शुक्रवार, 29 नवंबर 2013

खुनशी आजार


खुनशी आजार !  ( पर्व दुसरे -भाग ९१ वा )


मानसीचा संसाराला हातभर म्हणून नोकरी करावी किवा एखादे काम करावे हा उद्देश कितीही चांगला असला तरी ..सध्या तिने फक्त स्वतच्या प्रकृती कडे लक्ष द्यावे ..संसाराच्या उठाठेवी पुढे करायच्या आहेतच ...रोटी ..कपडा ..मकान या आपल्या प्राथमिक गरजा कोणाकडे भिक न मागता व्यवस्थित भागत आहेत ..बाकी सारी भौतिक सुखे हवीशी वाटली तरी त्या पायी जर घरतील मनशांती नष्ट होत असेल तर त्याबाबत नीट विचार करूनच काय ते ठरवावे असे मला वाटत होते ..मानसी नांदेड सारख्या छोट्या शहरातून आलेली ..शिवाय तिच्या घरातील अतिशय धार्मिक वातावरण ..त्यांत तिचे उपास -तापास ..आठवड्यातून तीन दिवस ती उपास करत असे ... कोणीतरी सांगितले लग्न जमावे म्हणून सोळा सोमवार कर ..तिने ते केले .. कोणी गुरुवार सांगितले ..कोणी शनिवार ..तिचे असे तीन दिवस उपास करणे गरोदर अवस्थेत तिच्या तब्येतीला मानवणारे नव्हते ...म्हणून उपास करणे सोड असा तिला आग्रह केला ..यावर तिने गुरुवार आणि शनिवारचे उपास सोडले मात्र त्या बदल्यात मी चतुर्थीचा उपास करावा अशी अट मला मान्य करावी लागली ..सोमवार मात्र ती सोडायला तयार होईना .. सोळा सोमवार करून झाल्यावर महिन्याभरातच आपले लग्न जुळले आहे ..असा तिने सोळा सोमवारचा महिमा मला सांगितला तेव्हा . ..तेव्हा गमतीने तिला म्हणालो ..म्हणूनच पार्वतीला जसा कफल्लक नवरा मिळाला ..तसा तुला देखील मिळाला आहे ...


एकंदरीत मी तिने नोकरी करण्याच्या विरुद्ध होतो ..या मागे कदचित असुरक्षिततेची भावना आहे की काय माझ्या मनात असेही मला वाटले ..मानसीचे वय त्यावेळी ३६ वर्षे होते ..या पूर्वी तिला नोकरीचा अनुभव व सवयही नव्हती ..शिवाय पुण्यासारख्या मोठ्या शहरात नोकरी साठी कोठे दूर जाणे तिला मानवले नसते ..असा सगळा विचार माझ्या मनात होता ..यात ती आपल्यापासून दूर जाईल की काय या भीतीपेक्षा तिची काळजीच जास्त होती ..बाहेरच्या जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत ..अतिशय लबाड लोकही आहेत ..आपली साधीसुधी ..निरागस ..भोळी पत्नी ..या जगात कशी तग धरू शकेल ही चिंता देखील त्या पाठीमागे होती ...कदाचित ही पुरुषप्रधान संस्कृती मुळे मनात निर्माण झालेली भावना असावी ..अर्थात मानसी देखील ..स्वतःचे करिअर ..स्त्री स्वातंत्र्य ..वगैरे विचारांचा हट्ट धरणारी नव्हती ..तिला फक्त आर्थिक चिंतेमुळे नोकरी करायची इच्छा होती ...नीट समजावून सांगितल्यावर तिने नोकरीचा विचार सोडून दिला .

रोज सायंकाळी आम्ही फिरायला जात असू ...मानसीने कधीही कोणत्याही गोष्टीचा हट्ट केला नाही ..फिरायला गेल्यावर कधी कधी ... ठेल्यावर साधी पाणीपुरी किवा भेल पुरी जरी खाल्ली ..तरी तिचा चेहरा आनंदाने फुलून येई ..पाहता पाहता दिवस उलटत होते ..मानसीला सातवा महिना लागल्यावर डोहाळजेवण वगैरे करावे ..त्यासाठी तिने नाशिकला यावे अशी आईची इच्छा होती ..तेथूनच मग बाळंतपणा साठी नांदेडला आईसोबत जाणार होती ..त्यानुसार मी दोन दिवस सुटी घेवून ..मानसी सोबत नाशिकला गेलो ..पहिल्या दिवशी घरातच थांबलो ..दुसऱ्या दिवशी बाहेर एकटा बाहेर फिरायला पडलो आणि घात झाला ..व्यसनाधीनता हा खुनशी आजार मानला जातो ..कोणत्या क्षणी व्यसनी व्यक्तीच्या मनात व्यसनाचे आकर्षण जागृत होईल याचा काही भरवसा नसतो .. जेव्हा केव्हा व्यसनी व्यक्ती व्यसन करण्याची शक्यता आहे अश्या असुरक्षित वातावरणात जाईल तेव्हा ..व्यसनाचे आकर्षण जागृत होऊ शकते ..जुने व्यसनी मित्र भेटणे ..पूर्वी व्यसन केलेल्या जागी जाणे ...हे सर्व व्यसनी व्यक्तीने टाळायचे असते ..तरीही या आजाराचा धूर्तपणाचा भाग असा की नेमका व्यसनी व्यक्ती अति आत्मविश्वासामुळे बेसावध राहतो ..किवा बरेच दिवस व्यसन केले नाही ..आता एखादे वेळी करूयात हा विचार त्याच्या मनात घर करतो ..पूर्वी सारखे आपण वाहवत जाणार नाही अशी मूर्ख पणाची खात्री त्याला वाटते ..माझेही तसेच झाले ..बाहेर पडल्यावर एका जुन्या मित्राला भेटायला गेलो ..त्याचे व्यसन सुरूच होते ...फक्त एकदाच असे मनाशी म्हणत ... मी पण ब्राऊन शुगर प्यायलो ..घरी आलो ..तर मानसीच्या डोहाळजेवणाची गर्दी ...भावाने माझा चेहरा पाहूनच काय ते ओळखले ..मला रागावला .. मी नेहमीचा तोच नकाराचा पवित्रा घेतला ..मी काहीही केलेले नाहीय ..तू उगाच संशय घेतो वैगरे ..थोडी कटकटही झाली ..त्या रागात मी ताबडतोब पुण्याला जायला निघालो .

( बाकी पुढील भागात )

========================================================================

बिंग फुटले ! ( पर्व दुसरे -भाग ९२ वा )

घरून रागाच्या भरात निघालेला मी आधी ब्राऊन शुगरच्या अड्ड्यावर गेलो ..दहा पुड्या सोबत घेतल्या ..मग पुण्याला जाणाऱ्या बसमध्ये चढलो ..मनात भावाबद्दल राग खदखदत होता ..व्यसन सुरु होण्यापूर्वी भावाबद्दल मनात असणारा आदर ..त्याने केलेली मदत वगैरे सगळे विचार कुठल्या कुठे पळून गेले होते ..व्यसनी व्यक्तीने एकदा व्यसनाचे सेवन केले की जो त्याच्या व्यसनाच्या आड येतो तो त्याच्या शत्रू पक्षात जातो .. मनातील सगळी सकारात्मकता ताबडतोब नाहीशी होते ...मी किती गरीब बिचारा .. माझ्यावर हकनाक किती अन्याय होतोय असेच त्याला वाटत राहते ...इतके दिवस मी व्यसनमुक्त राहिलो ..आता फक्त एखादे दिवशी व्यसन केले तर काय मोठे आभाळ कोसळणार होते ?.. लगेच मला रागावण्याची ..माझा पाणउतारा करण्याची काय गरज आहे होती ..असे अविवेकी विचार मनात घर करतात ..खरेतर ..पूर्वी व्यसनापायी मी खूप त्रास दिलेला होता ..शिवाय एकदा माझे सुरु झाले की आणखी पुढे काय काय होऊ शकते याचा घरच्या मंडळीना चांगलाच अनुभव पूर्वी आलेला होता ..त्यामुळे असे एकदाही व्यसन करणे त्यांना मान्य नसते .. त्यांना आता पुढे काय काय अनर्थ घडेल याची धास्ती वाटते आणि ही धास्ती खरीही असते .. ..म्हणून घरची मंडळी लगेच तो मुद्दा सिरीयसली घेतात ..मात्र व्यसनीला आपले काही फारसे चुकलेच नाही असे वाटते .व्यसनी समजत असतो की आपण अजिबात पुन्हा व्यसन करणार नाहीय ..आता पूर्वीसारखा मी वाहवत जाणार नाही वगैरे ..भावाची आणि माझी झालेली कुरबुर मानसीला समजली असली ..तरी ती दुसऱ्या खोलीत असल्याने व घरात इतर पाहुणे असल्याने ..आमच्या भांडणाचा नेमका विषय काय आहे हे तिला समजले नव्हते ..तरीही मी रागाने समान घेवून घराबाहेर पडल्यावर ...तिने मला घराच्या खिडकीतून हाक मारून थांबवण्याचा प्रयत्न केला होता ..अंगावर डोहाळ जेवणाचा नवीन शालू ..दागिने वगैरे घालून सजलेली मानसी सुंदरच दिसत होती .. मी असा रागाने निघालोय याबद्दल तिच्या डोळ्यात पाणी आलेले ..काहीतरी खावून जा ..नाहीतर सोबत डबा न्या ..असे ती खिडकीतून म्हणत होती ..तर मी खिडकीच्या खाली उभा राहून ..आता मी इथे क्षणभर सुद्धा थांबणार नाही ..माझा अपमान झालाय वगैरे तिला सांगत होतो ..शेवटी तिच्या पाणावलेल्या डोळ्याकडे दुर्लक्ष करून मी निघालोच होतो .

बसमध्ये सारखा डोळ्यासमोर मानसीचा डोळे पाणावलेला चेहरा नजरेसमोर येत होता ..तरीही त्यासाठी मी जवाबदार आहे हे मात्र मान्य करायला तयार नव्हतो ..सगळा दोष भावाला देत होतो ...रात्री पुण्याला पोचल्यावर ..घरी जावून पुन्हा रात्रभर ब्राऊन शुगर ओढत बसलो ..सकाळी मुक्तांगणला कामावर गेलोच नाही ..फोन करून निरोप दिला की माझी तब्येत बरी नाहीय ..माझा निरोप बंधूला कळला ...तो मला चांगलाच ओळखत असल्याने ..काहीतरी लोचा आहे हे त्याने ओळखले ...मुक्तांगण मध्ये कोणाला न सांगता बंधूही सटकून ..माझ्या घरी पोचला ..मी दार उघडल्यावर ..माझा चेहरा पाहून काय ते समजला ..मला समजवण्या ऐवजी मला किती पुड्या शिल्लक आहेत हे विचारू लागला ..त्यालाही ब्राऊन शुगर प्यायची आहे हे माझ्या लक्षात आले ..मग तो देखील माझ्या पिण्यात सहभागी झाला ..दुसऱ्या दिवशी सोबत नेलेला माल संपल्यावर अवस्थता सुरु झाली ..शारीरिक त्रास ( टर्की ) जरी फारशी नसली तरी मन मात्र सारखे ब्राऊन शुगरकडे ओढ घेत होते ..बंधूची देखील तशीच अवस्था ..मग काहीतरी जुगाड करून ..बंधू पुण्यातूनच माल घेवून आला ..आमच्या दोघांचेही व्यसन लपून छपून सुरु झाले ..पुण्याला नाशिकच्या तुलनेत ब्राऊन शुगर महाग मिळत होती ..तसेच आम्हाला विशेषतः बंधूला पुण्यातील बहुतेक ब्राऊन शुगर विक्रेते व गर्दुल्ले ओळखत होते ..कोणी ही बातमी मुक्तांगण मध्ये सांगू नये याची काळजी घ्यावी लागत होती ... मी त्यावर असा उपाय शोधला ... मी जास्त पैसे घेवून जावून नाशिकमधून ब्राऊन शुगर आणावी ..
त्यानुसार पिणे सुरु झाल्यवर आठ दिवसातच पगार झाल्यावर मी ते पैसे घेवून बसमध्ये बसलो ..रात्री १ वाजता नाशिकला ..सरळ अड्ड्यावर जावून माल घेतला ..पुन्हा लगेच बसमध्ये बसून सकाळी सात वाजता पुणे गाठले व ड्युटीवर हजार झालो ..संध्याकाळी कामावरून सुटल्यावर पुन्हा बंधू माझ्या घरी आला ..पिणे सुरु . ब्राऊन शुगर पिवून झाली की बंधू पुन्हा मुक्तांगण मध्ये जाई ..दारू सारखा ब्राऊन शुगरचा तोंडाला वास येत नाही त्यामुळे ..आम्ही नशा करून मुक्तांगण मध्ये गेलो तरी कोणी ओळखण्याची शक्यता कमी होती ..अर्थात जे स्टाफ पूर्वी ब्राऊन शुगरचे व्यसनी होते त्यांना सुगावा लागण्याची शक्यता होती ..म्हणून आम्ही त्यांच्या समोर जाणे टाळत असू.

एकदा मी असाच रातोरात नाशिकहून माल घेवून आलो ...पिवून मुक्तांगणला गेलो .नेमके त्यादिवशी बरेच स्टाफ बाबा शेखच्या मुलीच्या लग्नाला गेलेले ..गेटवर माझा मित्र द्विजेन होता ..त्याने माझा चेहरा पहिला ..त्याला लगेच समजले कारण तो देखील पूर्वी ब्राऊन शुगर ओढत असे ..तो मला काही बोलला नाही ..परंतु त्याने सरळ वरच्या मजल्यावर जावून मुक्ता मँडमना फोन लावला ' तुषार काहीतरी गडबड करून आला आहे ..काय करायचे ? ' मँडमने त्याला सांगितले की असे एकदम आरोप करणे योग्य नाही ..तू इतर स्टाफला विचारून खात्री करून घे ...मग उद्या पाहू काय करायचे ते..यावर द्विजेन सिनियर स्टाफ म्हणून बंधूकडे गेला ..त्याला सांगितले की तू बघ तुषारचे डोळे वेगळे दिसत आहेत ..तो बहुतेक पिऊन आला असावा ..बंधू माझाच साथीदार ..तरीही त्याने सरळ माझी बाजू घेवून मला क्लीनचीट न देता ..म्हणाला बहुतेक असेल ..मात्र खात्री देता येत नाही ..म्हणजे ना धड माझी बाजू घेतली ना द्विजेनची ..संशयाची सुई तशीच ठेवली ...मला हा सगळा सुगावा लागलाच ...आता प्रथम आपली झडती घेतली जाईल हे मला ठावूक होते..सुदैवाने मी मुक्तांगणला सोबत ब्राऊन शुगर नेलेली नव्हती.

( बाकी पुढील भागात )

========================================================================

नाटकबाजी ! ( पर्व दुसरे - भाग ९३ वा )


झडती घेतली असती तरी माझ्या खिशात काही माल नव्हता ..त्यामुळे कुठलाही पुरावा सापडला नसता मी व्यसन केल्याचा ..तरीही द्विजेनला संशय येणे हे पुरेसे होते मी ब्राऊन शुगर ओढल्याचे सर्वाना समजायला ..बंधूने माझी बाजू न घेतल्याने माझी केस कमकुवतच ठरली होती ..मला बंधूचा रागही आला ..माझ्या सोबत ब्राऊन शुगर ओढण्यात तो देखील सामील होता ..त्याने द्विजेनने माझ्यावर संशय व्यक्त केल्यावर मला खरेतर क्लिनचीट देवून प्रकरण मिटवायला हवे होते ..आता पुढे काय ? उद्या मुक्ता मँडम काय बोलतील ? सगळ्यांना नक्कीच मी रीलँप्स झाल्याचे कळणार ..या विचारांनी मी अवस्थ झालो ..काहीतरी आयडिया करायला हवी होती ..ज्या योगे माझे रीलँप्स होणे गंभीरतेने घेतले जाणार नाही ...सगळ्यांची सहानुभूती मिळविण्यासाठी काहीतरी नाटक करायला हवे होते ..सर्वांचे लक्ष कुठल्यातरी दुसऱ्या गोष्टीकडे विचलित केले असते ..तर माझ्या रिलँप्स वर पांघरूण घालता आले असते ..एक आयडिया सुचली ..मी किचन कडे गेलो ..तिथे कँरीडाँर मध्ये स्टाफ मध्ये एक वर्षापूर्वीच सामील झालेला ..रवी पाध्ये उभा होता ..हा रवी अतिशय साधा सरळ ...मितभाषी ...मी रवी जवळ जात एकदम लुंगीत पाय अडकून खाली पडण्याचे नाटक केले ..आणि मोठ्याने विव्हळू लागलो ..रवी लगेच माझ्या जवळ आला ..त्याने आधार देवून मला उठवले ..मी खूप वेदना होत असल्यासारखा विव्हळत होतो ..अजून दोन तीन जण धावत आले ...मला आधार देवून सगळ्यांनी पलंगावर नेले ..सहा महिन्यापूर्वीच माझे पाठीच्या मणक्याचे ऑपरेशन झाल्याचे सर्वाना माहितच होते ..सर्वाना वाटले ..हा आता पडला ..आणि परत याच्या पाठीच्या मणक्यात काही समस्या आली की काय ? आफ्टर केअर मधील सर्व जण माझी विचारपूस करू लागले ..मी वेदनांनी विव्हळण्याचे नाटक सुरूच ठेवले होते ..व्यसनी व्यक्ती तसा फार नाटकी असतो ..आपले व्यसन करणे लपवण्यासाठी ..घरच्या किवा बाहेरच्या लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्याला अनेक नाटके करायची सवय असते ..मी तर पूर्वी नाटकात कामही केले होते ..त्यामुळे माझे नाटक मस्त सुरु होते ..दिवसभर पलंगावर पडून राहिलो ..पेन किलर पण घेतली ...माझ्या रीलँप्सची चर्चा बाजूला पडली .

दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता मुक्तामँडम आल्यावर ..मला निरोप आला मुक्ता मँडमनी भेटायला बोलावल्याचा ...मुक्ता मँडमची केबिन वरच्या मजल्यावर ..तर मी खालच्या मजल्यावर आफ्टरकेअरच्या पलंगावर विव्हळत पडलेलो ..मी निरोप पाठवला की मला चालता येत नाहीय ..वरच्या मजल्यावर जिना चढून येणे कठीण आहे ..त्यावर मुक्ता मँडम खालच्या मजल्यावरच्या एका केबिन मध्ये येवून बसल्या ..त्यांना कसेही करून माझी भेट घ्यायचीच होती ..माझा नाईलाज झाला ..दोन मित्रांच्या आधाराने मी कसातरी उठून हळू हळू चालत मुक्ता मँडमच्या केबिन मध्ये गेलो ..चेहऱ्यावर खूप वेदना असल्याचे भाव घेवून ..मँडमनी कसा पडलास ? खूप दुखतेय का ? वगैरे प्रश्न विचारले ..यावर मी देखील दयनीय चेहऱ्याने उत्तरे देत गेलो ..मग मँडम मूळ प्रश्नावर आल्या ..काल काय केले होतेस ? द्विजेन म्हणतोय की तुझे डोळे ठीक नव्हते ..तू ब्राऊन शुगर ओढली होतीस ? ..मुक्ता मँडमची नजरही आता अनुभवाने धारधार झालेली ..मोठ्या मँडम सारखी तीच थेट डोळ्यात पाहून बोलण्याची स्टाइल ...क्षणभर मला मोठ्या मँडमचाच भास झाला ..एकदम सगळे नाकारण्याऐवजी अर्धवट खोटे बोललो ..म्हणालो ..मँडम मानसी डिलिव्हरी साठी गावी गेल्यापासून मला खूप एकटेपण वाटतोय ...खूप अस्वस्थ वाटते ..घरात मानसीच्या असण्याची इतकी सवय झालीय की एकटा असताना घर खायला उठते ... परवा रात्री नीट झोप येत नव्हती म्हणून मी रात्री एक लीब्रीयमची गोळी घेतली होती ..त्यामुळे दिव्जेनला माझे डोळे तसे वाटले असतील ..मी अजिबात ब्राऊन शुगर ओढलेली नाही ..मी असा नकार दिल्यावर पुढे मँडम म्हणाल्या ..जर तुला एकटेपणा वाटत होता घरी ...तर तू मुक्तांगण मध्ये राहायला यायचे होतेस..मानसी घरी नसताना या पुढे तू एकटा घरी राहू नकोस ..येथे ये राहायला ..तू जे सांगतो आहेस त्यावर मी विश्वास ठेवतेय ..या पुढे मात्र काळजी घे ..आणि हा विषय आता इथेच बंद करू ..बाहेर गेल्यावर कोणी काही विचारले तर काही चर्चा करू नकोस ..पाठीची काळजी घे ..वगैरे समुपदेशन केले त्यांनी ..मी आज्ञाधारक पणाचा आव आणून त्यांचे ऐकत ..साळसूद पणे मान डोलावली .. पुन्हा कण्हत उठून उभा राहिलो ... केबिन बाहेर उभे असलेले मित्र लगेच मला आधार द्यायला आले ..त्यांच्या आधाराने पलंगावर येवून पडून राहिलो ..मनातल्या मनात हुश्श केले ..सुटलो तर ..माझ्या पाठीच्या दुखण्याच्या नाटकाने वाचलो ...मँडमनी मला क्लीनचीट दिली ..कदाचित त्यावेळी मी खोटे बोलत आहे हे माहित असूनही मँडमनी सहानुभूती पोटी माझ्यावर विश्वास ठेवला असावा असेही वाटते !

मानसी गेल्यापासून भरपूर ब्राऊन शुगर ओढली असल्याने मला टर्की सुरु झाली होतीच ..आता माझ्या डोक्यात किडा वळवळत होता तो घरी लपवून ठेवलेल्या ब्राऊन शुगरबाबत ..बंधूने हळूच एकदा येवून ..घरी माल कुठे ठेवला आहे याची चौकशी केली होती..मी त्याला घराची किल्ली देणे टाळले ..काल त्याने माझी बाजू न घेतल्याने मला त्याचा राग आला होता ..शिवाय याला माल घरी कुठे ठेवला आहे हे सांगून किल्ली दिली असती तर त्याने एकट्यानेच सगळी ब्राऊन शुगर संपवली असती ..किवा त्यात हेराफेरी केली असती ..त्याला म्हणालो मी उद्या काहीतरी कारण काढून मँडम कडून थोडा वेळ घरी जाण्याची परवानगी काढतो ..आपण दोघेही जाऊ ...मग पाहू काय ते..रात्रभर टर्की मुळे तळमळत होतो ..शिवाय पाठीच्या वेदनांचे नाटक सुरूच ठेवावे लागले ...दुसर्या दिवशी सकाळी मँडम आल्यावर ..मी एका कागदावर लिहून पाठवले की ..मला पाठीच्या दुखण्याची परत एकदा तपासणी करावे लागेल असे वाटतेय ..त्यासाठी माझी घरी ठेवलेली ऑपरेशनची फाईल घेवून येण्यास परवानगी मिळावी ..हवे तर मी एकटा न जाता बंधू सोबत जावून येतो ..मँडमने परवानगी दिली ..मी बंधूला तसे सांगितले ..तर तो मी आत्ता येत नाही म्हणाला .. माझ्या सोबत रिलँप्स झाल्याचा संशय त्याच्यावर येवू नये म्हणून सावधगिरी बाळगत होता ..म्हणाला आपण संद्याकाळी जावू ..पण मला धीर नव्हता ..कधी एकदा घरी जावून लपवलेली ब्राऊन शुगर काढून आणतो ..आणि गुपचूप दम मारतो असे मला झालेले ..मग दत्ता श्रीखंडे म्हणाला मँडमनी मला तुझ्या बरोबर जायला सांगितले आहे ..दत्तापण पूर्वी ब्राऊन शुगर ओढत असल्याने त्याच्या सोबत जायला मला नको होते ..कारण दत्ता अतिशय हुशार होता ..त्याच्या समोर मला घरी लपवलेली ब्राऊन शुगर काढणे कठीण गेले असते ..शेवटी नाईलाजाने दत्ताच्या स्कूटरवर बसून घरी गेलो ..दत्ताने डोळ्यावर काळा गाँगल लावलेला होता ..घरी गेल्यावर मी दत्ताला पाणी दिले ...आणि स्वैपाक घरात गेलो ..जरा पसारा आवरतो म्हणून ..चलताना लंगडण्याचे नाटक सुरूच होते ..नेमकी ब्राऊन शुगर लपवलेली माचीस बाहेरच्या पलंगावर ठेवलेल्या उशीच्या अभ्र्यात होती ..दत्ता पलंगाच्या समोर खुर्चीवर बसलेला ..त्याला नकळत उशीच्या कव्हर मध्ये ठेवलेली माचीस काढणे मोठे दिव्यच होते ..एकदार त्याने गाँगल लावलेला असल्याने तो नक्की कुठे पाहतोय ते समजत नव्हते ..त्याची नजर कुठे आहे हेच काळत नव्हते तर नजर चुकवणार कशी ..कठीणच होते ..पण कसेही करून ब्राऊन शुगर मिळवायचीच हे मनात पक्के होते .

( बाकी पुढील भागात )
========================================================================

रंगेहात !  ( पर्व दुसरे - भाग ९४ वा )



दत्ता श्रीखंडेकडे पाठ करून त्याच्याशी बोलत बोलत मी पूर्वीच्या शस्त्रक्रियेची फाईल पलंगाखाली ...गादीखाली ..शोधण्याचे नाटक करत होतो ..तसे करता करताच हळूच उशीच्या कव्हर मध्ये हात घालून ...माल ठेवलेली माचीस काढून खिश्यात घातली ..मग फाईल सापडली असे म्हणून पलंगाच्या वर खिळ्याला टांगलेली पिशवी काढून त्यातून फाईल घेतली ..दत्ताला चल म्हणालो ..दत्ता खुर्चीवरून उठत म्हणाला ..माफ कर तुषार ..तुला राग येईल पण तुझ्या घरून निघताना तुझी झडती घ्यावी अश्या सूचना आह मला ..मी थंडच झालो ..' साप सुंघ जाना ' म्हणजे काय असते ते जाणवले ..अरे ..यार दत्ता माझ्यावर तुझा विश्वास नाही का ? वगैरे बोलू लागलो ..पण दत्ता तसा स्वभावाने ठाम आहे ...नाईलाजाने त्याला झडती घेवू दिली .. त्याने खिश्यातून माचीस काढली ..ती उघडली तर आत काड्यांच्या ऐवजी ..छोट्या कागदाच्या पुडीत ठेवलेली सुमारे २ ग्रँम ब्राऊन शुगर ...दत्ताने माझ्याकडे पाहत पुडी उघडली ..हे काय आहे ..असे म्हणत माझ्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागला ...म्हणजे तू रिलँप्स झालेला आहेस तर ..आम्हाला संशय होताच काही दिवसांपासून ...मी गयावया करून दत्ताला हे तू कोणाला सांगू नकोस ..आपल्यातच राहू दे ..आपण जुने मित्र आहोत ..वगैरे पटवण्याचा प्रयत्न करत होतो ..माझ्याशी बोलत बोलत दत्ता स्वैपाकघरात गँस जवळ गेला ..गँस पेटवला ..आणि त्या बर्नरवर ती सगळी पुडी ओतली ..माझ्या समोर सगळे भस्सम ....मी हतबल होऊन जळणाऱ्या ब्राऊन शुगर कडे पाहत होतो ..यार शेवटची थोडी तरी मला पिवू द्यायची होतीस असे दत्ताला म्हणालो ..तो म्हणाला अरे तू माझ्यापेक्षा जुना आहेस या क्षेत्रात ..कितीही नशा केली तरी कधी समाधान होते का आपले ? पुन्हा लागतेच ..तितक्यात मला आठवले उशीच्या कव्हरमध्येच ब्राऊन शुगर ओढण्याचा पाईप ठेवला होता ..त्याच्या आतील पन्नीवर साचलेल्या मालाचे एक दोन दम लागले असते ..तो पाईप काढला अन दत्ताला म्हणालो ..आता हे एक दोन दम तरी मारू दे मला ..टर्की होतेय खूप ..दत्ता काही बोलला नाही ..मला ते दोन दम मारू दिले ..मग जड पावलांनी दत्ताच्या मागोमाग घराबाहेर पडलो .

वाटेत दत्ताने विचारले ..तुझी इच्छा असेल तर मी यातले काहीही मँडमना सांगणार नाही ..मात्र तुझ्या रिलँप्स मध्ये कोण कोण सामील आहे ते मला खरे खरे सांग ..मी अगदीच गोंधळलो होतो ..आता मला नोकरीवरून काढून टाकतील की काय ? मानसीला सगळे कळेल ..घरी कळेल ..वगैरे भीती होतीच मनात ..दत्ताने टाकलेल्या जाळ्यात अडकलो ..आणि बंधूचे नाव सांगितले ..कुठून कशी सुरवात झाली ते पण सांगितले ..दत्ता नुसता हं..हं करत ऐकत होता ..मुक्तांगणला पोचल्यावर मी सावकाश आफ्टर केअरकडे वळलो ..दत्ता थेट वरच्या मजल्यावर गेला ..मला माहित होते तो मँडम कडे गेलाय ते..एकदा त्याच्याकडे असहाय नजरेने पहिले ..त्याने दुर्लक्ष केले ..दुपारी मला मँडमचे बोलावणे आले ...बळी द्यायला नेल्या जाणाऱ्या बकऱ्या सारखा केबिन मध्ये गेलो ... मँडमनी खुर्चीवर बसायची खूण केली ..मी बसलो ..बोल आता काय म्हणणे आहे तुझे ? .मी मान खाली घातली .. ' तुषार ..तुझे नुकतेच लग्न झालेय ..छान संसार सुरु झालाय ..कुठून पुन्हा सुचले तुला हे ? ' माझ्यापाशी काहीच उत्तर नव्हते ..' काल मी तुला सगळे खरे खरे सांग म्हणाले होते ..तू खोटेच बोललास ..तरी पण तुझ्यावर विश्वास ठेवला ' मान वर करून पहायची हिम्मतच नव्हती मला ..शेवटी म्हणाल्या उद्या नाडकर्णी सर बोलतील तुझ्याशी ..त्या वेळी नेमके डॉ . आनंद नाडकर्णी मुक्तांगणला आले होते ..आणि या पुढे मानसी इथे परत येईपर्यंत तू मुक्तांगणलाच राहायचे ..हे मी मानसीला सांगणार नाहीय ..तिच्या या अवस्थेत तिला हे सगळे सहन होणार नाही .. तुला नसली तरी आम्हाला तिची काळजी आहे ..मानवर करून मँडमकडे कृतज्ञतेने पहिले .. मान डोलावली आणि बाहेर पडलो .

थोड्या वेळाने बंधू माझ्या पलंगाजवळ आला ..त्याचाही चेहरा पडलेला ..म्हणाला तू मूर्ख आहेस ..मी काहीच बोललो नाही ..पुढे म्हणाला मला पण मँडमने बोलावले होते ..मी साफ नकार दिलाय.. तुझ्याबरोबर ब्राऊन शुगर ओढल्याचा इन्कार केलाय ..मी क्षीण हसलो ..दोस्तीत गद्दारी केलीय की काय मी असे वाटले मला..बंधू चरफडत निघून गेला ..नंतर समजले की बंधूला मँडमने काय प्रकार आहे हे विचारले तेव्हा त्याने सपशेल नकार देवून ..तुषार घाबरून कोणाचेही नाव घेतोय असे सांगितले होते ..दुसऱ्या दिवशी नाडकर्णी सरांनी मला बोलावले ..सगळे ऐकून घेतले..नक्की बंधू होता ना यात ? असे विचारून खात्री करून घेतली ..मग रिलँप्स झालेल्या स्टाफचा आपण सहा महिने पगार कापतो याची मला आठवण करून दिली ..मात्र तुझे नुकतेच लग्न झालेले आहे म्हणून तुझा सगळा पगार न कापता अर्धा पगार आम्ही कापणार आहोत हे सांगितले ...मी नुसताच मान डोलवत होतो ..बंधुलाही त्यांनी नंतर बोलावले होते ..त्याने तोच नकाराचा पवित्रा घेतला ..नाईलाजाने मग नाडकर्णी सरांनी त्याला एक महिना सुटीवर जायला सांगितले ..व्यसन केल्याचे नाकारणाऱ्या स्टाफला असे सुटीवर पाठवले जात असे ..म्हणजे जर त्याचे पिणे सुरु झाले असेल ..तर तो सुटीवर असताना जोमाने व्यसन करतो आणि स्वतःहून कबुल करायला येतो ..किवा या धक्क्याने बाहेर आपोआप चांगला राहतो असे गणित त्या मागे होते ...आता मानसीचे बाळंतपण होऊन ती परत पुण्याला येईपर्यंत सुमारे अडीच महिने तरी मला मुक्तांगणला राहावे लागणार होते..अर्धाच पगार मिळणार होता सहा महिने ..त्यातल्या त्यात समाधान हे होते की मानसीला यातले काहीही समजणार नव्हते ..घरीही आईला आणि भावाला काही सांगितले जाणार नव्हते ..मुक्तांगण एखाद्या पालकांप्रमाणेच माझी काळजी घेत होते ...

( बाकी पुढील भागात )

======================================================================

पितृत्व !  ( पर्व दुसरे -भाग ९५ वा )

या वेळच्या रीलँप्स मधून फारसे नुकसान न होता वाचलो होतो ..मुख्य म्हणजे मानसी आणि घरी कोणाला काही सांगितले जाणार नाही असे सांगून मँडमने मला मोठाच दिलासा दिला होता ...मी पुन्हा व्यसन सुरु करण्याला काही ठोस कारण नव्हतेच ..तसेही जगात व्यसने करून कोणतीच समस्या सुटत नाही ..किवा व्यसन करण्याला समर्थन म्हणून कोणतेच कारण असू शकत नाही ..हे सारे व्यसनीच्या मनाचे खेळ असतात ...व्यसनाधीनता या आजारात मनावर व्यसनाने पूर्वी दिलेल्या आनंदाचा ठसा इतका खोलवर असतो की तो कदाचित कधीच पुसला जात नाही ...ते सुप्त आकर्षण मनात अंतर्मनात दडलेलेच राहते ...मी कधीतरी संयमित पद्धतीने व्यसन करू शकेन ही वेडी आशा व्यसनीला सोडून द्यावी लागते ..किवा वारंवार व्यसनामुळे आजवर झालेल्या हानीची मनात सतत आठवण ठेवावी लागते ....व्यसनमुक्तीच्या काही काळानंतर उगाचच व्यसनी व्यक्तीला असे वाटते की आता आपले व्यसन कायमचे सुटलेय अथवा या पुढे मी कधीतरी व्यसन करण्यास हरकत नाही ..माझ्या बाबतीत व्यसनमुक्तीचे काही दिवस सुरळीत गेल्यावर असेच होत होते ..माझी बेफिकिरी वाढत जाई ..फाजील आत्मविश्वास माझा घात करत असे ...अर्थात माझे हे सारे विचार पश्चातबुद्धी होते ..आता व्यसन केल्याचे पकडल्या गेल्यावर हे सगळे सुचत होते ..आधीच स्वतःला सावध करू शकलो नव्हतो ..अजून गम्मत म्हणजे हे मानसीला समजणार नाहीय या समाधानात होतो ..मानसीला किवा घरच्या मंडळीना न समजण्याच्या आनंदापेक्षा मी स्वत:च स्वतःला फसवतोय ही भावना मनात असायला हवी ..कोणाला कळले नाही म्हणजे झाले ...हे समाधान मूर्खपणाचे होते .. कोणाला कळो वा न कळो नुकसान तर होणारच .

आता मला मानसीच्या डिलिव्हरीचे वेध लागले होते ..अजून किमान अडीच महिने तरी होते बाळाचे आगमन व्हायला ..सगळे काही सुरळीत व्हावे अशी आशा बाळगून होतो ..काही दिवसातच पुन्हा कामाला लागलो ..कुत्सीत नजरा आणि मित्रांचे टोमणे बंद झाले महिन्याभरातच ...नव्या बाळाच्या आगमना विषयी स्वप्ने रंगवू लागलो मनात ..वाटे इतर प्राण्यांप्रमाणे गर्भधारणा झाल्यावर थोड्याच दिवसात किवा दोन तीन महिन्यात डिलिव्हरी का होत नाही ? नऊ महिने आणि नऊ दिवस हे कोणते गणित असेल ..मानव जन्माला इतका जास्त कालावधी का लागत असावा ...कदाचित निसर्गाला आपली सर्वोत्तम निर्मिती करण्यास अधिक वेळ लागतो ..सर्व प्राण्यांमध्ये श्रेष्ठ ठरणारा जीव तयार होताना निसर्गाने देखील योग्य वेळ घेतला आहे ..फक्त दुर्दैव असे की माझ्यासाखा अथवा आत्मकेंद्रित ..विकारांच्या आहारी जाणारा मानव निसर्गाने असा नीट काळजी घेवून दिलेला जन्म .. निसर्गानेच दिलेल्या शक्तीचा आणि बुद्धीचा वापर करून निसर्गाचेच नियम मोडतो ..निसर्गाला वेठीस धरतो ..निसर्गाचे महत्व समजून न घेता स्वतचाच नाश करून घेतो .

पाहता पाहता मानसीची वेळ भारत आली ..डॉक्टरांनी डिलिव्हरीची दिलेली तारीख दोन दिवसांवर आल्यावर मी चार दिवस सुटी घेवून नांदेडला गेलो ...मानसीच्या हालचाली आता बऱ्याच अवघडल्या सारख्या झालेल्या ..मात्र तिच्या चेहऱ्यावर खूप तेज आल्या सारखे वाटले ..जास्त उजळ झाला होता रंग ..मी तेथे गेल्यावर तिला खूप आनंद झाला ..नव्या बाळाच्या आगमनाच्या वेळी आपला जोडीदार सोबत आहे ही भावना खूप बळ देत असावी ...एक दिवस आधी तिला दवाखान्यात दाखल केले गेले ..आता बाळंतवेणा सुरु होण्याची सगळे वाट पाहत होते ..मात्र ठरलेली निर्धारित तारीख उलटून गेली तरीही वेदना जाणवत नव्हत्या ..एक दिवस वाट पाहून मग सिझरीन करावे असा डॉक्टरांनी सल्ला दिला ..त्या नुसार मग ३ ऑगस्ट 19९९ रोजी पहाटे पाच वाजता मानसीला स्ट्रेचर वरून ऑपरेशन थियेटर मध्ये नेले गेले ..बाहेर सासूबाई आणि मी वाट पाहत होतो ..एकेक क्षण जीवघेणा होता ..अर्ध्या तासात नर्स बाहेर आली ..तिने सासूबाईन आत बोलावले ..मग रडण्याचा आवाज आणि सासूबाई हातात एक लाल गुलाबी जीव घेवून प्रफुल्लीत चेहऱ्याने बाहेर आल्या ..पेढे वाटा ..मुलगा झालाय असे म्हणाल्या ..त्यांनी तो जीव माझ्या हातात दिला ..माझे हात थरथरत होते ..तो नाजूक जीव हातात घेतल्यावर त्याच्या स्पर्शाने अंग एकदम रोमांचित झाले ..किती नाजूक ..इवलासा ..गुलाबी ..आणि हात पाय हलवत हलकेसे रडणे ..वर्णन करायला शब्दच अपुरे पडतात माझ्या अवस्थेचे ..माझ्या जन्माच्या वेळीही माझे वडील असेच रोमांचित झाले असतील ..नवी स्वप्ने त्याच्या मनात अंकुरली असतील ..हा विचारही मनात डोकावून गेला ..मात्र मी वडिलांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली होती ..बापरे ..या नव्या जीवाला सांभाळणे ..त्याची निगा राखणे ..त्याला योग्य ते संस्कार ..शिक्षण देणे आपल्याला झेपेल का ? अनेक विचार मनात होते ..नुसता बाप होणे विशेष नसते ..कुत्री ..गाढवे ..देखील बाप बनतात ..बाप कोणीही होतो ...एक जवाबदार बाप आपल्याला बनता येईल का ?

( बाकी पुढील भागात )

गुरुवार, 21 नवंबर 2013

नवा संसार....!!!

नस्ती आफत !  ( पर्व दुसरे -भाग ८६ वा )

लग्नानंतर चार दिवस नाशिकला राहून मी परत मुक्तांगणला आलो ..मानसी नाशिकला चार दिवस राहून नंतर माहेरी जाणार होती ..त्या वर्षी दिवाळी ऑक्टोबर महिन्यातच शेवटच्या पंधरवड्यात होती ..त्यामुळे ती काही दिवस नांदेडलाच राहील ..दिवाळसणाला जेव्हा मी नांदेडला जाईन तेव्हा मग तिला घेवून मी पुण्यात येणार असे ठरले होते ....दिवाळसण देखील मस्त पार पडला ..आम्ही जोडीने आमचे कुलदैवताचे आंबेजोगाई येथे जावून दर्शन घेतले ..जावई म्हणून माझी चांगली बडदास्त ठेवत होते मानसीच्या माहेरचे लोक ..मी देखील जवाबदार व्यक्ती असल्यासारखा वावरत होतो ..तुम्ही आमच्या मुलीचा स्वभाव बदलावलात असे लोक मला म्हणत ..म्हणजे काय तर पहिली विद्या खूप अबोल होती .. लवकर चिडायची ..मात्र आता मानसी झाल्यापासून ती जरा बोलायला लागलीय ..इतकेच नव्हे तर सारखी हसतमुख राहतेय वगैरे ..हे ऐकून मला छान वाटे ...मलाही ते जाणवले होते सुरवातीला अबोल असणारी मानसी आता बरीच बोलायला लागली होती ..कदाचित लग्न होण्यापूर्वी ..वय वाढतेय म्हणून ...लग्न होणार की नाही या चिंतेने ..आसपासच्या लोकांच्या कुत्सित नजरांनी ..नातलगांच्या चौकाशांमुळे वगैरे ती हैराण असावी ..शिवाय घरात आईवडिलांचे सारखे लग्नाबद्दल बोलणे ..काळजी व्यक्त करणे ..वगैरे कटकटींमुळे तिच्या मनात पूर्वी न्यूनगंडाची भावना तयार झाली असावी ... मुलीचे लग्न हा विषय कुटुंबियांच्या फार जिव्हाळ्याचा असतो ..शिवाय पुरुषप्रधान संस्कृतीत मुलगी म्हणजे आईवडिलांच्या डोक्याला ताप ..काळजी ..वगैरे अनेक गैरसमज मुलीच्या विरोधात असतात ..मुलीची निरोगी मानसिक वाढ होण्याच्या आड येतात ...लहानपणापासूनच मुलीच्या रंगरूपावरून घरात चर्चा होते ..या सगळ्या चर्चा शेवटी तिच्या लग्न जुळण्याशी जोडल्या जातात ..काही व्यंग असेल तर ' हिचे कसे होणार ' अशी मते व्यक्त होतात ..मुलीच्या जातीने असे करायचे नाही ..तसे वागायचे नाही ..मुलांशी बोलायचे नाही ..स्वैपाक आला पाहिजे ..घरकामे केली पाहिजेत ..सासरी आमचा उद्धार व्हायला नको ..सूचना सल्ले ...यांना सतत समोरे जावे लागते ..नंतर वयात आल्यावर झालेल्या शारीरिक आणि मानसिक बदलांमुळे ..आसपासच्या लोकांच्या बदलेल्या नजरा ..त्यामुळे बाळगावी लागणारी सावधगिरी ..प्रवासात ..गर्दीत ..घराबाहेर येणारे विचित्र विकृत अनुभव ..या सगळ्या गोष्टींचा विचार केला तेव्हा जाणवले की स्त्री चे जीवन एकंदरीत कठीणच झालेय पुरुषप्रधानते मुळे ...हे बदलण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले पाहिजेत ..पुरुषांकडून आणि मुख्यतः स्त्रियांकडूनही .



दिवाळसण आटोपून मी मानसीसह पुण्यास परतलो आणि आमचे सहजीवन नागपुर चाळीत सुरु झाले ..माझ्याकडे गँस नव्हता ..एका छोट्याश्या स्टोव्ह वर स्वैपाक होऊ लागला ..पलंगही नव्हता ..तुटपुंज्या सामानावर संसार सुरु झाला ..मी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळात मुक्तांगणला डबा घेवून कामावर जाई..मग सायंकाळी घरी आल्यावर आम्ही आसपास फिरायला जात असू ..एखाद्या कुटुंबवत्सल माणसाप्रमाणे किराणा सामान आणणे ..रॉकेलचा डबा घेवून जावून रॉकेल आणणे ..दळण आणणे ..भाजी आणणे वगैरे कामे मी सहजपणे करू लागलो होतो ...मुक्तांगणला माझ्यावर समूह उपचार घेण्याची तसेच योग्याभ्यास घेण्याची जवाबदारी होती ..शिवाय इतर कामामध्येही सहभाग होताच ...पगार जरी कमी असला तरी त्यामुळे काटकसर शिकायला मिळाली ..' जिज्ञासा ' प्रकल्पाचा संवादक म्हणून महिन्यात किमान चार पाच सेशन घेत होतो त्याचे वेगळे पैसे मिळत असत ...एकंदरीत ' दृष्ट लागण्यासारखा ' संसार सुरु झाला .



साधारण महिन्याभराने ..एकदा सकाळी मुक्तांगणला असताना ..अचानक आरडा ओरडा झाला ..मी देखील पळत मुक्तांगणच्या मुख्य दाराजवळ गेलो ..तेव्हा पहिले की सकाळी दाराजवळ सुरक्षेचे काम पाहणारे दोघे ' पळाला ..पळाला ..पकडा ..' असे ओरडत होते ..वरच्या मजल्यावरून जिन्यावरून उतरून एक उपचार घेणारा पेशंट ..रक्षकांची नजर चुकवून ..मुख्य दाराबाहेर पडला होता ..त्याने धूम ठोकली होती ..तो खूप वेगात पळत होता ..आणि माझे दोनचार मित्र नुसतेच पकडा पकडा असे ओरडत होते ...माझ्या नेहमीच्या साहसी स्वभावानुसार मला राहवले नाही ..मी त्याच्या मागे पळू लागलो ..वेग वाढवला ..खूप जोरात..मागून पळत जावून त्याला पकडले ..तो झटापट करू लागला माझ्याशी ..विरोध करू लागला ..शेवटी त्याला घट्ट पकडून मी खांद्यावर उचलले ..त्याच वेळी माझ्या पाठीत एकदम कळ आली ..एकदम खालीच बसलो ..एव्हाना माझे मित्र पळत येवून तेथवर पोचले होते ..त्यांनी मला उठवण्याचा प्रयत्न केला ..उठता येईना ..कंबरे जवळ ..पाठीच्या मणक्याच्या खालच्या भागात प्रचंड वेदना ...शेवटी मला कसेतरी आधार देवून उठवण्यात आले ..मित्रांच्या आधारानेच मुक्तांगण मध्ये आलो ..मला वार्डात थेट पलंगावर नेण्यात आले ..वेदना सुरूच होत्या ..एक पेन किलर घेवून पडून राहिलो ..थोड्या वेळाने डॉक्टर जॉन आले ..त्यांनी तपासणी केली ..म्हणाले कदाचित पाठीचा मणका सरकला असावा ..दुखावला गेला असावा ..सी ती स्कँन करावा लागेल ..तपासणी केल्याखेरीज नक्की कळणे कठीण आहे ..माझा डावा पाय देखील हळू हळू बधीर होत ..उठणे..बसणे..उभे राहणे ..चालणे .सगळेच बंद झाले ..नुसता एका कुशीवर पडून राहिलो होतो .

( बाकी पुढील भागात )

========================================================================

पायगुण ???????  ( पर्व दुसरे -भाग ८७ वा )


प्रचंड वेदनांनी तडफडत मी पलंगावर पडून होतो ..मला मानसीची काळजी वाटत होती ..तिला निरोप द्यायला घरी एका मित्राला पाठवले..ती रडतच मुक्तांगणला आली ..खूप घाबरली होती ..मी काही दिवस घरी येवू शकणार नाही हे सांगितल्यावर अधिकच घाबरली ..मला तपासण्या वगैरे करण्यासाठी मुक्तांगणला राहणे आवश्यक होते ..शिवाय इथे माझे मित्र सोबत असल्याने त्यांनी माझी काळजी चांगली घेतली असती ..घरी मानसीला हे सगळे कठीण गेले असते ..मुक्तांगण मधूनच नाशिकला भावाला फोन केला ..लवकरच मी तेथे येतो म्हणाला ..तो पर्यंत मला मदत म्हणून त्याने ताबडतोब आईला पुण्याला रवाना केले ... आई रात्रीच पोचली ..दुसऱ्या दिवशी डॉक्टरांच्या सांगण्यानुसार आम्ही तपासण्या करायला मुक्तांगणच्याच गाडीने गेलो ..दत्ता श्रीखंडे आणि बंधू सोबत होता ..डॉक्टरांनी सी.टी.मायलो आणि सी .टी.स्कँन करायला सांगितले होते ..त्यानुसार आधी माझ्या पाठीच्या मणक्यात एक इंजेक्शन दिले गेले ..नंतर सी .टी.स्कँन च्या मशीनमध्ये मला घातले . .. पेन किलरची इंजेक्शने घेत होतो ..परंतु तरीही जरा विपरीत हालचाल झाली की प्रचंड वेदना होत असत ...सी .टी.स्कँनच्या वेळी एकदा स्कँन सुरु झाला कि अजीबत हालचाल करायची नाही असे मला बजावले होते ...त्यामुळे अजिबात हालचाल न करता पडून राहावे लागले ..सरळ उताणे झोपताच येत नव्हते ..तरीही स्कँनच्या वेळी उताणेच झोपून राहावे लागले ..ही एक शिक्षाच होती ...एकदाचा स्कँन पार पडला ...रिपोर्ट मध्ये पाठीच्या मणक्याच्या खालच्या भागात गडबड आहे हे स्पष्ट झाले ..लुंबर ४ व ५ ( L4 , L5 )या ठिकाणी दुखापत होती ..तेथील मणका सरकला आहे असे निदान झाले ..शस्त्रक्रिया केली पाहिजे असे सांगितले गेले ...सुमारे ४० हजार रुपये खर्च येणार होता ..भावाने क्षणाचाही उशीर न करता ..शस्त्रक्रिया करण्यास मान्यता दिली ..खर्च भावूच करणार होता ..पूर्वी मी  त्याला इतका त्रास दिला असतानाही तो माझ्या पाठीशी उभा होता .



डॉ.जॉन अल्मेडा याच्या सल्ल्याने कोरेगाव पार्कच्या बाजूला असलेल्या इनलँक्स बुदरानी हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया करण्याचे ठरले ..तो पर्यंत वेदनाशामके घेवून मी वेळ काढत होतो ..लगेच मला हॉस्पिटल मध्ये दाखल केले गेले ..तीन दिवसांनी शस्त्रक्रिया होईल असे ठरले ..त्या आधी इतर तपासण्या करायच्या होत्या ..भावू पैश्यांची व्यवस्था करून परत नाशिकला गेला ..शस्त्रक्रियेच्या वेळी तो परत येणार होता ...हॉस्पिटल मध्ये माझ्या जवळ दिवसा आई आणि रात्री मानसी राहत असे ..पहिल्याच दिवशी रात्री माझ्या बाजूला बसलेल्या मानसीला पुन्हा रडू येवू लागले ..तिचे असे दवाखान्यात रडणे मला बरे वाटले नाही ..तिला समजावले ..सगळे ठीक होईल म्हणून धीर दिला ..माझी शस्त्रक्रिया वगैरे सगळे नीट पार पडेल की नाही या काळजीने ती रडत होतीच पण त्याच बरोबर तिने रडण्याचे अजून एक कारण सांगितले ..तिला भीती वाटत होती की लग्नानंतर जेमतेम महिनाभरात मला असा अपघात झाला म्हणून कुणी तिला तर दोष देणार नाहीत ना ? अशी शंका आणि अपराधीपणाची भावना तिच्या मनात होती ..मुलीचा पायगुण चांगला नाही असे लोकांना वाटेल ...याची भीती होती तिला ...मी तिला समजावले ..असे पायगुण वगैरे काहीही नसते ..ही अंधश्रद्धा आहे ..सुख -दुखः , भरती-ओहोटी , दिवस -रात्र , हा तर निसर्गचा नियम आहे ..त्या नुसार वेगवेगळ्या कारणांनी घटना घडतात ..माझ्या किवा माझ्या नातलगांच्या मनात अजिबात पायगुण वगैरे विचार नाही ...माझ्या बोलण्याने तिला जरा धीर आला ..दुसऱ्या दिवशी सकाळी आईला मानसीचे म्हणणे सांगितले तेव्हा आईनेही तिला धीर दिला ..आईने धीर देवून ..तू अजिबात काळजी करू नकोस असे सांगितल्यावर मानसी निश्चिंत झाली ..कदाचित तिला सासू काय विचार करत असेल याचीच जास्त भीती असावी .

त्या दोन दिवसात शस्त्रक्रियेची तयारी म्हणून माझी एच .आय .व्ही .टेस्ट देखील करण्यात आली ..सायंकाळी रिपोर्ट आला .. मी सिस्टरना रिपोर्ट बद्दल विचारले ..त्यांनी काहीतरी कारण सांगून मला रिपोर्ट बद्दल सांगणे टाळले ..म्हणाल्या उद्या परत एकदा टेस्ट करू ..दुसर्या दिवशी पुन्हा टेस्ट केली गेली ..सायंकाळी कळले की शस्त्रक्रिया दोन दिवस पुढे ढकलली आहे ..मी गोंधळात पडलो ..माझी एच .आय .व्ही .टेस्ट तर गडबड नाहीय ना ? अशी शंका मनात आली .. सिस्टरना विचारले तर त्यांनी पुन्हा थातूर मातुर उत्तर दिले ...म्हणाल्या उद्या पुन्हा बाहेरच्या लँब मधून टेस्ट करू मग पाहू ..म्हणजे नक्कीच माझ्या रिपोर्ट मध्ये गडबड होती तर ..रात्रभर मी झोपू शकलो नाही ..मनात वेगवेगळे विचार थैमान घालत होते .

( बाकी पुढील भागात )
========================================================================


टांगती तलवार ! ( पर्व दुसरे -भाग ८८ वा )


एच .आय .व्ही . टेस्ट मध्ये गडबड आहे हे समजल्यावर मी घाबरलो ..हा उपटसुंभ व्हायरस माझ्या शरीरात कुठून आला असावा या बद्दल विचार करून डोके शिणले ..,नेमका काहीच संदर्भ लागेना ....दुसऱ्या दिवशी सकाळी मानसी ..माझ्या रक्ताचा नमुना घेवून बाहेरच्या लँब मध्ये तपासणीसाठी गेली ..ती रिपोर्ट घेवून परत येईपर्यंत जीव टांगणीला होता ...केवळ विचारानेच माझी अशी अवस्था झालीय ..जे लोक खरोखर बाधित होत असतील त्यांची ...त्यांच्या नातलगांची नेमकी अवस्था होत असेल ..ते जाणवले ..एकदाची मानसी हसतमुखाने रिपोर्ट घेवून आली ..तिच्या चेहऱ्यावरूनच रिपोर्ट निगेटिव्ह आलाय हे मी समजलो ...मग भानगड कळली ..हॉस्पिटल मध्ये स्पाँट टेस्ट केली होती ..त्यात गडबड झाली ..म्हणून मग बाहेर ' इलीझा ' करायला पाठवले होते ...रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर ..उद्याच शस्त्रक्रिया करू असे ठरले ..त्या आधी सिस्टरने मला सही करायला एक फॉर्म दिला ..शस्त्रक्रियेचे स्वरूप ..प्रक्रिया ..उद्दिष्टे वगैरे सांगितली ..सुमारे साडेतीन तासांची शस्त्रक्रिया होणार होती ..तीन बाटल्या रक्त लागणार होते ..मला शस्त्रक्रियेच्या आधी ' अनेस्थेशिया ' दिला जाईल ..कदाचित त्यामुळे काही समस्या येवू शकेल ..शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही तर ..कमरेखालचा सगळा भाग निकामी होऊ शकतो ..नपुसंकत्व येवू शकते ..किवा मेंदूत काही बिघाड निर्माण होऊ शकतो ..वगैरे गोष्टी फॉर्म मध्ये स्पष्ट केल्या होत्या ..माझी परवानगी म्हणून मला सही करायची होती ..मी सही केली मात्र नंतर विचारात पडलो ..जर शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही तर होणारे परिणाम वाचून पुन्हा जीव धस्तावला ..मानसी सही करताना रडू लागली ..माझी काळजी सोडून तिलाच समजावत बसलो .


उद्या माझी शस्त्रक्रिया होणार हे मुक्तांगण मध्ये समजले माझे अनेक सहकारी मला भेटून गेले .. संध्याकाळी मुक्ता मँडम आशिषसह भेटायला ..मला धीर द्यायला आल्या ..त्यांनी मला आर्थिक मदत म्हणून मुक्तांगणच्या कार्यकर्त्यांनी गोळा केलेले पाच हजार रुपये आई जवळ दिले ..अजून काही मदत लागली तर कळवा असे आश्वस्त केले ..बाबा येवू शकले नाहीत ..मात्र त्यांनी मुक्ता मँडम सोबत माझ्यासाठी एक लेख पाठवला होता वाचायला ..कोल्हापूरच्या सामाजिक कार्यकर्त्या ' नसीमा हुरजूक ' यांच्या बद्दल माहिती असलेला तो लेख होता ..त्यानाही अशाच प्रकारची पाठीच्या मणक्याची समस्या येवून ..नेमके उपचार न झाल्याने त्या कशा कमरेखाली अपंग झाल्या ..नंतर त्यांनी धीर न सोडता ..त्या अपंगत्वावर मात करत मोठे सामाजिक कार्य उभारले ..त्यांच्या सारख्याच अपंगाना मदत केली ..वगैरे माहिती होती त्या लेखात ..बाबांनी मुद्दाम मला तो लेख पाठवला होता ...मी घाबरून न जाता शस्त्रक्रिया आणि नंतरच्या परिणामांना तयार राहावे असेच बहुधा त्यांना सुचवायचे होते ..खरोखर तो लेख वाचून माझा निर्धार बळावला ....वाटले जे होईल ते होऊ दे ..आपणही हरायचे नाही ..लढायचे जीवनाशी .

बंधूने मला एक सूचना दिली होती की आपल्या व्यसनी लोकांना सर्व साधारण लोकांना देतात तो ' अनेस्थेशिया ' चा डोस कामी येत नाही ..तू आधीच व्यसनी असल्याचे सांगून ..जरा त्या प्रमाणात ' अनेस्थेशिया ' द्यायला तज्ञांना सांग ..त्या नुसार मी अनेस्थेशिया द्यायला आलेल्या तज्ञांना संगितले ..ते म्हणाले बरे झाले सांगितलेस ..त्या नुसार मग त्यांनी मला इंजेक्शन दिले ..माझ्याशी ते तू काय करतोय ..वय किती ..शिक्षण किती ..वगैरे बोलता असतानाच माझी शुद्ध हरपली ...सकाळी जे ७ वाजता ऑपरेशन थीयेटर मध्ये गेलेला मी ..एकदम पावणेकरा वाजता शुद्धीवर आलो ...पहिले तर मला स्ट्रेचर वरून बाहेर वार्डात आणत होते ..हाताला रक्ताची बाटली लावली होती..माझ्या आसपास बंधू ..आई ..मानसी ..दत्ता श्रीखंडेची बायको राधा ..माझी ठाण्याची चुलत बहिण ..वगैरे लोक ...माझ्या तोंडाला कोरड पडल्यासारखे झालेले ..स्पष्ट बोलता येत नव्हते ..जीभही जड वाटत होती ..सर्वांनी इशार्यानेच मला बोलू नकोस ..स्वस्थ पडून राहा असे सांगितले ..शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती ..बारा टाके लागले होते पाठीच्या खालच्या भागात ..आता पंधरा दिवस जखम भरून येईपर्यंत आराम करायचा होता ..नंतर हळू हळू मला चालता येणार होते .

( बाकी पुढील भागात )

========================================================================


कृतघ्न ? ? ? ? ( पर्व दुसरे -भाग ८९ वा )


शस्त्रक्रियेनंतर पाठीची जखम भरून टाके काढेपर्यंत मला जास्त हालचाल करायच्या नाहीत असे बंधन होते अशी ..नुसते पाठीवर उताणे पडून रहायचे ...मोठी शिक्षाच होती माझ्यासारख्या चळवळ्या माणसासाठी ..दिवसभर खूप बोअर व्हायचे ..मग वार्डातील इतर पेशंट्सना बघत राहणे ..त्यांचे नातलग ..येणारे जाणारे ..झाडूवाला ..सिस्टर्स ...डॉक्टरांचा राउंड ..या गोष्टीत मन रमवत असे ..माझ्या पाशी दिवसा आई थांबे ..तर रात्री मानसी बसे ...मानसी नांदेड सारख्या छोट्या शहरातून आलेली असल्याने तिला पुण्याच्या वाहतुकीची ..गर्दीची ..धावपळीची सवय नव्हती ..रोज नागपूर चाळीतून शेअर ऑटो करून दवाखान्यात येणे - जाणे तिला अवघड जात असे ..तरी बिचारी काहीही कुरकुर न करता सगळे व्यवस्थित करत होती .. तिचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी दत्ता श्रीखंडेची पत्नी राधाची खूप मदत झाली ..राधा पुण्यातच लहानाची मोठी झाल्याने ..बोलायला हुशार .. खमकी देखील आहे . मला मुक्तांगण मधील बहुतेक जण भेटून गेले होते ..सगळ्यांनाच नवीन लग्न होऊन सारे सुरळीत होत असताना माझ्यावर आलेल्या या संकटामुळे माझ्याबद्दल सहानुभूती होती ...मला लघवी ..संडास वगैरेसाठी पाँट देण्याचे काम बहुधा मानसीला करावे लागत असे ..लग्न झाल्यानंतर केवळ एक दीड महिन्यात माझी सुश्रुषा करण्याची जवाबदारी तिच्यावर आली होती ...तिनेही हे सारे आईच्या मायेनेच केले ..मला वाटते सुश्रुषा हा स्त्रियांमधील एक नैसर्गिक गुण आहे ..त्यामुळेच त्यांच्याकडे मातृत्वाची जवाबदारी दिलीय निसर्गाने ..स्त्रिया जितक्या आत्मीयतेने एखाद्या नातलगाची किवा आजारी व्यक्तीची सृश्रुषा करतात तितकी पुरुषांना जमणे कठीणच आहे ...मानसीला त्याचे शंभर मार्क्स दिलेच पाहिजेत .

पाचसहा दिवसांनी माझ्याकडे फिजियो थेरेपिस्ट आले ..त्यांनी मला हळू हळू पायाच्या हालचाली कशा करायच्या वगैरे मार्गदर्शन केले ..आधार देवून मला थोडे उभे केले ..दुसऱ्या दिवशी थोडे चालवले ..एकंदरीत सगळे ठीक होते ..शस्त्रक्रिया फायदेशीर ठरली होती ...नंतर हळू हळू मी वार्डातच चालण्याचा सराव करू लागलो ..थोडे हळू चालावे लागत असे ..तसेच काही दिवस चालताना पाठीच्या मणक्याला आधार देणारा पट्टा वापरावा लागेल असे सांगितले गेले ...पंधरा दिवसानंतर मला डिस्चार्ज देण्याचा दिवस उगवला ..परेश ..बंधू ..हे मित्र आले होते दवाखान्यात ...आई आणि मानसी होतीच ..डिस्चार्ज फॉर्म वर मानसीची सही घेतली गेली ..तो फॉर्म मी वाचायला घेतला तेव्हा माझ्या लक्षात आले की सही करताना मानसीने मराठीत मानसी नातू ..अशी सही करण्याएवजी ..मानशी नातू ..असे लिहिले होते ..मराठीचे खूप वाचन असणाऱ्या मला ..मानसी ऐवजी मानशी असे लिहिलेली चूक खटकली ..ही व्याकरणातील चूक होती ..मला आठवले मानसी बी .ए .झालेली आहे ..तरीही अशी चूक करते हे योग्य नव्हे ...मी पटकन बोलून गेलो ' मानसी अग ..तू बी ए .आहेस ना ? अशी कशी पदवीधर झालीस तू ? इतकी साधी गोष्ट समजत नाही तुला ? ..सर्वांसमोर मी माझा शहाणपणा पाजळत होतो ...मानसी कसनुस हसली ' अहो , होते चूक ..त्यात काय मोठेसे ' इतकेच म्हणाली .

नंतर सगळी प्रक्रिया होत असताना माझ्या लक्षात आले की मानसी कुठे दिसत नाहीय ..मी आईला विचारले ..तर आई म्हणाली ..असेल इथेच कुठेतरी ..पाच दहा मिनिटे झाली तरी मानसी दिसेना ..मग बंधूला पाठवले तीला शोधायला ..बंधू वार्डाबाहेर जावून लगेच परत आला ..म्हणाला वहिनी तिथे जिन्यात रडत उभ्या आहेत ..आता सर्व सुरळीत झालेय रडण्या सारखे काय घडलेय टे मला समजेना ..मग बंधूच म्हणाला ' यार ..तुला पण काही अक्कल नाहीय ...तू सर्वांसमोर त्यांची व्याकरणाची चूक काढलीस ...त्यांना त्याचे वाईट वाटले असेल ' ..मग माझ्या लक्षात आले ..खरेच होते बंधूचे ..मी माझी आई ..मित्र यांच्या समोर जाहीर रीतीने मानसीची छोटीशी व्याकरणाची चूक दाखवून ..वर असली कसली बी .ए .असेही म्हणालो होतो ..हा तिचा अपमानच होता ..माझा शहाणपणा दाखवण्याच्या नादात मी तिच्या भावनांची पर्वा केली नव्हती ..जीने मला लग्नानंतर जेमतेम दीड महिन्यात लघवी ..संडासला पाँट दिला ...कसलीही कुरकुर न करता ..रात्र रात्र जागली ...मायेने माझी सुश्रुषा केली त्या पत्नीला मी मित्रांसमोर अपमानित केले होते ..खरोखर मी मूर्ख होतो ..माझा हा कृतघ्नपणाच होता . आज खूप वर्षांनी जाणवतेय ..पुरुष किती सहजपणे ..पत्नीच्या माहेरचा उद्धार करतो ..तिच्या भाबडेपणाचा बावळट म्हणून चारचौघात उल्लेख करतो ..किवा ती कशी मूर्ख आहे हे किस्से सर्वाना सांगतो ..विनोद म्हणून इतरांसमोर आपल्या पत्नीला अपमानित करतो ..तरीही त्या निष्ठेने पतीला मान देतात ..बहुधा स्त्रिया मात्र असे करत नाहीत ..खूप काही शिकण्यासारखे असते त्यांच्याकडून !

( बाकी पुढील भागात )

========================================================================

गोड बातमी !  ( पर्व दुसरे -भाग ९० वा )


महिन्याभरात मी पूर्ववत चालू लागलो ...काही पथ्ये पाळावी लागत होती .. जोरात पळणे ..कमरेत खाली वाकणे ... वजन उचलणे वगैरे गोष्टी शक्यतो टाळायच्या होत्या किवा काळजीपूर्वक करायच्या होत्या ..याच काळात माझ्या चिंचवडच्या चुलत बहिणीने माझ्याकडे गँस नव्हता म्हणून तिच्या कडील जास्तीचा सिलेंडर मला वापरायला दिला ..स्टोव्ह बंद झाला ..माझी मुक्तांगणची नोकरी पूर्ववत सुरु झाली ..एकदा मानसीने मला पाळी चुकलीय हे जरा काळजीनेच सांगितले ..मी खूप आनंदलो ...नव्या जिवाच्या आगमनाची ही चाहूल आहे हे मला समजले ..मी लगेच नाशिकला फोन करून ती बातमी दिली .. आई ...भाऊ ..वहिनी ..सगळेच आनंदले ..मानसी मात्र जरा घाबरत होती ...हे सगळे आपल्याला झेपेल का ? सगळे व्यवस्थित पार पडेल का ? अशी भीती तिच्या मनात होती ...शिवाय प्रसूती वेदना वगैरेबद्दल तिने जे ऐकले होते त्यामुळेही तिला भीती वाटत असावी...तिला मी बरेच समजावले ..मात्र ती निर्धास्त झालेली वाटली नाही ..मग तिला मुक्ता मँडमना भेटायला घेवून गेलो ..त्यांनी तिला व्यवस्थित समुपदेशन केले ..मग निश्चिंत झाली ..तपासणी केल्यावर बातमीवर शिक्कामोर्तब झाले ...इतकी वर्षे व्यसने केल्यावर ..शुक्राणू कमकुवत होऊन ... नपुसंकक्त्व येण्याची शक्यता असते ..माझ्या मनातील ती भीती देखील संपली ....सगळाच आनंदी आनंद ....फक्त आर्थिक बाबतीतच मी कमकुवत होतो ...हॉटेलिंग ..सिनेमा ..अशी चैन परवडत नव्हती ...मानसी देखील तशी अगदी साधी असल्याने तिने कधीही असल्या गोष्टींसाठी माझ्याकडे हट्ट केला नव्हता.. छान दिवस चालले होते ..!

पितृत्वाच्या कल्पेनेने मी खूप आनंदलो होतो ..अशा वेळी मुलगा की मुलगी अशी चर्चा सुरु होते ...माझ्या दृष्टीने दोन्ही सारखेच ..परंतु सर्वसाधारण मुलगा हवा अशीच बहुतेकांची भावना असते ...मानसीच्या तब्येतीवरून..तिच्या चेहऱ्याच्या तेजावरून ..तिच्या हालचालीवरून ..आसपास राहणाऱ्या ..तिची ओळख झालेल्या स्त्रिया मुलगा की मुलगी याबाबत काही अंदाज बांधत आणि ते मानसीला सांगत ...सायंकाळी मी घरी आल्यावर कोण काकू काय म्हणाल्या ते ती मला सांगे ..माझे छान मनोरंजन होई ..वाटे स्त्री -पुरुष हा फरक किती खोल रुजला आहे लोकांच्या मनात ..खरेतर निसर्गाने दोन्हीही एकमेकांना पूरक असे बनवले आहेत ..वृत्ती जरी भिन्न असली तरी मला नेहमी वाटते ..की पुरुष्यांच्या तुलनेत स्त्रिया.. ..हिंसा ..भ्रष्टाचार ..विध्वंसक कारवाया ..कुटिलता वगैरे पासून शक्यतो दूर राहतात ..अर्थात यालाही काही सन्माननीय असे राजकीय आणि ऐतिहासिक अपवाद आहेतच पण तरीही दया ..ममता ..शांतीवाद ..या बाबतीत त्या केव्हाही पुरुष्यांना मागे सोडतात ...सध्या तर प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी बाजी मारली आहे ..मुलगा असो की मुलगी ..पालकांनी त्याची योग्य काळजी घेतली ..त्याच्या निरोगी मानसिक विकासाकडे लक्ष दिले तर काहीच काळजी करण्याचे कारण नसते !

बाळाची चाहूल लागल्यापासून मानसीला सारखे आर्थिक असुरक्षितता वाटे ..तुटपुंज्या पगारात पुढे सगळे नीट होईल की नाही याची चिंता ती बोलून दाखवे ..एकदा सायंकाळी मुक्तांगणहून घरी आलो तर मानसी तुरीच्या शेंगांच्या ढिगाऱ्याशेजारी बसलेली दिसली ..एका परातीत ती त्या तुरीच्या शेंगा सोलून त्याचे दाणे टाकत होती ..घरभर शेंगांची साले पसरलेली ..मला समजेना काय भानगड आहे ते ..मग म्हणाली ..अहो घरात एकटी बसून कंटाळा येतो म्हणून बाजूच्या एका बाई सोबत एका ठिकाणी नोकरी शोधायला गेले होते ..तर हे काम मिळाले ..या शेंगा तेथून वजनावर मोजून आणायच्या आणि सोलून दाणे त्यांना द्यायचे ..त्याचे ठराविक पैसे मिळतात ..मला हसूच आले तिच्या भाबडेपणाचे ..तिला हे काम खूप सोपे वाटले होते ..मात्र त्या शेंगाची साले तेलकट किवा थोडी चिकट असतात ..सोलताना हात काळे होतात ..किचकट काम असते ...शिवाय खराब शेंगामधील अळ्या नीट लक्ष दिले गेले नाही तर शेंगातून बाहेर पडून घरभर पसरतात वगैरे !..मी पण तिला शेंगा लवकर संपाव्या म्हणून मदत केली ..सधारण तीन दिवस लागले पाच किलो शेंगा सोलायला ...त्यामानाने मिळणारे पैसे अगदीच कमी होते ..मात्र नंतर घरात दोन तीन दिवस कुठेही एखादी हिरवी अळी दिसे ...मग मानसीचे किंचाळणे आलेच ..मी काळजी पूर्वक ती अळी उचलून बाहेर फेकून देई ...नंतर मी तिला ते काम करण्यास मनाई केली .

( बाकी पुढील भागात )

गुरुवार, 14 नवंबर 2013

नवे आयुष्य


खतरनाक !  ( पर्व दुसरे -भाग ८१ वा )


संध्याकाळी दाखवायला आणलेली मुलगी म्हणजे खतरनाक असेच म्हणावे लागेल ..कारण तिला पाहताक्षणीच स्तब्ध ..पुतळा ..दगड ..विषण्ण ..वगैरे झालो .. एकाच वेळी मनात परस्पर विरोधी भावना येत होत्या ..मुलीचे वय ३४ वर्षे होते ..रंग आफ्रिकी काळा ..वजन सुमारे १०० किलो असावे ..बुटकी ..तिची मान वेगळी अशी दिसतच नव्हती ..मान आणि खांदा एकत्रच झालेले .. मला ग्लँडस्टन स्मॉल या गोलंदाजाचीच आठवण झाली . हिला कोण पसंत करणार या विचाराने बिचारीची दयाही येत होती ..वजन इतके वाढे पर्यंत हिच्या लक्षात कसे आले नाही असा विचार मनात डोकावून गेला ..रंग तर कोणाच्या हाती नसतो ..मात्र जे काही निसर्गाने दिले आहे त्याची नीट निगा तर माणूस राखू शकतो ..या मुलीने वाढत्या वजनाची अजिबात काळजी घेतलेली दिसत नव्हती ..कदाचित तिला वजन वाढण्याचा आजार असावा ....पदवीधर ..नोकरी नाही ... म्हातारे आईवडील..परिस्थिती बेताचीच ..म्हणजे पैसा पाहून कोणी लग्नाला तयार होईल अशीही परिस्थिती नव्हती . आई ..वहिनी ..मी आणि आमच्याकडे राहणारा विश्वदीप देखील त्यावेळी घरात होता ..सगळेच एकदम सुन्न झालेले ..काय बोलावे हेच सुचेना कोणाला ..आईनेच पुढाकार घेवून मुलीला एकदोन प्रश्न विचारले ..मग मला काही विचारायचे का म्हणून माझ्याकडे पहिले ...मी मानेनेच नकार दिला .मुलीच्या आई वडिलांना देखील आमच्या स्थितीची कल्पना आली असावी ..कदाचित त्यांना हे सवयीचे झाले असावे ..निर्विकार पणे ते सगळ्या गोष्टीतून जात असावेत . चहा घेवून मंडळी जायला निघाली ..नंतर कळवतो असे आईने त्यांना सांगितले ..इथे माझ्या पूर्व इतिहासाबद्द्दल काही सांगण्याची गरजच उरली नव्हती . एकमेकांशी न बोलताही सर्वांनी मुलगी एकमताने नापसंत केली होती ...विश्वदीप माझी मस्करी करत होता ..म्हणाला ' हिच्याशी लग्न झाले तर एक फायदा होईल ..तुषार परत कधी रिलँप्स झाला तर ही अशी बदडून काढेल की पुन्हा त्याची व्यसन करायची हिम्मतच होणार नाही ' .



एकंदरीत प्रकरण कठीणच होते ..मला तिच्याबद्दल वाईट वाटत होते ..कसे होणार हिचे लग्न ..तिच्या आईवडिलांना तुम्ही हिच्या लग्नाचा विचार सोडा ..हिला एखादी स्वत:च्या 
पायावर उभे राहता येईल अशी नोकरी करायला लावा ..आणि स्वाभिमानाने एकटीला जगू द्या ..असा आगावू सल्ला द्यावासा वाटला .जगात अनेक लोकांचे अनेक वेगवेगळ्या कारणांनी लग्न होत नाही ..त्यात विशेष ते काय ?..रात्री थट्टा मस्करी करतच झोपी गेलो .. मी जरी नकार दिला असला तरी बिचारीचे काहीतरी चांगले व्हावे असे मनापासून वाटत होते मला ...माणसाच्या मनाची गम्मतच वाटली ..त्या मुलीबद्दल मनात कणव दाटून आली तरीही मी तिला होकार मात्र दिला नाही हा स्वार्थीपणा होताच माझा ...दुसऱ्या दिवशी पुन्हा सायंकाळी एके ठिकाणी जायचे होते .

मुलगी पाहण्याच्या या दोन अनुभवानंतर माझा उत्साह मावळला होता ..आपल्याला बहुधा अशीच स्थळे सांगून येणार असा नकारात्मक विचार येत होता मनात ..किवा जर दिसायला चांगल्या मुली सांगून आल्या तरी ..माझा पूर्व इतिहास आड येणार ..म्हणजे एकूण आनंदच ...संध्याकाळी जी मुलगी पाहायला जाणार होतो ..तिचे वय २९ वर्षे होते ..एकुलती एक मुलगी .. नोकरी करणारी ..आम्ही त्यांच्या घरी पोचलो तेव्हा ..मुलगी बाहेर नोकरीवर गेलेली ..आता दहा मिनिटात येईलच असे तिच्या आईने सांगितले ..तो पर्यंत अवांतर गप्पा सुरु होत्या ..मुलीची आई सारखी माझ्या डोळ्यात रोखून पाहत होती असे मला जाणवले ...कारण काय असावे ते समजेना ..एकदाची मुलगी आली ..चपला काढून सरळ घरात गेली ..मी तिला पाठ्मोरीच पहिली ..बारीक चणीची होती ..एकंदरीत चालण्यावरून चटपटीत वाटली ..लवकरच ती ट्रे घेवून बाहे आली ..तेव्हा मी तिचा चेहरा पहिला .. गोरी होती ..मात्र ती नेमकी कुठे पाहतेय तेच कळेना ..मग लक्षात आले ..हिचा एक डोळा तिरळा आहे ..हे एक व्यंगच होते..तरीही चेहऱ्यावर कुठलेही भाव न दर्शवता मी तसाच बसून राहिलो .. आता मुलीची आई माझ्या डोळ्यात रोखून का पाहत होती ते उमगले .. माझ्या देखील डोळ्यात काही व्यंग आहे की काय ते तपासात असावी बहुधा ..मागील अनुभवावरून माझ्या व्यसनाच्या इतिहासाबद्दल इतक्या लौकर काही सांगायचे नाही हे आईने ठरवलेले होते ..आधी मुलीकडून पसंती आल्यावरच पुढील बोलणी करायची असे ठरले होते . इथेही नंतर कळवतो असे सांगून आम्ही बाहेर पडलो ..रस्त्यावर आल्यावर वहिनी तिचा एक डोळा तिरळा आहे असे म्हणालो ..तर वहिनी म्हणाली अहो तुम्हालाही तर टक्कल पडतेय की ..याचा अर्थ वहिनी सरळ सरळ हे सुचवीत होत्या की आता पसंतीचे जास्त नखरे न करता मी त्यातल्या त्यात चांगल्या मुलीला होकार द्यावा ..त्यांचेही बरोबरच होते म्हणा ..आयुष्यात सगळी व्यसने करून झाली होती माझी ..विशेष अशी नोकरी नाही ..वय ३६ वर्षे ..जास्त अटी ठेवायला नकोत .

( बाकी पुढील भागात )

========================================================================

पसंतीची कहाणी ! ( पर्व दुसरा -भाग ८२ वा ) 

मागील दोन अनुभवांवरून मी योग्य तो धडा घेवून जे समोर येतेय त्याला होकार देण्याच्या मनस्थितीत येत होतो .. तरीही मुलगी तिरळी आहे हे सत्य पचवणे तसे कठीणच होते ..मला मुख्य म्हणजे मित्र काय म्हणतील याचीच काळजी जास्त वाटली ...मित्र माझी मस्करी करणार हे तर नक्की होते ..त्यांना काय उत्तर द्यावे हे देखील मनात ठरवत होतो .. वाटले त्यांना सांगावे मुलगी बघायला गेलो तेव्हा चांगली होती ..पसंती कळवल्यानंतर मधल्या काळात लग्नापूर्वी तिचा छोटासा अपघात होऊन त्यात डोळा तिरळा झाला आहे ...मला स्वतःचेच मनातल्या मनात हसू आले ..माणूस प्रत्येक बाबतीत लोक काय म्हणतील याचाच जास्त विचार करतो ..लोकांनी नावे ठेवू नये म्हणून वेळप्रसंगी खोटे बोलतो ..लपवाछपवी करतो ..प्रत्येक वेळी ' लोक काय म्हणतील ' हा विचार अग्रभागी असतो ..हे लोक म्हणजे मुख्यतः समाजातले आपल्या जवळचे मित्र किवा नातलग असतात ...बहुधा ' नावे ठेवणे ' हे एकच काम जणू त्याना उत्तम जमते या हिशेबानेच आपण त्यांच्याकडे पाहतो .

शेवटी झोपताना मी निर्णय घेतला की उद्या आईला सांगून त्या मुलीला होकार कळवायचा ..दुसऱ्या दिवशी आईला तसे सांगितले .. आई म्हणाली ' आपण घाई करायला नको ..कालच दुपारी तुझ्या मामाने नांदेडहून एक स्थळ सुचवले आहे ..मुलीची माहिती आणि फोटो आलाय पोस्टाने ..एकदा शेवटचे म्हणून ते स्थळ देखील पाहून घेवू ' तू आज मुक्तांगानला परत जा व पुढच्या शनिवारी परस्पर सुटी घेवून नांदेडला मामाकडे ये ' त्या नुसार सर्व आईवर सोपवून मी मुक्तांगणला परतलो ...शुक्रवारी पुन्हा दोन दिवसांची सुटी घेवून नांदेडला गेलो ..तेथे आई आदल्या दिवशीच आली होती .. हे नांदेडचे माझे मोठे मामा तसे खूप कडक ..माझ्या बाबतीत त्यांना सर्व इतिहास माहितच होता .लहानपणी मला ते अनेकदा रागवत असत ..पुढे बोलून फायदा नाही या विचाराने त्यांनी रागावणे सोडले होते ..मात्र आईकडून टे व्यवस्थित माझी माहिती घेत होते ..जेव्हा मी चांगला राहतोय असे समजले तेव्हा त्यानाही माझ्या लग्नाच्या बाबतीत पुढाकार घ्यावासा वाटले म्हणून त्यांनी हे स्थळ सुचवले होते ..मामा सेवानिवृत्तीनंतर काहीतरी व्याप पाहिजे म्हणून हे लग्न जुळवून देण्याचे काम विनामुल्य करत असत.

दुसऱ्या दिवशी सकाळी मामाने मुलीच्या घरी आज दुपारी चार वाजता मुलगी पाहायला येतोय असा निरोप पाठवला ..तो निरोप मिळाल्यावर मुलीचा भाऊ आधीच मला पाहायला घरी आला ..खूप बोलका वाटला..त्याने माझी सर्व माहिती विचारली ..त्याचे समाधान झाल्यासारखे दिसले ..इथे माझ्या व्यसनाधीनते बाबत आधच काही सांगायचे नाही असे मामाने ठरवले होते ..आधी मुलीची पसंती आल्यावरच पुढचे बोलायचे असे सर्वांनी मला बजावले ..किवां माझ्या व्यसनाधीनते बाबत वडिलधाऱ्या लोकांना मामाच योग्य वेळी माहिती देईल असे ठरले ..या बाबतीत मी पुढाकार घेवू नये अथवा काही आगावूपणा करू नये अशी सर्वांची इच्छा दिसली ..मी जरा जास्त बोलका असल्याने ..तसेच स्वतःबाबत काही लपविण्याची माझी प्रवृत्त नसल्याने ..मी काही जास्त बोलून जाईन यांची त्यांना भीती वाटत होती ... मी तसे मान्य केले ..परंतु व्यसनाधीनते बाबत काही लपवायचे नाही हे पक्के ठरले ...दुपारी ४ वाजता मामा ..मामी ..आई ..मामाच्या सुना ..असे सगळे मुलीकडे गेलो ..मुलगी नाकीडोळी छानच होती ..वय ३४ वर्षे ..म्हणजे मुलीच्यात आणि माझ्यात जेमतेम २ वर्षांचे अंतर .. अंगाने जरा जास्त वाटली ..पण अगदीच बेढब नव्हती ..माझ्या मनात फक्त कुतूहल होते की मुलीचे इतके उशिरा लग्न होण्याचे कारण काय असावे ? मुलीच्या भावाला तसे विचारले तेव्हा तो म्हणाला खूप नखरे होते हिचे ..मुलगा काळा नको ..बुटका नको .. महाराष्ट्रातीलच हवा ..वगैरे कारणांनी मुलीने अनेक स्थळे नाकारली होती पूर्वी ..काही ठिकाणी देण्याघेण्यावरून बोलणी फिस्कटली ..नंतर वय वाढले तसे स्थळे सांगून येणे कमी झाले ..मग वडील आजारी होते म्हणून राहिले ..या उत्तराने माझे समाधान झाले ..मुलगी सर्वाना पसंत पडली ..मात्र मुलीच्यांकडून होकार बाकी होता .. मामाला मी सारखे विचारात होतो की मुलीकडे माझ्या व्यसनाधीनतेबद्दल सांगितले का ? तर तो म्हणाला मुलीच्या भावाला कल्पना दिली आहे ..तो यथावकाश मुलीला सांगेल ..मी निश्चिंत झालो .. रात्रीच मुलीच्या भावाचा पसंतीचा फोन आला .. तसे सगळे आनंदी झाले ..नंतर परत माझी सुटी ..आईचे पुन्हा नांदेडला येणे वगैरे गोष्टी लक्षात घेवून लगेच दुसऱ्याच दिवशी साखरपुडा करावा असे ठरले ..त्यापूर्वी एकदा मुलीने आणि मी सोबत फिरून यावे असा प्रस्ताव आला ..त्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी मी मुलीबरोबर बाहेर जाण्यास तयार झालो ..आई मला सारखे बजावत होती ..तुझ्याबद्दल जास्त बडबड करू नको .. मेंटल हॉस्पिटल वगैरे बोलशील तर मुलगी घाबरेल .. त्यापेक्षा तू जास्त बोलूच नको ..अगदी मोजकेच बोल वगैरे ..पुढे माझ्या मोजक्या बोलण्यामुळे भलतीच गम्मत झाली .

( बाकी पुढील भागात )
========================================================================


मतिमंद ??????  
( पर्व दुसरे -भाग ८३ वा )


दुसऱ्या दिवशी सकाळी मुलगी मामाकडे आल्यावर मी तिच्यासोबत बाहेर पडलो .. जाताना आईने तिचे नाशिकचे आरक्षण करण्यासाठी मला सांगितले ..मी आरक्षण करताना काही घाई गडबड करू नये म्हणून मुलीला आईने वेगळ्या सूचना दिल्या की तू पण मिळणारे तिकीट नीट बघून घे ..तारीख वगैरे तपासून पहा ..नाहीतर चुकीची तारीख पडेल ..आईच्या अशा सूचनांची मला सवय होती .. सकाळी १० वाजता आम्ही निघालो होतो ..नांदेडला सायकल रिक्षा असतात ..त्यात बसून आम्ही रेल्वे स्टेशनकडे निघालो ..वाटेत मी शांतच होतो ..सायकल रिक्षामध्ये बसून आसपासची दुकाने ..लोक ..वाहने यांचे निरीक्षण करणे छान वाटते ..स्टेशनला गेल्यावर मी आरक्षणाच्या खिडकी जवळ जाऊन फॉर्म भरला ..भरून झाल्यावर मुलीने माझ्या हातून तो फॉर्म मागून घेतला व तारीख वगैरे तपशील तपासले ..आरक्षणाचे तिकीट घेवून आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो ..इतके सगळे होईपर्यंत आमचा अजिबात संवाद नव्हता ..बाहेर आल्यावर तिला म्हणालो एखाद्या हॉटेल मध्ये जाऊन काहीतरी खाऊ आपण ..तिने नुसतीच मान हलवली ..त्यातल्या त्यात बऱ्या दिसणाऱ्या एका हॉटेल मध्ये जाऊन बसलो ..काय खाणार असे तिला विचारले तर टिपिकल मध्यमवर्गीय मुलीचे उत्तर आले ..मसाला डोसा ..अरे वा ..मला पण मसाला डोसा आवडतो ..असे म्हणत मी दोन मसाला डोसा मागवले ..खाताना तिची जरा काट्या चमच्याची अडचण जाणवली ..ते पाहून मी तिला म्हणालो असे काट्याने ख्यायला मजा येत नाही ..हातानेच खावू ..म्हणत मी हाताने खावू लागलो ..तेव्हा तिनेही हातानेच सुरवात केली खायला ..ते संपल्यावर कोल्ड ड्रिंक्स काय घेणार विचारले तर मँगोला असे उत्तर आले ..मलाही मँगोलाच आवडतो ..असे म्हणत मी दोन मँगोला मागवले ..ती तोंडात स्टूॉ घेवून मँगोला पीत असताना मी मात्र सरळ बाटली तोंडाला लावली तेव्हा तिने जरा आश्चर्याने माझ्याकडे पहिले असे वाटले ..तेथून मग आम्ही सरळ घरी आलो ..आई धस्तावल्या चेहऱ्याने मामाच्या घराच्या दारातच उभी होती ..याने स्वतः बद्दल काही भलती सलती बडबड केली तर नसावी ही भीती आईच्या चेहऱ्यावर ..सगळ्यांचा निरोप घेवून मुलगी परत तिच्या घरी गेली .

सायंकाळी मुलीकडचे स्नेही श्री .नाईक यांचेकडे साखरपुडा होणार होता ..आम्ही सगळे उत्साहात होतो .. दुपारी साधारणपणे तीन वाजता मुलीच्याकडून कोणीतरी स्त्री मला भेटायला आली ..ती म्हणे मुलीच्या आईची मैत्रीण होती ..साधारण मध्यमवयीन ..सदाशिवपेठी गोरी ..बोलण्यात हुशार ..अस्सल पुणेकर वाटली ..तिला माझी थोडी माहिती घ्यायची होती ..तिने मला पूर्ण नाव ..शिक्षण ..वय ..असे प्राथमिक प्रश्न आधी विचारले ...मग माझ्या आवडी निवडी ..मी तिला गायन ..काव्य ..अभिनय . ..वाचन असे सांगितले ..मग माझ्या मुक्तांगणच्या नोकरी बद्दल माहिती विचारली ..मी तिला समजेल अशा प्रकारे .व्यसनाधीनता हा आजार ..उपचार ..सुधारणा अशी माहिती पुरवली ..माझ्या बोलण्याने तिचे समाधान झालेले दिसले ..शेवटी ती म्हणाली ..अहो मी मुद्दाम तुम्हाला माहिती विचारायला आलेय ..कारण सकाळी तुम्ही जेव्हा मुली सोबत फिरायला गेला होतात तेव्हा म्हणे तिच्याशी काहीच बोलला नाहीत ..गप्पगप्पच होतात ..मुलीला भलतीच शंका आली ..घरी येवून आम्हाला म्हणाली ..मुलगा एकदम गप्प होता .. खूप लाजत होता ..नुसता हो ला हो करत होता ..मला तो मंदबुद्धी असल्याचा संशय आहे..म्हणून मी आले तुमची वेगळी मुलाखत घ्यायला ..तुम्ही तर चांगलेच बोलके आहात . 

म्हणजे माझ्या कमी बोलण्याचा ..गप्प राहण्याचा अर्थ मुलीने भलताच काढला होता तर ..म्हणून मी खरोखर मंदबुद्धी तर नाही हे तपासायला एक हुशार बाई पाठवली होती ..मला मनातून खुप हसू येत होते ..म्हणजे जास्त बोलू नकोस ..उगाच फालतू बडबड करू नकोस या आईच्या सूचना मी तंतोतंत वठवल्या होत्या तर .. ...अजूनही मी पत्नीची ' मंदबुद्धी ' विषयावरून फिरकी घेतो ..लग्नाच्या इतक्या वर्षांच्या अनुभवावरून आता ती म्हणते ..' अहो आता वाटते की मंदबुद्धी असतात तर अधिक चांगले झाले असते ..तुम्ही जास्त वेळ दिला असतात मला ' 

( बाकी पुढील भागात ).

========================================================================

दोनाचे चार ! 
( पर्व दुसरे -भाग ८४ वा )


मी मंदबुद्धी नाही याची खात्री करून घेवून समाधानाने त्या बाई निघून गेल्या ..मी विचारात पडलो होतो ..मुलगी मला मंदबुद्धी समजली याचे एक कारण माझे गप्प राहणे ..हो ला हो करणे हे होते हे समजले पण त्याचा दुसरा अर्थ असाही निघत होता की मामाने माझ्या पूर्वीच्या व्यसनी जीवनाबद्दल मुलीच्या भावाला सांगितलेली माहिती त्या भावाने बहुधा मुलीला सांगितलेली दिसत नव्हती ...म्हणजे तिला बिचारीला अजून माझी नेमकी माहिती मिळालेली नव्हती हे स्पष्ट होत होते ..अनेकदा मुलीकडचे लोक मुलीचे लवकर लग्न व्हावे म्हणून इतके अधीर झालेले असतात की ते लग्नाच्या आड येवू शकतील पुढे संसारात समस्या येवू शकतील ..अशा गोष्टींचा नीट विचारच करत नाहीत ..कसेही करून एकदाचे लग्न उरकले पाहिजे असाच त्यांचा आग्रह असतो ..लग्नानंतर सारे आपोआप सुरळीत होते हा गैरसमज देखील असेल त्यामागे ..किवा मुलीचे लग्न जमवताना येणाऱ्या अनंत अडचणींचा सामना करताना ते इतके हातघाईला येत असतील की लग्न या एकमेव उद्दिष्टांपुढे त्यांना बाकी गोष्टी नगण्य वाटत असतील ...कारण काहीही असो पण माझ्या व्यसनी पणाबद्दल मुलीला माहिती मिळालीच पाहिजे या विचारांचा मी होतो ...साखर पुडा जेमतेम एक तासावर आलेला ..मी आईला तसे म्हणताच आई म्हणाली ..आपण तिच्या भवाला सांगितले आहे ना ..मग आता बाकी काळजी करू नकोस ..हवे तर नंतर तिला तू विश्वासात घेवून सांग सगळे ...आता या भानगडी काढू नकोस आयत्या वेळी ...आईच्या म्हणण्या प्रमाणे मी शांत राहिलो . 

सायंकाळी साग्रसंगीत असा साखर पुडा झाला ..देण्याघेण्याच्या काही विशेष अडचणी नव्हत्याच ..फक्त मुलामुलीकडच्या नातलगांचा मानपान वगैरे गोष्टी होत्या ..त्या ठरल्या ..जवळचा मुहूर्त म्हणून ५ सप्टेंबर १९९८ ही तारीख ठरली...मुलीचे नाव विद्या तुप्पेकर ..वय ३४ वर्षे ..शिक्षण बी. ए. ...गृहकृत्यदक्ष वगैरे ...मुलगा बी.कॉम ..समाजिक कार्यकर्ता म्हणून मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात नोकरी ..मानधन रुपये ३००० ..होतकरू ..कुटुंबवत्सल आहे की नाही ते नक्की नाही . एकदाचे लवकरच माझे दोनाचे चार हात होणार हे पक्के झाले ...दुसऱ्या दिवशी पुण्याला परत येताना बसस्टँडवर मला सोडायला मुलीचा भावू आला होता ... मी मुलीच्या नावाने एक पत्र लिहून त्याच्याकडे दिले त्या पत्रात ..मी पूर्वी दारू , गांजा . ब्राऊन शुगर वगैरे प्रकारच्या व्यसनांच्या आहारी गेलो होतो ..मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेवून आता तेथेच कार्यकर्ता म्हणून काम करतोय हे लिहिले होते ..कदाचित तुला हे तुझ्या भावाने सांगितले नसावे असे मला वाटले म्हणून वेगळे पत्रात लिहितोय ....आपल्या दोघांना संसार करायचा आहे त्यामुळे तुला हे सर्व माहित असणे आवश्यक आहे ..जर तुला माझ्या पूर्व इतिहासाबद्दल काही आक्षेप असेल तर ..अजूनही तू मला नकार देवू शकतेस ..साखरपुडा झाला म्हणजे आता काही इलाज नाही असे समजू नये वगैरे लिहिले ..या पत्राचे उत्तर मला मुक्तांगणच्या पत्त्यावर लवकर पाठवावे असे शेवटी लिहून शेवट केला ..पत्र पाकिटात बंद करून मुलीकडे द्यायला तिच्या भावाला सांगितले .

पुण्याला पोचल्यावर दुसऱ्याच दिवशी मुक्ता मँडमना भेटून सगळा वृत्तांत कथन केला ..मुलीला तुझ्या व्यसनाबद्दल नक्की सांगितलेस का ? हा त्यांचा पहिला प्रश्न होता ..त्यांना सांगितले की मुलीच्या भावाला आधी सांगितलेय ..नंतर मी मुलीसाठी देखील एक पत्र त्याच्याजवळ दिलेय ..तर मँडम म्हणाल्या की जर त्या भावाने ते पत्र मुलीला दिला नाही तर गोंधळ होईल ..त्या मुळे तू पुन्हा एक वेगळे पत्र लिहून मुलीच्या नावाने त्यांच्या पत्त्यावर पाठव ..एका मुलीला अंधारात ठेवून तिच्या आयुष्याचे निर्णय घेतले जावू नयेत म्हणून मुक्ता मँडम खूप जागरूक आहेत हे जाणवले ...त्यांच्या सांगण्यानुसार मी पुन्हा तशाच आशयाचे एक पत्र लिहून त्यांना दाखवले आणि त्यांच्या समती नुसार ते पत्र लगेच मुलीच्या पत्त्यावर पोस्ट केले ..मग सुरु झाला इंतजार ..मुलीच्या पत्राचा ..माझा इतिहास समजल्यावर मुलगी नकार तर देणार नाही ही शंका सारखी मनात येवू लागली ..आम्हा व्यसनी व्यक्तींचा स्वभावच असतो जास्ती चिंता करण्याचा ..त्या काळात मी अत्यंत अस्वस्थ होतो ..वेगवेगळे नकारात्मक विचार मनात येत असत ..त्यांचा शेवट आपले लग्न जमणे शक्यच नाही इथवर होत असे ..अशा वेळी खूप उदास वाटे ..त्याच वेळी कसा कोण जाणे मी मनातल्या मनात गणपती अथर्वशीर्ष म्हणत असे ..त्यामुळे जरा मनाला धीर मिळे ..गणपती जरी माझ्या आयुष्यात मला हवे तसे मिळवून देणार नसला तरी ..जे होते आहे ते सहन करण्याची ..शांतपणे स्वीकारण्याची शक्ती नक्कीच देवू शकेल अशी माझी श्रद्धा होती ...इतक्या सगळ्या भानगडी करूनही मी पुन्हा उभा राहिलो होतो ..हे जरी इतरांना माझ्या इच्छाशक्तीचे फलित आहे असे वाटत असले तरी मला खात्री होती ..की कोणतीतरी शक्ती नक्कीच आहे या मागे ...जी मला वारंवार उभे राहण्याचे बळ देते ..तिला कोणी देव म्हणो ..कुणी अल्ला म्हणो.. वा कुणी येशू म्हणो ...निसर्ग म्हणो ..किवा अजून कोणते नाव देवो ..मात्र ती अदृश्य ..सर्वव्यापी ..सर्वसाक्षी शक्ती असलीच पाहिजे असे माझे दृढ मत बनले होते आजवरच्या अनुभवातून ..ती शक्ती प्रत्यक्ष जरी तुमच्या समोर येत नसेल ..तरी काही व्यक्ती ..विचार ..घटना ..या द्वारे तुमच्यापर्यंत पोचते ..आपला अहंकार बाजूला ठेवून तिची योग्य ओळख झाली तर ..ती शक्ती आपल्याला शहाणपणाचा मार्ग दाखवू शकते .

शेवटी सुमारे एका आठवड्याने मला फोन आलाय नांदेडहून असा निरोप फोनड्युटी वर असलेल्या कार्यकर्त्याने मला दिला ..मी धडधडत्या हृदयाने फोन कानाला लावला ..तिकडून हँलो ..मी विद्या बोलतेय असा आवाज आला .. हृदय अजूनच धस्तावले ..आता बहुधा हे लग्न होणे मला मान्य नाही असे ऐकायला मिळते की काय ? पण नाही ..ती पुढे म्हणाली ..तुमचे पत्र वाचले...बराच विचार केला ..सगळ्यात जास्ती आवडला तो तुमचा प्रामाणिकपण ...आता तुम्ही व्यसनातून बाहेर पडला आहात हे वाचून खूप बरे वाटले ..असेच चांगले रहा पुढेही ..जर तुम्हाला नकार देवून मी एखादा पूर्ण निर्व्यसनी व्यक्ती निवडली तर ती पुढे आयुष्यात व्यसनी होणारच नाही याची काय खात्री द्यावी ? त्या पेक्षा सगळे अनुभव घेवून तुम्ही त्यातून बाहेर पडलात ही समाधानाची बाब आहे ..माझी होकार पक्का आहे ....! मी फक्त हो ..हो ..हो ..असेच बोललो ..आणि फोन कट झाला !

( बाकी पुढील भागात )
========================================================================
शुभमंगल ...सावधान !  ( पर्व दुस्र्रे -भाग ८५ वा )

माझे लग्न ठरले म्हणून आई खूप आनंदात होती .. आता हा खऱ्या अर्थाने मार्गी लागणार याची तिला खात्री वाटली ...वहिनींना देखील आई सारखाच आनंद झालेला ..माझा मोठा भाऊ जरा माझ्या बाबतीत सावधच होता ..त्याला आनंद झाला असला तरी पुढे हा सगळे निभावून नेईल की नाही याची शंका होती ..लग्नात जास्त खर्च करण्याऐवजी नोंदणी विवाह करावा असे आमचे म्हणणे होते ..मात्र मुलीच्या कडून योग्य पद्धतीनेच लग्न झाले पाहिजे असा आग्रह होता ..मुलीकडचे लोक खूप धार्मिक होते ..एकदाचे कसेतरी लग्न जमतेय म्हंटल्यावर आम्हाला नोंदणी विवाहाचा जास्त आग्रह करता आला नाही ...लग्न झाल्यावर मला मुक्तांगण मध्ये निवासी कर्मचारी म्हणून राहता येणार नव्हते म्हणून पुण्यातच भाड्याने जागा घेवून तेथे मी संसार थाटणार होतो ..त्यासाठी मुक्तांगण च्या जवळपास जागेचा शोध घेणे सुरु झाले ..या साठी एजंट या प्राण्याची मदत घ्यावी लागली ...पूर्वी केवळ ओळख असलेल्या किवा परिचितांच्या परिचितांकडून अशी कामे होत असत .. कमिशन वगैरे प्रकार नव्हता ..एकमेका सहाय्य करू या उक्तीप्रमाणे लोक एकमेकांना मदत करत असत ..आता इथेही व्यवहार आला ..माझ्या मते आज असणारी महागाई ..जागेची समस्या ..व इतर अनेक समस्या हा एजंट आणि कमिशन नावाचा प्रकार बंद झाला तर नक्कीच कमी होऊ शकतील . ...शेवटी मला परवडेल अशी जागा येरवडा जेल जवळ असलेल्या नागपूर चाळीत जागा मिळाली ..रु .१० ००० अनामत रक्कम दोन महिन्याचे आगावू भाडे ..महिना एक हजार रुपये घरभाडे या प्रमाणे जागा मिळाली ..माझा मुक्तांगणचा पगार रुपये अठराशे आणि सामाजिक कृताज्ञता निधीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचेकडून मिळणारे रुपये बाराशे असे एकूण तीन हजार रुपये मला महिन्याकाठी मिळत असत ..आईने घरभाडे तिच्या कडून देण्याचे ठरवले ..त्यामुळे सर्वकाही जेमतेम होणार होते ...

एजंटला कमिशन म्हणून एका महिन्याचे भाडे दिले ...नांदेडहून येताना लग्नासाठी कापड खरेदी वगैरे केली होती..माझा मुक्तांगण मधील मित्र द्विजेन सोबत जावून कपडे शिवायला टाकले . दरम्यान सामाजिक कृदाज्ञता निधीप्राप्त कार्यकर्त्यांचे एक शिबीर झाले ..त्यात मी डॉ . दाभोळकर यांना माझ्या लग्नाची बातमी दिली ..त्यानाही खूप आनंद झाला ..म्हणाले ' तुझे उत्तम उदाहरण आहे की माणूस कितीही बिघडला असला तरीही तो सुधारला की लोक नक्कीच त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहतात ' ..लग्न नांदेड येथेच होणार असल्याने मुक्तांगणहून जास्त मित्र येवू शकणार नव्हते ..मुक्तांगणहून लग्नाला परेश कामदार आला होता ..विश्वदीप नाशिकलाच रहात असल्याने आमच्या सोबतच तो लग्नाला आला होता ..सर्व विधिवत होऊन ..५ सप्टेंबरला मी बोहल्यावर उभा राहिलो ..लग्नात मुलाचा बूट लपवणे ..मग त्याबद्दल मुलीच्या बहिणींनी नव-या मुलाकडून पार्टी मागणे वगैरे प्रकार मला पसंत नव्हते ..वाटे हे खूळ ' हम आपके है कौन ' या हिंदी सिनेमा पासून जास्त बोकाळले आहे ..म्हणून मी बूट घालणारच नव्हतो किवा ते पेटीत कुलूप लावून ठेवणार होतो ..मात्र मोठ्या भावाने मला मनाई केली ..म्हणाला ' अरे ..हौस असते मुलींची ..लपवू दे त्यांना बूट ..हवे तर त्यांनी मागितलेले पैसे मी देईन त्यांना ' ..भावाच्या अशा बोलण्यावरून मला समजले की त्यालाही माझ्या लग्नाचा खूप आनंद झालेला आहे ..फक्त तो व्यक्त करण्याची त्याची पद्धत वेगळी आहे ..तसेच मोठा भावू या नात्याने त्याची जवाबदारी जास्त आहे म्हणून तो अधिक सावध आहे .. मुलीचे नाव मी लग्नानंतर ' मानसी ' असे ठेवले ..त्या वर्षी त्याच दिवशी गणेश विसर्जन आणि शिक्षक दिन होता असे आठवते.

..पाठवणीच्या वेळी रडारड सुरु झाली ..मी खूप संवेदनशील असल्याने मुलीच्या आईचे ..चुलत बहिणीचे ..भावाचे रडणे पाहून माझ्याही डोळ्यात पाणी तरळले ..वाटले खरोखर आपण जरी याला रडारड म्हणत असलो तरी ..प्रत्यक्ष ज्या मुलीला आणि तिच्या नातलगांना या प्रसंगाला सामोरे जावे लागत असेल त्यांचे असे रडणे स्वाभाविक आहे . आईवडील ..नातलग ..ज्यांच्या अनेक वर्षे सहवास होता ..अशी सर्व जिवाभावाची माणसे सोडून मुलीला एका नव्या घरी राहायला जावे लागते ..तेथील माणसांचे स्वभाव ..आवडी निवडी ..रूढी ..परंपरा यांच्याशी सतत जुळवून घ्यावे लागते ..पत्नी म्हणून ..सून म्हणून आपले समर्पण सिद्ध करावे लागते ..सर्वाना आपलेसे करावे लागते ..तसेच ज्या पालकांनी मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले ..त्यांना देखील तिला असे परक्या घरी ..पाठवताना त्रास होणारच ! लग्नानंतर आम्ही फिरायला म्हणून नाशिक जवळच असलेल्या ' वणी ' गावी ' सप्तशृंगी ' देवीच्या दर्शनाला गेलो ..तेथेच दोन दिवस राहिलो ...मानसी तशी अबोल स्वभावाची मात्र खूप समजूतदार आहे हे मला जाणवले .. आता कोणतेही बंधन नसल्याने मी भरपूर बडबड केली ..आपली बडबड आपल्याला नावे न ठेवता ..आपले परीक्षण न करता कोणी ऐकत आहे हे खूप छान असते ..त्याच भरात मी मानसीला अनघाबद्दल देखील सर्व कहाणी सांगितली ..मानसीला ते ऐकून वाईट वाटले ..म्हणाली ' कसे हो तुम्ही ..इतकी चांगली मुलगी होती अनघा ..का वारंवार व्यसने केलीत ' माझ्यापाशी याचे उत्तर नव्हते . 

( बाकी पुढील भागात )

शनिवार, 9 नवंबर 2013

जीवन शिक्षण - मोकळ्या आकाशी !

'जिज्ञासा' - कुमारवयीन जीवन शिक्षण प्रकल्प ! ( पर्व दुसरे -भाग ७६)



आफ्टर केअर मधील हे प्रकरण वार्ड मध्ये देखील समजले ..तेथेही चर्चा सुरु झाली ..प्रत्येक जण अगदी गुप्तहेर असल्यासारखा अंदाज बांधत होता ..प्रत्येकाला कोणाचा ना कोणाचा तरी संशय वाटे ..बाहेरून कामाला येणारे कार्यकर्ते ..निवासी कार्यकर्ते ..आफ्टर केअर मधील उपचारी मित्र ..सगळेच संशयाच्या भोवऱ्यात.. बाबांनी प्रकरण उगाच वाढून अजून काही भानगडी होऊ नयेत म्हणून ज्यांचे शर्ट फाटले होते त्यांना नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शवली ..त्यांच्या मते कोणावर उगाच संशय घेवून बदनाम करणे योग्य नव्हते .. तसेच मुक्तांगण मधील बिघडलेले वातावरण लवकर पूर्वपदावर यावे हा देखील बाबांचा हेतू होता ..त्याच काळात डॉ .आनंद नाडकर्णी तेथे आलेले होते ..त्यांनी आफ्टर केअर मधील सर्व लोकांना ..प्रत्येकाला जे नाव संशयित वाटते ते एका चिठ्ठी वर लिहून देण्यास सांगितले ..सर्व चिट्ठया गोळा करून मग जी पाच सहा नावे समोर आली ..त्यांना नाडकर्णी सरांनी एकेकाला व्यक्तिगत भेटून ..त्याच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न केला .. मलाही नाडकर्णी सरांनी चौकशीस बोलावले होते .. मी त्यांना माझी ज्या व्यक्तीवर खुन्नस आहे त्याच्याशी सरळसरळ मारामारी करीन ..भांडण करीन ..मात्र असला प्रकार करणार नाही हे सांगितले ..नंतर कोण जाणे काय झाले ..बाबांनी आणि नाडकर्णी सरांनी आता या विषयावर पडदा असे जाहीर केले ..तो विषय मागे पडला ..पुढेही नंतर एक दोन वेळा असे प्रकार घडले ..त्यावेळी मला नक्की अंदाज बांधता आला नाही कोण व्यक्ती असेल तो ..मात्र आता खूप वर्षांनी अनेक प्रकारचे हिशोब मनात केल्यावर एक नाव माझ्या डोळ्यासमोर आहे ..ज्याने हा प्रकार केला असावा ..कारण ती व्यक्ती हे प्रकार जेव्हा जेव्हा मुक्तांगण मध्ये घडले त्यावेळी तिथे उपस्थित होती ..आता इथेही ते नाव मी सांगत नाहीय ..मात्र एक नक्की ..त्या व्यक्तीला त्याच्या कर्माचे फळ मिळालेले आहे ..त्याचा व्यसनाधीनता हा आजार ..वाढते वय ..त्या अनुषंगाने होणारे इतर आजार ..या सर्व बाबींपुढे तो चारीमुंड्या पराभूत झालेला आहे ...या आणि अशा अनेक गोष्टींवरून प्रत्येकाला त्याच्या कर्माचे योग्य फळ मिळते या वर माझा आता ठाम विश्वास बसला आहे .



त्याच काळात नाडकर्णी सरांनी आम्हा कार्यकर्त्यांच्या मिटिंग मध्ये आपल्याला मुक्तांगण च्या सहभागाने ' जिज्ञासा ' नावाचा कुमारवयीन जीवन शिक्षण प्रकल्प ..पुण्यातील जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये राबवायचा आहे हे सांगितले .. ' जिज्ञासा ' हे नक्की प्रकरण आहे हे कोणालाच माहित नव्हते ..मग नाडकर्णी सरांनी माहिती दिली की नाडकर्णी सरांच्या इन्स्टिट्यूट फॉर सायकाँलाँजीकल हेल्थ , टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडिज ..व मुंबईच्या आणखी दोन सामाजिक संस्थातर्फे ..कुमारवयीन मुला मुलांसाठी मुंबईत काही सरकारी शाळांमध्ये ..हा प्रकल्प राबवला होता .. त्याचे प्रमुख उद्दिष्ट हे कुमारवयीन मुलामुलींना योग्य जीवन शिक्षण देणे हा होता ..तोच प्रकल्प आता पुण्यात राबवला जाणार होता ...कुमारवय हे अत्यंत संवेदशील असते .. याच काळात व्यक्तीच्या जीवनाचा पाया रचला जातो .. जर या वयात त्यांना जीवनविषयक ..आसपासच्या वातावरण विषयक ...आरोग्यविषयक ...सामाजिक समस्यांबाबत ..योग्य असा दृष्टीकोन दिला गेला तर नक्कीच देशाची पुढील पिढी अधिक जवाबदार बनू शकते ..तसेच अनेक मुले पुढे बिघडण्याचे प्रमाण देखील कमी होईल ...हल्लीच्या स्पर्धेच्या युगामुळे ..विभक्त कुटुंब पद्धतीमुळे .. इतर अनेक कारणांनी पालक मुलांना जास्त वेळ देवू शकत नाहीत किवा मनात असूनही मुलांवर योग्य असे संस्कार करण्यात कमी पडतात ..सकस आणि विवेकपूर्ण मानसिकता मुलांमध्ये वाढीस लागावी म्हणून हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरेल असा नाडकर्णी सरांना विश्वास वाटत होता ..



' जिज्ञासा ' या प्रकल्पामध्ये शाळेत शिकणाऱ्या कुमारवयीन मुलांना एकूण सहा विषयांचे प्रशिक्षण किवा माहिती दिली जाणार होती विषय पुढील प्रमाणे .



१) कुमारवय -या विषयांतर्गत मुलांना कुमारवय म्हणजे नक्की काय ? या वयात होणारे मानसिक बदल ..विविध आकर्षणे ..त्यातील धोके ..पालकांचे जीवनातील महत्व ..आनंदी कौटुंबिक वातावरण ..वगैरे प्रकारच्या गोष्टी होत्या . 


२) मूल्यशिक्षण - यात आदर्श जीवन व्यतीत करण्यासाठी आवश्यक असणारी जीवनमूल्ये ..समानता ..न्याय ..सहिष्णुता ..सर्वधर्मसमभाव..कायद्याचे पालन ..घटनेचा आदर .देशप्रेम ..अशी माहिती देण्यात येणार होती ..तसेच ही जीवनमूल्ये व्यक्तिगत जिवनात राबवण्यासाठी मुलांना प्रेरित केले जाणार होते .

( बाकी पुढील भागात )

=================================================

' लैंगिक शिक्षण ' ( पर्व दुसरे -भाग ७७ वा )

३) ताण तणावांशी सामना - ( स्ट्रेस मँनेजमेंट ) या विषयात ..मानवी विचार ..भावना ..त्याचे वर्तन , मानवी जिवनात उद्भवणारे निरनिराळे ताण तणाव .. त्यामुळे येणारी भावनिक अवस्थता .. त्याचे दुष्परिणाम ..अशा वेळी नेमकी समस्या ओळखून त्यावर कशी मात करता येईल . वगैरे गोष्टी होत्या .

४) व्यवसाय मार्गदर्शन - यात दहावी बारावी नंतर करता येणारे विविध कोर्सेस .. अभ्यासात कच्च्या असणार्या मुलांसाठी शिक्षणाचे इतर पर्याय ...निरनिराळ्या व्यवसायांसाठी मिळणारी शासकीय मदत .. रोजगाराच्या संधी ..या बद्दल सविस्तर माहिती असे .

५) लैंगिक शिक्षण - स्त्री -पुरुषांची शरीर वैशिष्ट्ये ..स्त्री चा आदर ..तारुण्यात प्रवेश करताना होणारे मानसिक व शारीरिक बदल .. प्रेम आणि शारीरिक आकर्षण यातील फरक ..गर्भधारणा ..शारीरिक संबंध ठेवण्या मागील जवाबदारी ..विविध लैंगिक आजार ..एड्स ..या सर्व बाबतीत माहिती दिली जाई .. 

६) व्यसनाधीनता - विविध प्रकारच्या घातक व्यसनांचे दुष्परिणाम ...व्यसन व छंद किवा सवय यातील नेमका फरक .. व्यसनाधीनते वरील उपचार .. व्यसनमुक्तीसाठी शास्त्रीय प्रयत्न .. वगैरे सांगितले गेले .

' जिज्ञासा ' हा प्रकल्प मुंबईत यशस्वी पणे राबवला गेला होता ..त्या नंतर किमान सर्व मोठ्या शहरात तरी हा प्रकल्प राबवून जास्तीत जास्त मुलामुलींपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जाणार होता ...या प्रकल्पात संवादक म्हणून काम करण्यासाठी सामाजिक कार्याची आवड ..तळमळ ..असलेल्या कार्यकर्त्यांची आवश्यकता लागणार होती ..म्हणून नाडकर्णी सरांनी.. स्त्री मुक्ती संघटना ..व प्रकल्पात सहभागी संस्थांनी पुण्यात प्रकल्पाची योग्य अशी जाहिरात करून ..प्रकल्पात काम करू इच्छिणाऱ्या स्त्री -पुरुषांसाठी एक तीन दिवसांचे प्रशिक्षण शिबीर मुक्तांगण मध्ये आयोजित केले .. मुक्तांगण मधील उत्साही ..बोलके ..कार्यकर्ते म्हणून प्रकल्पात काम करण्यासाठी मी ..बंधू ..परेश आणि इतर आणखी दोघांची निवड केली गेली .

हे प्रशिक्षण शिबीर खूपच छान झाले .. पुणे शहरातून ..महाविद्यालयीन विद्यार्थी -विद्यार्थिनी ..गृहिणी ..सामाजिक कार्यात सहभागी होऊ इच्छिणारे कायर्कर्ते ..असे सुमारे १०० जण उपस्थित होते ..आम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी डॉ .आनंद नाडकर्णी व मुंबईत हे काम केलेले तज्ञ .. स्त्री मुक्ती संघटनेच्या पदाधिकारी ..प्रत्येक विषयातील अभ्यासू व तज्ञ मंडळी उपस्थित होती ...सकाळी ९ ते सायंकाळी पाच अशी प्रशिक्षण शिबिराची वेळ ठरली होती .. पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात ..एकमेकांशी ओळख ..विषया बद्दल थोडक्यात माहिती ..आमचे दृष्टीकोन ..वगैरे चर्चा होऊन वातावरण अत्यंत खेळीमेळीचे झाले ..नंतरच्या सत्रा पासून प्रत्येक विषयाची सविस्तर माहिती देण्यास सुरवात झाली .. सर्वात जास्त गम्मत आली ती लैंगिक शिक्षण या विषयाची माहिती घेताना आणि त्यावर चर्चा करताना .. या विषयाच्या सुरवातीला सगळेच एकदम गंभीर चेहरे करून बसले होते ..अजूनही आपल्या समाजात लैगिकता या विषयावर उघड चर्चा करणे व बोलणे टाळले जाते हे सर्वांनी अनुभवले .. नाडकर्णी सरांनी अतिशय कौशल्याने आम्हाला बोलते केले .. अत्यंत नाजूक व संवेदनशील विषय असल्याने ..नीट ..सखोल समजून घेणे आवश्यक होते ..शाळेत मुलामुलींसमोर हा विषय मांडताना नेमकी शास्त्रीय माहिती कशी देता येईल ..मुलांच्या मनातील शंकांचे समाधान ..आणि त्यासाठी सर्व प्रथम विषयाबाबत चर्चा करण्यास संवादाकाच्या मनातील संकोच ..या बाबींवर नाडकर्णी सरांनी उत्तम माहिती दिली ..प्रशिक्षणार्थींचा संकोच दूर करण्यासाठी सरांनी आम्हाला स्त्री व पुरुष इंद्रियांना ..शरीर संबंधाला ..नेहमीच्या बोलीभाषेत कोणते कोणते शब्द वापरेले जातात हे विचारले ..सर्वांनी अगदी छापील स्वरूपातील उत्तरे दिली ..म्हणजे ..लिंग ..योनी ..संभोग ..ही उत्तरे जरी बरोबर असली तरी प्रत्यक्ष बोलीभाषेत नेमके काय म्हणतात ते कोणीही उघड सांगण्यास तयार होईनात .. आपण संवादक म्हणून महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळात जाणार आहोत ..तेथे शिकणारे विद्यार्थी बहुधा गरीब ..निन्म मध्यमवर्गीय ..झोपडपट्टीतून राहणारे येतील ..त्यांच्या बोलीभाषेत या सर्व गोष्टीना वेगवेगळे शब्द आहेत ..ते नेमके शब्द आपण माहिती करून घेतले पाहिजेत ..तरच मोकळेपणी संवाद साधता येईल ..असे सांगून सरांनी एक आभ्यास म्हणून आम्हाला सर्वाना एका कागदावर या सर्व बाबतीत माहित असलेले पर्यायी शब्द लिहिण्यास सांगितले ..सर्व कागद गोळा केले गेले ..मग सरांनी फळ्यावर एकेक शब्द लिहिण्यास सुरवात केली तेव्हा गम्मत झाली ..अगदी झोपडपट्टीत वापरले जाणारे शब्द देखील त्यात लिहिले होते सर्वांनी ..म्हणजे आता संकोच दूर होत होता ..

( बाकी पुढील भागात )

=====================================================

मोकळ्या आकाशी ! ( पर्व दुसरे -भाग ७८ वा ) 


जिज्ञासाचे प्रशिक्षण झाल्यावर लगेच प्रत्यक्ष शाळांमध्ये जावून विद्यार्थ्यांना या जीवन शिक्षणाचे धडे देण्यास सुरवात झाली ..प्रशिक्षण शिबिराला जरी १०० जण उपस्थित असले तरी प्रत्यक्षात काम करताना मात्र त्यातील अनेक जण गळाले ..शेवटी सुमारे ५० जण हे काम नेटाने करण्यास तयार राहिले ..मग या पन्नास जणांचे विभागवार तीन समूह बनवले गेले ..प्रत्येक समूहाचा एक कोऑर्डीनेटर नेमला गेला ..त्या नुसार उत्साही असल्याने आमच्या विभागाचा कोओर्डीनेटर म्हणून माझी नेमणूक झाली .. आमच्या समूहात महाविद्यालयात शिकणाऱ्या आठ विद्यार्थिनी ...चार विद्यार्थी ...तीन गृहिणी होत्या .. त्या वर्षीसाठी येरवडा व जवळपास असलेल्या १० शाळा निवडल्या गेल्या ज्यातून आम्हाला संवादाकाचे काम करायचे होते .. प्रत्यक्ष कामही सुरु झाले ...हे काम अतिशय कौशल्याने करावे लागत असे ...शाळेतील विद्यार्थी वर्ग तसा चंचलच असतो .. शिवाय आमचा तास सुरु असताना बहुधा कोणी शिक्षक उपस्थित नसावा अशी आमची अपेक्षा असे ..कारण शिक्षक वर्गात असला तर त्याचा एक धाक असतो ..त्यामुळे विद्यार्थी मोकळेपणी बोलणार नाहीत असे शक्यता होती .. सुमारे ६० ते सत्तर मुला मुलींसमोर त्यांना गोंधळ करू न देता ....न रागावता ...आम्ही बोलत असलेल्या विषयात रस निर्माण व्हावा या पद्धतीने ...साधारण एका विषयासाठी दीड तास खिळवून ठेवणे सोपे काम नव्हते .. 


मात्र आम्हाला हळू हळू ते जमू लागले ..लैंगिक शिक्षण या विषयासाठी मात्र मुले मुली एकत्र बसवू नयेत असे ठरले होते ..कारण उगाच मुले चेकाळतात ..तर मुलीना माना खाली घालून बसावे लागते असा पूर्वीच्या संवादाकांचा अनुभव होता .. त्या नुसार लैंगिक शिक्षण या विषयावर संवाद साधताना पुरुष संवादक मुलांशी तर स्त्री संवादक मुलींशी वेगवेगळ्या ठिकाणी संवाद साधत असत ..जसे जसे आम्ही मुलांशी बोलत गेलो तसे तसे त्यांचे भावविश्व आमच्या समोर उलगडत गेले ..देशाची भावी पिढी असलेले हे विद्यार्थी खरोखर अतिशय मनस्वी असतात ..त्यांना योग्य पद्धतीने हाताळले गेले तर त्यातील प्रत्येक जण एक आदर्श नागरिक बनू शकतो ..असे वाटू लागले ..मला या कामात खूप आनंद वाटू लागला ..एका दिवशी दोन विषय आम्ही घेत असू ..म्हणजे तीन तास बोलावे लागे ..या काळातील आमचा प्रवास खर्च ..चहा पाणी वगैरे ..या खर्च साठी प्रत्येक संवादकला एका विषयाचे १५० रुपये मानधन मिळणार होते ..या प्रकल्पाचा आर्थिक भाग आयोजक संस्था तसेच टाटा इन्स्टिट्यूट तर्फे सांभाळला जाणार होता .

दरम्यान मी मुक्तांगण मधील माझे नेमून दिलेले काम करतच होतो ..शिवाय व्यायाम ..योगासने हे नियमित सुरु होते ..त्यामुळे तब्येत चांगलीच डोळ्यात भरण्यासारखी झाली होती ..दिवस कसा निघून जाई ते समजत नसे ..त्या वर्षी २६ जून या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनाची थीम ' संगीतातून व्यसनमुक्ती ' अशी होती ..बाबांनी त्यासाठी ..व्यसनांचे दुष्परिणाम ..व्यसनमुक्तीचा प्रवास ...या वर आधारित पाच सहा गाणी लिहिली होती ..पोवाडा ..फटका ..असे प्रकार असलेली ती गाणी आम्हाला २६ जून रोजी ....' टिळक स्मारक ' मध्ये सदर करायची होती ..त्या गाण्यांना संगीत देण्यासाठी बाबांचे स्नेही ...पुण्याचेच संगीतकार राहुल रानडे हे तयार झाले ...मी ..यशोदा ( बाबांची धाकटी मुलगी ) बंधू ..इतर दोन गायक असा सहा जणांचा समूह तयार झाला ..तो कार्यक्रम देखील यशस्वीपणे पार पडला .. या सर्व गाण्यांचे रेकॉर्डिंग करून त्याची एक ' मोकळ्या आकाशी ' नावाची कँसेट तयार करण्याचे ठरले ..मुक्तांगण मधून डिस्चार्ज घेतल्यानंतर उपचार घेवून बाहेर पडणा-या मित्राला ती गाणी नक्कीच सतत व्यसनमुक्ती प्रेरणा कायम ठेवण्यास मदत करतील हा या मागे हेतू होता ..त्या नुसार मग पुण्यातच एका स्टुडीओ मध्ये आमच्या गाण्याचे ध्वनिमुद्रण झाले .. यात मी एक पोवाडा आणि यशोदा बरोबर एक गीत म्हंटले .. कानाला हेडफोन वैगैरे लावून आपल्या आवाजात गाण्याचे ध्वनिमुद्रण करण्याचा हा अनुभव अविस्मरणीय होता ..पाहता पाहता माझे व्यसंनमुक्तीचे एक वर्ष पुन्हा उलटले .. दरम्यान दोन वेळा घरी नाशिकला जावून सुरक्षित परत आलो होतो ..त्यामुळे आई व भावू देखील आनंदात होते ..आता माझी वयाची पस्तिशी उलटून गेलेली ....याने लग्न करून पुढील जवाबदार्या घेतल्या पाहिजेत असे आईला वाटणे स्वाभाविक होते ..अनघा पुन्हा माझ्या आयुष्यात येणे केवळ अशक्य होते ..त्यामुळे तिला विसरून मी नव्याने उभे राहावे असे मलाही वाटू लागले ..!


( बाकी पुढील भागात )
=====================================================


मुलगी पहाणे..वगैरे !  ( पर्व दुसरे - भाग ७९ वा )


पूर्वी अनघा शिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलीचा पत्नी म्हणून मी विचार करू शकत नव्हतो ..मात्र आता अनघा पासून दूर होऊन आता बराच काळ लोटला होता ..ती पुन्हा आयुष्यात येणार नाही हे कटू मन स्वीकार करू शकत होते ....माझे बरोबरीचे मित्र केव्हाच संसाराला लागलेले ..त्यांच्या जिवनात विशिष्ट स्थिरता आलेली ..अशा वेळी आपणही लग्न करावे असे माझ्याही मनात येवू लागले .. पण त्या बरोबरच मनात अनेक शंका येत असत ..व्यसनाधीनते मुळे मी एकही नोकरी फार काळ टिकवून ठेवू शकलो नव्हतो ... बँकेत जेमतेम पैसे साठवलेले ..शिवाय मुक्तांगण मधील समाजसेवकाच्या नोकरीत मिळणारे तुटपुंजे मानधन ..माझा व्यसनांचा पूर्व इतिहास ..वगैरे गोष्टी माझी बाजू कमकुवत करणाऱ्या होत्या ..बाकी रंग रुपात विशेष समस्या नव्हती..पण डोक्यावरच्या केसांनी फारकत घ्यायला सुरवात केलेली ...आईच्या लग्नाच्या प्रस्तावाला मी दुजोरा दिला... भाऊ मात्र याच्या विरुद्ध होता ..त्याला जरी माझेही लग्न व्हावे असे वाटत असले ..तरी तो व्यवहारी असल्याने ..लग्नानंतर जर याचे व्यसन पुन्हा सुरु झाले तर ..मोठी समस्या उद्भवणार होती हे जाणून होता ..उगाच एका मुलीचे आयुष्य उध्वस्त होईल याची त्याला जाणीव होती ..म्हणून तो या बाबतीत फारसा पुढाकार घेण्यास तयार नव्हता ..माझ्या वाहिनीला मात्र आई सारखाच उत्साह होता ...व्यसनाधिन झाल्यावर माझा त्रास मुख्यतः पैश्यांचा होत असे सर्वाना ..वागण्याच्या बाबतीत फारसा उपद्रवी नव्हतो मी घरी .. व्यसन बंद असताना तर माझे वागणे अधिकच चांगले वाटे सर्वाना ..तेव्हा याचेही दोनाचे चार हात व्हावे अशी वहिनींची इच्छा असणे स्वाभाविक होते ...माझे वय ..आर्थिक परिस्थिती ..इतर जमेच्या बाजू लक्षात घेवून तसे स्थळ पाहावे लागणार होते ..आमची सर्वांची मुख्य अट अशी होती की ...मुलाला आणि तिच्या घरातील मंडळीना विश्वासात घेवून ..माझा पूर्व इतिहास सांगण्याची ..कारण माझ्या व्यसनाधीनतेबद्दल मुलीच्याकडे न सांगता लग्न लावून देणे म्हणजे विश्वासघात ठरला असता ..तसे करावे असे आम्हाला कोणालाही वाटत नव्हते .. एकंदरीत विचार करता मला लग्न होणे कठीणच वाटू लागले ..मुलाचा पूर्व इतिहास माहित असताना ..चांगल्या पगाराची नोकरी नाही ..स्वतचे घर नाही .. पुढे पेन्शन ..फंड वगैरे प्रकार नाही ..अश्या परिस्थितीत एखादी मुलगी मिळणे दुरापास्तच होते ..तरीही प्रयत्न म्हणून आईने ..जवळचे नातलग ..स्नेही ..यांना ' मला यंदा कर्तव्य आहे ' अशी जाहिरात करून ठेवली ... विवाह जुळवून देणाऱ्या संस्थांकडे देखील नोंदणी करून झाली ..त्यात माझी आर्थिक स्थितीचा स्पष्ट उल्लेख होता .



मुक्ता मँडमना या बदल सांगितल्यावर त्यांनीही ..मुलीच्या घरच्यांना तुझ्या पूर्व इतिहासाची कल्पना देवूनच लग्न कर अशी अट घालून ..लग्नाच्या बेतला संमती दर्शवली ...मुलगी जर नोकरी करणारी असेल तर अधिक बरे असेही सुचवले ..म्हणजे आर्थिक भाग नीट सांभाळला गेला असता .. आश्चर्य म्हणजे एका महिन्यातच आईचा फोन आला की एक दोन स्थळे सांगून आली आहेत ..तेव्हा तू दोन तीन दिवस सुटी घेवून नाशिकला ये ..मुली पहा ..पसंती कळव ..बाकी सर्व आम्ही ठरवू .. त्या वेळी मोबाईल फोन नव्हताच माझ्याकडे ..त्यामुळे मुक्तांगणच्या फोन वर आईचा फोन येत असे ..त्यामुळे लगेच सर्व आफ्टर केअर मध्ये बातमी पसरली ...माझी मस्करी करणे सुरु केले मित्रांनी ..मुलगी पाहायला आम्हालाही ने म्हणून काही जण चिडवू लागले ..तर काही जण तुला एखादी व्यंग असणारी मुलगीच मिळणार अशी भविष्यवाणी करू लागले .. काही जणांनी मुलीला आधी तुझ्या व्यसनाबद्दल कल्पना देवू नकोस ..असा शहाणपणाचा सल्लाही दिला ..



तीन दिवस सुटी घेवून मी नाशिकला गेलो ..तर तीन स्थळे सांगून आलेली ..आईने तीनही मुलीना पहायची वेळ ठरवून टाकली होती ..तिन्ही मुली नाशिक मधीलच होत्या .. मुलगी पहाणे हा प्रकार जरी कुतूहल पूर्ण असला ..त्याला विशेष महत्व असले तरी ..माझ्या मनाला ते जरा विचित्रच वाटत होते .. सर्व वडिलधा-या मंडळींसमोर मुलीने यायचे ..मर्यादा सांभाळून वागायचे ..पोहे आणायचे ..नम्रपणे समोर बसायचे ..त्यावेळी सर्व तिचे नीट निरीक्षण करणार ..तिला प्रश्न विचारणार .. मुलीचे कुटुंबीय मुलीचे कौतुक करणार .. इतके करूनही शेवटी ..नंतर कळवतो ..असे म्हणून ..मुलाकडील मंडळी निघून जाणार ..तो पर्यंत मुलीचा जीव टांगणीला ...नकार आला तर ..पुन्हा नवीन मुलगा ..तेच नाटक ..नकार म्हणजे त्या मुलीच्या मनावर आघात ..आपल्यात काहीतरी कमी आहे ही जाणीव .. आपल्या लग्नासाठी आईबाबांना त्रास होतोय ही खंत .. मला तर मुलीनेच नकार देण्याची भीती वाटत होती ....कारण उज्वल असे स्थळ नव्हतेच माझे .. मला नकार मिळाला तर मला कसे वाटेल ही कल्पना करूनच ..मला खूप वाईट वाटे ..असा नकार पचवणे मला जमेल का ? असेही विचार मनात येत .. नकार म्हणजे एका व्यक्तिमत्वाचा चक्क अपमान असतो असे वाटू लागले .. पहिली मुलगी पाहायला गेलो तेव्हा मी जरा नर्व्हसच होतो .



( बाकी पुढील भागात )



======================================================

पहिला नकार !  ( पर्व दुसरे -भाग ८० वा )



आई , वहिनी , भावाची लहान मुलगी रसिका , हे सगळे मुलगी पाहायला जाताना अतिशय उत्साहात होते .. नाशिकला सुंदर नारायण मंदिरा जवळ मुलगी रहात होती ..पदवीधर ..वय ३२ वर्षे ..खाजगी नोकरी ..अशी इतर माहिती ...सुंदर नारायण मंदिराच्या मागे माझा एक गर्दुल्ला मित्र रहात होता ..पूर्वी त्याने गर्द्विक्रीचा व्यवसाय देखील केलेला...त्यामुळे माझे तेथे बऱ्याचदा जाणे झाले होते ..तेथे जाताना मला उगाच कोणी गर्दुल्ला मित्र तर भेटणार नाही ना याची भीती वाटत होती ..शिवाय माझे तेथे जाणे कधी त्या मुलीने पहिले तर नसेल अशीही शंका मनात डोकावून गेली ...एकदाचे मुलीच्या घरी पोचलो ..साधे चाळवजा घर ..आसपास राहणाऱ्या महिलांना बहुतेक अशा बातम्या लगेच कळतात ..त्यामुळे आम्ही मुलीच्या घरात शिरताना ..आसपासच्या बायकांचे आमच्याकडे कुतूहलाने आणि निरीक्षणाच्या नजरेने पहाणे आधीच झाले होते ...घरात छान स्वागत झाले आमचे ..मुलीची आई आणि मोठा भाऊ अगत्याने मुलीची ...कुटुंबाची माहिती सांगत होते .. मी काय करतो ते मुलीच्या भावाने विचारले ..मी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात कार्यकर्ता म्हणून काम करतो असे सांगितल्यावर तो जरा विचारात पडलेला दिसला ..मग मी त्याला उत्साहाने मुक्तांगण बद्दल थोडीफार माहिती सांगितली ..माझे बोलणे झाल्यावर तो म्हणाला . ' ऐकून आहे मी मुक्तांगण बद्दल ..आमच्या गल्लीतील एकदोन लोक तेथे जाऊन आलेले आहेत ...अहो पण त्यांचे व्यसन परत सुरु झालेय ' ..व्यसनाधीनता हा अतिशय गंभीर आजार आहे ..काही लोकांना एकदा उपचार देवून भागात नाही ..वारंवार उपचार द्यावे लागतात वगैरे माहिती मी पुरवली . 

तितक्यात परंपरेनुसार ट्रे मध्ये पोह्यांच्या प्लेट्स घेवून मुलगी आली ...डोळ्यावर चष्मा होता ..उजळ ..मध्यम उंची .. नाकीडोळी ठीक ...मी एका नजरेत झाडी करून घेतली ..तिच्या हातून भावाने ट्रे घेवून आम्हाला पोहे दिले ..मुलगी संकोचाने बाजूला उभी राहिली ...आई व वहिनीने तिला शिक्षण ..आवड ..असे निरुपद्रवी प्रश्न विचारले ..मला म्हणाले तुला काही विचारायचे आहे का ? ..मी नकारार्थी मान हलवली ..मी काही विचारात नाहीय असे पाहून मुलीचा भाऊ जरा रीलॅक्स झाल्यासारखा वाटला ..अश्या वेळी नेमके काय विचारावे हे मला सुचतच नव्हते ..कारण बहुतेक माहिती आधीच मिळाली होती ..बाकीचे लोक मग इकडतिकडच्या गप्पा मारत बसले ..जरा वेळाने निघायची वेळ झाली तसे ..आईने मुलीच्या भावाला बाजूला घेवून माझ्या व्यसनाधिनतेच्या इतिहासाबद्दल थोडीफार कल्पना दिली .. तो नुसताच मान हलवताना दिसला .. नंतर कळवा असे म्हणून ..आम्ही बाहेर पडलो ...आम्ही मुलीला नाकारण्याचे काही कारणच नव्हते ..उलट माझीच बाजू कमी होती ..त्या दिवशी रात्री मी खूप अवस्थ होतो ..मुलाच्या घरून नेमके काय उत्तर येईल याबद्दल चिंता वाटत होती ..माझा काळाकुट्ट इतिहास सारखा डोळ्यासमोर नाचत होता .. आपण भूतकाळात किती मूर्खपणे वागलोय हे सारखे आठवून स्वत:चा रागही येत होता ..मात्र आता काहीही हाती राहिले नव्हते ..भूतकाळ पाटीवर लिहिलेल्या मजकुरासारखा पुसून टाकता आला असता तर किती बरे झाले असते असे वाटले ...याच वेळी अशा लग्नाळू मुलीला जेव्हा लोक पाहायला येतात ..तेव्हा पुढचा निरोप येईपर्यंत तिची काय अवस्था होत असेल ते देखील मी अनुभवत होतो ..तिला तर बिचारीला माझ्या सारखा इतिहास नसून देखील ..आर्थिक बाबी ..मुलाच्या व त्याच्या नातलगांच्या विशिष्ट विचारसरणी मुळे किवा ..त्यांच्या प्रत्येकाच्या आवडी निवडीतील वेगळेपणामुळे नकार मिळण्याची शक्यता असते ...माझ्या बाबतीत नकार मिळाला तर दोष माझ्या भूतकाळाचा असणार होता ...बाकी नाव ठेवण्यासारखे विशेष नव्हतेच .

दुसऱ्या दिवशी दुपारी मुलीच्या भावाने आम्हाल फोन करून नकार कळवला .. मुलाचा इतिहास आम्हाला मंजूर नाही याचा त्याने अस्पष्टपणे उल्लेख केला बोलण्यात ... मी जरा निराशच झालो होतो .. वाटले आपले लग्न होणे कठीणच नाही तर केवळ अशक्य आहे ...आई आणि वहिनी मला धीर देत होत्या .. त्यांना भीती होती की याने फार मनाला लावून घेतले तर पुन्हा याचे व्यसन सुरु व्हायला नको ..त्याच दिवशी पुन्हा एक मुलगी दाखवायला आमच्याकडे मुलीच्या घरचे येणार होते ..त्या तयारीला सगळे लागले !

( बाकी पुढील भागात )