मंगलवार, 25 जून 2013

दुनियादारी

नेकी कर ......गाली खा ! (पर्व दुसरे - भाग ३१ वा )


महेशभाऊंनी आपल्या समस्येचे निराकरण झाले नाही तर एकदम दारू प्यायलेले बरे असे म्हंटले तेव्हा मी जरा गंभीर झालो ..गेल्या दोन महिन्यापासून ते व्यसनमुक्त राहत होते ..तसेच मिटिंगला देखील नियमित येत होते या वरून त्यांची व्यसनमुक्ती टिकविण्याची इच्छा मनापासूनची इच्छा दिसली होती ..मात्र उतारवयातील लैंगिक सुखाच्या किरकोळ समस्येला त्यानी मनात मोठे स्थान देवून स्वतःला अवस्थ करून ठेवले ..अनेक व्यसनी व्यक्तींच्या बाबतीत असे घडते की एखाद्या शुल्लक कारणावरून ..किरकोळ घटनेवरून ..एखाद्या व्यक्तीच्या न आवडणाऱ्या वर्तनावरून लगेच ते अवस्थ होतात आणि पुन्हा प्यायला सुरवात करतात ..पुन्हा व्यसन सुरु झाल्यावर समस्या कमी होण्याऐवजी वाढतातच असा अनुभव असून देखील वारंवार व्यसनाचे विचार व तसे वर्तन हाच या आजाराचा वैचारिक धूर्तपणा आहे ...' मला बाहेर दुसरा पर्याय शोधायला हवा ' असे म्हणत त्यांनी लैंगिक सुखासाठी आपली शरीरविक्री व्यवसाय करणाऱ्या स्त्री कडे जाण्याची तयारी आहे हे दर्शविले तेव्हा मी ते फारसे गंभीरतेने न घेता त्यांना ...तुम्हाला हवे ते करा म्हणालो खरा ..पण त्यांच्यातील पांढरपेशा मध्यमवर्गीय माणूस '...सफेद गल्लीत पोलीस येतात म्हणून तेथे जायला घाबरणे स्वाभाविक होते ..मग ते मला म्हणाले की तुमची ' सफेद गल्ली ' येथे ओळख आहे..तसेच भद्रकालीतील पोलीस देखील तुमच्या ओळखीचे आहेत ..तेव्हा तुमच्या ओळखीने मला काहीतरी जमवून द्या .. मी जरा विचारात पडलो ..सफेद गल्लीत जरी माझी ओळख असली तरी तेथिल महिला माझा आदर करत असत ..त्यांच्याकडे हे ध्यान गिह्राईक म्हणून घेवून जाणेमाझ्या मनाला कधीच पटले नसते . म्हणजे एकप्रकारे हे ' एजंट ' असल्यासारखेच झाले असते ..मी महेशभाऊना ' सफेद गल्लीत ' नेण्यास स्पष्ट नकार दिला ..तरीही ते खूपच पाठीमागे लागले म्हणून ..मी त्यांना म्हणालो कि तुम्ही एक काम करा ..मेनरोड वर ज्या ' स्ट्रीट ऑपरेटर्स' ( रस्त्यावर उभे राहून गिह्राईक शोधून ..एखाद्या विशिष्ट लॉज मध्ये जाणाऱ्या ) उभ्या राहतात त्यापैकी एखादीला तुम्हीं गाठा ..तर म्हणाले ..अहो मला त्यांच्याशी बोलणे ..रेट वगैरे ठरविणे जमणार नाही .. म्हणजे पुन्हा वांधा आला .. पुढे महेशभाऊ म्हणाले ' तुम्हीच ते सगळे ठरवा ' ...या प्रकरणात मी आता अडकत चाललो होतो .. बर ठीक आहे असे म्हणत ...मी त्यांना तुम्ही पुढच्या वेळी मिटिंगला याल तेव्हा पैसे वगैरे घेवून या ..मी मदत करीन तुम्हाला असे आश्वासन दिले .


पुढच्या मिटींगला महेशभाऊ छान गुळगुळीत दाढी वगैरे करून आलेले .. नवा सफारी घातला होता ...आल्याबरोबर मला बाजूला घेऊन म्हणाले भरपूर पैसे आणलेत सोबत ..कीती पैसे आणलेत विचारले तर म्हणाले पाच हजार ..१९९३ सालचे पाच हजार म्हणजे भरपूरच होते एकंदरीत ..मिटिंग संपल्यावर बाकीच्या मित्रांना निरोप देवून आम्ही मेनरोडवर आलो ..सोबत माझी सायकल होतीच .. मेनरोडवरील दोन तीन स्ट्रीट ऑपरेटर्स माझ्या ओळखीच्या होत्या ..पण त्यांच्याकडे असा प्रस्ताव घेवून जाणे मला मान्य नव्हते ..एखादी अनोळखी दिसली तर मी तिच्याशी बोलणे करायचे ठरविले ..मेनरोडहून आत सोमवार पेठेकडे जाणारी एक गल्ली आहे ..त्या गल्लीत रस्त्यावर पिवळ्या कव्हरची पुस्तके ..जुनी मासिके ... वगैरे विकणारे लोक बसतात ..तेथे एक सावळी जरा बर्यापैकी दिसणारी मुलगी उभी होती ..तिच्या हावभावावरून ..उभे राहण्याच्या पद्धतीवरून ..ती स्ट्रीट ओपरेटर आहे हे मी ओळखले ..महेशभाऊंनी तिला पाहून पसंतीदर्शक मान हलविली ..धीर करून मी पुढे झालो ..तिच्याकडे पाहून हसलो ..ती देखील ओळख असल्यारखी हसली ..आजूबाजूने जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचे मला दडपण आले होते ..तिच्या जवळ जावून कुजबुजलो ..चलेगी ????? त्यावर मान हलवून तिने होकार दिला ..उगाचच तोंडाला पदर लावून लाजली ..कितने पैसे .. असे विचारल्यावर ..फुल नाईट के पाचसो..एक बार के पचास असा तिने भाव सांगितला .. मी विचार केला हा महेशभाऊ जास्तच काट्यावर आलाय तेव्हा ' फुलनाईट ' असे म्हणून तिला कुठे जायचे हे विचारले तर तिने रविवार कारंजा हून मेनरोड कडे जाणार्या रस्त्यावरील एक लॉज सांगितले ..ठीक आहे अस म्हणून मी महेशभाऊना जवळ बोलाविले ..तिला समजेना नक्की भानगड काय आहे ते .. महेशभाऊ जवळ आल्यावर मी तिला सांगितले .. मला नाही तर यांना बसायचे आहे .. महेशभाऊना पाहून तिचा जरा विरस झाल्यासारखा दिसला .. आता आपण सुटलो असे वाटले पण अजून माझा रोल बाकी होता बहुतेक ..मी एक ऑटो थांबविली त्यात ती बाई आणि महेशभाऊ बसले .. ऑटो सुरु व्हायच्या वेळी महेशभाऊ परत म्हणाले ...तुम्हीं चला न लॉजपर्यंत सोबत ..त्यांचा स्वर काकुळतीला आल्यासारखा होता म्हणून मी त्यांना म्हणालो तुम्ही जा पुढे ऑटोने ..मी सायकल घेवून येतोच तिथे .. लॉज जवळ ऑटो आणि माझी सायकल एकदमच पोचली ..लॉजवाल्याचे भाडे वगैरे ठरवायला देखील मलाच पुढाकार घ्यावा लागला .. मग महेशभाऊ म्हणाले मी जवळ जास्त पैसे ठेवत नाही ..हे तीन हजार तुमच्याजवळ ठेवा असे म्हणत त्यांनी पाच पैकी स्वतःजवळ दोन हजार ठेवले व माझ्याकडे तीन सुपूर्द केले .. त्या स्त्रीला लगेच त्यांनी पाचशे दिले ..आता सुटलो असे वाटले तोच पुन्हा महेशभाऊ म्हणाले ..तुषारभाऊ तुम्ही एक काम करा ना .. याच लॉजवर माझ्या शेजारची रूम तुम्ही घ्या आणि इथेच रहा ..म्हणजे रात्री काही गडबड झाली तर ... कारण लॉजवर देखील म्हणे कधी कधी पोलीस धाड टाकतात .. म्हणतात ना ' बुडत्याचा पाय खोलात ' तसेच होत चालले होते ..महेशभाऊंच्या प्रकरणात मी खोल अडकत चाललो होतो ..हो नाही करता करता मी लॉज वर बाजूच्या रूमवर राहायला तयार झालो .. त्यावेळी सेलफोन नसल्याने घरी देखील निरोप देता येत नव्हता .. !

एकदाचे महेशभाऊ रूमवर पोचले ..मी बाजूचीच रूम बुक केली होती .. जरा वेळ माझ्या रुममध्ये थांबून सहज सिगरेट ओढायला म्हणून बाहेर पडलो .. तर यांच्या रूमचा दरवाजा उघडा दिसला .. रूम समोरून मला जाताना पाहून ती बाई बाहेर आली .. मला म्हणाली तुमचे साहेब पान खावून येतो म्हणून बाहेर गेलेत .. ह्म्म्म ..असे म्हणत मी खाली पान टपरीवर आलो तर तेथे पान खायच्या बहाण्याने खाली आलेले महेशभाऊ दिसले नाहीत .. माझ्या मनात पाल चुकचुकली .. तितक्यात समोरून ते येताना दिसले .. मला खाली उभा पाहून जरा बिचकल्यासारखे वाटले ..मी त्यांच्यावर माझी ' खास ' झाडीची नजर टाकली तर पँटचा खिसा फुगलेला दिसला .. शेवटी महेशभाऊंनी ' काशी ' केलीच होती .. त्यांच्या खिश्यात चक्क क्वार्टर होती .. मी त्यांना रागावलो ...अहो तुम्ही दारू पिऊ नये म्हणून मी इतका खटाटोप करतोय आणि तुम्ही तर क्वार्टर घेवून आलात सोबत .. ते ओशाळले .. पण विनवण्या करू लागले ..फक्त जरा आजच मूड आलाय म्हणू लागले .. आता मला समजले की यांचे सेक्स आणि दारू असे असोशिअशन आहे ..म्हणजे सेक्स करण्याच्या वेळी दारू घेतलीच पाहिजे असे यांच्या अंतर्मनात खोल रुजले आहे ..त्या शिवाय त्यांना तो विशिष्ट आत्मविश्वास येत नाही ..त्यांची पत्नी त्यांच्या पासून दूर का राहते देखील लगेच समजले .. शरीरसंबंधांच्या निमित्ताने यांची दारू सुरु होऊ शकते हि भीती असल्यामुळेच पत्नी त्यांना टाळत असावी .. मी रागावून त्यांना म्हणालो ..मी जातो आता घरी ..तुम्ही तुमचे पहा .. तर चक्क हात जोडू लागले ..अहो प्लीज असे करू नका .. फक्त आजच घेतोय मी .. उद्यापासून नाही घेणार ..वचन देतो वगैरे .. आता मी प्रकरणात चांगलाच अडकलो होतो ..इतक्या सहजासहजी काढता पाय घेणे जमले नसते ..आता यांनी प्यायची तयारी केलीच आहे ..समजावून काही फायदा नाही ....तसेच हे संगमनेर सोडून परक्या गावात आहेत .. यांना असे वाऱ्यावर सोडणे ठीक नाही असे वाटले ... मी त्यांच्यासोबत वर गेलो .. त्यांना ताकीद दिली ..आता परत रुमच्या बाहेर जावू नका ..आणि माझ्या खोलीत गेलो .. दहा मिनिटांनी माझ्या दारावर थाप पडली ..दारात महेशभाऊ .. अर्धी क्वार्टर पोटात गेली असावी .. चांगलाच आत्मविश्वास होता बोलण्यात ..म्हणाले अहो जरा कंटाळा आलाय ..तुम्ही माझ्या रुममध्ये चला गप्पा मारायला .. हे अतीच होते ..तेथे ती स्त्री असताना हे मला कंटाळा आला म्हणत होते .. तितक्यात ती बाई देखील रुमच्या बाहेर आली व म्हणाली ..हा माणूस लई इचीत्र आहे .. फालतू चाळे करत बसलाय .. मुख्य काम सोडून हे ध्यान काहीतरी विकृत गोष्टी करत असणार हे माझ्या लक्षात आले .. ती बाई तरातरा खाली जायला लागली ..तर हे भडकले .. तिला मोठ्याने हाक मारू लागले .. शिव्या देवू लागले ..तमाशा नको म्हणून मी त्यांना रूममध्ये खेचले ...!

( बाकी पुढील भागात )

======================================================


करायला गेलो एक .... ! (पर्व दुसरे -भाग ३२ वा )


महेशभाऊ पोटात दारू गेल्यावर एकदम आक्रमक झाले होते .. त्या बाईला ते शिव्या देवू लागल्यावर मी त्यांना त्यांच्या रूम मध्ये खेचले .. त्यांना शांत करू लागलो ..गडी काही केल्या ऐकायला तयार नव्हता .. त्या बाई कडून पैसे परत घेतो म्हणू लागला .. आता अजून पंचाईत होती .. ती बाई असे पैसे परत देणार नव्हतीच ... तिच्या निघून जाण्यात तिचा विशेष दोष नव्हता .. वयापरत्वे किवा व्यसनाधीनते मुळे ..अथवा इतर काही कारणांनी जर नपुसंकत्व आले असेल तर काही जण प्रत्यक्ष लैंगिक सुखाचा आनंद घेता येत नसल्याने उगाच स्त्री च्या शरीराशी काहीतरी खेळणे समजून विकृत गोष्टी करतात हे मला माहित होते ..हा बुवा त्या पैकीच असावा ...अनेकांना व्यसनाधीनते मुळे तात्पुरते अथवा कायमचे नपुसंकत्व येवू शकते .. एका प्रकारात त्या व्यक्तीची प्रजनन शक्ती कमी होते व मुलबाळ होऊ शकत नाही कारण व्यसनाधीनते मुळे शुक्रजंतू तयार होण्याचे प्रमाण मंदावले असते किवा ते शुक्रजंतू अशक्त निर्माण होऊन .गर्भधारणा होण्यास अडथळा उत्पन्न होतो ..दुसऱ्या प्रकारात शुक्रजंतूच्या बाबतीत सगळे आलबेल असते मात्र व्यक्तीच्या लिंगाला उत्तेजना येत नाही .. त्यामुळे तो प्रत्यक्ष शरीर संबंध करण्यास असमर्थ होतो .. खरे तर व्यसन बंद करून योग्य तज्ञांचा सल्ला घेतला तर नक्कीच लाभ होतो ..परंतु लैंगिकता हि अतिशय नाजूक बाब असल्याने बहुधा लोक लैगिक उपचार तज्ञांकडे जायचे टाळतात ...त्या ऐवजी ते रस्त्यावर बसलेल्या फालतू वैदू कडे ..किवा वर्तमान पत्रात जाहिरात देणाऱ्या एखाद्या भोंदू कडे जातात कसल्या कसल्या जडी बुटी ..' ' सांडे का तेल ' असे अशास्त्रीय उपचार घेवून पैसे घालवतात ..दारू मात्र सोडत नाहीत ..एकाने मित्राने तर एका अश्या बोगस वैदू बाबत सांगितले की त्या वैदू कडे एका खोलीत संबंधित व्यक्तीला नेले जाई ..तेथे तुझ्या अंगात किती लैंगिक पाँवर आहे ते तपासतो असे सांगून त्याच्या लिंगाला दोन इलेक्ट्रिक वायर जोडल्या जात .. जर त्या वायर जोडल्यावर समोरच्या बोर्डवर असलेला हिरवा दिवा लागला तर ..खूप छान लैंगिक शक्ती आहे ..जर पिवळा दिवा लागला तर शक्ती जरा कमी पडतेय ..आणि लाल दिवा लागला तर म्हणे ..लैंगिक पाँवर पूर्ण संपली असे समजायचे .. कोणाला हे कळत नसे की त्या वैदूचा एक माणूस आतल्या खोलीतून बटने दाबून हे दिवे लावतोय .. आम्ही खूप हसलो होतो ते ऐकल्यावर ...पुन्हा तोच मुद्दा होता ..आपल्याकडे ' पुरुषार्थ ' याचा अर्थ केवळ लैंगिकतेशी जोडला जातोय .. तुम्ही लैंगिक संबंधात निपुण असणे किवा मुलबाळ निर्माण करण्याची क्षमता असणे म्हणजेच ' मर्द ' असल्याची खुण मानणे हा निव्वळ मूर्खपणा आहे ...तुमचे ' कर्तुत्व ' केवळ यावरूनच ठरत नाही . उत्तेजनेच्या बाबतीत असलेला कमीपणा हा सातत्याने किमान वर्षभर व्यसनमुक्त राहिले तर जातो .. अर्थात वयपरत्वे लिंगाची उत्तेजना कमी होत जाते हे देखील खरे आहे ... अनेक जण या उत्तेजनेच्या समस्येमुळे पुन्हा पुन्हा दारू पितात ..त्यांना वाटते आपली उत्तेजना कमी झाली म्हणजे आपण त्या अर्थाने ' नालायक ' झालोत ..आपला जोडीदार कदाचित आपल्याला झिडकारेल वगैरे .. तसे काही नसते ..जर आपल्या जोडीदाराशी मनमोकळे पणे चर्चा केली तर हि समस्या सोडविता येते .

ती बाई शरीरविक्रीचा व्यवसाय करणारी होती तरी ती ज्या अर्थी इतकी चिडून निघून गेली ...त्या अर्थी नक्कीच याने काही तरी चाळे केले असणार याची मला खात्री होती ...पैसे काही परत मिळणार नाहीत असे मी त्यांना समजावू लागलो तर म्हणाले .. बर जाऊ दे ..पैसे नाही तर नाही ..पण आता मला अजून एक क्वार्टर प्यायची आहे ..म्हणजे गाडे पुन्हा मूळपदावर आलेले .. मी वैतागलो होतो खूप ..पण पुन्हा या बाबाला असा खिश्यात इतके पैसे ठेवून एकटा सोडणे मला प्रशस्त वाटले नाही म्हणून ..नाईलाजाने त्यांना अजून एक क्वार्टर प्यायला परवानगी दिली ..मला वाटले पिवून हा शांत झोपेल तरी किमान .. रात्रीचा १ वाजत आलेला होता ..शहरातले सगळे ' बार ' व दारूची दुकाने बंद झालेली होती ..मी त्यांना तसे सांगताच ते म्हणाले मुंबई आग्रा रोडवर असलेले ' इनायत कँफे ' उघडेच असते .. म्हणजे यांना सर्व माहिती होती तर .. लॉज सोडून आम्ही ऑटोने ' इनायत कँफे ' ला गेलो .. माझे जेवण बाकीच होते अजून ..तेथे गेल्यावर मी जेवणाची ऑर्डर दिली ..महेशभाऊंनी दारूची ऑर्डर दिली .. काही लोकांचे मेंदू दारूच्या बाबतीत इतके जास्त संवेदनशील असतात की अगदी थोडी जरी दारू पोटात गेली कि त्यांचे ' माकड ' बनते .. ते लगेच शिवीगाळ सुरु करतात ..भांडतात .. वाट्टेल त्या स्तराला जातात ..महेशभाऊ त्यापैकीच होते हे मला नंतर समजले .. मी जेवत असताना त्यांची बडबड सुरूच होती .. वयाला न शोभणारे अश्लील जोक सांगत बसले होते मला ..ते सगळे जोक मला आधीच माहित होते तरीही ..त्यांना खोटे हसून ..टाळी देवून दाद द्यावी लागत होती ...मध्येच ते एका वेटर वर भडकले .. त्याच्याशी भांडू लागले ..हा मंत्री माझा नातलग आहे ..तो आमदार माझा पाहुणा आहे .. वगैरे सांगू लागले .. तितक्यात रात्रीचा राउंड घेणारी एक पोलीस व्हँन आली हॉटेल च्या दारात ..ती गाडी पाहून महेशभाऊ एकदम चूप झाले ..मी देखील जरा घाबरलोच होतो ..जर भद्रकालीतील कोणी माझ्या ओळखीचे पोलीस असतील तर मला रात्री या वेळी इथे पाहून त्यांच्या गैरसमज झाला असता .. सुदैवाने गाडीत कोणीच नव्हते ..ड्रायव्हर ने स्वतच्या जेवणासाठी सरकारी गाडी आणली होती .. अर्धवट जेवण सोडून महेशभाऊना घेवून मी सी .बी एस वर आलो ..जर एखादी संगमनेरला जाणारी बस असेल तर हे पार्सल बसमध्ये बसवून देणार होतो ..मला नंतर लॉजवर जावून माझी सायकल देखील घ्यायची होती .. एकही बस दिसेना संगमनेर कडे जाणारी ..यांचे माकडचाळे सुरूच होते .. स्टँडवर असलेल्या महिलांकडे रोखून पाहत होते .. अचकट विचकट बोलून वर मला टाळी देत होते .. बापरे ..हा बाबा बहुतेक मार खायची पाळी आणणार होता माझ्यावर ..

शेवटी माझी सहनशक्ती संपली ..मी खिश्यातून त्यांनी माझ्याकडे ठेवलेले तीन हजार रुपये काढून त्यांच्या हातावर ठेवले ..त्यांना हात जोडले ..म्हणालो .. हे तुमचे पैसे .. आता माझी जवाबदारी संपली ..मी घरी जातो आहे .. मी घरी निघालेला पाहून ते एकदम असुरक्षित झाले असावेत .. मला थांबा म्हणून गयावया करू कागले ..पण आता मी थांबणार नव्हतोच ..रात्रीचे तीन वाजले होते ..नीट जेवता आले नव्हते ..खूप झोप आली होती ..वर यांचे तमाशे सहन करण्याची इच्छा नव्हती .. मी त्यांच्याकडे पाठ फिरवून चालू लागलो .. दहा पावले पुढे गेल्यावर त्यांची हाक ऐकू आली ' ओ ..सर ..तुषार सर ..थांबा ना ' मी त्याकडे दुर्लक्ष करून पुढे चालतच होतो ..पुन्हा वीस पावले गेल्यावर दुसरी हाक आली .. ' तुषार भाऊ ..अहो थांबा ' मी चालतच होतो ..मग तिसरी हाक आली ' ए तुषार जास्त शहाणा बनू नकोस .. थांब जरा ' मी चालतच होतो आणि शेवटी माझे नाव घेवून त्यांनी शिव्या द्यायला सुरवात केली .. माझे रक्त उकळत होते आतून ..दुसरा कोणी असता तर इतक्या शिव्या ऐकून मी त्याचा मुडदाच पाडला असता .. लहानपणी एकदा मी असेच शिव्या दिल्या म्हणून एकाचे डोके फोडले होते ..पण इथे नाईलाज होता .. विषण्णपणे मी त्या शिव्यांकडे दुर्लक्ष करत चालतच होतो .

( बाकी पुढील भागात )



=============================================

लंगडी माधुरी ...! 
( पर्व दुसरे - भाग ३३ वा )


नाशिकच्या सीबीएस ( बस स्थानक ) पाच सहा वेळा माझे मध्यरात्री जाणे झाले होते ...तेव्हा एकदा सिगरेट संपली म्हणून आसपास कुठे सिगरेट मिळते ते शोधत होतो..मध्यरात्र झाली असल्याने ..आसपास च्या सगळ्या पानटपऱ्या बंद.. एका ऑटो वाल्याला सिगरेट कुठे मिळू शकेल हे विचारले तर तो सहज पणे म्हणाला ' लंगडी माधुरी ' असेल बघा स्टँड वर कुठेतरी गर्दीत बसलेली ..हे ' लंगडी माधुरी ' काय प्रकरण असावे ते समजेना .. त्याने सांगितल्याप्रमाणे सगळ्या सीबीएस वर झाडी केली तेव्हा कँटीनच्या बाजूला एका ठिकाणी चारपाच लोकांचा घोळका दिसला .. तेथे गेलो तर केसात मोगऱ्याचा गजरा माळलेली .. नाकीडोळी सुंदर ..गोरीपान ..अतिशय सुंदर चेहऱ्याची एक मुलगी दिसली ..तिच्या समोर एक पत्र्याची पेटी होती त्यात सर्व प्रकारच्या सिगरेटस ठेवलेल्या होत्या .. लोक तिला पैसे देवून तिच्या कडून सिगरेट विकत घेत होते .. मी देखील दहाची नोट पुढे करून दोन चारमिनार मागितल्या ...तिने सिगरेट आणि पैसे परत दिले ..अपेक्षेपेक्षा कमी पैसे होते ते ..बापरे इतकी महाग ? मी विचारले तर एकदम फिस्कारली ती ..' इतक्या रात्री ..तुम्हाला सिगरेट दुसरीकडे मिळेल का ? हवी तर घ्या ..नाहीतर फुटा इथून ' लगेच दहाची नोट मला परत देवू लागली ..तिचे खरेच होते जरी एक रुपया जास्त घेत होती ती ..तरी इतक्या रात्री सगळ्या पानटपऱ्या बंद असताना सिगरेट मिळणे दुरापास्त होते .. राहू दे ..राहू दे ..असे पटकन म्हणत मी सिगरेट पेटविली .. बाजूलाच उभा राहून त्या मुलीचे निरीक्षण करू लागलो ..तिचा चेहरा अतिशय निरागस होता ..मात्र जीभ एकदम तलवार ... ती पटापट लोकांना हवी ती सिगरेट किवा गुटखा देत होती .. आणि किमतीपेक्षा ५० पैसे ते एक रुपया जास्त आकारात होती..तिने एक ढगळ असा पंजाबी ड्रेस घातला होता .. चेहरा जरी सुंदर होता तरी तिचा ड्रेस मात्र एकदम मळलेला होता ..नीट निरीक्षण केले तेव्हा जाणवले... अरे ही तर सिनेमा नटी माधुरी दीक्षित सारखीच दिसते थोडीशी .. म्हणून कदाचित तिला ' लंगडी माधुरी ' म्हणत असावेत ..तिच्या मानेवर मळाची पुटे चढलेली दिसली .. तिचा एक हात अधू होता .. तिला बहुधा पँरँलीसीस झाला असावा असे वाटले ..तो अधू हात ती छातीशी धरून एका हातानेच सिगरेटचे पाकीट उचलत होती ..ते पाकीट छातीशी धरलेल्या हातांच्या बोटात पकडत होती ..त्या अधू हाताची मधली दोन बोटे सरळ होती बाकीची आतल्या बाजूला वळलेली .. मग पाकीट उघडून सिगरेट देत होती .. कसरतच होती एक ..मात्र सवयीमुळे हि कसरत ती कौशल्याने करत असावी ..मध्येच ती एकावर डाफरली ..' मुडद्या ..नुसता पाहत काय बसला आहेस मला ..पोरगी पहिली नाही का कधी..तो माणूस खजील होऊन तिथून उठला .. मी पण चमकलो ..कारण मी देखील तिचे निरखून निरीक्षण करत होतो ..!

दुसऱ्या दिवशी मी माझा मित्र विलास पाटील याला तिच्याबद्दल सांगितले तर त्याला ती मुलगी आधीच माहित होती ..म्हणाला .. एकदा तिच्याशी बोल तू ..मग कळेल तुला तिची स्टोरी ...मला जगातील समस्त वेगळ्या वाटणाऱ्या ..सर्वसामान्य नसणाऱ्या गोष्टींबद्दल प्रचंड कुतूहल असते .. त्यांची माहिती घेण्याचा माझा प्रयत्न असतो ..म्हणून परत चार दिवसांनी मुद्दाम सीबीएस वर मध्यरात्री गेलो .. ती त्याच ठिकाणी बसलेली होती .. सिगरेट घेवून मी तिच्याकडे पाहून ओळखीचे हसलो तशी एकदम तिचा चेहरा आक्रसला .. तिला ते आवडले नसावे हे समजले मला .. जरा दूर उभा राहून तिच्याकडे पाहत मी सिगरेट ओढत उभा राहिलो .. एक दोन वेळा तिची माझी नजर नजर झाली ..प्रत्येक वेळा तिने रागाने कटाक्ष टाकला माझ्यावर ..त्या काळी खादीचा रंगीत झब्बा ..जीन्स .. पायात कोल्हापुरी चपला दाढी वाढलेली ..असा माझा वेश असे ..अनेक लोक मला पत्रकार समजत.. तिलाही तसेच वाटले असावे म्हणून तिने मला एकदम काहीतरी टाकून बोलणे टाळले असावे .. मात्र रागाची नजर होतीच .. जरा गर्दी कमी झाली असे पाहून मी तिच्याजवळ आत्मविश्वासाने गेलो ..म्हणालो ' मला तुझ्याशी जरा बोलायचे आहे ..तुझी माहिती हवी आहे .. ' तशी पटकन म्हणाली ' मुलाखत घेताय व्हय माझी ??? ' मी पटकन हो असे म्हंटले ..मग म्हणाली ' काय करणार माझी माहिती घेवून ? .. पेपर मध्ये छापून देखील काही फायदा होणार नाही .. ' तिच्या बोलण्याला एक ग्रामीण धार होती ..कदाचित तिला माझ्या बद्दल आता जरा विश्वास वाटला असावा ..मग म्हणाली तुम्हाला थांबावे लागेल जरा ..पहाटे पाच पर्यंत ..चार वाजतच आलेले होते ..अजून एक तास होता ..चालेल.. म्हणालो मी ..बाजूलाच एका बाकड्यावर सिगरेट ओढत बसलो ..मध्ये ती एकदा उठून उभी राहिली ..आणि माझ्या लक्षात आले की तिचा उजवा पाय देखील अधू होता ... पोलियो झाल्यासारखा .. एका बाजूला झुकत लंगडत चालत होती ..बहुधा बाथरूम ला जात असावी ..मला म्हणाली ..जरा लक्ष ठेवा दुकानावर ..मी मानेनेच होकार दिला ..ती लंगडत गेली .. परत आल्यावर मी पुन्हा दोन सिगरेट घेतल्या ..या वेळी तिने माझ्याकडून जास्त पैसे घेतले नाहीत हे विशेष .. पाच वाजण्याच्या सुमारास तिने तिची पेटी आवरली .. मग म्हणाली बोला आता ..आधी जरा बाहेरच्या चहा टपरी वर चहा सांगून येते ..चहासाठी तिने लंगडत जाणे मला प्रशस्त वाटले नाही ..तिला तू थांब ..मी सांगतो चहा म्हणून चहा सांगून आलो ..स्टँड च्या बाहेर ची दुकाने आता उघडत होती .. चहा घेवून झाल्यावर म्हणाली ..माझी कहाणी इथे सांगत बसले तर गर्दी होईल .. लोक उगाचच माझ्या भोवती गोळा होतात .. माझ्या खोलीवर चला म्हणत तिने धड हाताने त्या पेटीला बांधलेली दोरी उचलली आणि खांद्याला टांगली ..माझ्याकडे दे ती पेटी असे मी स्त्री म्हणालो ..तर पटकन म्हणाली .' .रोज येणार आहत का माझी पेटी उचलायला ?? .ज्याचे मढे त्यालाच वाहायचे असते ..'

लंगडत चालत ती बाहेर आली ते पेटीचे ओझे होतेच सोबत ..एका मी तिच्या मागोमाग होतोच ..एका ऑटोवाल्याला तिने हात दिला ..आम्ही दोघेही बसलो .. कँनडा कॉर्नर च्या आधी दुकानांच्या मागे ..एक झोपडपट्टी होती तिथे तिने ऑटो थांबवली .. ..मी पैसे देवू लागलो तर तिने पुन्हा तोच डायलॉग मारला ' रोज देणार आहात का ??? ' झोपडपट्टीत चालत चालत आम्ही दोन तीन गल्ल्या पार करून एका पडक्या झोपडीपाशी उभे होतो .. पडकी झोपडी म्हणजे त्या झोपडीच्या वरील एका बाजूचे प्लास्टिक चे छत फाटलेले होते ..उघडीच होती झोपडी..आत शिरलो तर खूप कचरा साठलेला .. कोपऱ्यात एक गोधडी गुंडाळून ठेवली होती तिने पायाने गोधडी उलगडली न मला त्यावर बस म्हणाली .. मी बसलो ती पण गोधडीच्या कोपऱ्यात बसली .. मग म्हणाली बोला आता काय ते ..तुला हे असे अपंगपण लहान पानापासून आहे का ? ..' हो ..मला पोलिओ होता ..आठवते तेव्हापासून अशीच आहे लंगडी .. तुझे आईवडील कुठे असतात ..असे विचारले तर ..रडू लागली .. पुन्हा स्वतःला सावरले तिने आणि सगळे सांगू लागली .. मालेगाव येथील राहणारी .. आठवीपर्यंत शिक्षण झालेले ..वडील निम्नमध्यम वर्गीय .. चार वर्षाची असताना आई वारली .. मग वडिलांनी दुसरे लग्न केले ..सावत्र आई .. ' सावत्र ' या शब्दाला न्याय देणारी ...कजाग होती .. अश्या पोलीओने अधू झालेल्या अवस्थेतही हिला भांडी घासणे ..कपडे धुणे अशी कामे करावी लागत .. वर लंगडी म्हणून टोमणे होतेच ... जीव नकोसा होई .. मरणे जमत नव्हते .. अधून मधून डोळे पुसत ..ती बोलत होती !

( बाकी पुढील भागात )



=================================================

वासनेचा वणवा ! (पर्व दुसरे - भाग ३४ वा )


प्रथमदर्शनी सुंदर ...बोलताना कठोर ..तर चालताना दयनीय वाटणारी माधुरी जेव्हा आपल्या हृदयात लपविलेले दुखः सांगू लागली तेव्हा अतिशय करुण भासत होती .. बोलता बोलता मध्येच तिचा खालचा ओठ वाकडा होई ..आत मुडपला जाई .. श्वास अडकल्यासारखा होई... ती बाहेर पडू पाहणारा रडण्याचा उमाळा आवरण्याचा प्रयत्न करी ..मात्र क्षणातच बांध फुटून पाण्याचे लोट वाहावेत तशी ती भेसूर स्वरात रडू लागे .. तिने जे काही सांगितले ते एकून मनाची लाही लाही झाली माझ्या .. तिचे खरे नाव माधुरी नव्हे तर ' शीतल ' काहीजणांनी उगाच माधुरीसारखी सुंदर म्हणून तिला माधुरी म्हणायला सुरवात केलेली होती ....सावत्र आईचा जाच सहन करीत ..टोमणे.. शिव्या खात माधुरी घरकाम सांभाळून जमेल तशी शाळेत देखील जात होतील ..पोरीची जात आणि लंगडी म्हणजे आमच्या जीवाला घोर असे सारखे सावत्र आई तिला हिणवत असे ..बाप सावत्र आईच्या हातातील बाहुले बनलेला .. त्याला काही सांगायला जावे तर घरात अजून तमाशा होई ..म्हणून ही मुकाट्याने सारे सहन करीत होती....मी मलगी म्हणून जन्माला आले यात माझा काय दोष हा तिचा निरागस प्रश्न होता ..शिवाय मला मुलीची जात ..जीवाला घोर म्हणून ..टोमणे मारणारी सावत्र आई देखील एक ' स्त्री ' च आहे ..एक स्त्री दुसऱ्या ' स्त्री ' ला स्त्री त्वा बद्दल कशी रागावू शकते हे कोडेच होते तिच्या दृष्टीने .. असे सारे सहन करीत माधुरी मोठी झाली ..आठवीत गेली ..पोलिओमुळे एका पायाने आणि एका हाताने अधू असली तरी निसर्गाने आपले काम चोख केले होते .. वयात येताच माधुरीच्या अडचणी वाढल्या ..आई उगाचच ' बाहेर शेण खाशील ' असे म्हणू लागली ..तिच्या अधू पणाबद्दल एरवी तिची दया करणाऱ्या .. तिच्याबद्दल सहानभूती असणाऱ्या गल्लीतील ..नात्यातील .. शाळेतील पुरुष्यांच्या नजरा आता तिच्या सौंदर्याने दिपू लागल्या ..उगाचच मदत करण्याच्या बहाण्याने होणारे स्पर्श वाढले ..बाहेर पडायची भीती वाटू लागली ..!

सावत्र आईचा एक भाऊ उडाणटप्पू होता ..अर्धवट शिक्षण सोडलेले ..दारू ..जुगार वगैरेची दीक्षा घेतलेला ..तो जेव्हा जेव्हा बहिणीकडे येई तेव्हा ..हिचे लाड करी ..गोळ्या बिस्किटे देई ... त्याचीही नजर आता बदलली होती .. एकदा त्याने डाव साधला ..घरात कोणी नसताना .. अब्रूवर घाला घातला ..अधू मुलगी प्रतिकार कितीसा करणार ? .. नशिबाला दोष देत ही रडत बसली ... आल्यावर सावत्र आईला हे सांगितले तर आईने हिच्यावर विश्वास न ठेवता भावाची बाजू घेतली .. तू लंगडी उगाच माझ्या भावावर आळ घेतेस ..बाहेर कुठेतरी शेण खाल्लेस ..आता माझ्या भावाला यात गोवतेस म्हणून कांगावा करू लागली ....हिलाच मार पडला ..वर बाहेर कुठे बभ्रा करशील तर घरातून हाकलून देईन म्हणून धमकी मिळाली ..काही दिवसांनी पुन्हा तोच प्रकार .. तो आता चटावला होता ..आपले काहीही वाकडे होऊ शकत नाही याची खात्री झाली होती त्याची ...एकदा हा प्रकार सुरु असताना सावत्र आई घरात आली .. प्रकरण पाहून आरडाओरडा करू लागली ...माझ्या सोन्यासारख्या भावाला नासवले या लंगड्या सटवीने असे म्हणू लागली ..लोक गोळा झाले .. त्यांना आईने हिनेच माझ्या भावाला फशी पाडले असे सर्वाना सांगितले ..तो देखील बहिणीच्या बोलण्याला दुजोरा देत होता ....खूप मारले .घरातून हाकलून दिले रडत रडत ..लंगडत ...घराबाहेर पडली ..उघड्यावर आली ... मग पुढचे मात्र तिला बोलवेना .. आता रडून रडून अश्रूही आटले होते नुसतेच कोरडे हुंदके येत होते .. इतके सांगून झाल्यावर ती भकास मुद्रेने माझ्याकडे पाहू लागली .. पुढे काही ऐकायची माझ्यातही हिम्मत नव्हती ...उघड्यावर पडलेले ..राखण नसलेले ..मालक नसलेले पक्वान्न ... काय झाले असेल याची कल्पना करणे कठीण नव्हते .. !

वासनेच्या वणव्यात बिचारी होरपळून गेली होती .. कोणीतरी तिला इथे सीबीएस वर सिगरेट ..बिडी ..विकण्याची कल्पना दिली ..थोडेफार भांडवल दिले .. काही महिने इथे स्थिरावली ..तेव्हा जीवनात एक जण आला ..हिला सहानुभूती दाखवली .. लग्नाचे वचन दिले ..बिचारी हुरळून गेली ..त्याच्या सोबत त्याच्या झोपडीत राहायला गेली ..त्याच्या घरची मंडळी गावी होती .... दोन तीन महिने झाले तरी हा लग्नाचे नाव घेईना ...मग माझ्या घरचे लग्नाला परवानगी देणार नाहीत म्हणू लागला .. शेवटी काय ते समजली आणि पुन्हा सीबीएस वर आली .. लोक गोड बोलून कसा गैरफायदा घेतात याचा चांगलाच अनुभव असल्याने ती सर्वांशी तिरसट बोलण्याची कला शिकली ..तिची सिगरेट विकण्याची वेळ फक्त रात्री सुमारे १ ते पहाटे चार पाच अशी होती ..या काळात जरी ती महाग सिगरेट विकत असली तरी जेमतेम १०० ते २०० रुपयांचा गल्ला मिळे त्यात भांडवल वजा जाता .. तिला तीस चाळीस रुपये मिळत ..इतक्या पैश्यात भाड्याने चांगली खोली घेवून राहणे शक्य नव्हते म्हणून ती या पडक्या झोपडीत राहत होती .. झोपडीत कोणतीच भांडी दिसली नाहीत ..फक्त एका कोपऱ्यात छोटीशी फारशी बसवलेली दिसली .. बहुधा हिची मोरी होती..त्याचा कोपऱ्यात एक प्लास्टिकची बादली ..आणि प्लास्टिकचा मग होता .. वर आडव्या बांधलेल्या दोरीवर एक मळका ड्रेस व टॉवेल लटकत होता .. एकंदरीत तिच्या संसाराची कल्पना आली .. एका हाताने व पायाने अधू असल्याने अंघोळ करताना तिला सगळे अंग नीट घासता येत नव्हते म्हणून तिच्या मानेवर मळाची पुटे दिसली .. चहा ..जेवण बाहेरच होई ..जेवण म्हणजे मिसळ पाव ..वडा पाव ..सामोसे असेच काहीतरी .. तिच्या जवळ पेटीत एक ट्रांझिस्टर होता .. घरात असताना त्यावर लागणारी गाणी ऐकणे हाच विरुंगुळा...म्हणाली मला गाण्याची पण खूप आवड आहे ..त्यावेळी लागलेला माधुरी दीक्षितचा ' साजन ' पाच वेळा पहिला म्हणाली .. तिला जरा मूड मध्ये आणण्यासाठी मी गाणे म्हण एखादे असा आग्रह करू लागलो तर ..जिये तो जिये कैसे ..बिन आपके ' या गाण्याच्या चार ओळी म्हणून दाखविल्या तिने ..मग मला आग्रह करून तिच्यातर्फे एक सिगरेट पाजली ! सुमारे तीन तासांनी तिच्या झोपडीतून बाहेर पडलो तेव्हा बाहेर सगळी कडे जाग आलेली होती ..आठ वाजून गेलेले .. झोपडपट्टीतील लोक माझ्याकडे आश्चर्याने पाहत होते ..पुढे अनेकवेळा माधुरीला भेटलो ..तिला गौड सरांच्या ऑफिस ला देखील नेले होते ..!

( बाकी पुढील भागात )




=================================================


' हमाल भवन ' गुलटेकडी ! (पर्व दुसरे - भाग ३५ वा )


एके दिवशी मला ' सामाजिक कृतज्ञता निधी ' कडून कार्यकर्ता शिबिराला उपस्थित राहण्याविषयीचे पत्र मिळाले ..खाली श्री .नरेंद्र दाभोलकर यांची सही होती .. मलाही या शिबिराला उपस्थित राहण्याची उत्सुकता होतीच ..महाराष्ट्रात वेगवेगळ्या सामाजिक समस्यांसाठी पूर्णवेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी झाल्या असत्या ..त्यांच्या कार्याची माहिती मिळाली असती ...दोन दिवसाच्या या शिबिराचे आयोजन ' हमाल भवन ' पुणे येथे करण्यात आले होते .. याच शिबिरात प्रत्येकाला आपापल्या कामाचा अहवाल देखील सुपूर्द करायचा होता .. ठरल्यानुसार ' हमाल भवन ' येथे पोचलो ..डॉ. बाबा आढाव यांच्या हमाल बांधवांच्या चळवळी बद्दल पूर्वी फक्त एकले होते .. मात्र प्रत्यक्ष हमाल भावनाची इमारत पहिली तेव्हा त्यांच्या कार्याची व्याप्ती लक्षात आली ..हमाल बांधवाना संघटीत करून ..त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांना प्रेरणा देणे .. आंदोलने करणे ..या माध्यमातून सुरु झालेले कामाने मोठे स्वरूप धारण केलेय हे जाणवत होते .. शिबिराला महाराष्ट्राचा विविध भागातून कार्यकर्ते आले होते .. वैशिष्ट्य म्हणजे सर्वांचे पोशाख अगदी साधे होते ..' ग्राउंड झिरो ' म्हणजे प्रत्यक्ष समस्याग्रस्त भागात ..समस्याग्रस्तांसाठी काम करणारे हे सारे कार्यकर्ते त्यांच्या कामाच्या विशिष्ट ध्येयाने झपाटलेले दिसले ..शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी डॉ . नरेंद्र दाभोलकर , निळू फुले , डॉ . श्रीराम लागू ..डॉ . बाबा आढाव , श्रीमती पुष्पा भावे आदि प्रभूती असणार होत्या .. हमाल ..कागद वेचणारे .. कपडे धुणे ..भांडी घासणे आदी घरकाम करणाऱ्या मोलकरणी ..अनाथ ..अंध ..अपंग .. दंगलग्रस्त .. अंधश्रद्धा निर्मुलन .. देवदासी निर्मुलन .. धरणग्रस्त विस्थापित ....आदिवासी .. पर्यावरण ..प्राणी संरक्षण ..अश्या विविध समस्यांसाठी काम करणारे हे कार्यकर्ते आपापल्या क्षेत्रात तज्ञ होते .. तरीही त्यांच्या वागण्या बोलण्यात अतिशय साधेपणा पाहून मी भारावून गेलो ..!

डॉ . नरेंद्र दाभोलकर यांनी प्रस्ताविक करून .. सर्वाना आपापली ओळख करून देण्यास सांगितले .. सामाजिक कृतज्ञता निधी चे मानधन घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा एकमेकांशी समन्वय असावा ..एकमेकांच्या कार्याची ओळख व्हावी हा देखील या शिबिराचा एक हेतू होता ..डॉ ,. नरेंद्र दाभोलकर बाबांचे( डॉ . अनिल अवचट ) मित्र म्हणून पूर्वी ' मुक्तांगण ' मध्ये असताना एकदा तेथे व्यसनमुक्तीच्या वाढदिवस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना मी त्यांना पहिले होते .. अतिशय कार्यक्षम ..सतत कार्यमग्न .. अशी त्यांची बाबांनी ओळख करून दिली होती तेव्हा .. त्यांनी ' मुक्तांगण ' च्या धर्तीवर सातारा येथे ' परिवर्तन ' व्यसनमुक्ती केंद्र सुरु केले होते .. त्या कार्यक्रमात डॉ . दाभोलकर फक्त व्यसनमुक्ती बद्दल थोडेसे बोलले होते ..मात्र या शिबिरात त्यांचे बोलणे ऐकून ..विविध सामाजिक समस्यांबद्दल असलेला त्यांचा व्यासंग समजला .. खादीचा साधा शर्ट ..आणि साधीच पँट असा वेश असणारे डॉ . दाभोलकर सामाजिक कृतज्ञता निधीच्या कामकाजात महत्वाचा सहभाग देतात हे लक्षात आले .. त्यांच्या प्रास्तविकात त्यांनी देशात असलेल्या विविध समस्यांवर प्रकाश टाकत .. त्या समस्यांसाठी पूर्णवेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले .. धार्मिक ..जातीय ..प्रांतीय .. आर्थिक ..शैक्षणिक .. सांस्कृतिक ..अश्या वेगवेगळ्या विषमता असलेल्या समाजात समानतेसाठी .. न्याय हक्कांसाठी ..प्रबोधनासाठी .. तळमळीने काम करणारे कार्यकर्ते म्हणजे ' दीपस्तंभ ' असल्याचा त्यांनी उल्लेख केला ..डॉ . दाभोलकरांचे सर्वात मोलाचे कार्य म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाचे ... समाजात असलेल्या विविध अंधश्रद्धा ..बुवाबाजी .. मंत्रतंत्र .. देवभोळेपणा या सर्व गोष्टींमुळे कसे शोषण केले जाते याचा त्यांचा अभ्यास गाढा होता ..प्रगतीचा ..विकासाचा .. समानतेचा मार्ग अनुसरून आपला देश अधिक समृद्ध कसा होईल ..देशाचा प्रत्येक नागरिक सर्वार्थाने विकास कसा करून घेवू शकेल या विचारांवर श्रद्धा ठेवावी असे सांगितले .

डॉ . दाभोलकर यांच्या नंतर डॉ . श्रीराम लागू बोलले .. मध्यंतरी त्यांच्या ' देवाला रिटायर करा ' या विधानाने बरीच खळबळ उडवून दिली होती .. त्यांनी देव या संकल्पाने बद्दल थोडक्यात परामर्श घेतला ..विविध धर्मानी सूचित केलेला देव अनेकदा लोकांना परावलंबी करतो .. देवावर विसंबून राहून लोक प्रत्यक्ष प्रामाणिक पणे कष्ट करून यश मिळविण्या ऐवजी नवस .. सायास करून .ढोंगी बुवा ..साधू ..चमत्कार करणारे भोंदू यांच्या नादी लागून स्वतचे शोषण करून घेतात .. तसेच काहीही पाप करा आणि तीर्थयात्रा करून ..गंगेत डुबकी मारून ..देवस्थानाला देणगी देवून ते पाप धवून काढा अशी वृत्ती बळावत चालल्याचे नमूद केले .. त्यांचे म्हणणे देवाला रिटायर करा याचा अर्थ देवावर विसंबून राहू नका अश्या अर्थाचे होते .. प्रत्येकाची श्रद्धा असतेच एखाद्या व्यक्तीवर ..विचारांवर .. कार्यावर .. मात्र जेव्हा श्रद्धेचे रुपांतर अंधविश्वासात होते तेव्हा माणूस बुद्धी गहाण ठेवतो हे देखील खरे होते ..मानवाने स्वतच्या शक्तीचा .. बुद्धीचा ..संपत्तीचा ..सामाजिक स्थानाचा अहंकार बाळगून इतर मानवांवर अन्याय करू नये ... आपल्या सगळ्या कर्माचा हिशोब कोठे तरी द्यावा लागेल .. आपल्या अनैतिक कृत्यांची कोणीतरी दखल घेतेय ....याची मनात नोंद ठेवून अनाचार करू नये या हेतूने तसेच .. भीषण संकटात .. आपत्तीत ..गंभीर आजार ..समस्या आल्या असताना कोणीतरी तारणहार आहे या विचाराने धीर मिळावा ....संकटांचा सामना करण्याची शक्ती मिळावी सुख -दुखः , आशा -निराशा .. जन्म -मृत्यू , या निसर्गनियमांचा स्वीकार करण्यास मनाची तयारी असावी या हेतूने कदाचित देवाची ..धर्माची निर्मिती झाली असावी .. परंतु जर ज्ञात विज्ञानाला अनुसरून आपण बुद्धीचा उपयोग केला नाही तर .. शोषण होते .. माणूस दैवाधीन वृत्तीचा बनतो .. अश्या प्रकारचे मनोगत त्यांनी व्यक्त केले .. त्यांचे बोलणे मुद्देसूद होते ..त्यानंतर निळू फुले बोलले .. त्यांनी विविध सामाजिक समस्यांबद्दल चिंता व्यक्त करून .. माणसाने सर्व प्रथम माणुसकी धर्माचे पालन केले पाहिजे असे सांगत ..जरी मी सिनेमात अन्याय करणाऱ्या .. दुष्ट ..स्वार्थी .. कपटी ..वासनांध अशी भूमिका करत असलो तरी व्यक्तिगत जीवनात मी निर्व्यसनी आहे तसेच सदाचारी आहे हे नमूद केले .. 

( बाकी पुढील भागात )

मंगलवार, 18 जून 2013

अनोखी दास्तां


अनोखी प्रेमकहाणी ! (पर्व दुसरे -भाग २६ वा )


डॉ .मीना यांच्या प्रभावी आवाहनानंतर मग आपल्या व्यथा मांडण्याची जणू चढाओढच लागली .. बहुधा सगळ्यांच्या व्यथा सारख्याच होत्या ..आणि अपेक्षा एकच आम्हाला एक माणूस म्हणून तरी किमान सन्मान मिळायला हवा .. या पैकी काही महिला रस्त्यावर कोपऱ्यात उभ्या राहून किवा थियेटर च्या बाहेर उभ्या राहून व्यवसाय करणाऱ्या होत्या यांना स्ट्रीट ऑपरेटर्स असे म्हंटले जाते .. अश्या स्ट्रीट ऑपरेटर्स रस्त्यावर उभ्या राहून ग्राहक शोधात असत .. इच्छुक व्यक्तीशी संपर्क झाला कि मग त्याच्या सोबत एखाद्या हॉटेल मध्ये किवा तो नेईल त्या ठिकाणी जात असत ..अनेकदा याची फसवणूक केली जाई ..एक जण त्यांना घेवून त्याच्या ठिकाणी घेवून जाई व तेथे गेल्यावर एकाऐवजी चार पाच जण सक्तीने त्य महिलेचा उपभोग घेवून ..तिला योग्य मोबदला न देता हाकलून दिले जाई... अश्या वेळी तिने कोणाकडे तक्रार करायची ? .. तसेच रस्त्यावर उभ्या राहिल्या की आसपासचे दुकानदार अशा महिलेला माझ्या दुकानासमोर उभी राहू नकोस म्हणून हाकलून लावत .. अचकट ..विचकट बोलत . ..त्या नुसत्या जरी रस्त्यावर उभ्या राहिल्या तरी पोलीस त्यांच्यावर ..सार्वजनिक ठिकाणी अश्लील इशारे करणे ..अशा प्रकारचे कलम लावून केस करत असत किवा मग पैसे उकळले जात .. काही महिलांना ग्राहक दारू पिण्याची सक्ती करत असत .. ग्राहकाचे ऐकले नाही तर धंदा कसा होणार म्हणून त्यांना दारू घ्यावी लागे ...काही जण गुदासंभोगाची अपेक्षा करत असत .. पोटासाठी ते देखील सहन करावे लागे ... प्रत्येकीची व्यथा दाहक होती .. या महिलांच्या बोलण्यानंतर त्यांना धीर देवून संमेलनाची सांगता झाली .. किमान आपले म्हणणे कोणीतरी साहेब लोकांनी ऐकून घेतले हे तरी समाधान त्यांना नक्कीच मिळू शकले ...!

' सफेद गल्ली ' येथे आम्ही कार्यकर्ते आठवड्यातून किमान एकदा तरी जावून या महिलांच्या भेटी घेवून वारंवार त्यांना कंडोम वापरला प्रोत्साहित करत असू .. या ठिकाणी आम्हाला एक मुलगी भेटली ..साधारण पंचविशीची असावी .. सावळी..कृश बांध्याची .. नेहमी आजारी असल्यासारखा चेहरा करून ती एका कोपऱ्यात बसून राही .. तिला कधी नट्टा पट्टा करून इतर महिलांसोबत हास्यविनोद करताना आम्ही पाहिले नव्हते .. तिच्या कडे रोज दुपारी एक जण डबा घेवून येई .. ते दोघे एकत्र जेवत आणि मग तो माणूस निघून जाई ... कुरळे केस ..चांगला धडधाकट ...दिसायला बरा या सदरात मोडणारा हा तरुण तिशीचा होता .. त्याची चौकशी केल्यावर कळले कि तो एका हॉटेलात वेटर म्हणून काम करतो ..या जोडीबाबत आम्हाला अतिशय कुतूहल होते ..एकदा न राहवून आम्ही विचारलेच त्या मुलीला... साधना असे तिचे नाव म्हणूयात आपण .. साधना मराठवाड्यातील एका खेड्यातील मुलगी बारावी पर्यंत शिकलेली होती ..निम्न मध्यमवर्गीय घरातील .. बारावीत असताना तिचे गावातीलच एका मुलासोबत प्रेम संबंध जुळले .. जातीची अडचण आली म्हणून घरातून या प्रेम संबंधाना विरोध झाला .. शेवटी त्याने तिला पळून जाण्याचा प्रस्ताव दिला ..एके दिवशी दोघे घरातून पळून मुंबईला गेले ..सोबत तिने घरातून काही पैसे देखील चोरून नेले होते .. मुंबईला एका परवडेल अश्या हॉटेल मध्ये जेमतेम तीन चार दिवस राहिल्यानंतर ..का कोण जाणे त्या मुलाने साधनाला तशीच हॉटेल मध्ये सोडून देवून पलायन केले ..भानावर आली तेव्हा सर्व संपले होते .. आता परत गावी जाणे शक्यच नव्हते ..कारण सर्व गावात बदनामी झालेली होती .. आपल्या मुळे कुटुंबियांना त्रास नको ..म्हणून तीने परत घरी जायचा मार्ग स्वीकारला नाही .. एकाने हिला मुंबईहून पुण्याला आणले .. पुण्यात 'बुधवार पेठ ' येथे विकले .. हिला बिचारीला आता काहीच पर्याय उरला नव्हता ..तेथे काही दिवस शरीर विक्रय केल्यावर तिची तब्येत बिघडली ..तपासण्या केल्यावर समजले की ती एच .आय .व्ही पाँझिटीव्ह झालीय .. आभाळच कोसळले होते .. सगळ्या वस्तीला हे माहित पडल्यावर तिच्याकडे कोणी ग्राहक फिरकेना ..मग ती नवीन जागी जावे म्हणून नाशिकच्या ' सफेद गल्लीत ' आली ..तिला आजाराचे महत्व समजले होते म्हणून ती ' कंडोम ' शिवाय कोणाला बसू देत नसे ..नाशिक मध्ये या वेटर ची तिची ओळख झाली त्याचे नाव अरुण ..अरुण विवाहित होता ..मात्र विवाहानंतर पाच वर्षात त्याची पत्नी अपघातात गेलेली होती ..त्याला एक लहान मुलगा देखील होता ..अरुण पत्नीच्या मृत्युनंतर शरीर संबंधांच्या गरजेपोटी सफेद गल्लीत येत असे .. निर्व्यसनी .. प्रामाणिक पणे हॉटेल मध्ये वेटर म्हणून नोकरी करणारा अरुण जेव्हा साधनाच्या सहवासात आला तेव्हा ...ती करत असलेला कंडोम चा आग्रह पाहून त्याला जरा कुतूहल वाटले .. त्याने विश्वासात घेवून विचारले तेव्हा साधनाने त्याला सर्व कहाणी सांगितली .. !

साधनाची कहाणी ऐकून अरुणच्या मनात तिच्याबद्दल प्रेमभाव जागृत झाला .. ती एच .आय .व्ही ,बाधित आहे हे माहित असून देखील अरुणने तिच्याशी लग्न करायची तयारी दर्शविली ..मात्र साधनाने माझ्यासारख्या शरीरविक्रय करणाऱ्या तसेच एच .आय .व्ही बाधित महिलेशी लग्न करणे म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे असे सांगून अरुणला लग्नाला नकार दिला ..शेवटी असा पर्याय निघाला की साधनाने ' सफेद गल्ली ' येथेच रहावे ..अरुण तिला रोज भेटत होता ..तिच्यासाठी तो घरी स्वैपाक करून दुपारी जेवण घेवून येई .. दोघे नवराबायको सारखे एकत्र जेवत ..मग दुपारी अरुण हॉटेल मध्ये कामाला जाई .. अजबच होते सगळे ..आम्ही एकदा अरुणला देखील गाठले ..त्याला साधनाकडून आमच्या बदल माहिती समजली असावी ..तो देखील मोकळेपणी बोलला .. म्हणाला लग्न नंतर पत्नी चार वर्षाच्या मुलाची जवाबदारी माझ्यावर टाकून निघून गेलेली .. शारीरिक भूक भागविण्यसाठी येथे यावे लागले ..साधनाशी ओळख झाल्यावर ..तिची कहाणी ऐकून तिच्याबद्दल मनात प्रेम आणि करुणा दोन्ही निर्माण झाले ..तिच्याशी लग्नच करणार होतो ..पण ती लग्नाला तयार नाही ..म्हणून रोज एकदा तरी तिला भेटायला येतो ..साधना पुढे अधिक आजारी पडत गेली ..तिच्या मानेवर टी.बी,च्या गाठी आल्या ..तेव्हा अरुणने तिला शासकीय दवाखान्यात भारती केले ..तिच्याजवळ थांबून तिची सृश्रुषा केली .. मात्र वर्षभरातच साधना गेली .. अरुणने शेवट पर्यंत तीला साथ दिली होती .. पुढे एकदा एका गर्दुल्ल्या मित्राच्या घरी फॉलोअपला गेलो होतो तेव्हा त्याच गल्लीत अरुण भेटला ..तो तिथे जवळच राहत होता ..आग्रहाने मला घरी घेवून गेला .. घरात त्याचा छोटा मुलगा देखील होता .. अगत्याने चहा केला ..माझे लक्ष भिंतीवरच्या फोटोंकडे गेले .. एक फोटो अरुण आणि त्याच्या बायकोचा होता लग्नाच्या वेळचा ..आणि बाजूला दुसरा फोटो होता ..साधनाचा .. दोन्ही फोटोला हार घातले होते .. मी मनातल्या मनात अरुणला सलाम केला !

( बाकी पुढील भागात )

===================================================

शापित .....? ? ? ? ? ? (पर्व २ रे -  भाग २७ वा )

' एड्स ' संदर्भात कार्य करताना ..संबंधित असलेल्या सगळ्या घटकांची आपोआप माहिती मिळत गेली मला .. लैंगिकतेशी संबंधित आजार असल्याने लैंगिक संबंधांचे सारे वैध ..अवैध प्रकार मला माहित होत गेले .. विभिन्न्न लिंगी आकर्षण हे नैसर्गिक मानले जाते ..परंतु एका पुरुष्याने दुसऱ्या पुरुष्याशी लैंगिक संबंध ठेवणे किवा एका स्त्री ने दुसऱ्या स्त्री शी लैंगिक संबंध ठेवणे हा प्रकार आपल्या देशात तरी अनैतिक या सदरात मोडतो ..काही लोकांच्या दृष्टीने तर हा प्रकार अतिशय किळसवाणा मानला जातो ..आठवीत असताना एकदा NCC च्या दोन दिवसांच्या कँम्प ला गेलो होतो तेव्हा ..रात्री मी झोपेत असताना .. शरीरावर कोणाचा तरी हात रेंगाळतोय असे जाणवले होते .. तो हात नको तिथे जावू लागताच मी पटकन उठून बसलो आणि शिव्या घातल्या बाजूच्या थोराड मुलाला ..तो खजील होऊन बाजूला सरकला होता ..मोठा होत गेलो तसा याबाबत काही ऐकीव माहिती गोळा होत गेली ..त्यामागची शास्त्रीय कारणे जरी नीट समजली नव्हती तरी एकंदरीत हा प्रकार समजायला मदत मिळाली .. काही लोकांना मूलतः असे आकर्षण असते .. काही वेळा याचे कारण लैंगिक उपासमार असू शकते ...किवा हार्मोन्स मधील असंतुलन ... विशिष्ट मानसिकता ...वयात येताना योग्य लैंगिक माहितीचा अभाव हे देखील एक कारण असू शकते .. नाशिकरोडला असा एक माणूस आम्हाला माहित होता ..जो विवाहित होता ..त्याला मुलेबाळे होती ..हा गृहस्थ सार्वजनिक मुतारीच्या आसपास रेंगाळायचा नेहमी ..आणि कोणी मुतारीत गेले कि त्याच्या बाजूला उभा राहून निरीक्षण करायचा ..तो म्हणे आपले सावज हेरत असे .. त्याला म्हणे आधी एखाद्या पुरुषाने त्याच्या सोबत गुदा मैथुन केल्याशिवाय लैंगिक उत्तेजना येत नसे ..अश्या प्रकारच्या व्यक्तीला टपोरी भाषेत 'अठ्ठा..म्हणजे आठ नंबरचा ' ' रिव्हर्स गियर ' असे म्हणतात हे असे आकर्षण बहुधा लहान वयात इतर पुरुष्यांकडून लैंगिक शोषण केले गेल्यामुळे निर्माण होत असावे ..म्हणजे लहानपणी जर समलैंगिक संबंधांचे आकर्षण असणाऱ्या एखाद्या माणसाकडून मुलाचे लैंगिक शोषण केले गेला तर .त्या मुलाला लैंगिक संबंध म्हणजे असेच असते असे वाटू लागते ..पुढे वयात आल्यावर जरी हार्मोनल बदलांमुळे तो पूर्ण पुरुष होत गेला तरी ..सुप्त मनात समलैंगिक संबंधांचे आकर्षण उरतेच .. त्याला त्याला लैंगिक उत्तेजना येण्यासाठी म्हणे आधी कोणातरी पुरुश्याशी लैंगिक संबंध करावे लागतात त्याशिवाय त्याला उत्तेजना येत नाही ..हि मानसिकता खरे तर शास्त्रीय मानसिक उपचारांनी बरी होऊ शकते मात्र त्यासाठी समस्या असलेल्या व्यक्तीने लैंगिक उपचार तज्ञाकडे जायला हवे ....यात अक्टीव आणि पँसीव्ह असे दोन प्रकार आहेत .. पहिल्या प्रकारात असा संबंध करून घेण्याची आवड असते ..तर दुसऱ्या प्रकारात असा संबंध करण्याची आवड असते ..टपोरी भाषेत ' मारून घेणे ' हा पहिला प्रकार तर ' मारणे ' हा दुसरा प्रकार असे म्हणता येईल थोडक्यात काय तर ..लहान मुलीच नव्हे लहान मुलांचे देखील शोषण होऊ शकते... .त्यामुळे त्यांच्यावर ही लक्ष ठेवणे गरजेचे आहे !

पुढचा प्रकार तर केवळ लैंगिकतेचा अतिरेक या सदरात मोडणारा असतो याला हेट्रो सेक्सुयल किवा बायो सेक्सुयल असे म्हणतात अश्या लोकांना केवळ स्त्री शी संबंध करून समाधान होत नाही म्हणून एकाच वेळी स्त्री आणि पुरुष हे दोघेही सोबत असतात आणि ही व्यक्ती दोघांशीही त्याला वाटेल त्या प्रकाराने संबंध ठेवते .. लैंगिक स्वातंत्र्य या सदराखाली असे प्रकार सध्या वाढत आहेत ...त्या नंतरचा चा प्रकार हार्मोनल असंतुलना मुळे अथवा विशिष्ट मानसिकते मुळे तयार होतु शकतो ज्याला ' होमोसेक्शुअल ' किवा ' लेस्बियन ' असे म्हणतात ..पुरुष्याला पुरुश्याशी संबंध ठेवण्याचेच आकर्षण आढळते किवा एखाद्या स्त्री ला स्त्री शी संबंध ठेवण्यास आवडते .. या संबंधाना कायदेशीर मान्यता मिळावी म्हणून प्रयत्न सुरु आहेत अश्या लोकांचे ..अर्थात तत्वतः असले प्रकार मान्य असले तरी सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीकोनातून विचार केला असता अशी कायदेशीर मान्यता मिळणे कठीणच आहे .. पुढचा अतिशय दुर्दैवी प्रकार आहे तो म्हणजे ' हिजडा ' किवा ' छक्का ' ... काही मुलं जन्मत:च हिजडा म्हणून जन्माला येतात, अशी आपल्याकडे समजूत आहे. पण हे अजिबात खरं नाही. हिजडा कसा तयार होतो, याची शास्त्रीय कारणं समजून घेणं गरजेचं आहे. गर्भधारणा होताना .X क्रोमोझोम्स एकत्र आले तर मुलगी आणि X व Y क्रोमोसोम असले तर मुलगा हे समीकरण आता सगळ्यांना माहीत आहे. मात्र पहिले सहा आठवडे लिंगाचं स्वरूप मुलगा आणि मुलगी दोघांतही सारखंच असतं. त्यानंतर क्रोमोझोन्स विशिष्ट जनुक कार्यान्वित होतो. त्यातून जननेन्द्रिय विकसित व्हायला सुरवात होते बहुसंख्य वेळा हि नैसर्गिक प्रक्रिया गर्भात सुरळीत होते ...मात्र काही ठिकाणी यात गडबड होते गर्भ पुरुष असेल तर त्याची पुरुष जननेंद्रिये योग्य प्रकारे विकसित होत नाहीत किवा जरी जननेंद्रिये जरी विकसित झाली तरी लिंग पुरुष्याचे व मानसिकता मात्र स्त्री ची असते काही काही ठिकाणी उलटेही होते .. अश्या तृतीय पंथी लोकांना सामाजिक सृष्ट्या उपेक्षित जीवन वाट्याला येते .. रामायणात यांच्या संदर्भात एक गोष्ट अशी आहे की प्रभू श्रीराम जेव्हा वनवासात जायला निघाले तेव्हा त्यांना सर्व अयोध्यावासी वेशी पर्यंत निरोप द्यायला आले होते ..शेवटी रामचंद्रांनी सर्व स्त्री पुरुष्यानी आता आपल्या घरी जावे असे सांगितल्यावर सर्व आपापल्या घरी निघून गेले मात्र जे स्वतः आपण स्त्री आहोत कि पुरुष आहोत हे ठरवू शकत नव्हते असे लोक तेथेच उभे राहिले .. श्रीराम वनवासातून येईपर्यंत ते तेथेच होते ..१२ वर्षांनी परत आल्यावर त्यांना तेथेच उभे पाहून श्रीरामांना गहिवरून आले ..त्यांनी यांना वर दिला कि तुम्ही दिलेला आशीर्वाद नेहमी फळाला येईल ..तेव्हापासून जरी यांच्या आशिर्वादाला किवा शापाला महत्व प्राप्त झाले असले तरी यांचे सामाजिक स्थान मात्र उपेक्षितच राहिले ...!

असे लोक जरी लैंगिक दृष्ट्या अपूर्ण असले तरी बौद्धिक ....शारीरिक व इतर बाबतीत सर्व सामान्यांसारखे असतात ... मात्र सामाजिक दृष्ट्या उपेक्षित असल्याने यांना काही कामधंदा मिळणे दुरापास्त आहे .. अर्थात म्हणून हे लोक लग्न ..बारसे ..व इतर मंगल कार्याच्या ठिकाणी जावून भिक मागतात .. त्यांच्या बाबत प्रचलित असलेल्या कथेमुळे लोकही त्यांच्या आशीर्वाद शुभ मानून त्यांना पैसे देतात ..यातील काही लोक मात्र जरा लालची प्रवृत्तीचे आढळतात ते हवे तेव्हढे पैसे मिळावेत म्हणून किळसवाणे हावभाव करतात ..टाळ्या वाजवणे ..अश्लील वाटावेत असे अंगविक्षेप करणे ..हे प्रकार करून अनेकदा हे लोक सार्वजनिक ठिकाणी भिक देण्यासाठी जबरदस्ती करतात .. अश्या लोकांमुळे हि जमात अधिक बदनाम होते आहे ..आताश्या तर काही लोकांनी भिक मागण्याचा यशस्वी पर्याय म्हणून अश्या मुद्दाम साड्या नेसून ..स्त्री सारखे हावभाव करून हे ' नकली हिजडा ' बनणे सुरु केले आहे .. खरे तर हे लोक शारीरिक श्रम करू शकतात ..त्यामुळे नोकरी धंदा करू शकतात ..मात्र सामाजिक उपेक्षेमुळे त्यांना हे करता येत नाही .. ! सध्या विकसित असलेल्या विज्ञानामुळे अशी विरोधी मानसिकता असलेले लोक लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून घेतात .. पुरुषी मानसिकता असलेल्या स्त्रिया शारीरिक सृष्ट्या देखील पुरुष बनतात तर स्त्री ची मानसिकता असलेले पुरुष शारीरिक दृष्ट्या देखील स्त्री बनू शकतात ... एकंदरीत विज्ञान हे या लोकांसाठी वरदान ठरलेले आहे ..लैंगिकता हा आपल्या जीवनातील महत्वाचा भाग आहेच ...मात्र केवळ लैंगिकता म्हणजेच जीवन नव्हे हे लक्षात घेतले तर या पैकी अनेक गोष्टीत बदल होऊ शकेल असे वाटते 

( बाकी पुढील भागात )


=================================================


अरुण दाते यांची भेट ! (पर्व दुसरे -भाग २८ वा )


नाशिक मध्ये मी स्थिरावत असताना ... ' आझाद सेना ' सुरु करण्यास पुढाकार घेणारा ..क्रांतिकारी विचारांचा माझा मित्र विलास पाटील हा पुन्हा माझ्या संपर्कात आला .. त्याचे विचार अजूनही तसेच क्रांतिकारी होते .. मात्र वयपरत्वे तो थोडा मवाळ झाला होता ..मी व्यसनमुक्त असलेला पाहून त्याला खूप आनंद झाला ..तो देखील आता नाशिक रोड सोडून नाशिकला सिडको वसाहतीत राहायला आला होता त्यामुळे तो नियमित भेटू लागला .. त्याच्या सोबतीने मी इतर कामांसोबतच नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात देखील वावरू लागलो .. परशुराम सायखेडकर नाट्यगृहात होणारे काव्यसंग्रहाचे प्रकाशन समारंभ ..सार्वजनिक वाचनालयातर्फे होणारे सांस्कृतिक कार्यक्रम .. वगैरे ठिकाणी जावू लागलो होतो .. त्यानेच जयविजय सासीणे ( निपाणीकर ) नावाच्या वाल्लीशी माझी ओळख करून दिली ..हा जयविजय प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत होता ..अतिशय संवेदनशील ..हुशार .. निर्व्यसनी ..सामाजिक प्रश्नांबद्दल अत्यंत जागरूक असणारा .. वयाच्या तिशीतच ' आदर्श शिक्षक ' हा पुरस्कार मिळवलेला ..याने आधी msw केले मग MA.b.ed केलेले होते ..याला देखील साहित्याची आवड . ..अफाट वाचन मध्यम उंची ..सावळा वर्ण .. चेहऱ्यावरून एकदम शांत वाटणारा ..मात्र बोलू लागला ध्यानात येई की हे पाणी वेगळेच आहे ..जयविजयशी देखील माझी पटकन मैत्री जमली होती .. माझ्या पूर्व आयुष्याबद्दल ऐकून असल्यामुळे ..तो नेहमी माझी व्यसनमुक्ती टिकविण्यास मला मदत करी .. तो देखील त्याच्या सामाजिक कार्याच्या आवडीमुळे डॉ. गौड यांच्या कार्यात सहभागी झालेला होता .. त्याची नाशिकच्या साहित्यिक स्तरात चांगली ओळख होती ..एकदा त्याने माझी भेट श्री .वसंत पोतदार यांचेशी घालून दिली ..वसंत पोतदार हे एक बेदरकर व्यक्तिमत्व ..स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर आधारित ' योद्धा संन्यासी ' हा कार्यक्रम ते गेली अनेक वर्षे सादर करीत आले होते ..गावोगाव भटकून तरुणांमध्ये स्वामी विवेकानंदांचे विचार रुजविण्यासाठी हा कार्यक्रम करीत असत .. खणखणीत उच्चार ..स्पष्ट वाणी .. ओघवते वक्तृत्व ..आणि आक्रमक शैलीत सादर केलेले ' योद्धा संन्यासी ' हे एकपात्री कथन पाहणे हा एक रोमांचक अनुभव होता .. वसंत पोतदार त्यावेळी नाशिक मध्ये स्थायिक झालेले होते ..माझी स्टोरी ऐकून त्यांनी नाशिक च्या 'दैनिक ' देशदूत ' मध्ये ब्राऊन शुगरच्या भयानक परिणामांबद्दल तसेच या समस्ये बद्दल लिहायचे ठरवले ..ते माझ्यासोबत गर्दच्या आहारी गेलेल्या मुलांना भेटले ..त्यांची माहिती घेतली व ' गर्द चे गारदी ' या नावाने त्यांनी ' देशदूत ' मध्ये लेखमाला लिहिण्यास सुरवात केली .. लेखमालेच्या सुरवातीला त्यांनी व्यसनमुक्तीचा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख देखील करून दिली होती .. माझी माहिती सांगत असताना मी त्यांना ' मुक्तांगण ' मध्ये दाखल होण्याच्यावेळी कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेले व श्री .अरुण दाते यांनी गायिलेले ' या जन्मावर ..या जगण्यावर शतदा प्रेम करावे ' या गाण्याने कशी प्रेरणा दिली हे सांगितले ..तसेच हे गाणे टर्कीत असताना अनघाच्या मांडीवर डोके ठेवून किमान ५० वेळा एकूण टर्की सहन केली हे सांगितले होते .. !

एकदा वसंत पोतदार यांचा मला निरोप आला कि तू सायंकाळी सहा वाजता ' कालिदास 'नाट्यगृहात मला भेट ..त्यानुसार मी त्यावेळी व्यसनमुक्त राहत असलेल्या अजित सोबत ' कालिदास ' ला गेलो तर तेथे श्री .अरुण दाते यांच्या ' शुक्रतारा ' या कार्यक्रमाचे पोस्टर लागलेले होते ..खूप गर्दी होती कार्यक्रमाला आवारातच मला श्री. वसंत पोतदार भेटले ..माझीच वाट पाहत होते ..त्यांनी मला सरळ आत मेकअप रूम जवळ नेले ..आणि मला बाहेर उभा ठेवून आत गेले .. बाहेर येताना त्यांच्या सोबत प्रत्यक्ष अरुण दाते होते .. उंच ..टक्कल पडलेले .. गहिरे घारे डोळे .. तेजस्वी मुद्रा .. हिरवा झब्बा त्यांच्या गोऱ्या वर्णाला खुलून दिसत होता .. वसंत पोतदार यांनी बहुतेक श्री अरुण दाते यांना माझ्याबद्दल आधीच सांगितले असावे .. त्यांनी माझ्याशी हस्तांदोलन केले .. मला म्हणाले आजचा कार्यक्रम पहा तुम्ही .. त्यांनी कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी आमची बसायची व्यवस्था समोरच्या रांगेत केली .. कार्यक्रम सुरु झाला .. दातेसाहेब त्यांची एकसे एक गीते सादर करीत होते .. श्री. अरुण दाते म्हणजे मराठीतील ' तलत महेमूद ' होते माझ्या मते .. हृदयाला भिडणारा आर्त स्वर .. मध्यंतरानंतर त्यांनी एकदम माईक वरून माझे नाव पुकारले व मला स्टेजवर बोलाविले .. मी आधी गोंधळलो ..माझे नाव यांनी का पुकारले असावे या विचारातच स्टेजवर गेलो .. मग त्यांनी श्रोत्यांना माझी ओळख करून दिली .आणि मला ' या जन्मावर ' गाण्याबद्दलचा अनुभव सांगण्याची विनंती केली ..मी सर्व श्रोत्यांना या गाण्याचा माझ्या व्यसनमुक्तीची प्रेरणा टिकविण्यात असलेला सहभाग सांगितला तसेच .. टर्कीत प्रेयसीच्या मांडीवर डोके ठेवून हे गाणे ऐकताना आलेला अनुभव सांगितला ..सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला ..मग अरुण भैयांनी मला त्यांच्या बाजूला बसवून घेतले ..आजचे गाणे तुषारला समर्पित असे म्हणत ' या जन्मावर ' हे गाणे गाण्यास सुरवात केली .. अत्यंत रोमांचक अनुभव होता तो माझ्यासाठी ..माझ्या आवडत्या गायकाच्या शेजारी बसून त्याने मला समर्पित केलेले गाणे ऐकण्याचा .. माझा खूप मोठा सन्मान होता तो !

नंतर पुन्हा एकदा ' शुक्रतारा ' चा कार्यक्रम असताना श्री . अरुण दाते यांनी मला बोलावून घेतले .. त्यांनी मला ' या जन्मावर ' या गाण्याबद्दल चा अनुभव लिहून देण्याची विनंती केली ..ते त्यांचे जीवनचरित्र लिहिण्याच्या विचारात होते त्यात त्यांना माझा अनुभव घालायचा होता .. माझे नाव छापले तरी हरकत नाही असे मी त्यांना सांगितले मात्र त्यामुळे तुझ्या कुटुंबियांना त्रास होऊ शकतो म्हणून त्यांनी तुझे नाव न लिहिता हे मी माझ्या पुस्तकात छापीन असे मला सांगितले .. सहा महिन्यातच श्री . अरुण दाते यांचे ' शतदा पेम करावे ' नावाचे आत्मचरित्र प्रकाशित झाले त्यात एका प्रकरणात मी त्यांना सांगितलेला माझा अनुभव व मी त्यांना त्या बदल लिहून दिलेले पत्र प्रकाशित झालेले होते . ते पुस्तक मला श्री . वसंत पोतदार यांनी भेट म्हणून दिले .

( बाकी पुढील भागात )



================================================


हर एक जिस्म घायल..हर एक रूह प्यासी ! (पर्व दुसरे -भाग २९ वा )

नाशिक मध्ये व्यसनमुक्तीचे कार्य करताना माझ्या संपर्कात आलेला कादर हा ब्राऊन शुगरचा व्यसनी आता नियमित मिटींग्सना येत होता .. त्याची आणि माझी घट्ट मैत्री झाली लवकरच .. तो देखील माझ्या सोबत डॉ.गौड यांच्या ' एड्स ' जागृतीच्या कामात सामील झाला होता ..त्याला मुक्तांगण च्या बाहेर पडून त्याला एक महिना होऊन गेला होता ..अतिशय हुरहुन्नरी असा कादर नेहमी हसतमुख दिसे ...जरासा लहानखुरा वाटणारा .. दाउद इब्राहीम सारख्या जाड मिशा..बहुधा पांढरा किवा त्याच्या जवळपास पोचणारा फिकट रंगाचा शर्ट ..शक्यतो काळी पँट अश्या वेशातील कादर नेहमी सावली सारखा माझ्या सोबत वावरू लागला ..तो मराठी अतिशय उत्तम बोलत असे फक्त त्याच्या मराठी उच्चारांमध्ये हिंदीची झलक अनुभवायला मिळे.. मला भेटेपर्यंत त्याच्या मुक्तांगण च्या किमान १० अँडमिशन होऊन गेल्या होत्या ..मी ' मुक्तांगण ' च्या पहिल्या उपचारानंतर चांगला राहू लागलो होतो आणि कादरने मात्र आतापर्यंत दहा वेळा उपचार घेतले होते .. इतका हुशार कादर..वारंवार रीलँप्स का होतो हे माझ्या दृष्टीने एक कोडेच होते ..एकदोन वेळा मी त्याला पुन्हा पुन्हा कशी प्यायला सुरवात झाली हे विचारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने हसून उत्तर टाळले होते .. एकदा तो माझ्या जवळ येवून बसला व म्हणाला ' आज खूप एकटे वाटते आहे ..साला पुराने दिनोकी याद बहोत तकलीफ देती है ' ..कादरची भेट झाल्यापासून त्याला इतका गंभीर मी पहिल्यांदाच पहात होतो ..जरा खोदून विचारल्यावर म्हणाला ' क्या करेंगे यार तुम्हे बताकर ... हर एक का अपना रोना है ..अपना झगडा है किस्मत के साथ ' मी चिकाटीने त्याच्या पाठीमागे लागलो तेव्हा समजली त्याची व्यथा .. कादरला दोन भाऊ आणि एक बहिण ..हे कुटुंब मूळ कच्छी मुसलमान .. कादर पेक्षा दोन वर्षांनी एक मोठा भाऊ ..तर एक भाऊ व बहिण त्याच्यापेक्षा लहान ..कादर पाच वर्षांचा असतानाच वडील एकदा रागाच्या भरात त्याच्या आईला ' तलाक ' देवून घर सोडून निघून गेलेले .. मग कादरच्या मामाने पदरात चार मुले असलेल्या बहिणीचा सांभाळ करायला सुरवात केली ..गुजरात मधून स्थलांतर करून मग हे कुटुंब नाशिकच्या भद्रकाली विभागात स्थायिक झाले .. मामाची मदत असली तरी ती पुरेशी नव्हती म्हणून कादरच्या आईने लहानमोठी कामे करायला सुरवात केली .. ती घरी बिड्या वळण्याचे काम करू लागली .. कादरला हे सर्व समजायला लागले तेव्हा वडिलांबद्दल त्याच्या मनात राग बसला ....नुसते ' तलाक ' म्हणून वडील आपल्या आईला सोडून ..मुलांची जवाबदारी टाळून कसे काय निघून जाऊ शकतात हे कोडे त्याला उलगडत नव्हते ..अभ्यासातील लक्ष उडाले ..दहावीनंतर शिक्षणाला रामराम करून तो आई सोबतच विड्या वळण्याचे ..तसेच विड्यांच्या कारखान्यात हमालीचे काम करू लागला .. तेव्हाच कोणीतरी त्याला सांगितले की भांग खावून काम केले तर माणूस लवकर थकत नाही ..हमालीचे काम करताना थकायला होऊ नये म्हणून कादरने भांग खाण्यास सुरवात केली ..मग गांजाही आलाच ..दारू क्वचित दारू घेणेही सुरु झाले ..

वयात आल्यावर कादरने हमाली सोडून स्वतचा व्यवसाय सुरु करण्यासाठी उधार पाचशे रुपयांचे भांडवल घेवून ..बिडी ..तंबाखू ..सिगरेटस वगैरे माल घाऊक भावात घेऊन सायकल वरून पानठेल्या वाल्यांना विकायला सुरवात केली ..गोड बोलणे .. मनमिळावू स्वभाव यामुळे लवकरच व्यवसायात जम बसू लागला .. मग त्याने भद्रकाली च्या भाजी मार्केट समोर एक छोटेसे दुकान भाड्याने घेतले व तेथे बसून होलसेल भावात सिगरेट ..बिडी ..तंबाखू विकू लागला ..एव्हाना मोठा भाऊ देखील पदवीधर होऊन कादरच्या मदतीला आला होता ..माझ्यासारखीच गांजाच्या अड्ड्यावर त्याची ब्राऊन शुगरशी ओळख झाली .. ब्राऊन शुगर पिणे देखील सुरु झाले ..दरम्यान त्याच्या दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या एका हिंदु मुलीसोबत कादरचे प्रेम संबंध जुळले ...साथ जियेंगे ..साथ मरेंगे च्या आणाभाका झाल्या .. मात्र जेव्हा त्या मुलीच्या घरच्या लोकांना जेव्हा कुणकुण लागली तेव्हा यांच्या भेटीत अडथळे निर्माण होऊ लागले .. मुलीच्या बाहेर जाण्यावर बंधने लादली गेली ..मात्र तरीही एकदोन वेळा कुटुंबियांचा डोळा चुकवून ती मुलगी कादरला भेटली..ते देखील कुटुंबियांना कळले ..मग आपल्या मुलीला समजावून ..मारझोड करून ..काही फायदा नाही हे समजल्यावर एक दिवस त्या मुलीची आई कादरला भेटली .. विनवणी केली ..त्यामुलीला तीन लहान बहिणी होत्या .. एका मुलीने असे केले तर ..बाकीच्या बहिणींची देखील लग्ने होणे कठीण होईल .. समाजात आम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही हे सांगितले ..अतिशय संवेदनशील असलेल्या कादरला त्या माउलीचे बोलणे पटले ..त्याने तिच्या आईला तुमच्या मुलीला या पुढे भेटणार नाही असे वचन दिले ..काही दिवस या जागेतून दूर जावे म्हणून दुकान मोठ्या भावावर सोपवून भद्रकाली भागात जाणे टाळू लागला..दोन तीन वेळा त्यामुलीने भेटायचा निरोप देवूनही भेटायला गेला नाही .. त्याच काळात रिकामपणामुळे ... प्रचंड भावनिक संघर्षामुळे ब्राऊन शुगरचे व्यसन वाढले .. इकडे दोन महिन्यातच घरच्या लोकांनी त्या मुलीचे लग्न उरकले .. ती मुलगी सासरी गेल्यावर कादर पुन्हा दुकानात जाऊ लागला ..तो पर्यंत व्यसन वाढले होते .. मग दुकानातले लक्ष उडाले ..पैसे कमी पडू लागले .. कादरचे असले वर्तन पाहून दुकान मोठ्या भावाने ताब्यात घेतले .. कादरला जेमतेम खर्चापुरते पैसे मिळू लागले .. मग तो स्वतच्याच दुकानात चोऱ्या करू लागला ..मुक्तांगण बद्दल माहिती मिळाल्यावर भावाने त्याला मुक्तांगण मध्ये उपचारांसाठी दाखल केले .. मात्र एकदा व्यसनाची गुलामीची अवस्था आली की व्यसन कायमचे बंद ठेवणे सोपे नसते ..कादरचे तसेच झाले ..काही दिवस व्यसनमुक्त राहिल्यावर जुने मित्र ..जुन्या आठवणी ..जुन्या जखमा ..जुन्या व्यथा उफाळून आल्या की कादरचे पिणे पुन्हा सुरु होई ..त्याने सुरु केलेले लहान दुकान नंतर बंद करून भावाने जवळच एक मोठे दुकान सुरु केले .. भद्रकालीतील बिडी ..तंबाखूचे मोठे होलसेल दुकान म्हणून प्रगती झाली ..घरची आर्थिक स्थिती सुधारली ..पण कादर वाया गेला ..ती मुलगी जेव्हा जेव्हा माहेरी येई तेव्हा काही दिवस कादर खूप अस्वस्थ राही ..स्वतच तिच्या आईला दिलेल्या वचनात अडकला होता..एकीकडे त्यामुलीवरचे प्रेम आणि दुसरीकडे तिच्या आईची विनवणी त्या कुटुंबाची अगतिकता .. मोठाच पेच होता .

कादरला जेव्हा मी म्हंटले की तू त्या मुलीच्या आईला असले वचन द्यायला नको होते ..म्हणजे मग त्या मुलीशी तुझे लग्न होऊ शकले असते .. त्यावर तो म्हणाला ' यार अपनी माँ और उसकी माँ मे मै फरक नाही समझता .. माँ- बाप बहोत कष्ट उठाकर बच्चो को बडा करते है .. अपना पेट काटकर ..अपनी इच्छा मारकर बच्चो का सुख देखते है .. जब बच्चे बडे हो जाये ...और वो अगर माँ बाप कि इच्छाका सन्मान नही करेंगे तो बहोत बुरा लागता है उन्हे ' कादरने जरी त्यामुलीच्या आईच्या भावना समजून घेवून आपल्या प्रेमाचा त्याग केला होता तरीही ...हा त्याग पचवणे त्याला जड जात होते ..स्वतचे वडील आईला आणि आपल्याला वाऱ्यावर सोडून निघून गेलेले .. तरीही त्याला त्या मुलीच्या आईवडिलांच्या भावनांची काळजी होती .. आमचे बोलणे झाल्यावर कादर मोकळेपणी हसला माझ्याकडे पाहून म्हणाला तुने गुरुदत्त का वो गाना तो सुनाही होगा ' हर एक जिस्म घायल ..हर रूह प्यासी ..निगाहो मे उलझन ..दिलो मे उदासी ..' मी देखील हसलो त्याच्या हातावर टाळी दिली .. कादर जरी समाजाच्या नजरेत एक व्यसनी ..वाया गेलेला होता तरी मला त्याच्या आत एक सच्चा माणूस गवसला होता ! 

( बाकी पुढील भागात )


==================================================


आ बैल ..मुझे मार ! (पर्व दुसरे -भाग ३० वा )


दर बुधवारी व शनिवारी रोटरी क्लब हॉल येथे फॉलोअप च्या मिटींग्सना नियमित येणाऱ्या लोकांची संख्या आता वाढत चालली होती ..माझी व्यसनमुक्तीची दोन वर्षे पूर्ण होऊन गेलेली असल्याने मी नाशिक मध्ये चांगलाच स्थिरावलो होतो ..कादर ...अजित ..अभय ..अनिल ..राजेंद्र ..दिगंबर वगैरे आणि व्यसन सुरु असलेले तरी मिटिंग न येवून स्वतची व्यसनमुक्तीची इच्छा कायम ठेवणारे देखील काही जण मिटिंगला येत असत ...नाशिक प्रमाणेच संगमनेर येथून देखील दारू व गर्द चे व्यसनी मुक्तांगण ला दाखल होऊन गेलेले असल्याने मँडमनी मला संगमनेर येथे देखील महिन्यातून एकदा फॉलोअप ला जाण्यास सांगितले होते .. त्यानुसार महिन्यातून एकदा संगमनेर ला जावून मी तेथील लोकांना भेटत होतो ..ज्यांच्या सोबत मी पूर्वी व्यसन करत होतो अश्या जुन्या जिगरी मित्रांना भेटण्याचे मात्र शक्यतो टाळत होतो ..कारण असे मित्र भेटल्यावर व्यसन केल्याच्या जुन्या आठवणी जागृत होऊन मी गडबड करण्याची शक्यता आहे हे माझ्या लक्षात आले होते ... मिटींग्स न आलेले अनेक जण मला कधी कधी तुमच्याशी एकांतात बोलायचे आहे असे म्हणून मला आपल्या अडचणी सांगत असत ..मला जमेल तसे मी त्यांना समुपदेशन करत असे .. काही घरगुती वाद असतील ..गैरसमज असतील ते ते दूर करण्यसाठी त्यांच्या कुटुंबियांना भेटून त्यांनाही समुपदेशन करीत असे..एकदा राजेंद्र मिटिंगला आल्यावर खूप वैतागलेला दिसला ..म्हणाला ' दारू प्यायची खूप इच्छा होतेय .. कितीही चांगले वगले तरी घरचे लोक विश्वास ठेवत नाहीय ..वगैरे ' मी त्याला सांगितले कि इतका लवकर कुटुंबीय विश्वास ठेवणे कठीण असते .. कारण पूर्वी अनेक वेळा आपण त्यांच्या विश्वासघात केलाय ..खोट्या शपथा घेतल्यात .. वचने मोडली आहेत .. आपल्या वर्तनाने कळत..नकळत आपण कुटुंबियांना खूप त्रास दिलाय ..तेव्हा किमान एकदोन वर्षे आपण सातत्याने व्यसनमुक्त राहिलो तरच पुन्हा घरच्यांचा विश्वास संपादित करता येईल .. मात्र त्या दिवशी अनिल खूपच रागात होता .. 

त्याला घरून एक व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल हवे होते ..आणि त्याचा लहान भाऊ व वडील त्याच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते .. राजेंद्र त्यावरून घरात भांडून मिटिंगला आलेला होता ..आठ वाजता मिटिंग संपल्यावर आम्ही एकमेकांचा निरोप घेवू लागलो तेव्हा राजेंद्र म्हणाला आज घरी जावेसे वाटत नाहीय अजिबात ..जर घरी गेलो तर पुन्हा माझे भांडण होईल .. राजेंद्रचे कुटुंब नाशिकरोड मधील एक प्रस्थापित कुटुंब होते ..राजकारणात देखील त्याच्या कुटुंबियांचा चांगला दबदबा होता .. कॉलेज जीवनापासून वाया गेलेल्या राजेंद्रने पूर्वी अनेक भानगडी केलेल्या होत्या मात्र प्रत्येक वेळी कुटुंबियांच्या नाशिक मधील असलेल्या दबदब्या मुळे तो पोलीस केस वगैरे पासून वाचला होता .. राजेंद्रचे बोलणे ऐकून .. त्याला खरोखर व्यसनमुक्त राहायची इच्छा आहे हे मला जाणवले ..आज रात्री मी घरी गेलो तर परत भांडणे होतील आणि मी दारू पिवू शकतो ही त्याची भीती रास्त होती..पण रात्री तो कुठे मुक्काम करणार हा देखील प्रश्न होता .. त्याच्याशी गप्पा मारत मारत मग आम्ही सी .बी.एस च्या एस .टी स्टँड वर आलो ..रात्रीचे नऊ वाजून गेलेले होते .. इतर जण घरी जायला निघाले..फक्त अजित , मी व राजेंद्र उरलो होतो .राजेंद्र ला एकटे सोडणे योग्य ठरले नसते म्हणून मग आम्ही त्याच्या सोबत गप्पा करत तेथेच बसलो ..बाराच्या सुमारास अजीत देखील झोप आली म्हणून घरी निघून गेला .. त्याकाळी मला देखील झोप येत होती .भूकही लागली होती ..पण राजेंद्रला एकटे सोडावेसे वाटेना .. आमच्या दोघांच्या खिश्यात मिळून फक्त पाच रुपये होते .. त्या दिवशी रात्रभर आम्ही सी.बी.एस वर चहा घेत गप्पा मारत आम्ही रात्र काढली .. मुक्तांगण मधून बाहेर आल्या पासून प्रथमच मी असा रात्रभर घरच्यांना न सांगता बाहेर थांबलो होतो .. अर्थात चांगल्या कामासाठी .. त्या काळी मोबाईल नसल्याने मला घरी निरोप देखील देता आला नाही .. सकाळी राजेंद्र म्हणाला आता मी जातो घरी ..आता माझा राग शांत झालाय .. त्याल निरोप देवून घरी गेलो तर आई काळजी करत होती तिला सर्व प्रकार सांगितल्या वर म्हणाली ' हे असे नेहमी करत गेलास..तर तुझे व्यसन सुरु व्हायची भीती आहे ' मी मात्र आपण राजेंद्रला मदत केली या समाधानात होतो . 

संगमनेरचे एक जरा वयस्क गृहस्थ देखील आठवड्यातून किमान एकदा तरी मिटिंग साठी खास संगमनेर हून येत असत .. ते मुक्तांगणहून उपचार घेवून परत आल्याला दोन महिने उलटून गेले होते .. त्यांचे नाव महेश होते ..वय साधारण ५५ वर्षे होते त्यांचे .. सरकारी नोकरीतून ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेली .. शेतीवाडी होती चांगली .. मुलेही मोठी झालेली .. वयाने मोठे असल्याने आम्ही सर्व त्यांना महेशभाऊ असे संबोधत होतो ..एकदा महेशभाऊ देखील मला तुमच्याशी एकांतात बोलायचे आहे असे म्हणाले ..मी त्यांना घेवून जरा लांब जावून बसलो .. मग ते म्हणाले मी व्यसनमुक्त आहे मात्र आता मला माझी पत्नी नीट साथ देत नाहीय ..आधी मला ते नेमके काय म्हणत आहेत ते समजले नाही ..मी म्हणालो ' अहो उलट पत्नीने इतकी वर्षे तुमचे व्यसन सहन केलेय .. तिला खूप त्रास झालाय ..उलट सध्या तुमची पत्नी आणि मुलेच तुमचे खरे हितचिंतक आहेत ..ते तुम्हाला प्रेम ..जिव्हाळा देतात म्हणूनच तुम्ही व्यसनमुक्त आहात ' या वर महेशभाऊ हसून म्हणाले ' अहो ..नुसते प्रेम काय चाटायचेय .. माझी पत्नी गेल्या दहा वर्षापासून मला लैंगिक संबंधात साथ देत नाहीय .. दारू पिताना हे फारसे जाणवत नव्हते ..मात्र आता व्यसनमुक्त राहताना हि लैंगिक संबंधांची ओढ मला खूप अस्वस्थ करते ..मात्र पत्नी झिडकारते मला ' त्यांची ही समस्या ऐकून मी विचारात पडलो ..यांना नेमके कसे समजवावे हे कळेना .. मी त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान ..तसेच अविवाहित होतो .. शक्यता अशी होती पत्नीचे देखील वय सुमारे ५० वर्षे होते त्यामुळे तिची ' मेनापाँझ ' ( मासिक धर्म संपुष्टात येणे )ची अवस्था उलटून गेली असल्याने तिला शरीर संबंधात रस उरला नसावा ..किवा घरात मोठी मुले असल्याने तिला आता ते नकोसे होत असेल ..अशीही एक शक्यता होती की तिला पूर्वीची यांची दारू पिण्याची अवस्था आठवून असे संबंध ठेवण्यास पती जवळ आला की ' नॉशिया ' येत असावा . कारण बहुधा स्त्रियांना दारूचा वास आवडत नाही व पूर्वीचे यांचे ताल आठवून ती जाणीवपूर्वक दूर राहत असावी ...नेमके काय कारण असेल ते समजू शकत नव्हते ..मी महेश भाऊंना धीर देत म्हणालो ' अहो ..हळू हळू सगळे सूरळीत होईल ..तुम्ही तुमची व्यसनमुक्ती टिकवून ठेवा फक्त ' या वर ते म्हणाले सर्व हळू हळू सुरळीत होईपर्यंत मी पूर्ण म्हातारा झालेला असेन हो ... ' यावर मी चूप बसलो ... आपण पुढच्या मिटिंगला सविस्तर बोलू म्हणून मी त्यांना निरोप दिला ... ते परत पुढच्या मिटिंगला आले तेव्हा तीच तक्रार करू लागले ..म्हणाले ' त्यापेक्षा दारू प्यायलेले परवडेल मला .. जर पत्नी असेच वागणार असेल तर ' ..मला या गृहस्थाचे आश्चर्य वाटले .. लैंगिक संबंधासाठी हा या वयात इतका उतावीळ कसा हे समजेना ..त्यांच्या आनंदाच्या सर्व कल्पना लैंगिकतेशी जोडल्या होत्या त्याने .. लैंगिकता म्हणजे सगळे जीवन नसते .. तो या वयात स्वतःला वाचन ..लेखन .. संगीत ...अध्यात्मिकता .. अश्या छंदात गुंतुवून ठेवू शकला असता .. मी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे समजविण्याचा प्रयत्न केला ..मात्र त्यांचा हेका एकच होता .कसेही करून तुम्ही काहीतरी पर्याय शोधा .. मी हा विषय त्यांच्या पत्नीशी उघड बोलणे शक्यच नव्हते ..कारण ती संगमनेर सारख्या छोट्या गावात राहणारी जुन्या वळणाची ..विचारांची स्त्री असणार .. मी जरी शरीरविक्रय करणाऱ्या महिलांशी लैंगिक संबंध या विषयावर उघड चर्चा करत असलो तरी ..एखाद्या विवाहित ..संसारी आणि वयस्क महिलेशी या बाबत बोलणे मला जमले नसते हे नक्की .. ! महेश भाऊ तर एकदम घाईला आलेले.त्यांच्या या ' कामातुर' पणाचे मला मनातून हसू देखील येत होते ..बहुधा ' म्हातारचळ ' यालाच म्हणत असावेत ..शेवटी एकदा ते मला म्हणाले की जावू दे ..पत्नी गेली खड्ड्यात ..मला दुसरीकडे कुठेतरी आता माझी सोय करावी लागणार .. त्यांचा रोख स्पष्ट होता ..मग मी देखील म्हणालो ..हो चालेल तुम्ही योग्य ते काळजी घेवून करा काय हवे ते .. तर म्हणाले पण मला ' सफेद गल्लीत ' जायला भीती वाटते ..तेथे नेहमी पोलिसांची धाड येते म्हणे .. हे देखील खरे होते त्यांचे .. 

( बाकी पुढील भागात )

बुधवार, 12 जून 2013

रंग मनाचे !


' टर्की ' त लागलेले लग्न ! (पर्व दुसरे -भाग २१ वा )


अजितची आणि माझी मैत्री व्हायला वेळ लागला नाही ..थोड्याफार फरकाने आमची कहाणी सारखीच होती .. मी मग अजितला ' मुक्तांगण ' मध्ये उपचार घेण्यास तयार केले .. तुषार जर चांगला राहू शकतो तर आपणही नक्कीच चांगले राहू या विचाराने त्याने माझे ऐकले असावे .. अजितला त्याच्या भावाने मुक्तांगण मध्ये दाखल केले .. मिटिंगला अगदी पहिल्यांदा मी ज्याला समुपदेशन केले होते तो अभय देखील नियमित येत होता ..पाहता पाहता त्याच्या व्यसनमुक्तीचे चार महिने पूर्ण होत आले होते ..फॉलोअप करताना अनेक घरे मला सापडत नसत ..कारण काही लोकांचे पत्ते बदलले होते ..त्यात एकाचा पत्ता सापडायला खूपच शोधाशोध केली पण व्यर्थ ..त्याचे नाव होते कादर .. या कादरच्या मुक्तांगण मध्ये माझ्याही आधी म्हणे एकूण १० अँडमिशन झालेल्या होत्या .. त्याला भेटण्याची मला का कोण जाणे खूप उत्सुकता होती ..कदाचित लागोपाठ १० वेळा उपचाराला दाखल झालेला प्राणी किती हट्टी असेल हे मला पहायचे असावे .. एकदा असाच सायंकाळी रोटरी क्लब हॉल वर मिटींगच्या वेळेच्या जरा आधीच जावून बसलो असताना ..एक मध्यम उंचीचा ..दाट केस ..जाड मिश्या .. पांढरा शर्ट ..काळी पँट ..अशा वेशातील हसतमुख चेहऱ्याचा साधारण तिशीचा दिसणारा तरुण ...हात एक चिट्ठी घेवून माझ्यासमोर उभा राहिला .. ' तुषार नातू आपणच का ? ' शुद्ध मराठीत तो बोलू लागला .. मी त्याला होकार दिला ..तसा लगेच माझ्या बाजूला बेंच वर बसला अगदी जुना मित्र असल्यास्रखा बोलू लागला ..' या वेळी मी ठरवले कि नक्की व्यसनमुक्त राहायचे .. मँडमनी मला येथील रोटरी हॉल मध्ये तुषार नातू असतात ..त्यांना नियमित भेट असा सल्ला दिलाय .. मी परवा ..मुक्तांगण मधून डिसचार्ज झालो ..काल दिवसभर खूप बोर झालो घरात बसून .. केव्हा मिटिंग ला जाऊन तुम्हाला भेटतो असे झाले होते ..मला .. बरे झाले तुम्ही भेटलात ..' अतिशय बडबड्या प्राणी वाटला हा ...मी त्याला तुझे नाव काय असे विचारले तर म्हणाला ' कादर ' ..म्हणजे मी ज्याचे घर मनापासून शोधात होतो तोच प्राणी माझ्या समोर होता .. मला आनंद झाला ..त्याला म्हणालो मी तुमचे घर खूप शोधले .. सापडले नाही मला ..पत्ता बदलला आहे का ? ..त्यावर त्याने हात पुढे करून टाळी घेतली माझ्याकडून .. हो ..घर बदलले आमचे ..आता स्वतचे मोठे घर घेतलेय भावाने माझ्या ..तिथेच राहायला गेलोय दोन सहा महिन्यांपासून .. कादरशी माझी गट्टी जमायला वेळ लागला नाही .. !

कादर भद्रकालीतील सर्व गर्दुल्ल्याना ओळखत होता .. तो स्वतःला गमतीने ' पुराना पापी ' म्हणून घेत असे ... कादरने यावेळी गंभीरतेने व्यसनमुक्त राहायचे ठरवले होते ..त्यामुळे मी त्याला सांगितले की तू जर जास्तीत जास्त वेळ माझ्यासोबत घालविला तर अधिक चांगले ..म्हणजे तू पुन्हा जुन्या मित्रांमध्ये जाणार नाहीस ..तुझा वेळ देखील सत्कारणी लागेल ..त्या नुसार मग कादर रोज सकाळी मला भद्रकाली पोलीस स्टेशनच्या बाहेर भेटू लागला ..तेथून आम्ही दोन चार ठिकाणी फॉलोअप करून मग ..डॉ . गौड यांच्या कार्यालयात जात असू .. कादर मराठी चांगले बोलत असे .. दहावी पर्यंत शिकलेला होता मात्र अतिशय सुसंस्कृत असा वागत असे .. त्याचे सामान्य ज्ञान ..विनोदबुद्धी .. हजरजवाबीपणा हे गुण वाखाणण्याजोगे होते .. आता कादर ..अभय ..मी ..एक मुक्तांगण मधून आलेला अल्कोहोलिक संदीप असे चार जण नियमित एकमेकांना भेटत होतो .. अजित मुक्तांगण मधून उपचार घेवून आल्यावर तो देखील आमच्यात सामील झाला ..मेरी मध्ये देखील ' लोकशाही मित्र ' या आमच्या सामाजिक संस्थेचे सदस्य वाढत होते .. मी नेहमी लोकशाही मित्र च्या वार्ताफलकावर छान छान सुविचार लिहून लोकांना आकर्षित करत असे .. मेरीतील बहुतेक सर्व तरुण मला ओळखू लागले होते ..मी पूर्वाश्रमीचा व्यसनी आहे हे कधीच लपवत नसे ..याचे लोकांना आश्चर्य वाटे ..एकदा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला मेरीतील ई टाईपच्या क्वार्टर्स मधील मित्रमंडळाने मला तेथे प्रमुख अतिथी म्हणून देखील बोलावले होते .. आम्ही मराठी तरुण इंग्रजी भाषेबाबत जरा घाबरून असतो ..किवा मराठी माध्यमातून शिकल्यामुळे त्याला इंग्रजी बाबत न्यूनगंड असतो ..त्यामुळे तो मुलाखतीत कमी पडतो .. त्याला अधिक आत्मविश्वास मिळावा म्हणून ' लोकशाही मित्र ' तर्फे ' इंग्लिश स्पिकिंग ' चे क्लासेस सुरु केले ..एका इंग्रजी माध्यमातून शिकविणार्या शिक्षिकेला आम्ही यासाठी गळ घातली ..सामाजिक कार्य म्हणून अगदी अल्प म्हणजे फक्त २० रुपये महिना इतक्या फी मध्ये त्या शिक्षिका इंग्रजी बोलणे शिकवू लागल्या ..या क्लासला तरुण मुला मुलींचा चांगला प्रतिसाद मिळू लागला होता .. व्यसनाधीनते बाबत जनजागृती म्हणून एकदा मेरी तील सर्व लोकांसाठी आम्ही मेरी चे त्यावेळचे चीफ इंजिनियर श्री .परांजपे साहेब यांची परवानगी घेवून ...सांस्कृतिक भवनात पथनाट्य देखील सदर केले ..एकंदरीत छानच चालले होते माझे ..!

अजित मुक्तांगण मधून उपचार घेवून आल्यावर काही दिवस चांगला राहिला ..त्याच्या घरच्या मंडळीनी त्याचे लग्न देखील ठरविले .. मात्र लग्न अगदी पंधरा दिवसावर आले असताना अजितने गडबड केली .. त्याचे पिणे परत सुरु झाले .. तो पिणे सुरु झाल्यावर मला देखील टाळू लागला .. हे स्वाभाविक होते ..परत पिणे सुरु झाल्यावर व्यसनी आपल्या चांगल्या मित्र .शुभचिंतक यांना टाळू लागतो ..कारण त्याला अपराधी वाटत असते हे एक कारण आहे ..दुसरे कारण असे की पिणे सुरु झाल्यावर त्याला व्यसनमुक्ती बाबत काही चांगले ऐकावेसे वाटत नाही .. हा व्यसनाधीनता या आजाराचा धूर्त पणाचा भाग आहे ..अजितचे तसेच झाले होते ..मी त्याच्या घरी जाण्याच्या नेमका काही वेळ आधीच तो घरातून निघून जात असे ..मग एकदम मध्यरात्रीच परत येई .. त्याच्या घरी गेल्यावर त्याचे आई वडील ..मला गळ घालत कि लग्न तोंडावर आलेय आणी हा असा वागतोय ..आता लग्न मोडता देखील येत नाहीय ..याला कसेही करून समजावा तुम्ही ..लग्नाच्या आठ दिवस आधी तर अजित घरातून तीन दिवस गायब होता .. सगळीकडे शोधाशोध सुरु झाली ..मला एका गर्दुल्या कडून बातमी कळली कि अजित दुसऱ्या एका गर्दुल्या सोबत त्याच्या शेतात गेलाय ..तेथे तो टर्की काढून मग व्यसनमुक्त होऊन येणार आहे ..हा अजितचा जरी चांगला विचार होता ..तरी लग्न जवळ आले असताना ..घरच्या लोकांना न सांगता गायब होणे खचितच योग्य नव्हते .. शेवटी अजित तीन दिवसांनी परत आला .. मात्र त्याचे व्यसन काही बंद होऊ शकले नव्हते ..एकट्याच्या बळावर व्यसनमुक्ती केंद्राची मदत न घेता ..असे व्यसनमुक्त राहणे फार कमी लोकांना जमते ..अजितला जमले नाही ..आता लग्न तीन दिवसांवर आले होते .. अजितच्या वडिलांनी मला गळ घातली कि कसेही करून याला व्यसन करण्यापासून थांबवा .. हे जरा अवघडच काम होते ..मी मला माहित असलेल्या ..माझा आदर करणाऱ्या गर्द विक्रेत्यांना.. कोणीही अजितला गर्द विकत देवू नका असे सांगितले ..मात्र त्याचा फारसा फायदा झाला नाही ..अजित दुसऱ्या कोणाकडून तरी गर्द मागवीत असे .. लग्नाच्या आदल्या दिवशी अजितला मी पहाटे सहा वाजताच घरी जावून पकडले .. तेथपासून ते लग्न लागून वर वधू कार्यालय सोडेपर्यंत मी अजित जवळ सावली सारखा वावरत होतो ..त्याच्याजवळ थोडाफार माल होता ..त्या दिवशी मी त्याला अजिबात बाहेर पडू दिले नाही .. त्यानेही माझे ऐकले हे विशेष .. मला समजले होते कि अजितने लग्नाच्या दिवशी त्याला माल आणून द्यावा म्हणून तों तीन मित्रांजवळ पैसे देवून ठेवले होते .. लग्नाच्या दिवशी मी ..कादर ..अभय मिळून कार्यालया बाहेर फिल्डिंग लावली ..कोणीही गर्दुल्ला आत प्रवेश करणार नाही ..अजित पर्यंत पोचणार नाही म्हणून डोळ्यात तेल घालून पहारा ठेवला .. इकडे लग्नाचे विधी सुरु होते ..अजितला सकाळपासूनच टर्की सुरु झाली होती ..त्याच्या डोळ्यातून पाणी येत होते ... सगळे अंग दुखत होते .. तो सगळे विधी सुरु असताना तो खूप आशेने दाराकडे पाहत होता कि कोणीतरी गर्दुल्ला माल घेवून येईल ..पण इकडे मी कडक बंदोबस्त ठेवलेला .. अजितला हे समजले होते कि तुषार आज आपल्याला माल मिळू देणार नाही .. तो कधी रागाने तर कधी केविलवाण्या नजरेने माझ्याकडे पाही ..मलाही त्याची दया येत होती ..त्याची टर्की पाहून असे वाटले एकदा कि जाऊ दे याला एखादी पुडी पिवूदे ..पण अजितच्या वडिलांना मी वचन दिले होते की अजितला मी लग्नाच्या दिवशी व्यसनमुक्त ठेवीन .. कादरला देखील माझा हा निर्णय आवडला नव्हता ..त्याचे म्हणणे असे होते कि लग्न हा आनंदाचा समारंभ ..आयुष्यात एकदाच येतो ..अशा वेळी अजितला टर्कीत ठेवणे म्हणजे त्याच्यावर अन्याय आहे ..माझा देखील नाईलाज होता .. शेवटी टर्कीत असतानाच अजितचे सात फेरे झाले ..लग्न लागले ! एकदाचे लग्न लागल्यावर आम्ही निर्धास्त झालो .. अजितला अजूनही आशा होती कि कोणी त्याला माल आणून देईल म्हणून मात्र तसे आम्ही होऊ दिले नाही ..अगदी शेवटी ..वधू वर घरी निघण्याच्या वेळी अजित माझ्या कानाशी लागून म्हणाला ' साले .. अब तेरे दिलकी तसल्ली हो गई ना ? ' मी नुसताच हसलो ..मग तो पुढे म्हणाला ..' तुषार ..मी इतका वेळ तुझ्या शब्दाला मान देवून चूप बसलो ..मात्र आता लग्न लागून गेलेय .. तू माझ्या वडिलांना दिलेले वचन पाळले ..मी इतका त्रास होत असताना देखील तुला सहकार्य केले ..आता माझी रात्रीची सोय मात्र झालीच पाहिजे ' ..मलाही त्याची दया आली ..मी कादरला सांगून मग अजितला माल आणून दिला !

( बाकी पुढील भागात )

======================================================



रंग मनाचे ! (पर्व दुसरे -भाग २२ ) 


अजित लग्नानंतर १५ दिवसांनी ..बायको माहेरी गेल्यावर परत ' मुक्तांगण ' ला दाखल झाला ..कादर देखील आता मला नियमित भेटत असे .. स्वतची व्यसनमुक्ती टिकविण्यासाठी तसेच अनघाच्या दूर जाण्याचे दुखः विसरण्यासाठी मी स्वतःला ..लोकशाही मित्र .. मुक्तांगण .. डॉ. गौड .. या सर्व कामात अखंड गुंतवून ठेवले होते .. मात्र तरीही जुन्या आठवणी एखादेवेळी भूता सारख्या मानगुटीवर बसत .. त्यावेळी झोप येत नसे ..मग उगाचच कूस बदलत राही ..असे दोन तीन दिवस अवस्थतेचे जात .... या काळात खूप निराश वाटे ....कोणत्याच गोष्टीत मन रमत नसे ..सारखे जुन्या आठवणींचे काटे मनाला घायाळ करत असत ..एकदा मी अश्या निराश अवस्थेत मँडमना पत्र लिहिले ..त्यात अनघाशिवाय जगणे व्यर्थ आहे असे वाटते .. माझ्यावर अन्याय होतोय असे वाटते ..इतरांचे जीवन माझ्यापेक्षा अधिक सुखी आहे अशी तुलना होते .. पुन्हा व्यसन सुरु होईल कि काय याची भीती वाटते वगैरे लिहिले होते .. आश्चर्य असे की मँडमनी आपल्या व्यस्त दिनचर्येतून आवर्जून वेळ काढून माझ्या पत्राचे उत्तर दिले .. त्यांचे पत्र म्हणजे लेखी समुपदेशनाचा एक उत्तम नमुना होता .. त्या पत्राचा आशय असा होता ' तुषार प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ठराविक काळाने असे निराशेचे विचार येतात .. सर्व सामान्य लोक अशा वेळी काही दिवस आपले मन.. नेहमीचे रुटीन सोडन दुसऱ्या कोणत्यातरी गोष्टीत गुंतवतात .. हा काळ व्यसनी व्यक्ती साठी अधिक सावधगिरी बाळगण्याचा असतो ..अश्या मानसिक अवस्थेत आपले व्यसन पुन्हा सुरु होण्याचा धोका टाळण्यासाठी .. वाचन .. लेखन .. आपले छंद याकडे जास्त लक्ष द्यायचे असते ..कोणाशीही कसलेही वाद घालण्याच्या भानगडीत पडायचे नाही ..तुझ्या सारखाच प्रत्येक व्यक्तीच्या मनाचा एक कप्पा अतिशय हळवा असतो ..तेथे एखादी अनघा किवा एखादा तुषार असतो ..काहीतरी न मिळू शकल्याची ..काहीतरी गमावल्याची ..उपेक्षितपणाची..अपराधीपणाची किवा जगणे व्यर्थ होत असल्याची भावना उगाचच जीवापाड सांभाळून ठेवणारा हा मनाचा कप्पा देखील ...आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे हे स्वीकार कर ...आमच्या दृष्टीने तुझे छान चालले आहे .. तू देखील स्वतच्या कामातून आनंद मिळव .. नाहीतरी शेवटी जीवन म्हणजे शेवटी वजा -बाकी चाच एक खेळ आहे .. जे मिळू शकले नाही त्याचे दुखः करत बसण्यापेक्षा .. जे मिळतेय ते टिकव..वाढव .. म्हणजे सगळे सुरळीत होईल ! मँडमचे ते पत्र माझ्यासाठी खूप प्रेरणा दायी होते 

सामाजिक कृतज्ञता निधीचे मला मिळणारे ५०० रुपये मानधन परस्पर माझ्या पुण्याच्या मुक्तांगण ने उघडलेल्या बँकेच्या खात्यात जमा होत होते .. कुटुंबीय मी व्यसनमुक्त राहतोय यात आनंद मानून होते ..मात्र सर्व सामान्य लोकांसारखे सुरळीत आयुष्य हा कधी जगेल याची चिंता होतीच त्यांना .. मी आता व्यसनमुक्तीची सुमारे दोन वर्षे पूर्ण केली होती .. भावाला वाटे याने या सामाजिक कार्याबरोबरच स्वतच्या भौतिक .ऐहिक ..कौटुंबिक ...प्रगतीचा विचार केला पाहिजे..सामाजिक कार्यात मिळणारे मानधन तुटपुंजे असते .. पुढे जर याला लग्न संसार करायचे असेल तर ..याने एखादी चांगली नोकरी केली पाहिजे ..म्हणजे मग याच्या लग्नाबाबत विचार करता येईल ..मी मात्र अनघा शिवाय दुसऱ्या कुणा मुलीचा विचार करू शकत नव्हतो ..लग्न ..संसार या भानगडीत न पडता आयुष्यभर सामाजिक कार्यात राहायचे असे मी ठरविले होते .. एकदा माझ्या पुण्याचे चुलत मेव्हणे श्री . अनंतराव दामले यांचे कडून एका चांगल्या नोकरीचा प्रस्ताव आला ..पिंपरी चिंचवड येथे पालिकेच्या टोल नाक्यावर कारकून म्हणून नोकरी मला मिळू शकत होती ..अनंतरावांनी यासाठी प्रयत्न करायचे ठरवले होते .. त्यासाठी त्यांनी मला व आईला पुण्याला बोलाविले .. त्यादिवशी रविवार होता ..आईला चुलत बहिणीच्या घरी सोडून मी मँडम ना भेटायला त्यांच्या घरी पत्रकार नगर येथे माझ्या रवी जोगळेकर या मित्रासोबत गेलो .. बाहेरच्या हॉल छान भारतीय बैठक घातलेली होती..तेथे बसून मँडम आपल्या डायरीत काहीतरी टिपणे काढीत बसल्या होत्या .. त्यांना माझ्या येण्याचे कारण सांगून त्यांचा सल्ला विचारला तेव्हा त्या हसून म्हणाल्या .. असा कोणी सल्ला मागितला तर मला जरा दडपण येते ... कारण सल्ला देणे ही सगळ्यात सोपी गोष्ट असली तरी त्याचे बरे -वाईट परिणाम हे प्रत्यक्ष ज्याला सल्ला दिला जातो त्या व्यक्तीला अनुभवायचे असतात .. आताचे तुझे काम छानच चाललेय यात वादच नाही ..तरीही जर तुझ्या कुटुंबियांना तू हे काम सोडून एखादी चांगली नोकरी करून सर्वसामान्य लोकांसारखा संसार करावा असे वाटणे अजिबात वावगे नाही ..प्रश्न येतो तो तुझ्या पसंतीचा .. तुझ्या मते तुला या कार्यातच रहायचे आहे ..म्हणजे आता निर्णायक क्षण आहे हा .. मी तुला नेमके काय कर असे अजिबात सांगणार नाही ..तुझी आवड ..तुझा कल.. तुझे प्राधान्य ..या सर्व गोष्टी लक्षात घेवून तूच निर्णय घे ..मात्र एक लक्षात ठेव ..एकदा एखादा निर्णय घेतला मग .. पश्चाताप करत बसायचे नाही .. कोणतीही संधी ही शेवटची कधीच नसते ..सामाजिक कार्यात देखील तू मन लावून कल्पकतेने काम केलेस तर नक्कीच खूप मोठे काम उभे करू शकशील .. प्रत्येक निर्णयाच्या चांगल्या -वाईट बाजू असतात .. वगैरे ..एकंदरीत मँडम ने निर्णय माझ्यावरच सोपविला होता ..फक्त त्यांचा एक आग्रह दिसला की कोणताही निर्णय घेतला तरी तुझी स्वतची व्यसनमुक्ती टिकवून ठेवण्याला तू प्राधान्य दिले पाहिजेस ..मग मँडमनी आम्हाला चहा बद्दल विचारले ..आणि जरा गमतीने आतल्या खोलीत असलेल्या बाबांना हाक मारली ' अहो ..डॉ . अनिल अवचट ..जरा बाहेर येत का ? बघा आपल्याकडे कोणी आलेय ' बाबाही हसत हसत बाहेर आले ..एका सुती कापडाची पांढरी बंडी आणि खाली एक साधी ढगळ बर्म्युडा अशा घरगुती वेषा त होते बाबा .. एकदम साधे ... त्यांनी आम्हाला अभिवादन केले .. मग मँडम त्यांना म्हणाल्या ' पाहुण्यांना चहा पाजणार का आज तुमच्या हातचा ' .. हो ..तर आलो लगेच घेवून असे म्हणून बाबा स्वतः चहा करायला आत गेले .. चहा करून आमच्या साठी टेू मध्ये चहा घेवून आले ..मग बडीशेप दिली .. आम्हाला या सगळ्याचे नवल वाटले ..इतकी मोठी माणसे मात्र किती साधेपणा ..किती सरळपणा होता वागण्यात ..वागण्या बोलण्यात कोठेही मोठेपणाचा लवलेशही नाही ..अत्यंत खेळकर मूड !

मँडमशी चर्चा केल्यानंतर मी निर्णय घेतला तो सामाजिक कार्यातच राहायचा .. हेच काम काझ्या आवडीचे होते . मी आईला व अनंतरावांना तासे सांगितले ..त्यांनी फारश्या प्रतिक्रिया दिल्या नाहीत ..फक्त जे करशील ते मनापासून कर ..व्यसनमुक्त रहा असे बोलले ..चला..म्हणजे आता मी सामाजिक कार्यातच राहणार कायाम्चानी निश्चित झाले होते .. पुण्याहून परत आल्यावर .. डॉ . गौड यांचे कडे मुंबईच्या एका सामाजिक संस्थेचे काम आले .. हे काम एड्स संबंधीच ..मात्र संशोधनाचे होते .. ज्यात अनेक प्रकारच्या लोकांच्या भेटीगाठी घेवून एक सर्व्हे करायचा होता .. त्यासाठी त्या संस्थेने नाशिकच्या के.टी .एच .एम महाविद्यालयातील चार पाच मुली व पाच मुले निवडली होती .. संस्थेची एक प्रश्नावली मजूर ..कारकून ..अधिकारी .. हमाल .. व्यावसायिक . अश्या सर्व प्रकारच्या लोकांकडे जावून भरून घ्यायची होती ..स्त्रियांची प्रश्नावली मुली भरून घेणार होत्या ..तर पुरुश्यांची प्रश्नावली मुले भरून घेणार होत्या .. गौड सरांनी मला देखील या कामात सहभागी होण्यास सांगितले .. यातून अनेक प्रकारच्या लोकांचा लैंगिकते बाबतचा दृष्टीकोन समजण्यास मदत झाली असती .. किवा लैंगिकते बद्दलच्या सवयी ..माहिती वगैरे गोष्टी कळण्यास मदत मिळणार होती .

( बाकी पुढील भागात )


======================================================


लैंगिकतेचा सर्व्हे..एक कसरत ! (पर्व दुसरे - भाग २३ वा )


निरनिराळ्या वर्गातील .निरनिरळ्या वयोगटातील स्त्री पुरुष्यामध्येलोकांमध्ये जावून ..त्यांना असलेली लैंगिक माहिती .. त्यांचा एड्स कडे पाहण्याचा दृष्टीकोन .. लैंगिक तृप्तीची त्यांची कल्पना .. कंडोम वापराबद्दल असलेला कल ..गर्भनिरोधकाची साधने ...समलैंगिक संबंध ..वगैरे माहिती मिळविण्यासाठी भरून घ्यायची असलेली प्रश्नावली वाचून आम्ही जरा विचारात पडलो .. त्यातील अनेक प्रश्न खाजगी किवा व्यक्तिगत लैंगिक जीवनाशी निगडीत होते .. लोक कसा प्रतिसाद देतील या बद्दल मनात शंकाच होती आमच्या .. कारण अजूनही भारतात लैंगिकता हा विषय चारचौघात चर्चा करण्याचा नाहीय असे मानले जाते ..भले जवळच्या मित्रमंडळी मध्ये हलक्या आवाजात मस्करी होत असेल ..पण नवख्या माणसाजवळ असे कोणी बोलणे कठीणच होते ...मात्र एक बरे होते की मुलाखत देणाऱ्या व्यक्तीचे नाव भरण्याचा आग्रह नव्हता फॉर्म मध्ये ..म्हणजे नाव न सांगण्याच्या बोलीवर लोक कदाचित बोलले असते ..महत्वाच्या आणि नाजूक विषयावर लोकांना बोलते करण्यासाठी आम्हाला खूप चतुराईने बोलणे गरजेचे होते .. पहिल्या दिवशी आम्ही सगळे जेव्हा सर्व्हे करण्यास निघालो तेव्हा ..सकाळी ११ वाजले होते .. प्रथम मजूर वर्गात जायचे ठरवले होते ..त्या नुसार आम्ही पंचवटीत असलेल्या मार्केट यार्ड येथे गेलो ..येथे गावोगाव हून मोठ्या प्रमाणात भाजीपाला ट्रक्स .ट्रँकटर.. भरभरून येत असे .. शेतकरी बांधव .. भाजीपाला वाहून नेणारे ..भाजीपाला उतरविणारे मजूर .. दलाल .. वगैरे प्रकारच्या लोक आम्हाला भेटले .. आम्ही एखाद्याला थांबवून ' जरा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत असे म्हंटले की ती व्यक्ती थांबत असे ..मात्र पहिलाच प्रश्न ऐकून व्यक्ती ..एकदम बावचळून जाई .. मग.. आम्हाला काही समजत नाई असे उत्तर देवून निघून जाई..पहिला प्रश्न असा होता ..की ' तुम्हाला एड्स बद्दल माहित आहे काय ? ' हा प्रश्न विचारल्यावर समोरची व्यक्ती ..आम्ही त्याच्यावरच काहीतरी आरोप करतो आहोत अशा नजरेने आमच्याकडे पाही व माझा काही संबंध नाही अश्या आविर्भावाने निघून जाई ..काही जण तर आमची प्रश्नावली ऐकून आम्ही काहीतरी पाचकळ बोलतोय ..किवा त्यांची मस्करी करतोय असा चेहरा करत ..आमच्याकडे रागाने पाहून निघून जात ..एक दोन वेळा असा अनुभव आल्यावर आमच्या लक्षात आले की असे समूहाने फिरण्यपेक्षा एकेकटे फिरले पाहिजे ..कारण तीन चार तरुण वाटेत अडवून .. एकदम एकदम ' एड्स ' बद्दल काही विचारात आहेत हे पचनी पडण्यासारखे नव्हते ..तेव्हढा मोकळेपणा समाजात नाहीय ..लैंगिकतेशी संबंधित काहीही डायरेक्ट ' अश्लील ' या सदरात टाकले जाते आपल्याकडे ..मग ते प्रबोधन असो ..माहिती असो ! मग आम्ही एकेकटे फिरून मग नंतर दोन तासांनी सर्वांनी एके ठिकाणी गोळा व्हायचे ठरविले .. !

दोन तासात मी तीन जणांना पकडून त्यांची प्रश्नावली भरून घेतली .. आधी मी त्यांचा काम धंदा .. कुटुंबीय .. आर्थिक परिस्थिती ..असे जिव्हाळ्याचे प्रश्न विचारून मग मूळ मुद्द्यावर यायला शिकलो .... कोणालाही नाव विचारले नाही .. याचा परिणाम म्हणून ते जरा मोकळे पणी बोलले .. मुलीना तर आमच्या पेक्षा भयानक अनुभव आला .. मजूर बायका तोंडाला मदार लावून लाजत व काहीही सांगायला नकार देत ..किवा ' या बया..असे उद्गार काढून रागाने सर्व्हे करणाऱ्या मुलींकडे विचित्र नजरेने पाहात ..या पोरी पूर्ण वाया गेल्या ..कसे व्हायचे यांचे पुढे अश्या तोऱ्यात निघून जात असत ..मुलीनीही मग आमच्या सारखीच युक्ती केली एकेकटे फिरण्याची ..ही युक्ती थोडीफार कामी आली.. सुमारे दहा १२ दिवस आम्ही हे सर्व्हेचे काम केले ...सर्व स्तरांच्या स्त्री पुरुष्यांमध्ये फिरलो .. सायंकाळी मग एकत्र जमून आम्ही ..एकमेकांचे अनुभव ऐकून त्यातून बोध घेवून.. आमच्या बोलण्याच्या शैलीत बदल करत गेलो ... कॉलेजची मुले मात्र आमचे प्रश्न ऐकून चेकाळत होती .. थट्टा मस्करी करीत होती .. काही ठिकाणी एखाद्याला प्रश्न विचारताना भोवती बघे गोळा होत असत .. अशा वेळी चांगली उत्तरे देणारा बावचळून जाई कारण भोवती गोळा झालेले लोक त्याच्या कडे हसून पाहत असत ..या बघ्यांना मी दोन तीन वेळा इथे जमू नका .. असे सांगण्याचा प्रयत्न केला पण कोणी जाईना ..मग एक युक्ती केली ..भोवती बघे गोळा झाले की मी त्या बघ्यांना प्रश्न विचारू लागलो ..मग मात्र ते आपोआप सटकू लागले .. सुमारे बारा दिवस आमचे हे काम सुरु होते दिवसभरातून सुमारे सहा तास आम्ही काम केले .माझ्या बरोबर काही वेळा अमित ..कादर देखील होते ..या कालावधीत आम्ही वेगवेगळ्या वर्गातील स्त्री पुरुष्यांचे मिळून ४०० फॉर्म भरून घेतले .. मग त्या सर्व फॉर्म मधील उत्तरांची सरासरी काढली .. आणि त्यानुसार प्रत्येक बबतीत एकंदरीत टक्केवारी मिळाली ..आता सर्व तपशील माझ्याकडे नाही मात्र काही ठळक गोष्टी चांगल्या लक्षात आहेत .. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे कंडोम वापराबाबत असलेली उदासीनता ..गैरसमज ..आणि येथेही असलेले पुरुषी वर्चस्व .. कंडोम वापराने बहुधा लैंगिक तृप्तीचा अनुभव येत नाही असे बहुतेकांनी सांगितले .. मग तो कंडोम संरक्षण म्हणून वापरला जावो किवा गर्भ निरोधाचे साधन म्हणून .. अनेक जण तर मेडिकल स्टोर्स मध्ये जावून कंडोम कसा मागावा या चिंतेत दिसले .. बहुतेकांना कंडोम सुरक्षित पणे उत्तेजित लिंगावर कसा लावावा हे देखील माहित नव्हते .. त्यांची कंडोम लावायची पद्धत अधिक असुरक्षित होती ..कंडोम नाजूक असल्याने अजिबात नख न लागू देता फक्त हलक्या बोटांनी हाताळायचा असतो हे माहित नव्हते लोकांना .. काही जणांना कंडोम लावे पर्यंत धीर नव्हता .. कारण त्यावेळात उत्तेजना कमी होते असे त्यांचे म्हणणे होते .म्हणजे हे लोक संभोग पूर्वक्रीडेबाबत ( फोर प्ले ) पूर्ण अनिभिज्ञ होते.. काही जण जे विवाहित होते ते कंडोम लावण्या ऐवजी पत्नीच्या गर्भनिरोधाच्या शस्त्रक्रिये वर भर देत किवा स्त्रियांनी गर्भनिरोधक गोळ्या घ्यावात असे त्यांचे मत पडले म्हणजे येथे पुरुषी वर्चस्वाचा भाव होता ...!

हस्तमैथुना बाबत प्रश्न विचारल्यावर हे खूप मोठे पाप आहे किवा अत्यंत लज्जास्पद कर्म आहे असा अविर्भाव होई ..मात्र नीट खोदून विचारल्यावर बहुतेकांनी हस्तमैथुन करत असल्याचे मान्य केले .. त्यात काहीही लज्जास्पद नाहीय हे त्यांना पटवून द्यावे लागे ..अश्लील सिनेमे पाहण्याबाबत पुस्र्ष अग्रेसर आढळले .. त्याकाळी असे सिनेमे दाखविणारे व्ही .डी .ओ पार्लर असत .. लपत छपत जावून किवा मित्र मंडळीनी मिळून वर्गणी काढून गुप्त जागेत व्हीसीआर वर असे सिनेमे पहिल्याची अनेकांनी कबुली दिली .. स्त्रिया मात्र या बाबतीत मागासलेल्या आढळल्या ..कारण लैंगिक बाबतीत पुरुष्यांच्या तुलनेत स्त्रियांवर अधिक बंधने आहेत ..विवाह पूर्व लैंगिक संबंधांचा अनुभव आहे का ? या प्रश्नावर आधी नकार आणि मग लाजत लाजत होकार आलेला होता .. विवाहपूर्व लैगिक संबंध कोणाशी आले असे विचारताना बहुतेक उत्तरे ..ओळखीच्या व्यक्तीशी ..चुलत .मावस नाते संबंधात असे संबंध घडल्याची कबुली दिली गेली होती .. खूप कमी लोकांनी शरीर विक्रय करणाऱ्या महिलांकडे गेले असल्याची कबुली दिली .. अशी कबुली देणारे कंडोम वापराबाबत मात्र नकार देत होते ..याच प्रश्नाचे उत्तर मात्र १०० टक्के स्त्रियांनी विवाहपूर्व किवा विवाहबाह्य लैंगिक संबधांचा अजिबात अनुभव नाही असे दिले .. सरासरी काढताना हा विवाह पूर्व किवा विवाहबाह्य लैगिक संबंधांचा प्रश्न खूप वादग्रस्त ठरला .कारण बहुतेक पुरुष्यानी होकारात्मक उत्तरे दिली होती ..तर १०० टक्के स्त्रियांनी नकार दिला होता .. हे जरा विसंगतच होते . यावरून स्त्री च्या लैगिक स्वातंत्र्यावर किती मर्यादा आहेत हे स्पष्ट होते ..किवा समाज पुरुष्याना जरी विवाहपूर्व किवा विवाह बाह्य संबंधाना मान्यता देत असला तरी स्त्रियांना मात्र अजिबात या बाबत मान्यता नव्हती ..म्हणजे नैतिकतेचे सारे नियम फक्त स्त्रियांनाच लागू होते ..पुरुष्याना काहीही केले तरी मोकळीक होती ..पिवळ्या कव्हरची म्हणजे लैंगिकते बाबतची किवा अश्लील या सदरात मोडणारी पुस्तके वाचणारे आंबटशौकीन अनेक आढळले .. मात्र अशा पुस्तकातून लैंगिकते बद्दल शास्त्रीय माहिती मिळविण्याबाबत ते उदासीन होते .. उलट अशी पुस्तके वाचून लैंगिक संबंधा बाबत गैरसमज अधिक वाढत असल्याचे जाणवले .. भावना चेतवीणारी पुस्तके लिहिणारी हिंदी लेखक मंडळी ' मस्तराम ' ..' मुसाफिर ' अशी नावे धारण करून लोकप्रिय झालेली होती .. मराठीतील ' हैदोस ' नावाचे मासिक देखील अनेकांनी वाचल्याचे आढळले ..

( बाकी पुढील भागात )



======================================================

झाकली मुठ ...! (पर्व दुसरे -भाग २४ वा )


एकंदरीत आम्ही केलेला सर्व्हे असे दर्शवित होता की समाजात लैंगिकते बदल शास्त्रीय माहिती मिळणे गरजेचे आहे .. थोरांपासून ते तरुणवर्गाला देखील .. ब्लू फिल्म पाहून मिळणारे ज्ञान हे पूर्णतः गैरसमज पसरविणारे होते .. लैंगिक संबंधांची ओढ ही नैसर्गिक आहे ..त्यावर विजय मिळविणे सोपे काम नाही .. मानव सोडून अन्य प्राण्यांमध्ये ही प्रेरणा फक्त पुनरुत्पादनासाठी वापरली जाते ..मानव केवळ पुनरुत्पादनच नव्हे ..तरी मानसिक आनंद मिळविण्यासाठी या प्रेरणेचा वापर करतो ..लैंगिक भावनेचा योग्य तो निचरा होणे आवश्यक आहे ..अन्यथा अनेक प्रकारच्या मानसिक विकृती तयार होऊ शकतात ..नैतिक -अनैतिकतेच्या मर्यादा या समाजाने केव्हाच ओलांडल्या आहेत ...असे एकंदरीत चित्र होते .. या दरम्यान आम्ही ' सफेद गल्ली ' येथे शरीरविक्रय करणाऱ्या महिलांकडे येणाऱ्या ग्राहकांशी देखील बोललो .. बहुधा ८० टक्के लोक तेथे दारू ..चरस ..ताडी ..गांजा व इतर मादक पदार्थ सेवन करून येतात असा निष्कर्ष निघाला ..म्हणजे मादक पदार्थ सेवन केल्यावर चित्तवृत्ती सैल होतात .. लैंगिक भावना जास्त प्रमाणात जागृत होते .. व तशी हिम्मत देखील वाढते ...त्यामुळे असे मादक पदार्थ सेवन करणाऱ्या व्यक्तींकडून स्वतच्या सुरक्षीततेची काळजी कितपत घेतली जाईल या बाबत शंकाच आहे ..काही जण ब्लू फिल्म पाहून ..त्यातील प्रयोग घरी करणारे आढळले .. घरातील महिलेवर एखाद्या ब्लू फिल्म मधील नायिके सारखे वागण्याची अपेक्षा लादणे हे अन्यायकारक होते ..प्रणय क्रीडेबाबत शास्त्रीय माहितीचा अभाव सगळ्या वर्गात आढळला ..त्यामुळे लैंगिक तृप्तीच्या कल्पना देखील स्पष्ट नव्हत्या .. लैंगिक संबंधातील अत्त्युच्च आनंदाचा क्षण ( आर्गेझम ) पुरुष लवकर अनुभवतो .. स्त्री बाबत हा क्षण येण्यास विशिष्ट प्रकारे प्रणय करणे गरजेचे असते .. बहुतेक स्त्रियांना एकदाही हा अनुभव आलेला नव्हता .. किवा त्यांचा जोडीदार त्यांच्या या अत्त्युच्च क्षणाबाबत बेफिकीर आढळला .... काही ठिकाणी या संबंधाना ' उरकून घेणे ' इतकाच अर्थ उरला होता .. स्त्री च्या चित्तवृत्ती जागृत करण्यासाठी ज्या प्रमाणे पूर्वप्रणय( फोर प्ले ) आवश्यक आहे तसाच शास्त्रात पश्चातक्रीडा ( आफ्टर प्ले ) हा प्रकार देखील आहे ..ज्यात लैंगिक संबंध झाल्यावर आपल्या जोडीदाराशी मधुर संभाषण करून.. एक प्रकारे त्याने दिलेल्या सुखाबद्दल आभारप्रदर्शन करायचे असते ..बहुसंख्य लोक या बाबत मागासलेले आढळले .. लैंगिक संबंध झाले की लगेच जोडीदाराकडे पाठ फिरविणे हाच प्रकार आढळला ..अश्या वेळी योग्य प्रकारे लैंगिक तृप्ती न झाल्याने स्त्रियांमध्ये चीड चीड होणे ..वापरले गेल्याची .. अन्यायाची भावना बळावणे..निराशेची भावना येणे ..वगैरे प्रकार घडू शकतात हे कोणाच्याही गावी नव्हते !

या सर्व्हेची सरासरी काढून झाल्यावर खरोखर लैंगिक शिक्षण देणे महत्वाचे आहे हे लक्षात आले ..हा सर्व्हे करण्याआधी सर्व्हे करणाऱ्या मुलामुलींना विशिष्ट मानधन दिले जाईल असे ठरले होते ..मात्र सर्व्हे संपला तरी मुंबईहून सर्व्हे करून घेण्यासाठी आलेले संबंधित संस्थेचे प्रतिनिधी मानधन देण्याचे नाव घेईनात .. आम्ही मुंबईला गेल्यावर तुमचे सर्वांचे मानधन पाठवतो असे त्यांनी आम्हाला सांगितले ..मात्र एकदा ते मुंबईला गेले कि मानधन पाठवितील की नाही या बाबत काही खात्री नव्हती .. आम्ही सर्व्हे करणाऱ्या मुलामुलींनी खूप चर्चा केली .. नेमके काय करावे त कळेना .. पैसा हा घटक दुय्यम होता ..परंतु त्या लोकांनी आधी काबुल केल्याप्रमाणे त्यांचे वागणे नव्हते हे आम्हाला समजले .. उन्हात फिरून केलेल्या या कामातून बरेच शिकायला मिळाले होते आम्हाला तरी देखील ..पैसे नंतर देतो असे म्हणणे खचितच चीड आणणारे होते ..शिवाय ज्या संस्थेमार्फत हा सर्व्हे घेण्यात आला होता ..त्या संस्थेला नक्कीच या सर्व्हेचे पैसे मिळणार होते ..शेवटी ' उंगली तेढी ' करावी लागली ....इथे माझा टपोरीगिरी चा अनुभव कामी आला ..मी सरळ सर्वाना सांगितले की आपले मानधन मिळेपर्यंत आपण या प्रतिनिधीना मुंबईला जावू द्यायचे नाही ..ते ज्या हॉटेल मध्ये उतरले होते तेथेच त्यांना ओलीस ठेवायचे .. बाकीची मुले जरा घाबरत होती ..पण मी त्यांना धीर दिला व असे केल्याशिवाय पैसे मिळणे कठीण आहे हे सांगितल्यावर मुलेआणि मुलीही या ओलीस ठेवण्याच्या कल्पनेला तयार झाल्या .. त्याप्रमाणे मी त्या प्रतिनिधीना स्पष्ट सांगितले ..आमचा तुमच्यावर विश्वास नाही ...तुम्ही मुंबईला तुमच्या वरिष्ठांना कळवा की तुम्ही ताबडतोब पैसे पाठवा त्या शिवाय ही मंडळी आम्हाला मुंबईला येवू देणार नाहीत ..त्यांना हे अनपेक्षित होते .. ते जरा मुजोरी करू लागल्यावर मी माझी सिन्नरफाट्या ची भाषा वापरली मग ते जरा नरमले ..पैसे नक्की देतो वगैरे शपथा घेवू लागले ..आता आम्ही विश्वास ठेवण्यास तयार नव्हतो ..!

मग ठरल्याप्रमाणे त्या प्रतिनिधींनी हॉटेल सोडून मुंबईला निघून जावू नये म्हणून त्याच्यावर पहारा ठेवण्यात आला .. मी यात अग्रेसर होतो .. सरळ सरळ दमबाजी केली .. दोन दिवस आम्ही दोन तीन मुले तेथेच हॉटेल वर तळ ठोकून होतो .त्या प्रतिनिधींनी फोनाफोनी केली .. मग शेवटी त्यासंस्थेचे वरिष्ठ मुंबईहून नाशिकला आले ..त्यांनी सोबत पैसे आणले होते ..सर्व मुलामुलींचा हिशोब केला गेला ..ड्राफ्ट ने पैसे देण्याचे ठरले ..त्यानुसार मग सर्वाना पैसे मिळाल्यावर आम्ही त्या प्रतिनिधीना मुंबईला जावू दिले .. नंतर समजले कि त्या संस्थेने कोल्हापूर येथे देखील असा सर्व्हे केला होता व त्या सर्व्हे करणाऱ्या मुलांचे पैसे बुडविले होते .. म्हणजे आम्ही केले ते योग्यच होते ..सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या सगळ्याच संस्था प्रामाणिक असतात असे नव्हे .. कागदोपत्री सर्व आलबेल दाखवून .. दानशूर व्यक्तींकडून किवा सरकार ..अथवा इतर संस्थांकडून पैसे काढायचे व ते योग्य ठिकाणी न वापरता हडप करायचे ही प्रवृत्ती आढळली ..या सर्व्हेच्या नंतर गौड सरांनी शरीर विक्रय करणाऱ्या महिलांचे संमेलन आयोजित करण्याचे ठरविले .. वेगवेगळ्या शहरात शरीर विक्रय व्यवसायात असलेल्या महिलांच्या समस्या समजाव्यात ..त्या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थांचा समन्वय असावा ..असा या मागील हेतू होता .. !

( बाकी पुढील भागात )

======================================================

अति उपेक्षितांचे संमेलन ! (पर्व दुसरे - भाग २५ वा )


शरीरविक्रय करणाऱ्या महिलांचे संमेलन आयोजित करण्याचे ठरल्यावर डॉ . गौड यांनी सर्व तयारी सुरु केली ..दरम्यान आम्ही कार्यकर्ते आठवड्यातून दोन वेळा ' सफेद गल्ली ' , गंजमाळ , व नाशिक मधील इतर ठिकाणी शरीरविक्रय करणाऱ्या महिलांना भेटून त्यांना आरोग्याचे महत्व , कंडोम वापराचे फायदे ...वगैरे समजावून सांगून ..त्यांना मोफत कंडोम वाटपाचे काम देखील करत होतो ..या वस्त्यांमध्ये आमची चांगली ओळख झाली होती .. अनेकदा त्या महिला त्यांच्या व्यक्तिगत अथवा कौटुंबिक समस्या सांगत तेव्हा गहिवरून येई .. आम्ही त्यांना दिलासा देण्याशिवाय काहीही मदत करू शकत नव्हतो ..समाजव्यवस्थेमध्ये त्यांचे स्थान अतिउपेक्षित वर्गात मोडत होते .. त्यांच्या जीवनाबद्दल कोणालाही काहीही घेणे देणे नव्हते ..संमेलनासाठी इतर शहरातून देखील शरीर विक्रय करणाऱ्या महिला येणार होत्या ..गौड सरांनी त्या त्या शहरात अशा महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांशी संपर्क करून त्यांना निमंत्रणे दिली होती .. संमेलनाला यायचे म्हणजे या महिलांचे किमान एका दिवसाच्या व्यवसायाचे नुकसान होणार होते त्यामुळे जास्त महिला येवू शकणार नाहीत हे स्पष्ट झाले .. तरी देखील तीनचार शहरातून मिळून एकंदरीत १५ ते २० जणी येतील असा अंदाज होता .. गौड सरांनी त्या दृष्टीने आर्थिक निधी उभा केला होता .. नाशिक मधील त्र्यंबक रोडवर त्या वेळी नव्याने सुरु झालेले हॉटेल ' पंचवटी एलिट ' येथे संमेलन घेण्याचे ठरले होते ..या संमेलनातून अशा महिलांची मोठी चळवळ उभारून .. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना एकत्रित करण्याचा उद्देश होता आमचा ...या संमेलनाची माहिती देण्यासाठी एखादी पत्रकार परिषद आयोजित केली जावी असेही ठरले.. त्या दृष्टीने डॉ . गौड यांनी परिचित असलेल्या दोन तीन पत्रकारांना तशी माहिती दिल्यावर ..त्या पत्रकार बंधूंचे असे म्हणणे पडले की यासाठी सर्व दैनिकांच्या पत्रकारांना आधी एखादी पार्टी दिली तर नक्कीच हे काम चांगले होईल ..थोडक्यात पत्रकार बंधूना खायला प्यायला घातले तर ते या गौड सरांच्या कार्याला व या संमेलनाला प्रसिद्धी देणार होते .. मग तशीही एक पत्रकारांची पार्टी आयोजित करण्यात आली .. या पार्टीला माझ्या सोबत अजित , कादर , अभय , व व्यसनमुक्तीचे उपचार घेवून त्यावेळी व्यसनमुक्त असणारे तीन जण देखील उपस्थित असणार होते .. पार्टीत दारू असणार हे गृहीत होते ..त्यामुळे गौड सरांनी मला वेगळ्या सूचना दिल्या होत्या .. मी जास्तीत जास्त लक्ष आमच्या व्यसनमुक्त मित्रांवर ठेवावे असा त्यांचा कटाक्ष दिसला ..कारण अशा पार्टीत इतरांना पिताना पाहून आमच्या मित्रानाही मोह होऊ शकला असता .. 

व्यसनी व्यक्तीने व्यसनमुक्त राहत असताना ज्या समारंभात दारू असेल तेथे जाणे टाळणे उत्तम ..उगाच विषाची परीक्षा घेतल्यासारखे होते ..मी सर्व मित्रांना आधीच सावध करून ठेवले .. त्यानुसार मग ती ओली पत्रकार परिषद पार पडली .. समोरच्या टेबलवर छान सजविलेल्या डिशेस ..हॉटेलच्या हिरवळीवर लागलेले मंद संगीत .. समोर बियर अथवा व्हिस्की ने भरलेला ग्लास या वातावरणात सगळ्यांना डॉ . गौड यांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली .. शरीरविक्रय करणाऱ्या महिलांचे दारूण अनुभव सांगितले.. डोक्यात असलेल्या किक मुळे सर्व पत्रकार बंधू देखील खूप भावनाप्रधान झाले होते .. बिचाऱ्या शरीरविक्रय करणाऱ्या महिला किती अगतिक आहेत हे त्यांना चांगलेच कळले .. या पार्टीत अजिबात न घेणारे दोन तीन पत्रकार होते ..इतर पत्रकारांच्या दृष्टीने ते बावळट होते ..सर्वांनी सरांना.. त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या तसेच या कार्याला योग्य ती प्रसिद्धी देण्याचे आश्वासन दिले .. त्याप्रमाणे लवकरच स्थनिक दैनिकात ...शरीर विक्रय करणाऱ्या महिलांच्या समस्यांवर प्रकाशझोत टाकला गेला .. संमेलनाच्या आदल्या दिवशी सायंकाळपासून हॉटेल बुक केलेले होते ..बाहेरच्या गावाहून येणाऱ्या महिला आदल्या दिवशीच आल्या होत्या .. नागपूर येथील ' गंगा जमना ' या ठिकाणी असा मोठा व्यवसाय आहे ..तेथील पाच सहा महिला आणि त्यांच्या सोबत काम करणाऱ्या सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते .. सांगली हून देखील ' संग्राम ' या सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधी व तेथील शरीरविक्रय करणाऱ्या काही महिला उपस्थित झाल्या .. काही पत्रकार मित्र .. सरांचे शुभचिंतक ..नाशिकचे त्यावेळचे पोलीस सहआयुक्त ..या मंडळींच्या उपस्थितीत दुसऱ्या दिवशी हॉटेलच्या एका हॉल मध्ये संमेलनाची सुरवात झाली .. सुरवातीला गौड सरांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले .मग 'एड्स ' या गंभीर समस्येची जाणीव करून दिली ..एड्स चा सर्वात जास्त धोका असलेल्या या महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे संमेलन आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले .. त्यानंतर गावोगावहून आलेले सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी बोलले ..सर्वांनी आपल्या बोलण्यात या महिलांचा उपेक्षित तरीही उपयुक्त असा उल्लेख केला ..शेवटी पाळी होती प्रत्यक्ष शरीरविक्रय करणाऱ्या महिलांची ..इतर लोक बोलत असताना मी सवयीनुसार या महिलांचे निरीक्षण करीत होतो ..सर्वांच्या चेहऱ्यावर थोडेसे बुजल्याचे भाव होते ..तरीही आपल्या सारख्या महिलांना येथे सन्मानाने वागवले जातेय याबद्दल समाधान दिसले .. बोलण्याची वेळ येताच मात्र त्या महिला स्तब्ध झाल्या .. संकोचल्या .. पाच मिनिटे झाली तरीही कोणीही तोंड उघडायला तयर नव्हत्या !

सरांनी त्यांना मोकळेपणी बोलण्याचे आवाहन केले ..एरवी सगळ्या व्यथा भडाभडा बोलणाऱ्या या महिला इथे मात्र तोंडाला कुलूप लावून होत्या .. शेवटी सांगली येथे काम करणाऱ्या ' संग्राम ' संस्थेच्या डॉ. मीना पुढे झाल्या त्यांनी या महिलांना धीर दिला .. आम्ही तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी येथे जमलो आहोत तेव्हा तुम्ही लाजून ..संकोचून किवा घाबरून जाता कामा नये वगैरे आवाहन केले तरीही त्या महिला ढिम्म होत्या ..मग मीना मँडमनी अतिशय धाडसी आणि सर्व पुरुषवर्गाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे विधान केले .. त्या म्हणाल्या ' बायानो तुम्ही लाजू नका ..तुमच्यात आणि माझ्यात फारसा फरक नाही ..मी जरी विवाहित असले ..तुमच्या दृष्टीने गरती असले .. संसार करणारी असले ..तरी देखील आपल्यात एक साम्य नक्कीच आहे ते म्हणजे तुम्ही पोटासाठी .. रोज वेगवेगळ्या पुरुश्यांची मर्जी सांभाळता ..तुमचा देह हवा तेव्हा त्या पुरुष्यांच्या हवाली करता ..आणि मी देखील माझ्या संसारासाठी ..पोटासाठी ..सुरक्षिततेसाठी नियमित एका पुरुष्याची म्हणजे माझ्या नवऱ्याची मर्जी सांभाळते .. माझा देह त्याला हवा तेव्हा त्याच्या हवाली करते .. अनेकदा स्वतच्या मर्जीची .. मानसिक स्थितीची .. पर्वा न करता माल हे करावे लागते ' मीना मँडमचे हे बोलणे खूप परिणाम कारक ठरले .. मग त्या महिला बोलू लागल्या .. एकेकीने आपल्या अडचणी मांडल्या त्यांची सामुहिक व्यथा एकच होती कि आम्हाला समाजात खूप उपेक्षा सहन करावी लागते .. रंडी ..छिनाल .. हरामजादी असा उल्लेख आमच्या नशिबी आहे .. कोठेवाली घरमालकीण ..गल्लीतील गुंड .. पोलीस .. सगळे आमचे शोषण करतात .. आम्ही कोणाजवळ तक्रार करायला जावे .. दोन तीन जणींनी पुनर्वसनाचे प्रयत्न केले होते मात्र तेथेही जेव्हा तेथे यांच्या पूर्वायुष्याबद्दल समजले तेव्हा पुन्हा शोषण .. आमचे चारित्र्य सैल आहे असाच सर्वांचा समज झालाय ..आम्ही देखील एक माणूस आहोत ..आम्हाला एक मन आहे .. आमची स्वप्ने आहेत .. याची कोणालाच परवा नसते वगैरे !

( बाकी पुढील भागात )