गुरुवार, 27 मार्च 2014

शरणागती ? ? ? ?


शरणागती ? ? ? ?  ( पर्व दुसरे - भाग १५२ वा ) 

खिश्यातील पैसे संपत गेले तसा माझा आत्मविश्वास मला सोडून जावू लागला ..माझा मी पाहून घेईन ..कुठेही जाईन ..मेलो तरी पर्वा नाही ..अशा गर्जना करून तडफदारपणा दाखवणे व त्यानुसार खरोखर वागणे यात खूप फरक असतो ..मानव हा समूहात जगणारा प्राणी आहे ....तो सर्वार्थाने स्वतःच्या जिवावर एकटा जगणे कठीणच असते ....अनेकदा खिश्यात पैसे असले की सारे सोपे वाटू शकते कारण बऱ्याच गोष्टी पैश्याने विकत घेता येतात ..मात्र पैसा कधीही भावनिक सुरक्षितता देवू शकत नाही ...पैसा फक्त तुमच्या भौतिक गरजा भागवण्यासाठी मदत करू शकतो .. भावनिक ..मानसिक गरजा भागवण्यासाठी माणसेच लागतात ..ती देखील मायेची ...आपल्यावर प्रेम करणारी ..संकटकाळात आपल्या पाठीशी उभी राहणारी ..दिलासा देणारी ..वेळ प्रसंगी स्तुती करणारी ...तर कधी रुसणारी ..रागावणारी..पुन्हा क्षमा करून सारे अपराध पोटाशी घालणारी मायेची माणसे ..पैश्याने माणसे खरेदी करता येतात मात्र ती यंत्रासारखे बेगडी प्रेम करतात ..पैसा संपताच सोडूनही जातात ..मायेची माणसे ही भाग्यानेच मिळतात .. .माझी चूक असतानाही उन्मत्तपणे ...नशेच्या भरात मैत्री सोडून ..बाहेर पडलो होतो ..माझ्यावर प्रेम असणाऱ्या मित्रांना अव्हेरून ..लहानपणापासूनच्या माझ्या आत्मकेंद्रित वृत्तीमुळे मी फक्त स्वतच्या भावनांचा विचार करत आलो होतो ..माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझ्यासाठी त्यागास तयार असलेल्या माणसांच्या भावनांची कधीच काळजी केली नाही म्हणूनच तर भरकटत गेलो होतो ..या वेळीही आपण तीच चूक करत आहोत हे माझ्या ध्यानात येत गेले ...वाटले सरळ रविला फोन करून त्याला म्हणावे ..मी तयार आहे उपचाराला ..येतो परत मैत्रीत ..परंतु अहंकारी मन सहजासहजी असे करू देत नाही ..मी रवी ऐवजी मुकुंदला फोन केला ..त्याने काहीतरी मध्यस्थी करावी अशी इच्छा प्रदर्शित केली ..मुकुंद सरळ म्हणाला ' तुषार ..व्यसनाधीनता हा एक गंभीर मनोशारीरिक आजार आहे हे मी तुझ्याच तोंडून अनेकदा ऐकलेय ..व्यसनाधीनते मुळे अनेक चांगल्या गुणी माणसांची कशी माती झाली ते आजूबाजूला पाहिलेय ..असा आजार झालेल्या व्यक्तीने आयुष्यात एकदाही व्यसन करणार नाही असा पण करून तो पाळण्यासाठी सतत स्वतःला आठवण करून दिली पाहिजे... हेच तर तू पण येथील उपचारात शिकवतोस ....इतके सगळे माहित असूनही तू स्वतःला मात्र अपवाद कसा मानतोस ? तुलाही हा आजार जडलाय हे मान्य करूनही तू त्याची पथ्ये मात्र पाळण्यास तयार नाहीस ...फक्त एकदाच ..आजच्या दिवस ..कधीतरी ..वगैरे समर्थने देत तू आयुष्याची अनेक वर्षे या आजाराशी झुंज देण्यात घालवली तरीही तुला आपल्याला एकदाही व्यसन करता येणार नाही हे स्वीकारता आले नाहीय ..अश्या वेळी वारंवार मदत घ्यावी लागते हे तूच सांगत असतोस ...मग स्वतची वेळ येताच मदत का नाकारतो आहेस ? 

मुकुंदचे म्हणणे बरोबरच होते ..तो अवांतर बडबड करत नसे कधीच ....नेहमी मोजके आणि नेमके बोलणारा होता मुंकुंद ..मला त्याचे म्हणणे पटले ....मी त्याला तुझ्या घरी चर्चा करायला येतो असे सांगून त्याच्या घरी गेलो ..तेथे त्याने रविला ही बोलावले होते ..रवी व मुकुंदचा मी पुन्हा एक महिना मैत्रीत उपचार घ्यावेत हाच पवित्रा कायम होता ..मी त्यांना सगळ्या थेरेपीज न करता केवळ काही थेरेपीज करेन अशा अटी घालत बसलो ..हा माझा मानभावीपणा चालला होता ..' तू पेशंट आहेस हे का स्वीकारत नाहीस ? काही आजार दीर्घकाळ पर्यंत ग्रासणारे असतात ..तेव्हा उपचार घेत राहण्यात कसला आलाय कमीपणा ? वगैरे मुकुंद समजावत राहिला ..माझ्या अहंकारामुळे चर्चा फिस्कटली पुन्हा ..तावातावाने उसने अवसान आणून मुकुंदच्या घरातून बाहेर पडलो ..पुन्हा अनिलच्या घरी गेलो ..येथे मुक्काम ठोकून दोन दिवस झाले होते ..संगीताबाई जरी काही म्हणाल्या नव्हत्या तरी माझे स्वागत करण्याच्या वेळचा त्यांचा उत्साह कमी होत चालला होता हे मला जाणवत होते ..इथून बाहेर पडून जावे तरी कुठे हा प्रश्नच होता ....मैत्रीतून बाहेर पडताना रवीने घेवून दिलेला मोबाईल देखील मी परत करून बसलो होतो ..त्यामुळे या दोन दिवसात आई ..मानसी माझ्याशी संपर्क साधू शकल्या नव्हत्या ..किती काळजीत असतील त्या दोघी या विचाराने अवस्थ झालो होतो ....आईला माझे बेगडी तत्वज्ञान ऐकवून मी तिचा फोन कापला होता ..त्या नंतर तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल ? माझ्या बाबतीत असलेली आईची ..मानसीची ..भावाची स्वप्ने मी धुळीस मिळवली होती ....इतकेच नव्हे तर चिमुकल्या सुमितच्या भविष्याचीही पर्वा केली नव्हती ...तरीही ते सगळे माझ्यावर निर्व्याज प्रेम करत राहिले ..प्रत्येक वेळी ..आता सारे ठीक होईल या आशेवर जगले .. प्रत्येक वेळी मी त्याच बेजवाबदारपणे वागत गेलो ..नशेच्या वेडेपणाच्या आकर्षणाला बळी पडलो ..

ती तारीख १० डिसेंबर २००४ होती ..सुमारे तीन दिवस मी अनिलकडे घालवलेले ..जवळचे सगळे पैसे संपलेले ..सकाळी सकाळी शेवटची पुडी संपवून मी चहा घेवून सहज चक्कर मारायला घराबाहेर पडलो होतो ..अनिल आणि अँगी झोपलेलेच होते ..थंडीची सकाळी आठची वेळ ..एक लूत भरलेले कुत्रे रस्त्याच्या कडेला मरून पडलेले दिसले ..क्षणभर त्याच्याकडे पाहून खूप अंगावर काटाच आला ...सुटला एकदाचा असे मनात आले ..अचानक मनात चमकलेल्या विचाराने दचकलो ..कधीतरी आपलेही प्रेत असेच रस्त्याच्या कडेला पडलेले असेल ...बापरे ...किती भयानक अवस्था ? ..मला असा मृत्यू आलेला अजिबात पसंत पडला नसता ...निसर्गाने माझ्यावर कुठलाही अन्याय न करता सशक्त शरीर प्रदान केलेले ..सोबतीला प्रेम करणारे नातलग ..चांगले संस्कार ....मी ओढवून घेतलेल्या प्रत्येक संकटातून मला सहीसलामत बाहेर काढणारे लोक मला वेळोवेळी मिळत गेले ..तरीही माझा माज मात्र कमी झाला नव्हता ..कुठपर्यंत चालणार हा माज ? अनेक वेगवेगळे विचार मनात घोंगावत होते ..त्याच वेळी मानसीची आणि सुमितची तीव्रतेने आठवण झाली ..त्याच तिरमिरीत घरी फोन लावावा वाटले खिश्यात तेव्हढे पैसे होते ..एका पानठेल्यावरून घरी फोन लावला ..आईने फोन उचलला ..माझा आवाज ऐकून तिला खूप दिलासा मिळाला असावा हे जाणवले ..कुठे आहेस तू ? कसा आहेस ? या तिच्या प्रश्नांनी गलबलून आले ..मी ठीक आहे इतकेच बोललो ..मानसीला फोन दे म्हणालो ..मानसी फोन वर आली ..मात्र नुसतेच हुंदके ऐकू येत होते ..ती रडत ..हुंदके देत ..काहीतरी सांगत होती ..तिच्या रडण्यातून काही स्पष्ट ऐकू येत नव्हते ..तरीही हे समजले की मी जे वागतोय हे तिच्यासाठी असह्य होते ..कसा कोण जाणे ..मी जातोय रवीकडे परत असे तिला म्हणालो ..आणि फोन कट केला ..मग रविला फोन केला ..सकाळचे नऊ वाजत आले होते ..माझा आवाज रवीने लगेच ओळखला ..काय म्हणताय तुषारभाऊ ? त्याचा तसाच आश्वासक स्वर ..रवी ..यार कंटाळलो आता ..काय करावे सुचत नाही ? ..यावर तो सहज पणे म्हणाला ...कशाला स्वतःचा त्रास वाढवून घेताय उगाच ? ..त्यापेक्षा या इथे परत ..पाहता पाहता एक महिना संपेल उपचारांचा ..अहंकार बाळगून नुकसानच होते ..मी पटकन त्याला चालेल म्हणालो ..तुला भेटायला सेंटरला येतोय असे सांगितले ..अनिलकडे येवून झोपेतून नुकत्याच उठलेल्या अँगीला ..रवीकडे जावून येतो असे सांगितले ..अनिल सोबत त्याच्या स्कूटरवरून मैत्रीत पोचलो !

( क्रमश : )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें