गुरुवार, 2 जनवरी 2014

अजब तुझे सरकार...!!!


बोनस ? ? ? ( पर्व दुसरे - भाग १२१ वा )


माझी मँजीस्ट्रेट कस्टडी संपायच्या दिवशी ..बंदी उघडल्यापासून मी माझ्या नावाचा पुकारा व्हायची वाट पाहत होतो ..ज्यांची कोर्टात तारीख असेल त्या कैद्यांच्या नावाचा पुकारा सकाळी आठ नंतर होत असे ..तर ज्यांची भेट घ्यायला कोणी नातलग आला असेल त्यांच्या नावाचा पुकारा १० नंतर होई ....ज्यांचा जामीन बाहेरच्या बाहेर वकील किवा नातलग करीत त्यांची नावे दुपारी ३ नंतर जाहीर होत ..सुटीचा दिवस सोडून.. रोज ....प्रशासनाच्या ऑफिस मधून शिपाई आला त्याच्या भोवती गर्दी जमत असे कैद्यांची ..प्रत्येकजण या आशेवर असे की आपले नाही निदान आपल्या मित्राचे तरी नाव यावे यादीत ... एक शिपाई येवून मोठ्याने त्याच्या जवळच्या कागदावरची नावे वाचून दाखवी ..मग त्या कागदाची एक प्रत बराकीच्या वार्डन जवळ दिली जाई ..पुकारा झालेल्या सर्व लोकांना एका रांगेत बसवले जाई ..जेलच्या बाहेर जाणे म्हणजे काही कैद्यांसाठी पर्वणी असे ..त्या दिवशी कोर्टात त्यांना त्यांचे नातलग भेटत असत ..तारीख झाल्यावर परत येताना ते सोबत खायचे सामान ..बिड्या वगैरे घेवून येत असत ..काही सराईत कैदी नातलगांद्वारे इतर कैद्यांचे मेसेज देखील पोचवत असत ..सकाळी सकाळी मी हौदावर थंड पाण्याने अंघोळ करून तयार झालो होतो ..माझ्याजवळ अंगावरचा एकच जोड कपडे होते ..त्यामुळे अंघोळ करण्याच्या वेळी मी बनियन ने अंग पुसून ..नंतर ते बनियन वाळले की अंगात घालत होतो ..माझ्या सारखे अनेक जण असत जे ..रेल्वे स्टेशन ..पंचवटीचा घाट...बस स्थानक वगैरे ठिकाणाहून संशयित म्हणून पकडले जात .. ..त्यांच्याकडेही फक्त अंगावरचे कपडे इतकीच मालमत्ता असे ..असे सगळे जण अंघोळ दिगंबर अवस्थेतच करत ...कोणी कोणाला लाजायचा प्रश्नच नसे ...हालात की मजबुरी !

माझ्या नावाचा पुकारा झाल्याबरोबर मी बाजूलाच लागलेल्या रांगेत जावून बसलो ...कोर्टात नेमके काय होईल याची खात्री नव्हती मला ....भाऊ कोर्टात येईल का ? जामीन करेल का ? वगैरे प्रश्न होतेच मनात ..नऊ वाजता सर्कलचे गेट उघडून आम्हाला रांगेने मुख्य ' लालगेट ' जवळ नेले गेले ..पुन्हा तिथे रांगेने बसवले गेले ..जेलच्या मुख्य भव्य प्रवेशद्वाराला ' लालगेट ' असे म्हणत ...बराच वेळ तेथे बसावे लागले ...आमच्यासाठी तेथेच जेवणही आले ..सोबत थाळ्या देखील होत्या ..कारण आमच्या सगळ्यांच्या थाळ्या बराकीत ...रांगेने जेवण वाढले गेले ..इथे जेवण पोटभर मिळाले ..म्हणजे नेहमी पेक्षा दोन चपात्या जास्त मिळाल्या ...अकरा वाजत आले होते ..आम्ही रांगेत बसून कंटाळलो होतो ..शेवटी एक शिपाई आला ..सगळे उत्सुकतेने त्याच्याकडे पाहत होते ..त्याने जाहीर केले की ..आज पार्टी लागली नाही ..सगळ्यांनी परत बराकीत जायचे आहे ..पार्टी म्हणजे जेलमधून बंदोबस्तात कोर्टात नेण्यासाठी कमिशनर ऑफिस मधून नेमण्यात आलेले पोलीस ..मालेगाव येथे झालेल्या दंगली मुळे बाहेरचे वातावरण तंग होते ..त्यामुळे कैद्यांना कोर्टात नेण्यासाठी पोलीस उपलब्ध झाले नव्हते ..सगळे निराश झाले ..परत मागे फिरलो ... आता अजून पंधरा दिवस मला जेलमध्ये काढावे लागणार होते ...वैतागून बराकीत येवून बसलो ..मनातून घरच्या मंडळींचा खूप राग येत होता ..अनेकदा परिस्थिती इतकी कठीण आणि मनाविरुद्ध असते की त्रागा करून ..चीड चीड करून ....निराश होऊन काहीही उपयोग नसतो ..अश्या वेळी परिस्थितीला शरण जाणे ..हसतमुखाने तोंड देणे हाच योग्य पर्याय असतो ..येथे स्वतःचे खुजेपण चांगलेच जाणवते ..कोणीही कितीही मोठा असला तरी ' वक्त ..हालात ..के सामने मजबूर होनाही पडता है ' बहुधा अहंकार कमी होण्यासाठीच अशी परिस्थिती निर्माण होत असावी ..अनघाच्या वेळीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती ..मी काहीही करू शकलो नाही ..केवळ स्वतःला दोष देणे ..हेच हाती उरले होते ....

दुपारी बंदी उघडल्यावर ..विषण्णपणे बाहेर येवून बसलो होतो ..जेवणाची इच्छा राहिली नव्हती ..माझ्या बाजूला आमच्या बराकीचा शिपाई उभा होता ..त्याच्याजवळ दुसऱ्या बराकीचा एक शिपाई आला आणि त्याला विचारू लागला ' बोनस लिया क्या तुने ? ' आमच्या बराकीचा शिपाई वैतागून म्हणाला ..' कहासे मिलेगा ..आपले सरकार कंगाल झालेय ..त्यांनाच पैसे कमी पडत आहेत ..' मी त्यांच्या गप्पा ऐकू लागलो ..मग दुसरा म्हणाला ' महाराष्ट्र सरकार नै रे ..उधर के सर्कल मे भाई लोगोने बोनस बाँटना शुरू किया है ..बाबा को पाचसों और जमादार को एक हजार रुपये मिल रहे है ..मै अभी श्याम को जानेवाला हु ' मला हे ऐकून नवल वाटले ..त्या वर्षी महाराष्ट्र सरकारने राज्य सरकारी कर्मचार्यांना दिवाळीत बोनस दिला नव्हता ... तिजोरीत पुरेसे पैसे नाहीत असे कारण सांगितले होते ..तर इथे जेल मध्ये असलेले भाई लोक बोनस वाटत होते ...एका सर्कल मध्ये मुंबई टोळी युद्धातील गुन्हेगार ..भाई लोक ठेवले गेले होते ..त्यात कलानी ..गवळी ..दाउद अश्या सर्वांच्या गँगचे सदस्य ..ते जेलमध्ये राजासारखे रहात असत ...त्यांच्याकडे भरपूर पैसे येत होते बाहेरून ..सगळे नियम धाब्यावर बसवून ..असे भाई लोक सरकारने बोनस दिला नाही म्हणून ..दिवाळी नंतर जेलच्या कर्मचार्यांना बोनस वाटत होते ..अगदी राजरोस ..मला प्रश्न पडला ....नक्की राज्य कोणाचे आहे ? सरकारचे ..भाई लोकांचे ..की पैश्यांचे ?

( बाकी पुढील भागात )

===================================================================

हृदयद्रावक आठवण !( पर्व दुसरे -भाग १२२ वा )

अजून पुढचे पंधरा दिवस जेलमध्ये रहावेच लागणार होते ...जरी येथे स्थिरावलो होतो तरी ..बाहेरच्या जगाची ओढ मनात होतीच ..माझ्या सारख्या स्वतंत्र वृत्तीच्या माणसाला बंधने नको असतात ..स्वातंत्र्य हवे असते नेहमी ..मात्र स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांची सीमारेषा मला कधीच समजली नव्हती ..मी समजत असलेले माझे स्वातंत्र्य हा खरे तर स्वैराचार होता ..हा स्वैराचार पुढे इतका वाढला की त्यासाठी दुराचार सुरु झाला ... शेवटी अनाचार ..मग व्हावे लागले स्वतच्याच कर्माने लाचार ...येथील गुन्हेगारांच्या जगातही मी घरच्यांना त्रास देत होतो म्हणून लुख्खा ठरलो होतो ...अर्थात ते खरेही होते ..माझ्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या ओघात मी कुटुंबीयांवर नकळत का होईना अन्यायच करत गेलो...मी तासंतास विचार करत बसे ....अनेक प्रश्न आणि प्रत्येक वेळी उत्तर एकच येई ..व्यसनाधीनता ...जो पर्यंत मी व्यसन कायमचे बंद ठेवत नाही तोवर काहीही वेगळे घडणार नव्हते ..आपण काही दिवस व्यसन बंद ठेवले की ..आता थोडेसे घेण्यास हरकत नाही... हा आत्मघातकी विचार मला कायमचा सोडवा लागणार होता ...त्यासाठी वारंवार मनाला व्यसनाने दिलेल्या त्रासाची आठवण करून देणे भाग होते ..कदाचित त्यामुळेच ...फक्त एकदाच ..थोडेसे ..घेण्याचा विचार कायमचा हद्दपार करता आला असता ..

आमच्या बराकीत अनेक जण किरकोळ केसेस मध्ये संशयित म्हणून पकडले गेलेले होते ..त्यातील काही महाराष्ट्राबाहेरचे ... अश्या लोकांना पोलीस स्टेशन मार्फत त्याच्या घरी निरोप जाऊन ..घरून कोणीतरी त्यांचा जामीन करेपर्यंत जेलमध्ये रहवे लागे ..त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे न्याय व्यवस्था जवळ जवळ तुंबलेली ...महिनोंमहिने केस रेंगाळणार..जे पैसेवाले आहेत ते निष्णात वकील देवून केस लवकर तडीस नेणार किवा निरनिराळ्या कारणांनी केस लोंबकळत ठेवणार ....जेलमध्येही पैश्यांच्या जोरावर रंगदारी करणार ...हवे तसे करून घेणार ... जे गरीब आहेत ते हतबलपणे वकील नाही ..पैसा नाही ..अशा कारणांनी असहायपणे जेलमध्ये राहणार असे काहीसे चित्र होते ..अश्याच गरीबांपैकी एक थापा नावाचा हिमाचल प्रदेशातील माणूस होता ..तिशीचा असावा ..थापा म्हंटले की बहुधा विशिष्ट ठेवणीचा ..विशिष्ट उंची असलेला चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो हा थापा मात्र याला अपवाद होता ..उंच धिप्पाड ..सावळा ..थोडासा अबोल ..त्याला म्हणे पंचवटी घाटावर झोपलेला असताना संशयित म्हणून पकडून आणले होते ..घरच्या गरिबीमुळे तो घर सोडून ..कामधंदा करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात आलेला ..अशिक्षित असल्याने हमाली करून पोट भरत होता ...हा थापा सुमारे तीन महिन्यापासून जेलमध्ये अडकला होता . ..स्वभावाने अतिशय गरीब ..बिडीसाठी..पोटभर जेवणासाठी ..बराकीतील भाई आणि वार्डनची सेवा करावी लागे त्याला ..त्यांची जेवणाची भांडी धुवून ठेवणे ..त्यांचे कपडे धुणे ..त्यांची मालिश करणे वगैरे कामे करीत असे ...एकदा सकाळी बंदी उघडल्यावर आम्ही सगळे चहा घेण्याच्या लाईनीत बसलेलो असताना ..अचानक आरडओरडा ऐकू आला ..सगळे त्या दिशेला पाहू लागलो ..हा थापा आमच्या बराकीसमोर असलेल्या कडूलिंबाच्या झाडावर चढत होता ...खूप उंच आणि जाड बुंधा असलेले ते जुने झाड होते ..मोठ्या विस्ताराचे ..मात्र थापा अगदी सराईत असल्या सारखा बुंध्याला विळखा घालून वर चालला होता ..सगळे कैदी ..शिपाई ..वार्डन ..त्याला खाली उतर म्हणून ओरडत होते ..मात्र तो जणू बहिरा झालेला ...कोणाकडेही लक्ष न देता ..तो वर जात राहिला ..' पकडो ..पकडो ' .. असा आवाज सर्वत्र येत होता ..ते झाड खरेतर बराकीच्या आतच होते ..त्या झाडावरून चढून पळून जाणे शक्यच नव्हते ...तरीही तो झाडावर चढला होता ..त्याला पकडण्यासाठी एकदोन उत्साही कैदी ..त्याच्या मागे झाडावर चढू पाहत होते ..मात्र थापा खूप उंच पोचलेला होता ...सुमारे सत्तर ते ऐंशी फुट उंच गेल्यावर थापा एका आडव्या फांदीवर गेला ..ती आडवी फांदी पाण्याच्या दगडी हौदाच्या नेमकी वर ..

लुंगीचे एक टोक त्याने फांदीला बांधले ...दुसरे टोक स्वतच्या गळ्याला ..तो नेमके काय करतोय हे सर्वांच्या लक्षात आले होते ..पुन्हा मोठा आरडओरडा झाला ..क्षणार्धात थापाने स्वतःला खाली झोकून दिले ...तो गळ्याला लुंगी बांधलेल्या अवस्थेत झाडाला लटकला ...अगदी दोन तीन सेकंद..आणि नेमकी उंच धिप्पाड थापाच्या वजनाने ..ती जुनी जीर्ण लुंगी मधून फाटली ..तुटली ...थापा धपकन सुमारे ऐंशी फुट उंचीवरून सरळ खाली पडला ..तो नेमका दगडी हौदाच्या नालीत त्याचे तळपाय अडकले ..मग तो मागे आडवा पडला ..कटकन काहीतरी मोडल्याचा आवाज आला ..माझ्या समोरच थापाच्या नालीत अडकलेल्या घोट्याचे एक बारीक हाड उडून पडले ....सर्व लगेच धावले थापाला उचलले ..तो शुद्धीवर होता ..प्रतिकार करत होता ..त्याला दोन वार्डन ने खांद्यावर घेतले ..खाली पहिले तर त्याची दोन्ही पावले घोट्यापासून लोंबकळत होती ..दोन्ही घोट्याची हाडे तुटलेली ..त्यातून रक्ताची धार लागलेली ..निर्जीव वाटणारी त्याची पावले पाहून ..कसेसेच वाटले मला ..घोट्याच्या तुटलेल्या हाडाचा एक तुकडा माझ्या उडून माझ्या समोर पडलेला ...ताबडतोब ..थापाला सिव्हील हॉस्पिटलमध्य पाठवले गेले..सर्व जण जमून घोळक्याने तीच चर्चा करू लागले ..मला वाटले की लुंगी तुटली नसती तर कदाचित लोंबकळणारया थापाला त्याचा श्वास बंद पडायच्या आत... त्याला पकडायला झाडावर चढलेला वार्डन त्याच्या जवळ पोचून त्याला सोडावू शकला असता ..मात्र लुंगी तुटली आणि जास्तच भयानक प्रकार घडला ..दुपारी एक वाजता बातमी आली की थापा अति रक्तस्त्राव झाल्याने हॉस्पिटल मध्ये गेला ...संपला ...आम्ही सगळे हळहळत होतो ..निराशेच्या भरात थापाने हे कृत्य केले होते यात वादच नव्हता ..दुपारी तीन वाजता बंदी उघडल्यावर जामीन झालेल्या लोकांची नावे वाचायला एक शिपाई आला ..तो मोठ्याने नावे वाचत होता ..त्याने थापाचे नाव वाचले ..सगळे थक्कच झालो ..म्हणजे नेमका थापाचा जामीन आजच झाला होता ...बहुतेक त्याच्या गावी हिमाचल प्रदेशात पोलीस स्टेशनचा निरोप जावून ..त्याचा भावू पैश्यांचा बंदोबस्त करून ...नाशिकला कोर्टात येवून त्याचा जमीन करेपर्यंत सुमारे तीन काहीने उलटून गेले ..तो पर्यंत थापाचा धीर खचला ..आता थापाला जामीन मिळूनही काही उपयोग नव्हता ..तो केव्हाच मुक्त झालेला !

( बाकी पुढील भागात )
========================================================================

जेलरवर हल्ला ! ( पर्व दुसरे -भाग १२३ वा )

पहाटे सहाला बंदी उघडली की अंधुक प्रकाशात पळत जावून चहाच्या लाईनीत पुढचा नंबर घेणे ...चहा घेइपर्यंत कोवळे उन येत असे ...त्या उन्हात अभंग ऐकत ...ऊवा शोधण्याचा कार्यक्रम ..हौदावर कुडकुडत थंड पाण्याने अंघोळ ..तोवर जेवणाची वेळ झालेली असे ..जेवणाच्या लाईनीत .. ..जास्तीच्या दोन तीन चपात्या मिळाव्या यासाठी धडपड ..पुन्हा दुपारची बंदी ....बराकीतच थंडगार जमिनीवर सतरंजी टाकून खालच्या फरशीचा गारवा सहन अनुभवत वामकुक्षी..दुपारी तीनला बंदी उघडली की ..सायंकाळच्या जेवणासाठी लाईन ..इकडे तिकडे तासभर गुन्हेगारीच्या एक से एक गप्पा - टप्पा ऐकत वेळ घालवणे ...पाचला बंदी झाली की मग बराकीत थाळ्या बडवत गाणी म्हणत बसणे...रात्री झोपताना पाय पोटाशी घेवून डोक्यावर ते जुनाट कांबळ घेवून त्याचा वास सहन करत ..त्याच्या आत श्वासांनी उब तयार करत ..विचार करत राहणे ..सगळे विचार थकले की केव्हातरी झोपी जाणे..सकाळी उठल्यावर हौदावर तोंड धुताना नाक शिंकरले की त्यातून श्वासासोबत नाकात ..घश्यात गेलेले त्या कंबळाचे सूक्ष्म तंतू ..बाहेर पडत ..ते पाहून कसेसेच होई ..एकदा उन्हात बसलो असताना ..एक शिपाई बाजूला वर्तमान पत्र वाचत उभा होता ....सहज त्यात डोकावलो ..आश्चर्य म्हणजे त्या आतल्या पानावर मी सुमारे महिन्यापूर्वी शैलेंद्र तनपुरे जवळ प्रकाशित करण्यासाठी दिलेला माझा ' ताण तणावांशी सामना ' हा लेख छापून आलेला .. हा लेख मी लिहिला आहे असे सांगितल्यावर त्या शिपायाचा आधी विश्वास बसला नाही ..मग त्याने माझ्या नावाची खात्री करून घेतल्यावर त्याला पटले ..तो माझ्याकडे जरा आदराने पाहू लागला ..पत्रकार आहे म्हणून मला मान देवू लागला ..ही बातमी बराकीत पसरली ...सर्व जण मला तेथे पत्रकार म्हणून ओळखू लागले ..या नव्या ओळखी मुळे ..मला जेवताना दोन चपात्या जास्त मिळण्यास मदत झाली ..या जास्तीच्या घेवून ठेवलेल्या चपात्या मी कागदात गुंडाळून ठेवत असे ..पहाटे चहा सोबत त्या कडक झालेल्या चपात्या खाता येत असत ..

त्याच काळात माझा एक गर्दुल्ला मित्र अशोक आमच्या समोरच्या बराकीत राहण्यास आला ..त्याला तीन महिन्यांची शिक्षा झाली होती ..हा अशोक पूर्वी जेल मध्ये किमान आठ दहा वेळा तरी आलेला होता ..किरकोळ चोऱ्या करणे ..रात्री एकट्या दुकट्या व्यक्तीला चाकू दाखवून लुटमार करणे वगैरे गुन्हे करत असे ..याचे टोपण नाव ' पिऱ्या ' असे होते ..पाच सहा वर्षे आधी त्याला ' मुक्तांगण ' मध्ये उपचार घेण्यासाठी मी प्रेरित केले होते ..रानडे साहेबांनी जमवलेल्या निधीतून त्याला काही आर्थिक मदतही मिळवून दिली होती ..त्यामुळे पिऱ्या मला चांगला मान देत असे ..सकाळी पिऱ्या भिशीत ( जेलचे स्वयंपाक घर ) कामासाठी जाई ..तेथून जास्तीच्या चपात्या ..बिड्या आणत असे ..पिऱ्या ने माझी बदली त्याच्या बराकीत करून घेतली ..तेथे मला स्पेशल जागा मिळाली झोपायला ..त्या बराकीत ..शंकर भाई या मुंबईच्या दादाची टोळी होती ..शंकरभाई आणि त्याचे तीन चार साथीदार ....' मकोका ' खाली ते लोक आतमध्ये होते ...शंकरभाई अगदी वरच्या दर्जाचा नसला तरी मुंबईतील मध्यम दर्जाचा भाई..हप्ता वसुली ..अपहरण ..खंडणी वसुली अश्या गुन्ह्यात सामील असे ...त्यांच्याशी ओळख झाल्यावर त्यांच्या हंडीत बनलेला चहा मिळू लागला ...तसेच तीनचार दिवसांनी एखादे वेळी ..गांजाचे दम मारायला मिळत ..एकंदरीत आता चांगला जम बसला होता माझा..आठवड्यातून दोन वेळा जेलरचा राउंड असे ..त्यावेळी सगळ्या कैद्यांना बराकी समोरच्या मोकळ्या जागेत उभे करत ..सुमारे अर्धा तास आधी पासून सर्वाना ' सावधान ' च्या पोझ मध्ये उभे करून ठेवले जाई ..जेलर आला की ..एकेका कैद्या जवळ जाई ..त्याचे निरीक्षण करून मग पुढे सरके ..या प्रसंगी मला हटकून ' शोले ' मधील जेलरची आठवण होत असे ...काही कैदी जेलर जवळ किरकोळ तक्रारी करत असत ..बहुधा एकच तक्रार असे ..ती म्हणजे पार्टी लागली नाही ..जामीन झाला नाही ..जेलर अश्या तक्रारींना फक्त मान डोलवून ..पाहू ..बघू ..अशी उत्तरे देई ...एखादा जास्त मागे लागला तर ..त्याला ' इथे तुला काय कमी आहे ? जेवण मिळतेय ना रोजच्या रोज ..मग कशाला बाहेर जायचे ' असे उत्तर देवून चूप करत असे ..

असाच जेलारचा राउंड सुरु असताना ...माझ्या पुढून जेलर जेमतेम दहा पावले पुढे गेल्यावर आमच्याच बराकीतील एका कैद्याने ..दोन महिने झाले पार्टी लागली नाही ..अशी तक्रार केली ..जेलरने त्याला ' जेवण मिळतेय ना ? ' असे छापील उत्तर दिले ..अचानक त्या कैद्याने ..शिव्या देत ..मोठ्याने ओरडत जेलरवर हल्ला केला ..या अनपेक्षित हल्ल्याने जेलर गोंधळाला ..काही लक्षात येपर्यंत जेलरने दोन चार थपडा खाल्ल्या होत्या ..मग जेलर सोबत असलेले संत्री सावध झाले ...त्या कैद्याला पकडण्यात आले ..त्याला मारझोड सुरु झाली ..पाच सहा जण मिळून लाथाबुक्क्यांनी तुडवत होते त्या कैद्याला ..त्यांनी त्याला उचलून सर्कलच्या बाहेर नेले ...जेलरही अपमानित मुद्रेने बाहेर गेला ..सगळे कैदी त्या कैद्याच्या धैर्याचे कौतुक करत होते ..' क्या डेरिंगबाज है साला ..अच्छा किया उसने ' वगैरे चर्चा चालली होती ..मला आता त्या कैद्याचे पुढे काय होईल याची काळजी लागलेली होती ..विलास असे त्याचे नाव होते हे समजले ..एक जण म्हणाला त्याला आता दुसऱ्या सर्कल मध्ये दंडाबेडी लावून ठोकतील ..अर्धमेला करतील वगैरे ...एक दोन दिवस हीच चर्चा होती सगळीकडे ..मग तिसऱ्या दिवशी पिऱ्याने बातमी आणली की विलासचे डेरिंग पाहून त्याला दाउदच्या टोळीतील भाई लोकांनी त्यांच्या बराकीत बदली करून घेतले आहे ..तो मस्त भाई बनेल आता ...त्याच्या घरी महिन्याला ठराविक रक्कम पोचवली जाईल ..हे भाई लोक अश्या डेरिंगबाज तरुणाच्या शोधात असतात ..त्याला लगेच टोळीत सामील करून घेतले जाते ..गुन्हेगारीचे व्यवस्थित प्रशिक्षण दिले जाते ..त्यातूनच ' शुटर' निर्माण होतात .

( बाकी पुढील भागात )

======================================================================

मेरे हमसफर ! ( पर्व दुसरे -भाग १२४ वा )

जरी मी अगदी सराईतपणे जेलमध्ये वावरत होतो तरी अंतर्मनातून मी खूप अवस्थ असे ..हे माझे नेहमीचेच आहे ...अंतर्मनात नेहमीच ...अनेक प्रश्न ..विविध प्रकारची असुरक्षितता ..अविवेकी भावना यांचा कल्लोळ माजलेला असतो ..अगदी क्वचितच माझ्या वर्तनातून इतरांना हे जाणवते ..आठवत असल्यापासून ही अवस्थताच नेहमी मला असमाधानी ठेवण्याचे काम इमानइतबारे करत आली आहे ....व्यसनमुक्तीच्या काळात ही अवस्थता वाढलेली असते ..कारण व्यसन करत असताना नशेत काही काळ सर्व काही विसरल्यासारखे होई ...नशा उतरली की पुन्हा नशा कशी मिळवावी याच विचारात वेळ जाई ..व्यसनमुक्त राहताना शांत ..समाधानी ..प्रसन्न कसे रहावे हे समजत नसे ..इथे जेलमध्ये जरी अधूनमधून मला गांजाचे एकदोन दम मारायला मिळत होते ...तरी त्याची खात्री नसे ..अवलंबित्व देखील नव्हते ... मिळाले तर ठीक नाहीतर राहू दे ..अश्या वृत्तीने मी चिलीम ओढण्यात सामील होई .. अंशतः व्यसन सुरु होते ..तरीही हवी तशी नशा करत नव्हतो ....त्यामुळे मनाचा एक कोपरा सतत भविष्यकाळातील असंख्य संभावना आणि समस्या यांनी त्रस्त राही ..व्यसनमुक्त रहात असताना जर ही अवस्थता संपवता आली नाही तर वारंवार व्यसन सुरु होण्याचा धोका असतोच ...अशा वेळी जीवनावर श्रद्धा ठेवून ..जास्त पुढचा विचार करून चिंतीत होण्याऐवजी किवा भूतकाळातील चुकांबद्दल....गमावलेल्या संधींबद्दल..केलेल्या नुकसानाबद्दल अपराधीपणाची भावना जोपासण्यापेक्षा ..योग्य जाणीव ठेवून वर्तमानातले वास्तव स्वीकारून ...कोणातरी समंजस व्यक्तीकडे मनमोकळे बोलून ..जास्तीत जास्त सकारात्मक कामात मनाला गुंतवून ठेवावे ..असे मुक्तांगण मध्ये शिकवले जाई ... अर्थात मुक्तांगण मध्ये शिकवले गेलेले बाहेर पडल्यावर लक्षात ठेवणे जरी सोपे वाटले तरी ते अमलात आणणे मात्र खूप कठीण असते ...त्यासाठी सतत या आजाराबद्दल सावध ..सतर्क ..खबरदार रहाणे गरजेचे असते ..अति आत्मविश्वास ..स्वतची बुद्धी ..पैसा व इतर बाबतीत असलेल्या अहंकारावर सतत अंकुश ठेवावा लागतो ..मगच भावनिक पातळीवर स्थिर राहता येते ...नाहीतर पुन्हा व्यसनाची गुलामी येतेच .

पहाटे गाढ झोपेत असताना बराकीत एकदम बराच गोंधळ झाल्याचा आवाज आला ...जेवणाच्या मोठ्या भांड्यांचा आवाज ऐकून मी देखील उठून बसलो जागेवर ..पाहतो तर बराकीच्या एका कोपऱ्यात दहाबारा कैदी गोल टोपी घालून वज्रासनात असल्यासारखे बसलेले ...एकमेकांशी न बोलता काहीतरी पुटपुटत होते ..मग सगळ्यांनी तोंडावर हात फिरवले ..उठून उभे राहिले ...बाहेरून बराकीचा दरवाजा उघडला गेला ..बहुधा पहाटेचे पाच वाजून गेले असावेत ..ते सगळे कैदी बराकीच्या दरवाजा जवळ जाऊन आपल्या थाळीत जेवण घेत होते ..पॉट मध्ये चहा देखील घेतला त्यांनी ....मी बाजूच्या कैद्याला इशाऱ्याने काय प्रकार आहे असे विचारले तर उत्तर मिळाले ' आज से ' रोजा ' शुरू हो गया है ' ..त्या वर्षी दिवाळी नंतर रमजान महिना आला होता ..बहुतेक अधिक महिना होता त्यावर्षी ..म्हणून ' रोजे ' एरवीपेक्षा उशिरा सुरु झालेले ...बराकीतील मुस्लीम कैद्यांनी आपापल्या थाळीत जेवण घेवून ते कोपऱ्यात जावून एकत्र जेवण करू लागले ..जेल प्रशासना तर्फे प्रत्येक रमजान महिन्यात रोजे ठेवणाऱ्या कैद्यांना पहाटेची नमाज झाली की जेवण देण्याची सोय केली जात असे असे समजले ..मग दिवसभर हे कैदी काहीही खात नसत ..संपूर्ण उपास ...अगदी थुंकी सुद्धा गिळायची नाही ..कोणतीही व्यसने करायची नाहीत ..या काळात केवळ ' अल्ला ' चे स्मरण केले जाते ...असे पूर्वी कादर कडून समजले होते .. जेलमध्ये सुद्धा हा प्रकार असेल असे वाटले नव्हते ..यालाच आपल्या संविधानातील सहिष्णुता म्हणत असावेत ..सर्व धर्मियांच्या भावनांचा आदर करणे ..त्यांना त्याच्या धर्माचे पालन करण्यासाठी सहकार्य करणे ..किती सुंदर विचार होता या मागे ..धार्मिक स्वातंत्र्य ! देशातील प्रत्येक नागरिकाला तो मानत असलेल्या धर्माचे यथायोग्य पालन करण्याची मुभा ...इतर धर्मियांनी त्याच्या धर्मपालनात अडथळा उत्पन्न करू नये याची खबरदारी ..अर्थात सर्व धर्मियांनी जर संविधानातील या सहिष्णुतेचा अर्थ समजून घेतला तर ..धार्मिक दंगली होणारच नाहीत ..मग हिंदू श्रेष्ठ ..मुस्लीम श्रेष्ठ ..ख्रिस्चन श्रेष्ठ ...बौध श्रेष्ठ कि जैन श्रेष्ठ हा वाद नकोच ....प्रत्येकाने आपापल्या धर्माचे पालन करावे ...इतर धर्मांना दोष न देता ..त्यांच्या धर्माची ते दुखावले जातील अशी चिकित्सा न करता .. ' जगा आणि जगू द्या ' ! जेथे जेथे शोषण ..अंधश्रद्धा ..अन्याय असेल तेथे सर्व सहमतीने सुधारणा !

एव्हाना बराकीतल सगळे कैदी आवाजाने जागे झाले होते ..थंडीमुळे सगळे आपापल्या जागी कांबळे पांघरून बसलेले ..तितक्यात बाहेरून गाण्याचा आवाज कानी पडला ..सगळीकडे असलेल्या निरव शांततेत तो आवाज चांगलाच गहिरा वाटत होता ' किसी राह मे ..किसी मोडपर ..कही चल ना देना तू छोंडकर ..मेरे हमसफर ..मेरे हमसफर ' मुकेश आणि लता मंगेशकरने हे युगुलगीत ...आपल्या आवाजांनी शब्द अक्षरशः जिवंत केलेत गायकांनी ...बराकीच्या बाहेर व्हरांड्यात कोणीतरी कैदी हे गाणे म्हणत होता ..पहाटेच्या वेळी ..त्याचा करुण स्वर ..मनात सुरी फिरवत होता ..मी कान देवून गाणे ऐकू लागलो ....तसतसा अधिक हळवा होत गेलो ...आधी अनघा ..नंतर मानसी ..यांची तीव्र आठवण ...विरहाची टोकदार जाणीव ...कुठे असेल आता अनघा ..मानसी ..चित्रपटात जसे एखाद्या विरह गीताच्या वेळी नायक किवा नायीकेच्या डोळ्यासमोरून जशी त्यांच्या पहिल्या भेटीची ..प्रेमाची ..सहजीवनाची क्षणचित्रे सरकताना दाखवली जातात ..अगदी तसेच झाले माझे ..झरझर सारा भूतकाळ मनातून काटेरी आठवणी जागवत सरकत गेला ...मानसी बिचारी आता लहानग्या सुमितला कुशीत घेवून झोपली असेल ..रात्री खूप वेळ जागी राहिली असावी ..माझ्यामुळे तिच्यावर आलेली ही परिस्थिती कशी बरे स्वीकारली असावी तिने ? असे जीवाला चटका लावून एखाद्याचे जीवनातून निघून जाणे किती वेदनामय असते ..त्याच वेळी ...कोण जाणे ' चोरी चोरी ' या सिनेमातील ' रसिक बलमा .....हाये ..दिल क्यू लगाया तोसे ..दिल क्यू लगाया ' हे गाणे देखील आठवले ...मी कांबळाच्या आत तोंड लपवून ढसढसा रडू लागलो !

( बाकी पुढील भागात )

====================================================================

समलिंगी ? ? ? ( पर्व दुसरे -भाग १२५ वा )

मी जेलमधल्या वास्तव्यात किमान चारदा तरी रडलो होतो ..अगदी मनापासून ..स्वतच्या कर्माला दोष देत होतो ..जे काही घडले आहे त्याला केवळ माझे वागणेच जवाबदार आहे ही भावना पक्की झाली होती ...पूर्वी मी नेहमी माझ्यावर आलेली संकटे माझे दुखः ... माझे अपयश ...माझे होत असणारे नुकसान यांना आसपासचे लोक ...ओढवलेली परिस्थिती...माझे नशीब ..दैव ..यांना जवाबदार ठरवत होतो ..बहुधा प्रत्येक व्यसनी व्यक्ती असेच करत असतो ...आपले व्यसन ..त्या व्यसनामुळे आपले बिघडलेले विचार आणि वर्तन यांना दोष देण्याएवजी तो सगळा दोष इतरांच्या माथी मारतो ..कदाचित स्वतःच्या अहंकाराला सुखावण्यासाठी असे होत असावे किवा व्यसनाच्या समर्थनासाठी असे घडत असावे ...अनेक व्यसनी मित्र मला माहित आहेत जे व्यसन केला असताना झालेल्या अपघातात देखील स्वतःची चूक आहे असे मान्य करू इच्छित नसतात ..रस्ताच खराब आहे तो ..अचानक कुत्रे मध्ये आले ..समोरचा माणूस एकदम अंगावर आला ...वगैरे कारणे देतात ...व्यसन केल्यामुळे माझे रिफ्लेक्सेस कमी झाले असावेत हे काही मान्य करता येत नाही..किवा जर व्यसन न केलेल्या अवस्थेत अपघात झाला असला तर काल केलेल्या व्यसनामुळे माझा आत्मविश्वास कमी झाला असावा ..शारीरिक क्षमता वाहन चालवण्या इतपत योग्य नसावी हे तो काही केल्या काबुल करत नाही ....त्याचप्रमाणे व्यसनामुळे किवा व्यसनाची गुलामीची अवस्था आल्यानंतर प्रत्येकाने आपल्या मनात अनेक गाठी मारून ठेवलेल्या असतात ..या गाठी म्हणजे त्याच्यावर झालेला अन्याय ..इतरांनी केलेला अपमान ...नाकारण्यात आलेल्या संधी ..अपयश ...प्रेमभंग ..जवळच्या व्यक्तीचे त्रासदायक वर्तन ...अशा प्रकारच्या असतात ...प्रत्येकवेळी व्यसनाचे समर्थन म्हणून तो या गाठी वापरतो ...या गाठी सुटणे ..सोडवणे आवश्यक असते ...अन्यथा काही काळच्या व्यसनमुक्ती नंतर ...या मनातल्या गाठी किवा वैचारिक..भावनिक गुंते ..पुन्हा व्यसनाकडे नेतात ..काही अपवादात्मक घटना वगळता व्यसनाच्या गुलामीला ..वारंवार व्यसन सुरु होण्यास ..व्यसनामुळे झालेल्या नुकसानास ..केवळ मीच जवाबदार आहे तसेच पुन्हा व्यसन न करण्याची ..व्यसनमुक्तीची ...जवाबदारी देखील माझीच आहे ...ही जाणीव झाल्याखेरीज कायमची व्यसनमुक्ती अवघड होऊन बसते .

माझ्याबाबतीत देखील असेच घडत होते ..अगदी सुरवातीला केवळ मौज मस्ती ..कुतूहल म्हणून सुरु झालेले व्यसन नंतर प्रेमभंगाचे दुखः... या कारणाने सुरु राहिले ... अनघा जीवनात आल्यावर माझ्या मनाविरुद्ध असणारे मोठ्या भावाचे वर्तन ..भविष्यातील चिंता ...या कारणांनी व्यसन सुरूच राहिले ..नंतर अनघाला गमावण्याचे दुखः ...पुढे सुमारे तीन वर्षे चांगला व्यसनमुक्त राहिल्यानंतर ..एकदा व्यसन केल्यास काही हरकत नाही हा अहंकार ..त्यामुळे पुन्हा झालेली सुरवात ..मग त्यातच चारपाच वर्षे घालविल्यानंतर ..लग्न होऊन मानसी जीवनात आल्यानंतर ..तेच एखादे वेळी करण्यास काही हरकत नाही ही मूर्खपणाची भावना ...एकदा म्हणून करायला गेलो की त्यात पुन्हा अडकणे ..मग इतरांना ..परिस्थितीला ..नशिबाला दोष देत राहणे ...जेलमध्ये अतिशय प्रतिकूल वातावरणात मी असे परखड आत्मपरीक्षण करत होतो ...कायमच्या व्यसनमुक्तीसाठी हे परखड आत्मपरीक्षण नक्कीच मदत करू शकते ..जेलमध्ये माझे वास्तव्य वाढत चालले होते ..आधी पंधरा दिवस मिळालेली मँजिस्ट्रेट कस्टडी पंधरा दिवसांनी कोर्टात न्यायला पार्टी नाही म्हणून आणखी पंधरा दिवस लांबली ..पुन्हा पंधरा दिवसांनी पार्टी नाही याच कारणांनी अजून पंधरा दिवस लांबली ..म्हणजे मला आता जेलमध्ये येवून एक महिना उलटून गेला होता ...माझ्या सारखेच मँजिस्ट्रेट कस्टडी मिळालेले अनेक जण असेच होते ..ज्यांचा येथे राहण्याचा कालावधी काही ना काही कारणाने वाढला होता .. सराईत लोक म्हणत इथे खरी सजा असते ती फक्त लैंगिक इच्छेला ..बाकी सगळे मिळते पैसे असले की ..म्हणजे चांगले जेवण ..झोपण्याची उत्तम व्यवस्था ....भाई लोकांना तर दारू ..गांजा ..ब्राऊन शुगर सारखी व्यसनेही सहजगत्या उपलब्ध होतात ....मात्र जेलमध्ये लैंगिक इच्छापूर्ती होण्यासाठी स्त्री जोडीदार मिळणे मात्र अशक्य असते ..त्यासाठी आजारी पडायचे नाटक करून ..डॉक्टरला ..जेलरला पैसे खावू घालून ..बाहेरच्या दवाखान्यात जायचे ..तेथून मग हवे ते करायचे ..अशी पद्धत होती ...शिक्षा भोगत असलेले जुने कैदी ..हस्तमैथुन हा पर्याय वापरात .मात्र हस्तमैथुना बाबत अनेक प्रकारचे गैरसमज असल्याने काही रंगदार कैदी ...किवा वार्डन ..जेलमध्ये आलेल्या नाजूक प्रकृतीच्या ..घाबरट कैद्यांना ...बिडीकाडी..पोटभर जेवण ..इतर सुविधा उपलब्ध करून देवून त्या बदल्यात समलैंगिक संबंध ठेवत असत त्यांच्याशी ..माझ्या बराकीत असाच एक तरुण कैदी होता ..चोरीच्या गुन्ह्यात येथे अडकलेला..त्याला वार्डनने स्वतःजवळ झोपायला जागा दिली होती ....रात्री सगळे झोपल्यावर केव्हातरी वार्डन त्याच्या पांघरुणात शिरत असे .

त्या कैद्याच्या हावभावावरून तरी तो बायकी प्रवृत्तीचा वाटत नव्हता ..सर्वसाधारण पुरुषांप्रमाणेच त्याचे वागणे होते ..केवळ मिळणाऱ्या सवलतीपोटी तो वार्डनशी असे संबंध ठेवण्यास तयार झाला असावा असे दिसत होते ...पूर्वी मी डॉ . गौड यांचे सोबत ' एड्स प्रतिबंध ' कार्यात सामील असतांना ..समलिंगी संबंधाबाबत थोडीफार माहिती घेतली होती ..काही लोक हार्मोन्सच्या ( संप्रेरक) असंतुलनामुळे जन्मतः असे बायकी प्रवृत्तीचे असू शकतात ...किवा वरवर स्त्रिया दिसणाऱ्या देखील हार्मोन्सच्या असंतुलनामुळे पुरुषासारख्या रांगड्या असतात हे माहित होते ...इथे तसा प्रकार नव्हता ..केवळ लैंगिक उपासमार हे एकमेव कारण होते या समलैंगिक संबंधासाठी ...त्या कैद्याला केवळ स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी वार्डनशी असले संबंध ठेवावे लागत होते ...एकदा अशी गुदामैथुन करून घेण्याची सवय लागली की पुढे सर्वसामान्य लैंगिक संबंध ठेवणे त्या व्यक्तीसाठी अवघड होऊन बसते ..गुदमैथुन करून घेतल्याखेरीज त्याला लैंगिक उत्तेजना येत नाही असे मी ऐकून होतो ..म्हणजे त्या वार्डनने स्वतच्या लैंगिक उपासमारी वर शोधलेला पर्याय हा त्या तरुण कैद्याच्या जीवनाचे वाटोळे करणारा होता ...सिन्नरफाटयाला राहत असताना असे एकदोन जण मला माहित होते ..जे अश्या समलैंगिक संबंधांची चटक लागलेले होते ...बाकी सगळे काही सर्व साधारण असताना देखील केवळ लहानपणी त्यांना कोणीतरी लैंगिक उपासमारीवर उपाय म्हणून वापरून घेतले होते ..नंतर वयात आल्यानंतर ते याच प्रकारच्या संबंधात रस घेवू लागले होते ..बालकांचे लैंगिक शोषण ही एक मोठीच समस्या बनली आहे ..केवळ मुलीलाच नाही तर लहान मुलांनाही जपावे लागते हेच यावरून स्पष्ट होते ...बाराकीतल्या त्या तरुणाची पुढे दुसऱ्या बराकीतील वार्डनने आपल्या बराकीत बदली करून घेतली ..याच कारणासाठी ...चारपाच दिवसांनी त्या मुलाची पुन्हा ..नाविन बराकीत बदली झाली ..म्हणजे तो तरुण जणू याच कारणासाठी वापरला जात होता ..जगभरातील जेलमध्ये असे कितीतरी तरुण असतील ..जे शास्त्रीय दृष्ट्या पूर्णपुरूष आहेत ..मात्र केवळ नाईलाजाने त्यांना अश्या समलैंगिक संबंधाना सामोरे जावे लागत होते ..शिवाय येथे कंडोम वगैरेचा वापर होणे कठीणच असते ..त्यामुळे गुप्तरोग व एच .आय .व्ही ची बाधा होणे सहज शक्य असते .

( बाकी पुढील भागात )

गुरुवार, 26 दिसंबर 2013

चारीमुंड्या चीत !


चारीमुंड्या चीत !  ( पर्व दुसरे -भाग ११६ वा )


असे म्हणतात जो पर्यंत एखादा व्यसनी त्याच्या व्यसनासमोर ... स्वतच्या सर्व क्षमतांची ..शक्तींची ..हार झालीय हे मान्य करत नाही तो पर्यंत त्याचे व्यसन बंद होणे कठीण असते ..मी हारलो ..हे कबुल करून ती हार त्याला सतत मनात जपून ठेवावी लागते ..तेव्हा आपोआप व्यसनाचे मनातील आकर्षण कमी होण्यास मदत होते ..मला व्यसनाधीनते मुळे जेल मध्ये लागले होते ...तेथेही मी काही ना काही क्लृप्ती करून बाहेर पडण्याच्या बेतात होतो ..माझा प्लान जवळ जवळ यशस्वी झालाच होता ....अगदी शेवटच्या क्षणी ...माझ्या कुटुंबीयांनी कठोर भूमिका घेवून तो प्लान हाणून पडला होता ...अगदी मी मेलो तरी बेहत्तर असा त्यांनी घेतलेला पवित्रा ..माझ्यासाठी धक्कादायक होता ....मला प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारा होता ...आमच्याकडे उपचारांसाठी दाखल असलेल्या व्यसनी व्यक्तींच्या पालकांना मी नेहमी सांगत असतो कि जो पर्यंत तुम्ही त्याच्या व्यसनाधीनतेमुळे त्याचे आणि इतर कुटुंबियांचेही झालेले नुकसान परखडपणे त्याच्या समोर मांडत नाही ..तो पर्यंत तो प्रामाणिक पणे आत्मपरीक्षण करणे कठीण असते ....जो पर्यंत एखाद्या व्यसनी व्यक्तीला पालक घाबरतात ....तो पर्यंत तो त्रास देत राहतो ..एकदा का घरच्या मंडळीनी घाबरणे बंद केले ..की मगच व्यसनी व्यक्ती स्वतच्या वागण्यात बदल करण्याची शक्यता वाढते .. इतके नुकसान होऊनही ..माझे फारसे काही बिनसले नाही ..मी परत सगळे लवकरच ठीक करीन असा खोटा आत्मविश्वास प्रत्येक व्यसनीला वाटत असतो ..मी त्याला अपवाद नव्हतो ...म्हणूनच तर इतके नुकसान होऊनही पुन्हा पुन्हा मन व्यसनाकडे आकर्षित होत होते ....जेल मधून बाहेर पडायचे सगळे प्रयत्न फसल्यावर ..एकदम आत्महत्येचे विचार मनात येणे हा अजून एक मूर्खपणा होता ..त्याऐवजी माझ्यावर ही वेळ का आली ? याबाबत जर आत्मपरीक्षण केले असते तर अधिक योग्य झाले असते ...माझ्यावर पहारा करण्यासाठी हॉस्पिटल मध्ये असलेल्या शिपायांची देखील मी नाराजी ओढवून घेतली होतो ...ते आता अजिबात माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते ..म्हणूनच त्यांनी अतिशय निर्दयपणे मला 'इन्फेक्शन वार्ड ' मध्ये आणून टाकले होते ...

' इन्फेक्शन ' वार्ड मध्ये क्षयरोग ..धनुर्वात ..रँबीज ..अश्या प्रकारच्या आजाराचे रुग्ण ठेवलेले होते .. तेथील सगळ्या सिस्टर्स नेहमी तोंडाला रुमाल बांधून असत ...या वार्ड मध्ये खास जेल मधून उपचारांसाठी आलेल्या धोकादायक कैद्यासाठी एक गज असलेलली खोली होती ...एका वेळी दोन कैदी तेथे ठेवण्याची सोय केलेली ..बाहेरून ते गजांचे दार बंद राहत असे नेहमी ..आत अगदी छोट्याश्या जागेत संडास कम बाथरूम अशी जागा ..कोंदट असलेल्या त्या खोलीतील माझ्या बाजूच्या बेडवर असलेला कैदी .. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला ..म्हातारा ...अपघातात त्याने एक पाय गमावलेला..नंतर घरगुती भांडणातून दोन खून केले म्हणून जन्मठेपेची शिक्षा झालेली ..जेल मध्ये शिक्षा भोगत असताना क्षयरोगाची लागण झाली म्हणून त्याला येथे उपचारांसाठी आणले होते ..माझ्या आधीपासून तो या खोलीत होता ..अतिशय उग्र चेहरा ..तितकाच खरखरीत आवाज ...काळाभिन्न ..भरगोस झुबकेदार मिश्या ..असे त्याचे रूप ...मला शिपायांनी ज्या अवस्थेत स्ट्रेचर वरून आणले त्यावरून मी देखील कोणातरी खतरनाक कैदी आहे असा त्याचा समज झालेला .. .. खून ..हाफ मर्डर ..यापैकी कोणतातरी गुन्हा मी केला असावा असे त्याला वाटत होते ...सकाळ झाली होती ..रात्रपाळीच्या सिस्टर घरी जायला निघालेल्या ..तसेच वार्डात नातलगांची वर्दळ सुरु झालेली होती ..मी हतबलपणे एक पाय बेडीने पलंगाला अडकवलेल्या अवस्थेत आत्मपरीक्षण करत होतो ..स्वतच्या गुन्ह्यांचा आलेख तपासत होतो ....शेवटी एकाच उत्तर येत होते ..ते म्हणजे निसर्गाने सर्व काही चांगले देवूनही मी केवळ माझ्याच कर्तुत्वाने सगळे शून्य केले होते ...माझी कर्तव्ये ..जवाबदा-या समर्थपणे पार पाडण्यास मी नालायक ठरलो होतो ..एक चांगला मुलगा ..चांगला भावू ..चांगला पती ..चांगला पिता ... समाजातील एक सुजाण नागरिक बनू शकलो नव्हतो ...

बाहेर फटाक्यांचे आवाज ऐकू येत होते ..ऐन दिवाळीत मी अश्या अवस्थेत होतो ..बाहेर लोक दिवाळीच्या आनंदात असतील ..नवी खरेदी ..नवी स्वप्ने ..नवा उत्साह ..मी मात्र या वर्षी कुटुंबियांची देखील दिवाळी खराब केलेली होती ...लग्नानंतर मी सासरी दिवाळ सणाला गेलो होतो ते आठवले ..किती आनंदी दिसत होती मानसी ....हातात फुलबाजी घेवून ती फिरवताना ..तिच्या चेहऱ्यावर असलेली चमक मी डोळ्यात साठवून घेतली होती ..नवा शालू नेसून चाललेली तिची लगबग ..सासू ..सासरा ..मेहुणा यांचे अगत्य ...आता मानसी कुठे असेल या विचाराने काळजात खड्डा पडला ..बिचारी लहानग्या सुमितला घेवून एका कोपऱ्यात बसून असेल ..नवे कपडे ...गोडधोड ..सगळे तिला नकोसे झाले असेल ....मी व्यसनी होतो हे सांगूनही ....मझ्याशी लग्न करण्याचा तिने घेतलेला धाडसी निर्णय तिच्या अंगलट आला ...माझ्या सारखे बेभरवश्याचे ..कंगाल ..सौभाग्य ! आईची तब्येत आता कशी असेल ....मी समजायला लागलेल्या वयापासून म्हणजे सुमारे वयाच्या १३ व्या वर्षापासून आईला केवळ मनस्तापच दिला होता ....भांडणे ..मारामा-या ..खोड्या ..व्यसने .हेच केले होते ..प्रत्येक वेळी तिने वात्सल्याने ..मला पाठीशी घातले होते ...माझ्या चुकांवर पांघरून घालून मला वाचवण्याचा तिचा प्रयत्न असे ....मी मात्र सर्वांच्या प्रेमाचा केवळ गैरफायदा घेतला होता ..शेवटी माझ्यामुळे आईवर आत्महत्या करण्याची वेळ येवून ठेपली ....आता घरची दिवाळी कशी असेल या कल्पनेने पुन्हा मला रडण्याचा उमाळा आला ..कांबळे तोंडावर घेवून तो उमाळा दाबण्याचा प्रयत्न करत होतो ..तरी देखील हुंदके सुरूच राहिले ..सगळे शरीर हुंदक्यांनी हालत होते ..

( बाकी पुढील भागात )

=======================================================

पुन्हा जेल ! ( पर्व दुसरे -भाग ११७ वा )

माझे सगळी योजना फिस्कटल्यावर आता पांगळेपणाचे नाटक सुरु ठेवण्यात काही अर्थ नव्हता ....आपोआप बरा झालोय असे दाखवणेही जरा विचित्र वाटले असते सर्वाना..नेमके त्यावेळी सिव्हील हॉस्पिटल मधील एक्सरे मशीन बंद् पडले होते ...सुमारे चार दिवस लागतील ते दुरुस्त व्हायला असे समजले ..तो पर्यंत मला हॉस्पिटल मध्ये ठेवावे असा निर्णय झाला होता ....टर्की जरा कमी झालेली ....काहीतरी उपचार म्हणून मला सिस्टर पेन किलरच्या गोळ्या देत होत्या सकाळ संध्याकाळ .. टर्की मुळे माझे जेवण जवळ जवळ बंदच होते ..म्हणून दिवसातून दोन वेळा सिस्टर मला सलाईन लावत असत ...इन्फेक्शन वार्ड मध्ये मला शिपाई फक्त लघवी ..संडास ..जेवण यासाठी पायाची बेडी काढून काही काळ मोकळा सोडत असे ..मात्र खोलीचे गजांचे दार तो कुलुपबंद ठेवण्यास विसरत नसे ...बुडावर सरकून माझी पँट खराब झाली होती त्यामुळे ..मला त्यांनी वार्डात पेशंटला देण्यात येणाऱ्या सरकारी कपड्यातील एक पांढरा पोटऱ्या पर्यंत असणारा झगा घालायला दिला होता ...दाढी वाढलेली ..अंगावर तो पांढरा झगा ..या अवस्थेत मी कसा दिसत होतो देव जाणे ..एकदा मला सलाईन लावायला आलेली सिस्टर गमतीने म्हणाली ..तू हा पांढरा झगा आणि दाढी वाढलेल्या अवस्थेत एखाद्या चर्च मधील फादर सारखा दिसतो आहेस ... या वेषात माझ्या चेहऱ्यावर तिला विरक्तीचे भाव दिसले असावेत असे वाटले उगाच ..अर्थात ही विरक्ती पराभूत पणाच्या भावनेने आलेली होती ..सर्व काही असताना आलेली विरक्ती अध्यात्मिक असते तर ..सर्व काही गमावल्यावर आलेली विरक्ती हा नाईलाज असतो ...

पांगळेपणाचे नाटक सोडायचे म्हणून आधी मी हळू हळू उभे राहण्यास सुरवात केली ..नंतर आधाराने चालू लागलो ..तीन दिवसांनी मी व्यवस्थित चालू लागलो ..माझ्या खोलीतील माझा साथीदार ..फारसा माझ्याशी बोलत नसे ..बहुतेक वेळ तो झोपून राही .. त्याचा कोणीतरी नातलग त्याला एक बिडी बंडल आणून देत असे ..क्षयरोगामुळे त्याची तब्येत खूप खालावली होती ..जागा असला की सारखा खोकत राही ..मूड असला की मला आपणहून विडी देई ..एकदा रात्री ..खोकता खोकता त्याच्या तोंडातून विचित्र आवाज येवू लागले ..दम कोंडल्यासारखे ..थंडीचे दिवस ..त्यात क्षयरोगी ..खोकता खोकता तो एकदम निपचित झाला ..बाहरेच्या ट्युबलाईटच्या अंधुक उजेडात त्याचे डोळे अर्धवट उघडे आहेत असे मला दिसले ..मी त्याला दोन वेळा हाक मारली ..त्याचा खरखरीत आवाजातील प्रतिसाद ऐकू आला नाही ..मग मी बाहेर ड्युटीवर असलेल्या शिपायाला हाक मारली ..शिपायाने ..सिस्टरला बोलावून गजांचे दार उघडले ..खोलीच्या आतला मंद दिवा लावला ..मग समजले की तो बेशुध्द झालाय ..अगदी मंद श्वास सुरु होता ....हा खपणार लवकरच असे सिस्टर बडबडली ..त्याला ताबडतोब आपत्कालीन विभागात नेण्यात आले . तो गेल्यावर मी एकटाच होतो त्या खोलीत ...त्याला नेल्यावर त्याच्या गादीखाली हात खालून चाचपडले तर त्याचा अर्धवट संपलेला बिडी बंडल मिळाला ...मी पटकन तो काढून माझ्या गादीखाली लपवला ....मेल्या मढ्याच्या टाळूवरचे लोणी यालाच म्हणत असावेत बहुतेक ...

सहाव्या दिवशी निरोप मिळाला की एक्सरे मशीन सुरु झालेय ...मला हातात बेडी अडकवून शिपायांनी खुर्चीवर बसवून एक्सरे काढायला नेले ..मुळात काही झालेच नव्हते ..फक्त माझ्या पांगळेपणाच्या नाटकाला पूर्णविराम मिळण्याची शेवटची प्रक्रिया होती ..दुसर्या दिवशी रिपोर्ट नॉर्मल आहे ..काहीही इजा झालेली नाहीय पाठीच्या मणक्याला हे कळले ..मग पुन्हा माझी रवानगी जेल मध्ये झाली ..या वेळी मला दुसर्या सर्कल मध्ये ठेवण्यात आले ..जेमतेम आठ दिवस काढावे लागणार होते जेलमध्ये ..मला मिळालेल्या न्यायालयीन कस्टडी पैकी उरलेले ...टर्की संपली होती तरी अशक्तपणा मात्र जाणवत होता ..माझ्या आजारपणाच्या काळात जेलच्या हॉस्पिटल मध्ये माझे सरकारी सामान पडले होते ते पुन्हा घ्याला गेलो ...तर त्यातील काथ्या भरलेली उशी गायब झालेली होती ....कोणीतरी हंडी साठी जाळली असेल असे उत्तर मिळाले म्हणजे आता उशी शिवाय दिवस काढावे लागणार होते ..नव्या बराकमध्ये गेल्यावर तेथील वार्डनने मला कोणती केस असे विचारल्यावर मी ४९८ सांगितले ..त्याने क्षणाचाही विलंब न लावता ..मला बराकच्या संडासजवळ झोपण्यास जागा दिली ...अगदी कोपरा होता ..तेथे सारखा संडासचा दर्प येत असे ..मी त्याला जेव्हा विनंती केली की मध्यभागी जागा दे ..तेव्हा म्हणाला ' कौनसा बडा तीर मार के यहां आया है तू ? ..साले अपने बिबी को सताना मर्दानगी नही होती ' ..नंतर कळले की घरगुती हिंसाचाराच्या गुन्ह्यांना जेलमध्ये तुच्छ समजले जात होते ..अश्या कैद्यांना इतर कैदी चांगली वागणूक देत नसत ..त्यांच्या बाहेर चोऱ्या..दरोडे ...खून वगैरे ठीक होते ..मात्र स्वत:च्या कुटुंबियांना त्रास देवून घरी आतंक माजवणे म्हणजे लुक्खेपणा होता ...अश्या कैद्याची लायकी संडासजवळ झोपायची असते असे त्यांचे मत होते ...मला स्वतःबद्दल खूप वाईट वाटले ....

( बाकी पुढील भागात )

===============================================================


भिकारी ???? ( पर्व दुसरे -भाग ११८ वा )

मला दिलेल्या संडासजवळच्या जागेत रात्री सतरंजी टाकून पडून राहिलो ..उशी नसल्याने पायातील जुनाट स्लीपर्स डोक्याखाली घेवून झोपण्याचा प्रयत्न सुरु होता माझा ...खूप थंडी वाजत असल्याने सतरंजी खालची फरशी गारढोण झालेली ....तो गारवा थेट हाडात पोचत होता ..त्यात इतर कैद्यांची सारखी संडासला जाण्यासाठीची वर्दळ ..दर दहा पंधरा मिनिटांनी कोणी न कोणी माझ्या पायाजवळून संडासकडे जात होते ..चालताना चारपाच जणांचे पाय लागले माझ्या पायाला ..कदाचित एखादा मुद्दामही पाय लावून जात होता ...मग पाय पोटाशी घेवून पडून राहिलो ..माझ्या मनगटावरची जखम भरत आलेली होती ..तरीही थंडीमुळे जखम तडतडत होती ....रात्रभर जागाच होतो ...गिनती झाल्यावर मग चहाचे वेध लागले ..बंदी खुलल्या बरोबर चहाच्या लाईनीत जावून बसलो ..अर्धा तास थंडीत कुडकुडत चहाची वाट पाहिल्यावर कोमट चहा मिळाला ..आता मनाची तयारी केली होती .. अजून एक आठवडा काढावा लागणार आहे आपल्याला इथे ....चहा घेवून झाल्यावर अंगावर उन पडण्याची वाट पाहत बसलो बराकीच्या व्हरांड्यात ..सिव्हील हॉस्पिटलहून माझ्या खोलीतील मित्राचा मी काढून घेतलेला अर्धा बिडी बंडल बराच साथ देत होता ..अर्धी बिडी पिवून झाली की विझवून ठेवत होतो ..ती पुन्हा दुसऱ्या वेळी कामाला येई ..अंगावर उन आले तसे छान वाटले ..एक उबदार भावना सर्व शरीरात पसरली ...कोवळी उन्हे छान शेक देत होती ..मस्त डोळे मिटून उन खात बसून राहिलो ..तितक्यात कानावर भजनाचा आवाज ऐकू आला ..चक्क लता मंगेशकरांचा आवाज..' मोगरा फुलला ..मोगरा फुलला ...फुले वेचिता बहरू कळीयासी आला .." बहुतेक जेलच्या कार्यालयात भोंगे लावून अभंग लावले होते ...मग ...' पैल तो गे काऊ कोकताहे ..शकून गे माये सांगताहे ' सुमारे तासभर संत ज्ञानेश्वर ..संत तुकाराम ..संत एकनाथ वगैरेंचे अभंग लागले होते ...छान वेळ गेला ते ऐकण्यात ..एकाग्रतेने ते अभंग ऐकत मनातल्या मनात त्यांच्या शब्दांचा अर्थ शोधत बसलो ...लहानपणी रेडीओ वर ऐकायला मिळत असत हे अभंग ..नंतर वयात आल्यावर फिल्मी गाणी ..भावगीते ..विरहगीते यातच रस घेतला होता ....तुकारामांचा एक अभंग लागला ..' हाची नेम आता ..न फिरे माघारी ..बैसले शेजारी गोविंदाचे ' ..लता मंगेशकरांनी हे अभंग आपल्या सुरेल आवाजाने अमर केले आहेत .. न फिरे माघारी ऐकताना भरून आले मला ...संत तुकाराम ..विठ्ठलाच्या भक्तीत इतके लीन झालेत की जणू त्यांनी आता परत संसारात परतायचे नाही असा निश्चय स्वता:शी केलाय ...असा अर्थ होता गाण्याचा ..मी देखील तसाच निश्चय करायला हवा होता ..पुन्हा व्यसनांकडे न वळण्याचा ...

माझ्या सारखेच अनेक कैदी उन खात आजूबाजूला बसलेले होते .. काही सरकारी वेशात ..तर काही माझ्या सारख्या घरच्या कपड्यात ..बहुतेकांनी अंगावरचे शर्ट काढलेले होते .. ते त्या शर्टावर बारीक नजरेने झाडी करत होते ..मग काहीतरी सूक्ष्म सापडल्या सारखे ते बोटात पकडून नखांवर घेवून चिरडत होते ..बराच वेळ हा काय प्रकार असावा याचा विचार केला पण समजेना ..शेवटी शर्ट काढलेल्या एकाच्या अगदी जवळ जावून बसलो ..बारकाईने तो नेमके काय करतोय ते पाहू लागलो ..तरीही समजले नाही ..शेवटी तो कैदी माझ्याकडे पाहत म्हणाला ..साली जूवें ..ना जाने कहासे आ जाती है ..रातभर सोने नही देती .. सगळा प्रकार ध्यानात आला ..तो शर्टवरवरून पांढर-या रंगाच्या ऊवा शोधून काढून त्या नखावर घेवून मारत होता ....बहुतेक सगळ्यांचाच हा ऊवा मारायचा सामुदायिक कार्यक्रम सुरु होता ..जेलच्या बराकीत तीन चार दिवसांच्या वर कोणी मुक्काम केला की ..या पांढऱ्या रंगाच्या उवा आपोआप त्याच्या कपड्यात गोळा होता असत ..वर्षानुवर्षे पाणी न लागलेल्या जेलच्या कांबळात बहुधा या ऊवा तयार होत असाव्यात ...ते कांबळे पांघरले की त्या आपोआप अंगावरच्या कपड्यात शिरत असत .. जेथे जेथे कापडाची शिवण असेल तेथे त्या लपून बसत ...रात्री अंगभर चावत असत ..त्यामुळे खाज सुटत असे अंगाला ..मेंटल हॉस्पिटल मध्ये ढेकुण होते ..तर येथे पांढऱ्या ऊवा ...माझ्याशी बोलता बोलता त्या कैद्याने एक जू पकडली ...त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता ..पटकन त्याने ती नखावर घेतली आणि चिरडली ..मग समाधानाने पुन्हा त्याचा शोध सुरु झाला .. जू चिरडतांना मी त्याच्याकडे निरखून पाहत आहे हे लक्षात आल्यावर मला म्हणाला ' तीन चार दिनो के बाद तेरेको भी ये करना पडेगा ..' मला कसेसेच झाले ते ऐकून ..मी असा अंगावरचा टीशर्ट काढून उन्हात ऊवा मारत बसलोय ही कल्पनाही करवेना ..मात्र तसेच झाले ..नंतर दोन दिवसांनी मला देखील टीशर्ट काढून बसावे लागले उवा मारत ..आधी शर्ट मग पँट ..आणि दर दोन दिवसांनी ही सफाई करावी लागे .. उवा आपल्या कपड्यात येवू नयेत म्हणून वार्डन ..जेलमधले रंगदार कैदी ..बराकीत सगळे कैदी झोपतात ..त्यापासून सुमारे दहा फुट अंतर ठेवून स्वतची झोपायची जागा निवडतात ..इतर कैद्यांपासून दूर असा हा कंपू असतो ..त्यांचे कांबळे वेगळे असते ..तसेच ते शक्यतो इतर कैद्यांच्या कांबळांच्या संपर्कात येत नाहीत ....उलट कोणी कैदी त्यांच्या जवळ फिरकला तर त्याला मार देतात ..मला बहुतेक पहिल्या दिवशी याच कारणावरून मारहाण झाली असावी ...

सकाळी साडेसहाला पहिला चहा ..साडेदहा वाजता जेवण ..त्यात तीन जाड चपात्या आणि एखादी उकडलेली पाणीदार भाजी .. तूर ..मुग ..हरबरा..या डाळींचे वरण..असे जेवण मिळे..सांयकाळी जेवणात एक मुद भात.. दोन चपात्या ..पाणीदार भाजी ..वरण ...असे जेवण असे ...सुरवातीच्या दोन दिवसानंतर मला कडाडून भूक लागू लागली ...त्यामुळे मला ते जेवण पुरेनासे झाले ....मेंटल हॉस्पिटल मध्ये असताना जेवणाबद्दल असलेली माझी सगळी नाटके संपली होती ..चव कशीही असो ..रंग कसाही असो ..आवड निवड न ठेवता खायचे हे शिकलोच होतो ..त्यामुळे मला चवीची काहीही समस्या येत नव्हती ..फक्त जेवण पुरत नसे इथे...सगळ्यांना जेवण वाटून झाल्यवर वार्डन उरलेल्या किरकोळ चपात्या कैद्यांना वाटत असे त्यात नंबर लागावा म्हणून आशाळभूत पणे वार्डनच्या हालचालींकडे लक्ष ठेवावे लागे ..जेवण वाटून झाले की तो उरलेल्या चपात्या हातात घेवून ओरडे '..चलो ..रोटी ..' वार्डन असे ओरडला की माझ्या सारखे अनेक जण वार्डनकडे हात पसरत असत ..दयनीय चेहरा करून त्याचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असत ..त्यात धक्काबुक्की होई ..मग वार्डन मनाला येईल त्या कैद्याला एक एक चपाती देत असे ..कधी कधी हवेत आपल्या दिशेने फेकलेली चपाती मध्ये दुसराच कोणीतरी हात घालून बळकावत असे ....आपण भिकारी आहोत असे वाटे ..थोडे अपमानास्पद वाटे ..मग विचार केला ..जगात सगळेच तर भिकारी आहेत ..फक्त भिकेचे प्रकार वेगवेगळे ..कोणी नोकरीची भिक मागतोय..कोणी पैश्यांची ..कोणी मतांची ..कोणी सत्तेची ..कोणी प्रेमाची ..आणी विरक्ती आली की मुक्तीची ! 

( बाकी पुढील भागात )

===============================================================

भेटी लागी जीवा ...... ! ( पर्व दुसरे -भाग ११९ वा )

दोन तीन दिवसात मी जेलचा सराईत रहिवासी असल्यासारखा वागू लागलो ....रोज सकाळी सुमारे दोन तास मोठ्या आवाजात अभंग लागत असत ..ते ऐकून त्या अभंगांच्या शब्दांचा नेमका अर्थ मनातल्या मनात शोधणे ..हा एक चांगला विरंगुळा होता ....तो अभंग लिहिण्यामागे असलेली संतांची भूमिका समजून घेण्यास मदत मिळे ..सर्व संतांचे अभंग ऐकल्यावर एक गोष्ट मात्र लक्षात येत होती ..की या सर्वांची प्रत्यक्ष न पाहिलेल्या परमेश्वरावर अतूट अशी श्रद्धा होती ...त्या शक्तीला भेटण्यासाठी ...तिला अनुभवण्यासाठी ....त्यांनी सारी शक्ती पणाला लावून भक्ती केली होती ..हा भवसागर तारून नेण्यास त्याची सोबत असली की सगळी दुखः ..वेदना ..सहनीय होतात ..तसेच तोच यातून मुक्ती देऊ शकतो असा बहुतेक अभंगांचा अर्थ होता ...काही अभंगात तर त्याच्या भेटी साठी संत मंडळी इतकी व्याकूळ झालेली आढळली की त्यांनी शब्दबद्ध केलेल्या अभंगात लता मंगेशकरांनी आर्तता ओतून तो अभंग व्याकुळतेच्या सर्वोच्च बिंदूवर नेवून ठेवला आहे ..भेटी लागी जीवा ..लागलीसे आस ..पाहे रात्रींदिवस वाट तुझी ...तसेच ..अगा करुणा करा ...करीतसे धावा ...या मज सोडवा लवकरी करुणाकरा .....अगदी मग्न होऊन मी गाणी ऐकत असे ...पुरोगामी विचारसरणी नुसार परमेश्वर वगैरे सगळे झुठ आहे अशी माझी मनोधारणा होती .. तरीही हे अभंग ऐकताना मात्र मी पुन्हा पुन्हा स्वतःशीच वाद घालत बसे ...वाटे की आपण परमेश्वरावर श्रद्धा ठेवली नाही म्हणून तर कदाचित आपल्या जीवनात इतकी वादळे आली नसतील ? पण मग श्रद्धा ठेवावी तरी कशी ? पुन्हा लहानपणी पडणारे प्रश्न मनात घोंगावत असत ..परमेश्वर आहे तर मग विविध भेदभाव का ? दारिद्र्य ..अन्याय ..अपघात ..आजार ...हे सगळे निर्माण करून त्याने काय साधले ? सर्वाना हवे तसे सुख का मिळत नाही ..सुख म्हणजे नक्की काय ? मुक्तीची नेमकी कल्पना काय असावी ? जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्ती ..संसारातून मुक्ती ..विकारातून मुक्ती ..की दुखा:तून मुक्ती ? उत्तराच्या जवळपास पोचता येत नव्हते ...माझी बुद्धी तोकडी पडत होती ....पुढे कधीतरी नक्की हा शोध सुरु ठेवायचा असे मनात पक्के बसले होते ...भोळी भाबडी माणसे फारसा विचार न करता पुराणांनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात....त्याचा लबाड प्रवृत्तीची माणसे गैरफायदा घेतात ..अनेक बुद्धिमान माणसे विश्वास ठेवताना सावध राहतात ....परमेश्वर आहेही आणि नाहीही या गोंधळात अडकतात ...ठाम मताची आणि फक्त स्वताच्या बुद्धीवर विश्वास असलेली माणसे या कल्पनेला विरोध करतात ..शास्त्रीय दृष्टीकोन बाळगणारी माणसे ..षडरिपूने ग्रस्त माणसांनी ...इतर दुबळ्या ..अशक्त ..असहाय जीवांना लुटू नये ..म्हणून पाप पुण्याची ..परमेश्वराची कल्पना मांडली गेली आहे असे सांगतात ..एकंदरीत काय तर सगळ्यांचे मूळ एका जीवाने आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्या जीवांना त्रास देवू नये हे नक्की !

माझ्या सर्व त्रासांचे मूळ हेच होते बहुतेक ..मी अतिशय स्वार्थी मनोवृत्तीचा होतो ..लहानपणापासून मला हवे तसे कसे घडेल याच विवंचनेत असायचो ...खाण्याचे पदार्थ ..खेळणी ..इतर माणसांकडून हवे असणारे प्रेम ..मान सन्मान ..यश ..या सगळ्या गोष्टी मला माझ्या मनाप्रमाणे आणि माझ्या मार्गाने मिळाल्या पाहिजेत असा माझा अट्टाहास असे ..त्याच नादात मी मला जे आवडेल ते करत गेलो ..कोणतेही नियम पाळले नाहीत ..कोणतीही बंधने घालून घेतली नाहीत ..वर ' आपुन अपने मर्जी के मलिक है ' हा अहंकार बाळगून राहिलो .. आईवडील ..भावंडे ...प्रेयसी ...पत्नी ..नातलग कोणाच्याच भावनांची पर्वा केली नाही ..हु केअर्स ..या अविर्भावात जगलो ..बंडखोरी म्हणून मुद्दाम वेगळ्या गोष्टी केल्या ..समाजात अमान्य असलेल्या गोष्टी करण्यात रस घेतला ...आणि जेव्हा जेव्हा मनाविरुद्ध घडले ...मी असहाय झालो ...तेव्हा नशेचा सहारा घेतला ..स्वतचे अपयश ..निराशा ..वैफल्य ..मनाचा कमकुवतपणा ..सगळे पचवणे जड होत गेले तस तसा व्यसनात अधिक अधिक अडकत गेलो ..जगात सर्वांच्याच मनाविरुद्ध काही ना काही घडत असते ..प्रत्येकाला दुखः भोगावे लागते ...कोणालाही हवे तसे सुख हव्या त्या पद्धतीने कधीच मिळत नाही म्हणून तर समर्थांनी म्हंटले आहे ' जगी सर्व सुखी असा कोण आहे ' मी मात्र फक्त माझ्या आणि माझ्याच सुखाचा विचार करताना इतरांची दुखः नजरेआड केली ....एकीकडे मनात सतत कुरतडत असणारी.. स्वतच्या वर्तना बद्दलची खंत ..आणि दुसरीकडे सतत सुख मिळविण्याची धडपड या कात्रीत सापडून ...पुन्हा पुन्हा व्यसने करत गेलो ...स्वतच्या चुकांचे समर्थन करत इतरांच्या चुका शोधल्या ...कधी प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण केले नाही .

जेल मधले वास्तव्य मला आत्मपरीक्षण करण्यास प्रेरित करत होते ...कारण इथे माझ्या मनाप्रमाणे काहीच होत नव्हते ..त्रागा करून ..बंडखोरी करूनही.. काही फायदा होणार नव्हता ...चांगलाच कचाट्यात सापडलो होतो ..कदाचित त्यामुळेच हतबल होऊन स्वतःचे प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करत होतो ..सायंकाळी बंदी झाली की वेळ घालवण्यासाठी कैदी गाणी वगैरे म्हणत असत ..मी त्यांच्यात सामील झालो ...इतके व्यसने करूनही माझा आवाज अजूनही चांगला राहिला होता ..बराकमध्ये लवकरच मी गायक म्हणून प्रसिद्ध झालो ..मग कैदी मला गाण्यांच्या फर्माईशी करत असत ..येथे कव्वाल्या जास्त आवडत कैद्यांना ..तसेच विरहगीताना देखील पसंती होती ....' चिट्ठी आयी है ..आई है चिट्ठी आयी है ..या गाण्याची रोज फर्माईश होई ..त्या बदल्यात ज्या कैद्यांकडे भरपूर बिड्या असत ते मला बिड्या देत ....येथे धार्मिक गाणी देखील आवडत सर्वाना ..त्यात ' अजमेर जाना जरूर ख्वाजा ..अजमेर कितनी दूर ' ' सुख के सब साथी ..दुख मे ना कोय ...' शिर्डी वाले साईबाबा आया है तेरे दरपे सवाली..' वगैरे गाणी असत ...जेवणाची थाळी घेवून त्यावर ठेका धरून किवा हाताने टाळ्या वाजवत ठेका धरला जाई ..सायंकाळी तीनचार तास असे मजेत जात असत ..,आता थंडीलाही सरावलो होतो ..पाय पोटाशी घेवून का होईना झोप लागत होती ...तीन चार दिवसांनी वार्डनने संडासजवळची जागाही मला बदलून दिली ....गाण्याच्या कलेमुळे मला जेलमध्ये चांगल्या प्रकारे स्थिरावण्यास मदत झाली . 

( बाकी पुढील भागात )

=================================================================

रोटी ..हंडी ..!  ( पर्व दुसरे -भाग १२० वा )

मला दिलेल्या मँजिस्ट्रेट कस्टडीचा कालावधी संपत आला .... फक्त दोन दिवस बाकी होते माझ्या सुटकेला ...आता शरीर पूर्ण नॉर्मल झाले होते ..त्यामुळे भुकेचे प्रमाण वाढतच चालले होते ..व्यसनी व्यक्ती व्यसनाच्या काळात ... भरपूर ..पोटभर असे जेवत नाहीत ..कारण आधीच नशेने पोट भरलेले असते ..एकदा शरीरातून व्यसनाचे विष बाहेर पडले की शारीरिक त्रास कमी होऊन ....पचनक्रिया सुरळीत होते ..जास्त प्रमाणात भूक लागू लागते ..इतकेच नाही तर पूर्वी खाल्लेले खाण्याचे एक से एक रुचकर ..स्वादिष्ट पदार्थ आठवू लागतात ...वेगवेगळे पदार्थ खावेसे वाटतात ..माझेही तसेच होत होते ..जेवणाच्या वेळी लोणचे ..चटणी .. कोशिंबीर यांची आठवण होई ..तर इतर वेळी ..जेवणात छान मसालेदार भाज्या असाव्यात ..गरम गरम मउसुत अशी घडीची चपाती ..टोमँटो घातलेले वरण ..वगैरे गोष्टी आठवत ..मध्येच आईच्या हातच्या निरनिराळ्या पदार्थांची आठवण होऊन मन व्यथित होई ....घरी आई आग्रह करून करून वाढे ते आठवे ..इथे तर पोटभर जेवण मिळायची मारामार होती . काही कैदी भिशीत ( जेलचे स्वैपाक घर ) मदत करायला जात असत ..ते तेथून येताना सोबत लपवून चपात्या तसेच मीठ ..तिखट ..घेवून येत ..असे कैदी बराकीतील मित्रांना लपवून आणलेल्या चपात्या देत ..एक असाही प्रकार पाहायला मिळाला की जे रंगदार ..म्हणजे दादागिरी करणारे कैदी आहेत ते ..वार्डनशी ..जेलच्या सरकारी वर्दीतील शिपायाशी संधान बांधून असत ..अश्या कैद्यांना शिपाई जास्त चपात्या देई ..इतक्या जास्त की खाता खाववणार नाहीत ..प्रत्येक बराकीत असे तीनचार रंगदार कैदी असत ..ते वार्डन जवळ इतर कैद्यांपासून अंतर ठेवून झोपत असत ..इथे जरी पैसे जवळ बाळगायला परवानगी नसली तरी ..अनेक कैद्यांजवळ लपवलेले पैसे होते ..त्या पैश्यांच्या जोरावर सरकारी यंत्रणा वाकवता येत होती ..

' हंडी ' नावाचा एक प्रकार समजला .. रंगदार कैदी वार्डनशी अथवा शिपाई ज्यांना जेलमध्ये ' बाबा ' असे म्हणत ..यांच्याशी संधान बांधून असत .. ..असे कैदी ..जेलमध्ये मिळणारे जेवण जास्त रुचकर व चविष्ट नसते म्हणून त्या भाजीवर व वरणावर वेगळी प्रक्रिया करून ..ते पुन्हा नव्याने फोडणी देवून खात असत ...अशी फोडणी देण्यासाठी चुलीची गरज लागे ..बराकीत विटेचे छोटे तुकडे लपवलेले असत ..ही मंडळी सायंकाळी पाच वाजता मिळणारे जेवण घेवून ठेवत ..रात्री सात आठच्या सुमारास लपवून ठेवलेले विटेचे तुकडे काढून त्याची मांडणी करून चूल पेटवली जाई ..जेलच्या अल्युमिनियमची थाळी वाकवून.. त्याचे खोलगट आकाराचे भांडे फोडणी देण्यासाठी तयार केलेले असे ..जळण म्हणून बंदी नसताना बाहेरून गोळ्या केलेल्या वाळक्या काड्या ..कधी कधी नव्या कैद्यांचे चोरलेले कांबळे ..चादर ..उशीमधला काथ्या.. अशा वस्तू वापरल्या जात ..म्हणूनच मला पहिल्या दिवशी कांबळ.. सतरंजी..उशी देताना शिपायाने बजावले होते ..या वस्तू जपून ठेव पुन्हा मिळणार नाहीत ..म्हणजे माझी चोरी गेलेली उशी अश्या हंडीत जळाली होती तर ...चूल पेटली की ...घेवून ठेवलेली भाजी ..वरण यांना थोडे तेल ...तिखट ..मसाले घालून वेगळी फोडणी दिली जाई..मग ते लोक जेवण करत असत ..बाकीचे कैदी अशी हंडी पेटली की ..मंगल कार्यालयाच्या बाहेर जसे भिकारी ..त्यांची दयनीय पोरे समारंभाला आलेल्या लोकांकडे ..जेवणावळीकडे असूयेने ..आशाळभूतपणे पाहतात तसे पाहत असत .. ' हंडी ' हा प्रकार म्हणजे जेलमधील जेवणाची ..चहाची .... एक प्रकारची चैन होती ...वार्डनकडे चहाची भुकटी आणि साखर असे ..हंडी पेटवून त्यावर अधून मधून चहा देखील बनवला जाई ..मोजक्या चार पाच लोकांसाठी ..या हंडीत शक्यतो ठरलेले ..रंगदार ..पैसेवाले सदस्य असत ..त्यांचे मदतनीस म्हणून एक दोन किरकोळ लोचट कैदी असत ...मदतनीस कैदी जळण गोळा करून ठेवणे ...नवीन कैद्यांची कांबळे ..उश्या ..वैगरे चोरून हंडीसाठी जमवणे तसेच रंगदार कैद्यांची खरकटी भांडी धुणे ..त्यांचे कपडे धुणे ..रात्री त्यांची मालिश करणे वगैरे कामे करत असत ..त्या बदल्यात त्यांना बिड्या ..हंडीत बनवलेला पदार्थ ..चहा थोडासा मिळे ..हे मदतनीस कैदी देखील आपल्या धन्याच्या जोरावर नवीन कैद्यांवर दादागिरी करत असत ..

एकदा सकाळी मी उन खाण्यासाठी म्हणून बराकीच्या मागील बाजूस जावून बसलो होतो ..आसपास आठदहा कैदी बसले होते इकडे तिकडे ..मला समोर सतरंजीवर सुमारे तीस चाळीस चपात्या मांडून ठेवलेल्या दिसल्या ..उन्हाळ्यात जसे पापड वगैरे करून वाळवायला ठेवतात ..तशा त्या चपात्या पसरून ठेवलेल्या होत्या ..हा काय प्रकार असेल बरे ? इथे बाकी कैद्यांना पोटभर चपात्या मिळण्याची मारामार इतक्या चपात्या अशा वाळवत ठेवलेल्या ? ..मी बराच वेळ विचार करत बसलो होतो ..त्या चपात्यांच्या जवळपास कोणी नव्हते ...आसपास बसलेले कैदी देखील त्या चपात्यांकडे फिरकत नव्हते ..शेवटी यातील एकदोन चपात्या आपण उचलून घ्याव्यात या हेतूने जवळ गेलो ..तर त्या चपात्या जरा बुरसटलेल्या वाटल्या ..तरीही मनाचा हिय्या करून खाली वाकून दोन चपात्या उचलल्या ..मी चपात्या घेवून वळणार तोच ..एका बराकीच्या खिडकीतून ..' रुक.. रुक ..साले ..अजून दोन शिव्या ऐकू आल्या ..दोनच मिनिटात एक किरकोळ वाटणारा कैदी माझ्या अंगावर धावून आला ..शिव्या ऐकून माझी सटकली होतीच ...तो अंगावर येत आहे पाहून मी देखील त्याच्यावर हल्ला केला ..दोघेही खाली जमिनीवर पडलो ...किरकोळ मारामारी जुंपली ..इतर कैद्यांनी आम्हाला सोडवले ..मग कळले की त्या चपात्या भिशीतून मुद्दाम जास्त प्रमाणात आणल्या गेल्या होत्या..आमच्या समोरच्या बराकीत असलेल्या वार्डन व रंगदार कैद्यांच्या मालकीच्या होत्या त्या चपात्या ..त्या चपात्या वाळवून ..एकदम कडक झाल्या की हंडीत जळणासाठी वापरल्या जाणार होत्या ..जळणासाठी चपात्या ? माझे डोके सुन्न झाले ...देशात जशी मुठभर लोकांकडे अमाप संपत्ती आहे ..ती संपत्ती बँकेत ..दागिन्यांच्या रुपात ...पडून आहे ..जी केवळ मौजमस्ती ..चैन ..करण्यासाठी वापरली जाते ..तसेच होते हे ..त्याच वेळी बहुसंख्य लोक दोन वेळच्या जेवणासाठी महाग...

( बाकी पुढील भागात )

रविवार, 22 दिसंबर 2013

कैदी नंबर ....!



कैदी नंबर ....! ( पर्व दुसरे -भाग १११ )


सेन्ट्रल जेल समोर ऑटो थांबला ..जेलच्या त्या मोठ्या दरवाजासमोर आम्ही उभे होतो ..सायंकाळचे पाच वाजत आलेले होते ....माझ्या सोबतच्या एका पोलिसाने दरवाजा जवळ जावून त्याच्या हातातील कागदपत्रे तेथील पहारेकऱ्याला दाखवली ..त्याच्या हाती सुपूर्द केली ..म्हणजे आता माझे हस्तांतर होत होते ..महाराष्ट्र पोलिसांकडून जेलच्या पोलिसांकडे ..मग मला त्या गेटच्या आत नेण्यात आले ...बाहेरचे जग पाठीमागे पडले ...आत हत्यारबंद शिपाई होते ...एक छोटेसे टेबल मांडून त्यापाशी एक वयस्कर व्यक्ती बसलेली ...माझी कागदपत्रे त्यांनी व्यवस्थित पहिली ..मग ' ४९८ काय रे ' ...असे म्हणत माझ्याकडे उपहासाने पहिले ..म्हणाला ' साल्या तुझ्या .....दम असेल तर ....बाहेर दाखव तुझी मस्ती ... मोठ्या गुंडांना दे त्रास ..घरच्या लक्ष्मीला काय सतावतोस ? ' मी निमुटपणे खाली मान घालून त्याच्या शिव्या ऐकत राहिलो ....डोळ्यात पाणी तरळले ..ते पाहून परत ओरडला माझ्यावर ' ही रडण्याची नाटकं कोणाला दाखवतोस ? घरची बाई रडली तेव्हा आली का रे भडव्या तुला तिची दया ' त्याला काही उत्तर देणे म्हणजे मार खाणे हे मी उमगलो ..गुपचूप तसाच उभा राहिलो ..मग त्याने माझी झडती घेतली ..खिश्यात असलेल्या चारपाच बिड्या माचीस काढून त्याच्या टेबलावर ठेवली ..तब्येत बरीच खालावलेली असल्याने सैल होत असलेल्या पँटला मी पट्टा लावला होता ..तो पट्टा काढून घेतला त्याने ..पट्टा काढताच पँट कमरेखाली घसरू लागली ..ते पाहून म्हणाला ' हालत बघ काय झालीय तुझी ' स्वतःशीच हसला ..मी केविलवाणा चेहरा करून त्याला पट्टा राहू द्या माझ्याकडेच अशी विनंती केल्यावर ..त्याने मला पट्टा परत केला ..मी बिड्या देखील मागुन घेतल्या ....माचीस मात्र त्याने दिली नाही ...त्याच्या जवळील रजिस्टरवर माझ्या नावाची नोंद केली .. तेथून एकाने मला आत नेले ...आत खूप विस्तीर्ण परिसर गेटच्या आतल्या बाजूने ..उंच भिंताला लागून तीन चार खोल्या होत्या ..त्यातील एका खोलीत मला नेले गेले ..तेथे एकाने माझ्या हातात एक अल्युमिनियमची खोलगट थाळी ..एक तसाच अल्युमिनियमचा धरायला दांडी असलेला मग दिला...बाजूला व्यवस्थित रचून ठेवलेल्या सतरंज्या आणि कांबळी यांच्या ठीग होता ..त्यातून एक सतरंजी ..एक जाडसर कांबळ दिले ...त्या सगळ्या वस्तू हातात धरताना माझी तारांबळ होत होती ..तेव्हा ' गांडो ..असे नाही नीट धर ' म्हणत एकाने ती साधारण दोन फुट रुंद साडेपाच फुट लांब सतरंजी खाली मला जमिनीवर पसरायला लावली .. त्यावर ते कांबळे नीट पसरून ठेवायला लावले ..एक काथ्या भरलेली टोचणारी उशी माझ्या हाती देवून ..त्यावर ठेवायला लावली .. ती गुंडाळी करून घ्यायला सांगितले ..म्हणजे बेडींग करतात तसे .. गुंडाळी माझ्या काखेत धरायला लावली ..त्याच हातात थाळी पॉट कसा धरायचा ते शिकवले ...म्हणाला '' या वस्तू सांभाळून ठेवायच्या ..हरवल्या तर परत मिळणार नाहीत ' मी होकारार्थी मान हलवली तेथून आमची वरात निघाली पुढे ....

एका ठिकाणी मध्यम उंचीची भिंत असलेला अजून एक दरवाजा लागला ..त्यावर सर्कल नंबर १ असे लिहिले होते ..दरवाजा अर्धवट उघडाच होता ..त्यातून आम्ही आत शिरलो ..आत समोर मोकळी जागा ..आणि बाजूने दोन मोठ्या बैठ्या इमारती ...त्याला बँरक ( बराक ) म्हणता हे नंतर समजले ..त्यातील एका बराक मध्ये लोखंडी जाड गजांच्या बंद दाराजवळ जावून त्याने हातातील दांड्याने त्या दारावर वाजवले ..आतून एक कैद्याचा परंतु जरा वेगळा वाटणारा ड्रेस घातलेल्या एका माणसाने दाराला आतून लावलेली कडी काढली ..मला आत घेतले ..आत मध्ये सुमारे पन्नास साठ सध्या वेशातील कैदी भिंतीला उकिडवे टेकून बसलेले .. दार उघडणाऱ्याने ( त्यांना वार्डन म्हणतात हे नंतर समजले ) मला इशारा करून एका भिंतीपाशी त्या कैद्यांसारखेचे उकिडवा बसायला सांगितले ..मी निमुटपणे बसून राहिलो ..माझी बँरक मध्ये रवानगी झाल्यावर माझी जेल प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाली असावी ..कारण दार परत बंद झाले ..यावेळी ते दार मला घेवून येणाऱ्या शिपायाने बाहेरून कुलुपबंद केले होते ..बहुतेक कैदी माझ्या सारखेच नवखे असावेत असे वाटले ..कारण ते सारे अगदी केविलवाणे चेहेरे करून बसलेले ..मला जाणवले की मेंटल हॉस्पिटल मध्ये नवख्या पेशंटना सर्वात आधी जसे आँबझर्व्हेशन वार्ड मध्ये ठेवतात तसे हे होते ..नंतर दोन तीन दिवसांनी मला दुस-या ठिकाणी हलवले जाईल ..आता सगळ्या घडल्या घटनांचा विचार करत बसलो ..सगळे काही अनपेक्षित झाले होते ..काय घडतेय याचा नीट विचार करेपर्यंत मी जेलमध्ये पोचलो होतो ..घरचे लोक अशी भूमिका घेतील हे कधी स्वप्नात देखील वाटले नव्हते मला ..अर्थात त्यांच्या नाकापर्यंत पाणी आल्यामुळेच त्यांनी हे केले असावे यात शंकाच नव्हती ..खाजगी दवाखाना ..मेंटल हॉस्पिटल ..व्यसनमुक्ती केंद्र ..असे सगळे प्रयत्न माझ्या सुधारणेसाठी करून झाल्यावर देखील मी पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका करत होतो ..दिवसेंदिवस माझे नैतिक अधःपतन वाढतच चालले होते ..पोलिसांची मदत घेणे हा एकमात्र पर्याय उरला होता त्यांच्याकडे ..चूक माझीच आहे हे मनाला पटत होते ..पण ते पचवता येत नव्हते ..मला एकदा तरी त्यांनी सावध करायला हवे होते ..असे उगाच वाटत राहिले ..

थंडीचे दिवस असल्याने बाहेर लवकर अंधारले होते ..बराकीच्या पाच फुट उंच भिंतीच्या वरच्या बाजूला लावलेल्या गजातून थंड वाऱ्याचे झोत आत येत होते..आतले बहुतेक कैदी आता आपापला बिछाना पसरून त्यावर कांबळे पांघरून बसलेले ..मी देखील माझे बेडींग ( बिस्तर ) उघडले ..सतरंजी भिंतीला टेकून पसरली ..कांबळे पांघरून भिंतीला टेकून बसून राहिलो ..बराकीच्या एका मोठ्या भागात सगळे कैदी ..तर साधारण पाच फुट अंतर सोडून उरलेल्या भागात विशेष वेषातील दोन वार्डन आणि त्यांच्या सोबत इतर चार जण बसलेले होते ..जरा वेळाने एका वार्डनने हातावर काहीतरी घेवून ते जरा निवडल्यासारखे केले ..मग चिलीम काढली ..माझे डोळे चमकले ..बहुतेक गांजा ओढणार होते ते लोक ..तसेच झाले ..चिलीम भरून पेटवली गेली ..दम मारणे सुरु झाले ..गांजाच्या वास पसरला सगळीकडे ....मला टर्की सुरु झालेलीच होती ..वाटले आपणही यांच्याकडे एक दम मागवा गांजाचा ..हळूच उठून मी त्यांच्याजवळ जावू लागताच त्यांच्यातील एक जण उठला ..माझ्याजवळ आला माझ्या एक मुस्कटात लावली ..' माद..... खबरदार आपल्या जागेवरून उठलास तर .' त्याने मला खास शिव्या हासडल्या ..आई वरून शिवी ऐकून माझे टाळके सटकले ..मी त्याला भिडलो ..तेवढ्यात त्याचे अजून साथीदार पुढे आले ते सगळे मला भिडले ...लाथाबुक्यांनी तुडवू लागले मला ..शेवटी माझा प्रतिकार संपला ..तसाच निपचित पडून राहिलो ..माझी कीव आल्यावर त्यांनी मला सोडले ..' फिर हमारे पास आया तो और मार खायेगा ' अशी धमकी देवून पुन्हा त्यांच्या जागेवर जावून गांजा ओढत बसले ..अपमानित झालो होतो खूप ..उठून सरकत पुन्हा माझ्या जागेवर गेलो ..भिंतीला टेकून बसलो ..

( बाकी पुढील भागात )

================================================================

पांगळा ? ? ?  ( पर्व दुसरे -भाग ११२ वा )

रात्रभर तसाच भिंतीला टेकून बसून राहिलो ..थंडी होती म्हणून कांबळे गुंडाळून घेतले होते अंगाला ....वार्डन आणि त्याचे मित्र बराच वेळ ..गांजा ओढत होते ..नंतर ते देखील झोपले ..त्यांच्यातला एक फक्त जागा राहिला बराक मधील कैद्यांवर पहारा ठेवण्यासाठी ..टर्की सुरु असल्यामुळे ...मी प्रचंड अवस्थ होतो ....त्यात काल वार्डन कडून विनाकारण मार खाल्ल्यामुळे झालेला अपमान टोचत होता ..घरच्या मंडळींचा प्रचंड राग येवू लागला होता ..मला कधी असे अडकवले जाईल असे वाटले नव्हते ..कसेही करून इथून सुटका करून घेतली पाहिजे असा विचार मनात सुरु होता ..पण आत येताना असलेले पहारेकरी ..प्रचंड मोठ्या भिंती ..सगळा कडेकोट बंदोबस्त होता ..कसे बरे बाहेर पडावे ..मला पँपिलाँन कादंबरीतील हेन्री आठवला ..त्याने जेलमधून पळून जाण्यासाठी केलेल्या एकेक युक्त्या आठवल्या ...काहीतरी कल्पना करत ..बिड्या ओढत टाइम पास करत होतो खरा ...येथे जेव्हा एखाद्या कैद्याला रात्री लाघवी किवा संडासला उठायचे असे तेव्हा तो ..आधी बसल्या जागेवरून पहारा करणाऱ्याकडे पाहून जोरात ओरडून सांगे ..पेशाब ..किवा संडास ..असे सांगितले नाही तर तो पहारेकरी लगेच दंड्याने फटके देत असे ..कारण तुम्ही असे उठण्याचे कारण न सांगता आपल्या जागेवरून निर्हेतुक उठूण्यास सक्त मनाई होती ...पहाटे पहाटे एकदम बाहेरून ' जय श्रीराम ' ..बजरंगबली की जय ' अशा मोठ्याने दिलेल्या घोषणा ऐकू आल्या ..नंतर थोड्याच वेळात ..' अल्ला हो अकबर ' अशा ही घोषणा ऐकू आल्या ....बराच वेळ असे घोषणा युद्ध सुरु राहिले ..मग वार्डन साडेपाचला उठल्यावर त्याने गिनती असा पुकारा केला ..तसे सगळे कैदी एकमेकांचा हात धरून जोडीने खाली बसले ..मी पण एकाचा हात पकडला होता ..बाहेरून कुलूप काढल्याचा आवाज आला ..गरम ओव्हरकोट घातलेले दोन शिपाई आत आले ..त्यांनी सगळे कैदी मोजले ..मग ते बाहेरून कुलूप लावून गेले ...बराकमधील सगळे कैदी आपापले बिस्तर गुंडाळून कांबळे पांघरून भिंतीला टेकून बसले ....बाहेर थोडे फटफटत असताना बाहेरून कुलूप काढले गेले ....सगळे कैदी बाहेर पडले ..बंदी खुलली होती ..जेल मध्ये सकाळी ६ ते दुपारी ११ पर्यंत बराक बाहेरच्या पटांगणात कैदी मोकळे असतात ..त्या वेळात ..चहा ..जेवण ..अंघोळी ..कपडे धुणे वगैरे कामे करण्यासाठी मोकळे सोडले जाई ..नंतर ११ ते ३ सगळे बराक मध्ये बंद ... पुन्हा दुपारी ..३ ते सायंकाळी ५ पर्यंत बंदी खुलत असे ..५ नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ पर्यंत बराक बंद ..असे टाईम टेबल आहे हे एकाने मला सांगितले ..बराक उघडल्यावर मी कांबळे गुंडाळून बाहेर आलो ..बाहेरच्या पटांगणात एक साधारण तीस फुट लांब आणि सहा फुट मोठा असा पाण्याचा कालवा होता ..म्हणजे त्या सिमेंटने बांधलेल्या खोलगट भागात ....मोठ्या नळाने पाणी सोडले जाई ..त्याच्या दोन्ही बाजूला काळ्या दगडांनी बांधकाम होते ज्यावर कैदी बसून खाली वाकून त्या कालव्यातून वाहणारे पाणी घेवून तोंड धुणे ..बादलीत पाणी भरून घेवून अंघोळी करणे वगैरे कामे करत असत ..त्याला हौद म्हणतात हे समजले ..

सगळे कैदी हौदावर तोंड धुवत होते ..तितक्यात बाजूच्या बराकीतून एकदम एक मोठा घोळका बाहेर पडला ..सुमारे १०० तरी लोक असावेत ..सगळे तरुण होते ..त्यांनी बाहेर पडल्यावर '' जय श्रीराम ' अशा घोषणा सुरु केल्या ...त्यांच्या घोषणा सुरु झाल्यार बाजूच्या सर्कल मधून 'अल्ला हो अकबर ' असा पुकारा सुरु झाला ....जरा चौकशी केल्यावर कळले की काल रात्री पासून मालेगाव मध्ये हिंदू -मुस्लीम दंगल सुरु झाली होती ... दंगलखोर लोकांना पकडून रात्री पासून येथे आणले जात होते ..घोषणा बाजीने वातावरण जरा वेळ तंग झाले होते ..मला बाहेर जास्तच थंडी वाजू लागली तसा मी पुन्हा बराक मध्ये जावून बसलो ....माझ्या बाजूला एक जण येवून बसला ...माझी विचारपूस करू लागला ..त्याने बहुधा रात्री मी मार खाल्लेला पहिला असावा ..बहोत मारते हे साले ..अशीच सुरवात केली त्याने ..पुढे म्हणाला ...मेरेको भी मारा था ..गप्पा मारताना कळले की तो कलकत्त्याचा होता ..ड्रायव्हर ...अपघाताच्या केसमध्ये बंद झाला होता ..त्याचा मालक लवकरच त्याचा जामीन करून त्याला सोडवणार होता ...मला मात्र जामीन मिळण्याची काहीही व्यवस्था नव्हती ..कारण घरच्या मंडळींनीच ..माझ्यावर केस केलेली ..जामीन देणार कोण ? हताशपणे बसून होतो ..बाहेर चहाचा पुकारा झाला ..तसा बाहेर जावून रांगेत उभा राहिलो ..दोन कैदी एका मोठ्या अल्युमिनियमच्या पातेल्यातून चहा वाटत होते ..जेमतेम कोमट असा चहा ..मगमध्ये चहा घेवून पुन्हा बराकीत ...येथून बाहेर कसे पडावे हाच विचार मनात होता ..एकाला विचारले की इथे जर कोणी आजारी वगैरे पडला ..किवा काही गंभीर अपघात झाला तर कैद्याला कुठे नेतात ? तेव्हा त्याने सांगितले की येथेच जेलचे हॉस्पिटल आहे दुसऱ्या सर्कल मध्ये ...तेथे नेतात ..आणि तेथे जर उपचार होण्यासारखा नसेल तर कैद्याला बंदोबस्त देवून बाहेर सिव्हील हॉस्पिटल मध्ये पाठवतात ..मला हीच माहिती हवी होती ....कसेही करून इथून बाहेर पडू ..नंतर पुढचे पाहू ....मी बराक मधील संडासचे निरीक्षण करून आलो होतो मघाच ..तेथे जमिनीवर पाणी सांडलेले होते ...एकच संडास होता ...एकूण ६० लोकांना मिळून ..मात्र स्वच्छ ..जरी सिरेमिकचे भांडे मोडके होते तरी संडास मात्र चांगलाच स्वच्छ वाटला ...पन्हा संडास जवळ गेलो ..आत कोणीतरी बसले होते ..आतील व्यक्ती बाहेर येण्याची वाट पाहत उभा राहिलो ..तो बाहेर पडतानाच पाय घसरून पडल्यासारखे नाटक करून त्याच्या अंगावरच पडलो ..तो एकदम घाबरला ..बाजूला सरकला ..मी खाली पडलो ..आणि मोठ्याने विव्हळू लागलो ...माझे ओरडणे ऐकून वार्डन आला संडासात ...मला हात देवून उठवू लागला ..मात्र मी मोठ्याने विव्हळत होतो ..उठताच येत नाही असे भासवत होतो ..मग मला दोघांनी ओढत बाहेर आणले ...मी जणू कमरेखाली पांगळाच झालोय असे नाटक करत होतो ...फक्त बसता येत होते ..बाकी उठून उभे राहणे ..चालणे तर अशक्यच ...

वार्डनचा चेहरा जरा चिंतीत झाला ...मी विव्हळत त्याला सांगितले की माझे पाठीच्या मणक्याचे आँपरेशन झाले होते ...तेथेच मार लागला आहे परत ..त्याने माझ्या पाठीवर पहिले ..टाके घातल्याची खुण होतीच ...तरीही त्याला खात्री वाटत नव्हती ..' होगा ठीक एक दो घंटेमे असे म्हणत त्याने मला तसाच ओढत भिंतीला टेकवून बसवले ..आता जेलचे डॉक्टर येवून मला तपासतील ..पाठीच्या मणक्याचे नाजूक काम असल्याने सी टी स्कँन किवा एक्स रे काढण्यासाठी मला बाहेरच्या हॉस्पिटल मध्ये न्यावेच लागेल यांना ..असा माझा अंदाज होता ..त्यानुसार समस्येची गंभीरता वाढावी म्हणून मी सारखा विव्हळत होतो ..मध्ये एकदा लघवीला जायचे म्हणून तसाच बुडावर सरकत सरकत पांगळ्यासारखा संडासकडे गेलो ...माझ्या कडे पाहून इतर कैदी हळहळत होते ..ज्यांनी काल रात्री मला मारताना पहिले होते ..त्यांना वाटे कालच्या रात्रीच्या मारामुळेच असे झाले असावे याला ..त्यापैकी एक म्हणाला ..अभी जमादार और डॉक्टर आयेगा तो ये वार्डन ने मारा है ऐसा बताओ ...मी नुसताच विव्हळत होतो ..माझी अवस्था पाहून रात्री मला मारणाऱ्या वार्डनने मला स्वतः पुन्हा थोडा चहा आणून दिला ..बिडी देखील पाजली ..बहुधा तो घाबरत असावा की मी पांगळा होण्याला त्याला जवाबदार ठरविन की काय ? मला हळूच म्हणाला देखील तो ..रातको तो हमने जादा नाही मारा था ....ये कमर का लफडा तो सबेरे तू गिर गया इसलिये हुवा है ' ...माझा प्लान चांगलाच प्रभावी ठरत होता ...

( बाकी पुढील भागात )

=====================================================================

जेलचे रुग्णालय ! ( पर्व दुसरे -भाग ११३ वा )

माझे कमरे खाली अधू झाल्याचे नाटक मी सुरूच ठेवले ..दुपारी दोन वाजेपर्यंत चार वेळा मुद्दाम संडासकडे बुडावर सरकतच गेलो ..तेथे खालची जमीन ओली होती .. पँट त्यामुळे सगळी मागून ओली झालेली ..मला पोलिसांनी अंगावरच्या कपड्यासहित घरातून उचलले होते ..तेथून थेट कोर्ट ..सेन्ट्रल जेल .असा प्रवास झाला असल्याने ..माझ्याकडे अंगावरच्या एक पँट ..बनियन ..अंडरवेअर ..टीशर्ट ..या खेरीज दुसरे कपडे नव्हतेच ..मँजिस्ट्रेट कस्टडी मिळालेल्या कैद्याला घरचे कपडे वापरता येतात ..ज्यांना आरोप सिद्ध होऊन शिक्षा सुनावली जाई त्यांना मात्र जेलचे कैद्याचे कपडे घालावे लागत ..पँट आणि आतून अंडरवेअर देखील बुडावर सरकत पाण्यात गेल्याने पूर्ण ओली झालेली होती ..त्यामुळे खूप अवस्थ वाटत होते ..अवघडल्या सारखे झाले होते ..त्यात टर्की सुरु ..प्रचंड उलघाल होत होती शरीरमनाची .. बदलायला दुसरे कपडेही नव्हते . माझे नाटक उत्तम वठण्यासाठी मला तसेच बुडावर सरकत राहणे भाग होते ..सध्या आमच्या सेंटरला दाखल झाल्यावर काही व्यसनी सुरवातीच्या काळात ..कसेही करून घरी जायला मिळावे म्हणून ..तब्येत खराब झाल्याची ..छातीत दुखत असल्याची ..वगैरे नाटके करतात ..त्यांना वाटते आपल्याला लगेच हे लोक व्यसनमुक्ती केंद्रातून काढून हॉस्पिटलला नेतील ..घरच्या मंडळींची भेट घालून देतील ..मग शपथा ..वचने ..इमोशनल ब्लँकमेलिंग ..वगैरे करून आपण डिस्चार्ज घेवू ..माझी गाठीला व्यसनी व्यक्ती किती नाटके करू शकतो या बद्दल स्वतचा चांगलाच अनुभव असल्याने ..मी त्यांची डाळ शिजू देत नाही ...

बराकमधील सगळे कैदी वार्डनला ...बेचारे को जल्दी दवाखानेमें ले जावो असा आग्रह करत होते ...त्याला ही तसेच वाटत होते ..मात्र मी त्याने रात्री मला साथीदारांसोबत मारहाण केल्याची तक्रार करीन बाहेर पडल्यावर अशीही त्याला भीती वाटत असावी ...तो सारखा मला बिडी देवून ..मी रात्रीची घटना विसरावी इतके चांगले वागत होता माझ्याशी ..शेवटी दुपारी तीन वाजता ...मला एका चादरीवर ठेवून ..ती चादर चार कैद्यांनी उचलून मला बराक मधून बाहेर काढले ..तशीच चादरीची झोळी उचलून मला सुमारे शंभर मीटर दूर ..उंच भिंतीच्या आतच असलेल्या जेलच्या रुग्णालयात नेले ..तेथे अँप्रन चढवलेल्या एका डॉक्टरने मला तपासले .... पालथा करून पाठीच्या जखमेवरची खुण तपासली ..कसा पडलास वगैरे प्रश्न विचारले ..मी रात्रीच्या मारहाणीचा अजिबात उल्लेख न करता ..संडासात पडलो असे सांगितले ..तेव्हा सोबत आलेल्या वार्डनला सुटल्यासारखे वाटले ..डॉक्टरने गंभीर चेहरा करून मला हॉस्पिटलला दाखल करून घेतले ..मला तेथे सोडून जाताना बराकच्या वार्डनने मला त्याचे नाव सांगितले नाही याचे बक्षीस म्हणून एक बिडी बंडल माचीस दिले ...जेलच्या रुग्णालयात सगळे पलंग भरलेले असल्याने मला तात्पुरते ..जमिनीवरच जागा मिळाली ..चला इथपर्यंत तर सगळे मनासारखे घडत होते ..बिडी बंडल देखील मिळाला होता ..आता इथून लवकरात लवकर बाहेरच्या उंच भिंती बाहेरच्या दवाखान्यात कसे जाता येईल याचे विचार सुरु होते माझ्या मनात ..पांगळेपणाचे नाटक डॉक्टरच्या देखरेखी खाली उत्तम वठायला हवे होते ..चौकशी करत असताना मी ब्राऊन शुगरचा व्यसनी आहे हे डॉक्टरला सांगितले होते ..त्यामुळे मला टर्की होत असणार हे तो जाणून होता ..त्याने मला एक फोर्टविन चे इंजेक्शन दिले ..पेन किलर म्हणून आणि टर्की कमी व्हावी म्हणून ...ती रात्र जरा बरी गेली ..फोर्टविनच्या इंजेक्शनमुळे जरा गुंगीत होतो ..टर्की फारशी जाणवली नाही ..मात्र झोप अजिबात्र लागली नाही ..रात्री पुन्हा ..तशीच संडासकडे बुडावर सरकत जाण्याची कसरत दोन वेळा केली ..

दुसऱ्या दिवशी सकाळी तसाच बुडावर सरकत हॉस्पिटलच्या व्हरांड्यात येवून उन खात बसलो ..हॉस्पिटल मधील इतर आजारी कैदी माझ्याकडे सहानुभूतीने पाहत होते..एकाने तर स्वतचा पलंग मला देवू केला ..मात्र मी नाकारले ..बसल्या जागेवर चहा मिळाला ..याला बिचाऱ्याला लवकर बाहेरच्या दवाखान्यात नेले पाहिजे ..तरच काहीतरी ऑपरेशन होवून हा नीट होईल ..नाहीतर जन्मभराचा पांगळा होईल असे त्या कैद्यांना वाटत होते ....बाहेर चोऱ्या ..मारामाऱ्या..दरोडे ..असे गंभीर गुन्हे करणाऱ्यांच्या मनात असा माणुसकीचा ओलावा पाहून मला गम्मत वाटली मानवी मनाची ...एकाने तर मला जेल प्रशासनाच्या बद्दल त्याच्या मनात राग असल्याने ...मला लवकर बाहेरच्या हॉस्पिटल मध्ये न्यावे यासाठी एक भलतीच आयडिया सुचवली... आता जेव्हा दहा वाजता जेलर राउंडला हॉस्पिटलला येतील तेव्हा ..माझ्या जवळील चहाच्या पाँट मध्ये संडास मधील मैला भरून तो पाँट मी जेलरच्या अंगावर फेकावा असे त्याचे म्हणणे होते ...आयडिया जरी अफलातून असली तरी मी तसे करणे नाकारले ..कारण त्यानंतर जेलर नेमकी काय भूमिका घेईल या बाबत मी साशंक होतो ...दहा वाजता जेलर राउंडला आल्यावर मी मुद्दाम बुडावर सरकत त्याच्या जवळ गेलो ..काय झाले असे त्याने विचारले ..तेव्हा संडासात पडलो ..पूर्वी ऑपरेशन झाले आहे वगैरे सांगितले ..ठीक आहे ..पाहू इतकेच म्हणून जेलर पुढे गेला ..मला वाटले होते तो मला सिव्हील हॉस्पिटलला नेण्याबाबत सूचना देईल ..मात्र ते घडले नाही ..मी जरा निराश झालो ..मात्र पांगळेपण सुरूच ठेवायचे पक्के केले ..कधी ना कधी ..त्याला कीव येईलच माझी ..एकाने सांगितले की तुझ्याकडे पैसे असतील तर ..तुला बाहेर हॉस्पिटलला लगेच जाता येईल ..इथे बाहेरच्या हॉस्पिटलला रेफर करण्याचे पैसे घेतात ..कोणीही कैदी.. डॉक्टर ..जेलर वगैरेना पैसे खाऊ घालून ..आजाराचे निमित्त करून ..काही दिवस बाहेरच्या जगात जावून येतो ..मग तेथे ..नातलगांच्या भेटी गाठी घेतो ..सर्व इच्छा पूर्ण करून परत आत येतो ..माझ्याकडे फुटकी कवडी नव्हती ....त्यामुळे हा मार्ग मला लागू होत नव्हता ..बाहेरच्या हॉस्पिटल मध्ये रेफर करण्याचा त्यावेळचा रेट पाचशे रुपये आहे ही माहिती पुरवली त्याने .. जेल मध्ये जरी सर्वसाधारण कैद्यांना पैसे जवळ ठेवण्यास मनाई होती ..तरीही अनेक भाई लोकांकडे खूप पैसे असतात ..ते मदत करतात एखाद्या कैद्याला ..बाकीचे कैदी हा व्यवहार नातलगांमार्फत बाहेर जेलरची किवा डॉक्टरची भेट घडवून करतात ...जो खरोखर आजारी असेल त्याला देखील हे लोक चाचपडून पाहतात ..पैसे मिळाले तरच बाहेरच्या दवाखान्यात पाठवतात ..अन्यथा मग कोर्टाकडून आदेश मिळाला तर यांचा नाईलाज होतो ..किवा अगदीच एखादा मृत्यू पंथाला असेल तर त्याच्यावर लवकर कृपा करतात अशी माहिती मिळाली ..म्हणजे एकंदरीत इथून बाहेरच्या हॉस्पिटल मध्ये जाणे दिव्यच होते तर ...!

( बाकी पुढील भागात )

=====================================================================

दुर्दशा ! ( पर्व दुसरे -भाग ११४ वा )


जेलर ..डॉक्टर ..यांनी एकंदरीत माझ्या समस्येकडे दुर्लक्ष करून ..माझी जिद्द वाढवली होती ..कसेही करून जेलच्या बाहेरच्या हॉस्पिटल मध्ये जायचेच हा निर्धार झाला ..दिवसभर मी तसाच बुडावर सरकत ..विव्हळत ..कण्हत ...घालवला ..टर्की सुरु असल्याने भूक लागण्याचा प्रश्नच नव्हता ..दोन वेळा चहा मिळाला ....सायंकाळी बंदी झाल्यावर ...मी कंबर जास्तच दुखते आहे असे भासवू लागलो ..मोठ्याने विव्हळू लागलो ...माझे असे करुण विव्हळणे हॉस्पिटल मधील इतर कैद्यांना त्रासदायक होऊ लागले होते ..आठ वाजता एक जमादार राउंडला आला ..मेंटल बहुधा त्याची रात्रपाळी होती ..मेंटल हॉस्पिटल मध्ये जसे ओव्हरसीयर रात्रपाळी करून दर दोन तासांनी प्रत्येक वार्ड मध्ये राउंड मारतात तसेच हे होते ...माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून तो जमादार माझ्याजवळ आला ....माझी चौकशी करून माहिती घेतली ..तुला पाठवू एकदोन दिवसात सिव्हील हॉस्पिटलमध्ये असे आश्वासन दिले ..तो पर्यंत शांत राहा ..उगाच ओरडून सगळ्यांची झोप खराब करू नकोस असे मला बजावले .....मला झोप लागावी म्हणून रात्रपाळीच्या डॉक्टरकडून त्याने मला दोन कंम्पोझ च्या गोळ्या आणून खायला घातल्या ..ब्राऊन शुगरच्या व्यसनीला ..टर्कीत असताना सर्व साधारण झोपेची औषधे दिली तर तो हँलुस्नेशन मध्ये जातो ..असा माझा अनुभव होता ...परंतु दोन गोळ्या माझ्या हातावर देवून जमादार ..समोरच उभा राहिला ...त्यामुळे त्या गोळ्या घेणे मला भाग पडले ...त्या गोळ्या घेतल्यानंतर देखील माझे विव्हळणे सुरूच होते ..दोन तासांनी पुन्हा राउंडला आल्यावर त्या जमादाराने वैतागून मला अजून दोन गोळ्या आणून दिल्या ..कसेही करून माझा आवाज बंद करायचा होता त्याला ..एकूण चार झोपेच्या गोळ्या पोटात गेल्यावर ..जरा बरे वाटले ..थोडीशी गुंगी वाटली ..म्हणून भिंतीला टेकून.. डोळे मिटून जरा वेळ बसून राहिलो ..

बहुतेक रात्रीचे दहा वाजून गेला असतील ...नंतर चार पाच तास काय घडले ते मला आठवत नाही ....परंतु एक अंधुक आठवते ..की पलंगावरचा एक कैदी ..मला पुस्तक वाचायला देण्यासाठी त्याच्या जवळ बोलवत होता ..मी बुडावर सरकत सरकत त्याच्याजवळ गेलो ..नंतर माचीस संपली म्हणून एक दोन कैद्यांकडे माचीस मागत होतो ...हे सगळे उद्योग बुडावर सरकतच चालले होते माझे ....अचानक कोणीतरी फाडकन माझ्या गालात लावली ..मी डोळे उघडले तर समोर वार्डन त्रासिक मुद्रेने उभा ..काय प्रकार आहे ? मला याने असे अचानक का मारले असावे ते समजेना .... तो म्हणाला ..' साले एक जगह पे बैठे रहेना ..यहां वहां क्यू घूम रहा है ..लोगोके बिस्तर के नीचे हात डाल रहा है ...कितना मार खायेगा और ' ..माझ्या भोवती बरेच कैदी घोळक्याने उभे होते ..मग मला जाणवले ..मी बहुतेक हँलुस्नेशन मध्ये गेला असणार ..त्या भ्रमाच्या अवस्थेत मी उगाच इकडे तिकडे बुडावर सरकत फिरत होतो ..माचीससाठी पलंगावर झोपलेल्या कैद्यांच्या गादीखाली हात घालत होतो ..मी काही चोरतोय की काय असे वाटून ..तो पलंगावरचा कैदी मला दोन थोबाडीत मारत होता ..शरमून ..जरा वेळाने तेच तेच करत होतो ..मध्येच आईच्या ..मानसीच्या नावाने जोरजोरात हाक मारत होतो ..असे उद्योग जवळ जवळ तीन तास सुरु असावेत माझे ..मी हात जोडून वार्डनला सांगितले ..' वो निंद के गोली की वजह से मुझे ऐसा हो रहा है ..' खबरदार अभी अपनी जगह से हिला तो ..बांधके रखेंगे अशी त्याने ताकीद दिली ..मी गुपचूप भिंतीला टेक्न बसलो ..मला स्वतच्या अंतर्मनाचे खूप आश्चर्य वाटले ....हँलुस्नेशन मध्ये गेल्यावर स्थळ ..काळाचे भान हरपते ..कानात आवाज ऐकू येतात ...डोळ्यासमोर काही भ्रम निर्माण होतात ..हे खरेच आहे ..मात्र मी कमरेखाली अधू झालो असून मला चालता येत नाहीय ..हे मी करत असलेले नाटक ..हँलुस्नेशनच्या काळात देखील सुरु होते ..म्हणजे मी अंतर्मनाला दिलेली पांगळेपणाची सूचना अंतर्मनाने ..हँलुस्नेशन च्या काळात देखील लक्षात ठेवली होती ..त्या भ्रमाच्या अवस्थेतही ..जरी स्थळ ..काळ..व्यक्तींची ओळख याचे माझे भान हरपले होते ..तरीही सगळे उद्योग मी बुडावर सरकतच करत होतो ..पांगळेपणाचे नाटक काही विसरलो नव्हतो ..मानवी मन हे खरोखर अतिशय शक्तिशाली आहे ..हे पुन्हा पटले ..जर त्या मनाला सकारात्मक विचारांचे खाद्य देत राहिले तर ..ते नक्कीच सगळे व्यक्तिमत्व बदलविण्यास कारण बनते ..आणि नकारात्मक विचार करत राहिल्यास .. जीवनाची दुर्दशाही करते .

आता पुढे काय ..मी एकदम त्रासून गेलो होतो ..एकतर सारखे बुडावर सरकून कपडे खराब झालेले ..जमिनीवर हात टेकवून बुडावर सरकावे लागे ..त्यामुळे हात देखील दुखत होते ..टर्की ..थंडी ..संपत आलेल्या बिड्या ...वैताग होता नुसता ..सगळे शरीर गलीतगात्र 
झालेले ..मनात एक कल्पना चमकली ...मी कमरेच्या पँटला लावलेला चामडी पट्टा झडती घेताना तेथील शिपायाने मला पँट सैल होते म्हणून परत केला होता ..तो पट्टा मी काढला आणि गळ्याभोवती आवळला ..दोन्ही हातानी पट्ट्याची दोन टोके जोरात ताकद लावून विरुद्ध दिशेला ओढू लागलो ..गळ्याला फास बसत होता ..श्वास कोंडल्या सारखे झाले ..खरे तर असे स्वतच्या हाताने स्वतःला फास लावून घावून मरणे शक्य नसते..कारण जरा जास्त वेळ श्वास कोंडला गेला की हात आपोआप सैल पडतात ..फासाची ओढ कमी होते ..मात्र मी नेटाने प्रयत्न करतच होतो ..श्वास कोंडला गेला की गळ्यातून विचित्र घुसमटल्याचे आवाज येत होते ..खोकला येत होता ..हे सगळे जरा दूर बसलेला एक कैदी पाहत होता ..तो एकदम मोठ्याने ओरडला ..' अरे ..अरे . ..बचावो ..मार जायेगा ये ' ..त्याने अशी बोंब ठोकल्यावर पुन्हा सगळे कैदी उठले ....वार्डन माझ्याजवळ आला .. माझ्या हातातील पट्टा काढून घेतला ..यावेळी त्याने मला मारले नाही ..त्यालाही माझी दया आली असावी ' तू खुद भी तकलीफ मे है ..और दुसरो को भी तकलीफ मे डाल रहा है ..' त्याने मग त्याच्या साथीदार कैद्यांच्या मदतीने एक पलंग रिकामा करून मला पलंगाला बांधले ...म्हणजे पुन्हा मी आत्मघात करू नये ..

( बाकी पुढील भागात )


हँलुस्नेशन म्हणजे नेमके काय ते माहित करून घेण्यासाठी खालील लिंक पहा !

=====================================================================

सुटका ????  ( पर्व दुसरे -भाग ११५ वा )

मला जेमतेम दोन वेळा लघवी..संडास साठी सोडावे असा आदेश जमादाराने दिला होता ...पहाटेचे बहुतेक पाच वाजत आलेले असावेत ..पलंगावर बांधलेल्या अवस्थेत मी पडून होतो ...वार्डन उठला होता ..इतक्या पहाटे उठून स्नान वगैरे करून तो ..त्याचा बिस्तर असलेल्या कोपऱ्यात मांडी घालून डोळे मिटून बसला होता ..मला वाटले काहीतरी बैठे काम करत असेल ..नीट निरखून पहिल्यावर जाणवले तो डोळे मिटून ध्यानस्थ बसला होता ..अगदी निश्चल ...मग जाणवले तो ध्यान करतोय ..मी थक्कच झालो ..इथे जेलमध्ये कोणी ध्यान करणारा सापडेल असे स्वप्नातही वाटले नव्हते मला ..सुमारे तासाभराने बंदी उघडण्याच्या सुमारास तो उठला ..मला चहा हवा का विचारू लागला ..मी त्याला विचारलेच ' आपण आता ध्यान करत होता का ? ' तो हसला आणि म्हणाला ध्यान नाही त्याला ' विपश्यना ' म्हणतात ..म्हणजे 'विपश्यना ' इथेही पोचली होती तर ..त्याची चौकशी केल्यामुळे त्याला जरा बरे वाटले ..मला त्याने पाँट मध्ये चहा आणून दिला ..सांगू लागला ..मागच्या वर्षी इथे जेल मध्ये 'विपश्यना ' चे शिबीर झाले होते ..अनेक कैद्यांनी त्यात भाग घेतला होता ..तेव्हा मी हे शिकलो ..त्या शिबिरासाठी किरण बेदी यांनी पुढाकार घेतला होता....मला आठवले ..किरण बेदी यांनी ' तिहार ' जेल मध्ये जेलर असताना तेथे ' विपश्यना ' शिबीर घेतल्याचे वाचले होते वर्तमान पत्रात ..पुढे अशी शिबिरे त्यांनी देशभरातल्या सर्व कारागृहात घेण्यासाठी आग्रह केला होता .. तो वार्डन पुढे सांगू लागला ...खूप शांत वाटते यामुळे ...मी फार रागीट होतो पूर्वी ..रागाच्या भरात त्याच्या हातून खुन झाल्यामुळे त्याला सक्तमजुरीची शिक्षा झाली होती .. ..दीर्घकालीन शिक्षा झालेल्या कैद्यांना त्यांची जेलमध्ये चांगली वागणूक असेल ..तर वार्डन करण्यात येते ..म्हणजे त्यांना विशिष्ट पगार दिला जातो ..त्यांचा वापर बराकीत व्यवस्थापन करण्यासाठी ..जेलच्या आतच ..इतर सरकारी कामात मदत करण्यासाठी केला जातो ..पिवळी विजार आणि पांढरा शर्ट ..कमरेला पट्टा असा त्यांचा वेष असे ...वार्डन म्हणजे थोडक्यात कैदीपोलीस असे म्हणता येईल ...मी त्याला मला सिव्हील हॉस्पिटल मध्ये केव्हा नेणार असे विचारले तेव्हा म्हणाला ' कल रातको तुने जो लफडा किया ..उसके बाद अब तेरेको यहां रखना खतरा है ऐसा डॉक्टर साहब बोल रहे थे ..शायद आज भेज देंगे तुझे ' बरे वाटले ते ऐकून ..बाहेरच्या हॉस्पिटल मध्ये नेले की तेथून सोबत असलेल्या शिपायाला पटवून त्याला घरी फोन करायला लावू ..माझी अवस्था खूप वाईट आहे असा निरोप द्यायला लावू त्याला ..म्हणजे मग भाऊ लवकर जमीन करून मला सोडवेल ही अशा होती मला..किवा संघी मिळाली तर सरळ पळून जायचे तेथून मुंबईला .असे माझ्या मनात होते .

वार्डन ने सांगितले तसेच घडले ..त्या दिवशी सकाळी जेलर राउंडला आल्यावर माझ्या जवळ आला म्हणाला ..आज पाठवू तला हॉस्पिटल मध्ये ...त्यानुसार दुपारी दोन वाजता ..मला पलंगावरून सोडले गेले ..एका स्ट्रेचर वर झोपवून ते स्ट्रेचर कैद्यांनी उचलून बाहेर जेलच्या मोठ्या दारापाशी आणून ठेवले ..सुमारे तासभर तसाच दारापाशी स्ट्रेचरवर पडून होतो ..मग गेटबाहेर गाडी लागलीय असा निरोप आल्यावर मला उचलून बाहेर गाडीत आणून ठेवले गेले ...चला ..एकदाचा बाहेर पडलो जेलच्या ..तीन दिवसात मी क्लृप्ती करून बाहेर येण्यात यशस्वी झालो याबद्दल स्वतची पाठ थोपटली ..मोठ्या निळ्या गाडीत अजून तीन चार कैदी चार शिपाई बसले होते ..त्या कैद्यांना देखील हॉस्पिटल मध्ये नेण्यात येणार असावे .. तासाभरात पोचली गाडी सिव्हील हॉस्पिटल मध्ये ..ताबडतोब मला स्ट्रेचर वरून उचलून ' आपत्कालीन विभाग ' अशी पाटी असलेल्या वार्ड मध्ये नेले गेले ....तेथे पलंग सज्ज होते ..एका पलंगावर मला झोपवून डॉक्टरांनी तपासले ..उद्या एक्सरे काढून नक्की काय ते समजेल ..असे म्हणाले ..मग मला सलाईन लावले गेले ...माझ्यापाशी एक शिपाई थांबला होता पहारा म्हणून ..गेल्या तीन दिवसात पोटात चहा खेरीज काहीही नव्हते ..टर्की सुरु असल्यामुळे भूक लागलीच नव्हती ..त्या वार्डमध्ये एकूण २० पलंग असावेत ..त्यापैकी जेमतेम पाच पलंग भरलेले होते ..बाकी वार्ड रिकामाच होता ..बाहेर अंधारले होते ..माझ्या योजनेचा पुढील भाग म्हणून मी माझ्या सोबत थांबलेल्या शिपायाला पटवण्यास सुरवात केली ...

त्याला म्हणालो ' ये मेरे ससुराल वालो की चाल है ..मुझे गलात फसाया है उन्होने '...वगैरे ' तो नुसताच हम्म ..ह्म्म्म करत होता ..पुढे म्हणालो अभी मेरे घरवालोको मै ऐसी तकलीफ मे हु ऐसा पता चला तो वो तुरंत मिलने आयेंगे ..मेरा जामीन करायेंगे ...तो माझ्या बोलण्यात अडकतोय असे जाणवत होते मला ..माझ्याबद्दल दया उत्पन्न होत होती त्याच्या मनात ..शेवटी म्हणालो ..आप अगर मेरे घर को एक फोन करके ..उन्हे बतायेंगे के मै यहां बिमार हु ..तो वो तुरंत आयेंगे ..वो आनेके बाद मै आपको खुश करुंगा ..वगैरे ..त्याच्या मनात लालूच उत्पन्न झालीच ..कितने पैसे देगा मेरेको ? त्याने विचारले .. मी त्याला तुला दोनशे रुपये देईन असा सांगितले ..शेवटी तो तयार झाला ... पैश्याच्या लालचेने सहजगत्या विकली जाणारी माणसे भरपूर सापडतात... नितीमत्तेपेक्षा पैश्यांना जास्त महत्व प्राप्त झालेय..त्या जोरावरच तर अनेक राजकारणी ..भ्रष्टाचारी ..समाजकंटक राजरोस वावरत आहेत समाजात ...जेथे पैसा काम करत नाही तेथे ..सहानुभूती ..करुणा ..दया या मानवी भावना नेमक्या नकारात्मक कारणांसाठी वापरता येतात ...तो शिपाई फोन करण्यास तयार झाला ..जरा वेळाने जेव्हा इतर कैद्यांना दुसऱ्या विभागात घेवून गेलेला त्याचा साथीदार परत आला तेव्हा ..साथीदाराला माझ्यापाशी थांबवून तो माझ्याकडून घरचा फोन नंबर घेवून गेला फोन करायला .. पंधरा मिनिटांनी तो परत आला... थोडा चिडलेला..म्हणाला तेरा भाई तो बहोत कडक बात किया मेरेसे ..बोला ..वो हमारे लिये मर गया है ..उसके मरनेके बाद हमे खबर करो ..हे ऐकून मी जरा हादरलो ..त्याला म्हणालो ..आपने भाई से नही मेरी मां से बात करनी चाहिये थी..यावर म्हणाला ' मुझे सब बात दिया है उन्होने ..मग मराठीत म्हणाला ' साल्या तू गर्दा पितोस ..घरच्यांना खूप त्रास देतोस असे मला समजलेय ..तुझा भाऊ म्हणाला की तो खूप नाटकी आहे ..त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका ..यापुढे आमच्याकडे फोन केलात तर मी तक्रार करीन ...वगैरे !..माझा सगळा प्लान फसला ...आता पुढे काय ..खूप निराश झालो होतो....मी घरच्यांसाठी मेलोय असा निरोप ऐकून खूप रडू येवू लागले ..माझ्या व्यसनापायी ..हट्टीपणापायी ..गेल्या पंधरा वर्षात मी काय काय त्रास दिलाय ते आठवू लागले ..प्रत्येकवेळी आता तरी हा सुधारेल या आशेने घरच्या लोकांनी मला मदतच केली होती ..शेवटी जेव्हा आईच्या जीवावर बेतले ..त्यातही मी आईची पाटली काढून विकली ..हे सर्व म्हणजे नीचपणाचा कळसच होता माझ्या ...थोडासा आनंद ..तणावमुक्ती ..गम्मत ..म्हणून जीवनात आलेले व्यसन आता सगळ्या कुटुंबियांना जीवघेणे ठरले होते ..मी एकदाचा मेलो तरच बरे असे त्यांना वाटत होते ..माझी हुशारी ..चतुराई ..बुद्धी ..सगळ्या क्षमता मी वापरून माझाच विनाश करत होतो ...स्वतः बद्दल घृणा वाटू लागली मला ..

तो शिपाई मला निरोप देवून .. बाहेर जावून उभा राहिला ...जाताना त्याने आठवणीने खिश्यात लोंबकळणारी बेडी काढून ..माझा एक पाय बेडीने पलंगाच्या दांडीला अडकवला होता ..उठून पळून जाणे शक्यच नव्हते ..आता खरोखर आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे काहीही पर्याय नव्हता ..मी सावधपणे आसपास नजर फिरवली ..माझा पलंग एका खिडकीपाशी होता ..थोडी मान वर करून मागे वळून पहिले ..डोक्याच्या मागे असलेल्या खिडकीत ..इंजेक्शनची छोटी वायल कापण्यासाठी किवा इतर कापाकापी साठी वापरली जाणारी एक सर्जिकल ब्लेड पडली होती ..बहुतेक ए वापरून झाल्यावर ती फेकण्याऐवजी कोणीतरी खिडकीत ठेवली असावी ..हळूच हात मागे करून मी ती सर्जिकल ब्लेड उचलली ..या वेळी नेमकी शीर कापली गेली पाहिजे ..तरच मृत्यू येईल ..मी ती ब्लेड घेवून मनगटावर चालवणार तोच एकदम एका स्त्रीचा ओरडण्याचा आवाज आला ..सिस्टर वार्डात आली होती .... ब्लेड उचलण्याच्या नादात माझे तिच्याकडे लक्षच नव्हते ..मात्र तिने पहिले मी काय करणार होतो ते ..तिचे ओरडणे ऐकून ..शिपाई धावत आला माझ्याजवळ ..माझ्या हातातून ब्लेड हिसकावून घेतली ..जर मी कापून घेतले असते ..काही बरेवाईट झाले असते ..तर त्याची नोकरी गेली असती ..कर्तव्यात कसूर केला म्हणून बाराच्या भावात गेला असता तो ..खूप चिडला होता तो शिपाई ..त्याने सरळ मला येथे ठेवणे धोक्याचे आहे हे जाहीर करून ..डॉक्टरला सांगून माझी ट्रान्स्फर ' इन्फेक्शन वार्डात ' करून घेतली ..जेथे जेलच्या कैद्यांना ठेवण्यासाठी छोटी गज असलेली खोली होती ..मला स्ट्रेचरवर घालून ..जोरात रागारागाने स्ट्रेचर पळवत ' इन्फेक्शन वार्ड ' कडे मला घेवून निघाले ..मी वाटेत मोठ्या मोठ्याने..आकांताने ओरडत होतो ..मला मारून टाका ..मला मरू द्या ..मला जगायचे नाहीय ..मी खूप वाईट आहे वगैरे ..!

( बाकी पुढील भागात )