शनिवार, 14 दिसंबर 2013

बिंग फुटले !


बिंग फुटले ! ( पर्व दुसरे - भाग १०६ वा )


आईला ओळखत असणाऱ्या त्या काकूंना मी विसरून गेलो होतो ..अविकडे जावून सावकाश ब्राऊन शुगर वगैरे ओढून सायंकाळी पाच वाजता ..सुमित सोबत घरी पोचलो तर ..दर उघडताच मानसीने सुमितला माझ्या कडून ओढून स्वतच्या कडेवर घेतले ...तिचे डोळे रडून लाललाल झालेले ..थोडे सुजलेले ..मला पाहताच आई म्हणाली ..आता पोराला विकायचे तेव्हढेच बाकी ठेवले आहेस ..मी मुद्दाम ' त्या गावचा नसल्यासारखा ' चेहरा करून .. ..काय झाले ? ..असे का म्हणतेस ? वगैरे प्रश्न विचारू लागलो ...तेव्हा आई म्हणाली ..माझी मैत्रीण आली होती दुपारी घरी ..ती सांगत होती ..तू म्हणे सुमितला घेवून तिच्या घरी गेला होतास ..तेथे ..सुमितला हृदयात समस्या आहे ..त्याला अष्ट विनायक यात्रा घडवून आणायची आहे असे सांगून तिच्याकडे वर्गणी मागत होतास ..मी थक्कच झालो ..त्या मैत्रिणीचा राग आला ..तिने अगदी खास घरी येवून सांगायची काय गरज होती वगैरे विचार मनात आले ....आईच पुढे सांगू लागली ..ती बिचारी सकाळी सुटे पैसे नव्हते म्हणून हळहळत होती ..दुपारी खास पैसे सुटे केल्यावर आपल्याकडे आली होती ..तू मागितलेली वर्गणी द्यायला ..जबरदस्ती १०० रुपये देत होती आमच्या जवळ ..शेवटी आता पैसे जमलेत वगैरे सांगून तिची रवानगी केली ..आईने असे सांगितल्यावर सगळे बिंग कसे फुटले ते आले माझ्या लक्षात ..तेव्हा पासून सुमितला माझ्या सोबत बाहेर फिरायला पाठवणे बंद केले त्यांनी ..तेव्हापासून सुमित आणि मानसीला घेवून एकदा तरी अष्टविनायक यात्रा करून गणपतीची माफी मागावी असे मनात आहे ..मानसी अतिशय धार्मिक असल्याने तिच्या मनाला ते फारच लागून राहिले आहे ..कधी कधी सुमित आजारी पडला ..की ती अजूनही ते बोलून दाखवते ..म्हणते आपण अष्टविनायक यात्रा केली की सुमितवर काही संकट येणार नाही ...तुम्ही पत्यक्ष देवाचा अपमान केला आहे ..ते देखील मुलाला मध्ये घालून .



झटपट पैसे मिळवण्याचा माझा मार्ग बंद झाला ...पुन्हा अनिल साहेबांची नोकरी ..दांड्या ..कामावरील पैश्यात किरकोळ अफरातफर..घरात वाद असे सुरु राहिले ..त्याच काळात माझ्या डोक्यात लेखनाचा किडा वळवळत होता ...एखाद्या वर्तमान पत्रात काहीतरी लेखन करावे असे वाटत होते ..खूप आधीपासून मला लिखाणाची आवड आहे ...पूर्वी मुक्तांगणला प्रथम उपचार घेवून ..नाशिकला तीन वर्षे चांगला होतो त्या काळात ..दैनिक सकाळचे संपादक श्री . उत्तम कांबळे यांच्याशी परिचय झाला होता ..त्यांना मी व्यसनमुक्त राहात आहे याचे खूप कौतुक होते ..ते नेहमी मला तुम्ही आपले अनुभव लिहा असे म्हणत ...मला प्रेरणा देत असत लेखनासाठी ..मात्र तेव्हा ते राहून गेले होते ..नंतर माझ्या वारंवार झालेल्या रीलँप्स मुळे श्री . उत्तम कांबळे यांच्याशी संपर्क तुटला होता .. माझा शाळकरी मित्र शैलेंद्र तनपुरे हा ' दैनिक गावकरी ' या वर्तमान पत्रात संपादक आहे ही माहिती मिळाली होती ..त्यावरून एकदा त्याला भेटायला गेलो ..आम्ही खूप वर्षांनी भेटत होतो ..कॉलेजला असताना मी बिघडत गेलो ..त्या नंतर आमचा संपर्क नव्हता ..मला पाहून त्याला आनंद झाला ..मी त्याला.. सध्या चांगला आहे ..व्यसनमुक्त आहे ..लग्न केले..मुलगा आहे वगैरे माहिती सांगितली ..त्याल विनंती केली की काही लेखन करायचे आहे ..तू छापशील का ? त्याने त्वरित होकार दिला ..त्या नुसार त्याच्याकडे ..' ताण तणावांशी सामना ' हा लेख दिला ..' जिज्ञासा ' प्रकल्पासाठी मिळालेले प्रशिक्षण लेख लिहिताना कामी आले ..लवकरच छापून येईल गावकरी मध्ये असे त्याने सांगितले ..त्याच काळात नाशिक मध्ये ' दैनिक लोकमत ' सुरु झाला होता ..पाहता पाहता लोकमतने घरोघरी प्रवेश केला होता ..नाशिक मध्ये आधी पासून असलेली दैनिके म्हणजे गावकरी ..देशदूत ..सकाळ ....लोकमतने या तिन्ही दैनिकांवर अल्पकाळातच मात केली होती ..


एकदा असाच नशेत असताना ..लोकमतच्या अल्पावधीत लोकप्रिय होण्याची करणे मनात शोधात बसलो ...तेव्हा अनेक बाबी ध्यानात आल्या ...वाटले आपण जर शैलेंद्र तनपुरेच्या लक्षात या गोष्टी आणून दिल्या तर ..तो नक्कीच खुश होईल ..गावकरी मध्ये असे बदल करू शकेल ..मला पत्रकार होण्याची पूर्वीपासून इच्छा होती ..मात्र व्यसनामुळे राहूनच गेले होते ..माझी पत्रकार होण्याची हौस या निमित्ताने भागवून घेता आली असती ...मी लोकमतच्या यशाचा तुलनात्मक आढावा घेवून ते लिखाण घेवून शैलेंद्र तनपुरेला भेटलो ..त्याने मला गावकरीचे व्यवस्थापक ..मालक श्री . वंदन पोतनीस यांना भेटायाल सांगितले ..त्या प्रमाणे मी वेळ ठरवून श्री . वंदन पोतनीस यांची भेट घेतली ..लोकमतच्या यशाचा तुलनात्मक आढावा त्यांच्यासमोर ठेवला ..त्यांना विनंती केली की मी सांगतो ते बदल आपण गावकरी मध्ये केले तर नक्कीच गावकरी त्याचे गमावलेले एक नंबरचे स्थान पुन्हा मिळवेल ..त्यांनी ते सर्व शांतपणे वाचले ..मग म्हणाले ..हे तुम्ही काही आडाखे बांधून लिहिले आहे ..काही मुद्दे छान आहेत ..मात्र याच्यावर एक सविस्तर सर्व्हे व्हायला हवा ..तुम्ही जवाबदारी घेत असाल तर ..घरोघरी जावून असा सर्व्हे करण्याचे काम मी तुमच्याकडे सोपवतो ..सर्व्हेसाठी त्यांनी मला एक प्रश्नावली तयार करण्यास सांगितले ..मी त्या प्रमाणे घरोघरी जावून दैनिक वर्तमान पत्रात लोकांना काय काय वाचायला आवडते ..काय काय असले पाहिजे ..अशा प्रकारचे प्रश्न तयार केले ..ती प्रश्नावली श्री . वंदन पोतनीस यांना दाखवली ..त्यांनी हिरवा कंदिल दाखवला ..मला म्हणाले एका सर्व्हेचे मी तुम्हाला पन्नास रुपये देईन ..तुम्ही विविध भागातील ..विविध गटातील ..किमान एक हजार लोकांच्या घरी जावून ही प्रश्नावली भरून घ्या ..नंतर आपण निष्कर्ष काढून ..आवश्यक ते बदल नक्कीच करू आपल्या दैनिकात ..त्या नुसार माझा काम सुरु झाले ..दिवसाला किमान पाच घरी मी सर्व्हेसाठी जावू लागलो ..माझी नशा ..नशेकारिता पैसे..वगैरे भानगडी सांभाळून सर्व्हे साठी जास्त वेळ देणे कठीणच होते ..मात्र मला आशा होती ..की मी जर यशस्वीपणे हा सर्व्हे केला ..तर मला नक्कीच गावकरी मध्ये पत्रकार होण्याची संधी मिळणार होती ..

( बाकी पुढील भागात )

===================================================================

शेवटचा गंभीर गुन्हा !  ( पर्व दुसरे -भाग १०७ वा )


( सर्वांची माफी आधीच मागतोय )



वाचकांच्या सर्व्हेचे काम झाले की दर आठवड्याला मी ते सर्व्हेचे रिपोर्ट्स श्री .वंदन पोतनीस यांना दाखवत असे ..मग मला ठरल्यानुसार प्रत्येकी पन्नास या प्रमाणे सर्व्हेचे पैसे मिळत असत ..अनिल साहेबांच्या नोकरीवर अनियमित जावू लागलो ..दोन तीन वेळा मोठा भाऊ तेथे ऑफिसात आला तेव्हा ..माझे डोळे पाहून काय ते समजला ..त्याने नंतर घरी येवून माझ्याशी कटकट केली ..म्हणाला ' तू कधीही सुधारणार नाहीस असे वाटतेय ....अनिल साहेब काही बोलत नाहीत याचा गैरफायदा घेवू नकोस ...केवळ माझ्याकडे पाहून तुझी नोकरी टिकून आहे ...मी देखील नेहमीप्रमाणेच त्याच्याशी वाद घातला ...तुझा स्वभावच संशयी झालाय ....माझ्या कोणत्याही गोष्टींचे तुम्हाला कौतुक नाही ..लहानपणापासून तुम्ही असे वागत आलात ..म्हणूनच मी व्यसनी झालो मला कोणीच समजून घेत नाही ..वगैरे . भावू वैतागून निघून गेला ..जाता जाता आईला म्हणाला ..' आई तू याचे कितीही केलेस तरीही ..याला कोणाची पर्वा नाही ..आता वर लग्न करून बसलाय ..म्हणजे अजून जवाबदारी वाढवून घेतली आपण ..' आई बिचारी काय बोलणार ? ..भावाचे म्हणणे तसे पहिले तर अगदी बरोबरच होते ...मला सुधारण्यासाठी त्यानेही खूप प्रयत्न केले होते ...अगदी सुरवातीला खाजगी हॉस्पिटल ..नंतर मेंटल हॉस्पिटल ....मुक्तांगण ...सगळे सुरळीत व्हावे या हेतूने माझे लग्नही करून दिले घरच्यांनी ..इतके सगळे करूनही ...मला स्वतचे भले कशात आहे ते कळत नव्हते ..हा तद्दन वेडेपणाच होता माझा ..वर घडल्या गोष्टींचा दोष मी त्यांनाच देत होतो .


पुढच्या आठवड्यात सर्व्हे करून गेल्यावर ..गावकरीच्या ऑफिस मध्ये श्री .पोतनीस भेटले नाहीत ..त्यामुळे पैसे मिळू शकले नाहीत ..असे समजले की ते दोन तीन दिवसांनी येतील ..माझा भ्रमनिरास झाला होता ..कसेतरी जेमतेम एका पुडी पुरते पैसे जमले होते जवळ ..वैतागत एक पुडी घेवून घरी आलो ..सायंकाळचे सात वाजले होते ..सगळ्या जगावर डोके सरकले होते ..वाटले आपण गर्भश्रीमंत असतो तर किती बरे झाले असते ..राजरोस पैसा उडवता आला असता .. ..आपल्यावर निसर्गाने ....आणि सर्वानीच अन्याय केलाय असे वाटत होते ..अनघाशी आपले लग्न झाले असते तर ..पुढे इतके रामायण घडलेच नसते ..तेव्हाच मी सुधारलो असतो ..त्यावेळी कुटुंबीयांनी माझी किती निराशा केली ..अशी वैफल्याची भावना मनात घर करून होती ..एका पुडी पिण्यासाठी संडासात कशाला जायचे म्हणून ..घरात पुढच्या खोलीत जेथे आई ..सुमित ..मानसी बसले होते तेथेच उकिडवा बसून ब्राऊन शुगर ओढू लागलो ...आईला आणि मानसीला हे पाहून धक्काच बसला ...इतके दिवस मी लपून छपून पीत होतो ...मी सोडलीय कधीच ..किवा नक्की सोडणार आहे ..असे म्हणत असे ..आज राजरोस घरातच आई आणि मानसी समोर ब्राऊन शुगर ओढत बसलो होतो ..वर म्हणत होतो की ..तुम्ही कटकट करता म्हणून मला जास्त ब्राऊन शुगर प्यावी लागते ..एकंदरीत आता माझे व्यसन घरच्या मंडळीनी कोणतीही कुरबुर न करता स्वीकारावे ...मला माझ्या मनाप्रमाणे जगू द्यावे असे माझे म्हणणे होते ..आईला म्हणालो ..रोज सकाळी एक पुडी आणि संध्याकाळी एक पुडी इतकेच मी घेणार ..तुम्ही काहीही आडकाठी करायची नाही ..रोज शंभर रुपये इतकाच माझा खर्च राहील ..तुम्ही आडकाठी करता ..त्यामुळे माझी नशा उतरते .. जास्त प्यावी लागते ....माझे महिना तीन हजार यात खर्च होताल ..ते पैसे मी तात्पुरते घरून घेईन ..नंतर कुठूनही आणून तुम्हाला परत करेन ..तुम्ही अजिबात मध्ये बोलायचे नाही ...प्रत्येक व्यसनीला वाटत असते की आपले व्यसन घरच्यांनी निमूटपणे स्वीकारले तर ..आपणही कंट्रोल मध्ये व्यसन करू शकतो ..घरच्यांच्या कटकटीमुळेच जास्त भानगडी होतात ....खरेतर व्यसनाधीनता अशी कधीच कमी होत नाही ..उलट वाढतच जाते असा घरच्या मंडळींचा अनुभव असतो ..म्हणून तर ते विरोध करतात .

त्या दिवशी माझी मजल पाहून आई निशब्द् झाली ..काहीही न बोलता स्वैपाक घरात निघून गेली ..तिची घोर निराशा झाली होती ..मी बिघडल्यापासून प्रत्येक वेळी ..मला ती मदत करत आली होती ..मला वाचण्यासाठी माझी ढाल बनली होती ..सगळे नातलग अनेकदा तिला म्हणत की तुमच्या लाडामुळे हा बिघडला आहे ...माझ्या वर्तनामुळे अनेकदा तिला अपमान सहन करावे लागले होते ...भावू ..वडील ..नातलग ...वाहिनी ..मानसी ..या सर्वांच्या रोषाला बळी पडावे लागले होते ते केवळ माझ्यामुळे ...आणि आता मीच राजरोस व्यसन करीन म्हणत ..घरातच ब्राऊन शुगर ओढत बसलेलो होतो ..तिचा सारा त्याग ...व्यर्थ ठरत होता ..इतके दिवस किमान मी सुधारणार आहे नक्की सोडणार आहे असे म्हणत होतो ..आता सगळे लाथाडून मी व्यसन काहीही झाले तरी सुरूच ठेवणार हा माझा पावित्रा तिला खूप दुखः देत असावा ..त्या दिवशी रात्री आम्ही नेहमी प्रमाणे झोपी गेलो ....झोपताना मनात होते ..की आता घरच्यांना सरळ सरळ सांगितलेच आहे ..तेव्हा उद्यापासून आईकडून राजरोस पैसे घ्यायचे ..आपले कामाचे पैसे मिळाले की आईला परत करायचे ..वगैरे अविवेकी विचार करतच झोपी गेलो ..सकाळी सकाळी सहा वाजता मानसीने मला घाबऱ्या घाबऱ्या उठवले ..म्हणाली ' अहो आई ..आज सकाळी नेहमीप्रमाणे फिरायला गेल्या नाहीत ..अजून झोपूनच आहेत ..मी मच्छरदाणी बाहेरून आवाज दिला त्यांना ..पण काहीच उत्तर देत नाहीयेत ..मी पटकन उठून आतल्या खोलीत गेलो ..मच्छरदाणी बाजूला करून पहिले ..तर आई उताणी झोपलेली ..तोंड उघडे ठेवून मोठ्याने घोरत होती ..तिच्या तोंडातून थोडा फेस येत होता ..मी हाक मारल्या ..तिला हलवून पहिले ..मात्र ती उठेना ..अगदी गाढ झोपली होती ..तितक्यात बाजूला लक्ष गेले तर तेथे एक छोटी रिकामी बाटली पडलेली ....ही बाटली माझ्या ओळखीची होती ..वडील गेल्यावर ....त्यांच्या उरलेल्या औषधाच्या गोळ्या आईने त्या बाटलीत भरून ठेवलेल्या मला माहित होत्या ..त्यात कॉम्पोझ ..लारपोझ..व वडिलांना आजारी असताना सुरु असलेल्या रक्तदाबाच्या गोळ्या एकत्र करून ठेवल्या होत्या आईने ...सुमारे तीस चाळीस गोळ्या होत्या एकंदरीत ..पटकन बाटली उघडून पहिले तर रिकामी ..माझ्या छातीत धस्स... झाले ...म्हणजे आईने त्या सगळ्या गोळ्या खाल्ल्या की काय ?..शंकाच नव्हती ..नक्कीच आईने त्या गोळ्या खावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता ..मानसीला आईच्या हाताखाली एक चिट्ठी सापडली ..त्यात ..मी सर्व बाजूनी पराभूत झाले आहे ....जीवनाला कंटाळून जीवन संपवीत आहे ..त्यासाठी कोणालाही जवाबदार धरू नये ..सुहासने मानसी व सुमितचा नीट सांभाळ करावा वगैरे लिहिले होते ..माझ्याबद्दल काहीच उल्लेख नव्हता ..,,मी ताबडतोब मानसीला भावाकडे फोन करण्यास सांगितले ....आठवणीने बजावले की ..मी काल घरत ब्राऊन शुगर प्यायलो असे भावाला सांगू नकोस ..नाहीतर तो मलाच जवाबदार धरेल .

( बाकी पुढील भागात )

======================================================================

( कालचे प्रकरण वाचून वाचकवर्ग माझ्यावर नाराज होईल हे माहित असूनही मी नेटाने लिहिले ..आज त्यापेक्षा भयंकर प्रकार आहे ..ही लेखमाला प्रबोधन म्हणून लिहित असल्याने ...सगळे काही खरे खरे लिहायचे हे आधीच ठरवलेय ...यातील काही गोष्टी मी आपल्या पासून लपवूही शकलो असतो ..किवा मला सगळे लिहिलेच पाहिजे असलेही बंधन नव्हते ..मात्र तरीही वाचकांचा रोष पत्करून मी हे लिहित आहे ..कारण मी केलेले कृत्य जरी सगळ्यांपासून लपले तरी त्या सर्वसाक्षी परमेश्वरापासून काहीही लपलेले नाही ..त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहून लिखाण करतोय . माझे हे निंदनीय कृत्य अजून पर्यंत माझ्या कुटुंबीयांकडे कबुल केले नव्हते ..अर्थात त्यांना सगळे माहितच होते ..तरीही मी कबुल केले नव्हते ..त्यांचा मोठेपणा असा की नंतर आईनेही आणि इतर कोणीही मला पुन्हा त्याबद्दल काही विचारले नाही ..की माझ्या व्यसनमुक्तीच्या काळात कधीही माझ्या दुष्कृत्यांची आठवण करून दिली नाही ..हा माझा एक प्रकारे कबुली जबाबच आहे )

संघर्ष ..समर्थन ..!  ( पर्व दुसरे - भाग १०८ वा )

मानसी भावाला फोन करायला गेली ..मी पटकन जवळच राहणाऱ्या डॉक्टरकडे गेलो ..त्यांना घेवून आलो आईला तपासण्यासाठी ..तो पर्यंत भावू आलेला होता ...हे कसे घडले वगैरे विचारात होता ..मानसी घाबरून जमेल तशी उत्तरे देत होती ..त्याचा मुख्य प्रश्न होता ..रात्री आईशी तुषार भांडला का ? ..दुसरे काही भांडण झाले का ? मानसी नुसतीच नकारार्थी मान हलवत होती ..काल रात्री मी केलेला प्रकार त्याला सांगू नकोस असे मी तिला आधीच बजावले होते ..डॉक्टरांनी आईला तपासून जाहीर केले की जास्त परिणाम झालाय ..ताबडतोब हॉस्पिटल मध्ये न्यावे लागेल ..स्टमकवॉश देखील द्यावा लागेल ...ऑक्सिजन वगैरे लागेल ..ताबडतोब भावू खालच्या मजल्यावरच्या परिचितांकडे गेला ..त्यांच्याकडे कार होती ..त्यांनी लगेच गाडी काढली ..आईला बेशुद्धावस्थेत उचलून चारपाच जणांनी मिळून गाडीत टाकले ..तो पर्यंत सुमित उठला .त्याला कळेना काय प्रकार चाललाय ते ..तो गडबड पाहून रडू लागला ..आईला घेवून आम्ही हॉस्पिटलकडे निघालो ..भावू गाडीत पुढे बसला होता ..तर मागे मी ...आईचे डोके माझ्या मांडीवर होते ..अजूनही तसेच उघडे तोंड .. जोरजोरात घोरणे ..मला आईच्या चेहऱ्याकडे पाहून कसेसेच झाले ..रडू येवू लागले ..लहानपणापासून आईचा लाडका असणाऱ्या माझ्यामुळेच आईवर हा प्रसंग गुदरला होता ..आईचे शेपूट म्हणून मला लहानपणी चिडवत असत ..ते आठवले ...अकस्मात हे सगळे कल्पनातीत असे घडले होते .

काल रात्री प्यायलेल्या ब्राऊन शुगरचा परिणाम सकाळी संपला होता ..त्यामूळे टर्की सुरु झालेले होती ....शारीरिक आणि मानसिक अवस्थता देखील वाढली होती माझी ..आता सोबत ब्राऊन शुगर असती तर बरे झाले असते असे वाटले ..तसेच आता आज दिवसभर ब्राऊन शुगर मिळण्याचे वांधे होतील हे जाणवले ..कारण माझ्याकडे काहीच पैसे शिल्लक नव्हते ..माझी ATM असणारी आई ..अशा अवस्थेत ..भावू मला पैसे देणार नाही हे नक्की ..शिवाय आता दिवसभर आईसोबत घालवावा लागणार ..टर्की होणार .. तेथे हॉस्पिटलला सगळे नातलग जमणार..प्रश्न विचारून मला भंडावून सोडणार ..छे...कसेही करून ब्राऊन शुगर मिळवली पाहिजे ...या सगळ्या परिस्थितीला तोंड द्यायला मला मानसिक आणि शारीरिक शक्ती केवळ ब्राऊन शुगर मुळेच मिळणार होती ..मी हताशपणे आईच्या चेहऱ्याकडे पाहत होतो ..माझ्या डोळ्यातून ओघळलेले थेंब गालावरून ओठाशी येवून त्याची खारट चव जाणवत होती ..वाटले रात्रीच आईकडून पैसे घेवून ठेवले असते तर बरे झाले असते ..आईला हॉस्पिटल मध्ये सोडून लगेच ब्राऊन शुगर आणायला जाता आले असते ..पैसे कसे मिळतील त्याचा विचार डोक्यात वेगाने सुरु होता ..त्याच वेळी माझे लक्ष आईंच्या हाताकडे गेले ..तिच्या हाताच्या बोटात सोन्याची अंगठी चमकली ..माझे डोळेही चमकले ...मनात चमकून गेलेल्या विचाराने मी दचकलो ...ती अंगठी काढून घ्यावी हा विचार मनात थैमान घालू लागला ..तो विचार पळवून लावण्यासाठी मी स्वतःचीच निर्भत्सना सुरु केली ..किती हलकटपणा आहे हा ..आई वर हा प्रसंग तुझ्यामुळेच आलाय ..त्याही अवस्थेत आईच्या हातातील सोन्याची अंगठी काढणे म्हणजे नीचपणा आहे ..खूप मोठे पाप आहे ..वगैरे ..स्वतःला दटावत होतो ..तर दुसरीकडे आईच्या हातातील अंगठी पाहून चमकलेले मन ..टर्की वाढवत होते ..ब्राऊन शुगरची लालच अनिवार होत होती ..मग नेहमीप्रमाणे माझ्या मदतीला माझ्या चुकांचे समर्थन करणारा माझ्या मनाचा दुष्ट ..धूर्त ..हुशार वकील आला ..तो म्हणू लागला ..तुषार हे वाईट आहे हे मान्य ..पण तुला ब्राऊन शुगर मिळविण्याचा दुसरा पर्याय आहे का आत्ता ? शिवाय आईचे काही बरे वाईट झाले तर हे सोने नंतर तुलाच मिळणार आहे ..ते तू आधीच काढून घेतलेंस इतकेच ..आणि आई यातून आई सुखरूप बाहेर पडली ..तिने तुला अंगठी बदल जाब विचारला तर ..नाहीतरी तू लवकरच व्यसन सोडणारच आहेस ..तेव्हा आईला नंतर यापेक्षा जास्त किमतीची अंगठी करून दे ...मनात संघर्ष सुरु झाला ..पाहू तर खरी अंगठी सहज निघते का बोटातून असे मनाशी म्हणत मी हळूच आईच्या बोटातून अंगठी काढण्याचा प्रयत्न केला ..तर अंगठी बोटात घट्ट बसलेली ..क्षणभर निराश झालो ..!

पुन्हा स्वतःला सावरले ...मनाच्या लालची वकिलाला दटावले ..आज सहन करू टर्की ..आपण काही मारणार नाही ब्राऊन शुगर मिळाली नाही तर ..मात्र ब्राऊन शुगरसाठी चटावलेले मन स्वस्थ बसू देईना ..वारंवार नजर तिकडेच जात होती ..अंगठी निघत नाही म्हंटल्यावर माझे लक्ष आईच्या हातातील सोन्याच्या पाटल्यांकडे गेले ..हळू हळू मनाचा संघर्ष संपुष्टात येत होता ..मनातील व्यसनाधीनतेच राक्षस पूर्ण जागा झाला होता ..कसेही करून ब्राऊन शुगर हवी म्हणून मागे लागला ..सारासार विवेकाला समर्थनाच्या वकिलाने केव्हाच पळवून लावलेले ...शेवटी मी धीर करून आईच्या एका हातातील पाटली काढून हळूच खिश्यात ठेवली .संभाविता सारखा चेहरा करून बसलो ..हॉस्पिटल आले ..पटकन खाली उतरून स्ट्रेचर मागवले..चार वार्डबॉयनी आईला स्ट्रेचरवर ठेवून ते स्ट्रेचर लिफ्ट मध्ये ठेवू लागले ..मी देखील लिफ्ट मध्ये शिरलो ..वरच्या मजल्यावर गेल्यावर आईला सरळ ऑपरेशन थियेटर मध्ये नेण्यात आले ..तसा मी भावाजवळ जावून म्हणालो ..मी जरा माझ्या मित्रांना फोन करून येतो परत ..तेथून सटकलो ..सरळ अविनाशकडे गेलो ..त्याच्या सोबत त्याच्या ओळखीच्या एका सराफाच्या घरी जावून त्याला ती पाटली दिली ..त्या वेळच्या सोन्याच्या भावाप्रमाणे दहा मिनिटातच त्याने माझ्या हातावर आठ हजार पाचशे रुपये ठेवले ...तेथून सरळ अड्ड्यावर ..ब्राऊन शुगर घेवून अविनाशच्या रूमवर ओढत बसलो दोघे ..ब्राऊन शुगर ओढता ओढता रडतही होतो ..स्वतःला दोषही देत होतो ..आईची महती आठवत होतो ..पोटभर ब्राऊन शुगर पिवून झाल्यावर पुन्हा हॉस्पिटलकडे गेलो.. हॉस्पिटलच्या दारातच भावू माझी वाट पाहत उभा होता ..मला पाहताच त्याने पहिला प्रश्न केला ..आईच्या हातातील एक पाटली कुठे आहे ? मी नकार देवू लागलो ..म्हणालो घरातच कुठेतरी असेल ..तर म्हणाला.. आईला ऑपरेशन थियेटर मध्ये नेल्यावर सिस्टरनी आईच्च्या अंगावरचे दागिने काढले ..त्यात एकाच पाटली मिळाली ...दुसरी कुठे गेली ..मी मानसीला फोन करून विचारले घरात आहे का ? मानसीने नकार दिलाय ...त्याचा रोख सरळ सरळ माझ्याकडे होता ..मी ठाम नकार देत होतो ..मला जाणवले की भावू कदाचित माझी झडती घेईल ..मग खिश्यात असलेले पैसे पाहून त्याला सगळे समजेल ..म्हणून मी भावावर चिडण्याचे नाटक केले ..म्हणालो ...तुला नेहमीच माझा संशय येतो ..प्रत्येक वेळी मलाच जवाबदार धरतोस तू ..वगैरे ..रागारागाने तेथून सटकलो ...पुन्हा अविनाशच्या रूमवर आलो . 

( बाकी पुढील भागात )

========================================================================


अपराधीपणाची होरपळ !
( पर्व दुसरे -भाग १०९ वा )


हॉस्पिटलमधून अवीच्या रूमवर ..पुन्हा ब्राऊन शुगर ....सारखा स्वतःला दोषही देत होतो ...भरपूर ब्राऊन शुगर पिणेही सुरु होते ..दुपारी आईला एकदा पहावे म्हणून हॉस्पिटलला गेलो ..गेट मधूनच बाहेर उभा असलेला भाऊ ..वाहिनी ..मानसी ..जवळपास राहणारे नातलग दिसले ..वाटले या सर्वांसमोर आत जाणे म्हणजे भावाशी भांडणाला आमंत्रण आहे ..कारण त्याने तोच विषय काढला असता ..सर्वांसमोर माझी चोरी उघड झाली असती .. आत गेलोच नाही ..बाहेरूनच परतलो ..वाटेत एका एसटीडी बूथवरून ....टेलिफोन डिरेक्टरीतून त्या हॉस्पिटलचा नंबर घेतला .. तेथूनच हॉस्पिटलला फोन केला ...आपल्याकडे दाखल झालेल्या श्रीमती पुष्पा नातू यांची तब्येत आता कशी आहे हे विचारले ...रिसेप्शनिस्ट मुलीने चौकशी करून सांगितले ..अजून त्या बेशुद्ध आहेत ..आज रात्रभर जीवाला धोका आहे ..पुन्हा अवीच्या रूमवर येवून नशा ...जवळ भरपूर पैसे होतेच ..दर दोन तासांनी हॉस्पिटलला फोन करत होतो ..शेवटी त्या रिसेप्शनिस्टने विचारलेच ..आपण त्यांचे कोण आहात ..कुठे असता वगैरे ..सांगितले की मी त्यांचा मुलगा आहे ..मात्र बाहेरगावी असतो ..रात्रभर जागाच होतो ..केलेल्या कृत्याबद्दल प्रचंड अपराधीपणा वाटत होता ..पहाटे पाचलाच उठून हॉस्पिटलजवळ गेलो ..तर बाहेर माझा भाचा उभा ..मला पाहून म्हणाला ..मामा मी होतो रात्रभर इथे ..आजी अजून शुद्धीवर आलेली नाहीय ..मात्र आधा धोका टळला आहे असे डॉक्टर म्हणाले ..त्याने हळूच मला पाटली बद्दल विचारले .. त्याला म्हणालो हे लोक उगाच माझ्यावर संशय घेत आहेत ..भाच्याशी माझे संबंध मित्रासारखेच आहेत ..म्हणाला ..मामा तू कितीही सांगितलेस तरी तुझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही ..मी खरोखरच पाटली घेतली नाहीय ..माझ्या जवळ काहीच पैसे नाहीत ..असे भासवण्यासाठी त्याला म्हणालो ..कालपासून मी उपाशी आहे ..मला चहा पाज ...त्यासोबत चहा घेतला वरून पाच रुपये घेतले मुद्दाम ..तो इथेच थांब म्हणून आग्रह करत होता ..पण दिवसा इतर नातलग येतील म्हणून थांबलो नाही ..आईच्या जीवाचा धोका टाळला होता ही त्यातल्या त्यात आनंदाची बाब होती ..


खिश्यात पैसे उरले आहेत तो पर्यंत आपणही एखाद्या दवाखान्यात दोन तीन दिवस दाखल होऊन तेथे टर्की काढावी ..आणि व्यसन बंद करावे असे मनाशी ठरवून ..अविसोबत पंचवटीत असलेल्या आयुर्वेदिक दवाखान्यात जाऊन तेथे दाखल झालो ..मात्र जवळ माल होता तो पर्यंत तिथे थांबलो ..दुसऱ्या दिवशी सकाळी माल संपल्यावर टर्की सुरु झाली तसा ..कोणालाही न सांगता तेथून सटकलो .....अवीच्या रूमवर आलो खिश्यात जेमतेम दोन हजार रुपये शिल्लक होते ..म्हणजे मी तीन दिवसात सहा हजार रुपये उडवले ...आई शुद्धीवर येवून तिला आजच डिस्चार्ज मिळणार होता हे समजले होते ..संध्याकाळी आता आईला घरी नेले असेल ..तसेच घरच्या लोकांच्या मूडचा अंदाज घ्यावा म्हणून भावाकडे फोन केला ..माझ्या मोठ्या बहिणीने तो उचलला .. ती आईची अशी बातमी समजल्यावर अकोल्याहून आली असावी ...फोनवर माझा आवाज ओळखून मला रागवायला सुरवात केली ..तुला लाज वाटायला हवी ..असा नीचपणा केलास कसा ?..यापुढे तू आम्हाला मेलास असे म्हणू लागली ..ते ऐकून वैतागलो ..फोन मानसीला दे म्हणालो तर म्हणाली ..या पुढे मानसी तुझ्यासोबत राहणार नाही असे आम्ही ठरवलेय ..तुझी लायकी नाहीय बायको मूल सांभाळायची ..हे ऐकून मात्र मी उखडलो ..तिला म्हणालो तुम्ही माझ्या संसारात ढवळाढवळ करू नका ..मानसीला जर तुम्ही माझ्यापासून दूर केलेत तर मी सर्वांचा बदला घेईन . ..या पूर्वी असेच अनघाला तुम्ही माझ्यापासून हिरावून घेतले आहे..त्याचाच परिणाम म्हणून मी अजून सुधारलो नाहीय ..वगैरे ..फोन वर सर्वाना शिव्या घालू लागलो ..माझी बडबड ऐकून ताईने घाबरून फोन ठेवून दिला ...माझेही डोके फिरले होते .. अपराधीपणाची भावना वाढली होती ..त्यात रागाचीही भर पडली ....अवीच्या रूमवर जावून खूप दारू प्यायलो ..वर ब्राऊन शुगर ..जवळ आता फक्त १०० रुपये शिल्लक होते आणि पाच पुड्या ..आत्महत्या करावी असा विचार मनात घर करू लागला ..द्कानातून एक नवी ब्लेड विकत घेतली ..मरायचेच तर भावाच्या घरासमोर जावून मरू असा विचार केला ..रात्री अकरा वाजता ..खूप दारू प्यायलेल्या अवस्थेत ..भावाच्या घराची बेल वाजवली ...कोणी दार उघडण्यापूर्वीच ब्लेडने डाव्या हाताच्या मनगटावर मोठी चीर मारली ..रक्त बाहेर पडू लागले ...भळभळ वाहू लागले ..खाली जमिनीवर रक्ताचे थारोळे जमत होते ..वाहिनींनी दार उघडले ..त्यांचे लक्ष आधी जमिनीवर पडलेल्या रक्ताच्या थारोळ्याकडे गेले ..त्या मोठ्याने किंचाळल्या ...तसे घरातून भावू ..मोठी बहिण वगैरे बाहेर आले ..मला पाहून भावू म्हणाला ..तू इथे कशाला आलास ..आता तरी आम्हाला सुखाने जगू दे ..तू ताबडतोब इथून निघून जा नाहीतर मी आत्ताच्या आता पोलिसांना बोलावतो ..ते ऐकून तेथे थांबलो नाही ...तसाच रक्ताळलेला हात घेवून ...,रस्त्यावर आलो ..सगळे रक्त वाहून गेल्याशिवाय आपल्याला मरण येणार नाही हे माहित होते ....तेथून मेरीच्या बस स्टॉप वर येवून बसलो ....अंधारातच खिश्यातील उरलेली क्वार्टर लावली ..एक पुडी प्यायलो ..सुमारे तासभर थांबून पुन्हा भावाच्या घरी गेलो ..ब्लेडने कापल्यावर खोल जखम झाली होती हाताला मात्र नेमकी शीर कापली गेली नव्हती ..त्यामुळे आता रक्त कमी येत होते ..या वेळी माझ्या भाच्याने दार उघडले ..त्याने सरळ मला आत बोलाविले ..म्हणाला आधी हाताच्या जखमेवर मलमपट्टी तरी कर ...मला पाहून मानसीने रडणे सुरु केले ....आई बहुधा आतल्या खोलीत होती ..भाच्याने जखमेत हळद भरली ..काहीतरी बडबड करत नशेत मला झोप लागली ..


सकाळी उठल्यावर आधी खिश्यात उरलेल्या ब्राऊन शुगरच्या तीन पुड्या शिल्लक आहेत की नाही याची खात्री करून घेतली ..मानसीला म्हणालो ..मी इथे थांबू इच्छित नाही ..तू पण माझ्याबरोबर आपल्या घरी चल..तेव्हा वाहिनी म्हणाल्या या पुढे मानसीला आणि सुमितला आम्ही तुमच्या सोबत राहू देणार नाही ..तुम्ही त्यांचा जीव घ्यायला देखील कमी करणार नाही ..भावू देखील विरोध करू लागला ..मानसीला विचारले की तुझे काय म्हणणे आहे ? तर ती काहीही न बोलता नुसतीच रडू लागली ..मग म्हणालो ..माझी बायको आणि माझा मुलगा आहे ..ते माझ्या सोबतच राहतील ..मी समर्थ आहे त्यांना पोसायला ..वगैरे बडबड करत पुन्हा भावावर आरोप करणे सुरु केले ..सगळे वेड्या सारखेच चालले होते माझे ..शेवटी मानसी आणि सुमितला घेवून ऑटो करून आमच्या घरी आलो ..मानसी सारखी रडत होती ..तिला समजावत होतो ...शपथा घेत होतो ...मनगटाच्या जखमेतून बरेच रक्त गेल्यामुळे मला अशक्तपणा जाणवत होता ..दोन पुड्या मारून पुन्हा झोप लागली ...दुपारी तीन वाजता ..उरलेली शेवटची ब्राऊन शुगरची पुडी संडासात ओढत बसलो असताना दाराची बेल वाजली ..मानसीने दार उघडण्याचा आवाज आला ..मग संडासा बाहेरून मला म्हणाली ..तुमच्याकडे कोणीतरी आलेय ...मला काही अंदाज येईना कोण असेल ते ..एखादा मित्र असेल या विचाराने पुडी संपवून बाहेर आलो ..तीनचार अनोळखी माणसे बसलेली...मला पाहून त्यातील एकाने उठून माझ्या खांद्यावर हात ठेवला ...मला म्हणाला ..तुमच्या आईने आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्याबद्दल चौकशीसाठी तुम्हाला पंचवटी पोलीस स्टेशनला साहेबांनी बोलावले आहे ..एकदम भानावर आलो ..म्हणजे हे पोलीस होते तर ..डोक्यात पटकन विचारचक्र फिरू लागले ..सुटका कशी करावी ..पाणी पिण्याच्या निमित्ताने आत स्वैपाक घरात जावू न आणि सरळ गँस सिलेंडरची नळी काढून सगळे पेटवून देईन अशी धमकी द्यावी असा विचार पक्का झाला ..त्यांना म्हणालो जरा पाणी पिवून येतो मी ..ते पोलीस पक्के होते ..अजून एकाने उठून माझ्या कमरेत हात घातला ..म्हणाले ..आता पाणीबिणी काही नाही ..सरळ चल आमच्या सोबत चौकीत ..माझा नाईलाज झाला ..मला धरून त्यांनी बाहेर आणले ..मानसीच्या कडेवरचा सुमित आणि मानसी देखील रडत होती ..त्याच्याकडे पाहून क्षणभर जीव गलबलला माझा ..जिना उतरून खाली आल्यावर त्यांनी मला ऑटोत बसवले .


( बाकी पुढील भागात )

===================================================================


सेन्ट्रल जेल ! ( पर्व दुसरे -भाग ११० वा )

ऑटोत बसता बसता माझे बाहेर लक्ष गेले ..एका कोपऱ्यात घाबरलेल्या मुद्रेने मानसीचा धाकटा भाऊ उभा होता ..म्हणजे हे महाशय देखील आले होते तर येथे .. ..ऑटो पंचवटी पोलीस स्टेशनला न थांबता ..पुढे सरळ सीबीएस कडे जाऊ लागली तेव्हा मी त्या पोलिसांना विचारले ....पंचवटी पोलीस स्टेशन मागे पडले ..तुम्ही मला नक्की कुठे नेताय ? त्यातला जरा वयस्कर वाटणा-याने उत्तर दिले ..आपण कोर्टात जात आहोत ..तेथे साहेब भेटतील तुला ..कोर्टाच्या आवारात खाली उतरून पुन्हा एकाने माझा हात पकडला ..एकाने खांद्यावर हात टाकला ..हळूच कानात म्हणाला ..खबरदार जर काही गडबड केलीस तर ..गुपचूप त्यांच्या सोबत चालू लागलो ...वरच्या मजल्यावर पाटी होती ..न्यायदंडाधिकारी वर्ग १ ..बाहेर बरीच गर्दी होती त्या खोलीच्या ...एकाने आत जावून काहीतरी माहिती घेतली ..मी व्हरांड्यातून खालच्या आवारातील गर्दी पाहत असताना ..माझा मोठा भाऊ देखील दिसला मला तिथे ..तो आमच्याच दिशेला पाहत होता ...प्रकरण हळू हळू ध्यानात येत होते ..म्हणजे बहुतेक पोलीस स्टेशनला माझी तक्रार ..मी काल संध्याकाळी बहिणीला फोन वर भांडून धमक्या दिल्यावरच केली गेली असावी ...मग व्यवस्थित मी घरी निवांत आहे अशी बातमी पोलिसांना कळविल्यावरच पोलीस घरी आले असावेत ..म्हणजे मानसीला हे सगळे माहित होते तर ..पण ती माझ्यापासून काहीच लपवत नाही कधीच ..हे मात्र माझ्यापासून लपवले गेले होते ..तरीच मानसी सकाळपासून सारखी रडत होती ..तिला बरेचदा रडण्याचे कारण विचारले .सांगितले नव्हते तिने ....तिला माहित होते मला पोलीस पकडून नेणार आहेत ते ..म्हणून रडत होती ..मात्र मला सांगितले तर मी पळून जाईन म्हणून मला सांगत नव्हती ..


अर्ध्या तासाने माझ्या नावाचा पुकारा झाला ..तसे त्या पोलिसांनी मला आत धरून नेले ..सरळ उभा राहा म्हणाले ..समोर एक तिशीची स्त्री न्यायधीश होती ..तिने तिच्या समोरच्या कागदपत्रावर एक नजर टाकली ...मग मला विचारले ..' तुला पोलिसांनी मारहाण वगैरे केली का ? तसे काही घडले नव्हते ..म्हणून मी नकारार्थी मान हलवली ..मग जामीन आणलाय का असे विचारले ? मी पुन्हा नकारार्थी मान हलवली.. तिने समोरच्या एका कागदावर सही केली .. मला बाहेर आणले गेले ..बाहेर आल्यावर पोलिसांनी माझ्याकडे दोन कागद दिले ..कुतूहलाने मी माझ्यावर कोणती केस लावली गेली ते पाहत होतो ..एका कागदावर शुद्ध मराठीत टाईप केले गेला होते ..त्यात अर्जदार म्हणून सौ .मानसी तुषार नातू असे नाव होते ..पुढे माझे पती श्री .तुषार पांडुरंग नातू ..हे मला रोज पैसे मागतात ..मला मानसिक व शारीरक त्रास देतात ..अशा प्रकारचा मजकूर होता ..खाली मानसीची सही ..दुसऱ्या कागदावर माझ्यावर भारतीय दंड विधान कलम ४९८ अन्वये गुन्हा दाखल करणायत येवून मला चौकशीसाठी १५ दिवस न्यायालयीन कस्टडी सुनावली होती ..म्हणजे आता पंधरा दिवस मला सेन्ट्रल जेल मध्ये राहावे लागणार होते तर ..एकदम सुन्न झालो ..दुपारी पोलिसांनी नुसतेच साहेबांनी चौकशीला बोलावले आहे असे सांगितले होते मला ..मला वाटले होते साहेबांकडे चौकशी झाली कि मला सोडून देतील ..माझ्या हुशारीने मी साहेबाना बरोबर पटविन वगैरे ...आता सगळे उघड झाले होते ..अतिशय व्यवस्थित प्लान करून सगळे झाले होते ..मी आईला ..भावाला पैसे मागून नेहमी त्रास देत होतो हे खरे होते ..मानसी नोकरी करत नव्हती किवा माहेरहून देखील ती पैसे आणून मला देईल अशी स्थिती नव्हती ..त्यामुळे मी तिला पैसे मागतो ..शारीरिक- मानसिक छळ करतो वगैरे गोष्टी मला अमान्य होत्या ..परंतु बहुधा ..स्त्री अत्याचाराची केस अधिक मजबूत होते म्हणून मानसीवर सर्व कुटुंबीयांनी दबाव आणून तीला माझ्याविरुद्ध फिर्याद करण्यास भाग पाडले असावे ..तसेच त्या केस मध्ये साक्षीदार म्हणून माझा भावू ..वाहिनी ..खालच्या मजल्यावर राहणारे एक वृद्ध जोडपे यांच्या सह्या होत्या ..सगळेच माझ्या विरुद्ध होते तर ..सगळे फासे उलटे पडले होते ...


पोलीस मला खाली प्रांगणात घेवून आले ... मला टर्की सुरु होत होती ..दुपारी प्यायलेल्या शेवटच्या पुडीचा परिणाम कमी होत आला होता ..कोर्टातून बाहेर पडत असताना ..समोर भावू आला ...त्याचा चेहरा जरा घाबरलेलाच होता ..पोलीस त्याला म्हणाले ..१५ दिवस सेन्ट्रल जेल ..त्याला पाहून लगेच मी म्हणालो ..' किती दिवस ठेवणार जेलमध्ये ..कधीतरी बाहेर येईनच ..मग पाहतो तुमच्या सगळ्यांकडे ' ..मी त्याला सरळ सरळ धमकी देत होतो ..ते पाहून एका पोलिसाने माझ्या पाठीत एक जोरदार गुद्दा मारला ..गुपचूप चल म्हणाला .. ..सीबीएस वरून ऑटो करून आमची वरात निघाली नाशिकरोड सेन्ट्रल जेलकडे ..पूर्वी पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल मध्ये असताना ..आम्ही जिमखाना ग्राउंड वर क्रिकेट खेळायला वगैरे जात असू तेव्हा सेन्ट्रल जेल वाटेत लागे ..ते मोठे गेट बाहेरून अनेकदा पहिले होते ..कुर्बानी सिनेमाचे शुटींग तिथेच झाले होते ..त्यावेळी ते शुटींग पाहायला देखील गेलो होतो ..तेव्हा त्या उंच भिंतीमागे आत कसे जग असेल याचे कुतूहल होते मला ..आता ते कुतूहल देखील पूर्ण होणार होते तर ...मला मुख्य भीती होती ती टर्कीची ..कारण गेल्या पाच सहा दिवसात पाटली विकून मिळालेल्या पैश्यात भरपूर ब्राऊन शुगर प्यायलो होतो ..त्याचा सगळा त्रास होणार होता ..


( बाकी पुढील भागात )

बुधवार, 11 दिसंबर 2013

वास्तव


इन्फेक्शन वार्ड !  ( पर्व दुसरे -भाग १०१ वा ) 


सेन्ट्रल जेलचे दोन शिपाई आणि शासकीय रुग्णालयाचे दोन वार्ड बॉय यांनी मिळून मला स्ट्रेचर वरून खाली उचलून एका अंधाऱ्या जागेतील पलंगावर नेवून अक्षरश: आदळले ..मग माझ्या दोन पायात अडकवलेली बेडी एका पायातून सोडवून शिपायाने त्या बेडीचे दुसरे टोक ..पलंगाच्या दांडीला अडकवले ....' मला सोडा..मला मरू द्या ..मला जिवंत राहायचे नाहीय ..असे मी ओरडत होतो ..किंचाळत होतो ..एकाने माझ्या सणसणीत मुस्काटात लगावली ..' भोसडीच्या आमची नोकरी घालवत होतास ' ..असे म्हणत मला लाखोली वाहायला सुरवात केली...बेडी नीट पायात अडकलीय ना ..हे तपासून ते त्या खोलीच्या बाहेर पडले बाहेरून गजांच्या दाराला कुलूप लावले .. माझ्या नजरे समोरून दूर झाले ..मी तसाच किंचाळत होतो ..मला मरायचे आहे असे ओरडत होतो ..किती वेळ असा ओरडत होतो कोण जाणे ..घशाला कोरड पडली होती ..तरीही घसा खरवडून मी बोंबलत होतो ..तितक्यात एक सिस्टर आतील वार्डातून बाहेर आली ...क्षणभर ओरडणे थांबले ..तिच्या हातात इंजेक्शनची सिरींज दिसली ..पुन्हा ओरडलो ..मला मारून टाका ...मला जिवंत ठेवू नका ...सिस्टरला पाहून त्या शिपायांनी पुन्हा ते गजांचे दार उघडले ...मला पलंगावर दाबून धरले ..सिस्टरने माझ्या दंडावर कापसाचा बोळा फिरवून ..दंडात सुई खुपसली ...आत सिरींजमधील द्राव जात असल्याची क्षीण जाणीव होत होती ..मी उसळून उठण्याचा प्रयत्न केला ..पण त्या शिपायांनी घट्ट दाबून धरले होते मला ..इंजेक्शन देवून सिस्टर निघून गेली ...बराच वेळ मला त्या शिपायांनी तसेच दाबून धरले होते ..शेवटी माझा प्रतिकार कमी होत गेला ..फक्त ओरडणे सुरूच राहिले ..निर्विकारपणे ते शिपाई माझ्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करत ..पुन्हा गजांच्या दाराला बाहेरून कुलूप लावून दिसेनासे झाले ...मी ओक्साबोक्शी रडू लागलो ...खोलीत माझ्या डोक्यावर एक झिरोचा मंद बल्ब जळत होता ..बाहेरच्या ट्युबलाईटचा प्रकाश माझ्या तोंडावर आला ..कोणीतरी व्हरांड्यातील ट्यूब लावली होती ...हळू हळू माझी शुद्ध हरपली .

सगळे अंग दुखत होते ..अगदी कुशीवर वळणे देखील कठीण झाले होते ..खोल अंधाऱ्या गुहेतून आल्या सारखा माझ्या डाव्या बाजूने एक घोगरा आवाज आला ..मी हलकेच मान वळवली ...डोळे उघडण्याचा प्रयत्न केला ..डोळ्यांच्या पापण्या जड झालेल्या होत्या ..कसेतरी पापण्या उघडून आवाजाच्या रोखाने पहिले ..एकदम बिचकलो ..एक जाड पांढऱ्याझुबकेदार मिश्या असलेला काळा कुळकुळीत माणूस माझ्या बाजूच्या बेडवर होता ..कोणती केस आहे तुझी ..असे मला विचारात होता ..मी उत्तर देणे टाळले ..नजर थोडी खाली गेली ..त्याच्या पलंगाखाली एक जयपुरी फुट होता ..म्हणजे हा माणूस लंगडा होता तर ..पुन्हा वर पहिले त्याचा म्हातारा देह अस्थिरपंजर झालेला ..मात्र आवाज अगदी करारी भीतीदायक ..त्याला खोकल्याची उबळ आली ..जोरजोरात खोकू लागला ..पलंगावर उठून बसून तो तोंडावर हात ठेवून जीवघेणे खोकत होता ...उबळ थांबल्यावर त्याने गादीखालून बिडी बंडल काढले ..तसे माझे डोळे चमकले ...थोडासा मागे सरकून मी पलंगाच्या दांडीला टेकून बसण्याचा प्रयत्न केला .. एका पायात अडकवलेली बेडी काचली ..तसाच पाय लांब ठेवून अर्धवट उठून त्याच्याकडे बिडी मागू लागलो ..तो नुसताच माझ्याकडे रोखून पाहत बिडी ओढत राहिला ...मी लाचारीने त्याच्या तोंडाकडे पाहत होतो ..अगदी शेवटी ..त्याने जवळ जवळ ९० टक्के ओढून संपवलेले बिडीचे जळते थोटूक माझ्या हाती दिले ..ते थोटूक बोटात नीट पकडता देखील येत नव्हते ..बोटाला चटके बसत होते ..तसाच एक बिडीचा झुरका मारला ..ओठांना देखील चटका बसला ..अजून एक झुरका मारून ते थोटूक खाली फेकले ..आढ्याकडे पाहत पडून राहिलो .

किती तरी वेळ असाच खिन्न पडून होतो ..बाहेर पाखरांची किलबिल सुरु झाली ..तसा भानावर आलो ..कोंबड्याची एक सणसणीत बांग कानावर आली ..बहुतेक पहाटेचे पाच वाजत आले असावेत ..थंडगार वाऱ्याची एक झुळूक अंगावर शहारे उमटवून गेली ..मला प्रथमच थंडी वाजत असल्याची जाणीव झाली .. एका पायाने पायाशी असलेले लाल रंगाचे ब्लकेट अंगावर ओढून घेण्याचा प्रयत्न केला ..कशी तरी घडी उलगडली गेली मग हाताने ओढून ते अंगावर घेतले ..तसा त्याचा कुबट वास आला ..कदाचित अनेक महिने किवा वर्षे त्या ब्लँकेटला पाण्याचा स्पर्श झालेला नसावा ...बाहेरून आता फटाक्यांचे आवाज येत होते ..मला आठवले ..आज बहुतेक नरकचतुर्दशी होती ....पुन्हा रडण्याचा उमाळा आला ..मी घुसमटल्यासारखा रडू लागलो ...हुंदक्यांनी सर्व शरीर हलत होते माझे ..ते पाहून तो बाजूचा माणूस म्हणाला ..' आता रडून काय फायदा ...३०२ केला की ३०७ .." मी रडता रडता केविलवाण्या नजरेने त्याचाकडे पाहत होतो ..बहुतेक तो मला खुनी ..गुंड समजत असावा . नकारार्थी मान हलवली ..त्याच्या कडे पाठ करून पडून राहिलो ..आता बाहेर फटफटत होते ...आतल्या वार्डातून सँन्डलचा आवाज करत मघाची सिस्टर हातात स्टीलची पेटी घेवून आली ..गजांच्या दाराबाहेर उभे राहून ..कोणाला तरी हाक मारली ..तसे बाहेरून रात्री मला येथे आणणारे जेलचे शिपाई बाहेरून आत आले ..आता त्यांच्या अंगावर खाकी ओव्हरकोट होता ..दाराचे कुलूप काढून ते आता आले ..मागोमाग सिस्टर ..बघू कुठे कापलेय ..म्हणत माझ्या डाव्या मनगटावरची जखम पहिली चांगली दोन इंच जखम होती ..अरेरे ..बरेच कापलेय म्हणत तिने त्या स्टीलच्या छोट्या पेटीतून आयोडीनची बाटली काढून जखम स्वच्छ केली ..मग त्यावर मलम लावून चिकटपट्टी लावली ..पुन्हा दार बंद करून ते शिपाई नजरेआड झाले .

( बाकी पुढील भागात )
===================================================================

मँजिस्ट्रेट कस्टडी ! ( पर्व दुसरे _ भाग १०२ वा )

माझ्या व्यसनाधीनतेने अखेर मला जेलच्या दारात आणून सोडलेच ..मला पंधरा दिवस मँजिस्ट्रेट कस्टडी मिळाली होती ..माझा सगळा अहंकार नष्ट झाला ..बुद्धी चालेनाशी झाली ..सारी समर्थने शेवटी फोल ठरली ....खूप पूर्वी अल्कोहोलिक्स अँनाँनिमसच्या मेम्बर्सची अधःपतनाची शेअरींग्स ऐकताना वाटे ..हे लोक अतिरंजित कहाण्या सांगत आहेत ..आपण कितीही व्यसन केले तरीही आपल्यावर जेल मध्ये जाण्याची ..रस्त्यावर झोपण्याची ..भिक मागण्याची वेळ कधीच येणार नाही ..आपण काही तेव्हढे मूर्ख नाही ..आपण मनात येईल तेव्हा व्यसन थांबवू शकतो ..जास्त नुकसान होऊ लागल्यावर आपण कंट्रोल करू शकतो ..वगैरे ..मात्र आता पूर्वी ऐकलेल्या सगळ्या गोष्टी माझ्याबाबत घडून चुकल्या होत्या ..मी अपवाद ठरू शकलो नाही ...मला नकळत झालेल्या म्हणा किवा मी स्वतःहून ओढवून घेतलेल्या व्यसनाधीनता या आजाराने मी शेवटी कायद्याच्या कचाट्यात सापडलोच होतो ...आता एकही पत्ता माझ्या हाती राहिला नव्हता ..जे जे घडेल त्याला तोंड देणे हा एकच पर्याय शिल्लक राहिला होता ..

मुक्तांगण सोडून नाशिकला राहायला आल्यावर सुरवात तर सगळी छानच ..माझ्या मनासारखी झाली होती ...भावाने मला सांगितल्याप्रमाणे अनिल या त्याच्या मित्राच्या ए. बी . लोढा या कंस्टूक्शन कंपनीत कामाला लावले होते ..अनिल हा भावाचा अगदी पुण्यात इंजिनियरिंग कोलेजला शिकत असल्यापासुंचा जुना मित्र ..माझा मोठा भावू पण स्वतची इरिगेशन खात्यातील सांभाळून या मित्राकडेच नकाशे बगैरे बनवून देण्याचे ..साईटवर देखरेख वगैरे करण्याचे काम करीत असे ..तुषार आपल्या डोळ्या समोर राहील ..त्याच्यावर लक्ष ठेवता येईल या हेतूने त्याने मला तेथे नोकरी लावून दिली होती ..अनिल साहेबाना बहुधा माझ्या बद्दल सगळे माहित होते .. मी बिघडलेला आहे ..ब्राऊन शुगरचा व्यसनी आहे ..तरीही भावाकडे पाहून त्यांनी मला कामाला ठेवले..वर भावाला म्हणाले ' तू सांगशील तितका पगार मी तुषारला देईन ..भाऊ साधा आणि सालस असल्याने त्याने सध्या जास्त देवू नकोस ..तुषार जसा जसा कामात प्रगती करेल तसा पगार वाढव त्याचा ...असे सांगत माझा पगार तीन हजार रुपये महिना ठरवला होता ..मुक्तांगण मध्ये तेवढेच मिळत ..शिवाय इथे मला घरभाडे पडणार नव्हते ..आईच्या नावावर असलेल्या फ्लँट मध्ये आई सोबत मी मानसी ..सुमित राहू लागलो ..मी पुण्याला असताना पूर्वी विश्वदीप आई सोबत पेइंग गेस्ट म्हणून रहात असे ..त्याची आता दुसऱ्या गावी बदली झाली होती ..माझा अकोल्याचा भाचा आनंद इलेक्ट्रिक इंजिनीअर होऊन सध्या खाजगी नोकरी करत होता नाशिकला ..तो देखील आमच्या सोबत रहात असे ..सुमारे महिनाभर सारे सुरळीत चालले ..मी ठरवल्या प्रमाणे नाशिकला आल्यावर ब्राऊन शुगर पिणे बंद केले होते ..नियमित सकाळी डबा घेवून कामावर साडेआठ वाजता जावू लागलो ..सायंकाळी घरी यायला सात वाजत... मित्राचा भाऊ म्हणून अनिल साहेब मला धाकट्या भावासारखेच वागवत असत ...ते स्वभावाने थोडे कडक होते ..काम सोडून उगाच फालतू गप्पा टप्पा करीत नसत बहुधा ..सुरवातीला कामाला लागल्यावर रोज सकाळी ते ऑफिस मध्ये आले की मी हातातील काम सोडून ..उठून उभा राहून त्यांना गुड मॉर्निग करत असे ..तीनचार दिवसांनी त्यांनी मला सांगितले तुषार मी तुला कामाचा पगार देतो ..मला गुड मॉर्निंग नाही केलेस तरी चालेल मात्र काम मनापासून कर ..

पहिल्या महिन्याचा पगार झाल्यावर सगळे पैसे घरी देण्याएवजी त्यातले पाचशे रुपये मी स्वतःकडेच ठेवले ..स्वखर्चासाठी ..तेथेच घात झाला ..खरेतर व्यसनमुक्तीच्या सुरवातीच्या काळात गरजेपेक्षा जास्त पैसे खिश्यात ठेवू नयेत ..जुन्या व्यसनी मित्रांना भेटणे टाळावे ..आपल्या वेळेचा आणि पैश्यांचा हिशोब घरातील जेष्ठ व्यक्तीकडे नियमित द्यावा वगैरे पथ्ये पाळावी असे सांगितले जाते व्यसनमुक्ती केंद्रात ..मी जास्त पैसे खिश्यात ठेवणे ..मित्रांना न भेटणे हि पथ्ये पाळली नाहीत ..आता मी पूर्वीसारखा कधीच वाहवत जाणार नाही हा अति आत्मविश्वास पुन्हा नडला मला ..पंचवटीत अनिल साहेबांच्या घरासमोरच आमचे ऑफिस ..थोडे पुढे मालेगाव स्टँड भागात ..भद्रकाली सारखेच दारूचे व ब्राऊन शुगरचे अड्डे होते ..मला ऑफिस मध्ये पर्चेस करणे ..ऑर्डर्स देणे ..तसेच स्वागतकक्ष सांभाळणे अशी कामे दिली गेली होती ..पगार झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मी पेंट पर्चेस करण्यासाठी मालेगाव स्टँड भागात गेलो ..स्कूटर पेंटच्या दुकानासमोर लावून ...दुकानात गर्दी आहे म्हणून ..जरा बाहेर इकडे तिकडे भटकलो ..माझे दोन तीन जुने मित्र भेटलेच ..झाले लगेच गप्पा सुरु झाल्या ..गप्पा शेवटी ब्राऊन शुगरवर आल्या तेव्हा एक म्हणाला ..सध्या चंद्याकडे मस्त माल आलाय ..एकदोन दम मध्ये मस्त होतो माणूस ..ते ऐकून माझ्या अंतर्मनात सुप्त पणे वसलेले व्यसनाचे आकर्षण पुन्हा जागृत झाले ..फक्त आजच्या दिवस म्हणत मी त्यांच्या सोबत ब्राऊन शुगर प्यायलो ..तेथून माझ्या आयुष्यातील शेवटच्या विनाशाला सुरवात झाली .

( बाकी पुढील भागात )

=================================================================

घरातील कलह ! ( पर्व दुसरे -भाग १०३ वा )

नेहमीसारखेच घडले ..एकदा माझ्या शरीरात तो ब्राऊन शुगरचा धूर गेल्यावर ..शरीर- मन बंड करून उठले ...अजून हवे ही मागणी सुरु झाली ...मनाचे वारू निराशेच्या अंधाराकडे उधळले ..लहानपणा पासून मनाविरुद्ध घडलेल्या घटना ....वंचना ..अनघाला गमावणे ...जीवनाची झालेली धूळधाण ..या सर्व विचारांनी अवस्थ झालेल्या मनाला सारखी नशा हवी वाटू लागली ..प्रत्येक व्यसनीचे असेच होता असावे ...व्यसनमुक्तीच्या काही काळानंतर व्यसन एकदा जरी केले तरी ..अंतर्मनात दडलेला राक्षस जागा होतो ..माझ्या बाबतीत अनेकदा असे घडूनही ..प्रत्येक वेळी आता पूर्वी सारखे होणार नाही ..असे मला वाटत राहणे ..हा आजाराच्या धूर्तपणाचा भाग होता ..मी सारखा आजाराच्या धूर्तपणाला बळी पडत होतो .. ..जवळचे पैसे संपल्यावर ...घरी आईकडे पैशाची मागणी सुरु केली ...माझे व्यसन सुरु झाल्याचे आईला समजलेच ..त्यावरून घरात रोज वाद होऊ लागले ..मानसीला बिचारी अशा गोष्टीना प्रथमच सामोरी जात होती ...तिला वाटे यांना आईने पैसे दिले नाहीत तर आपोआप यांचे व्यसन बंद राहील ..अर्थात तिला हे माहित नव्हते की आईने पैसे देणे बंद केले तर ..मी बाहेर चोऱ्या करू शकतो ..जास्त मोठे गुन्हे करू शकतो .. तुम्ही यांना पैसे देवू नका म्हणून मानसी आईशी वाद घाले ..मग आमच्या तिघांचे भांडण सुरु होई ..त्या दोघीही आपापल्या जागी बरोबरच होत्या ..चूक माझीच असे ..आमची भांडणे पाहून लहानगा सुमित रडू लागे ...त्याला समजत नसे हे काय चालले आहे ..मात्र काहीतरी विपरीत घडते आहे याची जाणीव होत असावी नक्की ..कारण आमच्या भांडणाच्या आवाजाच्या वर आवाज काढून तो रडत असे ...ते जेमतेम दीड वर्षाचे पोर असे कळवळून रडताना पाहून ..मनातून वाईट देखील वाटत असे मला ..पण सकारात्मक कृती करणे काही जमत नसे .

अनिल साहेबांकडच्या नोकरीत माझे अँडव्हांस मागणे सुरु झाले .. त्यांनी मला वापरायला दिलेल्या ऑफिसच्या स्कूटर मध्ये पेट्रोलच्या निमित्ताने ..इतर खोटी करणे सांगून पैश्यात गडबड करणे सुरु झाले ... रोज सकाळी व संध्याकाळी ठराविक डोस घेतल्याशिवाय मला चैन पडत नसे ..एकदा नशा करून झाली की पुन्हा पश्चाताप ..अपराधीपणाची भावना ..घरी मानसीची ..आईची माफी मागणे ...पुन्हा असे वागणार नाही याची शपथ घेणे ... नशा उतरली की टर्की ..निराशा ..वैफल्य आणि पुन्हा कसेही करून नशा असे चक्र सुरु झाले ...मध्ये काही दिवस पैश्याचे खूप वांधे झाले की स्पाज्मो प्राँक्सीव्होन च्या गोळ्या खाणे ..कामावर दांड्या मारणे ..पुन्हा दारू ..गांजा ..ब्राऊन शुगर अश्या चक्रात अडकलो पूर्ण ..मध्ये एकदा नाशिकला फॉलोअप साठी मुक्तांगणचे समुपदेशक आले ..तेव्हा त्यांना भेटून सर्व काही आलबेल आहे असे खोटे सांगून ..पूर्वी मुक्ता मँडमने सांगितल्या प्रमाणे मुक्तांगणच्या नोकरीचा राजीनामा देखील लिहून दिला त्याच्या जवळ ..डॉ .नरेंद्र दाभोलकर यांना देखील पत्र पाठवून ..सामाजिक कृतज्ञता निधीचे मला मिळणारे मानधन बंद केले जावे ..मी आता व्यसनमुक्तीचे कार्य करत नाहीय ..ते मानधन दुसऱ्या योग्य अशा कार्यकर्त्याला दिले जावे असे कळवले ..माझ्या वागण्याला काही धरबंद राहिला नव्हता ....पाहता पाहता नाशिकला येवून मला सहा महिने उलटून गेले ..एकदा मानसीने वैतागून माहेरी निघून जाण्याची धमकी दिली तेव्हा ..तिच्या समाधानासाठी ..मुक्तांगणला फोन केला ..बाबांना कळवले की माझे व्यसन सुरु झालेय परत ..बाबांनी मला पुन्हा उपचार घे असे सुचवले ..त्या नुसार एक महिना मुक्तांगणला जावून राहिलो ..आता मुक्तांगण नव्या जागेत म्हणजे मेंटल हॉस्पिटलच्या जागेतून विश्रांतवाडी जवळ शिफ्ट झाले होते ..स्वतःच्या मालकीच्या जागेत ..

बघता बघता मुक्तांगण मधील ३५ दिवसांचे उपचार पूर्ण केले ..मी अजून काही महिने तेथेच रहावे असे आई ..मानसी व सर्वांचे म्हणणे पडले ..मात्र माझी अक्कल अजून ठिकाणावर आलेली नव्हती .. ..हट्टाने डिस्चार्ज घेवून पुन्हा नाशिकला आलो ..आधी दारू आणि नंतर पुन्हा सगळी व्यसने सुरु झाली ..अनिल साहेबांची नोकरी होतीच ..माझ्या वर्तनाला अनिल साहेब देखील कंटाळले असावेत ..तरीही सुहासचा भावू म्हणून ते मला सहन करत होते ..तसेच नवीन संसार आहे ..याला नोकरीवरून काढले तर बिचाऱ्या पत्नी मुलाचे हाल होतील ..ही भावना देखील होतीच त्याच्या मनात ..अनेक दारूड्यांची नोकरी केवळ त्यांच्या बायका पोरांकडे पाहून टिकते ...एकदा तर व्यसनासाठी पैसे नसताना ..पुण्याला घेतलेली लुना व माझी जुनी सायकल भंगारवाल्याला अक्षरशः किलोच्या भावाने विकली ..एकदा माझ्या रोजच्या पैश्यांच्या मागणीला कंटाळून आई काही दिवस भावाकडी राहायला गेली असताना ..मानसीशी गोड गोड बोलून तिच्या कानातले सोन्याचे डूल मागून घेतले ...एकाचे कर्ज फेडायचे आहे असे सांगून ते डूल विकले ..तिनेही फारशी कुरकुर न करता ..या नंतर मी चांगला वागेन या माझ्या खोट्या आश्वासनावर विसंबून मला ते डूल दिले ..मग नंतर माझ्या लग्नात आहेर म्हणून आलेल्या वस्तूंची मोठी पेटी उघडली ..त्यातील मिल्क कुकर ..फ्राय पँन ..शर्टपीस ..पँटपीस ..नॉन स्टिक वेअरची भांडी ..वगैरे एक एक करून व्यसनासाठी विकली ...!

( बाकी पुढील भागात )

( टीप - ज्या प्रमाणे एखाद्या हॉरर सिनेमाच्या सुरवातीला ..यांचे हृदय कमकुवत आहे अशा व्यक्तींनी हा सिनेमा पाहू नये अशी सूचना देतात ..त्या धर्तीवर ..जे भावनाप्रधान आहेत ..ज्यांना व्यसनी व्यक्तीचा तिटकारा आहे ..अश्या व्यक्तींनी हे वाचून अवस्थ होऊ नये अशी सूचना द्यावीशी वाटते ..तर जे दारू अथवा इतर मादक पदार्थांचे थोडेफार सेवन करतात त्यांनी सावध व्हावे ...मी जे काही लिहितोय तो माझा भूतकाळ आहे ..गेल्या नऊ वर्षांपासून मी व्यसनमुक्त असून ..मानसी ..सुमित ..माझी आई ..भावू ..पुतणे ..बहिण ..भाचे व इतर नातलग ..सगळे माझ्या बाबतीत समाधानी आहेत ...त्यांनी मला मोठ्या मनाने माफ केलेय ..आजच मी व्यसनमुक्तीची नऊ वर्षे पूर्ण केली आहेत ..सध्या मी नागपूर येथे ' मैत्री व्यसनमुक्ती केंद्र . या माझा मित्र रवी पाध्ये याने सुरु केलेल्या व्यसनमुक्ती केंद्रात वरिष्ठ समुपदेशक म्हणून यशस्वीपणे काम करतोय . हे माझ्या जीवनातील अत्यंत खाजगी पान केवळ व्यसनाधीनता हा किती भयानक आजार आहे हे वाचकांना सांगण्यासाठी लिहितोय ..यातील शब्द न शब्द खरा आहे )

=============================================================

शर्मनाक ..लाजिरवाणे ..इत्यादी ! ( पर्व दुसरे - भाग १०४ वा )

दिवसेंदिवस माझी परिस्थिती बिघडत चालली होती ...पैसे मिळविण्याचे नवीन नवीन मार्ग रोज शोधावे लागत ...माझा सगळा पगार..कामावर लबाडी करून मारलेले पैसे ..आईची पेन्शन ..सगळे मला व्यसनाला अपुरे पडत होते ..आई भावाकडून काही तरी कारणे सांगून घरखर्चासाठी पैसे घेवून कसेतरी घर चालवीत होती ..व्यसनी व्यक्तीला कोणाच्याच भावनांशी काहीही घेणे देणे नसते ..फक्त मी ..माझे व्यसन ..माझ्या भावना ..अशी आत्मकेंद्रित अवस्था होत जाते ...मध्येच कामावर दांडी मारून गर्दुल्ल्या पाकीटमार मित्रांसोबत फिरे ..त्यांना माझ्या सारखा जरा बरा दिसणारा ..बोलणारा ..व्यक्ती सोबत हवाच असे ...स्वतः जरी कधी पाकीट मारण्याचे धाडस केले नाही ..तरी त्यांचा साथीदार म्हणून वावरलो ...एका मित्राला आग्रह देखील केला ..मला पिक पाँकेटींग शिकव म्हणून ..,..पण त्याने मला सावध केले ..म्हणाला ..' अभी हम तो इसी में मर जायेंगे ....तू मत कर ये काम ..बहोत बद् दुवा लागती है लोगो की ' ...त्याचेही म्हणणे बरोबर होते ....माझ्या अनेक पाकीटमार मित्रांपैकी बहुतेक जण अतिशय वाईट अवस्थेत फुटपाथ वर मरण पावले नंतर ...एकाने तर नंतर मी धुळ्यात ' संकल्प ' व्यसनमुक्ती केंद्रात असताना ..माझ्या मांडीवरच प्राण सोडला होता ..पैसे मिळविण्यासाठी मी वाट्टेल त्या थराला जाण्यास तयार झालो होतो ...घर खर्चाला पैसे हवेत म्हणून आईने वयाच्या ६२ व्या वर्षी ..तिच्या एका मैत्रिणीच्या भांड्यांच्या दुकानात पार्ट टाईम नोकरी सुरु केली ..मला त्याचीही लाज वाटेनासी झाली होती .

एकदा असाच घरून भांडून पैसे घेवून जावून ..ब्राऊन शुगर पिवून घरी यायला निघालो ..दुपारचे कडक उन पडलेले ...पैसे उरले म्हणून स्पेशल ऑटो करून घरी येत होतो ..तितक्यात घराच्या एक किलोमीटर अलीकडे ..मानसी दिसली ..एका सोसायटीच्या गेट मधून बाहेर पडत होती ..भर उन्हात ही कुठे फिरतेय कळेना ..उन लागू नये म्हणून तिने डोक्यावर साडीचा पदर घेतलेला ...ऑटोवाल्याला तिच्याजवळ ऑटो थांबवायला सांगितला ..ऑटो तिच्या जवळ थांबल्यावर म्हणालो कुठे निघालीस इतक्या उन्हात ...ऑटोत मला पाहून एकदम बिचकली ....' कुठे नाही ..जरा काम होते ' असे पुटपुटली..मी तिला ऑटोत बस चल घरी जावू असे म्हणालो तर ..' मला अजून काम आहे ..तुम्ही जा पुढे ..सुमित झोपला आहे ' असे म्हणाली ..तिच्या हातात एक थैली होती ..त्यात काहीतरी वजनदार असावे असे दिसत होते ..मी आग्रहाने तिला ऑटोत बसवून घेतले ..कुठे गेली होतीस ..काय काम आहे अजून ..असे खोदून खोदून विचारले ..मात्र ती सांगायला आढेवेढे घेत होती ..शेवटी तिच्या हातातील पिशवी काढून घेतली ..त्यात काय आहे हे बघू लागलो .. त्यात ..तिखट ..मसाले ..हळद ..चहाचा मसाला ..वगैरेच्या छोट्या छोट्या १०० ग्रँम ..२०० ग्रँमच्या पुड्या ...त्यावर कुठल्या तरी स्थानिक कंपनीचे लेबल होते ...हे काय ? कुठे चालली होतीस हे घेवून ? असे विचारल्यावर ..रडू लागली ..म्हणाली ' घर खर्चासाठी पैसे कमी पडतात ... आईंची खूप ओढाताण होते ..तेव्हा त्यांच्या मागे लागले होते मी नोकरी करते कुठेतरी म्हणून ..तर म्हणाल्या ..नोकरी नको करूस ..सतत बांधल्या सारखे होते ..सुमित अजून लहान आहे ..तू त्याच्याकडे लक्ष दे ..तुला काही करायचेच असेल तर माझ्या मैत्रिणीची तिखट ..हळद ...मसाले निर्मितीची घरगुती उत्पादने आहेत ..त्या पुड्या विक हवेतर ..घरोघरी जावून फावल्या वेळात ..एका पुडीवर एक ते दोन रुपये कमिशन मिळते मला ..आईंनी तुषारला हे अजिबात कळू देवू नकोस असे बजावले आहे . ..कारण तुम्हाला समजले ..तर तुम्ही हे पैसे देखील भांडून घ्याल माझ्या कडून अशी भीती आहे त्यांना ' ..मी थक्कच झालो ..काय बोलावे ते सुचेना ..हे म्हणजे ...गरीब भांडी घासणाऱ्या मोलकरणीच्या दारुड्या नवऱ्या सारखेच होते ..ती बिचारी फाटक्या संसाराला ठिगळ म्हणून चार घरी धुणी भांडी करून पैसे कमावते ..आणि तो दारुडा नवरा ..तिच्याशी भांडून तिचे पैसे हिसकावून घेतो ..दारुड्या नवर्याला ती मोलकरीण नेमके किती उत्पन्न आहे हे सांगत नाही ....कारण ते पैसे देखील सुरक्षित नसतात ...स्वतःची लाज वाटली मला त्यावेळी ..माझ्या व्यसनापायी ..माझ्या पत्नीवर दारोदार ...मसाले विकत फिरण्याची वेळ आलेली होती ...आता या पुढे मी व्यसन करणार नाही असे तिला सांगून तिचे समाधान केले ..मात्र बदल काही झाला नाही वागण्यात ...आपल्या व्यसनामुळे कुटुंबीय काय काय भोगतात याची प्रत्येक व्यसनीला जाणीव होणे गरजेचे असते ..

नोकरीवर सततच्या दांड्या सुरूच होत्या ...एकदा आमच्या कॉलनीत ..माझ्या परिचयाच्या चार पाच गर्दुल्ल्यांची टोळी फिरताना दिसली ..त्यांच्या हातात एक पावती पुस्तक होते ...काय भानगड आहे ? कशाच्या पावत्या असे विचारले ..तेव्हा हे लोक घरो घरी ..दुकानात जावून ..एखादा देवाच्या नावाने ..उरूस ..संदल..यात्रा ..नवस ..वैगरे आहे असे सांगून लोकांकडे वर्गणी मागत फिरत होते ..त्यांची फाटकी अवस्था पाहून ..कदाचित हे सगळे खोटे आहे असे माहित असूनही ..लोक किवा दुकानदार त्यांना पाच दहा रुपये वर्गणी देत असत ..कसे तरी दिवसभरात दोनेकशे रुपये जमवून ही मंडळी त्यातून नशा भागवत असत ..चांगली आयडिया होती ही ..मात्र मिळालेल्या पैश्यात चार पाच जणांचा हिस्सा असे ...त्यांची ही भानगड समजल्यावर माझे डोके वेगाने काम करू लागले .आपणही असे काहीतरी एकट्याने केले पाहिजे असे वाटू लागले ...शिवाय जास्तीत जास्त पैसे लोकांकडून उकळता येतील अशी आयडिया सुचली पाहिजे असे वाटले ..खूप विचार करत बसलो ..कोणीही साथीदार न घेता ..अशी वर्गणी कशी गोळा करायची ? शेवटी एकदाची एक आयडिया सापडली !

( बाकी पुढील भागात )
=============================================================

अष्टविनायक यात्रा ! ( पर्व दुसरे - भाग १०५ वा )

(टीप - आजचा भाग लिहिताना मला मनाची खूप तयारी करावी लागली आहे ..व्यसनाधीनते मुळे व्यसनी व्यक्तीचे सर्वात मोठे नुकसान होते ते म्हणजे नैतिक अधःपतन ....व्यसन सुरु झाल्यावर सर्वात आधी त्याचा सदसद्विवेक त्याला सोडून जातो ..मग व्यसन मिळविण्यासाठी ...व्यसनाचे समर्थन करण्यासाठी ..व्यसनाच्या आड येणाऱ्या व्यक्तींचा सामना करण्यासाठी ..तो कोणत्याही थराचे अविवेकी वर्तन करतो ..आजच्या भागात मी जे लिहितो आहे ते ..नैतिक अधःपतनाचा नमुना आहे ...आजचा भाग लिहू की नको हा संभ्रम होता ..मात्र एकदा आपण सगळे स्वीकार केलेय म्हंटले की काहीच लपवायला नको या निर्धाराने लिहित आहे ..हे लिहिताना मनावर दडपण आले असले तरी ..एकदाचे लिहून झाल्यावर ..मन हलके होणार आहे हे देखील मी जाणतो )

झटपट आणि फारसे कष्ट न करता व्यसनासाठी भरपूर पैसे मिळविण्याचा नवीन मार्ग मी शोधला ...मनात काही आडाखे बांधले ..लोकांची श्रद्धा ..सहानुभूती ..मिळवता आली तर हे सहज शक्य होणार होते ..त्या नुसार दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजताच मी उठून अंघोळ वगैरे करून तयार होतो ..बाजूला सुमारे दोन वर्षांचा सुमित खेळत होता ....त्याला कडेवर घेतले आणि याला जरा फिरवून आणतो म्हणून घराबाहेर पडलो .. त्याला त्याच्या आईने सकाळीच छान अंघोळ घालून ..स्वच्छ कपडे घालून .... लावून केलेले ..अगदी गोंडस दिसत होता ..बाबा आपणहून कौतुकाने मुलाला फिरवून आणत आहेत म्हंटल्यावर सुमितची आजी ..आई व तो देखील खूप आनंदित झाला ..निघताना बाहेर कोणाची नजर लागू नये म्हणून त्याच्या आईने पटकन त्याच्या गालावर एक काजळाचे बोट लावले ..आईला ..आजीला टाटा करून आम्ही बाहेर पडलो ....मी आमची कॉलनी सोडून जवळच असलेल्या एका कॉलनीत गेलो ...एका इमारतीत शिरलो ...जिना चढून वर जात असताना एक मराठी आडनावाची पाटी दिसली .तसा थांबलो ..धीर एकवटून दाराची बेल वाजवली ..साधारण एका चाळीशीच्या स्त्री ने दर उघडले ..दारात अनोळखी माणूस त्याच्या कडेवर एक गोंडस मुलगा पाहून जरा विचारात पडली ..मी लगेच बोलण्यास सुरवात केली ..नमस्कार ..मी तुषार नातू ..इथे बाजूच्या कॉलनीत राहतो ..हा माझा मुलगा सुमित ..दोन वर्षांचा आहे ..दुर्दैवाने याच्या हृदयाच्या एका झडपेत समस्या आहे ..त्याचे ऑपरेशन होत नाही असे डॉक्टर म्हणतात ....सगळे उपाय झालेत ..शेवटी एकाने सुचवलेय की याला दहा अनोळखी घरात वर्गणी मागून ( भिक मागून ) अष्टविनायक दर्शन घडवेन घडवून आणा ...हा नक्की ठीक होईल ..मी सगळे एका दमात बोलून गेलो ..मी हे बोलत असताना ..ती बाई सुमितच्या गोड चेहऱ्याकडे पाहत होती ..हळू हळू तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले ..' अय्या किती गोड मुलगा ' हे भाव जावून त्याच्या जागी आता '' अरेरे ..बिचारा ' असे भाव आले . एकंदरीत माझे बोलणे प्रभावी होते तर ..तिने पटकन विचारले ..किती वर्गणी द्यायची ? ...असा काही निश्चित आकडा नाही ..पण फक्त दहा घरातून पैसे मागणार आहे ....तुम्हाला जमेल तितके दिलेत तरी काही हरकत नाही ..नाही दिलेत तरी चालेल ..फक्त तुमचे आशीर्वाद असू द्या मुलाला ..असे मी मानभावीपणाने म्हणालो ..झाले ..ती बाई पटकन घरात गेली ..एक शंभर रुपयांची नोट घेऊन आली ..माझ्या हातात ती नोट देवून तिने सुमितच्या गालाला हात लावला ..ठीक आहे येतो असे म्हणून मी तेथून निघालो ..

माझी आयडिया कमालीची यशस्वी ठरली होती ..नंतर अशीच तीन चार घरे फिरलो ..प्रत्येक ठिकाणी थोड्याफार फरकाने असाच अनुभव आला ..रुमारे तासाभरात मी पाचशे रुपये गोळा केले होते ...वा स्वतच्या हुशारी वर खुश होत ..तसाच स्पेशल ऑटो करून सुमितला घेवून अड्ड्यावर गेलो ...तेथे ब्राऊन शुगर घेतली ..आजचा दिवस चैन करता येतील इतके पैसे होते ..सुमित सकट माझा एकटा राहणारा गर्दुल्ला मित्र अविनाश याच्या खोलीवर गेलो ..मग निवांत ब्राऊन शुगर ओढत बसलो ..सुमित साठी फाईव स्टार कँडबरीची दोन दहा रुपयावाली पाकिटे घेतली होती ..आतले चाँकलेट सुमितला तर त्यावर गुंडाळलेला बेगड ब्राऊन शुगर ओढायला माझ्यासाठी पन्नी म्हणून ....सुमारे चार तास मस्त ब्राऊन शुगर ओढत बसलो होतो ..थोड्या वेळाने सुमित कंटाळला ..घरी चला म्हणून रडू लागला ..तर तुला अजून कँडबरी घेवून देईन असे आमिष दाखवून शांत बसवले ..त्या खोलीत अवि आणि मी असे दोन गर्दुल्ले ब्राऊन शुगर ओढत बसलेले ..आणि एक गोंडस दोन वर्षांचा मुलगा बाजूलाच खेळतोय हे दृश्य नक्कीच चांगले नव्हते ..आपल्या ब्राऊन शुगरच्या धुराचा ..सुमितवर काही परिणाम होऊ शकतो हे देखील माझ्या गावी नव्हते ..सुमारे दुपारी तीन वाजता घरी परतलो ..सुमित बिचारा कंटाळून माझ्या खांद्यावर डोके ठेवून गाढ झोपला होता ..घरी गेलो तर ..मानसी आणि आई काळजीत होत्या ..इतका वेळ कुठे गेलेत बाप लेक म्हणून ....आई म्हणाली ..असे इतका वेळ नेवू नकोस त्याला बाहेर ..आमचा जीव टांगणीला लागतो ....त्या दिवशी रात्री मनात अनेक प्रकारचे विचार थैमान घालत होते...आपण खूप मोठी चूक करतोय हे समजत होते ..तसा मी देवाला न मानणाराच ..कारण देव आहे तर मग सगळे माझ्या मनासारखे का घडत नाही ..प्रत्येक वेळी मी प्रार्थना केल्यावर देवाने माझ्या मनासारखे घडवले पाहिजे हा अट्टाहास या नास्तिकते मागे होता ..देव किवा ईश्वर हे एक तत्व आहे ..त्याचे काही नियम आहेत ...त्या नियमांना बहुधा अपवाद नसतो ..जन्म -मृत्यू ..सुख -दुखः ..उन -पाउस ..ऋतुचक्र ...जरा -व्याधी -मृत्यू ..अपघात ...नैसर्गिक आपत्ती ..हे सगळे त्या तत्वाचे नियम आहेत ..वगैरे गोष्टी मला जरा उशीरच समजल्या ..हे देखील जाणवले की जगात कोणाच्याच मनासारखे नेहमी घडत नाही ...तरीही कोणती तरी अदृश्य शक्ती शक्ती अगदी नियमबद्ध पद्धतीने अस्तित्वात आहे ..तिला लोकांनी भले वेगवेगळी नावे दिली असतील ...आपल्या मनासारखे न घडूनही त्या शक्तीवर विश्वास अतूट असणे..त्या शक्तीचे नियम स्वीकारणे म्हणजेच श्रद्धा !

असे तीनचार दिवस सुमितला घेवून फिरणे सुरु होते ..रोज किमान पाचशे रुपये तरी मिळत असतच ...नंतर सुमितला घरी सोडून मी अवीच्या रूमवर जावून बसे ..हल्ली तुषारला पोराचे एकदम इतके प्रेम कसे वाटू लागलेय हे कोडे पडले होते आईला ..त्यातल्या त्यात आता घरी पैसे मागून भांडत नाहीय हे समाधान होतेच ..सहाव्या दिवशी भानगड झालीच ... सुमितला घेवून मी एका सोसायटीत शिरलो असताना ..दार उघडणाऱ्या वयस्कर स्त्री ने मी तुषार नातू असे नाव सांगितल्यावर ..मला विचारले ..नातू आजींचा तू धाकटा मुलगा का ? बापरे ..म्हणजे ही माझ्या आईला ओळखत होती तर ...पुढे तीच म्हणाली ..अधून मधून भेटत असतात तुझ्या आई ..मंदिरात ..बाजारात वगैरे ..तू पुण्याला असतोस असे त्या म्हणाल्या होत्या ..त्यांना बरीच माहिती होती तर..त्यातल्या त्यात आई त्यांना अधून मधून भेटते ..रोज नाही.. हे त्यांच्या बोलण्यातून समजल्यावर जरा निर्धास्त झालो ..त्यांना सगळे सांगितल्यावर हळहळल्या ..म्हणाल्या ..माझ्याकडे पाचशे रुपयाची नोट आहे ..तुझ्याकडे सुटे पैसे आहेत का ? शंभर रुपये काढून मला चारशे परत दे ..ते माझे दुसरेच घर असल्याने माझ्याकडे सुटे पैसे नव्हतेच ...मग तीच म्हणाली ..एक काम कर ..तू साधारण तासाभराने ये ..मग तुला देते मी पैसे ..ठीक आहे म्हणून मी निथून निघालो ..पुढची दोन चार घरे करून ..हे प्रकरण मी विसरूनही गेलो ..पुन्हा त्यांच्याकडे न जाता ..तसाच सुमितसकट अड्ड्यावर ..आणि तेथून अवीच्या रूमवर गेलो ...

( बाकी पुढील भागात--- कृपया कोणत्याही व्यसनीने माझी आयडिया वापरू नये ही नम्र विनंती )

बुधवार, 4 दिसंबर 2013

तोरा मन दर्पण कहेलाये..


सुमितच्या बाललीला !  ( पर्व दुसरे -भाग ९६ वा )


नव्या बाळाच्या आगमनानंतर ..जेव्हा मी आत ऑपरेशन थियेटर मध्ये मानसीला भेटायला गेलो तेव्हा तिचा चेहरा थकलेला .श्रांत ..वाटत होता ..कदाचित थोडाफार अनेस्थेशियाचा देखील परिणाम असावा ..मी जवळ जाताच तिने फक्त माझा हात घट्ट पकडला .. सुमारे दोन मिनिटे तिने हात धरून ठेवला होता ...न बोलताही ती केवळ स्पर्शाने बरेच काही सांगत असावी ..मी तिच्या डोक्यावरून हात फिरवून तिला धीर दिला ...तासाभरात फोन करून सर्वाना आनंदाची बातमी सांगितली ..नाशिकला आई ..भाऊ ..वाहिनी ...इतर सर्व नातलग एकदम आनंदी झाले ..आता जवाबदारी वाढलीय ...तू आता अजिबात चुका करू नकोस ..असे सांगायलाही ते विसरले नाहीत ..तेथे असतानाच मानसीला मी तीन महिन्यापूर्वी झालेल्या रीलँप्स बद्दलही सांगून टाकले ..माझ्या मनात एखादी गोष्ट फार काळ गुपित म्हणून टिकत नाही ...जवळच्या व्यक्तीला मी सांगतोच सगळे बोलण्याच्या ओघात ..मानसीने रीलँप्स नंतर माझ्या वर्तनात होणारे बदल ..बेजावाबदार पणा ..पैश्यांची नासाडी ..माझी नाटके वगैरे कधीच अनुभवली नसल्याने..शिवाय लवकरच मुक्तांगण मध्ये पकडला जावून पुन्हा मार्गावर आल्याने तिला हे रीलँप्स प्रकरण फारसे गंभीर वाटले नाही ..आता सगळे विसरून जा ..पुन्हा असे वागू नका इतकेच म्हणाली ती ...नव्या बाळाच्या आगमनाची बातमी घेवून ..आनंदाने पेढे घेवूनच मुक्तांगणला परतलो ..माझे सर्व मित्र देखील आनंदी झाले ..सर्वाना पेढे दिले ..नेमके कोणत्या वेळी कोणता विनोद करावा हे काही लोकांना काळत नाही त्यातला माझा एक मित्र आहे .. ..मुक्तांगांमध्ये मी खूप मस्क-या ..गमती ..फिरकी घेणे वगैरे प्रकार करत असे ..त्यामुळे कधी कधी मला चिडून एखादा जण साल्या ..हरामी वगैरे शिव्या घाले ..तर मी पेढे वाटताना एक जण मस्करीत म्हणाला ' चला आता अजून एका हरामीची जगात भर पडली तर ' ..खरे तर हे वाक्य मस्करीने उच्चारले होते त्याने म्हणून मी देखील न चिडता हसून सोडून दिले ..मात्र नंतर ..मी सगळ्या समुपदेशकांना ..इतर मित्रांना पेढे वाटत असताना ..हा हरामी वाला मित्र माझ्या मागे मागे फिरत होता ..तसेच मी ज्या वेळी कोणाला पेढे देई त्यावेळी ..त्याचा ' अजुन एक हरामी जन्माला आला ' हा फालतू जोकसमोरच्याला सांगू लागला ...मग मला त्याचा खूप राग आला ..परंतु सुमितच्या जन्माच्या आनंदाच्या पुढे मी राग गिळला ..पुढे बरीच दिवस माझी त्या मित्रावर खुन्नस होती .


मानसी काही दिवस नांदेडला राहून ..तेथूनच नाशिकला गेली ..नाशिकला बाळाचे बारसे झाले ..त्याचे नाव जरा वेगळे म्हणून ' प्रेषित ' ठेव असे एकाने सुचवले होते ..मात्र आईच्या सूचनेनुसार ' सुमित ' नाव ठेवले गेले .सर्वाना आवड्ले हे नाव ..बारश्याच्या वेळी एक गम्मत झाली ..अर्थात त्यातून मला बरेच शिकायला मिळाले ..बरसे उरकल्यावर मी बाजूच्या खोलीत जावून तेथे सुमितला भेट म्हणून आलेली पाकिटे ..प्रेझेंट्सच्या वस्तू वगैरे पाहत बसलो होतो ..तर तिथे माझी मोठी बहिण येवून बसली ..बराच वेळ माझ्याशी गप्पा मारल्या ..मग जाताना म्हणाली तू पण चल बाहेर ..मी म्हणालो नको बाहेर गर्दी आहे मी इथेच थांबतो ..तर म्हणाली इथे सुमितच्या भेटीचे आलेले पैसे ..वस्तू ..मुख्य:त सुमितला भेट म्हणून मिळालेले सोने वगैरे आहे ..आम्हाला तू इथे बसला तर उगाच काळजी लागून राहील ..मला समजले तिला काय म्हणायचे आहे ते ..मनात खुप हसू आले ..म्हणजे मी त्या पैश्यांवर ..वस्तूंवर ..हात मारीन की काय अशी तिला भीती होती..बहिणीने व्यसन करण्याच्या काळातील माझ्या भानगडी पहिल्या होत्या ..म्हणून अजूनही तिचा माझ्यावर विश्वास नव्हता हे जाणवले ..तिला उगाच काळजीत न ठेवता ..बाहेरच्या खोलीत गेलो . जवळच्या नातलगांचा विश्वास संपादन करणे सोपे नाही हे समजले ...अश्या वेळी राग न मानता आपल्या पूर्वीच्या कर्माचेच हे फळ आहे हे समजणे केव्हाही चांगले .

बारसे झाल्यावर सुमित सह मी पुण्याला परतलो ..आता मुक्तांगणहून केव्हा एकदा घरी परततो असे व्हायचे ..मग मी सुमितला खेळवत बसे ..अतिशय चळवळ्या होता ..जागा असताना एक मिनिट स्वस्थ नसे ...सारखी काहीतरी हालचाल चालूच ..हातापायांची सायकल तर नेहमीचीच ... छतावर एक दोरी बांधून त्यात त्याला झोका देवून झोपवण्यासाठी एक दोरी बांधली होती ..लवकर झोपत नसे ..त्याच्या हालचाली थांबेपर्यंत झोका देण्याचे काम माझे होते ..कधी कधी खूप कंटाळा येई झोळीची दोरी हलवत बसायला ..दिवस भरात तो जेमतेम पाच सहा तास जागा राही ..बहुतेक वेळ झोपे ..कधी कधी तो झोपलेला असताना मला त्याच्याशी खेळायची लहर येई ..मात्र मानसी त्याला उठवण्यास मनाई करे ..मग नुसताच झोपलेल्या सुमितचा चेहरा निरखीत बसे ..झोपेत अचानक तो गालात हसे ..स्वप्न पडल्या सारखे ..या वयात कोणती स्वप्ने पडत असावी त्याला असा विचार मनात येई ..तर कधी एकदम झोपेतून दचकून उठे ..जवळ मी दिसलो की मला बिलगे ..तो अजिबात रडत नसे ..अगदीच भूक अनावर झाले की थोडे हलक्या आवाजात रडे ...किवा लंगोट खराब केला असला की थोडा रडे ..एरवी सतत हसरा ..मस्ती करायला तयार ..एक दोन वेळा मी उत्साहाने त्याचा खराब लंगोट वगैरे बदलण्याचे काम केले ..मात्र दिवसातून अनेकदा हे काम पडे ..तेव्हा कंटाळा येई ..मानसी हे सारे काम अगदी विनातक्रार हसतमुखाने ..कौतुकाने करे ..तिला कितीही गाढ झोप लागली असली तरी सुमितने थोडी चूळबुळ केली की लगेच जाग कशी येते हे कोडेच होते ..मला वाटते आई म्हणून हे वरदान आपोआपच मिळत असावे ..असा तळहाताच्या फोडासारखा मी देखील वाढवला गेलोय याची जाणीव होई ..मग आईवडिलांशी मी मोठा झाल्यावर कसा वागलो याचेही वाईट वाटे .

( बाकी पुढील भागात )

========================================================================

खस्ता ..!  ( पर्व दुसरे -भाग ९७ वा )


पाहता पाहता सुमित पालथा पडायला लागला ... पालथा पडून पुढे सरकण्याचा प्रयत्न करून लागला ..सुरवातीला तो पालथा पडून हाताचा जमिनीवर जोर लावून पुढे सरकण्याच्या प्रयत्नात नेमका मागे सरकू लागला ..तेव्हा आम्ही खूप हसलो ..एक दोन दिवसांनी मात्र तो भराभर पालथा पडून पुढे सरकू लागला ...एका हाताचे कोपर जमिनीवर टेकवून पटापट त्याच्या जोरावर स्वतचे शरीर पुढे सरकवत असे ...मग घरभर असे सरकणे चाले ..मानसी आतल्या खोलीत स्वैपाक करत असली की तो सरकत तेथे जाई ..मग मी पुढच्या खोलीतून हाक मारली की पुन्हा छान वळून तसाच सरकत माझ्याजवळ येई ...रांगायला लागल्यावर तर त्याला घर कमी पडू लागले ..अतिशय चळवळ्या.. झपाझप पुढे येई ..मी बाहेर जायला निघालो की माझे पाय पकडून मला पण सोबत ने म्हणून हट्ट करी ..रोज संध्याकाळी आम्ही त्याला फिरायला घेवून बाहेर जात असू ....तेव्हा मी अगदी अभिमानाने त्याला कडेवर घेवून मिरवे ..दिसला एकदम मर्फी बॉय..त्यामुळे रस्त्यावरून जाणारे येणारे ... त्याच्याकडे कौतुकाने पाहत ..विशेषतः स्त्रिया आणि मुली तर त्याला पाहून खूपच आनंदित होत असत ..' अय्या ..किती छान बाळ ..' असा अविर्भाव त्याच्या चेहऱ्यावर असे ..काहीजणी त्याच्या गालाला हात लावत ..त्याला कडेवर घेत ..अनोळखी व्यक्तीकडे पण सुमित पटकन जाई मला छान वाटे ..एक दोन वेळा मानसीची तब्येत बरी नसताना मी त्याला घेवून मुक्तांगणला गेलो होतो ....तेथे आफ्टर केअरच्या एका पलंगावर त्याला सोडून मी समूह उपचार ..योगाभ्यास वगैरे घ्यायला निघून जात असे ..मी येईपर्यंत तो सर्वांशी खेळे ..अजिबात रडणे नाही ..झोपेत असताना त्याला सु..सु ..झाली की त्याचा फोर्स इतका असे की एकदा रात्री झोपताना त्याला लंगोट घातला नव्हता ..तो आणि मानसी पलंगावर.. तर मी खाली झोपलो असताना ..रात्री अचानक माझ्या तोंडावर गरम पाणी पडले ..धडपडत उठून पाहतो तर ..हे महाशय झोपेत उताणे झाले होते ..आणि त्यांनी सोडलेली धार थेट मानसीच्या वरून ..खाली झोपलेल्या माझ्या तोंडावर ..मला चिडताही येईना ..मानसीची तर हसून हसून मुरकुंडी उडाली .

एकदा अचानक त्याला खूप ताप भरला ..अंगाला चटके बसत हात लावला तर ..एकदम मलूल पडलेला ..मग जुलाब सुरु झाले ..रडू लागला ..दुध घेईना ..जवळच्या डॉक्टरकडे नेले ..त्यांनी औषधे दिली ..इंजेक्शन दिले ..औषध घेतले की जरा वेळ ताप कमी होई ..पुन्हा दोन तीन तासात ताप चढे ..त्या काळात त्याला धड झोपही लागेना ...खाली ठेवला की जोराने रडे ...सारखे मांडीवर घेवून बसावे लागे .. आळीपाळीने मानसी आणि मी त्याला मांडीवर घेवून बसत तीनचार रात्री जागलो ..शेवटी एकदाचा चार दिवसांनी त्याला बरे वाटू लागले ..तेव्हा आमचा जीव भांड्यात पडला ..मला आठवले व्यसन करण्याच्या काळात जेव्हा माझे आई वडिलांशी भांडण होई ..मी पैश्यांचा ..वस्तूंचा हट्ट करी तेव्हा आई वडिलांवर बेफाम आरोप करी ..तुमचे माझ्यावर प्रेमच नाही ..तुम्हाला माझ्यापेक्षा पैसे जास्त प्रिय आहेत ..तेव्हा एकदा आई दुखा:ने म्हणाली की '' अरे तुला काय माहित ..तुला मोठा करताना आम्ही किती खस्ता खाल्ल्या आहेत ते " हे ऐकल्यावर मी म्हणे ' त्यात काय मोठे केले तुम्ही ..सर्वच आईवडील करतात आपल्या मुलांसाठी ....जर माझे लाड करता येत नव्हते तर मला जन्म दिलात कशाला ? ' वगैरे बोलून मी त्यांचा अपमान करत होतो याचे आता खुप वैषम्य वाटते ..त्यावेळी खस्ता म्हणजे नेमके काय ते मला कळत नव्हते ..फक्त खस्ता या शब्दाचा अर्थ कष्ट असा माहित होता ...त्या अर्थात दडलेली खोली समजली नव्हती ..सुमित आजारी असताना त्याला मांडीवर घेवून रात्र रात्र जागताना मला ' खस्ता ' म्हणजे नेमके काय ते समजले ...पालक आपल्या मुलाला कसे जपतात ...त्याची काळजी घेतात ... ते देखील अगदी निस्वार्थीपणे ..त्यांचे बहुतेक निर्णय मुलांच्या भल्यासाठीच असतात ..काही वेळा त्यांचे चुकतही असेल..मात्र मोठी होणारी मुले एवढ्या तेवढ्या कारणांवरून आईबापाचा पाण उतारा करतात हे अतिशय अयोग्य आहे . 

सुमित मोठा होऊ लागला.. तसा घरखर्च वाढला ..रोज नागपूर चाळीतून मुक्तांगणला येण्या जाण्याचे अंतर सुमारे चार किलोमीटर होते ....पाठीच्या मणक्याचे आँपरेशन झाल्याने फार चालले की माझी पाठ दुखू लागे ..म्हणून जाण्या येण्यासाठी एखादे वाहन असावे असे मला वाटू लागले ....रोज ऑटोचा खर्च परवडत नव्हता ..महिन्याच्या शेवटी बचत म्हणून देखील हाती काही रहात नव्हते...सारखे घरी आईकडे पैसे मागणे योग्य वाटत नव्हते ...मी अतिशय बैचेन होतो त्या काळात ..पैसे कसे जमवावे या विवंचनेत ..एखादा पार्ट टाइम जॉब करावा असेही मनात येई ..पण जवळपास असा जॉब मिळायला हवा होता ..दत्ता श्रीखंडेने जसे ..वाडीत फुटपाथ वर सायंकाळी ..बनियन ..अंडरवेअर ..इतर किरकोळ गरजेच्या वस्तू विकणे सुरु केले तसे करावे असेही मनात येई ..त्याच काळात मुक्तांगणला उपचार घेतलेल्या ... प्रोफेसर म्हणून नोकरीस असलेल्या ..एका सुधीर नावाच्या माणसाचा मुक्तांगण मधून डिस्चार्ज झाला ..सुधीरला दारूचे व्यसन होते ..लग्न झालेले नव्हते ..वारंवार रीलँप्स होऊ नये म्हणून ....सुधीरला त्याच्या सल्लागाराने ..मुक्तांगण जवळच कुठेतरी खोली घेवून राहा ...म्हणजे नियमित फाँलोअप करा येईल असे सुचवले ..सुधीरने ..नागपूर चाळीतच माझ्या घराजवळच रूम घेतली होती ..त्याने रोज एक वेळचा डबा मिळेल का असे विचारल्यावर मी आनंदाने त्याला होकार दिला ..तेव्हढेच थोडे पैसे मिळतील हा हेतू ..त्या नुसार रोज संध्याकाळी सुधीर माझ्या घरून डबा नेवू लागला .

( बाकी पुढील भागात )

========================================================================

विनाशकाले ...! ( पर्व दुसरे -भाग ९८ वा )

माझ्याकडे रात्रीच्या जेवणाचा डबा लावलेला सुधीर हा अल्कोहोलिक होता ..त्याच्या चार पाच रीलँप्स झालेल्या होत्या ...त्यामुळे या वेळी विशेष काळजी घ्यावी म्हणून तो मुक्तांगणच्या जवळ राहायला आलेला ..म्हणजे संध्याकाळी त्याला नियमित फॉलोअप करता येई ..हा इंग्रजीचा प्राध्यापक होता ..अतिशय हुशार ..वय सुमारे चाळीस असावे ..लग्न झालेले नव्हते ..प्रत्येक वेळी एकदोन महिने चांगला राहून हा एकदम झटका आल्यासारखा पिणे सुरु करी ..पिणे सुरु झाले की मागील न प्यायलेल्या दिवसांचा सगळा बँकलॉग भरून काढल्यासारखा पीत असे ...अगदी सकाळपासून सुरु राही पिणे ..जवळचे सगळे पैसे संपेपर्यंत किवा कोणीतरी पुन्हा उपचारांसाठी दाखल करीपर्यंत थांबत नसे ...माझ्याकडे डबा लावल्यावर दोन महिने सुरळीत चालले ..रोज रात्री नियमित माझ्याकडे डबा घ्यायला येई ..एकदा रात्री सुधीर डबा घ्यायला आला नाही म्हणून मी त्याच्याकडे डबा घेवून गेलो ..पाहतो तर गडी प्यायलेला ..मस्तच झाला होता ..खूप बडबड करत होता ..जुने जुने किस्से सांगून कोणाला तरी सारख्या आई बहिणीवरून शिव्या घालणे सुरु होते ..मला हात धरून थांबवून सगळे ऐकवीत होता ..अशा वेळी प्यायलेल्या माणसाला आपले म्हणणे खूप महत्वाचे आहे आणि ते समोरच्याला सांगितलेच पाहिजे असे वाटते ...मात्र त्या अर्थहीन बडबडीत समोरच्याला काहीही रस नाहीय हे पिणाऱ्याच्या लक्षात येत नाही ..मी कसातरी सुटका करून घेवून तेथून निघालो ..त्याला डबा खा म्हणून आठवण केली निघताना ..दुसऱ्या दिवशी सकाळी डबा आणायला गेलो तर ..अर्धवट खाल्लेला डबा तसाच उघडा पडलेला होता ..हे महाशय सकाळी सकाळी पुन्हा लावून आलेले ...वैतागून खरकट डबा घेऊन निघालो ..दोन तीन दिवस असे सुरु होते ..मी त्याला पुन्हा उपचार घे म्हणून सुचवले ..तर आज उद्या करत टाळत गेला ..एकदा असाच रात्री त्याच्याकडे डबा घेवून गेलो ..पाहतो तर दार सताड उघडे ..हा पिवून लक्कास झालेला ..उताणा अस्ताव्यस्त ...तोंड उघडे ठेवून जोरात घोरत होता ..मी त्याला हाका मारल्या ...मग जवळ जावून हलवले ..परिणाम शून्य ..उघड्या तोंडातून लाळ बाहेर पडून उशीवर थारोळे साचलेले ..त्याला कुशीवर करावा म्हणून सरकावू लागलो ..तशी उशी त्याच्या डोक्याखालून निसटली ..उशीखाली असलेल्या पाचशेच्या नोटा उघड्या झाल्या ..त्या कोऱ्या करकरीत नोटा पाहून माझी नियत बिघडली .
मनात लोभ जागृत झाला ...वाटले तसाही हा पिवून हे पैसे संपवणार आहे ...त्या ऐवजी आपण घेतले तर आपल्या कामी तरी येतील ..गेल्या काही दिवसांपासून मुक्तांगणला जाणे येणे करण्यासाठी एखादी सेकंडहँड का होईना मोपेड असावी असे मनात होते ..दुसरे मन सांगत होते की हे चूक आहे ...असे सुधीरचे पैसे घेणे योग्य नाही ...पूर्वी नाशिकरोडला असताना जेव्हा नशेसाठी पैसे नसत तेव्हा ..आम्ही मित्र मंडळी रात्री बेरात्री रेल्वे स्टेशन ..दारूचे अड्डे या ठिकाणी भटकत असू ..एखादा असा दारू पिवून पडलेला दिसला की त्याचे खिसे तपासून आतल्या चीजवस्तू पैसे ..घड्याळ काढून घेत असू ते आठवले ...हो ना करता करता शेवटी लोभ जिंकला ..मी त्या नोटा काढून खिश्यात ठेवल्या ..मग साळसूदपणे बाहेर पडलो ...घरी येवून पैसे मोजले ..तीन हजार रुपये होते .मानसीने ते पाहून मला हे कुठले पैसे ते खोदून खोदून विचारले तर तिला मित्राकडून उसने घेतलेत ..मोपेड घ्यायला हे सांगितले ..त्या दिवशी रात्री नीट झोप लागली नाही ..व्यसन करत असताना केलेल्या चोऱ्या नाईलाज होता ..मात्र प्रथमच मी व्यसनमुक्त असताना हे केले होते ..याची बोच मनात होती ..दोन मनांचा संघर्ष सरू झाला...' लबाडीने कमावलेला पैसा आतडे फाडून बाहेर पडतो ' हे एका ऑटोवर वाचलेले आठवले ..अपराधीपणाची भावना मनात थैमान घालू लागली ..अशावेळी एक मन आपला उत्कृष्ट असा वकील असते ..ते आपण काहीही चूक केलेली नाहीय हे पटवून देते ..जगात अनेक जण भ्रष्टाचार करतात ..अन्यायाने पैसे कमावतात ..लबाडी करतात ..आपण असे केले यात फारसे चूक नाहीय असे स्वतःला समजावले जाते ..तर दुसरे मन ' तोरा मन दर्पण कहेलाये..भले बुरे सारे कर्मो को देखे और दिखाये ' या गाण्याची आठवण करून देते ..मला सुधीरचे पैसे काढताना कोणी पहिले नसले .कदाचित सुधीरला देखील ते समजले नाही ..तरी ' मन से कोई बात छुपेना ..मन के नैन हजार ..जग से चाहे भागले कोई .. ..मन से भाग ना पाये ' हे देखील खरे आहे ..अपराधीपणाच्या भुताने मला झपाटलेच होते .

नंतर दोन तीन दिवसात सुधीर मुक्तांगणला उपचारांसाठी दाखल झाला..त्याला पैसे गेल्याचे समजले होते ..मात्र कोणी घेतले असावेत हे समजले नसावे ..मात्र जेव्हा जेव्हा सुधीर माझ्यासमोर येई तेव्हा मी अवस्थ होई ..मी त्या पैश्यांची एक जुनी मोपेड खरेदी केली ..त्यावरून मुक्तांगणला जाणे येणे सुरु झाले ..ती मोपेड सारखी बिघडत असे ..तेव्हा वाटे ..चोरीच्या पैश्यानी घेतलीय म्हणून असे होतेय ...आपल्या चुकीच्या कर्माचे फळ प्रत्येकाला मिळतेच ..आजार ..अनारोग्य ..अपयश ..जवळच्या व्यक्तीचा मृत्यू ..घरात कलह ..अपघात ..असमाधान ..किवा शेवटी कायद्याच्या मार्गाने का होईना फळ मिळणे अटळ असते .. अनेक मार्ग आहेत फळ मिळण्याचे ..हे आता खूप वर्षांनी उमगले आहे ..चांगल्या कर्माचे देखील तसेच आहे ..चांगले कर्म करत रहा ..यश .समाधान ..विकास ..उत्कर्ष ..हे फळ मिळणारच ..फक्त यासाठी किती वेळ लागेल हे नक्की नसते ...मात्र चांगल्या वाईट कर्माचे फळ मिळणारच हे नक्की ..फळ मिळण्यास उशीर झाला तर ते व्याजासहित मिळते हे देखील खरे आहे .

( बाकी पुढील भागात )

========================================================================

रॉक बॉटम ! ( पर्व दुसरे -भाग ९९ वा )


अल्कोहोलीक्स अँनाँनिमस अथवा मुक्तांगण मध्ये " एखादा व्यसनी व्यक्ती ' रॉक बॉटम ' गाठल्या शिवाय कायमचा व्यसनमुक्त राहणे कठीण असते " असे सांगितले जाते . ' रॉक बॉटम ' म्हणजे व्यसना मुळे झालेले विविध प्रकारचे नुकसान जे व्यसनी व्यक्तीला त्याच्या व्यसनाच्या शक्ती समोरच्या असहायतेची कायमची जाणीव करून देईल किवा व्यसनाच्या काळात झालेले अश्या प्रकारचे नुकसान जे व्यसनी व्यक्तीला कायम स्मरणात राहून व्यसनापुढे आपली बुद्धी ..शक्ती ..पैसा ..समाजिक स्थान ..नाते संबंध ....वगैरे सगळे फोल ठरतेय याची कायमची जाणीव व्यसनीला राहील ..रॉक बॉटम काही व्यसनींना एखाद्या अगदी छोट्या नुकसानामुळे जाणवतो व ते व्यसनमुक्तीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करून यश मिळवितात तर काही वेळा रॉक बॉटम हा विविध प्रकारच्या नुकसानांची मालिका असू शकते ...किवा व्यसनामुळे झालेली एखादी मोठी धक्कादायक घटना असू शकते ...प्रत्येक व्यसनी व्यक्तीला आपल्या बुद्धी चातुर्यावर ..किवा त्याच्याकडे असलेला पैसा ..शिक्षण ..त्याचे सामाजिक स्थान ..नातलगांचे त्याच्यावरचे प्रेम ..वगैरे गोष्टींवर प्रचंड विश्वास असतो ... अहंकारच असतो असे म्हणता येईल ..त्यामुळेच मी कितीही व्यसन केले तरी माझे फारसे वाकडे होऊ शकत नाही ही भावना त्याच्या मनात तयार होते ....किवा माझे कितीही नुकसान झाले तरी मी सगळे काही पुन्हा भरून काढून शकेन असा खोटा आत्मविश्वास असतो त्याला ..जेव्हा व्यसनापुढे हे सगळे अहंकार गळून पडतात.. तेव्हाच त्याच्या सुधारणेला खरी सुरवात होते ..व्यसनाची ओढ ..अथवा मला आहारी करून घेण्याची व्यसनाची शक्ती माझ्या सर्व क्षमता आणि शक्तींपेक्षा मोठी आहे हे जेव्हा तो मनोमन मान्य करतो तेव्हा आता या पुढे एकदाही मी व्यसन करू शकणार नाही हे त्याला उमगते ..मगच आजच्या दिवस ..एकदाच ..थोडीशीच वगैरे आकर्षणे निघून जाण्यास मदत मिळते . रॉक बॉटम ही एक मनाची... हतबलतेची ..सपशेल पराभवाची ..असहायतेची जाणीव असते ..ती जाणीव मनात खोल घर करून रहाते तेव्हाच कायमच्या व्यसनमुक्तीला सुरवात होते ..मग पुढे सगळे सोपे होते ..परंतु हा रॉक बॉटम ..पराभवाची जाणीव होण्यास माझ्या सारख्या अति आत्मविश्वासू ..अहंकारी ..जिद्दी ..हट्टी व्यक्तींना वेळ लागतो ..त्यामुळे अधिक अधिक नुकसान सोसावे लागते ..ही जाणीव होईपर्यंत अश्या व्यसनी व्यक्तीला उपचार देणेच योग्य ठरते ....व्यसनमुक्ती केंद्रात किवा अल्कोहोलिक्स अँनाँनिमसच्या मिटींग्स मध्ये व्यसनामुळे काय काय नुकसान होऊ शकते याची वारंवार जाणीव करून दिली जाते ..मात्र माझ्या सारखे अहंकारी लोक हे सगळे कानाआड करतात ..माझे इतके नुकसान होऊ शकणार नाही ..मी तेवढा मूर्ख नाही ..मी स्वतःला केव्हाही सावरू शकतो असे त्यांना वाटत रहाते ..

मला या पूर्वी व्यसनामुळे अनघाला गमवावे लागले होते ..मेंटल हॉस्पिटल मध्ये राहावे लागले होते ..मुंबईत फुटपाथ ..रेल्वे स्टेशनवर राहावे लागले होते हे खरे तर रॉक बॉटमच होते ..परंतु मी या सगळ्यातून कायमचा बोध घेवू शकलो नव्हतो ..म्हणूनच थोडेसे ..कधीतरी ...मर्यादित प्रमाणात व्यसन करण्याचे आकर्षण माझ्या मनात होतेच ...मागच्या वेळच्या सुमितच्या जन्मापूर्वीची माझी रीलँप्स ..रंगेहाथ पकडल्या गेल्यामुळे लगेचच थांबली होती ..मुक्तांगण ने मला सहा महिन्याचा पगार कापू असे जरी सांगितले असले ..तरी माझ्या सहानुभूती पोटी केवळ तीन महिनेच माझा पगार कापला व नंतर पुन्हा सगळे सुरळीत झाले ..मला वारंवार मदत करणारी सगळी भली ..चांगली माणसे मला उपलब्ध झाली हे खरेतर माझे भाग्य होते ..पण मी सर्वांच्या प्रेमाचा ..विश्वासाचा ..सहानुभूतीचा कायम गैरफायदा घेत आलो होतो ..हे मला समजत नव्हते ...सुधीरचे तीन हजार रुपये चोरल्यानंतर मनात जी अपराधीपणाची भावना होती ती मला कायम अवस्थ ठेवण्याचे काम करत होतीच ..त्यातच मानसी पुन्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यात माहेरी जायला निघाली ..झाले ..मला पुन्हा आयते रान मिळाले ..मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ..माझे पुन्हा पिणे सुरु झाले ...मागच्या वेळी मुक्ता मँडमनी सांगितल्या नुसार जर मानसी माहेरी गेल्यावर मी स्वतःशी प्रामाणिक राहून .. मुक्तांगण मध्ये राहायला गेलो असतो तर वाचलो असतो ..पण ते केले नाही ..पुन्हा माझे पिणे सुरु झाले ..सोबत बंधू देखील होताच ..यावेळी आम्ही मुक्तांगणमध्ये कोणाला समजू नये याची पुरेपूर दक्षता घेत होतो ..पाहता पाहता ..महिनाभर उलटून गेला ..मानसी परत आली ..तरी देखील आमचे पिणे सुरूच होते ..दारू सारखा ब्राऊन शुगरचा वास येत नसल्याने मानसीला काही समजणे कठीणच होते ..फक्त मी हल्ली जास्त दांड्या मारतो ..जास्त वेळ संडासात बसतो ..पगाराचे सगळे पैसे लवकर संपतात... वगैरे गोष्टी तिच्या ध्यानात आल्या ..तिने मला तसे बोलूनही दाखवले ..मात्र मी काहीतरी थातूर मातुर करणे सांगून तिला उडवून लावले होते ..एकदा व्यसन सुरु झाले की आपोआप सगळ्या नकारात्मक प्रवृत्ती जाग्या होतात व्यसानीच्या ..त्याप्रमाणे ..मला पगार कमी मिळतो ..माझ्यावर अन्याय होतोय ..कोणाला माझ्या भावनांची पर्वा नाही ..माझे नशीबच वाईट ..अशी नकारात्मक मनोवस्था होत गेली माझी .

एकदा व्यसन सुरु झाले की व्यसनी कोणत्या प्रकारचे नुकसान करेल याची काही खात्री देता येत नाही ..तसेच माझे होत गेले ..माझा बेदरकार पणा वाढला ..मानसी ..सुमित यांची पूर्वी सारखी ओढ राहिली नाही ..फक्त तेवढ्यापुरते प्रेम दाखवत होतो ..मनात सतत व्यसन ...व्यसनासाठी पैसे ..लबाड्या ..असेच सुरु राही .एकदा सकाळी सहा वाजताच आम्हाला पुण्यातूनच ब्राऊन शुगर आणून देणाऱ्या मुलाला फोन करायला बाहेर पडलो ..मानसी बाथरूम मध्ये होती ..सुमित झोपलेला ..म्हणून दाराला बाहेरून कडी लावून गेलो ..फोन करून दहा मिनिटात परत येईन असे मनात होते ..परंतु ज्याला फोन केला तो मुलगा फोनवर भेटला नाही ...आज ब्राऊन शुगर कशी मिळणार ..या विचारात खिश्यात पैसे होते म्हणून तसाच पिंपरी येथे गेलो ..दिवसभर ब्राऊन शुगरच्या शोधात भटकलो ..शेवटी मिळवली ...बाहेरच पिवून ..सायंकाळी सहा वाजता घरी परतलो ..पाहतो तर बाहेरून दाराला कडी ..मग एकदम आठवले ..आपण सकाळी जाताना बाहेरून दाराला कडी लावून गेलो होतो ..मनात धस्स झाले ..म्हणजे इतका वेळ आत मानसी आणि सुमित कोंडल्या सारखेच होते ..हळूच कडी काढून आत गेलो ..तर मानसी सुमितला घेऊन पलंगावर टी व्ही पाहत बसलेली ...म्हणाली ' अहो ..तुम्ही सकाळी बाहेरून कडी लावून गेलात ..ते परत आलाच नाहीत ..मला बाहेर कचरा टाकायला जायचे होते ..थोडे सामान आणायचे होते ..तसेच राहिले ते ' तिच्या सुरात तक्रार नव्हती ..तर केवळ मी इतका उशिरा आलो म्हणून माझी काळजी होती ..' अग तू खिडकीतून कोणाला तरी हाक मारून .दार उघडून घ्यायचे होतेस ' असे म्हणालो ..तर म्हणाली ' तसे केले असते तर सर्वाना समजले असते की तुम्ही किती विसरभोळे आहात ते ' म्हणून कोणाला हाक मारली नाही ..बिचारी किती साधी ..किती जपत होती मला .

( बाकी पुढील भागात )

==================================================================

पडत.... धडपडत ..!  ( पर्व दुसरे _ भाग १०० वा )

व्यसनीचे एकदा व्यसन सुरु झाले की त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्याला ते थांबवता येणे कठीणच असते ...जरी काही काळ नाईलाजाने व्यसन थांबले तरी तो जो पर्यंत प्रामाणिक पणे मदत घेत नाही तो पर्यंत कायमची व्यसनमुक्ती कठीण होते ..माझेही तसेच होत होते ..पुन्हा रीलँप्स झाल्यावर ..माझे ब्राऊन शागर पिणे नियमितच झाले ..मध्ये जेव्हा एकदोन दिवस पैसे नसत तेव्हा टर्कीचा त्रास कमी होण्यासाठी आता मी स्पाज्मो प्राँक्सीव्हॉन च्या गोळ्या देखील खाण्यास सुरवात केली ...म्हणजे आठवड्यातून चार दिवस ब्राऊन शुगर आणि उरलेले दिवस स्प्जामो च्या गोळ्या ..पाहता पाहता माझ्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला ..मानसीला सर्व समजत होते ..मात्र मी रोज विविध करणे सांगून तिचे समाधान करत होतो ..लवकरच हे सगळे थांबून पुन्हा अधिक उज्वल आणि सोनेरी भविष्यकाळ सुरु होईल याची तीला खात्री देत होतो ....ती देखील माझ्यावर विश्वास ठेवून ..माझ्या सुधारणेची आशा बाळगून होती ... पुन्हा माझे घरी आईकडून पैसे मागवणे सुरु झाले ...रोज रात्री स्वत:शी निश्चय करणे की उद्यापासून बंद करायचे ..मात्र सकाळी उठल्यावर ' ये रे माझ्या मागल्या ' असे होई ...मी जर पुन्हा मुक्ता मँडमना सगळे खरे खरे सांगून मदत मागितली असती तर ..नक्कीच त्यांनी मदत केली असती ....मात्र आपण आपल्या स्वत:च्या इच्छा शक्तीवर हे सगळे थांबवू शकतो हा फोल आत्मविश्वास होताच ...त्यामुळे मदत मागत नव्हतो ..मुक्तांगण मध्ये सर्वाना पुन्हा संशय येवू लागला ...माझे सहकारी मला आडून पडून टोमणे मारू लागले ...खरेतर त्या मागे त्यांच्या हेतू मी सावध व्हावे ..व्यसन थांबवावे असाच होता ..परंतु मी ते न करता सहकाऱ्यांवर राग धरू लागलो ..मनात पुन्हा वैफल्याचे ..निराशेचे ..आपल्यावर अन्याय होत असल्याचे भाव गहिरे होत गेले ..सहकाऱ्यांच्या नजरेला नजर मिळविणे कठीण जावू लागले ..प्रत्येक जण जणू आपल्या बद्दलच बोलतोय की काय असे वाटू लागले .. मुक्तांगण मध्ये नोकरी करणे जीवावर येवू लागले .. वाटे आपण पुन्हा नाशिकला जावे ..तिथेच काहीतरी काम करावे .

मुक्तांगण सोडण्याची योजना माझ्या मनात घर करून बसली ..हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा चुकलेला निर्णय होता हे आज उमगते आहे ..मुक्तांगण सोडण्याच्या योजनेचा भाग म्हणून मी घरी आईला आणि भावाला फोन करून खोटेच सांगितले की ... मुक्तांगणला मिळणाऱ्या सरकारी अनुदानाच्या रकमेत आता खूप कपात होणार आहे ..आमचे सर्वांचे पगार कमी करणार आहेत ..तेवढ्या पगारात माझे येथे भागणे शक्यच नाही ..वगैरे ...इकडे मुक्ता मँडमना सांगू लागलो की मला मुक्तांगणचे मिळणारे मानधन आता संसाराला पुरत नाही ..म्हणून भावू म्हणतोय की तू इथे नाशिकला ये .. तो मला त्याच्या ओळखीने चांगली नोकरी लावून देणार आहे .. दुहेरी खोटे बोललो ..भावाने व आईने माझ्यावर विश्वास ठेवला ..मी जर नाशिकला त्यांच्या समोर असतो तर कदाचित ..माझे बदलते रूप त्यांच्या लक्षात आले असते ..त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नसता ..परंतु मी त्यांच्यापासून दूर पुण्याला असल्याने त्यांना ..मी परत व्यसन सुरु केलेय हे कळत नव्हते ..त्यांनी मुक्तांगणला एखादा फोन करून मी सांगतोय तसे खरेच मानधन कमी होणार आहे का ? हे विचारून खात्री करून घेतली असती तर माझे पितळ उघडे पडले असते पण भावाने आणि आईने तसे केले नाही ते माझ्या पथ्यावर पडले .... मानसी बिचारी अगदीच साधीभोळी..तिच्या साधेपणाचा मी चांगलाच गैरफायदा घेत होतो ....जेव्हा मी मँडमना मी भावू नाशिकला बोलावतोय असे सांगितले तेव्हा त्यांनी मला सावध केले ..नाशिकला तुझे जर परत व्यसन सुरु झाले तर ..खूप कठीण होईल ..आता तुझ्यावर जवाबदारी आहे वगैरे समजावण्याचा प्रयत्न केला ..व्यसनीच्या डोक्यात एकदा एखादा विचार शिरला की तो अमलात येईपर्यंत त्याला चैन पडत नाही ..त्याच प्रमाणे मी मँडमना शपथपूर्वक ग्वाही दिली की मी नाशिकला चांगला राहीन ...नाशिकला भावाने त्याचा जिवलग मित्र अनिल याचेकडे माझ्या नोकरीबद्दल सांगून ..माझी त्याच्या मित्राकडे नोकरी पक्की केली ..मला जसे हवे तसे सगळे घडवून आणण्यासाठी मी सगळी बुद्धी पणाला लावली होती ..सगळे हवे मला तसेच घडत गेले .मात्र ते माझ्या भल्याचे नव्हते हे आता समजतेय ..शेवटी मँडमने मुक्तांगणची नोकरी सोडण्यास मला परवानगी दिली ..मी राजीनामा लिहून त्यांच्याकडे द्यायला गेलो तेव्हा त्यांनी ..माझ्या भविष्याबाबत सावधगिरी म्हणून मला सांगितले की आत्ताच राजीनामा देवू नकोस ....आधी नाशिकला जा ..तेथे नोकरीत स्थिर हो ..मग हवे तर महिन्या भाराने राजीनामा दे ..मी मंजुरी दिली ..आज जाणवतेय माझ्यापेक्षा मुक्ता मँडमनाच माझ्या सुरक्षिततेची जास्त काळजी होती .

शेवटी एकदाचा पुणे सोडण्याचा दिवस उगवला ..एक टेम्पो करून सारे समान त्यात भरून मी नाशिकला जायला निघालो ..कायमचा .. नाशिकला आईकडे राहणारा माझा भाचा सामान आवरण्यासाठी मदत करण्यास आला होता ....सामान असलेल्या टेम्पोतच बसून आम्ही नाशिकला रवाना झालो ....निघताना मुक्तांगण मधल्या सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या ...सगळे माझ्या मनासारखे घडले म्हणून मी आनंदी होतो ..स्वतच्या चातुर्यावर खुश झालो होतो ..नाशिकला गेल्यावर मी सहजासहजी व्यसन थांबवू शकेन असा खोटा आत्मविश्वास देखील वाटत होता ..,,चार पाच दिवस स्पाज्मो प्राँक्सिवॉन च्या गोळ्या खावून टर्की दूर करायची आणि नंतर परत कधीच व्यसन करायचे असे मला सोपे वाटणारे ..मात्र वास्तवात अत्यंत अवघड किवा अशक्य असेच गणित मी मनात मांडले होते ..,,मानसी आणि सुमित टेम्पोत आनंदी मुद्रेने बसले होते ..आजीकडे जायला मिळणार म्हणून सुमित खुश होता ..तर मानसी आता नवरा अधिक सुरक्षित भविष्य घडवणार म्हणून आनंदी होती ..सुमितचे वय त्यावेळी सुमारे ११ महिन्यांचा झाला होता .. कोणालाच माहित नव्हते की ही व्यसनामुळे होणाऱ्या नव्या विनाशाची नांदी होती .

( बाकी पुढील भागात )