सायकल घ्यायला बोलाविले .

( बाकी पुढील भागात )

========================================================================




पहिला पाठपुरावा ! (  पर्व दुसरे -भाग तिसरा )




संध्याकाळी पाच वाजता मी जेव्हा भद्रकाली पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा तेथे बाहेर पटांगणात पोलीस व्हॉलीबॉल खेळत होते ... सुरेंद्र पाटील साहेब देखील त्यांच्यात होते ..मला वयाच्या पन्नाशीत देखील असे चपळपणे व्हॉलीबॉल खेळणारे पाटील साहेब पाहून नवल वाटले ...जरावेळ तिथेच उभा राहिलो ..त्यांचा खेळ थांबल्यावर ..साहेबांनी मला जवळ बोलाविले ..म्हणाले ..तू पण हवे तर उद्यापासून येत जा खेळायला ..मग त्यांनी पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस नेले तेथे खूप जुन्या सायकली ..मोटारसायकली ..लुना ..स्कुटर वगैरे ठेवलेल्या होत्या .. सुमारे २०० तरी वाहने असावीत ..तुला यातील हवी ती सायकल निवड असे पाटील साहेब म्हणाले .. मी जरा गोंधळलो ..कारण तेथे ठेवलेली वाहने अनेक दिवस एकाच जागी पडून राहिल्याने जुनाट दिसत होती ...काही तर गंजलेल्या अवस्थेत ...माझी मनस्थिती पाटील साहेबांनी ओळखली असावी ...ते म्हणाले ' या पैकी काही वाहने चोराकडून जप्त केलेली आहेत ..काही बेवारशी सापडलेली ..तर काही गुन्हा करण्यासाठी वापरलेली आहेत .. केसचा निकाल लागेपर्यंत ती अशी ताब्यात ठेवावी लागतात .. तर काही वेळा केसचा निकाल लागला तरी कोणी ताबा घ्यायला न आल्याने ... अनेक दिवस वापर नसल्याने ती जुनी होतात ... खराब होतात ..पण त्याला आमचा नाईलाज आहे ..कधी कधी तर यातील काही वाहने आम्हाला ठेवायला जागा नाही म्हणून भंगार मध्ये काढावी लागतात ' ...त्यांचे म्हणणे ऐकून मनात विचार आला...देशात न्याय जर पटकन मिळाला तर किती बरे होईल ?..वर्षानुवर्षे केस कोर्टात रखडते..कधी कधी रखडवली जाते ..वेळेचा अपव्यय ..पैशांचा अपव्यय ..सरकारी यंत्रणा वेठीला धरली जाते ..प्रचंड लोकसंख्या हीच मोठी समस्या ..इतक्या मोठ्या लोकसंख्येस पुरेसे पोलीस बळ ..न्यायालये ..तपास यंत्रणा कशी पुरणार ? म्हणूनच कदाचित बहुधा पोलीस स्टेशनला .पोलीस एफ .आय ..आर ..नोंदविण्यास टाळाटाळ करत असावेत ...शिवाय अजून एक गोष्ट जाणवली ती अशी की .. चोरी झालेल्या केस मध्ये जर मुद्देमाल सापडला नाही तर ...चोराला शिक्षा होऊन देखील शेवटी ज्याची चोरी झाली त्याला त्याचा मुद्देमाल ..पैसे अथवा इतर चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळवून देण्याची काहीच निश्चित यंत्रणा नाहीय ..हमी नाहीय ,..त्याने फक्त चोर पकडला गेला याच समाधानात राहायचे ....कदाचित म्हणूनच गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढत असावे .


एक रेसर वाटणारी छोटी सायकल माझ्या मनात भरली ..मात्र तिची दोन्ही चाके बसली होती ..म्हणजे अनेक दिवस पडून राहिल्याने टायर ..ट्यूब . वगैरे खराब झाली असणार ..मी त्या सायकल कडे बोट दाखवताच ..पाटील साहेबांनी एका शिपायाला ती सायकल बाहेर काढून ..दुरुस्त करून घ्यायला सांगितले .. ' साहेब ..पण जर मला रस्त्यात कोणी अडवून ..ही सायकल माझी आहे असे म्हणाले तर ....? ' मी शंका काढली ..त्यावर पाटील साहेब मिशीत हसले ..' त्याला घेवून ये माझ्याकडे तू ..आपण पाहू काय करायचे ते ... तू अजिबात काळजी करू नकोस त्याची ' असे आश्वासन मिळाल्यावर मी निश्चिंत झालो ...मग त्यांनी मला अंमलदाराकडे जावून दहा रुपये घेण्यास सांगितले ... उद्यापासून काम सुरु कर .. काही अडचण आली तर ..निसंकोच पणे सांग असा धीर देखील दिला ... भरघोस मिश्यांमुळे काहीसे उग्र ..कडक वाटणारे पाटील साहेब मनाने अतिशय प्रेमळ आहेत हे जाणवले ..दुसऱ्या दिवशी मी जेव्हा पोलीस स्टेशनला गेलो तेव्हा माझी सायकल मस्त घासूनपुसून चकचकीत झालेली होती ...नवीन टायर .. ट्यूब लावलेली होती ..तसेच सायकलला नवीन कुलूप देखील लावलेले होते ...मग जेव्हा दहा रुपये घ्यायला अंमलदाराकडे गेलो ...त्याने माझ्या नावाने बनविलेल्या एका छोट्या डायरीत ..नोंद करून मला दहा रुपये दिले ..देताना गमतीने म्हणाला ..पोलिसांकडूनच तुला हप्ता चालू झालाय....भाग्यवान आहेस .


माझ्या जवळ मँडमने जी नाशिक मधून मुक्तांगणला दाखल होऊन गेलेल्या लोकांच्या नाव पत्त्यांची यादी दिली होती त्यात जवळ राहणारा म्हणून पंचवटीत एका ठिकाणी जायचे ठरवले ..त्याचे नाव गंगाराम होते ... दारूचे व्यसन होते त्याला ..मी पत्ता शोधात जेव्हा घरी पोचलो तेव्हा ..घराचे दार उघडेच होते ..अर्धवट लोटलेले ..मी आवाज दिला तर आतून ' कोण आहे ' असा करडा आवाज आला ..मी दार लोटून आत गेलो ..काहीसा अंधार वाटत होता घरात ..कारण त्या खोलीला खिडकी नव्हती ..पलंगावर एक व्यक्ती झोपलेली होती ..मी गंगाराम कोण असे विचारताच ती व्यक्ती उठून बसली ..अर्धवट वाढलेली दाढी .. पायजमा.. शर्ट..कृश देहयष्टी ..त्याने बाजूला असलेल्या मळकट खुर्चीवर बसायला सांगितले मला .. त्याने तोंड उघडताच दारूचा भपकारा आला .म्हणजे स्वारी सकाळी सकाळी लावून होती तर ..दारिद्र्य लपत नव्हते घराचे .. मी माझी ओळख करून दिली ..मुक्तांगण मधून आलोय हे ऐकून त्याचे डोळे चमकले ..अदबीने त्याने हात जोडून अभिवादन केले .. ' दारू परत सुरु झाली की काय ? असे विचारताच म्हणाला ' काय सांगणार राव ...टेन्शनच इतके आहे मला ...दोन पोरींचे शिक्षण ..लग्न ..करायचे आहे .. मला काही कामधंदा मिळत नाही ...ख-याची दुनिया राहिली नाही ..वगैरे रामायण सांगू लागला ..' ..' अहो पण ..दारुने तुमचे प्रश्न सुटतात का ? असे विचारल्यावर जरा खजील झाला ..मग त्याने घरातील लोकांच्या तक्रारी करणे सुरु केले ..बायको बेताल वागते ..पोरी माझे ऐकत नाहीत ... मला त्याची दया देखील येत होती आणि त्याच्या गेलेल्या आत्मविश्वासा बद्दल वाईट देखील वाटत होते .. घरात त्यावेळी कोणीच नव्हते .. आमचे बोलणे सुरु असतानाच ..एक मध्यम वयीन बाई घरात आली .. मला पाहून जरा थबकली ..मी तिला माझी ओळख करून दिली ..तेव्हा क्षीण हसली ..म्हणाली '' अहो काही फायदा झाला नाही यांना मुक्तांगण मध्ये ठेवून .. यांचे पिणे परत सुरु झालेय ..आणि त्रास देणे देखील सुरूच आहे ..बोलता बोलता तिने भिंतीवरच्या फळी वरून एक छोटा स्टीलच डबा काढला आणि त्यात हात घातल्यावर एकदम धक्का बसल्यासारखा चेहरा करून ती गंगाराम वर ओरडली ' यातले पैसे कुठे गेले ? ..पोरीला पुस्तके आणायची म्हणून ठेवले होते पन्नास रुपये .. ' गंगाराम तोऱ्यात म्हणाला मला काय विचारतेस .मी काय चोर आहे ? तिचा पारा चढला आणि ती त्याला रागावू लागली ... तुम्हाला पोरीच्या शिक्षणाची देखील काळजी नाही ..एक पैसा कमवत नाही ..मात्र राजासारखा रुबाब दाखवता आम्हाला वगैरे बडबडू लागली ..यार गंगाराम देखील चिडला आणि त्याने सरळ सरळ तला शिव्या देण्यास सुरवात केली ... तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू लागला .. त्याने तिला उंडगी ..चवचाल .. वगैरे म्हणताच ती हबकली ..परक्या व्यक्ती समोर नवऱ्याने असा अपमान केलेला तिला सहन झाले नाही ..ती रडू लागली ..मी खूप संकोचलो होतो ..काय करावे ते समजेना ...रडता रडता मला सांगू लागली ..हा माणूस एक पैसा कमावत नाही ..घर चालविण्यासाठी मी चार घरी धुणे भांडी करते ..त्यासाठी घराबाहेर जावे लागते तर ..हा माझ्यावर शक् घेतो .. पोरी आहेत म्हणून मी जिवंत आहे ..नाहीतर केव्हाच जीव दिला असता वगैरे .....शेवटी मी उद्या येतो असे सांगून तेथून सटकलो .

( बाकी पुढील भागात )

========================================================================


भीषण वास्तव ! ( पर्व दुसरे - भाग चौथा )



गंगारामच्या घरून बाहेर पडल्यावर ...दुसऱ्या ऐक जवळच्या पत्त्यावर गेलो ..तेथे घरात एक म्हातारी बाई होती ..येथेही दारिद्र्य ठाण मांडून बसलेले ... म्हातारीला बहुतेक कमी दिसत असावे ... घरात कोणी आहे का असे विचारल्यावर ..ती सावकाश डोळ्यासमोर हात धरून बाहेर आली ..मला निरखून पहिले ओळख पटेना तिला ..मी माझी ओळख सांगितल्यावर मला आत बोलाविले ... अरुण घरात आहे का असे विचारल्यावर ...म्हणाली ..आताच बाहेर गेलाय कटकट करून .. आता तो कसा राहतो असे विचारले तसा तिचा बांध फुटला ... मला म्हातारीला मरणही येत नाही ..अशी सुरवात करून तिने सगळी कर्म कथा सांगितली ...उशिरा झालेला ..एकुलता एक मुलगा म्हणून लाडात वाढलेला .. बाप सरकारी नोकरीत ..मात्र बापाला दारूचे व्यसन ... पुढे बाप दारूमुळे लवकर गेला ..तेव्हा त्याच्या जागी आईला नोकरी लागली ..पोराला मोठे केले मात्र बापाचा ठसा त्याच्यावरही होता ..फरक इतकाच की बाप दारू पीत असे ..याने दारूसोबत चरस ..गांजा आणि शेवटी ब्राऊन शुगर देखील जवळ केलेली..दहावीत चार वेळा नापास झाल्यावर शिक्षणाला रामराम केलेला ..म्हातारी सेवानिवृत्त झाली तरी याचे काही कामधंदा करण्याचे चिन्ह नाही ...मग आईच्या पेन्शनच्या पैश्यावर याचे व्यसन सुरूच ..रोजचे किमान १०० रुपये तरी घेणारच भांडून ...आईने कुठून तरी ' मुक्तांगण ' ची माहिती घेवून याला भरती केले ..उपचार घेवून परत आल्यावर जेमतेम एक आठवडा चांगला राहिला आणि पुन्हा हळू हळू पिणे सुरु केले ...म्हातारी कळवळून सारे सांगत होती ...सगळ्या दारूच्या धंदेवाल्यांना ..दारू उत्पादकांना ..दारू विक्रीचे परवाने देवून ... महसूल घेणाऱ्या सरकारला....ब्राऊन शुगर विकणाऱ्यांना शिव्याशाप देणे सुरु होते तिचे ... तळपट होईल मेल्यांचे .. माझे म्हातारीचे शाप भोवतील ..वगैरे ...मी सुन्न होऊन बाहेर पडलो . 


त्या दिवशी एकूण पाच घरी गेलो त्या पैकी चार ठिकाणी पुन्हा व्यसन सुरु झालेय असा निष्कर्ष ...मात्र एका ठिकाणी एकदम आनंदी वातावरण होते ... सुरेशचे व्यसन बंद होते ... तो घरीच भेटला .. सगळे ' मुक्तांगण ' ला दुवा देत होते ...सुरेश पाच महिन्यापासून चांगला राहत होता .. उपचार घेवून आल्या पासून त्याने जुन्या व्यसनी मित्रांना भेटणे बंद केले होते ..एका खाजगी कंपनीत नोकरी मिळाली ..नोकरी आणि घर इतकेच विश्व होते त्याचे .. अगदीच बोअर झालो तर ' काळाराम ' मंदिरात जावून बसतो म्हणाला ... त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता .. त्याच्या व्यसनमुक्त राहण्याचे नेमके कारण म्हणजे त्याने ..जुन्या व्यसनी मित्रांना भेटणे टाळले होते ..तसेच तो मिळाली ती नोकरी आनंदाने करत होता ..फावला वेळ मंदिरात घालवत होता ..ज्या ठिकाणी व्यसन पुन्हा सुरु झाले होते त्यांच्या बाबतीत नेमके उलटे होते ..त्यांनी सर्व जुन्या व्यसनी मित्रांना पुन्हा जवळ केले होते .. मनासारखा कामधंदा मिळत नाही म्हणून रिकामे राहिले .. आणि बोअर झाले ..कंटाळा आला ..टेन्शन आले म्हणून पुन्हा फक्त एकदा ..आजच्या दिवस म्हणत व्यसन सुरु झाले .मला यातून खूप शिकायला मिळाले ... पहिल्या चार घरी भेट दिल्यावर मी थोडा निराश झालो होतो ...पण शेवटच्या घरी असलेला आनंद पाहून माझा उत्साह परत आला होता .मँडम ने दिलेल्या सुचनेप्रमाणे मी अहवाल लिहू लागलो ...म्हातारीच्या इच्छेप्रमाणे जर खरोखरच सर्व दारूची दुकाने ..कारखाने .. मादक द्रव्यांचे अड्डे बंद झाले तर किती छान होईल असे वाटले ..मात्र ते कसे शक्य होईल ? ... दारूविक्रीतून मिळणारा अब्जावधी रुपयांचा महसूल सरकार सोडेल काय ? मादक द्रव्यांच्या व्यापारातून आणि विक्रीतून मिळणारा भरमसाठ नफा सोडून एखादा चांगला प्रामाणिक व्यवसाय ते अड्डेवाले करतील काय ? स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी साधून जर व्यावसायिकांनी एखादा व्यवसाय केला तर ..किती बरे होईल ? मग मला आठवले ..या गोष्टी करणे आपल्या हाती नाही .. त्यावर व्यर्थ विचार करण्यात अर्थ नाही ..मुक्तांगण च्या प्रार्थनेत सांगितले होते ' जे शक्य साध्य आहे ..निर्धार दे कराया...मज काय शक्य आहे आहे अशक्य काय ..माझे मला कळाया ..दे बुद्धी देवराया ..' मी व्यसन करायचे की नाही हे ठरविणे आणि ते पाळणे .. व्यसनांच्या दुष्परिणामांच्या बाबतीत जनजागृती करणे .. स्वतः व्यसनमुक्त राहून इतर व्यसनी लोकांना व्यसनमुक्त राहण्यासाठी वैचारिक मदत करणे .. माझ्या उदाहरणातून ' व्यसनमुक्त होणे शक्य आहे ' असा आत्मविश्वास देणे हे मला शक्य होते... तेच करायचे होते .


दिवसभर फॉलोअप करणे आणि सायंकाळी मेरीच्या लायब्ररीत जावून पुस्तके बदलून आणणे .. तिथेच बाजारात एखाद्या पानटपरीवर सिगरेट ओढून थोडा वेळ मेरीतील तरुणांशी गप्पा मारणे .. रात्री नऊ च्या सुमारास घरी येवून जेवण करून जरा वेळ टी. व्ही. आणि मग झोप अशी माझी दिनचर्या सुरु झाली ..त्याच काळात ..मेरीतील तरुणांशी माझी चांगली मैत्री जमली होती .. तेथे मी व्यसनमुक्ती ..माझे अनुभव ... देशातील अराजक .. वेगवेगळ्या सामाजिक समस्या ..अंधश्रद्धा .. लबाड राजकारणी ...वगैरे विषयांवर गप्पा मारत होतो ..मेरी मध्ये साधारण २ वर्षापुर्वी एक शिवसेनेची शाखा सुरु झाली होती ..त्याचा अध्यक्ष म्हणून एक दिनेश नावाचा तरुण होता .. हा उत्कृष्ट असा मँकेंनिक होता .. दुचाकी वाहने दुरुस्त करण्याचा व्यवसाय ..पुढे दारूच्या आहारी गेला ..कंगाल झाला ...मात्र त्याचा तोरा कायम होता .. तो नेहमी रात्री पिवून आला की मेरीत..पानटपरीवर असलेल्या लोकांना ..बाजारपेठेत आलेल्या लोकांना दमबाजी करत असे .. त्याच्या मागे शिवसेनेचा शिक्का होता म्हणून त्याला घाबरून असत लोक ..मी पूर्वी शिवसेनेच्या सिन्नरफाटा शाखेचा सेक्रेटरी होतोच .. आमची तोंड ओळख झाली होती मेरीतच ... खरे तर मी आणि दिनेश दोघेही शिवसेनेचे नाव घेत असलो तरी ..आम्ही व्यसने करून शिवाजी महाराजांचे नाव बदनामच केले होते .. आता व्यसनमुक्त राहताना मला ते पटले होते ..दिनेशचे व्यसन अजून सुरुच होते ..व्यसनामुळे आलेला बेदरकारपणा .. शिवसेनेचे वलय यांची त्याला खूप गुर्मी असावी असे त्याच्या वागण्या बोलण्यातून जाणवत असे ..एकदा असाच संध्याकाळच्या वेळी मी मेरीतील एका पानटपरीवर उभा असताना ..तिथे दिनेश दारू पिवून आला ..आल्याआल्या त्याने पानटपरीवाल्या कडून एक सिगरेट मागून घेतली फुकट .. नंतर तो उगाचच आसपास च्या लोकांना शिवीगाळ करू लागला .. एक एक करून लोक सटकले तेथून ..मी अश्याना कधीच घाबरत नव्हतो ..तसेच दिनेशशी माझी तोंड ओळख असल्याने .. तेथेच उभा राहिलो ..दिनेशचे माझ्याकडे लक्ष गेले तसे त्याने माझ्याकडे पाहून बडबड सुरु केली ..उगाचच ' आपून यहा कें दादा है .. टांगे तोड दुंगा ..' .वगैरे सुरु होते त्याचे ..मी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होतो ....शेवटी त्याने माझा हात धरून ओढला आणि माझी सटकली .. ' तेरी ....... साले ..... वगैरे शिव्या घालत मी त्याच्यावर तुटून पडलो ...त्याला हे अपेक्षित नव्हतेच ..खूप ठोकला मी त्याला ..आजूबाजूला गर्दी जमली .. दिनेशला असा सव्वाशेर यापूर्वी मिळाला नव्हता ... त्याचे तोंडबिंड फुटले मग उठून ' देख लुंगा तेरेको ..इधर रुक तू ..अभी मै लडके लेकर आता हू ' असा दम देत तो तेथून पळाला ' 

( बाकी पुढील भागात )


===================================================================


लोकशाही मित्र ! ( पर्व दुसरे -भाग पाचवा )


मार खावून ..थांब आता तुला मारायला मुले घेवून येतो असे म्हणून दिनेश जो पळाला तो परत आलाच नाही ... मारामारी पाहायला जमलेल्या गर्दीतील तीनचार तरुण मला म्हणाले ..बरे झाले याला तुम्ही ठोकले ते ..खूप त्रास होता याचा सगळ्या वसाहतीला .. तुम्ही काही घाबरू नका ..आम्ही आहोत तुमच्या सोबत ..खरे तर मी अजिबात घाबरलो नव्हतो ..माला माहित होते दिनेश जरी पूर्वी दादा वगैरे असला तरी आता तो एक दारुड्या होता ..दारुड्या साठी मारामारी करायला कोणीही मुले आली नसती ..आम्ही रात्री बारा वाजेपर्यंत दिनेशची वाट पहिली ..तेथेच गप्पा सुरु झाल्या की आपण सर्व तरुणांनी मिळून एखादे चांगले मंडळ किवा संस्था सुरु केली पाहिजे ज्या योगे आपल्याला काही सामाजिक कामे करता येतील ..विचार चांगलाच होता .. मात्र आपली संस्था कोणत्याही राजकीय संघटनेशी निगडीत राहणार नाही अशी माझी पहिली अट होती ..सर्वानी ते मान्य केले ..मग दुसऱ्या दिवशी आपण सर्वात आधी संस्थेचा एक वार्ताफलक बनवून घ्यायचा असे ठरले ..संस्थेचे नाव काय असावे यावर बराच खल झाला ..बहुतेकांना एखादे खतरनाक नाव असावे असे वाटत होते ..म्हणजे ज्यावरून संस्थेचा दबदबा राहील ..छावा ..टायगर ..बेधडक ..वगैरे नावे सुचविली गेली ..मात्र मला असा संघटनेचा दबदबा वगैरे व्हायला नको होता ..त्या ऐवजी लोकांना जवळचे वाटेल ..आपुलकी वाटेल ..विश्वास वाटेल ..असे नाव द्यायला हवे होते . ..घटनेवर आधारित असलेल्या लोकशाही राज्य पद्धतीचा राजकारणी लोकांनी कसा खेळखंडोबा केलाय... लोकांना जाती -धर्माच्या ..भाषा प्रांताच्या नावाखाली कसे विभागले आहे आणि लोकांमध्ये दुही निर्माण करून राजकीय नेते ..गल्लाभरू पुढारी....जनतेला कसे लुटत आहेत ..हे सगळे लोकांच्या ध्यानात आणून देवून ..खरी लोकशाही प्रस्थापित व्हावी ..जनता जागृत व्हावी .. सामाजिक सलोखा कायम राहून ..सर्वानी देशाच्या विकासाचा ...प्रगतीचा .. एकतेचा ..न्यायाचा विचार पुढे न्यायचा आहे ..म्हणून संस्थेचे नाव ' लोकशाही मित्र ' असे ठेवावे असे मी सुचविले ..आणि ते मान्य देखील झाले ..वार्ता फलकासाठी वर्गणी जमविणे उद्यापासून सुरु करू असे ठरवून ती दिनेश ची वाट पाहत चाललेली आमची बैठक संपली .

दुसऱ्या दिवशी मी नंदू नावाच्या मुलाच्या कटिंग सलून मध्ये नेहमी सायंकाळी टाईम पास करत असे त्या ठिकाणी आम्ही एक वर्गणी साठी पेटी बनवून ठेवली ..एका कार्डशीट वर लोकांसाठी एक आवाहन लिहून मी नंदूच्या सलून मध्ये चिकटवले ..ज्यात वर ' आज देशाला अश्या तरुणांची गरज आहे जे भान राखून योजना आखतील आणि बेभान होऊन त्या अमलात आणतील ' हे बाबा आमटे यांचे वाक्य लिहिले ..खाली ' लोकशाही मित्र ' संस्था सुरु करण्याचा मनोदय ... उद्दिष्ट्ये वगैरे थोडक्यात लिहून .. वार्ता फलकासाठी वर्गणी दानपेटीत टाकावी असे आवाहन केले ..खरे तर एकदोघे जण वार्ताफालक आम्ही बनवून देतो म्हणत होते परंतु यात जास्तीत जास्त लोकांचा सहभाग हवा म्हणून मी ते नाकारून वर्गणी काढण्याचे ठरविले होते .. फक्त एक रुपया प्रत्येकी द्यावा असे आवाहन केले होते ...दोन दिवसातच वार्ताफलक तयार होईल इतके पैसे जमले ...वर्ताफालाकासाठी चांगल्या दर्जाचा पत्रा ..रंग .. पेंटरची बिदागी ..वगैरे सगळे मिळून त्यावेळी एकूण १६० रुपये इतका खर्च आला .. फलकावर वर ' लोकशाही मित्र ' असे लिहिले होते आणि वरच्या एका कोपऱ्यात..एकता ..मध्ये न्याय ..आणि दुसऱ्या कोपऱ्यात प्रबोधन असे रंगवून वार्ता फलक तयार झाला ..मग तो वार्ताफलक आम्ही मेरीच्या बसस्टॉप वर ठेवू लागलो ..त्यावर मी रोज काहीतरी प्रबोधनात्मक लिहीत असे ....लोकांना ते हळू हळू आवडू लागले होते .. रस्त्यावरून येणारे जाणारे ..बसची वाट पाहत थांबलेले .. वगैरे लोक फलक वाचत असत ....अजून जरी संस्थेची नोंदणी झालेली नव्हती तरी संस्थेचे नाव प्रसिद्ध होत गेले ..

सकाळी भद्रकाली पोलीसस्टेशनला जावून दहा रुपये घेवून ...सायकलवरून पाठपुरावा करण्यासाठी पाच सहा जणांच्या घरी चक्कर टाकणे ..पुन्हा व्यसन सुरु केले असेल अश्या लोकांच्या कुटुंबियांना त्यांना पुन्हा उपचार देण्याविषयी सुचविणे ..जे चांगले असतील त्यांचा उत्साह वाढविणे .. दुपारी घरी येवून जेवून मग सायंकाळी चार वाजता ..मेरीत स्थानिक मित्रांना भेटणे ..लोकशाही मित्र च्या योजनांवर चर्चा करणे वगैरे सुरु झाले ...एक महिन्यानंतर जेव्हा मी फॉलोअपचा रिपोर्ट तयार करून मुक्तांगणला गेलो तेव्हा सोबत लोकशाही मित्र च्या फलकावर लिहिलेले काही मसुदे देखील मँडमना दाखवायला नेले ...मँडमनी अहवाल वाचून समाधान व्यक्त केले ..छान काम सुरु आहे अशी पसंतीची पावती दिली तेव्हा खूप आनंद झाला .. लोकशाही मित्र बद्दल देखील कौतुक केले मात्र एक सावधगिरीची सूचना दिली की कोणताही संघर्ष ... राजकीय संबंध .. भांडणे यात पडू नकोस ..कारण तुझ्या सारख्या भावनिक संतुलन साध्य करणे कठीण असलेल्या व्यक्तीला हे सगळे मानवत नाही आणि त्यातून पुन्हा व्यसन सुरु होण्याचा धोका असतो ....त्यांची सूचना रास्त होती ... त्याच वेळी मँडमनी मला तुझी दिल्लीला केंद्र सरकारतर्फे होणाऱ्या ' व्यसनमुक्ती समुपदेशन ' या बद्दलच्या प्रशिक्षणा साठी आम्ही मुक्तांगण तर्फे निवड केली आहे ..तू आणि मिलिंद असे दोघे या प्रशिक्षणा साठी जायचे आहे अशी आनंदाची बातमी दिली . १२ मार्च १९९२ ते १७ मार्च १९९२ असे पंधरा दिवस हे प्रशिक्षण होते .. म्हणजे अजून जेमतेम १० दिवस बाकी होते ...मी आनंदाने घरी परतलो .. त्याच काळात होळी येणार होती ... होळीला लाकडे गोवऱ्या वगैरे जाळण्याऐवजी परिसरातील कचरा जाळून ..कचराकुंडी सफाई वगैरे करून आधुनिक पद्धतीने होळी साजरी करावी असे ' लोकशाही मित्र ' ने ठरवले होते ...त्याबद्दलचे आवाहन देखील फलकावर लिहून झाले होते .. नेमका मी त्या काळात दिल्लीला असणार होतो म्हणून ' लोकशाही मित्र ' ची मुले जरा नाराज झाली ..प्रशांत .. संतोष ..विजय ..सलीम ..धनंजय ..किशोर असा आमचा आठदहा जणांचा छान समूह जमला होता ..यात सर्व जातीधर्माचे मित्र होते ..कोणताही भेद नव्हता ..सर्वांची समजूत घालावी लागली की मी नसलो तरी तुम्ही होळी आपण ठरवलेल्या पद्धतीने साजरी करा ..जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घ्या ...माझे असणे महत्वाचे नाहीय तर विचार पुढे नेणे जास्त गरजेचे आहे .

( बाकी पुढील भागात )