गुरुवार, 8 अगस्त 2013

सुधारणेचे पर्व

अतृप्ता !( पर्व दुसरे -भाग ५१ वा )


सुमारे महिनाभर शीतल आमच्याकडे रहात होती ...दरम्यान कादर मुक्तांगण मधून परत आलेला होता .. माझे पिणे सुरु होतेच ...त्यामुळे त्याचेही पिणे सुरूच झाले ...प्रामाणिकपणे व्यसनमुक्त राहायचे असेल तर ..सर्वात आधी पिणाऱ्या मित्रांपासून दूर राहायला पाहिजे .. ते न पाळल्यामुळे अनेकजण पुन्हा पुन्हा त्याच जाळ्यात अडकतात ..माझे मित्र वेळोवेळी बदलत गेले ..मात्र नवीन होणारे मित्र देखील बहुधा व्यसनीच मिळाले ..त्यातील ठराविक लोकांसोबत अनेकवेळा माझी रीलँप्स झाली आहे ...कादरचे देखील तसेच होत असावे ..तो उपचार घेवून परत आल्यावर माझे व्यसन सुरु असल्याने ..त्याचेही सुरु झाले ..कादरला शीतल बद्दल माहिती समजली तेव्हा .. त्याने मला तिला घरात राहू दिलेस म्हणून वेड्यात काढले ..मग शीतल आणि कादरची देखील ओळख झाली ..शीतलला नेमकी काय मदत करून यातून बाहेर काढावे हे समजत नव्हते .. ती मुलगी असल्याने काम जरा अवघड होते ..तसेच घरातून बाहेर काढलेली व्यसनी मुलगी म्हणून अधिकच अवघड .. त्यातच तिला लहान वयातच शरीरसुखाची ओळख झालेली ..इतकेच नव्हे तर चटक लागलेली ..ती माझ्याशी अत्यंत मोकळेपणे बोलत असे ..एकदा बोलताना ती म्हणाली ..माझे सेक्स बाबत कधी समाधानच होत नाही ..म्हणजे ती मी गौड सरांकडून ऐकलेल्या ' निम्फोमँनिक ' या प्रकारातील होती ... शरीर सुखातील अत्त्युच्च आनंदाचा क्षण ( ऑरगेझम ) अश्या प्रकारच्या स्त्रियांच्या वाट्याला फार थोड्या वेळा येतो .. तो क्षण गाठण्याची त्यांची शारीरिक क्षमता इतर स्त्रियांच्या पेक्षा वेगळी असावी ..अथवा त्यांच्या मनातील अतृप्तीचा भाव इतका जास्त खोलवर असतो की ..सतत जाणवणारी वेगवेगळ्या बाबतीतली अतृप्ती त्या शरीर सुखात शोधण्याचा प्रयत्न करतात ...त्यांच्या मनातील अतृप्तीचा भाव केवळ शरीर सुखाशी संबधित नसून ..त्यांच्या मानसिकतेशी देखील संबधित असू शकतो .. कुटुंबियांकडून न मिळालेले प्रेम ..गरिबीमुळे सततची वंचना .. विश्वासघात .. प्रेमप्रकरणातील अपयश ..वगैरे सगळ्या प्रकारचे असमाधान ..शरीर सुखाद्वारे शोधले जाते ..


शीतलचे घरात राहणे आईला मनापासून आवडत नव्हते ..अर्थात माझ्या हट्टापुढे आईचे काही चालत नसे .. कसेही करून हिला लवकरात लवकर मार्गी लावले पाहिजे असे आईला वाटे .. एकदोन वेळा मला जाणवले की शीतल माझ्याकडे आकर्षित झालीय ..विभिन्नलिंगी समुपदेशानात हा धोका नेहमी असतो .. समुपदेशन केले जाणारी व्यक्ती भिन्नलिंगी असेल तर समुपदेशाकाबद्दल तिच्या मनात आकर्षण निर्माण होत असावे ..कारण समुपदेशक त्या व्यक्तीला दोष न देता तिला तिच्या चुका दाखवून देतो .. चांगल्या प्रकारे समजून घेतो ... शीतलला एक दोन वेळा मी तू एखादा चांगला मुलगा पाहून लग्न करून टाक असे मी सुचविले तेव्हा तिने ' तू करतोस का माझ्याशी लग्न ? असे पटकन विचारले .. मी अनघावर जीवापाड प्रेम करत होतो ..आणि आता तिचे लग्न झाले आहे ..तिच्याशिवाय मी कोणाशीच लग्न करणार नाही असे मी तिला सांगितले ..तू एखादी नोकरी कर असे सांगितल्यावर म्हणाली..माझे शिक्षण अर्धवट आहे ..मला कोण देणार नोकरी ..अर्थात हे देखील खरे होते ..तिला फार फार तर धुणी भांडी करण्याचे काम मिळाले असते .. मी एड्स च्या क्षेत्रात काम करतो हे तिला सांगितले होते .. शरीरविक्रय करणाऱ्या अनेक महिला व त्यांच्या आँटी माझ्या ओळखीच्या आहेत हे तिला माहित झाल्यावर एकदा म्हणाली ..तू एखाद्या आँटीशी माझी ओळख करून दे ..मी सरळ सरळ शरीर विक्रय करण्याचा व्यवसाय करते ...केवळ दारू साठी शरीर ऑटोवाल्यांच्या हवाली करण्यावजी राजरोस धंदा करीन .. मला हे अनेपेक्षित होते ..तिला मी त्यातील धोके .. समाजाचा अश्या महिलेकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टीकोन वगैरे बाबी समजावून सांगितल्या .

एकदा कादर ..शीतल ..आणि मी तिघेही भद्रकालीत गेलो असताना शरीरविक्रय करणाऱ्या महिलांची एक घरवाली ( बाँस) आम्हाला वाटेत भेटली ..तिचे घर तेथून जवळच होते म्हणून चहा घेवून जा म्हणाली .. खूप आग्रह केला म्हणून आम्ही गेलो .. शीतल एका मित्राची बहिण आहे असे तिला सांगितले .. तिच्या सराईत नजरेने काय ते जोखले असावे .. त्या निमित्ताने शीतलला तिचे घर माहित झाले .. दोनच दिवसांनी ..मी बाहेर गेलो असताना शीतल पुन्हा सायंकाळी फिरायला म्हणून बाहेर पडली ..रातभर गायब होती ..थेट दुपारी परत आली ..खूप थकलेली ..मरगळलेली .. माझ्याशी ती खोटे बोलत नसे ..म्हणाली त्या दिवशी भेटलेल्या बाईकडे गेले होते काल .तिला सांगितले कि मला या व्यवसायात यायचे आहे ..तिने आधी खूप समजावले मग तयार झाली .. काळ तिने गाठून दिलेल्या एकासोबत लॉजवर मुक्कामाला गेले होते ..दोनशे रुपये मिळाले ..मी हतबल झालो होतो .. आपल्या समोर पाहता पाहता ही मुलगी शरीरविक्रय करण्याच्या व्यवसायात शिरली ..आपण काहीही करू शकलो नाही ..कदाचित आपले ब्राऊन शुगर पिणे सुरु नसते तर नक्की हिला काहीतरी ठोस मदत करता आली असती ही खंत कायमची मनात बसली ..एव्हाना आईने पुन्हा मँडमना फोन करून माझे पिणे सुरु झाले असावे असे सांगितले होते .. एकदा मँडमचा पुण्याला बोलाविले आहे असा निरोप आला..दोन दिवसात परत येतो ..तो पर्यंत शीतलला आपल्याच घरी राहू दे असे आईला सांगून पुण्याला गेलो .. पुण्याला गेल्यावर मँडमनी तू आता काही दिवस येथेच रहा असे संगितले ..माझा नाईलाज होता .. तिकडे शीतलचे काय झाले असेल ही काळजी वाटत होती काही दिवस.. नंतर नंतर विसरलो ...सुमारे सहा महिने मुक्तांगणला राहून परत आल्यावर आईने सांगितले कि तू गेल्यानंतर शीतल दोन तीन दिवसातच मैत्रिणीकडे राहायला जाते असे सांगून निघून गेली होती .. पुढे पुन्हा व्यसन सुरु झाले तेव्हा एकदा टर्कीत पंचवटीच्या घाटावर फिरत असताना ..एका लॉजच्या बाल्कनीत शीतल उभी दिसली ..अंगावर भारीपैकी गाऊन होता .. तिला मी हाक मारली ..तेथेच थांब असा इशारा करून लॉजच्या खाली रस्त्यावर येवून मला भेटली .. आता ती राजरोस शरीरविक्रय करण्याचा व्यवसाय करत आहे हे समजले ..माझी अवस्था पाहून मी टर्कीत आहे हे तिने ओळखले ...पुन्हा पुन्हा ब्राऊन शुगर का पितोस ? त्यापेक्षा तुझा लग्न न करण्याचा तसेच अनघाचा विचार सोडून दे ..लग्न कर तर मार्गी लागशील असा पोक्त सल्ला देवून मला ब्राऊन शुगर पिण्या करिता पाचशे रुपये काढून दिले ...या गोष्टीला आता सुमारे सतरा वर्षे उलटून गेलीत नंतर तिची काहीच खबर नाही . अजूनही तिची आठवण झाली की स्वतच्या त्यावेळच्या असहायतेची व्यसनाधीनतेची खंत वाटते .

( बाकी पुढील भागात )


====================================================

निर्लज्ज ???? (पर्व दुसरे -भाग ५२ वा )


व्यसनमुक्ती केंद्रात वारंवार उपचारांसाठी वारंवार दाखल होणार-या लोकांच्या बाबतीत एक धोका असतो ..तो म्हणजे निर्ढावलेपणाचा... तिसऱ्यांदा जेव्हा मी ' मुक्तांगण ' ला गेलो ..तेव्हा माझ्या बाबतीत तसेच घडले .. सुरवातीला काही दिवस ..आपण काहीतरी चूक केली आहे याची जाणीव राहिली ..मला या वेळी देखील ' आफ्टर केअर ' या दीर्घ काळ राहणाऱ्या तसेच निवासी कर्मचारीराहतात त्या विभागात ठेवले होते ..तेथे राहणारे सर्व जण बहुधा माझे जुने मित्रच असल्याने ..सहजपणे मी तेथे स्थिरावलो .. मी तेथे गेल्यावर दोनच दिवसात नेमक्या मँडम त्यांच्या उपचारांसाठी मुंबईला गेल्या काही दिवस ...त्यामुळे लगेच मँडमची भेट होऊ शकली नाही ...इतर कोणाजवळ की मोकळेपणी बोलू शकलो नाही .. किवा समुपदेशकाला देखील स्वतःहून काही बोललो नाही .. इतक्यात नाशिकला परत जाता येणार नाही हे समजल्यावर शीतलचे काय झाले असेल हा विचार देखील सोडून दिला ..पहिल्यांदा जेव्हा उपचारांसाठी दाखल झालो होतो तेव्हा ..माझ्या पुढे अनघा ..करिअर ...संसार वगैरे ध्येय होते ..या वेळी मात्र तसे काहीच ध्येय डोळ्यासमोर नव्हते .. लग्न करायचे नाही हे ठरवलेलेच होते ..शिवाय या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातच सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे देखील पक्के झालेले ..साहजिकच भविष्याच्या दृष्टीने मी फारसा गंभीर नव्हतो ..

जवाबदा-या घ्यायच्याच नाहीत हे एकदा मनात पक्के ठसले की असे होते ..कदाचित ही माझी पळवाट होती हे आता जाणवतेय... आठवड्यातून एखादा ' समूह उपचार ' घेणे .. पेंडसे सर योगाभ्यास घ्यायला येणार नाहीत तेव्हा योग्याभ्यास घेणे ..संगीत उपचारात सक्रीय सहभाग ...शिवाय रोजची एखाद्या ठकाणी झाडू मारण्याची ड्युटी ...इतक्याच सकारात्मक बाजू होत्या ..बाकी दिवसभर टिंगल टवाळ्या करणे ..एकमेकांच्या मस्क-या करणे ..'बुद्धिबळ ..कँरम खेळणे असे माझे उद्योग चालत ..माझ्या सारखेच तीनचार खुशालचेंडू होतेच माझ्या सोबतीला ..आतून खूप अवस्थ असणारा माणूस आपली अवस्थता लपविण्यासाठी कधी कधी एकदम निर्धास्त ..बिनधास्त असल्याचे सोंग घेतो तसे माझे झाले होते ...माझी विनोदबुद्धी चांगली असल्याने ..माझ्या विनोदाला लोक हसतात म्हणून मी सारखा विनोद करण्याचा मागे राही ..वरकरणी सारे काही आलबेल आहे दाखविण्याच्या नादात मी उगाचच माझ्या आयुष्याचे मौल्यवान दिवस बळी देत होतो हे मला समजले नाही ..म्हणजे वयाच्या मानाने माझी समज वाढण्याएवजी कमीच झाली होती ...एकप्रकारे मी ' कम्फोर्ट झोन ' व ' ड्राय ड्रंक ' अवस्थेत जास्तीत जास्त वेळ असे... याचा अर्थ असा की दारू न पिता अथवा कोणतेही मादक द्रव्य सेवन न करता देखील दारुड्या व्यक्तीसारखेच बेजवाबदार ..बेभरवश्याचे वर्तन करणे ..मनातील नकारात्मक भावना अनियंत्रित असणे ..फक्त व्यसन केले नाही मात्र वर्तन अगदी व्यसनी व्यक्तीसारखेच .... कोणताही सकारात्मक बदल नाही वर्तनात ...अन्न , वस्त्र , निवारा या जीवनावश्यक गोष्टी विनासायास मिळत आहेत ना ? मग उगाच बाकीची चिंता करायची नाही असा दृष्टीकोन .. अन्य प्राण्यांच्यापेक्षा अधिक क्षमता दिलेल्या असूनही त्या क्षमतांचा योग्य पद्धतीने वापर न करता ..आला दिवस ढकलणे ...शिवाय तीन वर्षे चांगला होतो हे तुणतुणे होतेच माझे .

मला जुने मित्र जरा ' सिरीयस ' राहायला सांगत तेव्हा त्यांच्या राग येई ..त्यातील काही अनेक वर्षे पुनर्वसनाच्या प्रक्रियेत होते .. तुम्ही बाहेर पडून चांगले राहून दाखवा असे मी त्यांना म्हणे .. मी बाहेर तीन वर्षे चांगला राहिलो होतो हा अहंकार काही कमी झाला नव्हता ....तेथे दत्ता श्रीखंडे ..प्रसाद ढवळे.. सोमनाथ पुरंदरे ..अंकुश दरवेश ..बाबा शेख ..गुरुजी .. रमेश हुले अशी मंडळी देखील होती ..जे माझ्या नंतर उपचार घेण्यास आले ..यशस्वीपणे उपचार घेवून प्रामाणिक पणे काम करू लागले...पाहता पाहता जीवनात स्थिरावले ... अश्या मोजक्या मंडळींचा आदर्श समोर न ठेवता मी जे वारंवार उपचार घेण्यास येतात त्यांच्यात जास्त रमत असे ..दत्ता श्रीखंडेची सुधारणा तर अगदी आश्चर्यजनक होती .. तो पहिल्यांदा उपचार घेवून गेल्यावर लगेच काही दिवसांनी परत उपचारांना आला ...या वेळी त्याला प्रामाणिकपणे व्यसनमुक्त राहायचे होते ..उपचारांसाठी दाखल झाल्याबरोबर ..त्याने निवासी कर्मचार्यांना सांगितले ..की मी येताना सोबत खूप ब्राऊन शुगर आणली होती ..ती सगळी काही मला संपवता आली नाहीय ..मेंटल हॉस्पिटलच्या बाहेरच्या भिंतीजवळ मी ती उरलेली ब्राऊन शुगर लपवलेली आहे .. मागच्या वेळी असेच झाले होते .. उपचार घेवून बाहेर पडताच मी लपवलेली ब्राऊन शुगर प्यायलो होतो .. आता मला प्रामाणिकपणे व्यसनमुक्त राहायचे आहे ..तेव्हा तुम्ही ती लपवलेली ब्राऊन शुगर तेथून काढून नष्ट करा ...बापरे किती हा प्रामाणिकपणा ... मी एकतर जवळची सगळी ब्राऊन शुगर संपल्याशिवाय अँडमिट झालोच नसतो ..आणि ब्राऊन शुगर लपवून ठेवल्याचे अजिबात सांगितले नसते कोणाला ..उपचार घेवून बाहेर पडल्यावर ' फक्त एकदाच ' म्हणून पुन्हा प्यायलो असतो .

( बाकी पुढील भागात )


=============================================

अतिशहाणा ..त्याचा ......!  (  पर्व दुसरे -  भाग ५३ वा )


व्यसनाधीनतेत अडकलेल्या माणसांचा बुद्ध्यांक हा सर्वसामान्य माणसापेक्षा जास्तच असतो असे संशोधन आहे .. मात्र त्याची ही अतिरिक्त बुद्धिमत्ता तो व्यसनात अडकल्यावर स्वतःलाच उल्लू बनविण्यासाठी वापरतो हे देखील तितकेच खरे आहे .. आपण व्यसनाधीनता या अतिशय भयंकर आजारात अडकलो आहोत हे मान्य करण्याच्या आड त्याची बुद्धिमता नेहमी येत असते ..एकदा या आजारात अडकलेल्या व्यक्तीला आयुष्यात कधीही .. थोडेसे ..एकदाच....कधी कधी .. वगैरे व्यसन करता येणार नाही हे शास्त्रीय सत्य आहे ...मात्र तरीही व्यसनी व्यक्ती सहजा सहजी व्यसनापुढे आपली हार मान्य करीत नाही ..तो महिना पंधरा दिवसातून एकदा पिणाऱ्या किवा रोज रात्री फक्त एकाच पेग घेवून थांबू शकणाऱ्या व्यक्तीची बरोबरी करण्याचा प्रयत्न करत असतो ..आणि एकदा तोंडाला लागली की जो पर्यंत एखादे मोठे नुकसान होत नाही किवा उपचार घेत नाही तो पर्यंत व्यसन थांबत नाही ..हे वारंवार अनुभवाला येवून देखील तो हे स्वीकारत नाही ..पुन्हा पुन्हा प्रयोग करीत राहतो ..तसेच प्रत्येक वेळी आपल्या अपयशाला नवीन नवीन समर्थने जोडतो ...म्हणूनच व्यसनमुक्ती केंद्रात स्वतची अक्कल चालविणे थांबवा असे सांगितले जाते ..तुम्ही जीवनाच्या इतर क्षेत्रात खूप हुशार असाल .. अगदी अनेक बाबतीत तुम्ही प्राविण्य मिळविले असेल ..तरीही त्या बुद्धिमत्तेचा किवा कौशल्याचा उपयोग तुम्हाला व्यसन कायमचे थांबविण्यासाठी करता आला नाही हे निखळ सत्य असते ...ते स्वीकारण्यासाठी पुन्हा पुन्हा आपल्या बुद्धिमत्तेचा शिक्षणाचा .. सत्तेचा ..मान सन्मानाचा ..पैश्यांचा ..शारीरिक क्षमतेचा .. जाती धर्माचा अहंकार दूर ठेवावा लागतो . जे लोक व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेताना स्वतःला शून्य मानून ..जेव्हा सारे प्रामाणिकपणे शिकतात ..तेव्हाच त्यांना उपचारांचा फायदा होतो ..अन्यथा वारंवार व्यसनमुक्ती केंद्राचा वाऱ्या करणे भाग पडते .

माझ्यासारखे अतिशहाणे वारंवार व्यसनमुक्ती केंद्रात उपचारांना दाखल होतात .. म्हणूनच या क्षेत्रात ' रिकव्हरी रेट ' कमीच आढळतो ...आमच्या सारखे अतिशहाणे आपल्या अशा प्रवृत्तीमुळे केवळ स्वत:चेच नुकसान करतात असे नाही.. तर आमच्या सारख्या लोकांमुळे व्यसनमुक्ती केंद्र बदनाम होते..तसेच सर्वसामान्य माणसांचा उपचारांवरील विश्वास डळमळीत होऊन ..काही फायदा होत नाही व्यसनमुक्ती केंद्रात ठेवून असा समज दृढ होतो ..व उपचार घेवू इच्छिणारे संभाव्य लोक देखील उपचार घेणे टाळतात ...पालकांचा देखील एक सर्वसाधारण गैरसमज असतो ..की व्यसनमुक्ती केंद्रात एकदा दाखल केले ..आता आपला माणूस एकदम सुधारुनच बाहेर पडेल ... तसे घडले नाही तर पुन्हा उपचार देण्याचे टाळतात ..हे सर्व माझ्या खूप उशिरा लक्षात आले .. अल्कोहोलिक्स अँनाँनिमसच्या मिटिंग बाबत देखील लोकांचा असाच गैरसमज होतो ..खरे तर केवळ एकदाच उपचार घेवून बरे झाले अशीही अनेक उदाहरणे आहेत ..परंतु हे प्रमाण जरा तुलनेत कमीच आढळते ..काही लोकांना पुन्हा पुन्हा उपचारांची गरज असते ..अर्थात याला जवाबदार केवळ व्यसनी व्यक्तीच असते .

स्वतःशी व्यसनाच्या बाबतीत कमालीचे प्रामाणिक राहावे लागते .. दत्ता श्रीखंडे अश्या प्रामाणिक पणाचे उत्तम उदाहरण होते .. व्यसनामुळे पाकीटमारी करू लागलेल्या ..मुंबईत पाच पोलीस स्टेशनच्या विभागात तडीपार असलेला ..मराठी अशुद्ध बोलणा-या दत्ताने मुक्तांगण मध्ये दीर्घकाळ राहायचे ठरवले .. आधी किचनमध्ये लहान सहान कामे केली ..नंतर स्वैपाक शिकला व मुक्तांगणच्या किचन विभागाचा प्रमुख म्हणून काम सांभाळू लागला .. हे करत असताना ..तो वेगवेगळे समूह उपचार घेणे देखील शिकला .. मग मुक्तांगणच्या बाहेर खोली घेवून राहू लागला .. भविष्यात लग्न ..संसार या जवाबदा-या घेण्यासाठी मुक्तांगणचे काम सांभाळून विश्रांतवाडी येथे सायंकाळी न लाजता फुटपाथ वर बनियन ..अंडरवेअर ..हात रुमाल ..घरगुती उपयोगाच्या किरकोळ वस्तू विक्रीचे काम सुरु केले ..केले .. पुढे मुक्तांगणच्या पुढाकाराने लग्न केले ..आज दत्ता आपली दोन मुले व पत्नीसोबत स्वतःच्या मालकीच्या घरात रहातो .. उरलेले अर्धवट शिक्षण देखील बाहेरून पूर्ण केले .. दत्ताच्या जीवनावर एक लघुपट देखील निघाला आहे ..आता तो अस्खलित मराठीत व्याख्याने देतो मुक्तांगण तर्फे ..त्याने केवळ व्यसनमुक्तीच साध्य केली असे नाही तर ..स्वतचा सगळा काळाकुट्ट भूतकाळ पुसून टाकला ..या सर्व प्रक्रियेत त्याने नियमित मँडम ..बाबा ..इतर समुपदेशक यांचा सल्ला घेतला इतकेच नव्हे तर तो सल्ला प्रामाणिकपणे पाळला ..स्वतची अतिरिक्त अक्कल वापरली नाही उगाच ...हेच खरे दत्ताच्या सुधारणेचे रहस्य असावे .

( बाकी पुढील भागात )


======================================

मूल्यमापन ..स्टाफ मिटिंग ! ( पर्व दुसरे  - भाग ५४ वा )


मुक्तांगण मध्ये महिन्यातून एकदा डॉ .आनंद नाडकर्णी सर आल्यावर ..सर्व कार्यकर्त्यांची स्टाफ मिटिंग आयोजित केली जाई ..एकंदरीत सर्व कसे चालले आहे .. ' रिकव्हरी रेट ' वाढविण्याच्या दृष्टीकोनातून उपचार पद्धतीत काय बदल केले जावेत ..उपचारांसाठी वारंवार दाखल होणाऱ्या मित्रांच्या बाबतीत नेमकी कोणती मदत केली म्हणजे त्यांना फायदाहोऊ शकेल ..या बाबतची चर्चा .. कार्यकर्त्यांमधील गैरसमज ..कुरबुरी ..भांडणे .. सोडविणे ..तसेच डिस्चार्जच्या वेळी उपचार घेणाऱ्या मित्रांकडून भरून घेतलेल्या ' फीडबँक ' फॉर्मचे मूल्यमापन करून उपचार पद्धतीत ..तसेच राहणे ..जेवण ..एकंदरीत वातावरण या बाबत उपचारी मित्राने केलेल्या सूचना ..राबविता येतील काय याची चाचपणी .. मुक्तांगण मधील वातावरण सतत सकारात्मक आणी खेळीमेळीचे राहावे यासाठी काय करता येईल वगैरे ...असा व्यापक हेतू असे या मिटिंगचा. शक्य असेल ते आवश्यक बदल केले देखील जात ..एकदा एका स्टाफ मिटिंग मध्ये' कार्य कर्त्यांची वारंवार होणारी रीलँप्स व उपाय ' हा विषय होता चर्चेला . या क्षेत्रात जरी अनेक निर्व्यसनी असलेले व कळकळीचे कार्यकर्ते आहेत ..तरी देखील जे प्रत्यक्ष व्यसनाधीनतेच्या अनुभवातून गेले आहेत त्याच्या अनुभवांचा उपचार पद्धती अधिक परिणामकारक करण्यास उपयोग होतो हे खरे आहे .. म्क्तांगण मध्ये त्या वेळी आयुष्यात कधीही व्यसन न केलेले ..मात्र समाजकार्याचे ..समुपदेशनाचे.. पद्धतशीर प्रशिक्षण घेतलेले कार्यकर्ते अगदी बोटावर मोजण्या इतपतच होते .. अधिक लोक माझ्यासारखे पुनर्वसनाच्या प्रक्रियेत कार्यकर्ते बनलेले असेच होते ..हे पुनर्वसनाच्या प्रक्रियेत असलेले कार्यकर्त बहुधा भावनिक दृष्ट्या स्थिर नसत ..तसेच त्यांची रीलँप्स होण्याची टांगती तलवार नेहमी व्यवस्थापनाच्या डोक्यावर असे .. म्हणजे चांगले कार्य करणारे ..जीव ओतून काम करणारे ..मात्र बेभरवश्याचे असेच त्यांचे वर्णन करता येईल .

अश्या कार्यकर्त्यांमध्ये मी ..बंधू .. अँगी ..आणि अजून तीनचार जण होते .. यांची होणारी रीलँप्स टाळण्यासाठी नेमके काय करता येईल अशी चर्चा सुरु झाली ..खरे तर आम्ही रीलँप्स होण्यास पूर्णपणे आम्हीच जवाबदार होतो ..अस्थिर भावना ..अहंकार ..आणि व्यसनासमोर हार न पत्करण्याची आमची घातक वृत्ती बदलण्यासाठी आम्हीच अधिक प्रयत्न करणे आवश्यक होते ..हे प्रकार वारंवार घडू नयेत या साठी चर्चा सुरु झाली . एकाने प्रस्ताव मांडला की अश्या कार्यकर्त्यांना रीलँप्स झाल्यावर पुन्हा कार्यकर्ता म्हणून काम देवू नये ..सरळ हाकलून लावावे ..कारण या कार्यकर्त्यामुळे संस्थेचे नाव खराब होते .तसेच वार्ड मध्ये उपचार घेणाऱ्या मित्रांवर देखील याचा नकारात्मक परिणाम होतो ..कामावरून काढून टाकण्याचा पस्ताव अर्थातच मँडम ..नाडकर्णी सर यांच्याकडून धुडकावला गेला ..कारण रीँलँप्स हा या आजाराचा एक अंतर्भूत भाग आहे .. हे कार्यकर्त एरवी अतिशय तळमळीने काम करतात ..हुरहुन्नरी आहेत ... अवघड कामे करण्यात पुढाकार घेतात ही आमच्या लोकांची जमेची बाजू होती ..यांना जर या क्षेत्रात कार्य करण्याची इच्छा असेल तर त्यांना काढून टाकणे म्हणजे तो अन्याय होईल असे मँडमचे मत होते ..तरीही यांनी पुन्हा व्यसनाकडे वळू नये यासाठी काहीतरी कडक उपाय योजले पाहिजेत असे बहुमत होते ..शेवटी ठरले की रीँलँप्स झाल्यावर अश्या कार्यकर्त्यांना सहा महिने पगार देता कामा नये .. त्यांना त्यामुळे धडा मिळेल ..पगार बंद होईन या भीतीने त्यांचा निर्लज्जपणा कमी होऊ शकेल ..नुकताच बंधू देखील त्या वेळी रीँलँप्स झालेला होता .. झाले असे की बंधूचा एक मुंबईचा जुना मित्र ..उपचार घेण्यासाठी दाखल होण्यासाठी आला होता ..बंधू त्या वेळी समुपदेशक म्हणून काम करत होता ..हा मित्र दाखल होण्याआधी बंधूला त्याच्या केबिन मध्ये जावून भेटला .. त्यांचे बोलणे सुरु झाले ..जुन्या आठवणी जागृत झाल्या ..आणि दोघेही त्यात वहात गेले ..साधारण तासाभरातच बंधूचे मन.. एकदाच ..आजच्या दिवस ..व्यसन केल्यास काय हरकत आहे ..या विचाराने व्यापले गेले ..परिणाम म्हणून बंधू त्या मित्रासोबत मुक्तांगण मधून चक्क पळून गेला व बाहेर जावून व्यसन केले ... हे ऐकण्यास जरी गमतीशीर वाटले तरी यातून आजाराचा भयानकपण लक्षात येवू शकेल ...सहा महिने पगार बंद ठेवण्याच्या या निर्णयामुळे आता आम्ही लोक ' बिनपगारी फुल अधिकारी ' या वर्गात मोडू लागलो .

मग दुसरी समस्या अशी पुढे आली की ' आफ्टर केअर ' विभागात राहणारे जास्त काळ मुक्तांगण मध्ये वास्तव्य करू इच्छिणारे पेशंट व निवासी कार्यकर्ते यांच्या भाषेबाबत ..आमची सर्वांची आपसात बोलण्याची भाषा अगदी ' टपोरी ' या सदरात मोडणारी होती ..तसेच बोलताना वाक्यात एकतरी शिवी हटकून यायचीच ..अनेकदा अश्या शिव्या केवळ वाक्याला धार येण्यासाठी किवा योग्य भावना प्रदर्शित करण्यासाठी वापरल्या जात .. कोणाला दुखावणे हा हेतू नसे ..तरीही हे योग्य नाही असे अनेकांचे मत होते ..सुधारणा म्हणजे आपल्या विचारात ..भावनात आणि वर्तनात सातत्याने सकारात्मक बदल केले पाहिजेत .. मग अश्या वारंवार शिव्या देणाऱ्या मित्रांना देखील आळा बसावा म्हणून एका शिवीला ५० रु. दंड ठरला ..याने काही दिवस फरक पडला वातावरणात ..बोलणे एकदम मिळमिळीत होऊ लागले ..संवादातील मजा कमी झाली आमच्या ..बंडखोरी हा आमच्या लोकांचा गुणधर्म असल्याने हा नियम देखील मोडल्या जावू लागला ..एक जण तर घरचा अतिशय श्रीमंत होता ..शिव्या देणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवायची जवाबदारी दिलेल्या निरीक्षक कार्यकर्त्यासमोर तो मुद्दाम खूप शिव्या घालायचा .. अगदी इतका की त्या कार्यकर्त्याला त्याच्या शिव्यांचा हिशोब ठेवणे जड जाई..दहा वाक्यांच्या संवादात याने चार शिव्या दिल्या की पाच असा हिशोबात गोंधळ होऊ लागला ..या वरून खूप गम्मत उडाली ..  

============================================


जवाबदार कोण ????  (  पर्व दुसरे -भाग ५५ )


अनेक व्यसनी व्यक्तींना प्रामाणिकपणे असे वाटत असते की आपल्या व्यसन सुरु होण्यास .. आपल्या घरची परिस्थिती ..सभोवतालचे वातावरण... मित्रमंडळी ..आपल्यावर झालेल्या अन्याय .. एखादे नैसर्गिक व्यंग .. प्रेमभंग .. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू .. वगैरे जवाबदार आहे ..त्या मुळेच आपले व्यसन सुरु झालेय ..असे वाटते . काही अंशी हे खरे ही असेल ..मात्र एकदा व्यसन सुरु झाल्यावर त्यात वहावत जाणे .. व्यसनामुळे आपल्या जीवनाचे नुकसान होते आहे हे माहित होऊनही पुढे व्यसन करत राहणे ..व्यसनमुक्तीच्या उपचारानंतर पुन्हा व्यसन करणे ..किवा स्वतः मध्ये सकारात्मक बदल करून व्यसनमुक्त राहणे या गोष्टींसाठी मात्र व्यसनी स्वतच जवाबदार असतो . एकदा स्टाफ मिटिंग मघ्ये वारंवार उपचारांसाठी दाखल होणारी एका गर्दुल्ल्याची केस चर्चेसाठी आली .. मुंबईतील कामाठीपुरा या बदमान वस्तीत तो रहात असे ..लहानपणीच त्याचे वडील अपघातात गेले ..मग दोन लहान मुलांना संभाळण्यासाठी आईने काही ठिकाणी मजुरी वगैरे केली ..मात्र शेवटी त्याची आई शरीरविक्रय करण्याच्या व्यवसायात शिरली ..तिच्या राहत्या घरातच ग्राहक मंडळी येत असत .. त्या पैकी काही जण या छोट्या मुलाला दारूची बाटली ..सिगरेट वगैरे आणायला पाठवत असत ..त्यातूनच तो लहान वयात दारू प्यायला शिकला .. नंतर गर्दचे व्यसन करू लागला ..पुढे उपचारांसाठी वारंवार मुक्तांगण मध्ये दाखल होऊ लागला ..त्याचे म्हणणे होते ..की लहानपणी जर माझे वडील वारले नसते तर आईला असा व्यवसाय करावा लागला नसता .. मग मी देखील व्यसनी झालो नसतो . निसर्गाने माझ्यावर अन्याय केलाय त्यामुळेच माझे व्यसन सुरु झाले . चर्चेच्या वेळी ही केस समोर आली तेव्हा अनेकांनी आपापली मते मांडली ..त्याचे व्यसन सुरु होण्यास त्याच्या घरची परिस्थिती ..आसपासचे वातावरण जवाबदार होते हे नाकारणे कठीण होते ...मात्र एकदा व्यसनाधीनता हा एक आजार आहे हे समजल्यावर देखील वारंवार त्या मोहाला बळी पडण्यास व्यसनी स्वतच जवाबदार होता ... तसेच परिस्थिती कितीही कठीण असो मात्र व्यसन करून परिस्थितीत काही फरक पडला नव्हता ..उलट व्यसनामुळे त्या मुलाचे जीवन उध्वस्त होत होते .. परिस्थिती अजूनच बिकट होण्यास वारंवार सुरु होणारे व्यसन जवाबदार होते.. परिस्थिती बदलण्यापेक्षा स्वतःला बदलणे सोपे होते ... हे मान्य केल्याखेरीज त्या मुलामध्ये सुधारणा होणे कठीण आहे असा निष्कर्ष काढला चर्चेतून सर्वांनी .

म्हणजे माझे व्यसन सुरु होण्यास कोणीही जवाबदार असले तरी माझ्या सुधारणे साठी मात्र जवाबदारी मी स्वतः घ्यायला पाहिजे . परिस्थिती बदलण्याची वाट न पाहता स्वतःला बदलले पाहिजे हेच खरे ... स्टाफ मिटिंग मध्ये माझ्या सारख्या वारंवार रीलप्स होणाऱ्या कार्यकर्त्याला सहा महिने पगार देवू नये ..असे ठरल्यावर ..मला आपले नुकसान होणार आहे हे समजलेच नव्हते .. कारण अन्न ..वस्त्र ..निवारा ..या मूळ गरजा भागात आहेत मग उगाच काळजी करायची नाही ..असा घातक विचार मनात रुजलेला होता ..तेथेच कार्यकर्ता म्हणून सेटल झालेल्या विजयचे आता लग्न झाले होते व त्याने संसाराला हातभार म्हणून मुक्तांगण च्या कामा व्यतिरिक्त आसपासच्या सोसायट्यांच्या बिल्डींगच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचे कंत्राट घेतले होते ..त्यासाठी तो मदतनीस म्हणून मुक्तांगणच्या ' आफ्टर केअर ' विभागातील मुलांची मदत घेत असे ...बदल्यात त्यानाही काही पैसे मिळत .. आधी टाकीतील पाणी रिकामे करून मग खराटा ..तारेचा ब्रश .यांचा वापर करून टाकीच्या तळाला जमा झालेले शेवाळ .. कचरा ..टाकीच्या भिंतीवरील शेवाळ ..वगैरे साफ करून ..मग सगळी टाकी साबणाच्या पाण्याने धवून स्वच्छ करत असू आम्ही ..

एकदा विजय सोबत मी या टाकी साफ करण्याच्या कामाला गेलो असताना .. त्या सोसायटीची पाण्याची टाकी गच्चीवर जरा उंच जागी होती ..टाकीवर चढायची शिडी मोडलेली ..मग मी टाकीत जाणाऱ्या पाण्याच्या पाईप ला धरून सुमारे पंधरा फुट वर चढू लागलो ..अगदी टाकीच्या जवळ पोचल्यावर कसा कोण जाने तो पाईप तुटला आणि १२ फुटांवरून मी धप्पकन खाली पडलो ..उठू लागलो तर लक्षात आले की पडताना पायाचा घोटा मुडपून खाली जमिनीवर आपटला आहे .. आधी विजय वगैरे हसले मी पडलो म्हणून ..पण मला उठता येत नाहीय म्हंटल्यावर गंभीर झाले ..मला आधार देवून त्यांनी उठवले ..पाय भप्प सुजलेला होता .. तसाच विजयच्या मोटार सायकलवर बसून मुक्तांगण मध्ये आलो ..एखादा दिवस आराम करून बरे वाटेल या विचाराने पेन किलर घेवून झोपलो ..मात्र रात्रभर पाय ठणकत होता ..अजिबात झोप लागली नाही ..सकाळी मला ससूनला नेले गेले ..एक्स रे काढला गेला तेव्हा समजले की पायाच्या घोट्याला हेअर लाईन फ्रँकचर आहे ... सूज कमी झाल्यावरच प्लास्टर लावता येईल ..आता वांधेच झाले होते माझे ..दोन दिवस तो दुखरा सुजलेला पाय घेवून बोंबलत होतो ..शेवटी पायाला एकदाचे प्लास्टर लागले .. आता माझा लंगडत कारभार होता .. सगळे मित्र मला चिडवत होते ..मस्करी करत होते .. मी मात्र खूप वैतागलो होतो ..कारण माझ्या हालचालींवर मर्यादा आल्या होत्या .. दिवभर मस्ती ..मस्करी .. पळापळ करण्याऱ्या माझ्या सारख्यावर पलंगावर पडून राहण्याची वेळ आलेली .

( बाकी पुढील भागात ) 

गुरुवार, 1 अगस्त 2013

समाज सुधारणा....???

प्राँपर्टी...हिस्सा ..वाटणी .. ! (पर्व दुसरे -भाग ४६ वा )

सगळे काही मनासारखे घडावे , ..यश ..पैसा ..कीर्ती सगळे आयते मिळावे इतकेच काय जीवनातील आनंद देखील विनासायास मिळावा अशी व्यसनी व्यक्तीची मनोवृत्ती झालेली असते, ..चिकाटी ..सहनशीलता ..संयम ..प्रामाणिकपणे मेहनत करणे.. सहिष्णुता ( इतरांच्या भावनांचा विचार करणे ) वगैरे गोष्टी व्यसनामुळे त्याने गमावलेल्या असतात असा बहुधा सर्वत्र अनुभव येतो . त्यामुळे व्यसन सुरु झाले की व्यासनीला जेव्हा घरातून व्यसन करण्यास मनाई होते ..अडथळा येतो ..तेव्हा त्याच्या डोक्यात वेगळे होण्याचे विचार येतात .. तो वडिलोपार्जित संपत्तीत वाटणी मागतो ..स्वतचा हिस्सा हवा म्हणून हट्ट धरतो .. 

माझ्याही बाबतीत पुन्हा व्यसन सुरु झाल्यावर असेच घडले ..खरे तर वडिलोपार्जित अशी काहीच संपत्ती नव्हती आमची ..तरी पुन्हा याची गाडी घसरली आहे असे लक्षात येताच जेव्हा भावाने माझ्याशी भांडण करायला सुरवात केली तेव्हा मला आपण वेगळे रहावे असे वाटू लागले ..घरच्या कटकटी मुळे आपले व्यसन वाढतेय ..असे वाटू लागले .. व मी घरात मला वेगळे राहायचे आहे असा हट्ट सुरु केला .. वडिलांनी त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळी मिळालेल्या पैश्यातून भावाला साठ हजार रुपये दिले होते ..भावाने त्यात स्वतचे साठ हजार टाकून ' आदर्श गोकुळ ' सोसायटीत फ्लँट घेतला होता तेथेच आम्ही सर्व राहत होतो .. मी व्यसनी व्यक्तीच्या मनोवृत्तीनुसार विचार करू लागलो कि वडिलांनी जे साठ हजार रुपये दिले आहेत त्यातील माझा वाटा म्हणून तीस हजार रुपये आहेत ..ते तीस हजार रुपये मी भावाला मागू लागलो ..मला तीस हजार रुपये दे ..मग मी घरच सोडून जातो कायमचा अशी कटकट घरी सुरु केली . वास्तव असे होते की आतापर्यंत मी वडिलांच्या कमाईचे लाखो रुपये व्यसनात उडविले होते .. भाऊ समजूतदार ..प्रेमळ ..जवाबदारीची जाणीव असणारा होता म्हणूनच त्याने मला घरात ठेवले होते ..अन्यथा पूर्वीच मी इतके नुकसान केले होते की माझी घरात ठेवायची लायकी देखील नव्हती ...शिवाय वडिलांच्या आजारपणात देखील त्याने खूप पैसे लावले होते . तरीही ' मेरी मुर्गी की एक टांग ' या वृतीने मी घरात भांडण सुरु केले . मी व्यसन करत नाहीय ..तुम्ही उगाच माझ्यावर संशय घेता ..मला घरात सुखाने राहू देत नाही ..असे आरोप करत होतो .

इकडे कादरला माझे व्यसन पुन्हा त्याच्यामुळे सुरु झाले अशी अपराधीपणाची भावना वाटत होती ..म्हणून तो भावाला सांगून पुन्हा ' मुक्तांगण ' मध्ये उपचारांसाठी दाखल झाला ..तो गेल्यावर मी अजितला पकडले ..त्याच्यासोबत ब्राऊन शुगर पिणे सुरु केले ..अजितने त्याच्या लग्नात ब्राऊन शुगर पिवू नये म्हणून काळजी घेणारा मी आता राजरोस त्याच्या सोबतच पिवू लागलो .. डॉ. गौड याच्याकडे राहायचे सोडून मी पुन्हा घरी राहायला आलो .. घरात स्वतंत्रपणे बिडी ओढता येत नव्हती .. तसेच घरी येण्या जाण्याच्या वेळा पाळाव्या लागत होत्या .. माझ्या वर्तनातील हे बदल आईच्या लक्षात येवूनही मी व्यसनी व्यक्तीच्या प्रवृत्तीनुसार ..पुन्हा पिणे सुरु झालेय ..मला उपचार घेण्याची गरज आहे हे कबुल करत नव्हतो ... शेवटी आईने एकदा मँडमन फोन करून सगळे सांगितले ..तसेच माझे नाव सांगू नका त्याला अशीही सूचना दिली .. मग मला निरोप दिला की दुपारी तू नसताना मँडमचा फोन आला होता ..त्यांनी तुला फोन करायला सांगितलेय .. खरा प्रकार मला माहित नसल्याने मी लगेच सायंकाळी मँडमला फोन केला ..त्यांनी सरळ सरळ ' काय चाललेय ? ... इतक्यात पुण्याला आला नाहीस.. मला सगळे खरे खरे सांग ' असे म्हंटल्यावर मी खोटे बोलू शकलो नाही .. एकदोन वेळा गडबड झाली असे अर्धसत्य सांगितले . यावर ' तू कोणताही संकोच न बाळगता ताबडतोब ' मुक्तांगण ' ला ये असे त्या म्हणाल्या . 

पडत्या फळाची आज्ञा म्हणून मी दुसऱ्या दिवशीच ' मुक्तांगण ' ला गेलो . माझे पिणे परत सुरु झाले असे कळले तर तेथील जुने मित्र काय म्हणतील ? ..असे विचार येत होते मनात म्हणून कोणालाही काही बोललो नाही .... मँडमने बोलाविले म्हणून आलो असे सांगितले . .मला तेथे पाहून कादरला खूप आनंद झाला .. मँडमनी वार्डात नाशिकचे मी दाखल केलेले पाच सहा पेशंट होते ..त्यांना मी रीलँप्स झाल्याचे कळू नये म्हणून मला वार्डात ठेवण्या ऐवजी ..आफ्टर केअर या विभागात ठेवले जेथे निवासी कर्मचारी व तीनचार महिन्यापासून राहणारे लोक राहतात ...मँडमनी भेटायला बोलाविल्यावर त्यांना अधून मधून पीत होतो असे सांगितले .. म्हणजे पुन्हा खोटे बोललो ...नाशिकमध्ये उत्तम प्रकारे फॉलोअपचे ...नियमित मिटिंग घेण्याचे काम केले होते याचा फायदा मिळाला ..काही दिवस इथे राहून पुन्हा नाशिकला जावून काम स्रुरू कर असे त्यांनी सांगितले . 

( बाकी पुढील भागात )
========================================================================

अयशस्वी समुपदेशक ??? ( पर्व दुसरे -भाग ४७ वा )


तीन वर्षे व्यसनमुक्त राहील्यानंतर रीलँप्स झाल्याने ..मला फार दिवस राहण्याची गरज नाही मुक्तांगण मध्ये असे माझे मत होते ..' तीन वर्षे व्यसनमुक्त होतो ' ... हा अभिमान पुढे मला खूप नडला ..खरे तर या क्षेत्रात आपल्या व्यसनमुक्तीचे श्रेय इतरांना म्हणजेच मी श्रद्धा ठेवत असलेला ईश्वर ..पालक ..समुपदेशक या सर्वाना माझ्या व्यसनमुक्तीचे श्रेय होते ..अल्कोहोलिक्स अँनाँनिमसचे सदस्य देखील शेअरिंग करताना ..आज मी केवळ ईश्वराची असीम कृपा .. अल्कोहोलिक्स अँनाँनिमसने दाखवलेला बारा पायऱ्यांचा सुंदर जीवनमार्ग ..व इतरांच्या मदतीने व्यसनमुक्त आहे असे म्हणतात ..याचे प्रमुख कारण म्हणजे व्यसनीला स्वतच्या अहंकारावर नेहमी नियंत्रण ठेवावे लागते . मुक्तांगण मध्ये केवळ २९ दिवस मी राहिलो .. मँडमच्या प्रत्येक भेटीत ..माझे नेमके काय चुकले .. माझ्या घसरण्यामागील मानसिकता कशी होती ...माझे मानसिक संतुलन कसे ढासळले होते ..या गोष्टींची चर्चा न करता ..मी कसा चांगला राहत होतो ..मिटींगला कशी गर्दी होत होती ..या गोष्टींबद्दल जास्त बोललो .. तसेच नाशिकला मी जर जास्त दिवस गैरहजर राहिलो तर मिटींग्सचे कसे नुकसान होईल वगैरे भीती दर्शविली ..स्वाभाविकपणे मला जास्त दिवस न ठेवता मँडमनी फक्त २९ दिवसात घरी जाण्यास परवानगी दिली ....कादर मात्र तेथेच राहिला जास्ती दिवस .

नाशिकला परत आल्यावर जेव्हा मिटींगला गेलो तेव्हा उपस्थितांचे प्रमाण कमी झालेले आढळले ..कारण गेल्या चार मिटींग्स न मी उपस्थित नव्हतो ..फॉलोअप पण झाला नव्हता ..अभय भेटला परंतु त्याची अवस्था चांगली नव्हती ..अगदी सुरवातीला मी समुपदेशन केल्यानंतर कोठेही व्यसनमुक्तीसाठी उपचार न घेता अभय बराच काळ महिने चांगला राहिला होता ..नंतर त्याने दारूला पर्यायी नशा म्हणून झोपेच्या गोळ्या खाण्यास सुरवात केल्यावर ..अधून मधून त्याचे हे झोपेच्या गोळ्या खाणे सुरूच राहिले होते ..नंतर मी स्वतच रीलँप्स झाल्यावर त्याला समुपदेशन करणे कमी झाले होते ..फक्त त्याला रागावण्याचे काम करत होतो मी ..अभय पुन्हा दोन तीन मिटींग्सना रेग्युलर आला .. इकडे मी देखील पुन्हा ' एकदाच ' या मोहाच्या आहारी गेलो .. असे म्हणतात की व्यसनमुक्तीची सर्वात पहिली पायरी म्हणजे सर्व प्रकारच्या व्यसनांसमोर आपला शिक्षण ..बुद्धी ..पैसा ..मान सन्मान .. वगैरे गोष्टींचा अहंकार कमी करून ..मी इतर बाबतीत कितीही थोर असलो तरी व्यसन करण्यास नालायक आहे हे सतत स्वतःला बजावावे लागते ..मी तसे न करता माझी तीन वर्षांची व्यसनमुक्ती ..व्यसनमुक्ती अभियान .. नाशिक मध्ये सुरु केलेल्या मिटींग्स ..वगैरेचा अहंकार बाळगून होतो .

एकदा अभय मिटींगला खूप गोळ्या खावून आला होता .. म्हणाला तुषार मला तुझ्या मदतीची गरज आहे .. दोन दिवसांपासून माझी आई ..भाऊ व बहिण माझ्यावर रागावून .मामाकडे राहायला गेल्या आहेत .. तू जर मध्यस्ती केलीस तर ते नक्की तुझे ऐकतील ..त्या वेळेस खरे तर मी अभयला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होण्याचा सल्ला द्यायला हवा होता ..कारण पूर्वी जरी माझ्या समुपदेशनाने तो चांगला राहिला असला तरी प्रत्येक वेळी माझ्या समजावण्याने तो चांगला राहीलच अशी खात्री नव्हती ..परंतु मी त्याला व्यसनमुक्तीसाठी ठोस उपचार घेण्याचा सल्ला न देता .. त्याला समजावत बसलो .. तसेच येत्या शनिवारी मी नक्की तुझ्यासोबत मामाकडे येतो व आई आणि भावाला समजावितो असे वचन दिले त्याला ..दोन दिवसानंतरच्या शनिवारी .. मी नाशिक मध्ये ब्राऊन शुगरचा तुटवडा असल्याने अजित सोबत ब्राऊन शुगर शोधात नाशिकरोडला गेलो ..आपण अभयला मिटिंगला बोलाविले आहे हे साफ विसरलो . रात्री उशिरा ९ वाजता जेव्हा मी रोटरीहॉल येथे मिटींगच्या जागी गेलो तेव्हा तेथे कोणीच नव्हते ..तेथील पहारेकऱ्याने मला सांगितले कि अभय खूप वेळ माझी वाट पाहत होता ..शेवटी साडेआठ वाजता मी येत नाही असे समजून निघून गेला ...त्याकाळी मोबाईल अस्तित्वात नव्हताच त्यामुळे सहजपणे निरोप देणे वगैरे शक्य नसे . दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी घाबऱ्या घाबऱ्या अजित माझ्याकडे आला ..म्हणाला आपल्याला सिव्हील हॉस्पिटलला जायचे आहे ..मला समजेना काय प्रकार आहे...तर म्हणाला काल रात्री अभयने खूप झोपेच्या गोळ्या खावून घरातील सिलेंडर उघडा ठेवून स्वतःला काडी लावून घेतली आहे .. अभय ९० टक्के भाजला आहे ..सिडकोतील त्याचे घर उध्वस्त झालेय सिलेंडरच्या स्फोटाने ...मला पुढचे काही ऐकवेना ..मटकन खाली बसलो .. खूप अपराधी वाटू लागले ..काल जर मी वेळेवर मिटिंगला गेलो असतो तर हा अनर्थ टळला असता असे वाटले..केवळ माझ्यामुळेच अभयने हा प्रकार केला असावा .. मी त्याच्या सोबत जावून त्याच्या कुटुंबियांशी बोलणार होतो ..मात्र मी मिटिंगला न आल्याने निराश होऊन अभयने असे केले ..हि सर्व जवाबदारी माझीच आहे असे वाटू लागले ..माझ्यात हॉस्पिटल मध्ये जावून कोळसा झालेल्या अभयचे कलेवर पाहण्याची हिम्मतच नव्हती .

( बाकी पुढील भागात )
========================================================================

 
सैरभैर मन ..! ( पर्व दुसरे -भाग ४८ वा )

अभयने केलेला आत्मघात माझ्या खूपच जिव्हारी लागला होता .. समुपदेशकाने ज्या व्यक्तीला समुपदेशन केले जातेय त्याला स्वतःवर कधीच निर्भर ठेवता कामा नये ..उलट त्याला स्वतच्या पायावर भावनिक दृष्ट्या ठाम उभे राहण्यास मदत केली पाहिजे .. समुपदेशकाने जर सारी जवाबदारी स्वतःवर घेतली तर ..समुपदेशन केले जाणारी व्यक्ती नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी समुपदेशाकावर अवलंबून राहते ...त्याच्या स्वतःतील ताकद विसरून जाते ..मी तीच चूक केली होती ..शिवाय अभयला मी आधी तू व्यसनमुक्त रहा मग सगळे काही ठीक होईल असा धीर दिला पाहिजे होता ..त्याला व्यसनमुक्तीसाठी उपचार घेण्याचा सल्ला द्यायला हवा होता .. त्या ऐवजी त्याला मी तुझे काम करतो .. तुझ्या आईला समजावतो व तिला परत घरी यायला सांगतो असे सांगितले होते ..तसेच मी त्याला दिलेली वेळ पाळली नव्हती ..अर्थात हे सगळे माझे व्यसन पुन्हा सुरु झाल्यामुळेच घडले होते ...मला स्वतःचाच खूप राग येवू लागला होता .. तसेच माझे नशीबच वाईट आहे हि भावना मनात पुन्हा घर करू लागली ..त्या अपराधीपणाच्या ..वैफल्याच्या भरात मी जोरदार पाने व्यसन सुरु केले .. ईश्वरावरची उरली सुरली श्रद्धा देखील नष्ट झाली .. अशा वेळी मी ताबडतोब मँडम ची मदत घेणे गरजेचे होते ..ताबडतोब मुक्तांगण ला जाऊन सारे काही कबुल करून उपचारांसाठी दाखल व्हायला हवे होते . मात्र ते न करता मी व्यसन करीतच राहिलो ..अर्थात हे सगळे शहाणपण आता सुचते आहे मला .

माझी घरी पुन्हा माझा हिस्सा ..वाटणी वगैरेची मागणी सुरु झाली ..भावाला हे माहित होते कि याला कितीही पैसे दिले तरी कमीच पडतील ..हा भांडून काहीही हक्क नसताना वाटणी मागेल ..मिळालेला पैसा उडवून टाकेल ..मग पुन्हा आपल्यालाच त्रास देईल ..भाऊ एक पैसा देखील द्यायला तयार होईना ..मग तुझ्यामुळेच अनघाला गमवावे लागले .. तूच सगळ्याच्या मुळाशी आहेस .वगैरे आरोप करू लागलो त्याच्यावर ..तो सरळ प्रवृत्तीचा असल्याने बहुधा माझ्याशी हमरातुमरीवर येत नसे .. शेवटी त्याने मला रोख पैसे देण्याएवजी ..जर तुला आमच्यामध्ये राहायचे नसेल तर ..मी तुला वेगळे घर करून देतो राहायला असे सांगितले ..मात्र ते घर तो आईच्या नावावर घेणार होता ..व माझ्या सोबत आई राहणार असेल तरच हे होणार होते ..मी आईकडे हट्ट सुरु केला .. नाईलाजाने आई भावाचे घर सोडून माझ्यासोबत राहायला तयार झाली .. आधी त्याने भाड्याने घर घेतले तेथे आई व मी काही दिवस राहिलो ..मग भावाने दीड लाखाला जुना पेट्रोल पंप ..म्हसरूळ रोडला ' यज्ञेश ' सोसायटी मध्ये एक रूम किचन चा एक छोटासा फ्लँट घेतला तेथे आई व मी राहायला गेलो ..आता तर मी मोकाटच झालो होतो . रात्री बेरात्री घरी येणे सुरु आले .. जेवणाच्या ..झोपण्याच्या सगळ्या वेळा बदलल्या ..आई बिचारी त्यावेळी कशी राहिली असेल याची आता कल्पनाही करवत नाही .. वडिलांच्या मागे तिची काळजी घेण्या ऐवजी उलट मी नकळत तिला त्रास देत होतो .. कोणी काही बोलले तर लगेच तुम्हीच माझ्या जीवनाचे वाटोळे केलेत असा आरोप करून मी मोकळा होई .. कुटुंबीयांवर वाट्टेल तसे आरोप करणे हे बहुतेक व्यसनी व्यक्तींचे शस्त्र असते .. अशा वेळी कुटुंबीय पण अपराधीपणाच्या भावनेने ग्रस्त होतात ..आपोआपच त्यांचा व्यसनी व्यक्तीला होणारा विरोध कमी होतो तसेच घडत होते माझ्या बाबतीत .

पूर्वी मला स्वतःला ब्राऊन शुगर विकत घ्यायला जायला लाज वाटत असे.. मात्र आता मी बिनदिक्कत अड्ड्यावर जावून माल विकत घेवू लागलो होतो .. सुरवातीला विक्रेते माझ्याकडून कमी पैसे घेत ..कधी कधी फुकट माल देत ..नंतर सगळे बंद झाले ..सर्वसामान्य गर्दुल्ल्याप्रमाणे मला वागवले जावू लागले .. पूर्वी हेच लोक मी आसपास असलो कि माल विकायला घाबरत असत .. सगळा दोष माझ्याच करणीचा होता ... तुम्ही जसे असाल तसेच जग तुम्हाला वागवते . मेरीतील ' लोकशाही मित्र ' चे सगळे सदस्य माझ्यावर चिडले होते .. ते परोपरीने मला समजावत होते ..परंतु मी कोणाचेच ऐकत नसे ..एकदा माझा कटिंग सलूनवाला मित्र मला म्हणाला ' तुषार भाऊ ..इथे परवा एक शीतल नावाची मुलगी आली होती .. जवळच राहते ..तिला दारूचे व्यसन लागले आहे ..जर तिला काहीमाडत करता आली तर पहा .. ' मला मुलगी दारुडी आहे हे ऐकून कुतूहल वाटले ..त्याला तिचे वय विचारले तर फक्त १७ वर्षे आहे असे म्हणाला ..मग त्याने मला थोडक्यात तिच्याबद्दल त्याला असलेली माहिती सांगितली ..ती म्हणे रोज संध्याकाळी इथे मेरी बसस्टॉपवर येते ..मग कोणीही रिक्षावाला तिला गावात घेवून जातो .. रात्री दारू पिवून परत येते . ..मी शीतलची भेट घेण्याचे ठरविले ..दुसऱ्या दिवशी सायंकाळी मी नंदू च्या कटिंग सलूनमध्ये जावून बसलो ..शीतल तेथून रस्त्यावरून जाताना दिसताच नंदूने तिला हक मारली ..एक सावळी ..साधारण पाच फुट उंच ..दिसायला बरी अशी मुलगी साधा पंजाबी ड्रेस घालून होती ...ती जवळ येताच नंदूने तिला माझी ओळख करून दिली . मी व्यसनमुक्तीचा कार्यकर्ता आहे असे तिला सांगितले ..तिने मला खालवर निरखून पहिले .. जरा बेरकी वाटली ..मग म्हणाली .'.मी रोज दारू पिते ..माझी दारू कशी सोडवाल ? ' ..' आधी आपण एकदा बोललो पाहिजे यावर ..मग पाहू तुला काय मदत करता येईल ते ' असे त्रोटक उत्तर दिले तिला ..' उद्या दुपारी मी तुम्हाला इथेच भेटेन असे सांगून तिने रस्त्यावरून जाणाऱ्या आटोरिक्षाला हात दिला ..निघून गेली .

( बाकी पुढील भागात )
========================================================================


शीतलचे अधःपतन ! ( पर्व दुसरे -भाग ४९ वा )

दुसऱ्या दिवशी दुपारी नंदूच्या दुकानात शीतल आली .. मला म्हणाली आपण तिकडे मंदिरात जावून बसू ..म्हणजे नीट बोलता येईल .. माझी काहीच हरकत नव्हती ..आम्ही गणपती मंदिरात एका बेंचवर जावून बसलो .. मला शीतल सोबत चालताना पाहून स्टँड वरचे सगळे ऑटोवाले कुत्सित हसत आहेत असे वाटले ...मी बिडी काढून पेटविली ..हम्म बोल आता असे तिला म्हणालो .. यावर म्हणाली ' मी माझ्याबद्दल कोणालाच सांगत नाही ..पण तुम्हाला पाहून वाटले कि सांगावे ..कारण तुमची नजर स्वच्छ वाटली मला ' माझ्या बद्दलची पावतीच होती ही.. डॉ .गौड यांच्यासोबत 'एड्स ' विरोधी कार्य करताना .. महिलांशी बोलताना फक्त त्यांच्या तोंडाकडे पहायचे ..उगाच इकडे तिकडे नजर रेंगाळू द्यायची नाही हे पथ्य शिकविले होते गौड सरांनी ... कोणतेही आढेवेढे न घेता शितल बोलू लागली ' माझे वडील वारले तेव्हा मी आठवीत होते ..दारू पिवून अपघातात ते गेले ..माझे खूप प्रेम होते त्यांच्यावर ..ते दारू पीत असले तरी मला खूप आवडत होते ..त्यांच्या छोटासा व्यवसाय होता .. ते गेल्यावर समजले की व्यवसायात त्यांनी खूप कर्ज करून ठेवले होते .. त्यापायी आमचे राहते घर विकावे लागले आईला ..घरी मी आई आणि छोटा भाऊ होतो .. आईने सगळी विकटिक केली वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी ..घरही गेले ..या सगळ्याचा आईच्या डोक्यावर परिणाम झाला असावा ..ती एकदम अबोल झाली ..शांत शांत राहू लागली .. जेवणाची सुद्धा आठवण करून द्यावी लागायची तिला ... आम्ही मामाच्या घरी राहायला आलो ..मामाही फार श्रीमंत नाहीय माझा .. त्याच्या छोट्या घरात आमची अडचण म्हणून मामी कटकट करते नेहमी ..इलाज नाही म्हणून तेथे राहत होतो .

माझे शाळेत जाणे सुरूच होते ..मी शाळेत खूप हुशार होते ..शिकायची खूप इच्छा होती .. आमच्या शाळेतून घरी येण्याच्या वाटेवर एक हॉटेल आहे .. गल्ल्यावर नेहमी एक हसतमुख माणूस बसत असे ..त्याचा चेहरा इतका हसरा होता की वाटे आपल्याकडे पाहूनच हसतोय .. त्याचे वय साधारण माझ्या वडीलांइतकेच होते .. ...कधी कधी त्याला पाहून मला वडिलांचीच आठवण येई ..एकदोन वेळा तो माझ्या कडे पाहून हसला म्हणून मी पण हसले.... एकदा त्याने खुणेने जवळ बोलाविले ..गेले तर माझ्या हातात लाडू आणि चिवड्याचा पुडा दिला त्याने .. मला खूप आनंद झाला .. पुढे तो असाच दर तीन चार दिवसांनी मला खावू देवू लागला .. एकदा सिनेमाला जावू म्हणाला तर मी गेले ..मग तेथून तो मला लॉजवर घेवून गेला .. मला मिठीत घेतले ..हे सर्व शीतल एकदम निर्विकारपणे सांगत होती ... मला तिच्या निर्विकारपणाचे आश्चर्य वाटत होते ..पुढे म्हणाली ..त्याने पहिल्यांदा मला शरीरसुखाची चटक लावली ..मग रोजच हे घडू लागले ..तो बियर पीत असे ..त्याच्यासोबत मी देखील बियर पिवू लागले .. पुढे त्याने माझ्याशी संबंध तोडले ..नंतर मात्र मी बियर आणि शरीरसुखाची चटक लागल्यामुळे ..एक दोन ऑटोरिक्षा वाल्यांसोबत बियर प्यायला गेले .. पुढचे शीतलने सांगायची गरजच नव्हती ..ही उफाड्याची ..केवळ १५ वर्षांची मुलगी ..ऑटोत नेवून बियर पाजली तर सर्व काही मिळते ...अशी जाहिरात सगळ्या ऑटोचालकांमध्ये व्हायला वेळ लागला नाही ..गेल्या दोन वर्षांपासून शीतलचे हे सर्व सुरु होते ..आता तिला दारूचे व्यसन लागले होते .. नंतर शाळा सोडून दिली तिने . आता घरी रोज माझ्यावरून कटकटी होतात .. म्हणून मी जास्तीत जास्त वेळ बाहेर असते .. 

शीतलला मी सांगितले की मी तुझ्या मामाला व आईला भेटून तुला मदत करायला सांगतो ..यावर ती हसली ..म्हणाली ..आईला सांगून काही फायदा नाही ..तिचे डोके फिरलेले आहे .. मामाला सांगितले तर.. मामा मला घराबाहेर काढेल आधी ..मला काहीच उपाय सुचेना ..तसेच माझी ब्राऊन शुगर प्यायची वेळ झालेलीच होती ..परत भेटू असे सांगून मी उठू लागलो ..तर म्हणाली मी पण येते तुझ्यासोबत गावात ..मग आम्ही दोघे नाशिक शहरात आलो .. तेथून मी माझ्या एका गर्दुल्ल्या मित्राकडे गेलो ..ब्राऊन शुगर घेतली .. प्यायलो ..तू व्यसनमुक्तीचा कार्यकर्ता आहेस ना ? असे विचारू लागली ..तुला नंतर माझी सगळी स्टोरी सांगतो असे म्हणून तिला शांत बसविले .. मी ब्राऊन शुगर पिताना माझ्याकडे एकटक पाहत होती .. मग तिने मला दारूला पैसे मागितले .. माझ्याकडे जेमतेम वीस रुपये उरले होते .. त्यात एक देशी दारूची क्वार्टर नक्की आली असती .. शीतल ने क्वार्टर घेतली आणि आम्ही परत मेरीला आलो ..रात्रीचे नऊ वाजून गेले होते .. आज मी खूप लवकर घरी आले ते पाहून माझ्या मामीला आश्चर्य वाटेल म्हणाली ..अशीच रोज लवकर घरी गेलीस तर सगळे ठीक होईल असे म्हणून गुडनाईट केले .. उद्या परत भेटू असे म्हणाली ती ...दुसऱ्या दिवशी पुन्हा दुपारी भेट असे सांगून ती मामाच्या घराकडे वळली .

( बाकी पुढील भागात )


========================================================================

आस्था आणि सहानुभूती ? (  पर्व दुसरे - भाग ५० वा ) 

 

समुपदेशन करताना ज्याला समुपदेशन केले जातेय अश्या व्यक्तीच्या भावनेत समुपदेशकाने वहात
जाता नये असे सांगितले जाते ..तटस्थपणे समोरच्या व्यक्तीच्या समस्यांचा अभ्यास करून ..मग उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी नेमका कमीत कमी नुकसान पोचविणारा आणि फायद देणारा पर्याय निवडायला त्या व्यक्तीला मदत करणे ..तसेच निवडलेल्या पर्याय निभावून नेण्यासाठी त्याला वेळो वेळी धीर देत रहाणे... हे पाळले गेले तरच योग्य पद्धतीने समुपदेशनाचा लाभ होतो ...हे शिकण्यासाठी मला बरेच अनुभव घ्यावे लागले आहेत ..आस्था आणि सहानुभूती असा हा फरक सांगितला जातो ..म्हणजे समोरच्या व्यक्तीच्या समस्येबद्दल योग्य ती जाणीव बाळगणे व स्वतचे तसेच त्या व्यक्तीचे नुकसान न होऊ देता त्याला मदत करण्याबद्दल पर्याय शोधणे.. याला आस्था म्हणतात तर ..समोरच्या व्यक्तीला त्याच्या समस्येमुळे होणाऱ्या भावनिक त्रासांचा स्वतः देखील अनुभव घेणे व त्याच्या सारखेच सैरभैर ..भावनिक दृष्ट्या अस्थिर होऊन ..मदत करण्यासाठी भावनेच्या भरात निर्णय घेणे म्हणजे सहानुभूती असे म्हणता येईल . इंग्रजीत याला Empathy आणि sympathy असे म्हणतात . अर्थात मी मानस शास्त्राचा तज्ञ नसल्याने हे सगळे मला माहित असणे शक्य नव्हते ..त्याचप्रमाणे मी स्वतः एक व्यसनी व्यक्ती असल्याने माझ्या भावनांवर माझे नियंत्रण नव्हतेच .. झाले असे की शीतल दुसऱ्या दिवशी पुन्हा भेटल्यावर ती माझ्या सोबत फिरली .. तिने उगाच दारू साठी फालतू लोकांसोबत फिरू नये हा माझा उद्देश होता ..तिलाही माझ्यासोबत अधिक मोकळे वाटत असावे म्हणून ती आपणहून माझ्याबरोबर येत होती .. असे तीनचार वेळा घडले .. मी स्वतःच ब्राऊन शुगर ओढत असल्याने ..शीतलला दारू पिण्यास मनाई करू शकत नव्हतो...एकदा रात्री १२ वाजता मला ओळखणाऱ्या एका मेरीतील मित्रासोबत शीतल माझ्या घरी आली .. त्या दिवशी मी जवळ भरपूर ब्राऊन शुगरचा साठा असल्याने सायंकाळी घराबाहेर पडलो नव्हतो ... इतक्या रात्री दारात मित्र आणि शीतल पाहून जरा भांबावलोच.. आई देखील जागीच होती .. तिला शीतल बद्दल ओझरते सांगितले होते मी .. ही मला बसस्टॉप वर भेटली ..तुझ्या घराचा पत्ता विचारीत होती म्हणून घर दाखवायला आलो असे सांगून मित्र शीतलला माझ्या दाराशी निघून गेला..शीतलच्या तोंडाचा दारूचा वास लपत नव्हता ..आई समोर काही बोलणे नको म्हणून मी शीतल सोबत गच्चीवर गेलो ..

सायंकाळी तू भेटला नाहीस ..म्हणून एकासोबत गेले होते फिरायला ...येताना उशीर झाला ..आज मामाने घराचे दार उघडलेच नाही .. मी खूप वेळ दार वाजविले आणि शेवटी तुझ्याकडे आले असे म्हणू लागली ..आता मोठे संकटच होते .. एकप्रकारे शीतलला घरातून हाकलून दिल्या सारखेच होते ..तरीही ..उद्या पाहू सर्वकाही ठीक होईल असा तिला धीर दिला ..आता रात्रीपुरती शीतलची झोपण्याची सोय केली पाहजे होती ..आईला सांगून तिला असे घरात ठेवणे कठीणच वाटले ..म्हणून आजची रात्र तू इथे गच्चीवर झोप ..मी तुला अंथरूण आणून देतो असे म्हणालो ..घरातून एक जाड सतरंजी ..ब्लकेट ..उशी घेवून निघालो तर आईने हटकले..आईला सर्व सांगितले ..थंडीचे दिवस सुरु होते .. तसेच असे एका मुलीला एकटीला गच्चीवर झोपाविणे आईला योग्य वाटले नाही ..शेवटी आईने शीतलला घरात झोपू देण्यास परवानगी दिली .. जरी स्त्रीच्या स्वाभाविक दयावृत्ती मुळे आईने अशी परवानगी दिली असली तरी .. आता हे काय नवीन प्रकरण आहे ? अशी चिंता आईच्या चेहऱ्यावर होतीच..शीतल आईच्याच बाजूला झोपली ..दुसऱ्या दिवशी मी उठलो तर आई आणि शीतल आधीच उठलेल्या होत्या ..त्यांच्या गप्पा सुरु होत्या .. बहुतेक आईने शीतलची सर्व माहिती काढली होती ..तुषार हिला आता जाऊ दे हिच्या मामाकडे असे आई म्हणू लागली .. ठीक आहे म्हणत मी सर्व आवरून शीतल सोबत बाहेर पडलो .. तिला मामाच्या घरी जा असा आग्रह केला ..ठीक आहे असे म्हणून ती गेली ... मी माझे धंदे उरकून दुपारी घरी झोपलो असताना ..परत दारात शीतल हजर.. हातात एक छोटीशी पिशवी .. मामा घरात घ्यायला तयार नाहीय मला .. माझे कपडे घेवून आलेय मी .. बापरे ..म्हणजे हे संकटच होते ...आईची कशीतरी समजूत काढली ..शीतलला काही दिवस आपल्याकडे राहू दे म्हणू लागलो ..नाईलाजाने आईने परवानगी दिली ..मात्र एका तरुण मुलीने काहीही नातेगोते नसताना ..तसेच घरात आपला तरुण मुलगा असताना असे राहणे तिला नक्कीच पसंत नव्हते ...शीतलच्या बाबतीत केवळ एक व्यसनी ..दुख्खी ..मुलगी या खेरीज माझ्या मनात कोणतेही भाव नव्हते ..आणि शीतलला मदत करावी हा एकमेव हेतू होता माझा ..मात्र हे सगळे लोकांना पटणे कठीणच होते .. तुला जर इथे राहायचे असेल तर सर्वात आधी दारू सोडली पाहिजे ..नाहीतर आई घरात राहू देणार नाही असे मी शीतलला बजावले होते ..तसेच मला सांगितल्याशिवाय कुठेही बाहेर पडायचे नाही हि दुसरी अट मी घातली तिला ..तिने सगळे मान्य केले ...

एकदोन दिवस ठीक गेले ..नंतर एकदा मी रात्री घरी आल्यावर ..आईने सांगितले की शीतल पाय मोकळे करून येते म्हणून बाहेर गेलीय .. रात्रीचे दहा वाजून गेले होते .. त्या रात्री शीतल घरी आलीच नाही ..मला काळजी वाटत होती .. बहुतेक ती पुन्हा दारू साठी ऑटोरिक्षावाल्यांसोबत फिरत असावी .दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता शीतल परत आली .. मी तिला रागावलो .. तर रडू लागली . मग काही बोललो नाही . सायंकाळी मला म्हणाली ..अरे मी फक्त नाक्यावर गेले होते ..तर तिथे एक ऑटोवाला भेटला .. मला ऑटोत बस म्हणाला ..मी नकार देणार होते ..पण जमले नाही .. गेले त्याच्या सोबत ..त्याने मला दारू पाजली आणि त्याच्या मित्राच्या रूमवर नेले ..तेथे अजून चार जण होते ..पुढचे सर्व मला न सांगताच समजले ..म्हणजे शीतलला नुसते दारूचेच नव्हे तर पुरुषी सहवासाचेही व्यसन लागले होते ... त्यावेळी मी जर सरळ सरळ मँडमना फोन करून सगळी परिस्थिती सांगितली असती तर नक्कीच मँडमनी काहीतरी मार्ग सुचविला असता ..मात्र माझे व्यसन सुरु असल्याने मी ' मुक्तांगण ' ला फोन करणे टाळले ..तसेच भद्रकालीचे पोलीस इन्स्पेक्टर सुरेंद्र पाटील साहेब देखील पुण्याला बदलून गेले असल्याने त्यांचीही मदत घेवू शकलो नाही ..काय करावे काहीच समजेना .. शीतलला मदत करावी ही इच्छा देखील सोडवेना . 

( बाकी पुढील भागात )  

व्यसनमुक्ती अभियान


पथनाट्ये ! (पर्व दुसरे - भाग ४१ वा )


व्यसनमुक्ती अभियानाचे उद्घाटन झाल्यावर..जेवून आम्ही सर्व पुन्हा हॉटेल वर गेलो ...पथनाट्याची तालीम करायची होती .. ..एक कॉलेजचा तरुण मुलगा ..अतिशय संवेदनशील ..मात्र व्यक्तिगत जीवनातील समस्यांमुळे हताश झालेला ..अश्या अवस्थेत त्याला कॉलेजमध्ये एक बिघडलेला मित्र भेटतो .. या मित्राच्या आग्रहामुळे नायक मुलगा बिघडतो ..व्यसनाधीन होतो .. घरात चोऱ्या..भांडणे करू लागतो ..सरतेशेवटी त्याला घरातून हाकलून दिले जाते ...मग तो भणंग अवस्थेत फुटपाथ वर राहतो .. शेवटी तो जिवनाला खूप कंटाळलेला ..वैफल्यग्रस्त अवस्थेत ..टर्कीत असताना मनापासून व्यसनमुक्तीची इच्छा दर्शवितो ..तेव्हा त्याला बिघडवणारा मित्र येतो ..हा मित्र आता ' मुक्तांगण ' मध्ये उपचार घेवून बरा झालेला आहे ..तो मित्र मग पथनाट्याच्या नायकाला व्यसनमुक्तीची प्रेरणा देतो ..आणि नायक व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतो .. अशी पथनाट्याची मध्यवर्ती संकल्पना होती ...यातील नायकाचा रोल बंधू करणार होता ..तर त्याला बिघडवणा-या बेरकी मित्राचा रोल मला करायचा होता .. पथनाट्याच्या सुरवातीला ..आम्ही सर्व व्यसनमुक्तीच्या घोषणा देत असू ..बंधू गळ्यात ढोलकी बांधून मध्यभागी उभा राहत असे ...गर्दी जमा झाली की मग पथनाट्य सुरु होई .. बंधू आणि माझे अभिनयाचे तसेच उत्स्फूर्त संवादाचे मस्त ट्युनिंग जमलेले होते .

सायंकाळी ५ वाजता पहिले पथनाट्य ..पेठ नाक्यावर झाले ..पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता ..पथनाट्याला बाबा मँडम देखील उपस्थित होत्या ..पथनाट्य चालू असताना लक्ष गेले तर मुक्ता मँडम आणि त्यांचा पती आशिष देखील आलेला दिसला ...खूप गर्दी होती पथनाट्याला कारण पोलिसांनी आधीच सगळीकडे जाहिरात केली होती याबाबत ..तो प्रयोग संपल्यावर लगेच पुढचा प्रयोग ..पेठरोड वरील फुले नगर येथे होता ..तो झाल्यावर लगेच नाशिकरोड येथे जेलरोड विभागात पाण्याच्या टाकीजवळ तिसरा प्रयोग .. आम्हाला पुन्हा हॉटेलवर परतायला रात्रीचे १२ वाजले .. सगळा दिवस एकदम मंतरल्या सारखा निघून गेला .. रात्री मी मुक्तांगणच्या मित्रांसोबत हॉटेलवरच झोपलो ..कादर जो सकाळी घाई घाईत दिसला तो नंतर परत आमच्याकडे फिरकला नाही ..नाशकात मुक्तांगणची आलेली असताना ..कादरचे असे आमच्यापासून दूर राहणे खचितच चांगले लक्षण नव्हते..दुसऱ्या दिवशी सर्व स्थानिक वर्तमान पत्रात व्यसनमुक्ती अभियानाची बातमी आलेली होती .. उद्घाटन माझ्या हस्ते झाल्याचा उल्लेख .. दैनिक सकाळचे पत्रकार श्री . प्रदीप निफाडकर यांनी खूप छान व सविस्तर बातमी दिलेली होती ..तसेच सकाळच्या पहिल्या पानावर माझा उद्घाटन करतानाचा फोटो देखील छापलेला ..सर्वांनी माझे अभिनंदन केले .. एका दिवसात माझे नाव नाशिक जिल्ह्यात पसरले होते ..सामाजिक कार्यकर्ता म्हणून . 

दुसऱ्या दिवशी पुन्हा शालीमार ..भद्रकाली आणि दुपारी त्र्यंबकेश्वर येथे पथनाट्ये झाली ..तिसऱ्या दिवशी .. कालिदास सभागृहात अभियानाचा समारोप झाला ..तेव्हा देखील पथनाट्य झाले .. नंतर दुपारी मुक्तांगणचे लोक पुण्याला परतले .. हे दोन दिवस एकदम भुर्रकन उडून गेले होते .. तिसऱ्या दिवशी कादर कालिदास सभागृहात आलेला होता .. माझी नजर चोरत होता .. मी त्याला हटकलेच शेवटी .. त्याला बाजूला घेवून गेलो आणि सरळ म्हंटले .." तेरा नाटक फिरसे शुरू हो गया ? " यावर क्षीण हसला .. व्यसनी माणूस जसा समर्थने देतो तसा घरच्या मंडळींवर आरोप करू लागला ..समर्थने देवू लागला .. सुमारे चार महिने चांगला राहून देखील घरची मंडळी विश्वास ठेवत नाहीत अशी तक्रार करू लागला .. या आजाराचे असेच असते .. व्यसनमुक्त असताना जीवनात सगळे काही चांगले घडावे ... ते देखील पटापट अशी अपेक्षा प्रत्येक व्यसनीला असते .. जेव्हा तसे घडत नाही ..तेव्हा परत व्यसन सुरु होते ... इतके वर्षांचा गमावलेला विश्वास काही दिवसात कसा परत मिळणार ? 

( बाकी पुढील भागात )

========================================================================


अहंकार ..! (पर्व दुसरे -भाग ४२ वा )


व्यसनमुक्ती अभियानामुळे मी चांगलाच प्रसिद्ध झालेलो होतो .. आता आठवड्यातून होणाऱ्या मिटींग्स न गर्दी वाढू लागली होती ..अभियानाच्या वेळी रानडे व पाटील साहेबांनी नाशिक शहरातील दानशूर लोकांकडून व्यसनमुक्ती साठी काही निधी गोळा केला होता .. जे व्यसनी अगदी गरीब आहेत ..ज्यांच्याकडे उपचारांना पुरेसे पैसे नाहीत .. अशा लोकांना या निधीतून पैसे देवून ' मुक्तांगण ' मध्ये उपचार घेण्यासाठी मदत करावी असा प्रस्ताव त्यांनी माझ्याकडे मांडला ..अतिशय चांगलाच प्रस्ताव होता .. अनेक जणांना मदत मिळू शकली असती .. जे लोक नियमित मिटींग्सन येतील..ज्यांची व्यसनमुक्तीची प्रामाणिक इच्छा असेल ..खरोखर गरीब असतील त्यांनाच ही मदत मिळणार होती ..असे व्यसनी निवडण्याचे काम रानडे साहेबांनी माझ्याकडे सोपविले ..त्यामुळे माझा भाव वाढला होता .. त्याच प्रमाणे नाशिक मधील काही पाकीटमार गर्दुल्ले .. किरकोळ चोऱ्या करणारे गर्दुल्ले यांच्यावर रानडे साहेबांनी गर्दच्या केसेस न करता कलम १०९ व ११० च्या केसेस केल्या होत्या ..या केसची सुनवाई सहाय्यक आयुक्तांकडेच असे ..अश्या लोकांना रानडे साहेब तू नियमित तुषार नातुना भेट ..त्यांनी तू मिटिंग ला येतोस असा निर्वाळा दिला तरच मी तुझ्यावरील केस निर्दोष करीन ..अन्यथा जेल मध्ये टाकीन असा दम भरला होता ..याचा परिणाम होऊन पूर्वी कधीच मिटिंगला आलेले .. उपचार न घेतलेले ..गुन्हेगारीच्या केसेस असलेले गर्दुल्ले मिटिंगला येवू लागले ..आवर्जून मिटींगच्या उपस्थितीच्या रजिस्टर मध्ये सही करू लागले .

एकदा एक संजय नावाच्या गर्दुल्ल्याची रानडे साहेबांकडे १०९ च्या केसची सुनवाई होती तो तीनचार मिटींग्स न लागोपाठ आला ..मग रानडे साहेबांपुढे हजर होण्याच्या आदल्या दिवशी मिटिंगला आला व मला विनंती केली की रानडे साहेबांकडे तुम्ही माझ्यासोबत चला व सांगा की मी मिटींग्सना नियमित येतोय ..तरच ते माझ्यावरची केस काढणार आहेत ..दुसऱ्या दिवशी मी त्याच्या सोबत मुंबई नाक्यावर असणाऱ्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात गेलो ..तेथे अनेक वकील मंडळी पण होती .. संजयच्या केसचा पुकारा झाल्यावर त्याचा वकील व मी दोघेही आत गेलो ..समोर रानडे साहेब बसलेले होते ..त्यांनी आम्हाला बसायची खुण केली ..आरोपी संजय मात्र उभाच होते .. त्याची बाजू मांडण्यासाठी त्याचा वकील उभा राहून रानडे साहेबांशी बोलू लागला ...वकिलाचे म्हणणे ऐकून मग रानडे साहेब माझ्याशी बोलू लागले .. संजय नियमित मिटिंगला येतो का असे त्यांनी मला विचारले ..मी बसूनच होकार दिला .. गेल्या चार पाच मिटींग्स पासून येतो आहे असे सांगितले ..हे सर्व बोलताना मी बसूनच बोलत होतो .. संजयचा वकील मला उभे राहून साहेबांशी बोला असे खुणावीत होता ..तेव्हा रानडे साहेबांनी त्या वकिलाला सांगितले की तुषार नातुना उभे राहून बोलण्याची काही गरज नाही ..बसूनच बोलले तरी चालतील .. एसीपी कोर्टात उभे राहून बोलायचे असते ही प्रथा मला माहित नव्हती . रानडे साहेबांनी मला बसून बोलले तरी चालेल अशी सवलत देवून माझा सन्मानच केला होता .. माझ्या सांगण्यावरून मग रानडे साहेबांनी संजायवरील केस काढून टाकली .

मला मिळत असलेला हा सन्मान नकळत माझा अहंकार वाढवीत होता ..अभयला मी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या म्हणून रागावल्यापासून तो नियमित नाही पण अधून मधून गोळ्या खातच होता ..कादरचे ब्राऊन शुगर पिणे देखील सुरु झाले होते .. त्यामुळे माझा व्यापही वाढलेला .. कादरला उपचार परत घे असे समजावत राहिलो .. तितक्यात इतके दिवस चांगला राहणारा अजित देखील एकदोन वेळा कादर सोबत ब्राऊन शुगर प्यायल्याचे समजले .. मी खूप वैतागलो त्यांच्यावर ..एकीकडे यांच्या व्यसनमुक्तीसाठी मी जीवाचे रान करतोय ..मात्र यांना माझी काही किंमत नाही असे वाटू लागले .. आपण मदत केलेला प्रत्येक व्यक्ती व्यसनमुक्त राहिलाच पाहिजे हा अहंकार होता त्यामागे माझा. ..एकदा माझ्या साहित्यिक मित्रांसोबत एका कवी संमेलनाला गेलो होतो .. तेव्हा संमेलन संपल्यावर आम्ही दोघे तिघे रात्री एका बारमध्ये गप्पा मारत बसलो होतो ..त्या मित्रांनी बियर मागवली .. मला देखील थोडी घे असे म्हणाले .. त्यांना हे माहित नव्हते कि व्यसनाधीनता हा आजार असा आहे की कोणत्याही स्वरुपात मादक पदार्थ एकदा जरी सेवन केला तरी पुन्हा शारीरिक आणि मानसिक ओढ जागृत होते व लवकरच अधपतन सुरु होते ..अर्थात मला सगळे माहित असूनही ..माझा वाढलेला अहंकार मला सांगत होता की बियर पिण्यास काय हरकत आहे ..झाले .. आजार जिंकला ..मी त्यांच्यासोबत त्या दिवशी बियर प्यायलो थोडी ! 

( बाकी पुढील भागात )
========================================================================



दुहेरी जीवन ! (पर्व दुसरे -भाग ४३ वा ) 


व्यसनाधीनता या आजाराला धूर्त ..कावेबाज ..वाढत जाणारा ..गोंधळात टाकणारा ..ताकदवान आणि कायमचा आजार असे म्हंटले जाते ..म्हणजे ...व्यसनापायी खूप नुकसान होऊनही .. व्यसनमुक्त राहत असताना व्यसनी व्यक्तीला व्यसनाचे आकर्षण वाटत राहते ..तसेच मागच्या वेळी आपण जरा जास्त केले होते म्हणून नुकसान झाले आपले ..या वेळी आपण शहाणे झालो आहोत ..आता एखादे वेळी व्यसन केले तर ..पुन्हा तितक्या वाईट पातळीला आपण जाणार नाही ..असा फसवा .. खोटा आत्मविश्वास त्याला वाटत राहतो ..तसेच आपण व्यसनी आहोत किवा नाही ..आपल्याला हा आजार जडला आहे किवा नाही ..हे ठरविणे त्याला कठीण जाते ..त्याच्या मनाचा गोंधळ उडतो ..आपले अजूनही फारसे नुकसान झालेले नाही असे त्याला वाटत राहते ..लोक उगाच आपल्या व्यसनाचा बाऊ करतात .. यावेळी मागच्या वेळे सारखे नुकसान मी होऊ देणार नाही ..असे घातक विचार त्याच्या मनात गोंधळ माजवतात .. याला इंग्रजीत Doing same mistakes again and again ..expecting different results असे म्हणतात .

एकदा मनात थोडीशी घ्यावी असा विचार शिरला की तो विचार इतका शक्तिमान असतो की व्यसनी व्यक्तीला एकट्याच्या बळावर तो विचार टाळणे बहुधा जमत नाही ..अश्या वेळी त्याने कोणाची तरी प्रामाणिकपणे मदत घ्यायला हवी ...अन्यथा ' सारे रिश्ते नाते तोड के आ गई ..ले मै तेरे वास्ते जग छोडके आ गई ' अशी त्याची अवस्था होऊन तो सगळी वचने ..शपथा विसरून व्यसनाकडे ओढला जातो ..हा मनोशारीरिक आजार कायमचा मानला गेला आहे ..कारण पूर्वी अथवा सुरवातीच्या काळात व्यसनाने दिलेला आनंद व्यसनी व्यक्तीच्या मनात खोलवर रुजलेला असतो तो पुसून टाकणे सहजा सहजी शक्य होत नाही ..त्यासाठी विचार ..भावना ..वर्तन.. यात सातत्याने सुधारणा करत गेले पाहिजे .. ज्या ज्या वेळी व्यसनी व्यक्ती भावनिक दृष्ट्या असंतुलित होईल ..जेव्हा जेव्हा काही न काही कारणाने त्याच्या भावना उत्तेजित होतील तेव्हा पुन्हा एकदा तो व्यसन करण्याची दाट शक्यता असते .. या आकर्षणाला बळी पडून एकदा जरी त्याने व्यसन केले तरी ..अंतर्मनात दडून बसलेला तो आकर्षणाचा राक्षस जिवंत होऊन .. मानसिक ओढ वाढत जाते ..त्याच प्रमाणे शरीरातील पेशी न पेशी बंड करून उठते ..शरीर अजून अजून अशी मागणी करत रहाते .. सारे नकारात्मक विचार पुन्हा जिवंत होतात ..निराशा ..खुन्नस .. जुने अपमान ..वंचना ..अन्यायाची भावना..ढोंगीपणा ..अप्रमाणिकपणा .. जागृत होऊन व्यसनी व्यक्तीला सतत अवस्थ ठेवण्याचे काम करते ..
त्या दिवशी मित्रांसोबत फक्त एक ग्लास बियर प्यायल्या नंतर माझीही थोडीफार अशीच अवस्था झाली होती .. कादरने व्यसन पुन्हा सुरु केल्याचा राग .. त्याचे व्यसन सुरु झाले आहे ..हे गौड सरांना कळले तर ते त्याला लेबोरेटरी मध्ये राहण्यास बंदी करतील ही भीती ..त्यामुळे त्याचे व्यसन सुरु झालेले आहे हे लपवण्याची कसरत ..कादर सोबत अजित सुद्धा बिघडला याची खंत .. अभयचे गोळ्या खाणे ..वगैरे गोष्टीनी आलेला अस्वस्थपणा .. शिवाय व्यक्तिगत जीवनातील अनेक दुखःद घटनांची आठवण .. अनघाचे माझ्यापासून दुरावणे ..त्यासाठी जवाबदार असलेले भावाने पाठवलेले पत्र ..भविष्याबद्दल वाटणारी असुरक्षितता .. सगळे सगळे उफाळून आले .. त्या दिवशी रात्री मी लेबोरेटेरीत नीट झोपू शकलो नाही .. कादरला खूप रागावलो ..त्याने मी काहीतरी नशा केली आहे हे ओळखले बरोबर .. मी रागावलो तरी काही बोलला नाही तो ..उलट माझी माफी मागू लागला ..दुसऱ्या दिवसापासून .. सगळ्या नकारात्मक भावना जागृत झाल्याने ..माझी झोप उडाली .. लवकरच मी पुन्हा एकदा दारू प्यायलो .. मग हळू हळू ..रोज रात्री मी ब्राऊन शुगर नाही मात्र थोडी दारू पिणे सुरु केले .. घराच्या बाहेर राहत होतो ..त्यामुळे घरी कळाले नाही लवकर .. म्हणजे दिवसभर पेशंटचा फॉलोअप .. व्यसनमुक्तीच्या मिटींग्स .. इतरांना व्यसनमुक्तीसाठी समजाविणे ..आणि रात्री मात्र स्वतः दारू पिणे .. असे दुहेरी जीवन सुरु झाले माझे ..आजाराचा पुढील भाग असा की असे ब्राऊन शुगर ऐवजी पर्यायी व्यसन दारू केले तरी ..काही दिवसातच गाडी मूळ व्यसनावर घसरते ...अथवा या पर्यायी व्यसनाचेच प्रमाण इतके वाढते की त्याची समस्या बनते .

( बाकी पुढील भागात )
 =================================================


घरी कलह ! ( पर्व दुसरे -भाग ४४ वा )


रात्रीचे गुपचूप दारू पिणे सुरु झाले तसे ..माझ्या दैनंदिन कामाच्या वेळापत्रकात हळू हळू बदल होऊ लागला .. सकाळी उशिरा उठून मग डॉ. गौड यांच्या लँब मधून घरी जाऊन ..अंघोळ वगैरे उरकून परत यायला उशीर व्हायला लागला .. कधी कधी आज कंटाळा आला म्हणून घरुच झोप काढू लागलो ..मेरीतील लोकशाही मित्र च्या मुलांना भेटणे कमी झाले .. माझ्या दिनक्रमात होत जाणारा बदल सर्वात आधी आईने ओळखला ..तिने मला तसे बोलूनही दाखवले ..जरी रात्री दारू प्यायली असली आणि सकाळी त्याचा वास येणार नाही असे मला वाटत असले तरीही ..सकाळी तोंडाला थोडासा आंबूस वास येतोच .. मी मात्र घरी कोणी त्याबद्दल काही बोलले तर नकार देत होतो ..एकदम घरच्या लोकांवर चिडत होतो ..अशा वेळी मी खूप आक्रमक होई घरात ..माझे चुकते आहे हे कबुल करण्या ऐवजी त्यांच्यावरच आरोप करू लागलो ..तुम्हीच माझ्या जीवनाचे नुकसान केलेत म्हणू लागलो.. घरी भावाची मोहितच्या पाठीवर झालेली मुलगी रसिका होती ..तिच्याशी आधी सारखे खेळणे कमी झाले ...एकदोन वेळा भावाशी भांडणही झाले .. मला मिळणारे मानधन कधीच संपून ..आईकडे पुन्हा पैसे मागणे सुरु झाले ..

डॉ .गौड यांनी त्याच काळात आम्हाला नवीन काम दिले .. एड्सच्या विषाणूची लागण होण्याचा अधिक धोका असलेला दुसरा गट म्हणजे ' ट्रक चालक ' ... हे लोक आपल्या घरादारापासून अनेक दिवस दूर असतात ..अशा वेळी लैगिक भूक भागविण्या साठी ते शरीरविक्रय करणाऱ्या महिलांकडे जातात ..मुळची बेफिकीर वृत्ती असल्याने योग्य ती काळजी घेण्याचे भान रहात नाही .. या लोकांचे प्रबोधन करण्याचे काम गौड सरांनी कादर व माझ्यावर सोपविले ..द्वारका नाक्यापाशी थांबून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रक मध्ये बसायचे ... वाटेत ट्रक चालकाला एड्सची माहिती द्यायची ..थेट इगतपुरी ..कसारा ..भिवंडी पर्यंत वाटेत असलेल्या ढाब्यांवर थांबून तेथे जेवणासाठी ..विश्रांतीसाठी थांबलेल्या ट्रक चालकांशी संवाद साधणे ..त्यांना मोफत कंडोम वाटणे ..त्यांच्यापैकी कोणाला गुप्तरोगाची लागण आढळल्यास ..त्याला योग्य ते उपचार घेण्यास सुचविणे ..एड्स बद्दल माहिती असलेली माहितीपत्रके वाटणे ..वगैरे कामे आम्ही करत असू ..कादरला माझे दारू पिणे सुरु झाले याचे वाईट वाटत होते ..त्याने मला दोन तीन वेळा तसे बोलूनही दाखवले ...परंतु तो स्वतःच संधी मिळेल तेव्हा ब्राऊन शुगर ओढू लागला होता ..त्यामुळे मला काही बोलण्याचा त्याला तसा काही नैतिक अधिकार उरला नव्हता .. उलट तुम्हीच जास्त टेन्शन देता मला ..असे मी त्याला म्हणत असे .

साधारण एक महिनाभरातच माझी भीड चेपली ... एकदा मी कादरला सरळ सरळ आज मला ब्राऊन शागर प्यायची आहे असे म्हणालो ..तू आणून दे म्हणून त्याच्यामागे लागलो ..तो नकार देवू लागला ..माझ्या सर्व ब्राऊन शुगर विक्रेत्यांशी ओळखी झालेल्याच होत्या ..ते माझा खूप आदर करत असत ..त्यामुळे सरळ सरळ त्यांच्याकडे जाऊन ब्राऊन शुगर विकत घेणे मला जमले नसते ..सर्वाना समजले असते माझे पिणे सुरु झाले आहे ते ..बातमी ' मुक्तांगण ' पर्यंत जायला वेळ लागला नसता .कादारच्या गळी पडलो ..शेवटी तो तयार झाला .. ब्राऊन शुगर देखील पिणे सुरु झाले ..तीन वर्षा नंतर परत व्यसने सुरु झाली माझी ..आईकडे पैसे मागणे वाढले ..इकडे रानडे साहेबांनी ब्राऊन शुगर विक्रेत्यांविरुद्ध मोहीम कडक केलेली होती ...ते मला विक्रेत्यांची नावे विचारात असत ..मात्र मी त्यांना आता माहिती सांगणे बंद केले .. त्यातच एकदा त्यांच्या नाईट राउंड मध्ये त्यांनी एक सुनिता नावाची १४ वर्षांची मुलगी ब्राऊन शुगर सहित पकडली ..तसे नाशकात चार-पाच शरीर विक्रय करणाऱ्या महिला ..ब्राऊन शुगरच्या व्यसनाधीन होत्या .

इतक्या लहान वयाची मुलगी ब्राऊन शुगरच्या व्यसनात अडकल्याचे हे पहिलेच उदाहरण होते नाशिकमधले ...रानडे साहेब भयंकर चवताळले ..त्यांनी सगळ्या विक्रेत्यांवर धाडी टाकण्याचे सत्र सुरु केले ...सुनिता अतिशय दुर्दैवाने या व्यसनात अडकली होती ..सुरेश पानवाला या ब्राऊन शुगर विक्रत्याच्या घरी सुनीताची आई धुणी -भांडी करण्याचे काम करत असे ..वडील दारुडे होते ..सुनिता नवनीत असताना आई आजारी पडली म्हणून ..सुरेशच्या घरी आईच्या ऐवजी ती धुणी भांडी करण्यास जाऊ लागली ..सुरेशच्या घरची मंडळी गावी गेली असताना ..एकदा सुरेशची नजर फिरली.. सुनिता नेहमी त्याला असे पन्नी घेवून ब्राऊन शुगर ओढताना पाहत असे ...नजर फिरल्यावर सुरेश तिला उगाचच खाऊ वगैरे साठी जास्त पैसे देवू लागला होता .. एकदा त्याने आग्रह केला व तिला ब्राऊन शुगर पाजली ..भले बुरे समजण्याचे तिचे वयच नव्हते ..शिवाय घरात दारुडा बाप .. अठराविश्वे दारिद्र्य .. सुरेश तिला पैसे देत होता ..तसेच तिचे लैंगिक शोषणही करत होता. ..

( बाकी पुढील भागात )
==========================================


सुनीताची फरफट ! ( पर्व दुसरे -भाग ४५ वा )


सुनीताला अल्पवयीन म्हणून रानडे साहेबांनी बालसुधार केंद्रात सहा महिने ठेवले .. इकडे सगळ्या ब्राऊन शुगर विक्रेत्यांवर कडक कारवाई सुरु केली ..अर्थात तरीही कोणी ना कोणी नवीन ब्राऊन शुगर विक्रेता तयार होतच होता .. आता माझे आणि कादरचे पिणेही सोबतच सुरु झालेले ... मला बहुतेक सगळे विक्रेते ओळखत असल्याने .. मी प्रत्यक्ष ब्राऊन शुगर विकत घ्यायला जाणे प्रशस्त नव्हते .. मी कादरच्या हातून माल मागवू लागलो .. मी पुन्हा पिणे सुरु केले आहे हे ' मुक्तांगण ' मध्ये कोणाला कळू नये याची दक्षता घेताना खूप कसरत करावी लागे ..त्याच काळात सोमवार पेठेत राहणाऱ्याअविनाश नावाच्या एका गर्दुल्ल्याशी ओळख झाली .. अविनाश पूर्वी सैन्यात ड्रायव्हर होता .. तेथून सुटीत घरी आला असताना त्याला ब्राऊन शुगरचे व्यसन लागले ..नंतर कामावर गेलाच नाही ..व्यसनापायी पत्नी मुलाला घेवून माहेरी निघून गेलेली .. हा एकटाच त्याच्या खोलीवर रहात असे.. अतिशय उत्कृष्ट पेंटर देखील होता ..साईन बोर्ड रंगविणे ..वगैरे कामे त्याला मिळत ..सगळे पैसे व्यसनात उडवत असे .. अविनाश खोलीवर एकटाच राहत असल्याने ..त्याच्या खोलीवर बसून निवांत ब्राऊन शुगर पिता येत असे !

सुनिता सहा महिने बाल सुधार गृहात राहून आली तरीही ब्राऊन शुगरच्या व्यसनाचा पगडा तिच्या मनावर बसलेला होताच .. आधी तिला सुरेश पानवाला शरीरसुखाच्या बदल्यात फुकट ब्राऊन शुगर पाजत असे ..रानडे साहेबांनी सुरेशवर कडक कारवाई केल्यानंतर सुरेशचा धंदा बंद पडला.. सुनीताचे ब्राऊन शुगर पिणे पुन्हा सुरु झाल्यावर व्यसनासाठी पैसे हवेत म्हणून ती सहजच वाममार्गाला लागली ... कोणत्याही भणंग गर्दुल्ल्यासोबत ती दिसे .. एक दोन पुड्यांच्या बदल्यात कोणासोबत ही शैय्यासोबत करू लागली ..काहीवेळा तर एका वेळी तीन चार गर्दुल्ले मिळून तिचा उपभोग घेत ... हे सर्व माझ्या कानावर येत होते मात्र मी स्वतःच त्यावेळी पुन्हा व्यसनात अडकलो असल्याने सुनीताला काही मदत करू शकलो नाही ...एकदोन वेळा सुनिता मला अविनाशच्या रूम वर भेटली .. तेथे ती अविनाश एकटा राहतो म्हणून कधी कधी रात्री झोपायला येई ..एकदा ती टर्कीत असताना तिला माल देखील पाजला ...मात्र तिच्या कडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही .. सुनिता बद्दल इतर गर्दुल्ले करत चर्चा ऐकूनच मला तिची दया येई ..तिच्या या अवस्थेचा फायदा घेवून तिच्याकडून शरीर सुखाची अपेक्षा करणे म्हणजे निव्वळ निर्दयीपणा होता ..मी तिला बरेच समजविण्याचा प्रयत्न केला ..मात्र ठोस अशी मदत करू शकलो नाही ..त्यावेळी ' मुक्तांगण चा महिला वार्ड अस्तित्वात नव्हता ..नाहीतर तिला तेथे दाखल होण्यास मदत करता आली असती .आता पुणे ..मुंबई येथे महिलांसाठी व्यसनमुक्ती केंद्रे सुरु झालीत .

सुनीताच्या बाबतीत शेवटी अपेक्षित होते तेच घडले ..असुरक्षित शरीर संबंध ठेवल्याने ती एच .आय .व्ही बाधित झाली ..तिच्या सहवासात आलेल्या अनेक गर्दुल्ल्यांपैकी बहुतेक मीच एकटा असा होतो की तिच्या शरीर सुखाच्या मोहात पडलो नव्हतो .. सुनिता पुढे तीन चारवर्षांनी एका पाकीटमार गर्दुल्ल्यासोबत टाकळी रोड वरील झोपडपट्टीत राहू लागली..तिला एक मुलगाही झाला .. त्याचे नाव तिने का कोणजाणे ' तुषार ' असेच ठेवले होते ..कदाचित तिच्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता तिला ब्राऊन शुगर पाजणारा तिला मी एकमेव भेटलो असेन ... चार महिन्यांनी पेपर मध्ये बातमी आली सुनिता नावाच्या एका महिलेचा 'एड्स ' मुळे मृत्यू तो पाकीटमार गर्दुल्लाही बहुधा मेला असावा आधीच ..तिच्या लहानग्या मुलाचा सांभाळ झोपडट्टीतील महिला मिळून करत आहेत अश्या आशयाची ती बातमी होती . अविनाश देखील गेला कारण तो देखील सुनीताच्या सहवासात आला होता .. नाशिक मधील आठ दहा गर्दुल्ले मृत्युमुखी पडण्याचे कारण सुनिताचा घेतलेला भोग हेच होते . !

( बाकी पुढील भागात )