शुक्रवार, 24 जनवरी 2014

मैत्री....!!


दुर्दैवी हरीष ! ( पर्व दुसरे -भाग १४१ वा ) 


आमच्या सोबत मैत्रीत रहात असताना ..पहिली पालखी म्हणून उचलून आणलेल्या हरिषबाबत हळू हळू सर्व माहिती मिळू लागली ..तसेच त्याच्या विक्षिप्तपणाचे अनेक प्रकारही आम्हाला अनुभवायला मिळाले ....दारूमुळे लिव्हर वर परिणाम होतो हे सर्वश्रुत आहे ..तसेच लिव्हरची तपासणी करून नेमका किती परिणाम झालाय हे देखील शोधून काढता येते ....औषधे घेवून काही प्रमाणात ते परिणाम कमी करून ...व्यसन बंद ठेवल्यास खाण्याची काही पथ्ये पळून व्यसनी व्यक्ती सर्वसामान्य आयुष्य जगू शकतो ..परंतु दारू किवा तत्सम मादक पदार्थांमुळे मानवी मेंदूवर देखील गंभीर परिणाम होतात ..याबाबत बरेच लोक अनभिज्ञ आहेत ...प्रगत विज्ञान देखील अजून मानवी मेंदुबाबत संपूर्ण संशोधन करू शकले नाहीय ...प्रचंड गुंतागुंतीची असलेली मेंदूची यंत्रणा अजूनही वैज्ञानिकांसाठी साठी एक न सुटलेले कोडे आहे....दारू किवा सर्व मादक पदार्थांना शास्त्रीय परिभाषेत ' माइंड अल्टरिंग सबस्टन्स ' असे संबोधले जाते ..याचा सरळ सोपा अर्थ असा की मानवी मनोव्यापारावर किवा मनोवस्थेवर परिणाम करणारे पदार्थ असा सांगता येईल ..सेवन करणाऱ्या व्यक्तीचे विचार ..भावना ..वर्तन यात काही काळा पुरता बदल करणारे हे पदार्थ काही व्यक्तींच्या मेंदूवर कायमचा परिणाम करू शकतात हे व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या चांगलेच अनुभवास आलेले आहे ..दारू व अन्य मादक पदार्थांच्या सेवनाने कायमचे वेडे ...ठार वेडे... झालेले अनेक लोक मला माहित आहेत ....निसर्गाने जसे प्रत्येक मानवाला वेगवेगळ्या क्षमता प्रदान केलेल्या आहेत ..रंग ..रूप ..उंची ..मानसिकता यात जसे वेगळेपण असते तसेच प्रत्येकाच्या मेंदूची कार्य करण्याची क्षमता देखील वेगवेगळी असते ..काही व्यक्तींचे मेंदू दारू व इतर मादक पदार्थांच्या बाबतीत अधिक संवेदनशील असतात ..अश्या लोकांच्या मेंदूवर अगदी अल्पकाळ केलेल्या व्यसनाने देखील मंभीर दुष्परिणाम होतात ...तसेच व्यसनांमुळे मेंदूवर नेमका काय परिणाम होतोय हे तपासण्याची सध्या तरी कुठलीही खात्रीलायक टेस्ट उपलब्ध नाहीय...सेवन करणा-याच्या मेंदूत काही रासायनिक बदल घडून आल्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊन ..आसपासच्या व्यक्ती ..भोवतालची परिस्थिती ...याबाबतचे अत्यंत चुकीचे किवा काल्पनिक आकलन होऊन अशी व्यक्ती विक्षिप्त वर्तन करू लागते ..हे बदल इतके हळू हळू घडत जातात की अनेकदा पूर्ण नुकसान होईपर्यंत ते लक्षात येणे देखील अवघड असते ...डिप्रेशन ..ओब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिंसऑर्डर .स्किझोफ्रेनिया ..पर्सनँलिटी डिंसऑर्डर ..वगैरे सारखे मनोविकार निर्माण होऊन एखादी व्यक्ती कायमची कुचकामी होऊ शकते ...

हरीषने स्वतच्या जीवनाचे एक अजब तत्वज्ञान बनवून ठेवले होते ...आईबापांनी आपल्या नेहमीच पोसले पाहिजे ...सरळ प्रामाणिकपणे काम करून अधिक पैसा मिळू शकत नाही ..काहीतरी लांड्यालबाड्या केल्याच पाहिजेत ...आपल्याला आपल्या मर्जीने जगण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे ..त्यासाठी इतरांच्या भावनांचा विचार करू नये ...कौटुंबिक बंधने ..समाजिक बंधने ....नैतिक बंधने ..वैवाहिक बंधने ..वगैरे अनेक प्रकारची बंधने ..हे एक खूळ आहे ...वगैरे प्रकरचे त्याचे तत्वज्ञान बनले होते ..शाळेत अतिशय हुषार असणारा हरीष सुमारे नववी नंतर वाईट मित्रांच्या संगतीत पडला ...आधी तंबाखू ..धुम्रपान आणि नंतर दारूचेही अधूनमधून सेवन सुरु झाले ..तेव्हाच केव्हातरी ..त्याच्या मेंदूत व्यसनांमुळे रासायनिक बदल होऊ लागले होते .. कॉलेजला प्रवेश घेतल्यावर त्याच्या वर्तनात झपाट्याने बदल होऊ लागला ..दुरुत्तरे करणे ..प्रत्येक चुकीचे असंबद्ध समर्थन देणे ...सगळे जग एक वेडेपणा आहे अशी मनोवृत्ती बनत गेली ..त्यातूनच घरात खटके उडू लागले ....एरवी सर्वसामान्य वाटणारा हरिष जवळच्या लोकांसाठी असहनीय बनू लागला ...अस्वच्छता ...वेळी अवेळी घरी येणे ..त्याचा ' तुच्छतावाद' दिवसेंदिवस वाढतच गेला अशा वर्तनाला कंटाळून..कुटुंबीयांनी त्याला तू घरात न राहता एखाद्या लॉजवर रहा ..आम्ही लॉजचे तसेच तुझ्या जेवणाखाण्याचे ठराविक पैसे तला देवू असे सांगितले ....अतिशय हट्टी असल्याने तो एखाद्या मानसोपचार तज्ञांची मदत घेण्यास देखील तयार नव्हता ..त्याच्या मते मानसोपचार तज्ञ हा ' चुत्या बनवण्याचा धंदा आहे ' मला त्याच्याकडे जायचे नाही ..शेवटी मैत्रीची माहिती मिळाल्यावर..पालकांनी आमच्याशी संपर्क करून हरीषला मैत्रीत ठेवण्याचे ठरवले ...आम्ही त्याला उचलून आणले ..आमच्या सोबत राहताना ..त्याने नियमित अंघोळ करावी ..दात घासावेत ..स्वच्छ कपडे घालावेत म्हणून त्याच्यावर आम्ही नियमित लक्ष ठेवत होतो ..त्याच्या वृत्तीत थोडासा बदल होण्यास सुरवात झालेली होती..आमच्या भीतीने का होईना तो सगळे व्यवस्थित करू लागला ..सुमारे तीन महिने आमच्याकडे राहिल्यानंतर हरिषला घरी सोडण्यात आले ..त्याने बाहेर एका खाजगी ठिकाणी काही काळ संगणकचा छोटासा कोर्स करून नोकरीही केली ..मात्र सुमारे आठ महिन्यानंतर तो पुन्हा जुन्या मित्रांच्या संगतीत गेला ..रीलँप्स झाली ..पुन्हा विक्षिप्तपणा सुरु झाला ..यावेळी प्रमाण वाढले होते ..आम्ही पुन्हा हरिषला उचलून आणला ..या वेळी आम्ही मानसोपचार तज्ञांची मदत घेतली ..त्याला औषधे गोळ्या सुरु केल्या ..त्या गोळ्या तो स्वतःहून घेत नसे ..त्याला समोर उभे करून खायला लावावे लागे ...

एका विशिष्ट टप्प्यावर मानसोपचार तज्ञ फारशी मदत करू शकत नाहीत ..फक्त मेंदूचे अधिक नुकसान होऊ नये म्हणून काळजी घेता येते ..तसेच झाले हरिषचे ..नंतर दोन वेळा संधी मिळाल्यावर हरिष मैत्रीतून पळून गेला ..घरी न जाता बाहेरच भटकत राहिला ..त्या काळात त्याने अजिबात व्यसन केले नाही ..शेवटी कंटाळून पुन्हा स्वतःहून मैत्रीत आला ..इथेच राहतो म्हणाला ..वर्तनात काहीच बदल झालेला नव्हता ..अगदी गेला तसाच परत आला ..चार दिवसा उपाशी होता म्हणे बाहेर ...आता हरीषचे वय सुमारे ३८ वर्षे आहे ..अधून मधून त्याला आईवडील आठदहा दिवस घरी घेवून जातात ..पुन्हा घेवून येतात ....त्याच्या हातून या काळात म्हणजे सुमारे दहा वर्षात किमान पन्नास वेळा त्याचा चष्मा फुटलेला आहे ..अजूनही अंघोळ ..कपडे बदलणे ..वगैरे साठी आठवण करून द्यावी लागते त्याला ...स्वताशी बडबड करण्याचे प्रमाण वाढले आहे ..त्याच्या मते जगात सगळ्यात मूर्ख....बेअक्कल अशी पाच माणसे आहेत आहेत ..एक त्याची आई ..दोन त्याचे वडील .. तीन त्याला उपचार देणारे मानसोपचार तज्ञ ..तसेच त्याला मैत्रीत ठेवणारे रवी पाध्ये व तुषार नातू ..हे त्याचे मत कायमचे बनले आहे ..त्याला उपचार खर्चात सवलत देवून आम्ही ठेवून घेतलेय ..कारण आम्हाला माहिती आहे ..बाहेर हा जगू शकणार नाही ..उपाशी तापाशी भटकेल ..रस्त्यावर फिरणारा ..भणंग ..दाढी वाढलेला ..ओळख हरवलेला ..फाटके कपडे घातलेला वेडा म्हणून ...मग एखादे दिवशी थंडी ..उन..पाउस ..उपासमार यामुळे खंगलेले शरीर दम सोडेल ...रस्त्याच्या कडेला याचे प्रेत बेवारशी सापडेल ....सध्या हरीष आमच्याकडे किरकोळ कामात मदत करतो ..आमच्या धाकाने बरेच विधी सुरळीत करतो ..हरीष सारखे अजून दोन जण मैत्रीचे कायमचे रहिवासी झालेत..बहुधा प्रत्येक व्यसनमुक्ती केंद्रात असे माणसातून उठलेले एकदोन जण सापडतील ! 

( माझ्या व्यसनाधीनतेच्या काळात ..असे अनेक जण मला माहित आहेत जे व्यसनांमुळे मेंदूत कायमचे रासायनीक बदल होऊन असे विक्षिप्त बनले आहेत ..व्यासानाधीनते मुळे दारूण ..गंभीर .कधीच भरून न येणारे नुकसान झालेले शेकडो लोक मी पहिले आहेत ..म्हणूनच जनजागृतीसाठी हे लिखाण नेटाने करतोय ..) 

( बाकी पुढील भागात )

=======================================================================

प्राधान्य ..अग्रक्रम ..वगैरे ! ( पर्व दुसरे - भाग १४२ वा )


एखाद्या व्यसनी व्यक्तीने व्यसनमुक्त राहण्याची सुरवात केल्यावर सदोदित आपल्या व्यसनमुक्त राहण्याला प्राधान्य द्यावे असे या क्षेत्रात सांगितले जाते ..म्हणजे एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रत उपचार घेवून .अथवा अल्कोहोलिक्स अँनाँनिमसच्या मिटींगला जायला सुरवात करून ... एखाद्या खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचार घेवून ..स्वतच स्वतःच्या मानसिक शक्तीच्या बळावर व्यसन बंद करून ..एकदा व्यसनमुक्त राहण्याची सुरवात झाली की ..त्या व्यक्तीने सुरवातीची काही वर्षे फक्त व्यसनमुक्त रहाणे हेच त्याचे ध्येय ठेवले पाहिजे ..ते ध्येय साध्य करण्यासाठी समुपदेशकाने आवश्यक सांगितलेली मानसिक पथ्ये पाळणे महत्वाचे असते ..त्यात जुन्या व्यसनी मित्रांना न भेटणे ....आपण व्यसन करण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी म्हणजे जेथे ओली पार्टी असेल ...इतर लोक दारू पीत असतील ..अश्या ठिकाणी जाणे टाळणे ..स्वतच्या नकारात्मक भावनांवर सतत नियंत्रण ठेवणे..त्यासाठी कोणाची तरी मदत घेणे ..सतत आत्मपरीक्षण करत राहून स्वत:चे स्वभावदोष शोधून काढून ते कमी करण्याचा प्रयत्न करणे ...किठीही संकटे आली ..समस्या आल्या ....टेन्शन आले ..तरी एकदाही व्यसन न करणे ..जिवनात आपल्या आयुष्यात व्यसनमुक्ती अतिशय महत्वाची ...मगच इतर गोष्टी हे सतत स्वतःला बजावणे आवश्यक असते ..कारण सतत व्यसनमुक्त राहत गेले की शारीरिक ..मानसिक ..आर्थिक ..कौटुंबिक ..सामाजिक वगैरे सगळ्या बाबी हळू हळू व्यवस्थित होत जातात ...याबाबत रविचे स्वत:चे एक छान उदाहरण सांगत असे ..त्याला एकदा मुक्ता मँडमनी समुपदेशन करताना विचारले ..तुझी स्वतच्या जीवनाबद्दल काय काय स्वप्ने आहेत ? ते मला एका कागदावर लिहून दे ...रवीने त्यावर लिहिले मला छान पगार असलेली नोकरी मिळावी .... मनासारखे लग्न व्हावे...स्वतची गाडी असावी ..कुटुंबाचा गमावलेला विश्वास परत मिळावा ..समाजात मान सन्मान प्राप्त व्हावा ..वगैरे ..ते वाचून मँडम हसल्या ..म्हणाल्या आता या कागदाच्या दुसऱ्या बाजूला ..तुझे आई वडील व कुटुंबियांची तुझ्या कडून कोण कोणत्या अपेक्षा आहेत ते लिही ..त्यावर रवीने खूप आठवून ..कुटुंबियांची फक्त मी व्यसनमुक्त राहावे हीच अपेक्षा आहे हे लिहले ..मँडमने रविला तो कागद आता सतत उलटा ठेव ..म्हणजे कुटुंबियांची व्यसनमुक्तीची अपेक्षा लिहिलेला भाग वर ठेव ... आणि तुझी स्वतःबद्दलची स्वप्ने ..जीवनाकडून इतरांकडून असलेल्या अपेक्षा वगैरे लिहिललेला भाग मागच्या बाजूला राहू दे ..त्याचा विचार न करता फक्त व्यसनमुक्तीला आणि संबंधित गोष्टीना प्राधान्य देत रहा काही वर्षे ..मग पहा काय होते ते ..रवीने त्यांनी सांगितल्याप्रमाणे केले ..पाहता पाहता आज त्या गोष्टीला सुमारे पंधरा वर्षे उलटून गेल्यावर ..रवीच्या लक्षात येतेय की तो फक्त मनापासून व्यसनमुक्त रहात गेला ..सगळी पथ्ये पाळत गेला ...तशी तशी त्याची सगळी स्वप्ने पूर्ण होत आलीत ...मलाही पूर्वी मोठ्या मँडमने हेच वेगळ्या पद्धतीने सांगितले होते ..मात्र मी ते गंभीरतेने घेतले नव्हते ..म्हणून मी वारंवार चुका करत होतो .. व्यसनमुक्तीच्या सुरवातीच्या काही वर्षात पथ्ये न पाळल्याने रीलँप्स होतच जाते ...माझ्या बाबतीत अनेकदा चुका करूनही माझे प्राधान्य नेहमीच व्यसनमुक्ती असले पाहिजे ..बाकी सगळ्या गोष्टी नंतर हे योग्य पद्धतीने समजायला मला पुन्हा एकदा रीलँप्सला सामोरे जावे लागले ...!

नागपूरला नव्याने व्यसनमुक्तीची छान सुरवात झाल्यावर ..आता लगेचच माझे सगळे काही व्यवस्थित व्हावे .. मानसी सुमित सोबत राहायला मिळावे ..चांगला पगार मिळावा....वगैरे वाटू लागले ..हे स्वाभाविक असले तरी व्यसनी व्यक्तीसाठी प्राधान्य फक्त व्यसनमुक्तीचे असले पाहिजे हे विसरलो मी ..' मैत्री ' ची आर्थिक घडी अजून नीट बसली नव्हती ..सर्व खर्च भागवताना रवीची ओढाताण होत असे..हे सर्व मी पाहतच होतो ...मला घाई झाली होती लवकरात लवकरात सेटल व्हायची ..खरेतर अजून कुटुंबीयांनी माझ्याकडे पैसे कमावून आण असा अजिबात तगादा लावलेला नव्हता ..तरीही येथे पगार मिळत नाही ..कधी सगळे सुरळीत होणार ..वगैरे चिंता मला सतावत असत ..त्याच काळात एकदा बंधू मुक्तांगण मधून बाहेर पडून नागपूरला आला होता चारपाच दिवस ..बंधू हा प्राणी व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात मला भेटलेला सगळ्यात हुशार व्यसनी ..अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता ....खूप उत्साही ..कार्यक्षम ..कोणतेही काम करण्यास सदैव तत्पर ..इतरांना मदत करण्यात आनंद मानणारा ...वाचन ..संगीत ..अभिनय ..खेळ सर्वात प्राविण्य असलेला ..परंतु अतिशय चंचल ..भावनाप्रधान ..माझ्यासारखच अहंकारी ..जिद्दी ..' असेल तर सुत नाहीतर भूत ' या प्रवृत्तीचा ..त्याच्याकडे व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील प्रचंड अनुभव ..माहिती आहे परंतु ही माहिती स्वतःच्या व्यसनमुक्ती साठी योग्य प्रकारे न वापरता येणारा ..बंधूची पुन्हा रीलँप्स झाल्यावर तो मुक्तांगण सोडून नागपूरला आला होता..मैत्रीचे वातावरण त्याला आवडले ..आम्ही त्याला आग्रह केला इथेच राहण्याचा ..मात्र त्याला ते पटले नाही ..मैत्रीची आर्थिक स्थिती चांगली नाही ..आपल्याला पगार मिळू शकणार नाही हे जाणून होता तो ..तसेच इतकी वर्षे पुण्यात राहिल्याने त्याला पुण्यापासून इतक्या दूर यायचे नव्हते कायमचे ..पाचसहा दिवस तो मैत्रीत राहून टर्की काढून ..परत पुण्याला गेला ..त्या नंतर दहा दिवसांनी त्याचा रविला फोन आला असताना तो माझ्याशीही बोलला ..म्हणाला मी सध्या धुळे जिल्ह्यात बेटावद नावाच्या छोट्याश्या गावी ' संकल्प ' नावाच्या व्यसनमुक्ती केंद्रात संचालक म्हणून काम करतोय ..चांगला पगार मिळतोय मला ..तू पण येथे ये ..तुलाही पगार मिळेल ...आपण मिळून छान काम करू ..बेटावद च्या ' संकल्प ' व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख डॉ. श्री अहिरराव हे होते ..बंधूचा प्रस्ताव मला आवडला .

मैत्रीत इरफानशी होणारी भांडणे ..खुन्नसबाजी ...यांना मी वैतागलो होतोच ..वाटले चांगला पगार मिळत असेल तर जायला काय हरकत आहे ..शिवाय बेटावद हे नाशिक पासून जेमतेम तीन चार तासांच्या अंतरावर ..तेथून आपणास नाशिकला मानसी व सुमित यांना भेटण्यासाठी नियमित जाता येईल ..आता व्यसनमुक्तीचे आठ महिने झालेच आहेत आपले ..आता आपली रीलँप्स होणारच नाही ..आता पैसा कमावणे ..सगळे लवकरात लवकर ठीक करणे याला प्राधान्य दिले पाहिजे ....वगैरे ! रवी जवळ मी बंधू जे म्हणाला त्या बद्दल काहीच बोललो नाही ..मनातल्या मनातच माझे मैत्री सोडून ' संकल्प ' ला जाण्याचे मनसुबे सुरु झाले .

( बाकी पुढील भागात )

========================================================================

मु . पो . बेटावद ! ( पर्व दुसरे - भाग १४३ वा )


' संकल्प ' येथे बंधू आहे आणि तो मला तेथे बोलावतोय म्हंटल्यावर मी तेथे जायचे ठरवले ...रवीला हे मी सांगितले नाही ...त्याच्यापाशी विषय देखील काढला नाही ..कदाचित तो मला अडवेल अशी भीती वाटत होती मला ....खरेतर उलट मी मोकळेपणी रविशी चर्चा करून... माझ्या अडचणी सांगून ..आर्थिक चणचण सांगून..काहीतरी मार्ग काढू शकलो असतो ..परंतु तसे न करता ...रविला न सांगता येथून निघून जायचे असे ठरवले ..तशी संधीही मिळाली मला ..दिवाळीत मानसी ..आई ..सुमित वगैरे मंडळी अकोल्याला येणार होती ..मलाही दोन दिवसांसाठी तेथे बोलावले होते त्यांनी ...त्यानुसार रवीचा निरोप घेवून दोन दिवसांसाठी म्हणून मी अकोल्याला गेलो ..तेथे आई आणि मानसीला ' संकल्प ' बद्दल सांगून तेथे चांगला पगार मिळेल वगैरे गोष्टी सांगितल्या बंधू तेथे आहे म्हंटल्यावर आई जरा सावध झाली ..' मुक्तांगण ' ला असताना मी दोन तीन वेळा बंधू सोबत रीलँप्स झालो होतो हे तिला माहित होते ..ती म्हणालीच ' अरे ..पण बंधू आणि तू एकत्र राहणार म्हणजे काळजीच वाटते ...तुम्ही दोघेही पूर्वी गडबड केलेली आहे ..आता परत एकत्र राहणे कितपत योग्य राहील ? ' यावर मी आता तसे होणार नाही ..अजून तुम्ही लोक विश्वास का ठेवू शकत नाही माझ्यावर ..वगैरे मखलाशी करून आईला चूप केले ..रविला हे माहित आहे का असे तिने विचारल्यावर ..हो रविला माहित आहे असे खोटे बोललो ..बंधू कितीही हुषार असला ..खूप चांगला कलावंत असला .. चांगला माणूस असला तरी ..व्यसनमुक्तीच्या बाबतीत आईला त्याच्यावर आणि माझ्यावर देखील विश्वास नव्हता...ही जोडी एकत्र आली की अनर्थ होऊ शकतो याची भीती तिच्या मनात होतीच ...पूर्वी कादर आणि मी ..अजित आणि मी ..किरण आणि मी ..भारत आणि मी अश्या अनेक जोड्या आईला माहित होत्या ... ठराविक मित्रांच्या संगतीत आल्यावर तुषारला स्वतःवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते ...यात त्या मित्रांचा दोष नसतो ..दोष दोघांच्या स्वभावाचा असतो ....प्रत्येक व्यसनीला असा एखादा मित्र असू शकतो ..ज्याच्या संगतीत आल्यावर दोघानाही व्यसन करण्याची अनावर ओढ होऊ शकते ...व्यसनमुक्तीच्या बाबतीत आईचा रवि वर जास्त विश्वास होता ..अशा मित्रांना एकटे भेटणे किवा असुरक्षित वातावरणात भेटणे टाळावे लागते ..हे मला नंतर शिकायला मिळाले . तसेच व्यसनमुक्तीच्या सुरवातीच्या काही वर्षात ..व्यसनी व्यक्तीने स्वतच्या जीवना वर परिणाम करू शकणारे मोठे निर्णय घरातील वडीलधारी मंडळी ...समुपदेशक ..यांच्याशी मोकळेपणी चर्चा करून घेतले तर अधिक फायद्याचे असते . स्वतच्या निर्णयाचा अट्टाहास न ठेवता ....त्यांच्या म्हणण्याला मान देवून स्वतचे घोडे पुढे दामटणे बंद केले पाहिजे .. .

अकोल्याहून मी येतोय असा बंधूला फोन करून मी परस्पर ' बेटावद ' जिल्हा धुळे येथे गेलो ..तेथे पोचल्यावर दुसऱ्याच दिवशी बंधूने माझी डॉ. अहिरराव यांचेशी भेट घालून दिली ..त्यांना सर्वजण ' आप्पा ' म्हणत असत ..साधारण पन्नाशीच्या पुढे वय ..टक्कल ..बोलण्यात अतिशय मृदू ..असे व्यक्तिमत्व ....श्री छगन भुजबळ यांचेशी चांगले संबंध असल्याने ..धुळे जिल्ह्यात त्यांचे राजकीय संबंध होते ..तसेच ते त्यावेळी महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य खात्याच्या समितीचे सदस्यही होते ..' श्रीराम अहिरराव मेडिकल ट्रस्ट ' या नावाने ट्रस्ट स्थापन करून त्या मार्फत ' संकल्प ' व्यसनमुक्ती केंद्र सुरु केलेले ..सरकारचे अनुदान देखील मिळत होते संस्थेला ..त्याच प्रमाणे त्यांच्या ट्रस्ट मार्फत इतरही अनेक अनुदानित योजना सुरु होत्या ...व्यसनमुक्तीच्या कामासाठी अनुभवी ..असे कार्यकर्ते मिळून मुक्तांगण सारखे चागले काम उभे रहावे अशी त्यांची तळमळ होती ...व्यसनमुक्तीच्या कार्यात पूर्वाश्रमीचे व्यसनी जर व्यसनमुक्त राहून सामील झाले तर अधिक चांगले ..परिणामकारक आणि तळमळीने काम करू शकतात हे माहित असल्याने त्यांनी बंधूला स्वतःकडे बोलावून घेतले होते ...मग बंधूच्या सल्ल्याने मलाही तेथे कामावर ठेवले ..मला सुरवातीला सहा महिने तीन हजार रुपये पगार ठरला ..नंतर पुढे वाढवू असे त्यांनी सांगितले ..' संकल्प ' व्यसनमुक्ती केंद्राचा परिसर आप्पांच्या घराच्या बाजूलाच होता ..सुमारे हजार फुटांचा हॉल ..त्याला जोडून एक वेगळी खोली ..ऑफिस ..पुढे छान अंगण ज्यात फुलझाडे लावलेली होती ..तर मागच्या बाजूला अंगणात संडास बाथरूम होते ..त्या वेळी तेथे दहा जण उपचार घेत होते ..तेथे दुसऱ्या दिवशी पासूनच मी योगाभ्यास ..ध्यान ..समूह उपचार घेणे सुरु केले ...बंधू आणि माझ्या स्वभावात अनेक समान दुवे असल्याने आमचे चांगलेच जमत होते ..रविला मी नंतर दोन दिवसांनी फोन करून बेटावद येथे ' संकल्प ' व्यसनमुक्ती केंद्रात आलोय ..येथेच राहणार आहे हे कळवले ..कदाचित त्याला वाईट वाटले असावे ..मात्र तो काही बोलला नाही ..उलट मला काळजी घ्या असे सांगून शुभेच्छा दिल्या त्याने ..

बेटावदला ' लोड शेडींग ' या प्रकारचा चांगलाच अनुभव घेतला ..सुमारे आठ ते दहा तास लाईट जात असे ..वीज ..पाणी..चांगले रस्ते या सुविधा सरकारने जनतेला पुरवायच्या असतात हे पूर्वी नागरिक शास्त्रात वाचले होते ..त्या मोबदल्यात जनतेने सरकारला विविध करांच्या स्वरुपात पैसा द्यायचा ...परंतु करवसुली ..सार्वजनिक हिताच्या योजना साऱ्याचाच बट्ट्याबोळ झालेला आहे ..नीट करवसुली करणायत सरकारचे भ्रष्ट अधिकारी नाकाम ठरले आहेत ....जनतेचाही कर बुडविण्याकडे जास्त कल ..कारण घेतल्या जाण-या करांचा योग्य उपयोग होईल असा राज्यकर्त्यांवर विश्वास नाही ... दुसरीकडे जमा झालेला कर योग्य प्रकारे जनतेसाठी खर्च करण्यात राजकीय लोकांना रस नाही ..सगळे स्वतःची तुंबडी भरून घेण्यात मग्न ...जनतेलाही स्वताच्या अधिकाराची व जवाबदा-यांची जाणीव नाही ..असे चित्र ...ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेला दहा दहा तास विजे विना रहावे लागते ..तर शहरी भागात जाहिरातीचे मोठे मोठे होर्डींग.. मोठे मोठे मॉल.. चित्रपटांच्या मोठ्या मोठ्या जाहिराती असलेले फलक या ठिकाणी विजेचा झगमगाट...अनेक ठिकाणी दिवसही स्ट्रीट लाईट सुरु ..हा अनागोंदी कारभार ...सकाळी सहा वाजता गेलेली वीज दुपारी २ वाजता येई ..किवा दुपारी दोन वाजता गेलेली रात्री एकदम दहा वाजता ..अनेकदा आम्हाला कंदिलाच्या उजेडात रात्रीची जेवणे उरकावी लागत असत ..पाहता पाहता मला ' संकल्प ' ला एक महिना होत आला .

( बाकी पुढील भागात )

======================================================================

चुपके चुपके ! ( पर्व दुसरे - भाग १४४ वा )


बंधू आणि मी मिळून बेटावद येथे चांगल्या प्रकारे काम करू लागलो होतो ..उपचार घेणाऱ्या मित्रांचे मुक्तांगण सारखे छान टाईम टेबल बनवून ..त्यात योगाभ्यास ..समूह उपचार ..ध्यान .. व्यक्तिगत समुपदेशन वगैरे सुरु केलेले ...आप्पा ( डॉ. अहिरराव ) खूप उत्साही होते ..त्यांच्या पत्नी ज्यांना आम्ही अक्का म्हणत असू त्या देखील या कामात अप्रत्यक्षपणे सहभाग घेत असत सगळ्या उपचारी मित्रांच्या चहा ..नाश्ता..जेवण या व्यवस्थेचे नियंत्रण व देखरेख करण्याचे काम त्या आनंदाने करत असत ...विविध खानदेशी खाद्यप्रकार त्या आवर्जून करायला लावत असत स्वैंपाक करण्या-या बाईना ...त्यांचा मुलगा डॉ. निलेश ...देखील आम्हाला निरनिराळ्या कल्पना सांगून काम कसे वाढवता येईल याबाबत चर्चा करत असे ..त्यांच्या विविध प्रकल्पांमध्ये काम करणारे त्यांच्या संस्थेतील इतर कार्यकर्ते सगळ्यांशी आमचे चांगले सबंध होते ...रोज सायंकाळी आम्ही सगळ्या उपचार घेणाऱ्या मित्रांना घेवून तेथील नदीवर जात असू ..तेथे बंधू त्यांना व्यायामाचे प्रकार शिकवीत असे ..एकंदरीत ' संकल्प ' व्यसनमुक्ती केंद्राचा कारभार सुरळीत चालला होता ..उपचार घेण्यासाठी अधिक जण प्रेरित व्हावेत म्हणून बंधूने धुळ्यातील स्थानिक वर्तमानपत्रात एकदोन लेख लिहिले ....' लोड शेडींग ' वगळता काहीही त्रास नव्हता आम्हाला तेथे ...आमचा पगार झाल्यावर जवळच नाशिकला घर असल्याने कुटुंबियांना भेटून यावे म्हणून मी आप्पाकडे तीन दिवसांची सुटी मागितली..बंधुलाही तसे सांगितले ...मी नाशिकला जाणार म्हंटल्यावर बंधू जरा अवस्थ झाला ..म्हणाला ' साल्या ..तू नीट परत येशील का ? नाहीतर करशील गडबड '.......' नाही यार बंधू ..आता तरी माझा काहीही विचार नाहीय गडबड करण्याचा ' असे बंधूला पटवत होतो ....अर्थात हे बोलणे सुरु झाल्यावर बहुतेक आमच्या दोघांच्याही मनात ब्राऊन शुगरचे आकर्षण जागृत झाले असावे ...कारण आम्ही दोघेही एकमेकांना चांगले ओळखून होतो ..बंधू पुढे म्हणाला ' जरी तू काही गडबड केलीस तरी इथे समजणार नाही कोणाला ..मी मात्र बरोबर ओळखीन..तेव्हा काहीही एकटा करण्याऐवजी जरा आपल्या दोस्तीची आठवण ठेव ' बंधू मला अप्रत्यक्षपणे हेच सुचवीत होता की नाशिकला गेल्यावर माझा जर ब्राऊन शुगर प्यायचा विचार असेल तर ते मी एकटयाने न करता ..बंधुचाही विचार करावा ...शेवटी मी उघड म्हणालो ..' तसे आता बरेच दिवस झालेत व्यसनमुक्तीचे ...एखादे वेळी केल्याने काही बिघडणार नाही ' ...बहुतेक बंधू माझ्या याच उद्गारांची वाट पाहत असावा ..मला टाळी देवून म्हणाला ..डन...येताना मला पण आण थोडी ...झाले ...बेटावदहून नाशिकला जायला निघतानाच मी डोक्यात ब्राऊन शुगर घेवून निघालो ...

व्यसनमुक्तीच्या काळातही .... संधी मिळेल तेव्हा ..कोणाला समजणार नाही अश्या पद्धतीने ..कधीतरी ..सुरक्षित पद्धतीने ..नुकसान होणार नाही याची काळजी घेवून व्यसन करण्याचे विचार मनात येणे ..त्या विचारांशी खेळणे ...हा ' व्यसनाधीनता ' या घातक आजाराचाच एक भाग आहे ' याला स्लीप इन माइंड ' असे म्हणतात ..अश्यावेळी ते विचार ताबडतोब झटकून टाकणे ..आपल्याला एकदाही करणे जमणार नाही ..कारण एकदा जरी केले तरी शरीरातील ' अँलर्जी ' जागृत होऊन वारंवार व्यसन करण्यासाठी शरीर- मन बंड करेल ...पूर्वी अनेकदा याच विचाराने आपला घात केला आहे ..याची स्वतःला आठवण करून देणे ...पूर्वी व्यसनामुळे झालेले नुकसान आठवणे ...हे विचार मनातून काढून टाकण्यासाठी कोणाची तरी मदत घेणे ..वगैरे गोष्टी कराव्या लागतात ..मात्र बंधू आणि मी दोघेही एकाच माळेचे मणी होतो ..कोण कोणाला अडवणार ? ..म्हणूनच या क्षेत्रात उपचार घेणाऱ्या मित्रांना समुपदेशक नेहमी ' तुम्ही स्वतःसाठी व्यसनमुक्त राहा ' असा सल्ला देतात ...कोणाला समजेल ..कोणीतरी आपल्याला रागवेल ..वगैरे भीती पेक्षा आपण स्वतःचेच नुकसान करणार आहोत ..स्वतःलाच फसवणार आहोत ....पुन्हा एकदा त्यात अडकल्यावर आपलेच नुकसान होणार आहे हे लक्षात ठेवायला हवे ...आपली व्यसनमुक्ती सगळ्यात जास्त आपल्याच फायद्याची असते ....कोणावर उपकार म्हणून आपण व्यसन सोडलेले नाहीय ..याचे भान हवे मग असे चुपके चुपके करण्याचे मनातील विचार पळवणे सोपे जाते .

नाशिकला जाताना आप्पांनी मला तेथे वर्तमान पत्रात ' संकल्प ' बद्दल बातमी देण्याची जवाबदारी दिली ..तसेच पगारा व्यक्तिरिक्त थोडेफार पैसेही दिले खर्चासाठी ...मी बंधूकडून देखील थोडे पैसे घेतले ..तुझ्यासाठी पण ब्राऊन शुगर आणतो म्हणून ...बसमध्ये बसल्यावर ..घरच्या मंडळीना भेटण्याच्या आनंदाऐवजी ...खूप दिवसांनी व्यसन करायला मिळणार याचाच आनंद होता मनात ..' स्लीप इन माइंड ' ने ताबा घेतला होता विचार मनाचा...केव्हा एकदा नाशिकला पोचतो असे झाले होते ..पत्नी मुलाच्या ओढीने नव्हे ..तर ब्राऊन शुगरच्या ओढीने...नाशिकला पोचल्यावर घरी जाण्याऐवजी सरळ अड्ड्यावर गेलो ..तेथून चार पुड्या घेवून ..मग घरी पोचलो ... !

( बाकी पुढील भागात )

=======================================================================

आजाराचा धूर्तपणा ! ( पर्व दुसरे - भाग १४५ वा )


व्यसनाधीनता या मनोशारीरिक आजाराला धूर्त व कावेबाज असेही संबोधले जाते ..याचा सरळ अर्थ असा की ..व्यसनी व्यक्तीने व्यसनमुक्त राहण्याची सुरवात केल्यावर क्वचित ..कधीतरी ..कोणत्याही कारणाने संयमित पद्धतीने ...नियंत्रित पद्धतीने ..तो व्यसन करू शकणार नसतो ....अर्थात हे त्याला वारंवार सांगूनही ...त्याला मात्र त्याच्या अहंकारामुळे असे वाटते की ....मी कधीतरी करण्यास हरकत नाही ..व्यसनाधीनता हा गंभीर आजार आहे ....वगैरे सगळे मान्य करूनही हा आजार ' मला झालेला आहे ' हे त्याच्या पचनी पडणे कठीणच असते...किवा ते स्वीकारणे त्याला जड जाते ... ' मला जमू शकेल ' हे आकर्षण त्याच्या मनात दीर्घकाळ पर्यंत जिवंत राहू शकते ...त्यामुळे तो अधून मधून व्यसनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत राहतो ...अनेकांना कायमचे व्यसन सोडण्याऐवजी ..स्वतःला व इतरांना त्रास होणार नाही इतपत सुरक्षित पद्धतीने व्यसन करण्याचे प्रयोग करावेसे वाटतात ...प्रत्येक वेळी या प्रयोगांचे फलित एकच असते ..ते म्हणजे पुन्हा पुन्हा उध्वस्त होत राहणे ...नवीन नुकसानाला सामोरे जाणे..माझ्याही बाबतीत वारंवार हेच घडत आले होते ...आपण आयुष्यात यापुढे एकदाही ..कधीही व्यसन करू शकणार नाही हे स्वीकारणे मला जड जात होते ..प्रत्येक वेळी वेगवेगळ्या कारणांनी मी एकच चूक करत गेलो ...आमच्या ' मैत्री ' व्यसनमुक्ती केंद्रात देखील अनेक सध्या अनेक गुणी मुले..माणसे .. प्रौढ किवा वयोवृद्ध देखील ... ' मी एकदाही व्यसन करू शकत नाही ' हे न स्वीकारता आल्यामुळे ..प्रयोग करत राहतात व पुन्हा पुन्हा उपचारांना यावे लागते ...तर काही सुज्ञ मंडळी एकाच उपचारात चांगले राहतात ..व्यसनमुक्त होतात ...मात्र एक क्षण प्रत्येकाच्या त्याच्या जीवनात नक्की येतो ...जेथे त्यांना त्यांच्या आजाराचा स्वीकार करणे सोपे जाते ..व्यसनमुक्तीची निर्विघ्न सुरवात होऊन व्यसनमुक्ती टिकवता येते ..परंतु तो पर्यंत अश्या व्यक्तीला उपचार देत राहणे हेच पालकांच्या आणि उपचाराकांच्या हाती असते ..नाहीतर ते अधिक अधिक नुकसान करत जातात ...!

नाशिकला गेल्यावर मी अड्ड्यावरून घेतलेल्या चार पुड्या रात्री सगळे झोपल्यावर संडासात जावून प्यायलो ..कोणाला काही संशय आला नाही ...दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी ...वर्तमान पत्रात ' संकल्प ' बद्दल बातमी ....इतर किरकोळ कामे वगैरे करून ..भावालाही भेटून आलो ..त्याला संशय आलाच ...त्याने मला सावध केले ..मी तू उगाच संशय घेतोस ..तसे काही नाही ..वगैरे समर्थने दिली ..दुसऱ्या दिवशी रात्री परत तेच केले ..तिसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा बेटावदला जायला निघताना आधी अड्यावर जावून माल घेतला ....बंधू तेथे मी कधी येतो याची वाटच पाहत होता ..त्याचा एकदाही फोनही येवून गेला ' लवकर ये ' असा ....मग लगेच बंधू आणि मी दुपारी बाजारात चक्कर मारायला म्हणून बाहेर पडलो ..एका सुरक्षित ठिकाणी जावून एकत्र माल प्यायलो ..हे शेवटचे ..पुन्हा नाही ..असे एकमेकांना बजावत ...परंतु पुन्हा आजाराची सुरवात झालेलीच होती ....नंतर पंधरा दिवस पुन्हा सगळे सुरळीत चालले ..मग बंधूने चार दिवसांसाठी पुण्याला जायचे काढले ...तेव्हाही तेच झाले ..पुण्याहून तो देखील माझ्यासाठी माल घेवून आला ..वार्डच्या संडासात आम्ही एकेकटे जावून माल पिवू लागलो ..बंधूने पुण्याला जावून जाहिरात केली होती ' संकल्प ' ची ...तेथे तुषार आणि बंधू आहेत म्हंटल्यावर ..मुक्तांगणला उपचार घेतलेले ..आमचे जुने गर्दुल्ले रीलँप्स मित्र ' संकल्प ' ला उपचारांना येवू लागले ....नाशिक ..त्र्यंबकेश्वर..नगर ..पुणे या ठिकाणचे नफ्फड आमच्या सारखेच प्रयोगशील गर्दुल्ले .... ' संकल्प ' ला उपचारांसाठी येवू लागले ...येताना सोबत ते शेवटचे म्हणून ..माल घेवून येत असत ..त्यात आम्हीही वाटेकरी होऊ लागलो ...नाशिकचा माझा जिवलग मित्र अजित देखील आला ....पुन्हा पिणे सुरु केल्याचा परिणाम माझ्या तब्येतीवर होऊ लागला ..पुन्हा सगळ्या नकारात्मक भावना मनात जोर धरू लागल्या ...कदाचित आमच्या रीलँप्स झाल्याची ..अधूनमधून व्यसन करण्याची कुणकुण आप्पा व अक्कांनाही लागली असावी ..कारण उघड नाही तरी अप्रत्यक्षपणे त्यांनी आम्हाला समजावून सांगितले ..पुढे धुळ्याचा एक गर्दुल्ला आमच्याकडे उपचारांसाठी दाखल झाला ..तेव्हा धुळ्यात कुठे माल मिळतो ही माहिती आम्हाला समजली ..झाले ..मग दर आठ दिवसांनी काहीतरी कारण काढून बंधू किवा मी ..कोणीतरी जवळच धुळ्याला जावून ' माल ' आणू लागलो ..आता पैश्यांचीही ओढाताण सुरु झाली ...

एकदा मी नाशिकला गेलो असताना ..अड्ड्यावर माझा जुना पाकीटमार मित्र कुबेर भेटला ..खूप खराब तब्येत झाली होती त्याची ..पायावर सूज आली होती ..बहुतेक क्षयरोग देखील झाला होता ..सारखा खोकत होता तो ....पूर्वी अनेकदा मी त्याला ' मुक्तांगण ' मध्ये उपचार घे म्हणून मागे लागलो होतो ..तो काही बधला नव्हता ..या वेळी मात्र तो स्वतःहून म्हणाला ' तुषार भाई ..मै भी आता हुं ' संकल्प ' में..जरा तबियत बहोत खराब हुवी है ' एकदाची त्याला उपरती झाली होती तर ..मात्र त्याची तब्येत इतकी खराब झालेली होती की ' संकल्प ' मध्ये टर्की काढू शकेल का ? ..ब्राऊनशुगर त्याच्या शरीरात इतकी खोलवर पसरली होती की ब्राऊन शुगर शिवाय हा जगू शकेल का ? याची शंका होती ...मी त्याच्या घरी जावून त्याच्या पत्नीला व आईला भेटलो ..त्यांना सांगितले की याला एखाद्या हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यास अधिक योग्य होईल ..व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे हॉस्पिटल नव्हे ..याला चोवीस तास वैद्यकीय निरीक्षणात राहण्याची गरज आहे ..वेळ पडली तर ऑक्सिजन ..व इतर हॉस्पिटलच्या सुविधा व्यसनमुक्ती केंद्रात नसतात ..मात्र कुबेर मी तुझ्याकडे ' संकल्प ' लाच येणार म्हणून हटून बसला ...शेवटी मी आप्पांना फोन करून कुबेर बद्दल सांगितले ..त्याला उपचारांना आणू का विचारले .त्याच्या कुटुंबियांना सर्व धोक्याची कल्पना देवून त्याला आण ..हवे तर सोबत त्याच्या पत्नीलाही घेवून ये ..ती त्याच्यावर नीट लक्ष ठेवेल ..अशी सूचना देवून आप्पांनी संमती दिली ..कुबेर आणि त्याच्या पत्नीसह मी बेटावदला पोचलो ...सोबत कुबेरने २० पुड्या घेतल्या होत्या ब्राऊन शुगरच्या !

( बाकी पुढील भागात )

( व्यसनाधीनता या मनोशारीरिक आजाराची सविस्तर माहिती पुढे लिंक दिलेल्या ब्लॉगवर आहे ..सर्वांनी जरूर वाचावी ..व इतरानाही सांगावी )

शनिवार, 18 जनवरी 2014

चलो एक बार फिरसे ..


चलो एक बार फिरसे...अजनबी बन जाये हम दोंनो!(पर्वदुसरे-भाग१३६ वा)


सीमंतीपूजन आटोपून जेवणाची तयारी सुरु झाल्यावर मी निराश झालो ..आता काही अनघाशी भेट होऊ शकत नाही असे वाटून ..सिगरेट ओढायला बाहेर निघून गेलो ..परत आल्यावर पाहतो तर अनघा कुठे दिसेना ..बहुतेक परत घरी गेली असावी ..विमनस्क बसून राहिलो एका खुर्चीवर ..मला परत आलेला पाहताच सुमित जवळ आला ..मानसीही होती त्याच्या मागे ..माझ्या बाजूच्याखुर्चीवर दोघेही बसले ..मानसी म्हणाली अहो ..सीमंतीपूजनाच्या वेळी ..मुलाचे मामा कुठे गेलेत म्हणून विचारात होते गुरुजी ...तुम्ही का आला नाहीत पुढे ..मला त्या वेळी एक जण आला होता बोलवायला परंतु मी नकार दिला होता ..त्यावेळी माझा मोठा भावू पुढे झाला होता पूजेसाठी ...माझ्या नकाराचे कारण सरळ होते ..एकतर न्यूनगंडांमुळे मी पुढे झालो नव्हतो ...दुसरे महत्वाचे कारण असे की अनघाने माझ्या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले मनाला खूप लागले होते ..त्यामुळे माझा आत्मविश्वास खच्ची झाल्यासारखा वाटत होते ...' सुहास होता की मामा म्हणून ' असे मानसीला म्हणालो ..' अहो पण ..असे दूर दूर का होतात तुम्ही ' सगळ्यांमध्ये मिसळला का नाहीत ? ' मानसीने माझे वर्तनातील बदल बरोबर ओळखला होता ..स्त्रियांना पुरुषांची नजर ओळखण्याचे सहावे इंद्रिय असते असे म्हणतात ..तसेच आपल्या नवऱ्याचा मूड ओळखण्याचे ...कोणीतरी एखादा टोमणा नेमका आपल्याला मारत आहे हे समजण्याचे ...नवऱ्याची एखाद्या स्त्री शी संशयास्पद जवळीक होत असल्याचे ओळखण्याचे ...वगैरे कितीतरी अदृश्य इंद्रिये असावीत असे मला नेहमी वाटत आलेय ...कदाचित त्यांचे संसारातील समर्पण..समरसता ....आत्मीयता यास कारणीभूत असावी ...मानसी काहीतरी अवांतर गोष्टी मला सांगत होती ..मी नुसताच हम्म ..हम्म ..करत बसलो ....पत्नीला आपल्या पतीला सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात ...अर्थात अनेकदा पतीला त्यात काडीचाही रस नसतो ...किवा त्याच्या मते त्या फालतू गोष्टी असतात ....कोणीतरी नवीन दागिना बनवला ....कोणाचे तरी नवरयाशी पटत नाही ....कोणीतरी स्त्री स्वतःला फार शहाणी समजते ...वगैरे !

शेवटी मानसीनेच विषय काढला ..' अहो अनघा आली होती असे कोणातरी म्हणत होते ..तुम्ही बोललात का ? खरेतर संपूर्ण समारंभात मानसीचे माझ्याकडे चांगलेच लक्ष होते ..सुमित माझ्याजवळ होता ..म्हणून ती सारखी माझ्याकडे पाहत होती ..मी कोणाशीही बोललेला नाहीय हे तिला ठावूक असायला हवे होते ..तरीही तिने अतिशय निरागसपणे प्रश्न विचारला ' हो आली होती ..नाही बोललो तिच्याशी मी ' असे तुटक उत्तर दिले ..यावर ती हळहळली ..अहो बोलायचे होते एखादा शब्द ..असे मत व्यक्त केले ..मी अनघाशी बोलण्यात पुढाकार न घेण्याची दोन करणे होती ..पहिले म्हणजे ..अनघाने जर मला योग्य प्रतिसाद दिला नसता तर ..अपमान झाल्यासारखे वाटले असते ..दुसरे कारण असे की आता आम्ही दोघेही विवाहित होतो .. एकमेकांसाठी परके ..आम्हाला दोघांना ओळखणाऱ्या कोणी आम्हाला बोलताना पहिले असते तर ..माझ्यापेक्षा जास्त अनघालाच ते त्रासदायक होऊ शकत होते ....कदाचित म्हणूनच अनघाने देखील मला ओळख दाखवली नसावी ..माझा मूड पाहून मानसीने बोलणे थांबवले ..म्हणाली उद्या अनघा लग्नाला येईलच ..तेव्हा तिची न माझी ओळख करून द्या तुम्ही ..मला बोलायचे आहे तिच्याशी ! मी नुसतीच मान हलवली...मानसी निघून गेली ...सहज म्हणून कार्यालयात फिरत होतो ....आडबाजूच्या एका खोलीत भाच्याचे सारे मित्र बहुधा पार्टीच्या मूड मध्ये होते .. तिकडे एक चक्कर मारली ..मोठा भावू तेथे बाहेरच उभा होता ..बहुधा त्यांच्यात मी मिसळत तर नाहीय याच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी ..मी त्या खोलीत जाताच माझे प्रताप माहित असलेल्या भाच्याच्या मित्रांनी मला आग्रह सुरु केला .. " मामू आवो .. बैठो ..म्हणत एकाने माझा हात धरला ..रंग चढला होता मैफिलीचा ..मी नम्रपणे नकार दिला ..' आपका चलने दो ..मै ऐसाही आया ' असे उत्तर देवून त्यांच्यात सामील होण्याच्या शक्यता फेटाळून लावल्या ' अरे वा ..सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली ' असा टोमणा मारला एकाने ..मी त्यांना नकार दिलेला पाहून भावाने समाधानाने मान हलवली आणि तो निघून गेला ..दोन तीन जणांना जास्त झालेली होती ..ते काहीतरी फालतू जोक करून मोठ्यामोठ्याने टाळ्या देवून हसत होते ..मला तेथे कसे तरीच झाले ..आपण मैफिलीत सामील नसताना ..सामील असणाऱ्यांचे वर्तन आपल्याला वेडेपणा वाटतो ..असह्य होते ..तेथून निघून झोपण्याच्या व्यवस्थेकडे गेलो ..विचार करत पडून राहिलो .

लग्नाच्या दिवशी पहाटेपासूनच धावपळ सुरु झाली सर्वांची ...मी तयार होऊन दाराजवळच अनघाची वाट पाहत होतो ...आज तर जास्तीच सुंदर दिसत होती ..तिच्या अंगावर बरेच दागिने दिसले ..एकंदरीत सुखात असावी हे समजले ..आपली प्रिय व्यक्ती सुखात असावी असे प्रत्येकाला वाटत असते ..मात्र तिला सुखात ठेवणारा कोणी दुसरा आहे हे पचवणे जरा जडच जाते ...वरात निघाली तेव्हा मी उत्साहाने नाचणाऱ्या मंडळीत सामील झालो ..अनघाची छोटीशी मुलगी देखील पुढाकार घेवून नाचत होती ..तिच्याशी बोललो ..तिचे नाव विचारले ..तिने सांगितलेले नाव ऐकून बरे वाटले ..आम्ही पूर्वी ठरवलेल्या नावांपैकीच एक नाव ठेवले होते अनघाने तिचे...कितवीत आहेस हे विचारले ..सहावीत आहे असे समजले ..ती इतकी सेम अनघासारखी दिसत होती की आश्चर्य वाटले ..लग्न लागल्यावर मानसी माझ्याजवळ आली ..म्हणाली ' अहो ..बोललात का ? अनघाशी ' ..माझ्या कडेवर सुमित होता मी नकारार्थी मान हलवली ..तितक्यात अनघा समोरून येताना दिसली ..मानसीने आग्रह केला तिच्याशी बोलण्याचा ....अगदी समोर येताच मी स्मित केले ..तिनेही स्मित करून प्रतिसाद दिला ...पुढे निघून गेली ..आता थोडा धीर आला होता मला ...मानसी सारखी तुम्ही पुढाकार घेवून बोला ..माझ्याशी ओळख करून द्या असे म्हणत होती ..पुन्हा अनघा जवळ येताच तिला हाक मारली ..चक्क ती थांबून हसली ..जवळ आली ...' ही माझी पत्नी मानसी असे सांगितले ..तर मानसीला... ही अनघा ..तुला सांगितलेच आहे त्या बद्दल ...असे म्हणालो ... दोघीही अतिशय मोकळेपणी बोलू लागल्या ..तितक्यात कुठून कोण जाणे अनघाची आई आमच्याजवळ आली ...बहुधा आमच्यावर लक्ष ठेवून असावी ..अनघाच्या आईला अभिवादन करून तिचीही मानसीशी ओळख करून दिली ..अनघाने माझ्या कडेवरच्या सुमितचा गालगुच्चा घेतला ..छान आहे म्हणाली ...तुझी मुलगी सेम तुझ्यासारखी दिसते असे तिला म्हणालो ..मुलगा पण आहे एक ..तो खेळतोय तिकडे असे सांगितले ..ती नागपूर जवळच एका गावात राहतेय असे सांगितले तिने ..या कधीतरी आमच्या गावी असे निमंत्रण दिले मानसीला ....छान वाटले तुला भेटून ..असेच चालू दे ..असे मला म्हणाली ..कदाचित तिला म्हणायचे असावे ..या पूर्वी जर असा व्यसनमुक्त राहिला असतास तर ...कदाचित आपण एकत्र असतो .

( बाकी पुढील भागात )

====================================================================

दिल तो बच्चा है जी ... ! ( पर्व दुसरे -भाग १३७ वा )

जेमतेम दोन मिनिटांची अनघाची भेट घडली ..तिची आई मध्येच आल्याने ...मानसी समोर असल्याने फारसे बोलणे झालेच नाही ...फक्त ख्याली खुशाली कळली एकमेकांना ..लगेचच अनघा निघून गेली ...तिची माफी मागायची होती ..तसेच त्या वेळी नेमका मी कसा मजबूर होतो ते अनघाला सांगायचे होते ..सगळे तसेच राहिले ..ती निघून गेल्यावर माझी रुखरुख अधिकच वाढली ....वाटले तिच्याशी एकटीशी बोलायची संधी मिळायला हवी होती ...मनाचे हे असेच असते ..आधी ती भेटवी म्हणून मन तडफडत होते ..नंतर निट भेट झाली नाही म्हणून मन कळवळले ...पुन्हा कधीतरी भेटू अशी आशा मनात जागली ....अनघा निघून जाताच मी हरवल्यासारखा झालो ...कालच्या पेक्षा अधिकच बैचैन ..हळवा..अवस्थ ! अनघा गेल्यावर मानसी पुन्हा एकदा हळहळली ..म्हणाली तुमची दोघांची जोडी छान झाली असती ...तुम्ही उगाच व्यसनाच्या नादी लागून अनघाला गमावलेत ... मनातून मानसीचे नवल वाटत होते ...किती सहजपणे तिने माझा भूतकाळ स्विकारला होता ....लग्न उरकून सगळे पुन्हा बहिणीकडे परतले ..दुसऱ्या दिवशी दुपारी मला परत निघायचे होते नागपूरला ..रात्री मानसी ' मैत्री ' बद्दल माहिती विचारात होती ...आम्हाला कधी राहायला येता येईल नागपूरला ? तुम्हाला पगार कधी मिळणार ? असे प्रश्न विचारात होती . ..मात्र सध्या तरी केंद्र प्राथमिक अवस्थेत असल्याने ते इतक्यात शक्य होणार नाही हे तिला समजावले ...मानसीचे मनात खूप कौतुक वाटत होते ...माझ्या व्यसनाधीनते मुळे झालेला सगळा त्रास ती हसतमुखाने पचवत होती ...मला कोणताही दोष न देता ...जे समोर आहे त्याला कोणतीही तक्रार न करता सामोरी जात होती ...तर माझे मन अतिशय चंचल ...हळवे ..भावनेच्या भरात वाहून जाणारे ..मानसीला ही ताकद कुठून मिळत असेल ..स्वतःला समजावण्याची ...दुख: पचवण्याची ...बहुधा लहानपणापासून मुलीना जे मर्यादा पाळण्याचे संस्कार दिले जातात त्यातून तर ही ताकद मिळत नसावी ..मनाविरुद्ध घडले तरी सहन करण्याची ..मनाला लगाम घालण्याची ..केवळ स्वतःचा नव्हे तर ..कुटुंबाचा ..समाजाचा ..परिस्थितीचा विचार करून....मनाला समजावण्याची ...मनाविरुद्ध घडत असलेल्या गोष्टीना सामोरे जाण्याची ..!

दुसऱ्या दिवशी सुखरूप नागपूरला परतलो ...पुन्हा तेच फार्महाउस मधील रुटीन सुरु झाले ...सध्या सेंटर मध्ये जेमतेम पाच जण उपचारांसाठी दाखल होते ..सर्वांची फी देखील नियमित येत नव्हती ..त्यात निवासी कर्मचारी म्हणून मी ..अँगी ..इरफान ..आणि रवीचा एक स्थानिक मित्र आम्ही चौघे फुकट राहत होतो ..सगळा खर्च भागवणे जडच है रविला ..अनेकदा त्याला सेंटरच्या गरजा भागवण्यासाठी घरून पैसे घ्यावे लागत ...आम्ही दोघे एकत्र असताना ....कारभार कसा वाढवता येईल यावर चर्चा करत असू ..रवीने स्थानिक वर्तमान पत्र दैनिक ' लोकमत ' मध्ये तीन चार लेख लिहिले होते आजाराबद्दल ..त्यामुळे हळूहळू काम वाढेल अशी आशा होती ..मात्र हा आजार कसा आणि केव्हा बरा होतो ..याची काहीच खात्री देता यात नसल्याने जेव्हा काही लोक सुधारणेची गँरटी मागत तेव्हा आमचा नाईलाज होई ...आपण एक शास्त्रीय प्रयत्न करणार आहोत ..त्याचा फायदा कोणाला... कसा ....कधी होईल याची खात्री देता येत नाही असे पालकांना समजावणे जड जाई ...व्यसनी व्यक्तीला सतत उपचार देवून व्यसनमुक्तीस प्रेरित करणे ..त्याच्या व्यसनमुक्तीस पोषक अशी मनोवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करणे .. तो भविष्यात करू शकणाऱ्या नुकसानापासून त्याचा आणि कुटुंबियांचा बचाव करणे हेच आपल्या हाती असते ...एक व्यसनी व्यक्ती व्यसन करण्याच्या काळात स्वतः सहित किमान चाळीस लोकांचे प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्ष नुकसान करत असतो ...व्यसनामुळे लाखो रुपयांचा चुराडा करत असतो ...शिवाय कुटुंबियांचे मनस्वास्थ बिघडते ते वेगळेच....अश्या व्यक्तीला जर उपचार दिले नाहीत तर ती खात्रीने मरणार..दिवसेंदिवस अधिक अधिक नुकसान करणार ...त्या पेक्षा उपचारांसाठी थोडाफार खर्च केलेला परवडतो ..शिवाय समुपदेशन ..पालकांचा उपचारातील सततचा सहभाग ..व्यसनी व्यक्तीची व्यसनापासून कायमचे दूर राहण्याची इच्छा या गोष्टी जुळून आल्या तर यश मिळतेच ...फक्त काही केसेस मध्ये जास्त वेळा ..जास्त काळ उपचार द्यावे लागतात ..अथक ! 

या आजारातील सर्वात महत्वाची समस्या अशी असते की ..प्रत्यक्ष व्यसनी व्यक्तीला जरी व्यसन सोडावेसे वाटत असले तरी बहुतेक जण अहंकारामुळे उपचार घेण्यास तयार होती नाही ..माझे मी सोडून देईन .. काहीतरी चमत्कार होऊन माझे व्यसन बंद होईल कायमचे या भ्रमात तो अधिक अधिक खोलात जात राहतो ..अश्या वेळी जबरदस्तीने उपचार देणे केव्हाही योग्य ..कारण जबरदस्तीने का होईने उपचार केंद्रात आणल्यावर व्यासानीचे व्यसन बंद होते ..शिवाय उपचारांच्या काळात त्याला व्यसनाधीनतेचे भयानक दुष्परिणाम शुद्धीवर असताना समजावता येतात ..योगाभ्यास ..प्राणायाम ..समुपदेशांना द्वारे ..कायमचे व्यसनमुक्त राहण्याची प्रेरणा देता येते ..मात्र व्यसनी व्यक्तीला जबरदस्तीने उपचारांसाठी घेवून येणार कोण ? कुटुंबीय तर त्याला घाबरत असतात ..नंतर तो बदल घेईल ..आम्हाला दोष देईल ..वगैरे भीती कुटुंबियांच्या मनात असते ..अशा वेळी बाहेरच्या लोकांनी मदत करावी अशी त्यांची अपेक्षा असते ..माझ्या अनुभवातून व्यसनी व्यक्तीच्या बाबतीत ' वाघ म्हंटले तरी खातो ..वाघोबा म्हंटले तरी खातो .. वाघ्या का म्हणू नये ' हे मी शिकलो होतो ..त्यामुळे आपण अशा व्यसनी व्यक्तीला कुटुंबियांच्या संमतीने घरातून उचलून ..उपचारांना आणू शकतो याची मला खात्री होती ..वेळ प्रसंगी त्या व्यसनीशी खोटे बोलावे लागते ..त्याला घाबरावावे लागते ..वगैरे आम्ही जाणून होते ..एकदा चौकशीला एक केस आली ..मुलगा बी .कॉम झालेला वय वर्षे २४ ..दोन भावू इंजिनियरिंग करत आहेत ..आईवडील दोघेही नोकरी करणारे..व्यसानीने प्रत्येक वेळा कुटुंबियांचा विश्वास घात केलेला ..शेवटी आम्ही जन्माला घातले आहे तर तुला पोसायलाच हवे ..मात्र तुझा त्रास घरात नको ..या विचाराने कुटुंबीयांनी त्याला एका लॉज मध्ये महिना रूमचे भाडे भरून ठेवलेले ..तिथेच राहा दारू पी ..जुगार खेळ ..हवा तो गोंधळ घाल ..महिन्याला आम्ही ठराविक रक्कम तुला देवू असे ठरलेले ..त्या नुसार तो व्यसनी दर महिन्याला त्याचे पैसे घेण्यापुरता घरी येई ..शिवाय ते पैसे संपले की बाहेर उधाऱ्या करून ठेवी ..त्या घरच्यांना फेडाव्या लागत..त्याच्या पालकांना आम्ही त्याला जबरदस्तीने उपचारांना घेवून येवू असे सांगितले ....उपचारांना जबरदस्तीने घेवून येण्याची ही आमची पहिलीच वेळ होती ..ही ' पालखी ' कशी आणावी यावर आमची बरीच चर्चा झाली ..दोन दिवसांनी तो घरी पैसे घ्यायला येणार होते ..तेव्हा त्याला तेथूनच उचलायचे असे ठरले ..त्याला घाबरवण्यासाठी म्हणून आपण पोलीस आहोत असे सांगण्याचे ठरले ! 

( बाकी पुढील भागात )

========================================================================

पहिली पालखी ! ( पर्व दुसरे - भाग १३८ वा )

मुक्तांगण मध्ये असताना ..एखाद्या व्यसनी व्यक्तीला तो स्वतःहून उपचार घेण्यासठी येत नाही असे लक्षात आल्यावर ..त्याचे पालक किवा मित्र खूप दारू पाजून शुद्धीवर नसताना उचलून घेवून येत असत ..त्याला ' पालखी ' आणली असे गमतीने म्हंटले जायचे ..मात्र बहुधा ' मुक्तांगण ' चे कार्यकर्ते यात पुढाकार घेत नसत ..व्यसनीचे पालक अथवा मित्रमंडळी हे काम करत असत ....असे जबरदस्ती उपचार देवून नक्की फायदा होतो का ? अशी अनेकांच्या मनात शंका असे ..बहुधा असे समजले जाते की व्यसनी जो पर्यंत स्वतः मनापासून ठरवत नाही तोवर असे जबरदस्ती उपचार देवून फायदा होत नाही ..मात्र हा आजार इतका भयानक आहे ..की फार थोड्या लोकांना स्वतचे होणारे नुकसान जाणवते व ते स्वतःहून व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेण्यासाठी येतात ..बहुतेक लोकांना ..कुटुंबियांचा दबाव ..एखादे मोठे संकट ..झालेले एकादे नुकसान यामुळेच व्यसनमुक्तीचे उपचार घेण्याची इच्छा होते ...अशीही उदाहरणे मला माहित आहेत की ..फारसे नुकसान होत नाही तो पर्यंत व्यसनी उपचार घेण्यास तयार होत नाही ..त्याचा अहंकार त्याला शेवट पर्यंत असे भासवतो की तो स्वतःहून व्यसन सोडणार आहे ..व्यसनमुक्ती केंद्राची गरज नाही ..काही व्यसानींचे कुटुंबीय व्यसनी व्यक्तीपुढे इतके हतबल झालेले असतात की त्यांना व्यसनी व्यक्तीला कसेही करून उपचारांसाठी दाखल करायचे असते ..मात्र तो स्वतःहून तयार होत नसतो ..अश्या वेळी मदत घेणे अनिवार्य ठरते ..त्याला स्वतःहून उपचारानां जाण्याची प्रेरणा होईपर्यंत नुसते पाहत बसता येत नाही ..कारण त्याने सर्वाना जीव नकोसा केलेला असतो ...म्हणून आम्ही पालकांना मदत म्हणून अशी ' पालखी 'आणण्याची तयारी दर्शवली होती ....जबरदस्ती उचलून आणताना तो आरडा ओरडा करून तमाशा करू शकतो ..याची आम्हाला जाणीव होती ..अश्या वेळी त्याला चारचाकी गाडीतून खिडक्या बंद करून घेवून आणणे अधिक सोपे झाले असते ..आम्ही ज्याला उचलून आणणार होतो त्याचे नाव हरीश .. ' मैत्री ' कडे स्वतःची गाडी नव्हती ..म्हणून आम्ही हरीषच्या पालकांचीच चारचाकी गाडी वापरण्याचे ठरवले ..ठरल्या नुसार हरीष घरी येण्याआधी रवी ..इरफान आणि अँगी त्याच्या घरी जावून बसले ....मी सेंटरला कोणीतरी हवे म्हणून थांबलो होतो ..

सुमारे दोन तासाने जेव्हा सेंटरला गाडी आली तेव्हा मी कुतूहलाने कोणाची पालखी आणली ते पाहू लागलो ..एक साधारण पाच फुट उंचीचा ..चष्मा असलेला तरुण गाडीतून खाली उतरला ..मध्यम बांध्याचा ..चेहऱ्यावरून अतिशय तरतरीत वाटत होता ..त्याला शुद्धीवर असतानाच उचलून आणले होते ..त्याला उचलताना कशी गम्मत झाली ते रवीने सांगितले ..तो बरोबर सांगितलेल्या वेळेस आला ..त्याचे वडील म्हणालेच होते की वेळेचा अतिशय पक्का आहे ...घरी आला तेव्हा हे लोक घरात बसलेले ..त्याने यांच्याकडे दुर्लक्ष करून सरळ वडिलांकडे पैश्यांची मागणी सुरु केली ..वडील म्हणाले हे लोक तुझी चौकशी करत घरी आले आहेत ..तर यांच्याकडे पाहून म्हणाला मी यांना ओळखत नाही ..मला अनोळखी लोकांशी बोलायला वेळ नाही ...प्रकरण एकंदरीत विक्षिप्त होते हे रवीने ओळखले ..मग रविनेच बोलायला सुरवात केली ..म्हणाला आम्ही साध्या वेषांतील पोलीस आहोत ....तुझ्या बद्दल एक तक्रार आली आहे आमच्याकडे ...हे ऐकल्यावर तो म्हणाला चोरीची तक्रार असेल तर मला मान्य आहे ..बाकी की कोणत्या भानगडीत नसतो मी ..त्याने चक्क एका झटक्यात मी चोरी करतो हे काबुल करून टाकले ..यांना वाटले होते पोलीस आहोत सांगितल्यावर हा गडी घाबरेल ..गयावया करेल ..मात्र हा सरळ चोरी करतो असे कबुल करत होता ..मग त्याचे वडील रविला सांगू लागले ..अहो साहेब ..आमचा मुलगा तसा खूप चांगला आहे ..हुशार आहे ..मात्र दारूच्या नादाने जरा बिघडलाय..तुम्ही त्याला जेलमध्ये नका टाकू ..हवे तर त्याला एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात ठेवा ..यावर तो म्हणू लागला ..व्यसनमुक्ती केंद्रात जायची मला गरज नाही ..जगात मी काही एकटा दारू पीत नाही ..तुम्हाला दारूवर आक्षेप असेल तर ..आधी सरकारला दारूबंदी करायला लावा ...हे पाणी वेगळेच होते ..हा पठ्ठ्या अजिबात व्यसनी आहोत हे कबुल करायला तयार नव्हता ..मग रवीने त्याच्या पुढे दोन पर्याय ठेवले ..पहिला असा की ...आम्ही तुझी तक्रार आहे म्हणून तुला जेल मध्ये टाकणार ..जर तुला जेलमध्ये जायचे नसेल ..तर एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात भरती व्हावे लागेल ..अशा वेळी एखाद्याने जेलच्या भीतीने व्यसनमुक्ती केंद्रात जाणे केव्हाही पसंत केले असते ..परंतु हा म्हणाला ..' चालेल तुम्ही मला जेल मध्ये टाका ..मला एकदा पहायचेच होते जेल कसे असते ते ..व्यसनमुक्ती केंद्रात नको ' ...आमचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले ..शेवटी रवी म्हणाला चल बस गाडीत ..पोलीस स्टेशनला जावू ..मग ठरवू काय करायचे ते ..हा चालेल म्हणत सरळ गाडीत बसला ..

गाडी जेव्हा शहर सोडून हायवेला लागली तेव्हा म्हणाला ..तुम्ही मला पोलीस स्टेशनलाच नेताय ना ? की भलतीकडे कुठे नेत आहात ..रवीने त्याला जरा इकडे दुसर काम आहे ..ते करून आपण पोलीस स्टेशनला जाणार आहोत असे सांगून त्याला चूप बसवले ..गाडी जेव्हा ' मैत्री ' च्या आवारात पोचली तेव्हा ..म्हणाला ' म्हणजे तुम्ही केलाच माझा घात ...शेवटी आणलेच व्यसनमुक्ती केंद्रात ..हा आयुष्यातला पहिला व्यसनी मला भेटला होता ..जो पोलीस स्टेशनला जायला उत्सुक होता ..गाडीतून खाली उतरल्यावर आम्ही त्याला घेवून वार्डात हाँल मध्ये गेलो ..तर हा म्हणाला माझे वडील मूर्ख आहेत ..तुम्ही त्यांच्या नादी लागू नका ...माझे जीवन मी कसे जगावे ते स्वातंत्र्य मला पाहिजे ...मी माझ्या पद्धतीनेच जगणार ...त्यावर मी त्याला म्हणालो ..' अरे ठीक आहे तुझे जीवन तुझ्या पद्धतीने जगायचे आहे तुला ..मग स्वतच्या पैश्यानी स्वातंत्र्य उपभोग हवे तेव्हढे ...घरून कशाला पैसे घेतोस ? ' तो उत्तरला ..' मुले जो पर्यंत स्वतच्या पायावर उभे राहत नाहीत तो पर्यंत आईवडिलांनी त्यांना पोसलेच पाहिजे ..पालकांचे कर्तव्य असते ते ' हे उत्तर ऐकून मी सर्द झालो ' अरे गाढवा ..आता तू २४ वर्षांचा झाला तरी अजून स्वतच्या पायावर उभा नाहीस ..काय उभा जन्म त्यांच्यावर अवलंबून राहणार आहेस का ? ' .. ' त्यात काय झाले ..मी जर अपंग ..किवा लुळा पांगळा असतो तर त्यांना मला पोसावेच लागले असते ' हा प्राणी पटापट उत्तरे देत होता ...त्याची मूर्खपणाची उत्तरे ऐकून माझी सटकली ..' ऐ शहाण्या ..आता जरा शांत बस ..नाहीतर फटके खाशील ' तो पुन्हा त्याच सुरात म्हणाला ' तुम्ही चर्चा करत आहात माझ्याशी ..असे एकदम हमरातुमरी वर येणे ठीक नाही ..हिंसेने प्रश्न सुटत नसतात ' त्याचे हे उत्तर ऐकून सगळे हसू लगले ..एकंदरीत हे प्रकरण आम्हाला उपचार देताना बरेच जड जाणार होते हे जाणवले .

( बाकी पुढील भागात )

====================================================================

निर्दोष मुक्तता ! ( पर्व दुसरे -भाग १३९ वा )

अजब तत्वज्ञान असलेला हरीश प्रत्येक प्रश्नाला एकाच शांत ..सहज ..आणि उर्मट वाटेल अश्या स्वरात पटापट मुर्खासारखी उत्तरे देत होता ...आपण येथे अडकलोय ..या लोकांनी आपल्याला येथे उपचारांसाठी आणलेय असे लक्षात आल्यावर त्याने ते देखील स्वीकारले ..म्हणाला ' मला काय ? ..दोन वेळचे फुकटचे खाण्याशी मतलब ..करा तुम्ही तुम्हाला हवे ते ' याचे बोलणे गंभीरतेने घेतले तर हा रोज आपल्या हातून मार खाईल हे मला उमगले ...कदाचित हळू हळू निवळेल गडी असा सर्वांनी विचार केला ..त्याने जवळपास एक आठवडा तरी आंघोळ केली नसावी असे वाटत होते त्याच्याकडे पाहून ...नखे वाढलेली ..मळलेले कपडे ..त्याचा अवतार पाहून एक म्हणाला ' क्यों बे ..चारपाच दिनोसे नहाया नही लगता है ? ' त्याचे उत्तर तयारच होते ' आपका अंदाजा गलत है ..पंधरा दिनोसे नही नहाया मै ...और दात भी नही मांजे...जिस शरीर को आखिर में जलाना हो ..मिट्टी में मिलना हो ..उसके बारे में मै जादा लोड नाही लेता ' हे उत्तर ऐकून मी त्याला ' चल ताबडतोब अंघोळीला जा म्हणून बाथरूमकडे हाकलले....आता उपचार घेणाऱ्या लोकांमध्ये एकाची भर पडली होती ....शहरापासून इतक्या दूर फार्महाऊस वर ...स्वैपाकाची सोय म्हणून सेन्टरच्या बाहेरच्या बाजूने असलेली एक छोटीशी खोली वापरात घेतली होती..मातीच्या भिंती ..आणि टीन टाकलेले होते त्या खोलीवर ..पूर्वी जनावरांचा चारा वगैरे साठवण्यासाठी त्या खोलीचा उपयोग होत असे ..आम्हाला कोणालाच चपात्या करता येत नव्हत्या ..त्यामुळे बहुतेक वेळी आम्ही भाताचेच विविध प्रकार करत असू जेवणासाठी ..साधा भात ..मसाले भात ..खिचडी ..मसाला खिचडी ..त्या सोबत वरण ..भाजी ....असे जेवण असे ...रवी कधी कधी हॉटेल मधून किवा घरून चपात्या आणत असे ..

पाहता पाहता मला दोन महिने उलटले होते नागपूरला येवून ..माझी केसची तारीख म्हणून मी दोन दिवसांसाठी नाशिकला जाऊन आलो ...कोर्टात मानसी आणि सुमित सोबत होते ..सरकारी वकील मानसीला विविध प्रश्न विचारत होते ..ती खूप गोंधळली ..रडू लागली ...मी खरेतर आधीच मँजिस्ट्रेटकडे माझ्या व्यसनांचा ..त्यामुळे कुटुंबियांना होत असणा-या त्रासाचा कबुलीजबाब दिला होता ..तरीही एक प्रक्रिया म्हणून सरकारी वकील केस लढवत होते ..एक तासभर जेवणाची सुट्टी झाली तेव्हा ..त्या महिला सरकारी वकिलाला मानसी व मी जावून भेटलो ..त्यांना सगळी परिस्थिती सांगितली ..मानसीने आता माझी काही तक्रार नाही नवऱ्याबाबत असे सांगितले ..तरीही तुम्ही नव-याच्या दबावाने तर बोलत नाही ना ? अशी शंका आलीच त्यांना ..खूप गयावया केली तेव्हा त्यांनी कोर्टात केस मिटवून टाकू असे आश्वासन दिले ..एकदाचा निर्दोष सुटलो ४९८ च्या केस मधून ...त्या दोन दिवसात एकटा घराबाहेर पडलोच नाही ...सुमित एकदम खुश होता ..बर्याच दिवसांनी त्याला नॉर्मल बाबा अनुभवायला मिळाले होते ..सतत माझ्या अवतीभोवती असे तो ..मी चपात्या कशा करायच्या हे देखील आईकडून शिकून घेतले ...नेहमी भाताचे प्रकार खाणे जीवावर आले होते आमच्या ...मानसीला आईने घरात एकटी कंटाळते म्हणून माँटेसरी टीचरच्या कोर्सला घातले होते असे समजले ...एकंदरीत ठीकच होते सगळे ...पुन्हा नागपूरला परतल्यावर मी चपात्या बनवणे सुरु केले ..त्यामुळे सगळे खुश झाले ..अँगी व इरफानला देखील चपात्या बनवायला शिकले माझ्याकडून ..आता चारी ठाव व्यवस्थित स्वैपाक होऊ लागला सेंटरला ..रवीने लोकमत मध्ये लिहिलेले चार लेख वाचून लोकमत च्या एक पत्रकार वर्षा पाटील यांनी रवीची भेट घेवून ..खूप चांगले काम आहे तुमचे ..नक्की हे काम वाढवण्यास मी मदत करेन असे सांगितले..त्यांनी एकदा सेंटरला देखील भेट दिली ...त्याच काळात नागपूर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त श्री . जाधव साहेब यांच्याशी आमची ओळख झाली ..जाधव साहेब व्यसनमुक्तीच्या कामात खूप रस घेणारे होते ...गुन्हे शाखेशी संबंध असल्याने ...व्यसनाधीनते मुळे गुन्हेगारीत प्रचंड वाढ होतेय असे त्यांचे मत होते ...व्यसनाधीनते बद्दल जास्तीत जास्त जनजागृती झाली पाहिजे ..शाळा कॉलेजेस मधील विद्यार्थ्यांना ..व्यसनांचे दुष्परिणाम सांगितले पाहिजेत या हेतूने त्यांनी ..नागपूर पोलीस आयुक्तालय व मैत्री व्यसनमुक्ती केंद्र यांच्या मार्फत अशी जनजागृती करण्यास पुढाकार घेतला ..सुमारे नागपूर मधील सुमारे तीस शाळा कॉलेजेस मधून जनजागृती कार्यक्रम घेण्याचे ठरवले .

आम्ही मुक्तांगण मध्ये असताना करत असलेले पथनाट्य येथेही करायचे ठरवले ..रवी ..मी आणि आणखीन दोन जण मिळून आम्ही पथनाट्य बसवले ..अर्थातच प्रमुख व्यसनीची भूमिका मी करत होतो ...मंगरूळहून आम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी नेण्यासाठी पोलिसांची मोठी निळी गाडी येत असे .त्यात बसून आम्ही ..शहरात माध्यमिक शाळा व कॉलेजेसमध्ये जावून पथनाट्य करत असू ...त्या निमित्ताने ' मैत्री ' चा गवगवा होऊन उपचार घेणाऱ्या मित्रात जरा भर पडू लागली ..त्या वर्षी २६ जून या आंतरराष्ट्रीय अमली विरोधी पदार्थ दिनानिमित्त नागपूरमधील मोमीनपुरा या वस्तीत एक छान जनजागृती कार्यक्रम झाला...मी भाषण केले ते सर्वाना खूप आवडले ..नागपूर च्या उन्हाळ्याशी जुळवून घेताना एकदोन वेळा आजारी पडलो ...हळू हळू नागपूर मध्ये चांगलाच रमू लागलो..पुन्हा एकदा एकाला पालखी करून आणायचे ठरले ..हा २१ वर्षाचा मुलगा ..चरस व गांजाचा व्यसनी होता ..थोडासा गुन्हेगारी जगताशी संबंधित ...खूप धिप्पाड ....जाडजूड ..त्याला उचलून आणणे सोपे काम नव्हते ...त्यासाठी जाधव साहेबांची मदत मागितली ..त्यांनी साध्या वेशातील चार पोलीस आमच्या सोबत दिले ..पोलिसांची गाडी घेवून आम्ही त्याला उचलून आणले ..पुढे गरज पडली तर केव्हाही पोलीस आपल्या मदतीस देतो असे जाधव साहेबांनी आश्वासन दिले ..त्यामुळे बरेचसे काम सोपे झाले ..नासिक मध्ये जसे सुरेंद्र पाटील साहेब ..रानडे साहेब मला मदत करत असत तसेच इथे मैत्रीस जाधव साहेब मदत करू लागले .

( बाकी पुढील भागात )

=======================================================================

भांडणे ..कटकटी ..इगो क्लँशेस ! ( पर्व दुसरे - भाग १४० वा )

' मैत्री ' मध्ये सर्व सुरळीत चालले होते ...नागपूरला येऊन सहा महिने होऊन गेलेले ...आम्ही केलेल्या जनजागृती कार्यक्रमांमुळे सेंटरला उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढू लागलेली ...पथनाट्यात सहभाग ..भाषणात ..समूह उपचार ..पालकांचे समुपदेशन ..व्यक्तिगत समुपदेशन सगळ्या गोष्टी मी छान करत होतो ...त्यामुळे साहजिकच रवीचे आणि माझे चांगलेच जमले होते ..परंतु कदाचित याच मुळे माझे इतर सहकाऱ्यांशी खटके उडू लागले ....इगो क्लँशेस वाढू लागले ...सगळेच पूर्वाश्रमीचे व्यसनी ..प्रचंड अहंकारी ...एकमेकांच्या चुका शोधण्यात वाकबगार ...शिवाय मला मिळत गेलेले महत्व पाहून इतर इतर सहकाऱ्याना उपेक्षितपणाची भावना निर्माण झालेली ..एकदोन वेळा इरफान शी माझे भांडण झाले ..कडाक्याचे ...एकदा मी हॉल बाहेरच्या व्हरांड्यात उपचारी मित्रांचा योगाभ्यास संपवून ' शवासन ' घेत होतो ....डोळे बंद करून सर्व शरीर शिथिल करा ...शरीराचा एकेक भाग हळू हळू शिथिल होतोय ..विश्रांती घेतोय ..अश्या सूचना मी देता होतो .. ..त्याचवेळी बाजूच्या किचन मध्ये इरफान सर्वांसाठी चहा करत होता ....आम्ही पाळलेला टाँमी नावाचा कुत्रा तनेमका तेव्हा तेथे किचन मध्ये गेला ..त्याने कशात तरी तोंड घातले ..झाले इरफानची सटकली ...त्याने कुत्र्याला जोरात लाथ घातली ..ते जोरजोरात केकाटू लागले ....किचन मधून पळून बाहेर व्हरांड्याकडे धावू लागले ....कुत्र्याला लाथ घालूनही समाधान न झालेला इरफान त्याच्या पाठोपाठ बाहेर पळत आला ..त्याने हातातील कुठले तरी भांडे धावत्या कुत्र्याच्या दिशेने फेकून मारले ..ते भांडे कुत्र्याला न लागता ...व्हरांड्याच्या भिंतीवर आपटून ...योगाभ्यास करणाऱ्या लोकांच्या मध्ये पडले ...कोणाला तरी लागले ...' शवासन ' सोडून सगळे घाबरून उठून बसले...इरफानच्या शिव्यांचा पट्टा सुरु होता जोरजोरात ..याने इतका तमाशा करण्याची काय गरज आहे म्हणून मी देखील चिडलो ..इरफानला रागावू लागलो ..तो दुरुत्तरे करू लागला ...दोघेही एकमेकांना भिडलो ....सुदैवाने आम्हाला इतरांनी दूर केले ..सोडवले ..परंतु प्रकरण धुमसत राहिले ...

नंतर परत तीनचार दिवसांनी ..इरफानची स्वैपाकाची पाळी असताना ..त्याने आज पोळ्या करणार नाही असे जाहीर केले ..नुसता भात आणि वरण करणार असे सांगितले ...त्याला कंटाळा आला होता पोळ्या करण्याचा ..आम्ही चारपाच जण त्यावेळी नुकतेच बाहेरून पथनाट्य करून आलेलो ...हरकत नाही पोळ्या नसतील तर नुसता वरण भात खाऊ असे मान्य केले .. इरफानने नेहमी प्रमाणे चार वाट्या तांदळाचा भात लावला ....पोळ्या नाहीत तेव्हा तांदूळ जरा जास्त घे ..असे मी इरफानला सांगू लागलो ..' तू मेरेको मत सिखा ..मै करता हु बराबर ..' असे इरफान उर्मट उत्तर ...' अरे ..क्या बराबर करेगा तू ? रोटी नही तो चावल जादा लागणं पडेगा तेरेको ' असा मी आग्रह करू लागलो ..इरफान त्याच वेळी हातात भाजी चिरायची सुरी घेवून माझ्याशी वाद घालत होता ..' तू अपने आप को बहोत शाना समझता है ..मै तेरेको नाही गिनता ...अपने मर्जी से करुंगा भात ' वैगरे सुरु केले इरफान ने ...मी जास्त भात लाव असे सर्वांचा विचार करून त्याला सांगत होतो ...कोणी अर्धपोटी राहू नये हा प्रामाणिक हेतू होता माझा ..मात्र इरफान हट्टाला पेटलेला ..शेवटी प्रकरण शिवीगाळी वर आले ....इरफान माझ्या अंगावर धावून आला ..त्याच्या हातात ती भाजी कापण्याची सुरी ..मी सावधच होतो ..त्याला भिडलो ...त्याने सुरीचा वापर करू नये म्हणून सुरीचे पाते हाताने मुठीत घट्ट पकडले ..तो सुरी सोडवण्यासाठी झटू लागला ..त्या झटापटीट माझ्या हातातील सुरीचे पाते मला जखम करू शकत होते म्हणून मी ते पाते मुठीतच वाकवून तोडून टाकले ..मग निर्धास्त झालो ..तोवर इतरानी आम्हाला सोडवले ..रात्री रविला सगळी घटना समजली ..त्याने इरफानला समजावले ..मात्र कोणाला नीट रागावणे रविला जमत नाही ..इरफान तात्पुरता शांत झाला ..मात्र त्याने माझ्या कुरापती काढणे बंद केले नाही ..मी मारामारी ..शिवीगाळ ...यात चांगलाच तरबेज आहे ....भिडलो तर मी नक्कीच सहजपणे एकदोन जण नक्कीच लोळवू शकतो ...परंतु हे सगळे उपचार घेणाऱ्या मित्रांसमोर होत असलेले मला पसंत नव्हते ..त्याचा त्याच्या मनावर विपरीत परिणाम होतो ...त्यांना शिकवणारेच जर असे भांडत असतील तर ते काय शिकणार आमच्या कडून ? ..अँगी तसा शांत प्रवृत्तीचा त्यानेही इरफानला समजावले ..परंतु इरफानच्या वागण्यात फारसा बदल झाला नाही .

पुढे उपचार घेणारे मित्र वाढले ' मंगरूळ ' मधील जागा सोडून आम्ही नागपूर शहरात अमरावती रोड वर ..' भरतनगर ' या ठिकाणी थोडी मोठी जागा भाड्याने मिळवली ..हा एक चार खोल्यांचा बंगला होता ..एका वेळी किमान २० जण उपचार घेवू शकतील अशी ही जागा होती ..मंगरूळ हून सेंटर नव्या जागेत शिफ्ट झाले ..आम्ही सगळे कार्यकर्ते जरी व्यसनमुक्त असलो तरी ' ड्राय ड्रंक ' अवस्थेत होतो ..म्हणजे ..अहंकार ..हट्टीपणा ..बेजवाबदारपणा ..तसाच होता ..रोज आमच्या काहीतरी कटकटी होत असत ..रवी शांत स्वभावाचा असल्याने त्याला अनेकदा तक्रारी करूनही तो ठोस अशी कारवाई कोणावर करत नसे ...शिवाय जरी उपचार घेणारे मित्र वाढले तरी ..आर्थिक बाजूत हवी तशी सुधारणा होत नव्हती ...अनेक पालक वेळच्या वेळी उपचार खर्चाचे पैसे देत नसत..काही जण नंतर पैसे देतो म्हणून चक्क पैसे बुडवत असत ....उपचार खर्च वेळच्या वेळी घेण्याबाबत रविला कडक धोरण स्वीकारता येत नव्हते ...कसाबसा खर्च भागत होता..कार्यकर्त्यांना मानधन देण्याची रवीची इच्छा असूनही त्याला ते शक्य होत नव्हते ..सेंटरला अनुदान मिळावे यासाठी आमचे सरकार दरबारी प्रयत्न सुरु होते ..परंतु तेथेही टक्केवारी ..भ्रष्टाचार ..चालतो ..प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची डाळ शिजणे कठीणच असते ..एकदोन वेळा नाशिकला जावून आलो ..मानसीचा सारखा आग्रह चाललेला होता ..आम्हाला तेथे राहायला घेवून चला म्हणून ..मला मानधन मिळत नसल्याने ते शक्य नव्हते ....मला मानधन देण्याची रवीची इच्छा असूनही सगळा खर्च भागवणे दिवसेंदिवस अवघड होत चालले होते ..त्यामुळे मी देखील रविला काही पैसे मागणे टाळत होतो ..सगळी परिस्थिती पाहून मला रविला अजून त्रासात टाकणे योग्य वाटले नाही .

( बाकी पुढील भागात )

सोमवार, 13 जनवरी 2014

नया दौर जिंदगीका....!!!


धडकी ..धास्ती ..वगैरे ! ( पर्व दुसरे - भाग १३१ वा )


तीन चार दिवस मी अतिशय अवस्थेत काढले ..माझा आत्मविश्वास पूर्णपणे संपल्या सारखा झाला ..ओळखीच्या लोकांशी मी रस्त्यात दिसल्यावर बोलणे टाळू लागलो ..रस्त्याने जाता येत प्रत्येक जण आपल्याकडेच पाहतोय असा भास होई ..,,एखाद्याशी बोलताना ..सारखे वाटत राही की ..हा जरी आपल्याशी सर्व साधारण गप्पा मारत असला तरी ..तरी मनातून आपली लायकी ओळखून आहे ..आपला तिरस्कार करतो ..आपल्या बद्दल याच्या मनात घृणा आहे ...वगैरे ..खरेतर हे सगळे माझ्या मनाचे खेळ होते हे देखील मला समजत होते ..मात्र ते असे थांबवावेत हे काही केल्या कळात नसे ..रात्री झोपायची भीतीच वाटे ....एकसे ..एक भीतीदायक स्वप्ने पडत असत ..प्रत्येक वेळी त्याचा शेवट .. शरीराला दरदरून घाम सुटलाय ..छातीचा भाता धपापतोय ..घसा कोरडा झालेला ..अश्या अवस्थेत जाग येण्यात होई ..मी रस्त्याने उघडा फिरतोय ..एखाद्या उंच सुळक्यावर अडकलोय ..समुद्रात पडलोय ..हातापायातले बळ नष्ट झालेय ...बुडतोय ..अश्या प्रकारचे स्वप्ने असत . अश्या वेळी जीवनावर श्रद्धा ठेवून ..मनातील अवस्थता ..नेमक्या भावना ..आपल्या समुपदेशकाशी ..जवळच्या व्यक्तीशी ..एखाद्या शुभचिंतक मित्राशी ..हे सगळे बोलून दाखवले पाहिजे ..तसेच नियमित ध्यान ..प्राणायाम ..योगाभ्यास करून मनाला प्रसन्नता ..संतुलन ..देण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत ..मन संगीत ..मनोरंजन ..विविध कला प्रकारांचा आनंद ..वगैरे गोष्टींमध्ये गुंतवून ठेवले पाहिजे ..असे मुक्तांगण मध्ये शिकवले गेले होते ..मात्र ते त्या वेळी मला सुचले नाही ...किवा सुचले तरी त्या गोष्टीना मी महत्व दिले नाही ...प्रत्येक व्यसनी व्यक्तीला व्यसनमुक्तीच्या अवस्थेत किवा व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार घेवून आल्यावर अश्या प्रक्ररचे भास होतातच असे नाही .... काहीना नियमित आळस वाटणे ..कोणत्याही कामात रस नसणे ..नोकरीवर जाण्याची इच्छा नसणे ..सारखी चिडचिड होणे ...आपल्यावर अन्याय झालाय असे वाटणे ..वगैरे गोष्टी होऊ शकतात ...व्यसनी मित्रांशी भेटण्याची इच्छा होणे ..वगैरे प्रकार होऊ शकतात ..माझ्या बाबतीत घडणारे प्रकार हे ' स्किझोफ्रेनिया ' या मानसिक विकाराची लक्षणे देखील असू शकत होती ..मात्र सुदैवाने तसे घडले नाही .

. जेल मध्ये जाण्यापूर्वी घडलेल्या घटना अतिशय गंभीर स्वरूपाच्या होत्या ..जेलमध्ये असताना कित्येकदा त्या घटनांची उजळणी मी मनातल्या मनात करून ..स्वतःची अपराधीपणाची भावना मोठी करून ठेवली होती ..स्वतःच स्वतःची मनातल्या मनात अनेकदा निर्भत्सना केली होती ..त्याचा परिपाक म्हणून ..बाहेर पडल्यावर मला असे भास होणे सुरु झाले होते ..याचे मूळ माझ्या अंतर्मनातच होते ..कुचकामी पणाची ...वैफल्याची ..निराशेची ..अपराधीपणाची ..नाकारलेपणाची ....दारूण पराभवाची ..अश्या साऱ्या नकारात्मक भावना माझ्या मनात ठाण मांडून बसलेल्या होत्या ...परिणामी रात्रीची झोप पुरेशी होईनाशी झाली ..कशातच मन रमेनासे झाले ..आपण मुक्तांगण उगाच सोडले असे वाटू लागले ....एकदोन वेळा मुक्तांगण मध्ये फोन करून सारे सारे सांगून ..मुक्ता मँडमची माफी मागून ..परत मुक्तांगणला जावून रहावे असेही वाटले ..परंतु मनातील सुप्त अहंकार तसे करू देत नव्हता..सुप्त अहंकार किवा मदत घेण्याची तयारी नसणे ही प्रत्येक व्यसनीची समस्या असते ..आपण स्वतः सगळे काही नीट करू ..सगळे काही आपोआप नीट होईल ..अथवा मदत घेण्यात वाटणारा कमीपणा ..या सर्व गोष्टींमुळे मी अधिकच पराभूत होत होतो ... नेमकी मदत घेणे मी टाळले होते ..एरवी मी अतिशय बोलका आहे ..परंतु मनातल्या नेमक्या गोष्टी कोणाजवळ मनमोकळे पणाने बोलणे कटाक्षाने टाळतो ..त्या मुळे माझेच नुकसान होते...' ओपन माइंडेडनेस ' हा सुधारणेच्या काळात अतिशय महत्वाचा असतो ..मनातली सारी खळबळ ..अवस्थता समुपदेशकाकडे बाहेर काढून ... समुपदेशक सांगेल त्या सूचनांचा स्वीकार करणारा मनमोकळेपणा इथे अभिप्रेत असतो ..इथे जर ..तर ..न लावता मदत घेणे गरजेचे असते .अर्थात हे सगळे मला आता नीट कळतेय ..त्यावेळी अहंकारामुळे मी सारे संघर्ष मनातल्या मनात विनाकारण जपून ठेवले होते .

मानसी चार दिवसांनी सुमितसह परत आल्यावर आई मी व मानसी पुन्हा आधीच्या घरात राहायला गेलो ..भावाने मला सांगितले जरी तुझा मित्र तुला जामीन मिळवून देणार असला ..तरी तू त्याचा जामीन न घेता ..माझा मित्र तुझा जामीन करेल ..म्हणजे तू जरा गडबड केलीस की आम्हाला लगेच जामीन काढून घेता येईल ..तुला पुन्हा जेल मध्ये पाठवता येईल ..त्या नुसार आठ दिवसांनी कोर्टात जावून माझा पर्सनल बाँड रद्द करून ..शेख वकिलांच्या मदतीनेच.. माझ्या भावाच्या मित्राने मला जामीन दिला ..तसेच भावाने आईला आणि सर्व कुटुंबियांना सक्त ताकीद दिली ..याने एकदा जरी व्यसन केले आहे असे तुम्हाला समजले तर तुम्ही ते न लपवता ताबडतोब मला सांगा ..या पुढे व्यसनाच्या बाबतीत अजिबात तडजोड नाही ..इतर बाबतीत लाड केलेत तर हरकत नाही ..मात्र व्यसन अजिबात चालणार नाही ..प्रथमच भावाने इतका कडक पवित्रा घेतला होता ...जामिनावर असल्याने मी देखील भावाशी भांडू शकत नव्हतो ..नाहीतर परत जेल मध्ये जावे लागले असते ..अगदीच जायबंदी झालो होतो ..हतबलता काय ते अनुभवत होतो ..मानसी परत आल्यावर मी तिला जेलमधील घटना सांगत असताना.. ती खूप रडली ..म्हणाली दुसरा काही पर्यायच नव्हता शिल्लक ..तुम्ही जरी मला त्रास दिला नाहीत ..तरी तुमच्या व्यसनांचा ..अशा बेजावाबदार वागण्याचा मलाही त्रास होतोच ..घरातले सगळे वातवरण बिघडते ..सुहास भावोजी ..वाहिनी ..आणि सर्वांनी मला सांगितले होते की तुषारला जर सुधारावायचे असेल तर ..आता कडक पवित्र घेतलाच पाहिजे ..त्यासाठी भले खोटी केस करावी लागली तरी चालेल ..त्याच्या भल्यासाठी आपण हे करतोय ..त्यामुळे मला खोटी तक्रार द्यावी लागली ..तिलाही अपराधीपणा वाटत होता ..तिला दोष न देता मी तिला धीर दिला ..आपली प्रिय व्यक्ती आपल्यामुळे असहाय झालीय ..आपल्यामुळे तिचे जीवन जगणे कठीण होतेय ....ही जाणीव प्रत्येक व्यसनीला होणे आवश्यक असते .

( बाकी पुढील भागात )

====================================================================

नागपूरकडे प्रयाण ! ( पर्व दुसरे -भाग १३२ वा )

सुमारे पंधरा दिवस अशा घाबरलेल्या मनस्थितीत काढले ..व्यसनाची वारंवार आठवण येत होतो ..मात्र भावाला समजले तर तो जामीन काढून घेईल या भीतीने व्यसन करणे टाळत होतो ...तो दिवसातून एकदा तरी माझ्या ऑफिसमध्ये किवा घरी चक्कर मारून जात असे ..मुख्य हेतू हाच की माझे कसे चाललेय ते प्रत्यक्ष पाहणे ..ब्राऊन शुगर घेत ल्यावर त्याला माझ्या डोळ्यांच्या बाहुल्यांवरून समजलेच असते ..दारू प्यायलो असतो तर ..दारूचा वास आला असता ... व्यसनाने खूप पूर्वी दिलेला आनंद असा सहजा सहजी विसरता येत नाही ...नंतर व्यसनामुळे कितीही त्रास झाला असला तरीही ..व्यसनाची इच्छा होणारच नाही असे अजिबात नसते ..व्यसनमुक्तीच्या उपचारात व्यसन करण्याची इच्छा आणि ते करण्याची कृती या मधील अंतर वाढवण्यास शिकवले जाते ...तसेच कितीही इच्छा झाली तरीही ..व्यसन माझ्यासाठी ..माझ्या भविष्यासाठी ..कुटुंबियांसाठी या पूर्वी किती घातक ठरलेय याची स्वतःला वारंवार आठवण करून द्यावी लागते ..त्यासाठी मन स्थिर असावे लागते ...मनमोकळे पणे बोलणे ..मदत घेणे ..मनातील कलह ..गुंते ..नष्ट करण्यासाठी स्वताच पुढाकार घ्यावा लागतो ..या बाबतीत मात्र मी काहीच करत नव्हतो ..केवळ धास्तीमुळे व्यसन करणे टाळत होतो ..एकदा पाठ दुखतेय असे कारण सांगून मी राजरोस स्पाज्मो प्राँक्सिव्हानच्या दोन गोळ्या खाल्ल्याच ....तोवर स्पाज्मो च्या दुष्परिणामांबद्दल फारसा गवगवा झाला नव्हता ....आई व मानसीला ते पाठदुखीचे औषध आहे असेच वाटले ..त्या दिवशी रात्री छान झोप लागली ..स्वप्ने वगैरे पडली नाहीत ..शिवाय कोणाला समजलेही नाही ....व्यसनापासून दूर राहत असताना व्यसनी कोणाला समजू नये म्हणून ..झोपेच्या गोळ्या ..दारू ऐवजी ताडी किवा गांजा ओढणे ..ब्राउन शुगर ऐवजी दुसरे स्वस्त व्यसन करणे ..अशी पर्यायी व्यसने शोधण्याचा धोका असतोच ...मग दर दोन दिवसाआड पाठ दुखीच्या निमित्ताने मी स्पाज्मोच्या गोळ्या खात गेलो ...पगार झाल्यावर जास्त पैसे मिळाले म्हणून घरी येतानाच ब्राऊन शुगर विकत घेवून ठेवली ....भावू घरी येवून भेटून गेल्यावर ..सगळे झोपल्यावर ती गुपचूप संडासात जावून ओढली ..असे चक्र हळू हळू पुन्हा सुरु झाले .. पुन्हा जेल मध्ये जाण्याच्या भीतीने ..जरा जपूनच चालले होते सगळे ....पैशांसाठी भांडणे ..घरात कटकटी वगैरे टाळत होतो ..पैसे नसतील तेव्हा चुपचाप टर्की सहन करत होतो ..

मनातून हे सगळे कायमचे बंद व्हावे अशीही इच्छा होती ..तरीही इच्छेला आत्मशक्तीचे पाठबळ मिळत नव्हते ....आपण पूर्वी व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातच कार्य करण्याचा घेतलेला निर्णय सोडून उगाच नाशिकला परतलो असे वाटत होते ....एक दोनदा नाटकीपणे मुक्ता मँडमना फोन केला ..मात्र त्यांना खरे काय चाललेय ते अजिबात सांगितले नाही ..सगळे काही ठीक आहे असेच भासवले ..मानसीला मात्र माझी गडबड परत सुरु झाल्याचा संशय होताच ..ती अधूनमधून मला सावध करत गेली ...असे सुमारे तीनचार महिने सुरु राहिले ..पुढे पुढे बाहेर पडावे वाटेनासे झाले ..कामावर दांड्या मारून घरात निराशेत झोपून राही ..परंतु कुटुंबियांना सगळे खरे खरे सांगून मदत मागत नव्हतो ..शेवटी मानसीनेच एकदा पुढाकार घेवून मुक्ता मँडमना फोन केला ..सविस्तर नाही तरी त्यांना मानसीने ..माझे व्यसन पुन्हा सुरु झाल्याचे सांगितले ..यावर त्यांनी त्याला मला फोन करायला सांग असा तिला निरोप दिला ..मात्र मी आज ..उद्या ..असे करत ते टाळत गेलो ..तिने पुन्हा एकदा फोन केला ..तेव्हा मुक्ता मँडमने तिच्या जवळ रवी पाध्येचा नंबर दिला ..म्हणाल्या ..हा रवी तुषारचा मित्र आहे ..इथे ते सोबतच राहत होते मुक्तांगणला..त्याने नागपुरात स्वतचे व्यसनमुक्ती केंद्र सुरु केलेय . गेल्याच आठवड्यात तो मुक्तांगणला भेटीसाठी आला होता ....तेव्हा तो तुषार बाबत चौकशी करत होता.. ..त्याला त्याच्या व्यसनमुक्ती केंद्रासाठी अनुभवी कार्यकर्त्यांची मदत हवी आहे ..तू त्याला फोन करायला सांग तुषारला..सायंकाळी घरी आल्यवर मानसीने मला रवी पाध्ये बद्दल सांगितले ....मी तेथे फोन करावा असे सुचवले ..हा पर्याय मला आवडला ..मुक्तांगण मध्ये वारंवार अँडमीट होणे तसेही लज्जास्पद वाटू लागले होते ..तसेच तेथे सगळे समुपदेशक माझे मित्रच असल्याने मी गंभीरतेने उपचार घेत नव्हतो ...एखाद्या व्यक्तीला वारंवार उपचार घेवून फायदा होत नसेल ..किवा ती व्यक्ती उपचारांना योग्य सहकार्य करत नसेल ..तर दुसरया व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करून पहावे असे सुचवले जाते मुक्तांगणकडून ..त्या नुसार मुक्ता मँडमनी..मानसीला रवी पाध्येचे नाव सुचवले होते .. .थोडक्यात सांगायचे तर मी मुक्तांगण मध्ये ब्लँक लिस्टेड झालो होतो ..प्रत्येक व्यसनमुक्ती केंद्रात अशा नफ्फड लोकांची यादी असते ..उपचारात योग्य सहकार्य न करणारे ..अनेकदा संधी देवून देखील न सुधारणारे ..उपचारांच्या काळात मस्ती ..गोंधळ करणारे ..स्वतःला अति शहाणे समजणारे ..वगैरे प्रकारचे लोक या ब्लँक लिस्ट मध्ये असतात ....माझ्या मागच्या मुक्तांगणच्या उपचारांच्या वेळीच ..मला जास्त दिवस राहावे असे सुचविण्यात आले होते ते मी ऐकले नव्हते ..त्या वेळी अशी गम्मत झाली होती की ..बाबांना फोन करून जेव्हा मी मुक्तांगण मध्ये दाखल झालो होतो ..तेव्हा तेथे समुपदेशक म्हणून काम करणाऱ्या माझ्या मित्राने येवून सांगितले होते की वर स्टाफ मिटिंग मध्ये ..तुझी फाईल समुपदेशक म्हणून स्वीकारण्यास कोणीही समुपदेशक तयार होत नाहीय ..तुला समुपदेशन करण्याची कोणाचीही तयारी नाहीय ..तूला समुपदेशन करणे म्हणजे दगडावर डोके आपटून डोके फोडून घेण्यासारखे आहे असे सर्वांचे मत आहे ..एकंदरीत आता मुक्तांगण मध्ये मी उपचार घेऊ नये असे मत दिसले मुक्तामँडमचे म्हणून त्यांनी मानसीला रवी पाध्येचा नंबर दिला होता ..

रवी पाध्ये हा अल्कोहोलिक होता ...१९९७ साली मी मुक्तांगण मध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत असताना माझ्या समोरच तो उपचारांसाठी दाखल झाला होता..३५ दिवसांचा उपचार पूर्ण करून स्वखुशीने आफ्टर केअर मध्ये राहिला होता ..हळू हळू त्याने बंधूला वार्डात मदत करायला सुरवात केली होती ..,,त्याचे कौशल्य पाहून त्याला कार्यकर्ता म्हणून मानधन देखील सुरु झाले होते ..हा रवी गोरापान ..उंच ..हसरा ..मितभाषी आणि एकदम टापटीप राहणारा कार्यकर्ता म्हणून मुक्तांगण मध्ये लवकरच सगळ्यांचा आवडता झाला होता ..कोणाशीही त्याचे भांडण नसे ..अतिशय समजूतदार अशी याची छबी होती ...मी आफ्टर केअर इन्चार्ज असताना तो वार्ड मध्ये इन्चार्ज म्हणून बंधुसोबत काम करत असे ..रात्री आम्ही सगळे कार्यकर्ते आफ्टर केअर मध्ये एकत्रच झोपत असू ..त्याचा पलंग अनेक दिवस माझ्या शेजारी होता ..त्यामुळे तो माझाही चांगला मित्र होताच ..मानसीने मला त्याचा फोन नंबर देवून मुक्ता मँडमचा निरोप सांगितल्यावर मी दुसर्याच दिवशी रविला फोन केला ..मला आठवतेय ती१४ एप्रिल २००२ अशी तारीख होती ..सकाळी मी रवीला फोन केला ....मी बोलतोय हे समजल्यावर त्याला आनंद झाला ..म्हणाला ..कसे चाललेय तुमचे तुषारभाऊ ..अनुभवाने आणि वयानेही मी त्याच्यापेक्षा मोठा असल्याने तो मला तुषारभाऊ असे संबोधत असे ..एरवी देखील रवी कोणालाही पटकन अरे तुरे करत नाही ..सर्वाना सन्मानानेच बोलतो ..मी रविला माझे व्यसन परत सुरु झाल्याचे सांगितले ..त्यावर त्याने मला इथे नागपूरला येत का ? असे विचारले ..मी ताबडतोब होकार दिला ..

( बाकी पुढील भागात )

====================================================================

शून्य मैल ! ( पर्व दुसरे - भाग १३३ वा )

रवी पाध्येशी बोलणे झाल्यावर मी जास्त विचार करत बसलो नाही ..काळजी होती प्रपंचाची ..नाहीतरी मी कुठे प्रपंच नेटका करत होतो ...रवीच्या नवीन सेंटर वर नव्याने सुरवात करावी हे मनाशी योजले ..सुरवातीला काही दिवस संघर्ष करावा लागेल ..नाशिक पासून इतक्या दूर कधी मला नव्याने जीवन सुरु करण्याची संधी उपलब्ध होईल असे वाटले नव्हते ...लहानपणी एकदा वडिलांची बदली नागपूरला होता आहे असे ऐकले होते ..त्यावेळी वडिलांनी प्रमोशन मिळत असूनही बदली नाकारल्याचे आठवतेय ..खूप उन्हाळा असतो ..एकदम गरम वातावरण आहे ..बकाल शहर आहे ..असे काहीतरी वडील बोलत असत नागपूरबद्दल हे आठवले ..त्या वेळीच बालमनात नागपूरबद्दल तेथे कधीच राहायला जायचे नाही अशी अढी बसली असावी ..नागपूरचा विषय निघाला की ..उन्हाळा ..बकाल शहर वगैरे गोष्टी आठवत ..वडिलांचे असे मत बनण्यास एक कारण होते ..त्यांचा रेल्वेतील एका मित्राला सरकारी कामासाठी म्हणून एका आठवड्यासाठी नागपूरला पाठवले गेले असताना ..त्यावेळी नेमका उन्हाळा असल्याने त्याने योग्य काळजी न घेतल्याने त्याला सनस्ट्रोक होऊन तो गेला होता ...सायंकाळीच मी नागपूरला निघण्याचे ठरवले ..तसे रविला सांगितले ..तसेही आता नाशिकमध्ये राहणे मला अवघड होत चालले होते ...अगदी सुरवातीला मुक्तांगण मध्ये उपचार घेवून परतल्यावर ..मी तीन वर्षे व्यसनमुक्त असताना ..मुक्तांगणचा कार्यकर्ता म्हणून चांगला लौकिक मिळवला होता ....नंतर होत गेलेल्या रीलँप्स मुळे मीच तो लौकिक धुळीस मिळवला होता .. शेवटच्या जेलच्या घटनेनंतर तर मला बाहेर फिरण्याची देखील लाज वाटू लागली होती ..उगाच इथे कुढत जगण्यापेक्षा जावू नागपूरला ..उन्हाळा असेल ..गरम वातावरण असेल ..बकाल शहर असेल ..तरीही जावूच हा निर्धार पक्का केला ...आईने सांगितले मी तू मानसी व सुमितची काळजी करू नकोस ..आम्ही त्यांची काळजी घेवू ..तू फक्त सध्या तुझ्या सुधारणेकडे लक्ष दे ..हे व्यसनाचे जोखड कायमचे झुगारून दे मनावरून ...चार पैसे कमी मिळवलेस तरी हरकत नाही ..आम्हाला तुझ्याकडून आर्थिक संपन्नतेची नाही तर ..व्यसनमुक्तीची अपेक्षा आहे ..प्रत्येक व्यसनीच्या घरी हेच सांगत असावेत ..जास्त पैसे कमावले नाहीस तरी चालेल ..मात्र व्यसनमुक्त रहा ..अर्थात आम्हा व्यसनी मंडळीना कुटुंबियांच्या भावना समजत नाहीत ..आमच्या जीवनाच्या बिघडलेल्या गाडीची इतर लोकांच्या चांगल्या जीवनाशी तुलना करून ....स्वतःच मनात खंत ..अपराधीपणा ..निराशा अशा भावना जोपासत असतो ...पुन्हा पुन्हा त्याच चुका करत जातो .

दुपारी आईकडून पैसे घेवून ब्राऊन शुगरच्या दोन पुड्या आणि एक संत्राची क्वार्टर घेवून ठेवली ..गाडीत प्यायला म्हणून ...शेवटचे म्हणून ...व्यसनी मंडळींचे हे शेवटचे असतेच नेहमीचे ..खरे तर असे शेवटचे म्हणत अनेकदा परत परत तेच केलेलं असते ..आताही आम्ही जेव्हा एखाद्या व्यासानीला उपचारांसाठी घेवून येतो तेव्हा ..तो मला एकदा व्यसन करून द्या ..शेवटचे ..असे विनवत असतो .. ..सायंकाळी सेवाग्राम एक्प्रेसने निघालो ..भावू स्टेशनवर सोडण्यासाठी आला होता ..त्यानेही मानसी व सुमितची काळजी करू नकोस ..तू फक्त स्वतच्या सुधारणेकडे लक्ष दे असे बजावले ..घरून निघताना ..मानसीच्या डोळ्यातील पाणी पाहून जीव कळवळला ..तिच्या कडेवरचा सुमित नेमके काय चाललेय हे न समजल्याने मी पण बाबांबरोबर जातो म्हणून रडत होता ..मनावर दगड ठेवून निघालो घरातून ...गाडीत स्टेशनवरून हलल्याबरोबर ..संडास मध्ये शिरलो ..एक ब्राऊन शुगरची पुडी आणि अर्धी क्वार्टर लावली ..मग बर्थवर येवून बसलो ..मनात सगळ्या भूतकाळाला उजळणी देत ..अनघा लग्न होऊन नागपूरजवळच कोठे तरी राहते हे माहित होते ..नागपूरला कधीतरी ती रस्त्यात दिसेल ..भेटेल असे उगाच वाटत राहिले ..मानसीशी लग्न झाल्यावर ..मानसीने मला खूप प्रेम दिले होते ..पत्नी धर्म अगदी उत्तम निभावला होता ..उलट मीच पती म्हणून योग्य जवाबदारी निभावयास कमी पडलो होतो ..तरीही अनघाची आठवण येतच असे...अनघाशी जर आपले वेळीच लग्न झाले असते तर ..आपले जीवन नक्कीच वेगळे असते ..यापेक्षा चांगले असते असे वाटे ..व्यसनमुक्तीच्या वाटेवर ..हे जर ...तर..किवा IF ..But ..न लावता चालता यायला हवे ..जे समोर आहे त्यात समाधान मानून जगायला शिकले पाहिजे ..माझी असमाधानी वृत्तीच नेहमी माझा घात करत आली आहे ..जे मिळाले आहे ..मिळते आहे ..त्यापेक्षा अजून काहीतरी ...जे मला हवे होते ..जे मिळू शकले नाही ..जे कदाचित कधीच मिळणार नाही ..याबद्दल जास्त खेद वाटत राहतो ..त्या मुळे जे समोर आहे त्याची किंमत रहात नाही ...गाडीत उलट सुलट विचार करत जागाच होतो रात्रभर 

सकाळी सात वाजता अजनी स्टेशनवर उतरलो ...रवी आणि त्याचे तीन मित्र मला घ्यायला आले होते स्टेशनवर ..त्या मित्रांना रवीने माझ्या बद्दल खूप काही तरी चांगले सांगितलेले जाणवले ..कारण ते सगळे खूप आदराने माझ्याशी बोलत होते ..रवीचे हे एक वैशिष्ट्य आहे ..तो बहुधा कोणाबद्दल वाईट बोलत नाही ..त्याला माहित असले तरी.. ..अगदी जवळच्या ...मोजक्याच लोकांजवळ तो एखाद्या बद्दल असलेले खरे मत मांडतो बहुधा सर्वांबद्दल चांगलेच बोलतो ...मला रवीने आनंदाने मिठी मारून माझे स्वागत केले ..म्हणाला तुषारभाऊ मुक्तांगण मध्ये असतना पेक्षा आता तब्येत जास्त खराब झालीय तुमची ..मी नुसताच हसलो ..स्टेशनवरून रवीच्या घरी शंकर नगर येथे गेलो ...रवी मुक्तांगणला असताना एकदा त्याचे आईवडील त्याला भेटायला आले असताना त्यांना पहिले होते ..मात्र ओळख नव्हती ..रवीने माझी ओळख करून दिली त्यांच्याशी ..चहा ..नाश्ता वगैरे करून आम्ही सेंटरवर निघालो ..सेंटर वर अँग्नेलो देखील आहे हे रवीने सांगितले ..मला रविचे व्यासानुक्ती केंद्र कसे आहे हे पाहण्याचे कुतूहल होते ..नागपूरपासून सुमारे ३४ किलोमीटर वर सेंटर आहे असे त्याने सांगितले ..एका ' मंगरूळ ' नावाच्या खेडेगावात ..एका मित्राच्या मदतीने ..भाड्याची जागा मिळाली होती ...आम्ही सगळे बाईक वर तेथे जाण्यास निघालो होतो ..एप्रिल महिना असल्याने उन खूप तापले होते ..अगदी सकाळी १० वाजताच ..खूप गरम होत होते ..रवीने मला एक पांढरा कपडा दिला डोक्याला गुंडाळायला ..म्हणाला ..हे इथे आवश्यक असते ..उन्हापासून बचाव करायला ..मला गम्मत वाटली ..तो कपडा डोक्याला नेमका कसा बांधायचा हे देखील शिकवले त्याने ..वाटेत मी रविला सांगितले ..माझे व्यसन सुरु होते ..त्यामुळे आता मला दोन तीन दिवस टर्की चा त्रास होईल ..स्पाज्मो प्राँक्सिव्हानच्या गोळ्या घे वाटेत ...मात्र आम्ही शहराच्या बरेच पुढे आल्याने एका छोट्याशा मेडिकल स्टोर्स मध्ये ..नुसत्या सध्या प्राक्सिव्हान मिळाल्या ..टर्की कमी होण्यास याचा फारसा फायदा होणार नव्हता ..सुमारे तासभराने आम्ही सेंटर वर पोचलो ..साधारण सातशे स्क्वेअरफुटांचा एक हॉल..बाहेर पडवी ..असे ते शेतातील फार्महाऊस सारखे होते ..वर छत टिनाचे ..सेंटरवर अँगी आणि इरफान हे मुक्तांगणचे जुने मित्र भेटले !

( बाकी पुढील भागात )

===========================================================

नवी सुरवात ...! ( पर्व दुसरे - भाग १३४ वा )

रवीने मुक्तांगणला उपचार घेवून तिथेच सुमारे तीन वर्षे आफ्टर केअर मध्ये वास्तव्य केले होते ...मुक्तांगणचा निवासी कर्मचारी म्हणून काम करत असताना ..त्याची तेथे नागपूरहून मुक्तांगण मध्ये समुपदेशकाच्या प्रशिक्षणासाठी आलेल्या एका मुलीची ओळख झाली ...मने जुळली .. त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला ..मी जेव्हा सन २००० जुलै मध्ये मुक्तांगण सोडले ..त्याच सुमारास रवीने देखील नव्याने नागपूरला जीवनाची सुरवात करावी या हेतूने ..सर्व संमतीने मुक्तांगण सोडले होते ..मुळचा नागपूरचाच असल्याने मुक्तांगण मध्ये यशस्वी उपचार घेवून तसेच व्यसनमुक्तीचा कार्यकर्ता म्हणून पुरेसे अनुभव घेवून तीन वर्षांनी त्याने ..पुन्हा नागपूरला येण्याचा निर्णय घेतला होता ...नागपूरला आल्यावर शासकीय अनुदान मिळणाऱ्या एका व्यसनमुक्ती केंद्रात त्याने समुपदेशक म्हणून नोकरी पत्करली ..त्याची होणारी पत्नी देखील तेथेच काम करत असे ...दरम्यान त्यांनी लग्नही केले ....नागपूरच्या अनुदानित व्यसनमुक्ती केंद्रात करताना त्याला आलेले अनुभव भयंकर होते ....केवळ शासनाचे अनुदान मिळते म्हणून व्यसनमुक्ती केंद्र सुरु करणारे अनेक लोक आहेत..ज्यांना व्यसनाधीनता या आजाराची शास्त्रीय माहिती नसते ..उपचार पद्धती नेमकी कशी असली पाहिजे याचेही ज्ञान नसते ..उपचार घेण्यासाठी दाखल झालेला व्यसनी सुधारावा याची कळकळही नसते ...फक्त शासनाचे अनुदान मिळवावे या हेतूने सुरु केलेल्या त्या व्यसनमुक्ती केंद्रात ..दाखल झालेल्या व्यसनी व्यक्तीला ..केवळ काही दिवस व्यसन मिळणार नाही अशा ठिकाणी डांबून ठेवणे असाच प्रकार होता ...समूह उपचार ..व्यक्तिगत समुपदेशन ..पालकांचे समुपदेशन ..वैवाहिक समुपदेशन ..अशी व्यसनमुक्तीस सर्वांगीण मदत करू शकणारी शास्त्रीय उपचार पद्धती नव्हती .... ..अनेकदा तर अनुदान मिळावे म्हणून खोटे अहवाल तयार केले जात ....शासनाकडून तपासणी करण्यास आलेल्या अधिकाऱ्यांना पैसे वाटून ते अहवाल अधिकृत करून घेतले जात असत ....मुक्तांगण सारख्या समर्पित हेतून काम करणाऱ्या संस्थेत काम केले असल्याने ...रविला ते सारे खटकले ..त्याचे नियमित संचालकांशी खटके उडू लागले ..अशी व्यसनमुक्ती केंद्रे व्यसनमुक्तीच्या नावावर समाजाच्या डोळ्यात निव्वळ धूळफेक करण्याचे काम करत असतात ...शेवटी अति झाल्यावर रवीने मुक्तांगण सारखे सर्वांगीण उपचार देवू शकणारे व्यसनमुक्ती केंद्र सुरु करायचे ठरवले..योगायोगाने त्याच्या पत्नींने पूर्वीच ' मैत्री बहुउद्देशीय संस्था ' या नावाने एक सामाजिक संस्थेची धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी करून ठेवली होती ..त्या संस्थे मार्फत ' मैत्री व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र हा प्रकल्प ' राबवण्याचे उभयतांनी मनावर घेतले ..पुरेसा पैसा हाताशी नव्हता ..तसेच साधन सामुग्रीची कमतरता देखील होतीच ..परंतु सगळे काही ठीक होईल या विश्वासाने काम सुरु करण्याचे ठरले ..कुटुंबियांची मदत ..मित्र मंडळींची मदत ..तसेच रवी ज्या संस्थेत काम करत असे ...तेथील रवीच्या मदतीने व्यसनमुक्त राहणाऱ्या चार मित्रांच्या मदतीने शेवटी फेब्रुवारी २००२ मध्ये ' मैत्री व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र ' या प्रकल्पाची सुरवात नागपूरजवळ असलेल्या ' मंगरूळ ' नावाच्या खेडेगावात मित्राच्या शेतातील फार्म हाउसवर झाली होती .

अनुभवी कार्यकर्ते म्हणून जमवाजमव सुरु करताना ..रविला पूर्वी मुक्तांगण मध्ये असलेला अँगी व लवकरच इरफान सामील झाला ..हे दोघेही माझ्या सारखेच ' नफ्फड ' म्हणजे वारंवार रीलँप्स होणारे ..त्यानाही मदतीची गरज होतीच म्हणून रवीकडे आलेले ..मी नंतर दोनच महिन्यात तेथे सामील झालो ..मी गेलो तेव्हा तेथे उपचार घेणारे जेमतेम पाच जण होते ..सगळे ' अल्कोहोलीक ' अँगी व इरफान जरी अनेकदा मुक्तांगण मध्ये असले तरी ..त्यांनी मुक्तांगण मध्ये समूह उपचार घेणे ...योगाभ्यास घेणे..पथनाट्यात काम करणे ..वगैरे कामात रस घेतला नव्हता ..ते इतर व्यवस्थापन करण्यात अनुभवी होते ..म्हणजे देखरेख ..किचन मधील काम ..सुरक्षा व्यवस्था ..विजेची कामे ..फिटिंगची कामे ..वगैरे ..मी मुक्तांगणला असताना कुतूहल म्हणून किवा शिकायची आवड म्हणून व्यसनमुक्ती केंद्राशी संबंधित उपचारांच्या सर्व बाबी शिकलो होतो ..माझ्या प्रवेशानंतर कार्यकर्त्यांची योग्य सांगड घातली गेली ... परिपूर्ण अशी टीम तयार झाली ..मंगरूळ पासून सुमारे एक किलोमीटर असलेल्या शेतात ..केंद्राच्या परिसर अतिशय शांत ..निसर्गरम्य असा होता ..वीज व पाण्याची थोडी असुविधा होती ..कारण तेथे शेतात असलेली विजेचा ट्रान्स्फार्मर दर एक दोन महिन्यांनी नादुरुस्त होई ..किवा चोरीला जाई ..मग तो नवीन बसेपर्यंत अंधारात राहावे लागे ..शिवाय लोड शेडींग होतेच ..उन्हाळ्यात तर खूपच वांधे होत असत ..वर घातलेले टीनाचे पत्रे ..गरम होऊन आत मध्ये तापलेल्या भट्टीसारखे वातावरण निर्माण होई ..वीज असताना कुलर मदतीला असे ..मात्र वीज नसली की भट्टी ..पाण्यासाठी एक विहीर होती ..त्याचा जुना पंप जेव्हा नादुरुस्त होई ..तेव्हा त्याला सुरु करण्यासाठी खटाटोप करावा लागे ..नाहीतर मग बाद्ल्यांनी विहिरीतून पाणी काढून अंघोळ ..पिण्याचे पाणी ..वापरण्याचे पाणी वगैरे गरजा भागवल्या जात ..सेंटरच्या हॉल मध्ये एक संडास कम बाथरूम होते ..बहुधा तेथे कोणी जात नसत ..सकाळच्या वेळी बाजूच्या डोंगरावर उघड्यावर काम उरकले जाई ..विहिरीतून पंप सुरु करून पाण्याचा चार इंची फवारा बाहेरच्या अंगणात अंगावर घेवून एकत्रच अंघोळ ....तेथील आमचे जीवन ' सत्ते पे सत्ता ' मधील फार्म हाउस सारखे होते ..आम्ही सर्व बहुधा फक्त एखाद्या शाँर्टसवर वावरत असू ..निसर्गाच्या सानिध्यात ..मला सुरवातीला चार दिवस टर्की झाली ..नंतर मी देखील कामाला लागलो ..तेथे नियमित समूह उपचार ..योग्याभ्यास वगैरे घेणे सुरु केले ...रवी दिवसभर शहरातील कामे करत असे ..म्हणजे पालकांना त्याच्या घरी जाऊन भेटणे ..किराणा सामान ..भाजी वगैर खरेदी ..त्याच्या जवळ त्यावेळी सेलफोन नव्हता ..त्याच्या घरी असलेल्या फोन वरूनच सर्व कारभार चाले ..रात्री तो मुक्कामाला सेंटरला येई.. तो पर्यंत दिवसभर कारभार आम्ही सांभाळत असू ..अनेकदा रवीच्या सेंटर ते नागपूर अशा दोन तीन चकरा होत असत मोटार सायकलवर ..मनापासून कष्ट करत होता तो ..केंद्राच्या उभारणीसाठी ..तुटपुंज्या आर्थिक बळावर सुरु असलेले त्याचे प्रयत्न कौतुकास्पद होते ..त्याच्या जवळ त्यावेळी सेलफोन नव्हता ..त्याच्या घरी असलेल्या फोन वरूनच सर्व कारभार चाले ..

माझ्या ४९८ च्या केसची भावाने तीन महिन्यानंतरची तारीख घेतली होती ..तेव्हा मला नाशिकला जावे लागले असते ..हळू हळू मी नवीन ठिकाणी रुळत चाललो होतो ..नवीन वातावरणाशी जुळवून घेत होतो ..मनोरंजन म्हणून त्यावेळी तेथे ..कँरम बोर्ड .. एक रेडीओ उपलब्ध होता ...समोरच्या शेतात एक मोठे पिंपळाचे झाड होते ...त्याच्या सावलीत बसून निसर्ग निरखत राहायचे ..पहाटे क्षितिजावर हळू हळू पसरत जाणारी लाली ..' तेजोनिधी लोहगोल ' या गाण्याची आठवण करून देई ....सकाळ ..दुपार ..सायंकाळ ...रात्र ..निसर्गाच्या विविध छटा ..विविध रंग ..एप्रिल ...मे ...मधील रखरखीत उन ..रात्री २ पर्यंत असलेल्या झळा ..नंतर पहाटे एकदोन तास जाणवणारा सुखद गारवा ....तब्येत सुधारत चालली होती माझी ..एकदा आईचा रवीकडे फोन आला ..मे महिन्यात माझा भाचा आनंद याचे लग्न ठरले होते अकोल्याला ..तेथे लग्नाला नाशिकची सगळी मंडळी येणार होती ..मला नागपूरहून जायचे होते ..दोन दिवसांसाठी सर्वांची भेट होणार होती ..मुख्य म्हणजे भाच्याची होणारी पत्नी ही अनघाच्या दूरच्या नात्यात होती ..त्या निमित्ताने अनघा नक्की लग्नाला येईल अशी मला खात्री होती ..तिला नक्की भेटता येणार होते ..आईचा निरोप येताच मी स्वप्न रंजन करू लागलो ..सुमारे एक तपानंतर ...अनघाला पाहायला मिळाले असते ...जमले तर बोलता आले असते ..ती माझ्याशी बोलेल का ? सुरवात कशी होईल ? ..नाहीच बोलली तर ? वगैरे प्रश्न मनात होतेच .

( बाकी पुढील भागात )

===============================================================

दिल ढूंढता ....है फिर वोही ! ( पर्व दुसरे - भाग १३५ वा )

अकोल्याला लग्नात अनघा भेटेल या विचाराने मनाचा ताबा घेतल्यावर ..मन उलट सुलट विचार करू लागले ..तिला शेवटचे पाहून १२ वर्षे उलटून गेली होती ...तिचे लग्न झालेय ....नवरा छान सरकारी नोकरीत आहे वगैरे माहिती आधीच मिळाली होती ..एकंदरीत ती सुखात होती ...नंतर झालेली माझी वाताहत पाहता तिचे लग्न झाले हे बरेच झाले असे सर्वाना वाटत असेल ..त्यावेळी तिच्या कुटुंबीयांनी आम्हाला दूर करण्यासाठी घेतलेला कठोर निर्णय ..तिच्या भल्याचाच होता ..असे एकंदरीत चित्र तयार झाले होते ..पण जर तसे घडले नसते ..तर कदाचित मी लवकर सुधारलो असतो ..इतक्या टोकाला जावून व्यसने केली नसती ..असे मला वाटत असे ...शेवटी नियती की काय जे असते ते आडवे आलेच होते माझ्या मार्गात ....तुम्ही विश्वास ठेवा ..नका ठेवू ..टीका करा किवा समर्थन करा ..नियती तिचे काम करणारच ..तिचे तडाखे खावे लागणारच ...तिच्या प्रत्येक जण फेऱ्यात सापडणारच ..अशा वेळी मानव खरोखरच किती असहाय असतो हे मी अनुभवले होते ....जर कर्मे चांगली ठेवली तर नियती तिच्या मर्जीने हवी तशी ..हवी तेव्हा सूट देणार ...आहे तसा स्विकार करून पुढे हसतमुखाने पुढे चालत रहायचे ..किवा उभा जन्म रडत ....कुढत ..रहायाचे ही निवड मात्र आपल्या हाती असते...काही लोक ..निसर्गापुढे स्वतःच्या मर्यादा ओळखून ..सगळे स्वीकारून हसतमुखाने जगतात ..त्यांच्या व्यथा ..संकटे ..सारे पचवण्याची ताकद श्रद्धेच्या मार्गाने देवाकडून मिळवतात ...नाहीतर काही देवाला शिव्या घालत ... तिरस्काराची तिडीक मस्तकात घेवून तो तिरस्कारच जगण्याचा आधार बनवून जगात रहातात ..त्याच विखाराला जीवन उर्जा बनवून ..तुच्छतेने जगतात ..सगळ्यांकडे पाठ फिरवून अंगार वाटत फिरतात ...माझ्या सारखे व्यसनी ..एखाद्या व्यसनाला जीवनाचा आधार बनवून ..भ्रमात ..तात्पुरत्या धुंदीत ...रडत ..भेकत ..बंडखोरीचा झेंडा फडकावून ..स्वतःलाच जिंकण्याच्या कैफात ..स्वतःलाच नष्ट करत राहतात . 

अकोल्याला लग्नघरी पोचल्यावर मी शांत शांतच होतो ...नाशिकची सगळी मंडळी आलेली होती आधीच ..सुमित मला लगेच बिलगला ..सुमारे महिनाभरानंतर त्याला भेटत होतो...मानसीच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता ....धावपळीत कोणाशी काही बोलणे झाले नाही ..सायंकाळी सगळे कार्यालयात गेलो ..आज रात्री सीमंतीपूजन होते ...कार्यालयात महिलावर्ग नटूनथटून मिरवत होता ...तर पुरुषमंडळी कडेच्या ठेवणीतले कपडे घालून खुर्च्यांवर बसून सगळी गम्मत पाहत बसलेले ...मी उगाचच सारखा कार्यालयाच्या दारापाशी जावून बाहेर डोकावत होतो ..अजून अनघा आलेली नव्हती ..माझी घालमेल चाललेली ...अनघा दिसताच पुढे जावून तिच्याशी बोलावे का ? की नुसतेच स्मित करावे .. ओळखच देवू नये स्वतःहून ....मी समोर दिसल्यावर नेमक्या काय प्रतिक्रिया असतील तिच्या ..या बाबत मन साशंक होते ....आधार म्हणून सुमितला कडेवर घेतले होते ...अशा वेळी एखादा मित्र जवळ असला की बरे असते ..त्याच्याशी काहीतरी बोलून..स्वतःला धीर देता येतो ..सुमितला कडेवर घेतल्यामुळे का कोणजाणे मला थोडे सुरक्षित वाटत होते ..असाच अर्धातास गेला ..बाहेर अंधारून आले होते ..पूजेचे विधी सुरु झाले ..आता अनघा आज तरी येत नाही ..असे वाटून निराशेने कार्यालयाबाहेर चक्कर मारून यावे म्हणून निघालो ..गेट जवळच अनघाची आई दिसली ..तिच्या मागे अनघा ....छान भरजरी साडी नेसून ....गळ्यात दागिने घालून ..त्यांच्या मागे एक साधारण १० वर्षांची मुलगी ..अगदी सेम अनघासारखी दिसणारी..तसेच डोळे ..तशीच गोरी ..हे सगळे एकदम अचानक समोर दिसल्यावर ..मी गडबडलो ..घाईने पुढे निघून गेलो ...चक्क मी त्यांच्या नजरेला नजर देणे टाळले होते ..अनघाची आई दिसताच ..माझा आत्मविश्वास पळाला होता...नंतर अनघा दिसताच शरीराला कंप सुटला होता ..मनात योजलेले सगळे विसरून गेलो ...सुमितला घेवून तसाच पुढे गेलो ... रस्त्यावर एक चक्कर मारली ..छाती खूप धडधडत होती ..खूप धीट ..वगैरे असणारा मी गोंधळलो होतो ..चक्क घाबरल्या सारखे झाले होते ..इतक्या वर्षांनी अनघा दिसली होती ..तशीच तजेलदार ...प्रसन्न ..काळजात घालमेल होणे म्हणजे काय ते अनुभवत होतो .

सीमंती पूजनात सुरु असताना .. बायकांच्या गर्दीत सारखा अनघाकडे नजर लावून होतो ..तिने ..तिच्या आईने ..मला महिले होते हा नक्की ...मात्र त्यांनी काहीच प्रतिक्रिया दाखवल्या नव्हत्या चेहऱ्यावर ..निर्विकारपणे पुढे निघून गेल्या होत्या ...कदाचित मी त्यांच्यासमोर अनपेक्षितपणे गेल्याने ...मेंदूकडून काही सूचना येवून प्रतिक्रिया देण्याचा आतच मी पुढे निघून गेलो होतो ..अनघा आत हॉल मध्ये स्थिरावल्यावर ..गर्दीत मला शोधेल अशी मला आशा वाटत होती ..म्हणून तिला मी पटकन दिसावा अशा जागी बसलो होतो ...तिची नजर पकडण्याच्या टप्प्यावर ..मात्र तसे काही वाटले नाही ..ती सहजपणे सर्व स्त्रियांच्यात मिसळली होती ..गप्पा ..हसणे सुरु होते ..मी तिला निवांत निरखत होतो ..लग्नानंतरही फारसा बदल झालेला नव्हता तिच्या शरीरयष्टीत ..तशीच दिसत होती ..चेहऱ्या वरचे तेज वाढलेलेच वाटले ...सेम तिच्यासारखी दिसणारी तिची मुलगी ..समवयस्क मुलींबरोबर खेळण्यात दंग झालेली ...मानसी आणि अनघा त्या बसलेल्या स्त्रियांच्या गर्दीत एकमेकींपासून अवघ्या १० फुट अंतरावर होत्या ..मानसी अधून मधून सुमित माझ्याकडेवर शांत बसलेला आहे ना याची खात्री करून घेत होती..अनघाला आणि मला ओळखणारा भाच्याचा एक मित्र माझ्याजवळ येवून बसला ..त्याने माझ्या मनात काय चालले आहे हे ओळखले असावे ..' मामू ..काय गडबड है ? ' असे म्हणत माझ्याशी त्याने हात मिळवला ..मी उसने अवसान आणून हसलो ..डोळे सतत अनघाकडे लागलेले ..ती मात्र अनभिज्ञ असल्यासारखी ...सहजसुंदर !सुमारे दीड तासात एकदाही तिने माझ्याकडे पहिले नव्हते ..इतकी सहजपणे कशी वागू शकते ही ..याचे आश्चर्य वाटले मनात ..मला पाहून काहीच घालमेल झाली नसावी का हिची ? ..की स्त्रिया असे मनातले भाव सहजासहजी लपवण्यात जास्ती वाकबगार असतात ? ..कदाचित आता आपण विवाहित आहोत ..हे भान अनघाला सोडता येत नव्हते ..कदाचित तुषारकडे बघितले ..नजरानजर झाली तर ..स्वतःला सावरणे कठीण जाईन हे तिला माहित होते ..किवा आता मी तिच्या साठी चक्क परका झालो होतो !

( बाकी पुढील भागात )