शुक्रवार, 14 फ़रवरी 2014

मनाची शस्त्रक्रिया


रे तुझ्यावाचून काही ..येथले अडणार नाही ! ( पर्व दुसरे - भाग १५१ वा ) 


संगीताबाईंच्या घरी पोचल्यावर त्यांनी आम्हाला जेवण वगैरे झालेय का विचारले ..इतक्या रात्री तुम्ही काही त्रास घेवू नका ..आचे बाहेर खाणे झालेय असे मी सांगितले त्यांना ..तरी त्या काही ऐकेनात किमान अंडाभुर्जी बनवते म्हणून मागे लागल्या ..आम्ही अनिल कुठे गेलाय विचारल्यावर म्हणाल्या " मुडदा सकाळ पासून बाहेर जातो ते रात्रीच येतो एकदम .केव्हा येईल काही नेम नाही ..पण येईलच इतक्यात ....झालीय त्याची वेळ ..जेवणाला कोणी विचारात नाही बाहेर ..मी त्याला पैसे देणे अजिबात बंद केले आहे ..त्याचे लग्न लावून दिलेय पण तरीही घरात पाय टिकत नाही '" त्या अनिल बाबत बऱ्याच तक्रारी सांगत बसल्या होत्या .... तिच्या तोंडून माझी आईच बोलतेय की काय असा भास झाला ..कारण प्रत्येक व्यसनीच्या घरी थोड्याफार फरकाने हीच स्थिती असते ..सुमारे अर्ध्या तासाने अनिल आला ..आम्हाला घरात पाहून चकित झाला ..मी अँगीला डोळ्याने इशारा केला त्याबरोबर अँगी अनिलला गळ्यात हात टाकून बाहेर घेवून गेला ..मालाची चौकशी केली .. मला बाहेर बोलावले ...मी त्यांच्या जवळ रविकडून घेतलेल्या दोन हजार रुपयांपैकी ..एक हजार रुपये दिले ..ते दोघेही माल आणायला गेले ..नागपूरमध्ये नाशिकच्या तुलनेत ब्राऊन शुगर जास्त महाग होती ..संगीताबाईंनी गप्पांच्या ओघात ..मी ब्राऊन शुगर सोडलीय मात्र मला दारू चालते ना ? ते विचारले ..मी नुसतीच मान हलवली ...त्या आपणहून विचारात आहेत तर कशाला नाही म्हणा ..एक प्रकारे त्या मला दारू घेणार का थोडी असेच विचारात होत्या ....माझ्या पाहुणचाराचा हा त्यांच्या मते उत्तम मार्ग होता ....अनेक ठिकाणी सन्माननीय पाहुण्यासांठी पाहुणचाराचा मार्ग म्हणून दारूची ऑफर करून ..आग्रहाने दारू पाजली जाते ..संगीताबाईंच्या मते ब्राऊन शुगर खूप वाईट ..दारू जरा बरी ..अनेक लोकांना असे वाटत असते ..ड्रग्स आणि दारू हे दोन भिन्न आहेत ....दारूमुळे फार नुकसान होत नाही ..तर ड्रग्स म्हणजे एकदम खतरनाक ..खरे तर माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवातून दारू आणि ब्राऊन शुगर व इतर ड्रग यात फारसा फरक आढळला नव्हता ....नुकसान दोन्हीत सारखेच होते ..फरक इतकाच की दारू ही विनाशाकडे नेणारी स्लो लोकल आहे ..तर ड्रग्स ही फास्ट लोकल ..

संगीताबाईनी घरातच ठेवलेली एक ओसी ची क्वार्टर काढली ..छानच झाले ..मैत्रीत खूप डोकेफोड करून झाली होती माझी..मला लवकरात लवकर कोणती तरी नशा हवीच होती ..मी अँगी व अनिलची वाट पाहत ..दारूचे घुटके घेत ..संगीताबाईच्या अनिलबद्दलच्या ..त्याच्या त्रास देण्याबद्दलच्या तक्रारी ऐकत बसलो ..अँगी आल्यावर ..आम्ही अनिल सोबत आम्ही त्याच्या घराच्या गच्चीवर गेलो ..तेथे आडोसा पाहून आमचे काम सुरु केले ...संगीताबाईना वाटले अनिल प्यायला गेलाय गच्चीवर आणि मी व अँगी नुसतेच बसलो आहोत त्याला समजावत ...तासाभरातच आम्ही आठशे रुपयांचा धूर केला ...मग खालच्या हॉल मध्ये येवून ...जेवण करून झोपलो ..दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आधी अनिल जवळ अजून पाचशे रुपये दिले ...थंडीच्या दिवसात नशा पटकन उतरते ..सुमारे दहा वाजता ..सामान अनिलच्याच घरी ठेवून आम्ही बाहेर पडलो ..मनातील राग आणि बंडखोरी अजून संपली नव्हती ..खिश्यात पैसे असेपर्यंत संपलीही नसती ...आपण मैत्री सोडून नागपुरातच दुसऱ्या एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात नोकरी करू असे वाटत होते ..माझ्या जवळ एका व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालकांचा फोन नंबर होता ..मी त्यांना फोन लावून ..तुमची भेट घ्यायची आहे असे म्हंटले ...तर ते बाहेरगावी होते ..दोन दिवसांनी परत येणार म्हणाले ..तो पर्याय संपला ..जवळ आता फक्त पाचशे रुपये उरलेले होते .. संध्याकाळी संपले असते ....नंतर काय हा मोठा प्रश्न होता ...अँगी आणि मी एकमेकांना आपण मैत्रीसाठी आपण किती काम केले ..रवीने त्याची जाण ठेवली पाहिजे होती वगैरे सांगत होतो सारखे ..प्रत्येक व्यसनीला.. तो घरात ...बाहेर कामाच्या ठिकाणी ..खूप उपयुक्त व्यक्ती आहे असे वाटत असते ..अनेकदा तर आपल्यामुळेच सर्व सुरळीत चालले आहे अशा भ्रमात तो असतो ..त्याचा हाच अहंकार त्याला पुन्हा पुन्हा व्यसन करण्यासाठी प्रवृत्त करतो ..मी खूप हुशार आहे ..पूर्वी मी खूप मोठी कामे केली आहेत ..सर्वांच्या भल्यासाठी झटलोय ..वेळप्रसंगी कष्ट केलेत ..त्याच्या बदल्यात माझे व्यसन इतरांनी खपवून घेतले पाहिजे असा त्याचा अट्टाहास असतो ..जरी मी खूप मोठी कामे केली नसली तरी किमान माझ्यावर जर नातलगांचे आणि इतरांचे खरे प्रेम असेल तर ..माझ्या आनंदासाठी म्हणून त्यांनी मला अधूनमधून का होईना व्यसन करू देण्यास आडकाठी करू नये वैगरे ...

सायंकाळी उरलेल्या पैश्यांचा धूर केल्यावर अनिलच्या गच्चीवर ...अंगावर अनिलने दिलेली गोधडी पांघरून विचार करत पडलो होतो ..अनिलच्या आईला अजून जरी माझे ब्राऊन शुगर पिणे सुरु झालेय हे समजले नसले तरी ..त्यांच्या घरी असे किती दिवस राहता येईल आपल्याला ..? अँगीसोबत पुण्याला जावूनही काही विशेष घडणार नव्हते ..अँगी पण माझ्या सारखाच भणंग होता ....दोघांना राहायची देखील सोय नव्हती ..मुंबईला परत जावून रस्त्यावरचे जीवन जगण्यात काही अर्थ नव्हता ....मी जरी अनेकदा रागात सर्वाना ...मी कुठेही जाईन ..कुठेही राहीन ..माझा मी समर्थ आहे वगैरे ऐकवत असलो ...तरी पूर्वी एकदा मी फुटपाथच्या जीवनाचा अनुभव घेवून झाला होता ..तेथे अक्षरशः फाटली होती माझी ..आपण असे आयुष्य व्यर्थ जगण्यासाठी जन्माला आलेलो नाहीत ..तारुण्यात प्रवेश करताना आपण स्वतःबद्दल ..कुटुंबियांबद्दल ..समाजाबद्दल अनेक स्वप्ने पहिली होती ..पुढे एकदा रस्ता चुकल्यावर ..चुकतच गेलो ..भरकटत राहिलो ..कटलेल्या पतंगासारखे ..अधांतरी झोके खात राहिलो ..कुठे पडणार याचा काही नेम नाही ..वारा येईल तसे दिशाहीन भरकटत राहणे हेच आपले जिवन आहे का ? एखाद्या दिवशी मृत्यू गाठणारच ..मरायचे तर प्रत्येकालाच आहे ..परंतु आपण जगलो कसे यालाही महत्व आहेच ...आपले जगणे जर इतरांसाठी त्रास दायक असेल ..त्यांना दुखः देणारे असेल तर ..आपला असून नसूनही काही फायदा नाही ..समजा मी मेलो तरी जगाचे काही अडणार नव्हते ..मला ते गाणे आठवले ' रे तुझ्या वाचून काही येथले अडणार नाही ' मोठे मोठे समाजसुधारक .थोर नेते ..महान संत ..सगळे काळाच्या पडद्याआड गेले ...जगरहाटी थांबली नाही ....इतके मौल्यवान जिवन आपण केवळ आपल्या इच्छेने जगून व्यर्थ करतोय ..आपल्या मृत्युपश्चात काय उरेल .. " बरे झाले गेला एकदाचा ..जगणे नकोसे केले होते आम्हाला ..त्याच्यासाठी काय नाही केले ? तरीही कोणाचेही काही ऐकले नाही कधी ..." असे इतरांचे सुटकेचे दबक्या आवाजातील उद्गार ..!

( क्रमशः )

===================================================================

शरणागती ? ? ? ? ( पर्व दुसरे - भाग १५२ वा ) 



खिश्यातील पैसे संपत गेले तसा माझा आत्मविश्वास मला सोडून जावू लागला ..माझा मी पाहून घेईन ..कुठेही जाईन ..मेलो तरी पर्वा नाही ..अशा गर्जना करून तडफदारपणा दाखवणे व त्यानुसार खरोखर वागणे यात खूप फरक असतो ..मानव हा समूहात जगणारा प्राणी आहे ....तो सर्वार्थाने स्वतःच्या जिवावर एकटा जगणे कठीणच असते ....अनेकदा खिश्यात पैसे असले की सारे सोपे वाटू शकते कारण बऱ्याच गोष्टी पैश्याने विकत घेता येतात ..मात्र पैसा कधीही भावनिक सुरक्षितता देवू शकत नाही ...पैसा फक्त तुमच्या भौतिक गरजा भागवण्यासाठी मदत करू शकतो .. भावनिक ..मानसिक गरजा भागवण्यासाठी माणसेच लागतात ..ती देखील मायेची ...आपल्यावर प्रेम करणारी ..संकटकाळात आपल्या पाठीशी उभी राहणारी ..दिलासा देणारी ..वेळ प्रसंगी स्तुती करणारी ...तर कधी रुसणारी ..रागावणारी..पुन्हा क्षमा करून सारे अपराध पोटाशी घालणारी मायेची माणसे ..पैश्याने माणसे खरेदी करता येतात मात्र ती यंत्रासारखे बेगडी प्रेम करतात ..पैसा संपताच सोडूनही जातात ..मायेची माणसे ही भाग्यानेच मिळतात .. .माझी चूक असतानाही उन्मत्तपणे ...नशेच्या भरात मैत्री सोडून ..बाहेर पडलो होतो ..माझ्यावर प्रेम असणाऱ्या मित्रांना अव्हेरून ..लहानपणापासूनच्या माझ्या आत्मकेंद्रित वृत्तीमुळे मी फक्त स्वतच्या भावनांचा विचार करत आलो होतो ..माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझ्यासाठी त्यागास तयार असलेल्या माणसांच्या भावनांची कधीच काळजी केली नाही म्हणूनच तर भरकटत गेलो होतो ..या वेळीही आपण तीच चूक करत आहोत हे माझ्या ध्यानात येत गेले ...वाटले सरळ रविला फोन करून त्याला म्हणावे ..मी तयार आहे उपचाराला ..येतो परत मैत्रीत ..परंतु अहंकारी मन सहजासहजी असे करू देत नाही ..मी रवी ऐवजी मुकुंदला फोन केला ..त्याने काहीतरी मध्यस्थी करावी अशी इच्छा प्रदर्शित केली ..मुकुंद सरळ म्हणाला ' तुषार ..व्यसनाधीनता हा एक गंभीर मनोशारीरिक आजार आहे हे मी तुझ्याच तोंडून अनेकदा ऐकलेय ..व्यसनाधीनते मुळे अनेक चांगल्या गुणी माणसांची कशी माती झाली ते आजूबाजूला पाहिलेय ..असा आजार झालेल्या व्यक्तीने आयुष्यात एकदाही व्यसन करणार नाही असा पण करून तो पाळण्यासाठी सतत स्वतःला आठवण करून दिली पाहिजे... हेच तर तू पण येथील उपचारात शिकवतोस ....इतके सगळे माहित असूनही तू स्वतःला मात्र अपवाद कसा मानतोस ? तुलाही हा आजार जडलाय हे मान्य करूनही तू त्याची पथ्ये मात्र पाळण्यास तयार नाहीस ...फक्त एकदाच ..आजच्या दिवस ..कधीतरी ..वगैरे समर्थने देत तू आयुष्याची अनेक वर्षे या आजाराशी झुंज देण्यात घालवली तरीही तुला आपल्याला एकदाही व्यसन करता येणार नाही हे स्वीकारता आले नाहीय ..अश्या वेळी वारंवार मदत घ्यावी लागते हे तूच सांगत असतोस ...मग स्वतची वेळ येताच मदत का नाकारतो आहेस ? 

मुकुंदचे म्हणणे बरोबरच होते ..तो अवांतर बडबड करत नसे कधीच ....नेहमी मोजके आणि नेमके बोलणारा होता मुंकुंद ..मला त्याचे म्हणणे पटले ....मी त्याला तुझ्या घरी चर्चा करायला येतो असे सांगून त्याच्या घरी गेलो ..तेथे त्याने रविला ही बोलावले होते ..रवी व मुकुंदचा मी पुन्हा एक महिना मैत्रीत उपचार घ्यावेत हाच पवित्रा कायम होता ..मी त्यांना सगळ्या थेरेपीज न करता केवळ काही थेरेपीज करेन अशा अटी घालत बसलो ..हा माझा मानभावीपणा चालला होता ..' तू पेशंट आहेस हे का स्वीकारत नाहीस ? काही आजार दीर्घकाळ पर्यंत ग्रासणारे असतात ..तेव्हा उपचार घेत राहण्यात कसला आलाय कमीपणा ? वगैरे मुकुंद समजावत राहिला ..माझ्या अहंकारामुळे चर्चा फिस्कटली पुन्हा ..तावातावाने उसने अवसान आणून मुकुंदच्या घरातून बाहेर पडलो ..पुन्हा अनिलच्या घरी गेलो ..येथे मुक्काम ठोकून दोन दिवस झाले होते ..संगीताबाई जरी काही म्हणाल्या नव्हत्या तरी माझे स्वागत करण्याच्या वेळचा त्यांचा उत्साह कमी होत चालला होता हे मला जाणवत होते ..इथून बाहेर पडून जावे तरी कुठे हा प्रश्नच होता ....मैत्रीतून बाहेर पडताना रवीने घेवून दिलेला मोबाईल देखील मी परत करून बसलो होतो ..त्यामुळे या दोन दिवसात आई ..मानसी माझ्याशी संपर्क साधू शकल्या नव्हत्या ..किती काळजीत असतील त्या दोघी या विचाराने अवस्थ झालो होतो ....आईला माझे बेगडी तत्वज्ञान ऐकवून मी तिचा फोन कापला होता ..त्या नंतर तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल ? माझ्या बाबतीत असलेली आईची ..मानसीची ..भावाची स्वप्ने मी धुळीस मिळवली होती ....इतकेच नव्हे तर चिमुकल्या सुमितच्या भविष्याचीही पर्वा केली नव्हती ...तरीही ते सगळे माझ्यावर निर्व्याज प्रेम करत राहिले ..प्रत्येक वेळी ..आता सारे ठीक होईल या आशेवर जगले .. प्रत्येक वेळी मी त्याच बेजवाबदारपणे वागत गेलो ..नशेच्या वेडेपणाच्या आकर्षणाला बळी पडलो ..

ती तारीख १० डिसेंबर २००४ होती ..सुमारे तीन दिवस मी अनिलकडे घालवलेले ..जवळचे सगळे पैसे संपलेले ..सकाळी सकाळी शेवटची पुडी संपवून मी चहा घेवून सहज चक्कर मारायला घराबाहेर पडलो होतो ..अनिल आणि अँगी झोपलेलेच होते ..थंडीची सकाळी आठची वेळ ..एक लूत भरलेले कुत्रे रस्त्याच्या कडेला मरून पडलेले दिसले ..क्षणभर त्याच्याकडे पाहून खूप अंगावर काटाच आला ...सुटला एकदाचा असे मनात आले ..अचानक मनात चमकलेल्या विचाराने दचकलो ..कधीतरी आपलेही प्रेत असेच रस्त्याच्या कडेला पडलेले असेल ...बापरे ...किती भयानक अवस्था ? ..मला असा मृत्यू आलेला अजिबात पसंत पडला नसता ...निसर्गाने माझ्यावर कुठलाही अन्याय न करता सशक्त शरीर प्रदान केलेले ..सोबतीला प्रेम करणारे नातलग ..चांगले संस्कार ....मी ओढवून घेतलेल्या प्रत्येक संकटातून मला सहीसलामत बाहेर काढणारे लोक मला वेळोवेळी मिळत गेले ..तरीही माझा माज मात्र कमी झाला नव्हता ..कुठपर्यंत चालणार हा माज ? अनेक वेगवेगळे विचार मनात घोंगावत होते ..त्याच वेळी मानसीची आणि सुमितची तीव्रतेने आठवण झाली ..त्याच तिरमिरीत घरी फोन लावावा वाटले खिश्यात तेव्हढे पैसे होते ..एका पानठेल्यावरून घरी फोन लावला ..आईने फोन उचलला ..माझा आवाज ऐकून तिला खूप दिलासा मिळाला असावा हे जाणवले ..कुठे आहेस तू ? कसा आहेस ? या तिच्या प्रश्नांनी गलबलून आले ..मी ठीक आहे इतकेच बोललो ..मानसीला फोन दे म्हणालो ..मानसी फोन वर आली ..मात्र नुसतेच हुंदके ऐकू येत होते ..ती रडत ..हुंदके देत ..काहीतरी सांगत होती ..तिच्या रडण्यातून काही स्पष्ट ऐकू येत नव्हते ..तरीही हे समजले की मी जे वागतोय हे तिच्यासाठी असह्य होते ..कसा कोण जाणे ..मी जातोय रवीकडे परत असे तिला म्हणालो ..आणि फोन कट केला ..मग रविला फोन केला ..सकाळचे नऊ वाजत आले होते ..माझा आवाज रवीने लगेच ओळखला ..काय म्हणताय तुषारभाऊ ? त्याचा तसाच आश्वासक स्वर ..रवी ..यार कंटाळलो आता ..काय करावे सुचत नाही ? ..यावर तो सहज पणे म्हणाला ...कशाला स्वतःचा त्रास वाढवून घेताय उगाच ? ..त्यापेक्षा या इथे परत ..पाहता पाहता एक महिना संपेल उपचारांचा ..अहंकार बाळगून नुकसानच होते ..मी पटकन त्याला चालेल म्हणालो ..तुला भेटायला सेंटरला येतोय असे सांगितले ..अनिलकडे येवून झोपेतून नुकत्याच उठलेल्या अँगीला ..रवीकडे जावून येतो असे सांगितले ..अनिल सोबत त्याच्या स्कूटरवरून मैत्रीत पोचलो !

( क्रमश : )
===================================================================
मनाची शस्त्रक्रिया ! ( पर्व दुसरे -भाग १५३ वा )



सेंटरला आल्यावर ..एक महिनाभर उपचार घेण्याची माझी तयारी आहे असे रविला सांगितले ..त्याला बरे वाटले ....पुढे मी लगेच रवी जवळ अँगीचा विषय काढला व त्यालाही माझ्यासोबत मी सेंटरला घेवून येतो असे सांगितले ...अँगी मुळे तुषार चांगला असताना बिघडला असा त्यांच्या समज होता ....त्याला म्हणालो ..मी नाशिकहून माल आणला ही माझी चूक आहे ..त्यामुळे अँगीला त्याची शिक्षा मिळायला नकोय ..त्याला पण परत उपचार घेण्याची संधी मिळाली पाहिजे ..रवीने यालाही मान्यता दिली ..सगळी व्यवस्थित बोलणी झाल्यावर रविकडून शेवटचे म्हणून दोनशे रुपये घेतले ..अनिलकडे जावून अँगीला आपल्याला सेंटरला परत जायचे आहे असे सांगून ....थोडासा माल पिवून ...सामान घेवून सायंकाळी सेंटरला आलो ....नेहमी प्रमाणे सायंकाळी मुकुंद ..तसेच चांगले राहून फॉलोअपला येणारे आमचे मित्र आल्यावर ..मुकुंदने मला ऑफिस मध्ये बोलावले ..म्हणाला ' चांगले केलेस ..परत आलास ते ..पण तुझी पत्नी ..मुलगा ..वगैरे मंडळी नाशिकला असतात ..त्यांना भेटायच्या निमित्ताने तुला पुन्हा नाशिकला जायची इच्छा होईल ...आम्ही तुला अडवू शकणार नाही ....त्यावेळी नाशिकला गेल्यार परत असे होणार नाही याची काय खात्री ? ' मुकंदची शंका अगदी रास्त होती ..नाशिकला गेल्यावर का कोणजाणे मी स्वतःला व्यसन करण्यापासून रोखू शकत नव्हतो असा इतिहास होता ..जरी अकोल्यात ...पुण्यात ..धुळ्यात ..इतर ठिकाणीही माझ्या रिलँप्स झाल्या असल्या तरी ...नाशिकच्या बाबतीत हे जास्त वेळा घडले होते ....एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी ..स्थानाशी ..खास मित्राच्या भेटीशी ... जुन्या आठवणींशी .. एकदा व्यसन केले पाहिजे ही माझी भावना निगडीत असावी हे नक्की होते ..मी ते मान्य करून ' या पुढे पाच वर्षे मी नाशिकला जाणार नाही ' असे जाहीर केले ..मी घेतलेला हा निर्णय पाळण्याची जवाबदारी अर्थातच माझी होती ..मी पाच वर्षे नाशिकला जाणार नाही असे जाहीर केल्यावर....रवी आणि मुकुंदचे समाधान झाले ..म्हणाले ' तुझ्या पत्नी व मुलाला लवकरच आपण इथे राहायला घेवून यायची सोय करू ' तो पर्यंत तुला स्वतःवर नियंत्रण ठेवले पाहिजे ..झाले एकदाचा परत सुरक्षित ठिकाणी येवून पोचलो होतो ....!

टर्की मुळे दोन तीन दिवस मी झोपूनच काढले ..नंतर उपचारात सहभागी होण्यास सुरवात केली ....समूह उपचार घेणारे कार्यकर्ते माझ्याच तालमीत तयार झालेले होते ..उपचार घेणाऱ्या मित्रांमध्ये समोर मी बसलेला असल्याने सुरवातीला त्यांची तारांबळ उडत असे ..कारण मीच त्यांना शिकवलेले ते आता मला नव्याने शिकवणार होते ..बोलताना आपले काही चुकेल की काय याची त्यांना धास्ती वाटे ..' ध्यान ' या उपचारात मी अल्कोहोलिक्स अँनाँनिमस च्या ' प्रतिबिंब ' या पुस्तकातील एक विचार रोज वाचून त्यावरचे माझे विवेचन देत असे पूर्वी ..ते विवेचन देताना ..मी अत्यंत तल्लीन होऊन जात असे ..तेच विवेचन माझ्या समोर तेव्हढ्या प्रभावीपणे देणे आमच्या कार्यकर्त्यांना जमत नसे ..त्यामुळे स्वाभाविकच उपचार घेणारे इतर मित्र माझी व त्यांची तुलना करून ' तुषार सर ..जादा अच्छा लेते है ध्यान असे ' त्यांना सुनावत असत..चारपाच दिवसानंतर एकदा तर ..आमचा नवोदित कार्यकर्ता ' प्रतिबिंब ' चे वाचन करत असताना उपचार घेणाऱ्या सगळ्या मित्रानी त्याला थांबवले आणि ते वाचन मीच करावे असा आग्रह धरला ..मी त्यांना सांगितले की सध्या मी पण इथे पेशंट म्हणून आहे ..तेव्हा असे वाचन मी करणे योग्य होणार नाही ..तरीही ते ऐकेनात ..किमान ' ध्यान ' तरी मीच घ्यावे असा त्यांचा आग्रह होता ..त्या नुसार मी ' ध्यान ' घेण्यास सुरवात केली ..' प्रतिबिंब ' या पुस्तकात वर्षाच्या ३६५ दिवसांसाठी रोज ' आत्मचिंतन ' करायला प्रेरित करणारा एक विचार दिलेला असतो ..अल्कोहोलिक्स अँनाँनिमसच्या व्यसनमुक्तीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या बारा पायऱ्याचे ...प्रत्येक महिन्यात एका पायरी वरचे विचार ..असे त्या पुस्तकाचे स्वरूप आहे ....तो डिसेंबर महिना सुरु होता ..दहाव्या पायरीवरचे विचार वाचन सुरु होते ..दहाव्या पायरीत असे म्हंटले आहे की ' आम्ही नियमित स्वतचे आत्मपरीक्षण सुरु ठेवले व जेथे जेथे आम्ही चूक आढळलो तेथे त्याची तत्काळ स्वतःशी कबुली देवून दुरुस्ती केली ' या पायरी वरचे विचार मला प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्यास मदत करणारे होते ..

अगदी प्रथम ' मुक्तांगण ' मध्ये ज्या प्रामाणिकपणे मी उपचार घेतले होते ..मोठ्या मँडमवर श्रद्धा ठेवून त्यांच्या सूचनांचे पालन केले होते ..ते सगळे आठवले ..तितका प्रामाणिकपणा नंतर न ठेवता आल्याने माझ्या वारंवार रिलँप्स झाल्याचे माझ्या लक्षात आले ..नुसते व्यसन बंद करून भागत नाही ..तर व्यसन करण्यास प्रवृत्त करणारे माझ्या मनातील विचार बदलले पाहिजेत ..व्यसनमुक्तीचे उपचार घेणे म्हणजे जादूची छडी नव्हे ....नुसते यापुढे व्यसन करणार नाही असे स्वतःशी ठरवले असले तरी ..मानसिकतेत योग्य बदल न करता आल्याने माझ्यासारखेच अनेक जण पुन्हा पुन्हा व्यसनाच्या जाळ्यात अडकतात ..माझ्या व्यसनाधीनतेला इतर कोणी जवाबदार नसून माझे व्यसनाकडे पाहण्याचे दृष्टीकोन ..माझ्या अनियंत्रित भावना ..त्या मागचे अविवेकी विचार ..मनातील असंख्य गुंते ..गाठी ...कारणीभूत आहेत हे उमगले ..हे सगळे निस्तरायला अनेक दिवस लागतात..उपचारा नंतरही ही स्वतःला बदलण्याची प्रक्रिया सतत सुरु ठेवावी लागते ....त्यासाठी सतत स्वतःच्या मनाची शस्त्रक्रिया करावी लागते ..या शस्त्रक्रियेसाठी नेमाने समुपदेशकाशी चर्चा करून त्याचे मार्गदर्शन घेतले पाहिजे ..तसेच एकदा व्यसनमुक्त राहण्यास सुरवात केली की आजवर व्यसनामुळे झालेले सारे नुकसान ताबडतोब भरून निघावे ..गमावलेल्या साऱ्या गोष्टी परत मिळाव्यात ..सर्वांनी माझ्यावर तसाच पूर्वीसारखा विश्वास ठेवावा ..वगैरे अपेक्षा न बाळगता व्यसनमुक्ती वाढवत गेली पाहिजे ...हळू हळू सारे सुरळीत होईल हा विश्वास मनी ठेवून तो विश्वास वाढवत नेला पाहिजे ..हे देखील मान्य केले पाहिजे की गमावलेल्या साऱ्या गोष्टी कदाचित परत मिळणार नाहीत ..तरीही समोर आहे तो वर्तमान ..आणि पुढील भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे ..हा विश्वास मात्र कायम असायला हवा !

( क्रमश : )

========================================================================

चरखा थेरेपी !( पर्व दुसरे - भाग १५४ वा ) 


' मैत्री ' मधील या शेवटच्या उपचारांमध्ये मी अंतर्मनाची सगळी शक्ती पूर्णपणे वापरून या पुढे काहीही झाले तरी व्यसनमुक्त राहायचे हे ठरवले होते ..वारंवार व्यसन सुरु होण्याची सारी पाळेमुळे खोदून काढायची ..माझ्या अंतर्मनातील सगळे गुंते -गाठी सोडवायच्या ..कितीही मानसिक शारीरिक त्रास झाला तरी पुन्हा व्यसनाच्या मार्गाला जायचे नाही असा निश्चय करत होतो ..माझ्या लक्षात आले की माझ्या व्यसनी होण्याला तसेच वारंवार व्यसन करून उध्वस्त होण्याला कुणी व्यक्ती ..मित्र ..कुटुंबीय ..माझ्या बाबतीत घडलेले चांगले- वाईट ..प्रसंग परिस्थिती ..निसर्ग अजिबात जवाबदार नाहीय तर माझ्या अंतर्मनातील स्वतःबद्दल ..जगाबद्दल ..एकंदरीत जीवनाबद्दल ..तयार झालेले नकारात्मक दृष्टीकोन जवाबदार आहेत ..तसेच दारू ..ब्राऊन शुगर .अन्य मादक पदार्थांबाबत असलेली माझी ' एकदा घ्यायला काय हरकत आहे ' ही वेडेपणाची भावना जोपासण्यासाठी माझा सुप्त अहंकार कारणीभूत आहे ..जन्मतः माझ्या स्वभावात असलेली काही स्वभाव वैशिष्ट्ये ( स्वभाव दोष ) ..चंचलपणा ..भावनिक असंतुलन ..आहारी जाण्याची वृत्ती ..आत्मकेंद्रितपणा ..आत्मकरुणा ( सेल्फ पीटी ) ..कधी कधी प्रबळ होणारी आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना ..आणि निसर्गाने विनामुल्य बहाल केलेल्या स्वस्थ...सदृढ शरीराबद्दलची अनास्था ...नेहमीचा अतिआत्मविश्वास ..सगळ्यांना गृहीत धरण्याची प्रवृत्ती ..याच बरोबर वारंवार व्यसन केल्याचा मानसिक परिणाम म्हणून बेफिकीर वृत्ती ..आजाराचा धूर्तपणाचा भाग म्हणून माझ्यात निर्माण झालेले अमली व मादक पदार्थांबद्दलचे कायमचे आकर्षण ..ज्यामुळे माझ्या सर्व समस्या ..अडचणी ..चिंता ..संकटे यावर एकदा व्यसन केले पाहिजे हा मूर्खपणाचा उपाय ...असे सगळे आहे ..हे सगळे साफ करून एक सर्वसामान्य जीवन जगायला सुरवात केली पाहिजे ..त्यासाठी प्रामाणिक ..आणि सर्व शक्तीनिशी प्रयत्न करण्याचे मी ठरवले ..कितीही वेळ लागला तरी चालेल ..मात्र बदल झालाच पाहिजे ही भावना माझ्या मनात दृढ झाली ..त्या नुसार मी थेरेपी नसेल त्या वेळात ' ध्यान ' करू लागलो ...हे ध्यान म्हणजे डोळे मिटून ..तटस्थपणे आत्मपरीक्षण करत राहणे होते .



आमच्याकडे पूर्वी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमाशी संबंधित एक जण उपचारांसाठी दाखल होऊन नंतर काही दिवस कार्यकर्ता म्हणून राहत होता ..त्याचे सोबत रवी व मी जाऊन एकदा सेवाग्रामला भेट देवून आलो होतो..तेथून येताना आम्ही दोन छोटे आधुनिक पद्धतीचे चरखे दोन हजार रुपये अनामत रक्कम भरून कौतुकाने आणले होते ..मला नेहमीच नवीन गोष्टीबद्दल कुतूहल असते ..मात्र ते चरखे आणून वर्षभर झाले तरी मी कधी त्याकडे ढुंकूनही पहिले नव्हते ..या वेळी उपचार घेताना निवांत वेळी मी तो चरखा काढून बसलो ..तो कसा काम करतो ते समजून घेतले ..कापसाचा पेळू त्याला अडकवला नीट लावून ..त्याला जोडलेले एक हँडल ..सावकाश फिरवायचे ..मग त्यातून कापडाचे सूत तयार होते ..मी हे शिकू लागलो ..वरवर पाहता सोपे वाटले तरी हे खूप अवघड व अतिशय एकाग्रतेचे काम होते ..सुरवातीला सारखे सूत तुटू लागले ...पेळू चरख्यावर बसवताना चुका होता असत ..मात्र नेटाने ते शिकलो ..चरख्याचे हँडल फिरवताना त्याचा वेग खूप जास्ती ठेवला तर सूत तुटते किवा खूप कमी असला तरी ते बिनसते ..हे लक्षात आले ..मात्र त्याचा वेग नेमका संतुलित कसा ठेवायचा हे शिकताना जाणवले की मानवी भावनांचे असेच आहे ..त्या संतुलित ठेवल्या गेल्या नाहीत तर ..नुकसान होणारच ..काम बिघडणारच ..माझा अतिराग ..अतिनिराशा ..अतिवैफल्य ..अतिआत्मविश्वास ..किवा न्यूनगंड ..अपराधीपणा ..वगैरे भावनांचे तसेच असावे ..प्रत्येक व्यक्तीने चरखा दिवसातून दोन तास तरी चालवलाच पाहिजे असा सेवाग्राम आश्रमात राहणाऱ्या व्यक्तींसाठी नियम बनवला होता गांधीजीनी असे आम्हाला कळले होते ..तो नियम का बनवला असावा ते समजले ..सुतनिर्मिती हा प्राथमिक उद्देश नव्हता ..तर चंचल मनाला एका ठिकाणी बांधून ठेवण्याचा तो एक मार्ग होता हे जाणवले ..चरखा फिरवताना कधी कधी मनात अचानक काहीबाही भूतकाळातले विचार यायचे तेव्हा आपोआप चरख्याचा वेग वाढत असे किवा भविष्यकाळातील काही चिंता मनात उद्भवल्या तर चरख्याचा वेग मंदावत असे ...लगेच सारखे सूत तुटण्यास सुरवात होई ...आधी मला वाटे आपला वेग आपोआप वाढतोय किवा कमी होतोय ..नंतर जाणवले आपल्या मनातील भावना जशा वरखाली जातात तसा चरख्याचा वेगावर परिणाम होतो हे रहस्य समजल्यावर शक्यतो शांतपणे चरखा चालवायची सवय लावून घेतली ..माझ्या सोबत त्या वेळी अँगी देखील दुसरा चरखा काढून बसे ..आम्हाला अनेकदा गप्पा मारण्याचा मोह होई ..पण गप्पा मारताना देखील सूत..वेग यावर लक्ष ठेवावे लागे ...यालाच अवधान म्हणत असावेत .!



यावेळी मी पूर्वी मुक्तांगण मध्ये शिकलेले सगळे नव्याने आठवत होतो ..तसेच अल्कोहोलिक्स अँनाँनिमस ने सुचवलेल्या व्यक्तिगत सुधारणेच्या बारा पायऱ्यांचा मनापासून अर्थ समजून घेत ..त्याचे सखोल विश्लेषण करून ..मला नक्की सुधारणा कशी करता येतील हे ठरवत होतो ..सध्या भूतकाळ ..भविष्यकाळ वगैरे विचार न करता फक्त वर्तमानात मनात काय चालले आहे ..ते योग्य आहे का ? त्यात बदल कसा करता येईल याबाबतच विचार करत राहिलो ..उपचार घेवून महिना पूर्ण होऊन मी पुन्हा कार्यकर्ता म्हणून मैत्रीत वावरू लागलो ..मात्र मी तरीही मी सुधारलो असे न समजता ..सुधारणेच्या वाटेवर वाटचाल करतोय ..अजूनही मी पेशंटच आहे हे मनाला बजावत होतो ..हा आजार कायमचा मानला गेल्याने ..आपण स्वतःला सुधारलो असे न म्हणता सुधारणा करतोय म्हणजे रिकव्हर्ड न म्हणता रिकव्हरिंग असे का म्हणायचे हे नीट समजले ..म्हणजे फाजील आत्मविश्वास टाळता येतो .



( क्रमश : )

शनिवार, 1 फ़रवरी 2014

चुपके चुपके...!!

कुबेरचा अंत !( पर्व दुसरे - भाग १४६ वा )


कोणत्याही व्यसनमुक्ती केंद्रात एखाद्या उपचार घेणाऱ्या व्यक्तीसाठी किमान गरजेच्या वैद्यकीय सुविधा असतात ..ज्यात फर्स्टएड ...रक्तदाब तपासणी ....शुगर टेस्ट ...तसेच ताप ..सर्दी ..खोकला ..अंगदुखी .. सलाईन लावण्याची सोय ..इंजेक्शन देण्याची सोय ..तो करत असलेल्या व्यसनाच्या विरहात त्याला होणा-या त्रासावरची( विड्राँवल सिम्पटम्स ) काही औषधे ..इतकी मोजकी वैद्यकीयव्यवस्था असते ..कारण व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे हॉस्पिटल नव्हे .. व्यसनमुक्ती केंद्रात जेव्हा व्यसनामुळे खूप शारीरिक नुकसान झालेला व्यसनी भरती होतो तेव्हा ..तेथील वैद्यकीय अधिकारी त्याला तपासून हा येथे राहू शकेल किवां नाही ते ठरवतात ..एकदोन दिवस त्याचे निरीक्षण करून ....आवश्यक तपासण्या करून ..जर त्याला सतत वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्याची गरज आहे असे आढळले तर ..पालकांना सांगून त्याला ..तो चालण्या फिरण्या इतपत ..जेवण पचण्या इतपत साधारण झाला की मग पुन्हा व्यसनमुक्ती केंद्रात आणा ..तो पर्यंत एखाद्या चांगल्या हॉस्पिटल मध्ये याला ठेवा अशी स्पष्ट सूचना देतात ..तरीही काही वेळा ..काही व्यसनी असे असतात की आतून त्यांचे झालेले नुकसान सुरवातीला ताबडतोब जाणवत नाही ...कारण बहुधा दाखल होण्याच्या वेळी त्याने व्यसन केलेले असते ..त्या नशेत अनेक शारीरिक त्रास त्याला सुसह्य वाटत असतात ..तो डॉक्टरना नीट काही सांगतही नाही ..मग व्यसन बंद होऊन काही दिवस झाले की त्याला निरनिराळे त्रास होऊ लागतात ..जर ते त्रास आटोक्यात ठेवण्याच्या बाहेर असतील तर ..डॉक्टर व समुपदेशक अशा व्यक्तीला हॉस्पिटल मध्ये पाठवतात ..गम्मत अशी की अनेक पालकांच्या हे पचनी पडत नाही ..याचे कारण असे की एकतर हॉस्पिटल मध्ये व्यसनमुक्ती केंद्रापेक्षा जास्त खर्च येतो ..दुसरे कारण असे की हॉस्पिटल मध्ये पेशंटपाशी थांबायला ..त्याच्यावर लक्ष ठेवायला पालकांना वेळ नसतो..काही पालक तर अशा वेळी चक्क आमच्याशी वाद घालतात की ' याला आणला तेव्हा तर हा ठीक होता ..एकदम असे कसे झाले याला ..तुम्ही नीट लक्ष दिले नाही वगैरे आरोप करतात ' त्यांची समजूत घालणे खूप कठीण होऊन बसते ....म्हणून कुबेरच्या बाबतीत डॉ. अहिर रावांनी आधीच योग्य ती काळजी म्हणून त्याच्या पालकांना सोबत आणण्यास सांगितले होते मला . 

कुबेरची राहायची व्यवस्था वार्डच्या बाजूच्याच एका छोट्या खोलीत केली गेली होती ..त्याल क्षयरोग झाल्याचा संशय होताच ..सुरवातीला सोबत त्याने आणलेल्या २० पुड्या होत्या त्याच्या सोबत ..त्यापैकी पाच पुड्या मी व बंधू ने संपवल्या ..मग तिस-या दिवशी आप्पांनी कुबेरच एक्स रे काढण्यासाठी मला त्याला धुळ्याला घेवून जायला सांगितले ..त्या नुसार आम्ही जावून आलो ..आता त्याच्याकडे जेमतेम दोन पुड्या शिल्लक होत्या ...एक्सरे चा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी कळणार होता ..मात्र दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच माल संपल्यावर कुबेरला टर्की सुरु झाली ....खूप तडफडत होता तो ...पलंगावर उठून बसणेही कठीण झाले त्याला ..हातापायाच्या काड्या झालेल्या ..छातीचा पोकळ पिंजरा ..निस्तेज त्वचा ...त्याची अत्यंत वाईट अवस्था दिसत होती ...बोलणेही कठीण होऊ लागले त्याला ..दुपारी तीन वाजता त्याने डोळे सताड उघडे ठेवून बाकी साऱ्या हालचाली बंद केल्या ...त्याची पत्नी रडू लागली ....त्याची पत्नी सीता ही त्याची लग्नाची नव्हे तर अशीच कुठूनतरी भरकटत आलेली ..आधार म्हणून त्याच्या सोबत गेल्या दहा वर्षांपासून राहणारी स्त्री ...हा पाकीटमार ...मुलबाळ झालेले नव्हते ..कारण बहुधा खूप वर्षे व्यसन केल्यामुळे कुबेर त्या साठी असमर्थ झाला असावा ...कुबेरची अवस्था पाहून मला खूप कसेतरी झाले ...त्याला उगाच इथे आणले असे वाटले ..मात्र त्यानेच आग्रह केला होता माझ्यासोबत धुळ्याला येण्याचा ..या पूर्वी अनेकवेळा त्याला मुक्तांगणला उपचार घे असे सुचवले असूनही तो कधी तयार झाला नव्हता ..' यार तुषार अपनी जिंदगी सुधार के बाहर हुई है ' असे म्हणत असे ...' मध्यमवर्गीय घरातला कुबेर लहान असतानाच बिघडलेला ..शाळेला दांड्या मारून सिनेमा पाहणे ...चोरून बिडी ओढणे ..वगैरे सुरु झालेले होते ..वडिलांच्या मृत्युनंतर शाळा सोडून व्यसनी मित्रांच्या संगतीत आला ..पाकीटमारीचे शिक्षण मिळाले ...भरपूर पैसे कमवू लागला ..व्यसनही भरपूर केले ..आपण पाकीट मारतो ..नक्कीच मोठे पाप करतो ही टोचणी घालवण्यासाठी दिवसरात्र नशेत राहू लागला ...मी रिलँप्स असताना त्याने अनेकदा मला ब्राऊन शुगर पाजली होती ..मला त्यावेळी त्याच्या खिश्यात भरपूर पैसे पाहून त्याचा खूप हेवा वाटे ..आपणही असे एखादे झटपट पैसा मिळू शकणारे काम करावे असा मोह होई ..त्याला मी एकदोन वेळा मला पण पाकीटमारी शिकव असा आग्रह केला होता ..मात्र त्याने मला फटकारले होते .." देख भाई ..ये बहोत बुरा काम है ....बहोत हाय ( शाप )लगती है लोगोंकी ...तू कभी इस काम ने नही पडना..कभी जरुरत पडी तो मै तेरे को नशा पिलाउंगा ..पर तू ये पाप मत करना " असे सांगत असे ...पाकीटमारी करायला निघताना आवर्जून देवळात जावून अर्धा तास प्रार्थना करणारा ..कपाळाला टिळा लावून पाकीट मारी करणारा ...डोळे उघडे ठेवून बेशुद्ध पडलेल्या कुबेरकडे पाहून मला ते सारे आठवू लागले .

आम्ही त्याला एखाद्या हॉस्पिटल मध्ये हलवायचे ठरवले ..त्याच्या पत्नीकडे पैसेही नव्हते जास्त ..म्हणून त्याला लगेच नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटल मध्ये न्यावे असे नक्की झाले ...एक कार भाड्याने घेवून त्यात ड्रायव्हर ..त्याच्या शेजारी पुढे कुबेरची पत्नी ..मागच्या सीटवर कुबेरचे डोके माझ्या मांडीवर घेवून बसलेला मी ..असे निघालो ..कुबेरच्या पत्नीला कुबेरजवळ बसवले नाही कारण ती त्याच्या चेहऱ्याकडे पाहून सारखी रडत होती..सायंकाळी सहाला आम्ही निघालो ..बेटावद ते नाशिक असा एकंदरीत चार पाच तासांचा प्रवास होता ....वाटेत त्याची पत्नी सारखी मागे वळून कुबेर शुद्धीवर आला का ते मला विचारात होती ..मी त्याच्या धापापणा-या छातीवरच हात ठेवून बसलेला होतो ..माझे लक्ष श्वास सुरु आहे ना याकडे लागलेले ..वाटेत कुठेही न थांबता नाशिकजवळ पोचलो ..कसेही करून कुबेरला सिव्हील हॉस्पिटल पर्यंत काही होऊ नये अशी प्रार्थना करत होतो मनात ..एकदाचा हॉस्पिटलला पोचला की त्याला चांगली मदत मिळू शकली असती ..नाशिकच्या हद्दीत आडगाव नाक्याजवळ आल्यावर ..मला एकदम संडासचा आणि लघवी केल्याचा वास आला ..गाडीत अंधारच होता ..त्याचवेळी माझ्या मांडीवर असलेली कुबेरची मान निर्जीव वाटली ..त्याच्या छातीवर ठेवलेल्या माझ्या हाताला ..छातीचे धपापणे बंद झाल्याचे जाणवले ..मी समजलो कुबेर गेला ..त्याच्या पत्नीला ते सांगितले असते तर तिची गाडीतच मोठ्याने रडारड सुरु झाली असती ..अजून त्याच्या घरी पोचायला अर्धा तास बाकी होता ..आता कुबेरच्या म्हाताऱ्या आईला कसे तोंड दाखवायचे ?...आम्ही बेटावदला जायला निघताना तिने ' ठीक होकर ही वापस आना ' असा गुजराथी भाषेत दिलेला आशीर्वाद आठवला ...कुबेरची निर्जीव मान जणू काही तो जिवंतच आहे अश्या अविर्भावात मांडीवर घेवून मी चुपचाप बसलो होतो गाडीत..एकदाची गाडी त्याच्या घराजवळ पोचली ..मी ताबडतोब त्याला उचलून त्याच्या घरी आणला ..त्याची आई घाबरली होती ..' काय झाले याला ' असे विचारू लागली ..जरा बेशुद्ध पडलाय ..याला हॉस्पिटल मध्ये न्यावे लगणार असे तिला म्हणालो ..त्याला पलंगावर ठेवल्यावर आई त्याच्या जवळ गेली ..त्याला स्पर्श केला ..आणि मोठ्याने हंबरडा फोडला तिने ..' मरी गयो ..रे ' धाय मोकलून रडू लागली ...त्याची पत्नी देखील रडू लागली ..शेजारी पाजारी गोळा झाले ..लोक उगाचच फालतू चौकश्या करतील ..उगाच आपल्याला अडकवतील या भीतीने मी गाडीच्या ड्रायव्हरला खूण करून तेथून सटकलो .

( क्रमश: )

=======================================================================

पुन्हा नागपूर !  ( पर्व दुसरे -भाग १४७ वा )


कुबेरच्या मृत्यूनंतर पुन्हा बेटावद गेल्यावर मी सैरभैर झालेला होतो ..इतक्या जवळून ..अगदी माझ्याच मांडीवर झालेला त्याचा करुण अंत ...ज्या व्यसनासाठी त्याने सगळे आयुष्य उधळून लावले ....पणाला लावले..ते व्यसनही शेवटी मरताना त्याला मिळू शकले नव्हते ....व्यसनाविना तडफडत प्राण सोडला होता त्याने ..व्यसनाची इतकी प्रचंड गुलामी मी अगदी जवळून अनुभवली होती ....त्याची तब्येत चांगली असताना त्याला अनेकदा आग्रह केला होता मी व्यसनमुक्ती केंद्रात भरती होण्याचा ..मात्र तेव्हा तो नकार देत गेला ..अगदी शरीर जर्जर होईपर्यंत तो व्यसन करण्यासाठी निकराने लढत राहिला ..जेव्हा व्यसनमुक्त व्हावे अशी इच्छा वाटली ..तेव्हाच नेमका काळाने त्याचा घात केला होता ..शेवटच्या क्षणी तर तो कोमातच होता ...स्वैरपणे... स्वतःच्या मर्जीने ..कोणालाही न जुमानता ...कशाचीही पर्वा न करता जगलेल्या कुबेरला शेवटी मृत्यूने गाठलेच होते ...मृत्युपुढे तो हरला होता ...निसर्गापुढे माणूस किती छोटा आहे याची जाणीव मला त्याच्या मृत्यूने करून दिली होती ...अनेक माणसे अशीच ...एका धुंदीत ..कैफात ..मोहात ..विशिष्ट अहंकारात जगतात ..कधीतरी मृत्यू येणार हे माहित असूनही सगळे काही कायमचे टिकेल या भ्रमात ...आमच्या सारखीच व्यसने ..सत्ता ..संपत्ती ..अधिकार ..या गोष्टींच्या मागे राहतात ....खूप काही मिळवण्याच्या अट्टाहासाने ..निसर्गाने प्रदान केलेल्या शक्तीचा ..बुद्धीचा ..गैरवापर करून ....लांड्या लबाड्या करून ....इतरांवर अन्याय करतात ....या सर्व काळात एक माणूस म्हणून जगणे ..इतरांना आनंद देण्यासाठी जगणे ...मिळालेल्या अनमोल जीवनाचे सार्थक करणे राहूनच जाते ...

पुढे बंधूचे व माझे व्यसन वाढतच गेले ..हे होणारच होते ..आप्पा व अक्कानाही आता सर्व माहित झाले होते ...मात्र ते आम्हाला स्पष्ट बोलू शकत नव्हते ..आमच्या पिण्यामुळे उपचार घेणाऱ्या इतर मित्रांवर परिणाम होत होता ..कोणी आम्हाला तोंडवर काही बोलत नव्हते तरी ...आमची प्रत्यक बाबतीतली अनियमितता ..त्या केंद्रासाठी हानिकारकच ठरत होती ...शेवटी मी एकदा अप्पाना पंधरा दिवस सुटी पाहिजे असे विचारायला गेलो तेव्हा ते म्हणालेच ..' सध्या आपल्याकडे पेशंटही कमी आहेत ..तेव्हा तुम्ही महिना सहा महिने सुटी घेतलीत तरी चालेल ..जेव्हा पुन्हा पेशंट वाढतील तेव्हा मी तुम्हाला बोलावून घेईन ' याचा अर्थ सरळ होता ..सध्या मी काही महिने घरीच बसावे ...मी सायंकाळी बेटावद सोडून निघालो ..बसस्टँड वर मला सोडायला बंधू आला होता ....नाशिकला घरी आल्यावर ..मी नोकरी सोडलीय हे समजल्यावर मानसी आणि आईला धक्काच बसला ..आता पुन्हा हा काय गोंधळ घालणार या भीतीने त्या धस्तावल्या ...सुमित आता तीन वर्षांचा होत होता ..त्याला शाळेत घालायचे होते ..पुढे जवाबदारी वाढत जाणार होती ..मी मात्र कशाचेच सोयरसुतक नसल्यासारखा वागत होतो ...भावानेच सुमितची मेरीच्या चांगल्या शाळेत अँडमिशन करून दिली ...आता घरी पैसे मागून त्रास देणेही प्रशस्त वाटत नव्हते ..भावाने पुन्हा अनिल साहेबांकडे नोकरी करतोस का विचारले ..परंतु मी नकार दिला ..अनिल साहेबांपुढे उभे राहण्याचे धैर्य नव्हते माझ्याकडे ....बहुतेक काळ निराशेत ..घरी झोपून रहात होतो ....कधीतरी संधी मिळाली की थोडेफार पैसे घेवून व्यसन करत होतो ..किवा स्वस्त मिळतात म्हणून स्पाज्मो प्रॉक्सीव्हानच्या गोळ्या खावून ' दुधाची तहान ताकावर ' या न्यायाने ब्राऊन शुगरची तहान भागवत होतो...पुन्हा रविला फोन करून मैत्रीत जावे असे अनेकदा वाटले ..मात्र मी स्वतःहून मैत्री सोडले होते ..आता परत रवी काय म्हणेल ? कदाचित तो नकार देईल या भीतीने ..त्याला फोन करणे टाळत होतो ...परंतु मैत्रीत पुन्हा जाण्याची मनापासून इच्छा होती ..कदाचित माझी इच्छा समजल्यासारखे की काय ...एकदा रवीचाच मला फोन आला ...मी बेटावद सोडलेय हे त्याला समजले होते ..माझ्यानंतर पंधरा दिवसातच बंधुनेही बेटावद सोडले होते ..चार दिवस बंधू नागपूरला टर्की काढायला जावून ..तेथूनच पुण्याला गेला होता ..रविला त्याने माझ्या बद्दल सांगितले होते ..रवीने विचारले ' येता का पुन्हा इकडे तुषार भाऊ ' ..मी त्याच प्रतीक्षेत होतो ..लगेच होकार दिला ..आणि दुस-याच दिवशी नागपूरला निघालो ..

नागपूरला पोचल्यावर समजले की इरफान आणि अँगी दोघेही मैत्री सोडून परत पुण्याला गेले होते ..रवी एकटाच सर्व कारभार पाहत होता ..त्याची खूप ओढाताण होत होती ..त्याच्या मृदू स्वभावामुळे उपचार घेणाऱ्या मित्रांचा उपचार खर्च पालक वेळच्या वेळी भरत नव्हते ..खर्च वाढतच चालले होते ..सगळी तोंडमिळवणी करणे कठीण झालेले ...पुन्हा आम्ही दोघे जोमाने काम करायचे ठरवून कामाला लागलो ...पुढच्या महिन्यात अगदी सेंटरचे रेशन भरायला देखील जवळ पैसे नाहीत अशी अवस्था आली होती ..रवीने आतापर्यंत घरून सुमारे वीस हजार रुपये आणून सेंटर सुरु ठेवले होते ..आता त्याला घरी पैसे मागायलाही संकोच वाटत होता ...शेवटी आम्ही एक उपाय काढला ..मैत्रीला नेहमी मदत करणारे सहायक पोलीस आयुक्त जाधव साहेब यांच्याकडे पैसे मागण्याचा ..आम्ही दोघेही जाधव साहेबाना भेटायला कमिशनर ऑफिस मध्ये गेलो ..त्यांना सर्व परिस्थिती सांगितली ..यावर त्यांनी विचारले ' किती पैसे लागतील तुम्हाला ? ..आम्ही नेमका आकडा सांगायला कचरत होतो ..शेवटी रवीने मनात सर्व हिशोब करून त्यांना तीन हजार रुपये मिळाले तर सध्याची गरज भागेल असे सांगितले ..त्यांनी पटकन पाकीट काढून आम्हाला तीन हजार रुपये काढून दिले ..पैसे घेताना रवी म्हणाला '' सर ..जमले तर एक दोन महिन्यात आपले पैसे मी परत करतो " ते म्हणाले ' जर पैसे परत करणार असला तर मी देत नाही ' हे पैसे माझ्यातर्फे देणगी आहे मैत्रीला असे समजा ..आम्ही भारावलो होतो ...अशीही माणसे जगात आहेत ..कुठलाही गाजावाजा न करता ..उपकार केल्याचे न दर्शवता ..एखद्या अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत करतात ..पोलीस दलात कार्यरत असलेल्या जाधव साहेबांची माणुसकी ...आमच्या व्यसनमुक्तीच्या कार्यासाठी असलेली तळमळ ग्रेटच होती....पुढे एक आठवडा भरातच आम्हाला पूर्वी भेटलेल्या लोकमतच्या पत्रकार वर्षा पाटील यांनी लोकमत ' सखी ' च्या साप्ताहिक पुरवणीत व्यसनमुक्तीवर आधारित लेखमाला सुरु करण्याचा मानस असून त्यासाठी आम्ही काहीतरी लिहावे असे आम्हाला सांगितले ..ही चांगली संधी होती ..मैत्रीचे काम लोकांपर्यंत पोचवण्याची ..रवीने आणि मी चर्चा करून काहीतरी वेगळ्या पद्धतीने लिहावे असे ठरवले ..त्यातूनच ' एका बेवड्याची डायरी ' ही लेख मला लिहिणे सुरु केले ..लेख लिहिल्यावर मी रवीला दाखवून त्यात आवशक ते बदल करून वर्षा मँडम कडे देऊ लागलो ..

( क्रमश: )

========================================================================
व्यसनावरील श्रद्धा ? ? ? ? ( पर्व दुसरे - भाग १४८ वा )

लोकमतच्या ' सखी ' या साप्ताहिक पुरवणीत ' एका बेवड्याची डायरी ' ही लेखमाला लिहिणे सुरु केल्यावर ...दर गुरुवारी ही लेखमाला प्रकाशित होऊ लागली ..एका भागाच्या लेखनाचे मला त्यावेळी दीडशे रुपये मिळत असत ...या लेखमालेमुळे हजारो वाचकांपर्यंत ..व्यसनाधीनते बद्दल शास्त्रीय माहिती पोचण्यास सुरवात झाली ...व्यसनाबद्दलचे अनेक गैरसमज दूर होण्यास मदत होऊ लागली ....तसेच व्यसनमुक्ती केंद्राबाबत असलेले गैरसमज दूर होऊन व्यसनी मित्र स्वतःहून उपचारांना येण्यास सुरवात झाली..आमच्या कडे चौकशी करणारी ..स्वतःच्या व्यसनाबद्दल कबुली देणारी ..मदत मागणारी ..पत्रे येवू लागली ..त्या पत्रांना उत्तरे देण्याचे काम सुरु झाले ..व्यसनाधीनता हा एक मनो-शारीरिक आजार आहे हे लोकांना समजू लागले ...मौज म्हणून ..आनंद म्हणून ..मित्रांचा आग्रह म्हणून ..विरंगुळा म्हणून ..सेलिब्रेशन ... श्रमपरिहार म्हणून ..समाजात निर्लज्जपणे प्रस्थापित होत असलेल्या असलेल्या ' ड्रिंक्स ' संस्कृतीला तसेच ' पार्टी ' वादी मानसिकतेला मला सुरुंग लावायचा होता ..दारूला लाभलेली प्रतिष्ठा ..त्यामुळे मिळणारा आनंद ..किती भयानक परिणाम देवू शकतो हे मी त्या लेखमालेतून दर्शवत होतो ...या लेखमालेचे सुमारे ३८ लेख लिहून झाल्यावर वर्षा पाटील मँडम एकदा गमतीने म्हणाल्या ' अहो ..ही लेखमाला कधी बंद करणार ? असे माझ्या कामावरचे अनेक सहकारी मला विचारात आहेत ..कारण म्हणे या लेखमालेच्या वाचनामुळे त्यांच्या घरातील कटकटी वाढल्या आहेत ..त्यांच्या बायका त्यांना पिण्यास मनाई करत आहेत ..' थोडी थोडी घेत गेला ..बघता बघता बेवडा झाला ' हे त्यांना इतके पटले आहे की आमच्या पिण्यावर बंधने येवू लागली आहेत ..आपण आता हे थांबवले तर बरे होईल ..' त्यांचे हे बोलणे जरी लेखमाला बंद करण्यासंबंधी होते तरी त्यातच लेखमालेचे यश स्पष्ट होते होते ....अजून बरेच भाग लिहिणे बाकी होते ..तरी शेवटी ती लेखमाला बंद करण्यासाठी वर्षा मँडमवर वेगवेगळ्या कारणांनी दबाव वाढल्यावर शेवटी लेखमाला बंद करावी लागली . ' मैत्रीत ' उपचार घेणाऱ्यांची संख्या बरीच वाढली होती ..त्या वर्षभरात अनेक जण स्वतःहून उपचारांना आले ..

या काळात आमच्याकडे पुरेसे अनुभवी ..प्रशिक्षित कार्यकर्ते नसल्याने ..कामाचा सर्व भार रवी व माझ्यावर होता ..रवी सामान आणणे ..भाजी आणणे ..भेटीगाठी घेणे ..एखादा समूह उपचार घेणे अशी कामे करत असे ..तर मी वार्डमधील अंतर्गत व्यवस्था सांभाळण्याचे ..किचन मध्ये स्वैपाकाचे ..योगाभ्यास ....ध्यान ..समूहउपचार ..वगैरे पातळींवर व्यस्त होतो ...दिवस कसा निघून जाई काळात नसे ..हळू हळू आमच्या तालमीत तयार कार्यकर्ते मैत्रीत काम करू लागले ..मैत्रीला आर्थिक स्थैर्य येवू लागल्याने मला दरमहिना तीन हजार रुपये मानधन मिळू शकत होते ..ते पैसे रवी परस्पर नाशिकला पाठवत असे ..माझा खर्च असा नव्हताच ..कपडे ..जेवण .इतर किरकोळ खर्च रवी भागवत असे ...तिकडे नाशिकला ही सगळे व्यवस्थित चालले होते ..मानसीने माँटेसरीचा कोर्स पूर्ण करून एका बालवाडीत नोकरी सुरु केली होती ..सुमित पहिलीला गेला होता ...मी मैत्रीत सगळी सकारात्मक कामे करीत असलो तरी माझ्या मनावरील व्यसनाचा सुप्त असलेला पगडा काही पूर्ण निघाला नव्हता ..व्यसनाने सुरवातीच्या काळात दिलेला आनंद इतका गहिरा आणि खोलवर मनात रुजतो ..की व्यसानीला हळू हळू त्यापुढे जीवनातील इतर आनंदाची किंमत व्यर्थ असते ..एकप्रकारे त्याची व्यसनावर गाढ श्रद्धा बसलेली असते ..माझ्या समस्या ..माझी दुखः ..अडचणी ..भावनिक अवस्थता ..वगैरे गोष्टींवर एखादेवेळी व्यसन करून करून मला तात्पुरता दिलासा मिळतो ...त्या अवस्थेत मी चांगला विचार करू शकतो ..माझ्या भविष्याच्या योजना अधिक चांगल्या पद्धतीने आखू शकतो ..वगैरे व्यसनावरील ही श्रद्धा खरे तर अंधश्रद्धा असते ..तरीही माझ्या सारख्या मनस्वी व्यक्तीला ती अंधश्रद्धा आहे हे समजण्यास ..मनातून त्याचा पगडा काढून टाकण्यास बरीच वर्षे घालवावी लागू शकतात ...त्यासाठी व्यसनमुक्तीच्या बाबतीत पूर्ण प्रामाणिकता यावी लागते ...या एकदीड वर्षात मी तीनचार वेळा नाशिकला नातलगांच्या भेटीला जावून आलो ...मनात असलेली व्यसनाची सुप्त ओढ मी मैत्रीत असताना थांबवू शकत होतो मात्र नाशिकला गेलो की सुरक्षित पद्धतीने ..कोणाला समजणार नाही अश्या रीतीने ..एकदोन दिवस मी ..दारू ..ब्राऊन शुगर ..अशी व्यसने करत गेलो ..मानसी व आईला समजले तरी हा परत मैत्रीत जाणारच आहे एक दोन दिवसात ..तेथे आपोआप थांबेल ...या विचाराने उगाच कटकट नको म्हणून कदाचित त्या काही बोलत नसाव्यात ..नागपूरला आलो की मी परत नॉर्मल राही ..अर्थात ही स्वतःचीच फसवणूक चालली होती ....मात्र आपण आता इतरांना त्रास देत नाही या समाधानात हे सुरु होते ....नागपूरला जर परत यावे लागले नसते तर ??? मी पुन्हा तसाच गोंधळ केला असता ..

नाशिकला गेल्यावर असे एकदोन दिवस व्यसन करणे मैत्रीत कोणाला कळत नसे ...परत आलो की माझे पुन्हा नियमित रुटीन सुरु होई ..त्याच काळात मैत्री सोडून पुण्याला गेलेला अँगी परत मैत्रीत आला ..तो रीलँप्स होताच ..व्यसनाधीनतेच्या क्षेत्रात तो देखील माझ्या सारखाच ' पुराना पापी ' असल्याने ..मी नाशिकला जावून गुपचूप पीत असणार हे त्याला लक्षात आले ..एकदा तो मला मी नाशिकला निघालो असताना म्हणाला ' साले अकेले अकेले मजा करत है क्या ? ' त्याचा रोख उघड होता ..तू नाशिकला जावून एकदोन दिवस गडबड करतोस ..अशी माझी खात्री आहे हे त्याला सुचवायचे होते ..मी त्याला सपशेल नाही असे म्हणू शकलो नाही .. " हा थोडा करता हुं " अशी कबुली दिली त्याला ..पुढे तो म्हणाला ' मेरी सोबरायटी अभी जादा हो गई है ..इस बार जरा मेरे लिये भी लेकर आना थोडा प्रसाद ' यावर मी त्याला तसे करणे योग्य योणार नाही ..रवीला समजले तर त्याला खूप वाईट वाटेल वगिरे सांगितले ..तरी तो हट्टाला पेटला ..जवळच्या मित्रांना नकार देणे व्यसानीला जमतच नाही ..शेवटी मी तयार झालो ..नाशिकहून येताना थोडा माल अँगीला आणण्यासाठी ..ती तारीख होती ३ डिसेंबर २००४ ..मी तीन दिवसांसाठी म्हणून नाशिकला जायला निघालो होतो ..निघताना रविकडून सोबत खर्चायला म्हणून एक हजार रुपये घेतले होते ...

( क्रमश: )

=======================================================================

शेवटचा लोचा ! ( पर्व दुसरे - भाग १४९ वा )

त्या नाशिकच्या तीन दिवसांच्या फेरीत ..मी गाडीतून उतरून थेट अड्ड्यावर गेलो ..एकदम हजार रुपयांचा माल घेतला ..दोन दिवस घराच्या बाहेर पडलोच नव्हतो ..सारखा संडास मध्ये जाऊन माल पिणे आणि मग पलंगावर येवून झोपून राहणे ..आईने मला तीन चार वेळा हटकले देखील ..मात्र तेथे मैत्रीत मी खूप कष्ट करतो ..खूप कामे असतात ..येथे मी सुटीवर आलोय तेव्हा मला जरा आराम करू द्या ..माझी तब्येत खराब आहे वगैरे करणे सांगून तिला चूप बसवले ..त्यांना दिलासा इतकाच होता की माझे परतीचे रिझर्व्हेशन झालेले होते ..निघण्याच्या दिवशी पुन्हा अड्ड्यावर जावून माल घेवून ..एक दारूची क्वार्टर घेवूनच गाडीत बसलो .. रात्रभर मी रेल्वेत माझ्या बर्थवर कमी आणि गाडीच्या टाँयलेट मध्ये जास्त वेळ होतो ..अगदी सगळे नियंत्रण सुटल्यासारखे झाले होते ...पहाटे सातला मैत्रीत पोचलो ..माझे डोळे लाललाल झालेले ..मैत्रीतील सगळे कार्यकर्ते आमच्याच हाताखाली तयार झालेले असल्याने संशय येवूनही कोणीही मला काही बोलण्याची हिम्मत केली नाही....खरेतर प्रत्येक व्यसनमुक्ती केंद्रात बाहेरून आलेल्या व्यक्तीची झडती घेण्याची प्रथा असते ..आमच्याकडेही ती प्रथा होती ..फाँलोअपला येणारे पेशंटस ..बाहेर जावून परत केंद्रात आलेले स्टाफ मेम्बर्स ..यांची झडती घेतली जाई ..अर्थात याला अपवाद मी आणि रवी होतो ..कारण आम्हीच तर केंद्राचे सर्वेसर्वा...कोणी माझी झडती घेण्याचा प्रश्नच नव्हता ..अँगी माझी वाटच पाहत होता ..गुपचूप त्याला गुपचूप सोबत आणलेल्या ब्राऊन शुगरच्या दहा पुड्यांपैकी तीन पुड्या दिल्या..आणि कोतवाल नगर मध्ये शिफ्ट झालेल्या सेन्टरच्या वरच्या मजल्यावर संडासात जावून मी दोन पुड्या ओढून ..आराम करतो म्हणून झोपलो ...पाच पुड्या तशाच ठेवल्या ..एकदम सायंकाळी चारलाच उठलो ..रविला तो सकाळी दहाला सेंटरला आल्यावर मी नाशिकहून परत आलोय हे समजले होते ..मात्र मी झोपलो असल्याने आमची भेट होऊ शकली नव्हती ..त्याने देखील आराम करु दे तुषारभाऊंना म्हणून माझी भेट घेतली नाही ..सायंकाळी चारला उठल्यावर ..पुन्हा संडासात गेलो ..सगळा माल संपवून टाकू एकदाचा असा विचार करून ..सुमारे दोन तास मी संडासात चेसिंग करत बसलो होतो ..दोन वेळा मला बाहेरून आमच्या कार्यकर्त्याने रवीने बोलाविले आहे असा निरोप दिला त्या वेळात ..एकदाचा सगळा माल संपवून बाहेर पडलो ..तयार होऊन ...बाहेर ऑफिस मध्ये येवून बसलो ..तेथे रवी ..आमचे दोन तीन कार्यकर्ते ..बरे होऊन फॉलोआपला आलेले आमचे दोन मित्र ..मैत्रीचे हितचिंतक वगैरे बसलेले ..मला पाहून सगळे एकदम चूप झाले ..त्यात मुकुंद नावाचा आमचा एक शुभचिंतक मित्रही होता ..हा मुकुंद बांधकाम व्यावसायिक होता ..मैत्रीचा सच्चा शुभचिंतक ...रवीचा व माझा चांगला मित्र ..अतिशय सरळ आणि स्पष्ट बोलणारा ..

मुकुंदनेच विषय काढला ..' तुषार ..हे काय चालले आहे ? ' मुकुंदचा तेवढा अधिकार होता मैत्रीच्या नात्याने माझ्यावर ...तो मला एकप्रकारे माझ्या वागण्याचा जाबच विचारात होता ..' कुठे काय ? ' मी अनभिज्ञ असल्यासारखे दाखवले ..पुढे मुकुंद म्हणाला .." सकाळी नाशिकहून परत आल्यापासून तू झोपून आहेस ..कोणाला भेटला नाहीस ..संध्याकाळी झोपेतून उठल्याबरोबर संडासात जाऊन बसलास ..दोन वेळा तुला निरोप पाठवावा लागला ..इतका वेळ संडासात काय करत होतास ? ...तू असा पूर्वी वागला नव्हतास कधी .... " मुकुंदचा रोख सरळ होता ..माझ्या सकाळपासूनच्या एकंदरीत वर्तनाबद्दल त्यांना संशय होता ..मी पुन्हा प्यायला लागलोय की काय ? असे एकदम न विचारता मुकुंद तेच वेगळ्या पद्धतीने व्यक्त करत होता .... मी जणू त्या गावचाच नाही असे दाखवत ..माझी तब्येत जरा खराब आहे अशी करणे देवू लागलो ..तितक्यात वार्डमधून अँगी त्याच्या सामानाची बँग घेवून बाहेर ऑफिसात आला ..एकदम सामान वगैरे घेवून अँगी कुठे निघालाय हे मला समजेना .. मुकुंद अँगीला म्हणाला.." आपको नयेसे मौका मिला था इसबार ..लेकीन आपने फिर गडबड कर दी " ..अँगी गुपचूप मान खाली घालून उभा होता ...मुकुंद मला सांगू लागला ... तुषार हा अँगी सकाळी तू झोपल्यावर संडासात गेला होता ..तेथून बाहेर आल्यावर चक्कर येवून खाली पडला ..त्याला सावध झाल्यावर काय झाले असे विचारले तर नीट सांगेना ..खोदून खोदून विचारल्यावर अँगीने ..त्याने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या आहेत हे सांगितले ...म्हणून त्याला आम्ही परत पुण्याला पाठवतो आहोत ..इथे सगळ्या चांगल्या ..शिस्तीच्या वातावरणात याचे असे स्लीप होणे योग्य नाही ..म्हणून सर्वांनी हा निर्णय घेतला आहे " ..एकंदरीत काय प्रकार घडला ते माझ्या लक्षात आले ..मी दिलेल्या तीन पुड्या अँगी संडासात जावून प्यायला होता ..खूप दिवसांनी एकदम अधाश्या सारख्या तीन पुड्या प्यायल्यावर अँगीला नशा जास्त झाली ..संडासातून बाहेर पडल्यावर तो चक्कर येवून खाली पडला ..जेव्हा त्याला याचे कारण विचारले गेले तेव्हा ..त्याने आपण तुषारने दिलेल्या पुड्या प्यायल्याने चक्कर येवून पडलो हे न सांगता ..झोपेच्या गोळ्या खाल्ल्या हे सांगितले ..त्याने माझे नाव मुद्दाम घेतले नव्हते ..मला नुकसान होऊ नये म्हणून ..अँगीला एक प्रकारे सेंटरमधून हाकलण्यात येत होते ...मला ते पाहून कसेसेच झाले ..माझ्यामुळे अँगिला हाकलले जातेय हे मला चांगले वाटेना ..वाटले आपण आता सगळे खरे सांगून टाकावे ..मी सर्वाना खरा प्रकार सांगितला ..मी नाशिकला गेलो होतो तेव्हा ..सोबत ब्राऊन शुगर आणली होती ..त्यातील तीन पुड्या मी अँगिला दिल्या ..म्हणून त्याला चक्कर आली ...त्यात त्याचा काही दोष नाहीय ..सर्वाना बहुतेक याचा अंदाज होता फक्त मला कोणी डायरेक्ट म्हणाले नव्हते ..माझी कबुली ऐकून मुकुंद म्हणाला आम्हाला तोच संशय होता ..बरे झाले तूच कबुल केलेस ते ..आता पुढे आम्ही काय करावे असे तुझे म्हणणे आहे ? 

चूक माझी होती हे मी मान्य केले असले तरी ..त्यावर उपाय काय असे मुकुंदने विचारताच ..म्हणालो या पुढे मी असे वागणार नाही ..अर्थात त्यांना हे इतकेच अपेक्षित नव्हते ..मुकुंद रवीचा प्रतिनिधी म्हणूनच बोलत होता ..कारण रवीच्या मुळच्या संकोची स्वभावामुळे मला स्पष्ट बोलणे त्याला जमले नसते हे मी ओळखले ..मुकुंद म्हणाला आम्ही सर्वांनी तुझ्या बाबतीत असा निर्णय घेतलाय की तू एक महिना रीतसर पेशंट म्हणून पुन्हा मैत्रीमध्ये उपचार घ्यावेस ..मगच जवाबदा-या घ्याव्यास ..एक महिना तू कोणत्याही प्रशासकीय कामात पडायचे नाहीस ..कोणतीही थेरेपी घ्यायची नाहीस ..समुपदेशन वैगरे बंद ..फक्त आपण इथे एक उपचार घेणारे पेशंट आहोत हे समजून वागायचे ..तुला हे मान्य आहे का ? 

( क्रमश : )

========================================================================

मोडेन पण ....वाकणार नाही ! ( पर्व दुसरे - भाग १५० ) 

माझ्या समोर मुकुंदने महिनाभर मैत्रीत पेशंट बनून उपचार घेण्याचा पर्याय ठेवल्यावर मला ते प्रचंड अपमानास्पद वाटले ...माझा अहंकार आडवा आला ..मला सगळे काही माहित आहे ..मीच मैत्री उभी राहण्यास हातभार लावला आहे ...येथील बहुतेक कार्यकर्ते माझ्याच हाताखाली शिकून तयार झालेत ... मी आता त्यांच्याकडेच पुन्हा नव्याने व्यसनमुक्ती शिकायची हे काही माझ्या पचनी पडत नव्हते ..व्यसनी व्यक्ती वर वर जरी कितीही मनमोकळा ..जॉली ..सर्वाना समजून घेणारा ..विनम्र वाटत असला तरी ..आतून तो प्रचंड अहंकारी असतो ..वर्तमानात माझी स्थिती उपचार घ्यावे अशीच होती ..मी जेथे प्रामाणिकपणाचे धडे देत होतो ..व्यसनमुक्तीची माहिती देत होतो ..जेथे मी काटेकोर नियम बनवले होते ..इतरांनी ते नियम पाळावेत असा आग्रह करत होतो ..तेथेच मी स्वतः नियमांचे उल्लंघन केले होते ..इतरांना आपण व्यसनमुक्तीचे धडे देतोय याचा अर्थ असा नव्हे की मी अधून मधून व्यसन करावे ..मैत्रीचे सगळे नियम धाब्यावर बसवून तेथे मी ब्राऊन शुगर घेवून आलो होतो ..प्यायलो होतो ..मी कितीही हुशार असलो ....मैत्रीसाठी कितीही उपयुक्त असलो ..तरी माझ्या चुकांबद्दल मला भरपाई करणे भाग होते ...नुसते ' यापुढे असे करणार नाही ' असे म्हणून भागणार नव्हते ..परत महिनाभर पेशंट बनून राहणे मला मंजूर होत नव्हते ..मी मुकुंदची ..रविशी ..वाद घालू लागलो ..त्यांना मी पूर्वी किती चांगली कामे केली आहेत याची आठवण करून देवू लागलो ..तुम्ही माझ्यावर अन्याय करत आहात असे म्हणून लागलो ...व्यसन सुरु झाल्यावर येणारी नकारात्मकता माझ्या तोंडून बाहेर पडत होती ..अगदी मुर्खासारखा वाद घालत होतो त्यांच्याशी ..आता ते सगळे आठवल्यावर स्वतःचेच हसू येते ..स्वतच्या बुद्धीची कीवही येते ..जी बुद्धी नेहमी मी माझ्या समर्थनासाठी ..बचावासाठी ..इतरांना दोष देण्यासाठी ..इतरांच्या चुका शोधून माझ्यावर कसा अन्याय झालाय हे शोधण्यासाठी वापरली होती ..ती कुशाग्र बुद्धी जर मी ..स्वतःची कर्तव्ये ..जवाबदार-या पार पाडण्यासाठी ...आत्मपरीक्षण करण्यासाठी ...प्रामाणिकपणे व्यसनमुक्त राहण्यासाठी वापरली असती तर ...इतके रामायण माझ्या बाबतीत घडलेच नसते ..परंतु व्यसनी व्यक्तीची अतिरिक्त बुध्दिमत्ता ...जर तो सतत आत्मपरीक्षण करत राहिला तरच त्याच्या भल्यासाठी उपयोगात आणता येते त्याला ....आमच्याकडे सध्या उपचारांना आलेल्या ..उपचारांना न येणाऱ्या ..मी व्यसनी आहे हे मनापासून न समजू शकणाऱ्या ..माझा माझ्यावर कंट्रोल आहे ..मी केव्हाही सोडू शकतो ..पूर्वी मी खूप काहीतरी मोठे काम केले आहे ....मी स्कॉलर आहे एकेकाळचा ..वगैरे समर्थने देवून ...वर्तमानात माझे नेमके काय होतेय ..हे न उमगणाऱ्या सगळ्या मित्रांना ..माझे हेच सांगणे असते ...

मी पुन्हा उपचार घेण्यास अजिबात तयार होत नव्हतो ..कोणी दुसरा व्यक्ती जर असा माझ्या सारखा वाद घालत असता तर ...मी त्यावेळी त्याच्याशी वाद न घालता सरळ त्याला बळाचा वापर करून जबरदस्तीने मैत्रीत डांबले असते ..कारण एकदा व्यसन सुरु झाल्यावर व्यसानीची नकारात्मकता ..आजाराचा नकार जागृत होतो ..अशा वेळी वाद घालण्यात अर्थ नसतो ..सर्वात आधी त्याला व्यसनमुक्त ठेवण्यासाठी उपाययोजना करणे आवशक असते ..एकदा त्याची नशा उतरली की दोन तीन दिवसात तो जरा सरळ विचार करू शकतो ..मुकुंद ..रवी व आमच्या इतर कार्यकर्त्यांना माझ्यावर बळाचा वापर करण्याचे धाडस होत नव्हते ...ते फक्त सन्माननिय पद्धतीने मला वारंवार समजावत राहिले ..शेवटी मला समजावण्याचा शेवटचा मार्ग म्हणून रवीने नाशिकला घरी आईला फोन लावला ..तिला सगळे संगितले ..मला तिने चार समजुतीच्या गोष्टी सांगाव्यात अशी तिला विनंती केली ..आई काय म्हणत आहेत ते ऐका असे म्हणून माझ्याकडे फोन दिला ..फोन घेताना त्याला म्हणालो ..ब्रम्हदेव जरी आला आता तरी मी त्याचेही ऐकणार नाही ..आई मला फोनवर म्हणाली " अरे ..किती वेळा हे असे करणार ..जरा मानसी ..सुमित यांच्या भविष्याचा तरी विचार केला पाहिजेस तू ..काय हरकत आहे पुन्हा उपचार घ्यायला " मला कोणाचेही काहीही ऐकायचे नव्हतेच ..माझा टोकाचा अहंकार मला मोडेन पण वाकणार नाही या अवस्थेला घेवून गेला होता ..मी आईला वेगळेच तत्वज्ञान संगु लागलो ..म्हणालो ' आई .शेवटी माणूस एकटा जन्माला येतो आणि एकटा मरतो ..वाटेत सोबती म्हणून तो नातीगोती निर्माण करतो .. कोणाचे भविष्य कोणामुळे बिघडत नाही ..मी मेलो तरी मानसी व सुमितच्या भविष्याचा मला विचार करण्याची गरज नाही ...तो ईश्वर समर्थ आहे त्यांना सांभाळायला ..ज्याने चोच दिली तो चाऱ्याचाही बंदोबस्त करतो ' वगैरे म्हणत मी आईचा फोन कापला ..मी आत्ताच्या आत्ता मैत्री सोडतोय असे रविला म्हणालो ..हे माझे त्यांना इमोशनल ब्लँकमेल करणे होते ...मी कायमचा मैत्री सोडून जातोय म्हंटल्यावर कदाचित ते त्यांचा मी पुन्हा उपचार घेण्याचा आग्रह सोडून देतील असे मला वाटले होते ..मात्र त्यांनी मला थांबवले नाही ..याचे डोके लवकरच ठिकाणावर येईल अशी कदाचित त्यांना खात्री असावी ..जशी तुमची मर्जी तुषारभाऊ असे रवी म्हणाला ..मी लगेच रवीकडे दोन हजार रुपये मागितले ..रवी पैसे देण्यास मनापासून तयार नव्हता ..हे सगळे पैसे हा व्यसनात उडवेल हे त्याला माहित होते..तरीही सुमारे दोन तासांपासून चाललेल्या वाद्विवादा मुळे सगळेच वैतागले होते ..एकदाचे हे प्रकरण तडीस लगावे असे सर्वांनाच वाटत असावे ...रवीने नाईलाजाने मला दोन हजार रुपये दिले ..मी तडतड करत वार्ड मध्ये जावून माझे समान गोळा केले ..ते घेवून बाहेर आलो ..सर्वाना बाय बाय करून अँगी सोबत सेंटर सोडून निघालो ..मी निघाल्यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता ..काळजी ..दुख: ..माझ्याबद्दलची कणव दिसत होती ..तर माझ्या चेहऱ्यावर अहंकाराचा. ..गुर्मीचा तडफदारपणा ...

बाहेर पडल्यावर कुठे जावे हा प्रश्न होताच ....मात्र त्या आधी आम्हाला ब्राऊन शुगरची गरज होती ....नागपूरला ब्राऊन शुगर कुठे मिळते हे आम्हाला दोघानांही माहित नव्हते ..त्यासाठी मैत्रीत पूर्वी उपचार घेतलेल्या आणि आता रीलँप्स असलेल्या मित्राची गरज भासली ..आम्हाला आठवले एक अनिल नावाचा तरुण मुलगा दोन महिन्यापूर्वीच मैत्रीतून उपचार घेवून बाहेर पडल्यावर पंधरा दिवसात रीलँप्स झाला होता ..अँगिला त्याचे घर कोणत्या एरियात आहे ते माहित होते ..मात्र नक्की गल्ली ...घर नंबर वगैरे माहित नव्हते ..आम्ही त्याला भेटायचे ठरवले ..थंडीचे दिवस ..रात्रीचे दहा वाजलेले ..तो कुठे सापडेल या बाबत शंकाच होती ....तो राहत असलेल्या एरियात त्याचे घर शोधणे तसे सोपे गेले असते ....कारण त्याच्या आई ..संगीताबाईचा दारूचा धंदा होता ..नवरा गेल्यानंतर तिने उदरनिर्वाहाचा मार्ग म्हणून ..गावठी दारू ..मोहाची दारू ..देशी दारू ..विकण्याचा बेकायदेशीर अड्डा चालवण्यास सुरवात केलेली होती ..धिप्पाड शरीरयष्टीच्या संगीताबाईचा दारूचा धंदा प्रसिद्ध होता त्या एरियात ..या संगीताबाई त्यांच्या मुलाला अनिलला मैत्रीत दाखल केल्यावर मला एकदोन वेळेस भेटल्या होत्या समुपदेशनासाठी ..त्यांना मी अतिशय उत्तम प्रकारे दिलासा दिला होता ..माझी चांगली छाप पडली होती त्यांच्यावर ..त्या नक्की माझे स्वागत चांगले करतील अशी मला खात्री होती..एरवी दारूचा धंदा म्हंटल्यावर जसे उर्मट ..तोऱ्यात वागणे असते ..तसेच वागणे असे संगीताबाईचे ..वेळ पडल्यास एखाद्या उधार दारू मागणाऱ्या दारुड्याला गच्ची पकडून ..अर्वाच्च शिव्या देवून बाहेर काढण्याची देखील त्यांच्यात धमक होती .. कसेतरी संगीता बाईंचा अड्डा शोधत तेथे पोचलो ..अड्डा म्हणजे एक अंधारी खोली होती ..आम्ही बाहेरून आवाज दिला ..' संगीताबाई अहो संगीताबाई ' ..कोण आहे म्हणत संगीताबाई बाहेर आल्या ..अंधारात त्यांनी आमचे चेहरे ओळखले नव्हते ..मी पुढे होऊन ..मी तुषार नातू ..असे म्हणालो ..माझा आवाज ओळखून त्यांनी एकदम पदर वगैरे घेतला डोक्यावर ..' अरे .सर तुम्ही कसे काय इथे आलात .? .' म्हणत आदराने पुढे आल्या ..मी त्यांना खोटेच संगितले की मी नाशिकला गेलो होतो दोन दिवसांसाठी ..आता परत आलोय ..मैत्रीत गेलो होतो ..पण तिथे सगळे झोपलेले आहेत ..कोणीच दरवाजा उघडायला उठले नाही ..म्हणून इथे आलोय ..उद्या सकाळी जाईन मैत्रीत ....माझे बोलणे त्यांना पटले होते ..चला ना घरी बसू असे म्हणत त्या पुढे निघाल्या ..अड्ड्यापासून जेमतेम शंभर पावलांवर त्यांचे घर होते ..वाटेत अनिलचे पिणे परत सुरु झालेय ..बरे झाले तुम्ही आलात ..त्याला जरा समजावा सर ...असे त्या सांगत होत्या .. 

( क्रमश : )