शनिवार, 18 जनवरी 2014

चलो एक बार फिरसे ..


चलो एक बार फिरसे...अजनबी बन जाये हम दोंनो!(पर्वदुसरे-भाग१३६ वा)


सीमंतीपूजन आटोपून जेवणाची तयारी सुरु झाल्यावर मी निराश झालो ..आता काही अनघाशी भेट होऊ शकत नाही असे वाटून ..सिगरेट ओढायला बाहेर निघून गेलो ..परत आल्यावर पाहतो तर अनघा कुठे दिसेना ..बहुतेक परत घरी गेली असावी ..विमनस्क बसून राहिलो एका खुर्चीवर ..मला परत आलेला पाहताच सुमित जवळ आला ..मानसीही होती त्याच्या मागे ..माझ्या बाजूच्याखुर्चीवर दोघेही बसले ..मानसी म्हणाली अहो ..सीमंतीपूजनाच्या वेळी ..मुलाचे मामा कुठे गेलेत म्हणून विचारात होते गुरुजी ...तुम्ही का आला नाहीत पुढे ..मला त्या वेळी एक जण आला होता बोलवायला परंतु मी नकार दिला होता ..त्यावेळी माझा मोठा भावू पुढे झाला होता पूजेसाठी ...माझ्या नकाराचे कारण सरळ होते ..एकतर न्यूनगंडांमुळे मी पुढे झालो नव्हतो ...दुसरे महत्वाचे कारण असे की अनघाने माझ्या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेले मनाला खूप लागले होते ..त्यामुळे माझा आत्मविश्वास खच्ची झाल्यासारखा वाटत होते ...' सुहास होता की मामा म्हणून ' असे मानसीला म्हणालो ..' अहो पण ..असे दूर दूर का होतात तुम्ही ' सगळ्यांमध्ये मिसळला का नाहीत ? ' मानसीने माझे वर्तनातील बदल बरोबर ओळखला होता ..स्त्रियांना पुरुषांची नजर ओळखण्याचे सहावे इंद्रिय असते असे म्हणतात ..तसेच आपल्या नवऱ्याचा मूड ओळखण्याचे ...कोणीतरी एखादा टोमणा नेमका आपल्याला मारत आहे हे समजण्याचे ...नवऱ्याची एखाद्या स्त्री शी संशयास्पद जवळीक होत असल्याचे ओळखण्याचे ...वगैरे कितीतरी अदृश्य इंद्रिये असावीत असे मला नेहमी वाटत आलेय ...कदाचित त्यांचे संसारातील समर्पण..समरसता ....आत्मीयता यास कारणीभूत असावी ...मानसी काहीतरी अवांतर गोष्टी मला सांगत होती ..मी नुसताच हम्म ..हम्म ..करत बसलो ....पत्नीला आपल्या पतीला सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात ...अर्थात अनेकदा पतीला त्यात काडीचाही रस नसतो ...किवा त्याच्या मते त्या फालतू गोष्टी असतात ....कोणीतरी नवीन दागिना बनवला ....कोणाचे तरी नवरयाशी पटत नाही ....कोणीतरी स्त्री स्वतःला फार शहाणी समजते ...वगैरे !

शेवटी मानसीनेच विषय काढला ..' अहो अनघा आली होती असे कोणातरी म्हणत होते ..तुम्ही बोललात का ? खरेतर संपूर्ण समारंभात मानसीचे माझ्याकडे चांगलेच लक्ष होते ..सुमित माझ्याजवळ होता ..म्हणून ती सारखी माझ्याकडे पाहत होती ..मी कोणाशीही बोललेला नाहीय हे तिला ठावूक असायला हवे होते ..तरीही तिने अतिशय निरागसपणे प्रश्न विचारला ' हो आली होती ..नाही बोललो तिच्याशी मी ' असे तुटक उत्तर दिले ..यावर ती हळहळली ..अहो बोलायचे होते एखादा शब्द ..असे मत व्यक्त केले ..मी अनघाशी बोलण्यात पुढाकार न घेण्याची दोन करणे होती ..पहिले म्हणजे ..अनघाने जर मला योग्य प्रतिसाद दिला नसता तर ..अपमान झाल्यासारखे वाटले असते ..दुसरे कारण असे की आता आम्ही दोघेही विवाहित होतो .. एकमेकांसाठी परके ..आम्हाला दोघांना ओळखणाऱ्या कोणी आम्हाला बोलताना पहिले असते तर ..माझ्यापेक्षा जास्त अनघालाच ते त्रासदायक होऊ शकत होते ....कदाचित म्हणूनच अनघाने देखील मला ओळख दाखवली नसावी ..माझा मूड पाहून मानसीने बोलणे थांबवले ..म्हणाली उद्या अनघा लग्नाला येईलच ..तेव्हा तिची न माझी ओळख करून द्या तुम्ही ..मला बोलायचे आहे तिच्याशी ! मी नुसतीच मान हलवली...मानसी निघून गेली ...सहज म्हणून कार्यालयात फिरत होतो ....आडबाजूच्या एका खोलीत भाच्याचे सारे मित्र बहुधा पार्टीच्या मूड मध्ये होते .. तिकडे एक चक्कर मारली ..मोठा भावू तेथे बाहेरच उभा होता ..बहुधा त्यांच्यात मी मिसळत तर नाहीय याच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी ..मी त्या खोलीत जाताच माझे प्रताप माहित असलेल्या भाच्याच्या मित्रांनी मला आग्रह सुरु केला .. " मामू आवो .. बैठो ..म्हणत एकाने माझा हात धरला ..रंग चढला होता मैफिलीचा ..मी नम्रपणे नकार दिला ..' आपका चलने दो ..मै ऐसाही आया ' असे उत्तर देवून त्यांच्यात सामील होण्याच्या शक्यता फेटाळून लावल्या ' अरे वा ..सौ चुहे खाकर बिल्ली हज को चली ' असा टोमणा मारला एकाने ..मी त्यांना नकार दिलेला पाहून भावाने समाधानाने मान हलवली आणि तो निघून गेला ..दोन तीन जणांना जास्त झालेली होती ..ते काहीतरी फालतू जोक करून मोठ्यामोठ्याने टाळ्या देवून हसत होते ..मला तेथे कसे तरीच झाले ..आपण मैफिलीत सामील नसताना ..सामील असणाऱ्यांचे वर्तन आपल्याला वेडेपणा वाटतो ..असह्य होते ..तेथून निघून झोपण्याच्या व्यवस्थेकडे गेलो ..विचार करत पडून राहिलो .

लग्नाच्या दिवशी पहाटेपासूनच धावपळ सुरु झाली सर्वांची ...मी तयार होऊन दाराजवळच अनघाची वाट पाहत होतो ...आज तर जास्तीच सुंदर दिसत होती ..तिच्या अंगावर बरेच दागिने दिसले ..एकंदरीत सुखात असावी हे समजले ..आपली प्रिय व्यक्ती सुखात असावी असे प्रत्येकाला वाटत असते ..मात्र तिला सुखात ठेवणारा कोणी दुसरा आहे हे पचवणे जरा जडच जाते ...वरात निघाली तेव्हा मी उत्साहाने नाचणाऱ्या मंडळीत सामील झालो ..अनघाची छोटीशी मुलगी देखील पुढाकार घेवून नाचत होती ..तिच्याशी बोललो ..तिचे नाव विचारले ..तिने सांगितलेले नाव ऐकून बरे वाटले ..आम्ही पूर्वी ठरवलेल्या नावांपैकीच एक नाव ठेवले होते अनघाने तिचे...कितवीत आहेस हे विचारले ..सहावीत आहे असे समजले ..ती इतकी सेम अनघासारखी दिसत होती की आश्चर्य वाटले ..लग्न लागल्यावर मानसी माझ्याजवळ आली ..म्हणाली ' अहो ..बोललात का ? अनघाशी ' ..माझ्या कडेवर सुमित होता मी नकारार्थी मान हलवली ..तितक्यात अनघा समोरून येताना दिसली ..मानसीने आग्रह केला तिच्याशी बोलण्याचा ....अगदी समोर येताच मी स्मित केले ..तिनेही स्मित करून प्रतिसाद दिला ...पुढे निघून गेली ..आता थोडा धीर आला होता मला ...मानसी सारखी तुम्ही पुढाकार घेवून बोला ..माझ्याशी ओळख करून द्या असे म्हणत होती ..पुन्हा अनघा जवळ येताच तिला हाक मारली ..चक्क ती थांबून हसली ..जवळ आली ...' ही माझी पत्नी मानसी असे सांगितले ..तर मानसीला... ही अनघा ..तुला सांगितलेच आहे त्या बद्दल ...असे म्हणालो ... दोघीही अतिशय मोकळेपणी बोलू लागल्या ..तितक्यात कुठून कोण जाणे अनघाची आई आमच्याजवळ आली ...बहुधा आमच्यावर लक्ष ठेवून असावी ..अनघाच्या आईला अभिवादन करून तिचीही मानसीशी ओळख करून दिली ..अनघाने माझ्या कडेवरच्या सुमितचा गालगुच्चा घेतला ..छान आहे म्हणाली ...तुझी मुलगी सेम तुझ्यासारखी दिसते असे तिला म्हणालो ..मुलगा पण आहे एक ..तो खेळतोय तिकडे असे सांगितले ..ती नागपूर जवळच एका गावात राहतेय असे सांगितले तिने ..या कधीतरी आमच्या गावी असे निमंत्रण दिले मानसीला ....छान वाटले तुला भेटून ..असेच चालू दे ..असे मला म्हणाली ..कदाचित तिला म्हणायचे असावे ..या पूर्वी जर असा व्यसनमुक्त राहिला असतास तर ...कदाचित आपण एकत्र असतो .

( बाकी पुढील भागात )

====================================================================

दिल तो बच्चा है जी ... ! ( पर्व दुसरे -भाग १३७ वा )

जेमतेम दोन मिनिटांची अनघाची भेट घडली ..तिची आई मध्येच आल्याने ...मानसी समोर असल्याने फारसे बोलणे झालेच नाही ...फक्त ख्याली खुशाली कळली एकमेकांना ..लगेचच अनघा निघून गेली ...तिची माफी मागायची होती ..तसेच त्या वेळी नेमका मी कसा मजबूर होतो ते अनघाला सांगायचे होते ..सगळे तसेच राहिले ..ती निघून गेल्यावर माझी रुखरुख अधिकच वाढली ....वाटले तिच्याशी एकटीशी बोलायची संधी मिळायला हवी होती ...मनाचे हे असेच असते ..आधी ती भेटवी म्हणून मन तडफडत होते ..नंतर निट भेट झाली नाही म्हणून मन कळवळले ...पुन्हा कधीतरी भेटू अशी आशा मनात जागली ....अनघा निघून जाताच मी हरवल्यासारखा झालो ...कालच्या पेक्षा अधिकच बैचैन ..हळवा..अवस्थ ! अनघा गेल्यावर मानसी पुन्हा एकदा हळहळली ..म्हणाली तुमची दोघांची जोडी छान झाली असती ...तुम्ही उगाच व्यसनाच्या नादी लागून अनघाला गमावलेत ... मनातून मानसीचे नवल वाटत होते ...किती सहजपणे तिने माझा भूतकाळ स्विकारला होता ....लग्न उरकून सगळे पुन्हा बहिणीकडे परतले ..दुसऱ्या दिवशी दुपारी मला परत निघायचे होते नागपूरला ..रात्री मानसी ' मैत्री ' बद्दल माहिती विचारात होती ...आम्हाला कधी राहायला येता येईल नागपूरला ? तुम्हाला पगार कधी मिळणार ? असे प्रश्न विचारात होती . ..मात्र सध्या तरी केंद्र प्राथमिक अवस्थेत असल्याने ते इतक्यात शक्य होणार नाही हे तिला समजावले ...मानसीचे मनात खूप कौतुक वाटत होते ...माझ्या व्यसनाधीनते मुळे झालेला सगळा त्रास ती हसतमुखाने पचवत होती ...मला कोणताही दोष न देता ...जे समोर आहे त्याला कोणतीही तक्रार न करता सामोरी जात होती ...तर माझे मन अतिशय चंचल ...हळवे ..भावनेच्या भरात वाहून जाणारे ..मानसीला ही ताकद कुठून मिळत असेल ..स्वतःला समजावण्याची ...दुख: पचवण्याची ...बहुधा लहानपणापासून मुलीना जे मर्यादा पाळण्याचे संस्कार दिले जातात त्यातून तर ही ताकद मिळत नसावी ..मनाविरुद्ध घडले तरी सहन करण्याची ..मनाला लगाम घालण्याची ..केवळ स्वतःचा नव्हे तर ..कुटुंबाचा ..समाजाचा ..परिस्थितीचा विचार करून....मनाला समजावण्याची ...मनाविरुद्ध घडत असलेल्या गोष्टीना सामोरे जाण्याची ..!

दुसऱ्या दिवशी सुखरूप नागपूरला परतलो ...पुन्हा तेच फार्महाउस मधील रुटीन सुरु झाले ...सध्या सेंटर मध्ये जेमतेम पाच जण उपचारांसाठी दाखल होते ..सर्वांची फी देखील नियमित येत नव्हती ..त्यात निवासी कर्मचारी म्हणून मी ..अँगी ..इरफान ..आणि रवीचा एक स्थानिक मित्र आम्ही चौघे फुकट राहत होतो ..सगळा खर्च भागवणे जडच है रविला ..अनेकदा त्याला सेंटरच्या गरजा भागवण्यासाठी घरून पैसे घ्यावे लागत ...आम्ही दोघे एकत्र असताना ....कारभार कसा वाढवता येईल यावर चर्चा करत असू ..रवीने स्थानिक वर्तमान पत्र दैनिक ' लोकमत ' मध्ये तीन चार लेख लिहिले होते आजाराबद्दल ..त्यामुळे हळूहळू काम वाढेल अशी आशा होती ..मात्र हा आजार कसा आणि केव्हा बरा होतो ..याची काहीच खात्री देता यात नसल्याने जेव्हा काही लोक सुधारणेची गँरटी मागत तेव्हा आमचा नाईलाज होई ...आपण एक शास्त्रीय प्रयत्न करणार आहोत ..त्याचा फायदा कोणाला... कसा ....कधी होईल याची खात्री देता येत नाही असे पालकांना समजावणे जड जाई ...व्यसनी व्यक्तीला सतत उपचार देवून व्यसनमुक्तीस प्रेरित करणे ..त्याच्या व्यसनमुक्तीस पोषक अशी मनोवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करणे .. तो भविष्यात करू शकणाऱ्या नुकसानापासून त्याचा आणि कुटुंबियांचा बचाव करणे हेच आपल्या हाती असते ...एक व्यसनी व्यक्ती व्यसन करण्याच्या काळात स्वतः सहित किमान चाळीस लोकांचे प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्ष नुकसान करत असतो ...व्यसनामुळे लाखो रुपयांचा चुराडा करत असतो ...शिवाय कुटुंबियांचे मनस्वास्थ बिघडते ते वेगळेच....अश्या व्यक्तीला जर उपचार दिले नाहीत तर ती खात्रीने मरणार..दिवसेंदिवस अधिक अधिक नुकसान करणार ...त्या पेक्षा उपचारांसाठी थोडाफार खर्च केलेला परवडतो ..शिवाय समुपदेशन ..पालकांचा उपचारातील सततचा सहभाग ..व्यसनी व्यक्तीची व्यसनापासून कायमचे दूर राहण्याची इच्छा या गोष्टी जुळून आल्या तर यश मिळतेच ...फक्त काही केसेस मध्ये जास्त वेळा ..जास्त काळ उपचार द्यावे लागतात ..अथक ! 

या आजारातील सर्वात महत्वाची समस्या अशी असते की ..प्रत्यक्ष व्यसनी व्यक्तीला जरी व्यसन सोडावेसे वाटत असले तरी बहुतेक जण अहंकारामुळे उपचार घेण्यास तयार होती नाही ..माझे मी सोडून देईन .. काहीतरी चमत्कार होऊन माझे व्यसन बंद होईल कायमचे या भ्रमात तो अधिक अधिक खोलात जात राहतो ..अश्या वेळी जबरदस्तीने उपचार देणे केव्हाही योग्य ..कारण जबरदस्तीने का होईने उपचार केंद्रात आणल्यावर व्यासानीचे व्यसन बंद होते ..शिवाय उपचारांच्या काळात त्याला व्यसनाधीनतेचे भयानक दुष्परिणाम शुद्धीवर असताना समजावता येतात ..योगाभ्यास ..प्राणायाम ..समुपदेशांना द्वारे ..कायमचे व्यसनमुक्त राहण्याची प्रेरणा देता येते ..मात्र व्यसनी व्यक्तीला जबरदस्तीने उपचारांसाठी घेवून येणार कोण ? कुटुंबीय तर त्याला घाबरत असतात ..नंतर तो बदल घेईल ..आम्हाला दोष देईल ..वगैरे भीती कुटुंबियांच्या मनात असते ..अशा वेळी बाहेरच्या लोकांनी मदत करावी अशी त्यांची अपेक्षा असते ..माझ्या अनुभवातून व्यसनी व्यक्तीच्या बाबतीत ' वाघ म्हंटले तरी खातो ..वाघोबा म्हंटले तरी खातो .. वाघ्या का म्हणू नये ' हे मी शिकलो होतो ..त्यामुळे आपण अशा व्यसनी व्यक्तीला कुटुंबियांच्या संमतीने घरातून उचलून ..उपचारांना आणू शकतो याची मला खात्री होती ..वेळ प्रसंगी त्या व्यसनीशी खोटे बोलावे लागते ..त्याला घाबरावावे लागते ..वगैरे आम्ही जाणून होते ..एकदा चौकशीला एक केस आली ..मुलगा बी .कॉम झालेला वय वर्षे २४ ..दोन भावू इंजिनियरिंग करत आहेत ..आईवडील दोघेही नोकरी करणारे..व्यसानीने प्रत्येक वेळा कुटुंबियांचा विश्वास घात केलेला ..शेवटी आम्ही जन्माला घातले आहे तर तुला पोसायलाच हवे ..मात्र तुझा त्रास घरात नको ..या विचाराने कुटुंबीयांनी त्याला एका लॉज मध्ये महिना रूमचे भाडे भरून ठेवलेले ..तिथेच राहा दारू पी ..जुगार खेळ ..हवा तो गोंधळ घाल ..महिन्याला आम्ही ठराविक रक्कम तुला देवू असे ठरलेले ..त्या नुसार तो व्यसनी दर महिन्याला त्याचे पैसे घेण्यापुरता घरी येई ..शिवाय ते पैसे संपले की बाहेर उधाऱ्या करून ठेवी ..त्या घरच्यांना फेडाव्या लागत..त्याच्या पालकांना आम्ही त्याला जबरदस्तीने उपचारांना घेवून येवू असे सांगितले ....उपचारांना जबरदस्तीने घेवून येण्याची ही आमची पहिलीच वेळ होती ..ही ' पालखी ' कशी आणावी यावर आमची बरीच चर्चा झाली ..दोन दिवसांनी तो घरी पैसे घ्यायला येणार होते ..तेव्हा त्याला तेथूनच उचलायचे असे ठरले ..त्याला घाबरवण्यासाठी म्हणून आपण पोलीस आहोत असे सांगण्याचे ठरले ! 

( बाकी पुढील भागात )

========================================================================

पहिली पालखी ! ( पर्व दुसरे - भाग १३८ वा )

मुक्तांगण मध्ये असताना ..एखाद्या व्यसनी व्यक्तीला तो स्वतःहून उपचार घेण्यासठी येत नाही असे लक्षात आल्यावर ..त्याचे पालक किवा मित्र खूप दारू पाजून शुद्धीवर नसताना उचलून घेवून येत असत ..त्याला ' पालखी ' आणली असे गमतीने म्हंटले जायचे ..मात्र बहुधा ' मुक्तांगण ' चे कार्यकर्ते यात पुढाकार घेत नसत ..व्यसनीचे पालक अथवा मित्रमंडळी हे काम करत असत ....असे जबरदस्ती उपचार देवून नक्की फायदा होतो का ? अशी अनेकांच्या मनात शंका असे ..बहुधा असे समजले जाते की व्यसनी जो पर्यंत स्वतः मनापासून ठरवत नाही तोवर असे जबरदस्ती उपचार देवून फायदा होत नाही ..मात्र हा आजार इतका भयानक आहे ..की फार थोड्या लोकांना स्वतचे होणारे नुकसान जाणवते व ते स्वतःहून व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेण्यासाठी येतात ..बहुतेक लोकांना ..कुटुंबियांचा दबाव ..एखादे मोठे संकट ..झालेले एकादे नुकसान यामुळेच व्यसनमुक्तीचे उपचार घेण्याची इच्छा होते ...अशीही उदाहरणे मला माहित आहेत की ..फारसे नुकसान होत नाही तो पर्यंत व्यसनी उपचार घेण्यास तयार होत नाही ..त्याचा अहंकार त्याला शेवट पर्यंत असे भासवतो की तो स्वतःहून व्यसन सोडणार आहे ..व्यसनमुक्ती केंद्राची गरज नाही ..काही व्यसानींचे कुटुंबीय व्यसनी व्यक्तीपुढे इतके हतबल झालेले असतात की त्यांना व्यसनी व्यक्तीला कसेही करून उपचारांसाठी दाखल करायचे असते ..मात्र तो स्वतःहून तयार होत नसतो ..अश्या वेळी मदत घेणे अनिवार्य ठरते ..त्याला स्वतःहून उपचारानां जाण्याची प्रेरणा होईपर्यंत नुसते पाहत बसता येत नाही ..कारण त्याने सर्वाना जीव नकोसा केलेला असतो ...म्हणून आम्ही पालकांना मदत म्हणून अशी ' पालखी 'आणण्याची तयारी दर्शवली होती ....जबरदस्ती उचलून आणताना तो आरडा ओरडा करून तमाशा करू शकतो ..याची आम्हाला जाणीव होती ..अश्या वेळी त्याला चारचाकी गाडीतून खिडक्या बंद करून घेवून आणणे अधिक सोपे झाले असते ..आम्ही ज्याला उचलून आणणार होतो त्याचे नाव हरीश .. ' मैत्री ' कडे स्वतःची गाडी नव्हती ..म्हणून आम्ही हरीषच्या पालकांचीच चारचाकी गाडी वापरण्याचे ठरवले ..ठरल्या नुसार हरीष घरी येण्याआधी रवी ..इरफान आणि अँगी त्याच्या घरी जावून बसले ....मी सेंटरला कोणीतरी हवे म्हणून थांबलो होतो ..

सुमारे दोन तासाने जेव्हा सेंटरला गाडी आली तेव्हा मी कुतूहलाने कोणाची पालखी आणली ते पाहू लागलो ..एक साधारण पाच फुट उंचीचा ..चष्मा असलेला तरुण गाडीतून खाली उतरला ..मध्यम बांध्याचा ..चेहऱ्यावरून अतिशय तरतरीत वाटत होता ..त्याला शुद्धीवर असतानाच उचलून आणले होते ..त्याला उचलताना कशी गम्मत झाली ते रवीने सांगितले ..तो बरोबर सांगितलेल्या वेळेस आला ..त्याचे वडील म्हणालेच होते की वेळेचा अतिशय पक्का आहे ...घरी आला तेव्हा हे लोक घरात बसलेले ..त्याने यांच्याकडे दुर्लक्ष करून सरळ वडिलांकडे पैश्यांची मागणी सुरु केली ..वडील म्हणाले हे लोक तुझी चौकशी करत घरी आले आहेत ..तर यांच्याकडे पाहून म्हणाला मी यांना ओळखत नाही ..मला अनोळखी लोकांशी बोलायला वेळ नाही ...प्रकरण एकंदरीत विक्षिप्त होते हे रवीने ओळखले ..मग रविनेच बोलायला सुरवात केली ..म्हणाला आम्ही साध्या वेषांतील पोलीस आहोत ....तुझ्या बद्दल एक तक्रार आली आहे आमच्याकडे ...हे ऐकल्यावर तो म्हणाला चोरीची तक्रार असेल तर मला मान्य आहे ..बाकी की कोणत्या भानगडीत नसतो मी ..त्याने चक्क एका झटक्यात मी चोरी करतो हे काबुल करून टाकले ..यांना वाटले होते पोलीस आहोत सांगितल्यावर हा गडी घाबरेल ..गयावया करेल ..मात्र हा सरळ चोरी करतो असे कबुल करत होता ..मग त्याचे वडील रविला सांगू लागले ..अहो साहेब ..आमचा मुलगा तसा खूप चांगला आहे ..हुशार आहे ..मात्र दारूच्या नादाने जरा बिघडलाय..तुम्ही त्याला जेलमध्ये नका टाकू ..हवे तर त्याला एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात ठेवा ..यावर तो म्हणू लागला ..व्यसनमुक्ती केंद्रात जायची मला गरज नाही ..जगात मी काही एकटा दारू पीत नाही ..तुम्हाला दारूवर आक्षेप असेल तर ..आधी सरकारला दारूबंदी करायला लावा ...हे पाणी वेगळेच होते ..हा पठ्ठ्या अजिबात व्यसनी आहोत हे कबुल करायला तयार नव्हता ..मग रवीने त्याच्या पुढे दोन पर्याय ठेवले ..पहिला असा की ...आम्ही तुझी तक्रार आहे म्हणून तुला जेल मध्ये टाकणार ..जर तुला जेलमध्ये जायचे नसेल ..तर एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात भरती व्हावे लागेल ..अशा वेळी एखाद्याने जेलच्या भीतीने व्यसनमुक्ती केंद्रात जाणे केव्हाही पसंत केले असते ..परंतु हा म्हणाला ..' चालेल तुम्ही मला जेल मध्ये टाका ..मला एकदा पहायचेच होते जेल कसे असते ते ..व्यसनमुक्ती केंद्रात नको ' ...आमचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले ..शेवटी रवी म्हणाला चल बस गाडीत ..पोलीस स्टेशनला जावू ..मग ठरवू काय करायचे ते ..हा चालेल म्हणत सरळ गाडीत बसला ..

गाडी जेव्हा शहर सोडून हायवेला लागली तेव्हा म्हणाला ..तुम्ही मला पोलीस स्टेशनलाच नेताय ना ? की भलतीकडे कुठे नेत आहात ..रवीने त्याला जरा इकडे दुसर काम आहे ..ते करून आपण पोलीस स्टेशनला जाणार आहोत असे सांगून त्याला चूप बसवले ..गाडी जेव्हा ' मैत्री ' च्या आवारात पोचली तेव्हा ..म्हणाला ' म्हणजे तुम्ही केलाच माझा घात ...शेवटी आणलेच व्यसनमुक्ती केंद्रात ..हा आयुष्यातला पहिला व्यसनी मला भेटला होता ..जो पोलीस स्टेशनला जायला उत्सुक होता ..गाडीतून खाली उतरल्यावर आम्ही त्याला घेवून वार्डात हाँल मध्ये गेलो ..तर हा म्हणाला माझे वडील मूर्ख आहेत ..तुम्ही त्यांच्या नादी लागू नका ...माझे जीवन मी कसे जगावे ते स्वातंत्र्य मला पाहिजे ...मी माझ्या पद्धतीनेच जगणार ...त्यावर मी त्याला म्हणालो ..' अरे ठीक आहे तुझे जीवन तुझ्या पद्धतीने जगायचे आहे तुला ..मग स्वतच्या पैश्यानी स्वातंत्र्य उपभोग हवे तेव्हढे ...घरून कशाला पैसे घेतोस ? ' तो उत्तरला ..' मुले जो पर्यंत स्वतच्या पायावर उभे राहत नाहीत तो पर्यंत आईवडिलांनी त्यांना पोसलेच पाहिजे ..पालकांचे कर्तव्य असते ते ' हे उत्तर ऐकून मी सर्द झालो ' अरे गाढवा ..आता तू २४ वर्षांचा झाला तरी अजून स्वतच्या पायावर उभा नाहीस ..काय उभा जन्म त्यांच्यावर अवलंबून राहणार आहेस का ? ' .. ' त्यात काय झाले ..मी जर अपंग ..किवा लुळा पांगळा असतो तर त्यांना मला पोसावेच लागले असते ' हा प्राणी पटापट उत्तरे देत होता ...त्याची मूर्खपणाची उत्तरे ऐकून माझी सटकली ..' ऐ शहाण्या ..आता जरा शांत बस ..नाहीतर फटके खाशील ' तो पुन्हा त्याच सुरात म्हणाला ' तुम्ही चर्चा करत आहात माझ्याशी ..असे एकदम हमरातुमरी वर येणे ठीक नाही ..हिंसेने प्रश्न सुटत नसतात ' त्याचे हे उत्तर ऐकून सगळे हसू लगले ..एकंदरीत हे प्रकरण आम्हाला उपचार देताना बरेच जड जाणार होते हे जाणवले .

( बाकी पुढील भागात )

====================================================================

निर्दोष मुक्तता ! ( पर्व दुसरे -भाग १३९ वा )

अजब तत्वज्ञान असलेला हरीश प्रत्येक प्रश्नाला एकाच शांत ..सहज ..आणि उर्मट वाटेल अश्या स्वरात पटापट मुर्खासारखी उत्तरे देत होता ...आपण येथे अडकलोय ..या लोकांनी आपल्याला येथे उपचारांसाठी आणलेय असे लक्षात आल्यावर त्याने ते देखील स्वीकारले ..म्हणाला ' मला काय ? ..दोन वेळचे फुकटचे खाण्याशी मतलब ..करा तुम्ही तुम्हाला हवे ते ' याचे बोलणे गंभीरतेने घेतले तर हा रोज आपल्या हातून मार खाईल हे मला उमगले ...कदाचित हळू हळू निवळेल गडी असा सर्वांनी विचार केला ..त्याने जवळपास एक आठवडा तरी आंघोळ केली नसावी असे वाटत होते त्याच्याकडे पाहून ...नखे वाढलेली ..मळलेले कपडे ..त्याचा अवतार पाहून एक म्हणाला ' क्यों बे ..चारपाच दिनोसे नहाया नही लगता है ? ' त्याचे उत्तर तयारच होते ' आपका अंदाजा गलत है ..पंधरा दिनोसे नही नहाया मै ...और दात भी नही मांजे...जिस शरीर को आखिर में जलाना हो ..मिट्टी में मिलना हो ..उसके बारे में मै जादा लोड नाही लेता ' हे उत्तर ऐकून मी त्याला ' चल ताबडतोब अंघोळीला जा म्हणून बाथरूमकडे हाकलले....आता उपचार घेणाऱ्या लोकांमध्ये एकाची भर पडली होती ....शहरापासून इतक्या दूर फार्महाऊस वर ...स्वैपाकाची सोय म्हणून सेन्टरच्या बाहेरच्या बाजूने असलेली एक छोटीशी खोली वापरात घेतली होती..मातीच्या भिंती ..आणि टीन टाकलेले होते त्या खोलीवर ..पूर्वी जनावरांचा चारा वगैरे साठवण्यासाठी त्या खोलीचा उपयोग होत असे ..आम्हाला कोणालाच चपात्या करता येत नव्हत्या ..त्यामुळे बहुतेक वेळी आम्ही भाताचेच विविध प्रकार करत असू जेवणासाठी ..साधा भात ..मसाले भात ..खिचडी ..मसाला खिचडी ..त्या सोबत वरण ..भाजी ....असे जेवण असे ...रवी कधी कधी हॉटेल मधून किवा घरून चपात्या आणत असे ..

पाहता पाहता मला दोन महिने उलटले होते नागपूरला येवून ..माझी केसची तारीख म्हणून मी दोन दिवसांसाठी नाशिकला जाऊन आलो ...कोर्टात मानसी आणि सुमित सोबत होते ..सरकारी वकील मानसीला विविध प्रश्न विचारत होते ..ती खूप गोंधळली ..रडू लागली ...मी खरेतर आधीच मँजिस्ट्रेटकडे माझ्या व्यसनांचा ..त्यामुळे कुटुंबियांना होत असणा-या त्रासाचा कबुलीजबाब दिला होता ..तरीही एक प्रक्रिया म्हणून सरकारी वकील केस लढवत होते ..एक तासभर जेवणाची सुट्टी झाली तेव्हा ..त्या महिला सरकारी वकिलाला मानसी व मी जावून भेटलो ..त्यांना सगळी परिस्थिती सांगितली ..मानसीने आता माझी काही तक्रार नाही नवऱ्याबाबत असे सांगितले ..तरीही तुम्ही नव-याच्या दबावाने तर बोलत नाही ना ? अशी शंका आलीच त्यांना ..खूप गयावया केली तेव्हा त्यांनी कोर्टात केस मिटवून टाकू असे आश्वासन दिले ..एकदाचा निर्दोष सुटलो ४९८ च्या केस मधून ...त्या दोन दिवसात एकटा घराबाहेर पडलोच नाही ...सुमित एकदम खुश होता ..बर्याच दिवसांनी त्याला नॉर्मल बाबा अनुभवायला मिळाले होते ..सतत माझ्या अवतीभोवती असे तो ..मी चपात्या कशा करायच्या हे देखील आईकडून शिकून घेतले ...नेहमी भाताचे प्रकार खाणे जीवावर आले होते आमच्या ...मानसीला आईने घरात एकटी कंटाळते म्हणून माँटेसरी टीचरच्या कोर्सला घातले होते असे समजले ...एकंदरीत ठीकच होते सगळे ...पुन्हा नागपूरला परतल्यावर मी चपात्या बनवणे सुरु केले ..त्यामुळे सगळे खुश झाले ..अँगी व इरफानला देखील चपात्या बनवायला शिकले माझ्याकडून ..आता चारी ठाव व्यवस्थित स्वैपाक होऊ लागला सेंटरला ..रवीने लोकमत मध्ये लिहिलेले चार लेख वाचून लोकमत च्या एक पत्रकार वर्षा पाटील यांनी रवीची भेट घेवून ..खूप चांगले काम आहे तुमचे ..नक्की हे काम वाढवण्यास मी मदत करेन असे सांगितले..त्यांनी एकदा सेंटरला देखील भेट दिली ...त्याच काळात नागपूर गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त श्री . जाधव साहेब यांच्याशी आमची ओळख झाली ..जाधव साहेब व्यसनमुक्तीच्या कामात खूप रस घेणारे होते ...गुन्हे शाखेशी संबंध असल्याने ...व्यसनाधीनते मुळे गुन्हेगारीत प्रचंड वाढ होतेय असे त्यांचे मत होते ...व्यसनाधीनते बद्दल जास्तीत जास्त जनजागृती झाली पाहिजे ..शाळा कॉलेजेस मधील विद्यार्थ्यांना ..व्यसनांचे दुष्परिणाम सांगितले पाहिजेत या हेतूने त्यांनी ..नागपूर पोलीस आयुक्तालय व मैत्री व्यसनमुक्ती केंद्र यांच्या मार्फत अशी जनजागृती करण्यास पुढाकार घेतला ..सुमारे नागपूर मधील सुमारे तीस शाळा कॉलेजेस मधून जनजागृती कार्यक्रम घेण्याचे ठरवले .

आम्ही मुक्तांगण मध्ये असताना करत असलेले पथनाट्य येथेही करायचे ठरवले ..रवी ..मी आणि आणखीन दोन जण मिळून आम्ही पथनाट्य बसवले ..अर्थातच प्रमुख व्यसनीची भूमिका मी करत होतो ...मंगरूळहून आम्हाला कार्यक्रमाच्या ठिकाणी नेण्यासाठी पोलिसांची मोठी निळी गाडी येत असे .त्यात बसून आम्ही ..शहरात माध्यमिक शाळा व कॉलेजेसमध्ये जावून पथनाट्य करत असू ...त्या निमित्ताने ' मैत्री ' चा गवगवा होऊन उपचार घेणाऱ्या मित्रात जरा भर पडू लागली ..त्या वर्षी २६ जून या आंतरराष्ट्रीय अमली विरोधी पदार्थ दिनानिमित्त नागपूरमधील मोमीनपुरा या वस्तीत एक छान जनजागृती कार्यक्रम झाला...मी भाषण केले ते सर्वाना खूप आवडले ..नागपूर च्या उन्हाळ्याशी जुळवून घेताना एकदोन वेळा आजारी पडलो ...हळू हळू नागपूर मध्ये चांगलाच रमू लागलो..पुन्हा एकदा एकाला पालखी करून आणायचे ठरले ..हा २१ वर्षाचा मुलगा ..चरस व गांजाचा व्यसनी होता ..थोडासा गुन्हेगारी जगताशी संबंधित ...खूप धिप्पाड ....जाडजूड ..त्याला उचलून आणणे सोपे काम नव्हते ...त्यासाठी जाधव साहेबांची मदत मागितली ..त्यांनी साध्या वेशातील चार पोलीस आमच्या सोबत दिले ..पोलिसांची गाडी घेवून आम्ही त्याला उचलून आणले ..पुढे गरज पडली तर केव्हाही पोलीस आपल्या मदतीस देतो असे जाधव साहेबांनी आश्वासन दिले ..त्यामुळे बरेचसे काम सोपे झाले ..नासिक मध्ये जसे सुरेंद्र पाटील साहेब ..रानडे साहेब मला मदत करत असत तसेच इथे मैत्रीस जाधव साहेब मदत करू लागले .

( बाकी पुढील भागात )

=======================================================================

भांडणे ..कटकटी ..इगो क्लँशेस ! ( पर्व दुसरे - भाग १४० वा )

' मैत्री ' मध्ये सर्व सुरळीत चालले होते ...नागपूरला येऊन सहा महिने होऊन गेलेले ...आम्ही केलेल्या जनजागृती कार्यक्रमांमुळे सेंटरला उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढू लागलेली ...पथनाट्यात सहभाग ..भाषणात ..समूह उपचार ..पालकांचे समुपदेशन ..व्यक्तिगत समुपदेशन सगळ्या गोष्टी मी छान करत होतो ...त्यामुळे साहजिकच रवीचे आणि माझे चांगलेच जमले होते ..परंतु कदाचित याच मुळे माझे इतर सहकाऱ्यांशी खटके उडू लागले ....इगो क्लँशेस वाढू लागले ...सगळेच पूर्वाश्रमीचे व्यसनी ..प्रचंड अहंकारी ...एकमेकांच्या चुका शोधण्यात वाकबगार ...शिवाय मला मिळत गेलेले महत्व पाहून इतर इतर सहकाऱ्याना उपेक्षितपणाची भावना निर्माण झालेली ..एकदोन वेळा इरफान शी माझे भांडण झाले ..कडाक्याचे ...एकदा मी हॉल बाहेरच्या व्हरांड्यात उपचारी मित्रांचा योगाभ्यास संपवून ' शवासन ' घेत होतो ....डोळे बंद करून सर्व शरीर शिथिल करा ...शरीराचा एकेक भाग हळू हळू शिथिल होतोय ..विश्रांती घेतोय ..अश्या सूचना मी देता होतो .. ..त्याचवेळी बाजूच्या किचन मध्ये इरफान सर्वांसाठी चहा करत होता ....आम्ही पाळलेला टाँमी नावाचा कुत्रा तनेमका तेव्हा तेथे किचन मध्ये गेला ..त्याने कशात तरी तोंड घातले ..झाले इरफानची सटकली ...त्याने कुत्र्याला जोरात लाथ घातली ..ते जोरजोरात केकाटू लागले ....किचन मधून पळून बाहेर व्हरांड्याकडे धावू लागले ....कुत्र्याला लाथ घालूनही समाधान न झालेला इरफान त्याच्या पाठोपाठ बाहेर पळत आला ..त्याने हातातील कुठले तरी भांडे धावत्या कुत्र्याच्या दिशेने फेकून मारले ..ते भांडे कुत्र्याला न लागता ...व्हरांड्याच्या भिंतीवर आपटून ...योगाभ्यास करणाऱ्या लोकांच्या मध्ये पडले ...कोणाला तरी लागले ...' शवासन ' सोडून सगळे घाबरून उठून बसले...इरफानच्या शिव्यांचा पट्टा सुरु होता जोरजोरात ..याने इतका तमाशा करण्याची काय गरज आहे म्हणून मी देखील चिडलो ..इरफानला रागावू लागलो ..तो दुरुत्तरे करू लागला ...दोघेही एकमेकांना भिडलो ....सुदैवाने आम्हाला इतरांनी दूर केले ..सोडवले ..परंतु प्रकरण धुमसत राहिले ...

नंतर परत तीनचार दिवसांनी ..इरफानची स्वैपाकाची पाळी असताना ..त्याने आज पोळ्या करणार नाही असे जाहीर केले ..नुसता भात आणि वरण करणार असे सांगितले ...त्याला कंटाळा आला होता पोळ्या करण्याचा ..आम्ही चारपाच जण त्यावेळी नुकतेच बाहेरून पथनाट्य करून आलेलो ...हरकत नाही पोळ्या नसतील तर नुसता वरण भात खाऊ असे मान्य केले .. इरफानने नेहमी प्रमाणे चार वाट्या तांदळाचा भात लावला ....पोळ्या नाहीत तेव्हा तांदूळ जरा जास्त घे ..असे मी इरफानला सांगू लागलो ..' तू मेरेको मत सिखा ..मै करता हु बराबर ..' असे इरफान उर्मट उत्तर ...' अरे ..क्या बराबर करेगा तू ? रोटी नही तो चावल जादा लागणं पडेगा तेरेको ' असा मी आग्रह करू लागलो ..इरफान त्याच वेळी हातात भाजी चिरायची सुरी घेवून माझ्याशी वाद घालत होता ..' तू अपने आप को बहोत शाना समझता है ..मै तेरेको नाही गिनता ...अपने मर्जी से करुंगा भात ' वैगरे सुरु केले इरफान ने ...मी जास्त भात लाव असे सर्वांचा विचार करून त्याला सांगत होतो ...कोणी अर्धपोटी राहू नये हा प्रामाणिक हेतू होता माझा ..मात्र इरफान हट्टाला पेटलेला ..शेवटी प्रकरण शिवीगाळी वर आले ....इरफान माझ्या अंगावर धावून आला ..त्याच्या हातात ती भाजी कापण्याची सुरी ..मी सावधच होतो ..त्याला भिडलो ...त्याने सुरीचा वापर करू नये म्हणून सुरीचे पाते हाताने मुठीत घट्ट पकडले ..तो सुरी सोडवण्यासाठी झटू लागला ..त्या झटापटीट माझ्या हातातील सुरीचे पाते मला जखम करू शकत होते म्हणून मी ते पाते मुठीतच वाकवून तोडून टाकले ..मग निर्धास्त झालो ..तोवर इतरानी आम्हाला सोडवले ..रात्री रविला सगळी घटना समजली ..त्याने इरफानला समजावले ..मात्र कोणाला नीट रागावणे रविला जमत नाही ..इरफान तात्पुरता शांत झाला ..मात्र त्याने माझ्या कुरापती काढणे बंद केले नाही ..मी मारामारी ..शिवीगाळ ...यात चांगलाच तरबेज आहे ....भिडलो तर मी नक्कीच सहजपणे एकदोन जण नक्कीच लोळवू शकतो ...परंतु हे सगळे उपचार घेणाऱ्या मित्रांसमोर होत असलेले मला पसंत नव्हते ..त्याचा त्याच्या मनावर विपरीत परिणाम होतो ...त्यांना शिकवणारेच जर असे भांडत असतील तर ते काय शिकणार आमच्या कडून ? ..अँगी तसा शांत प्रवृत्तीचा त्यानेही इरफानला समजावले ..परंतु इरफानच्या वागण्यात फारसा बदल झाला नाही .

पुढे उपचार घेणारे मित्र वाढले ' मंगरूळ ' मधील जागा सोडून आम्ही नागपूर शहरात अमरावती रोड वर ..' भरतनगर ' या ठिकाणी थोडी मोठी जागा भाड्याने मिळवली ..हा एक चार खोल्यांचा बंगला होता ..एका वेळी किमान २० जण उपचार घेवू शकतील अशी ही जागा होती ..मंगरूळ हून सेंटर नव्या जागेत शिफ्ट झाले ..आम्ही सगळे कार्यकर्ते जरी व्यसनमुक्त असलो तरी ' ड्राय ड्रंक ' अवस्थेत होतो ..म्हणजे ..अहंकार ..हट्टीपणा ..बेजवाबदारपणा ..तसाच होता ..रोज आमच्या काहीतरी कटकटी होत असत ..रवी शांत स्वभावाचा असल्याने त्याला अनेकदा तक्रारी करूनही तो ठोस अशी कारवाई कोणावर करत नसे ...शिवाय जरी उपचार घेणारे मित्र वाढले तरी ..आर्थिक बाजूत हवी तशी सुधारणा होत नव्हती ...अनेक पालक वेळच्या वेळी उपचार खर्चाचे पैसे देत नसत..काही जण नंतर पैसे देतो म्हणून चक्क पैसे बुडवत असत ....उपचार खर्च वेळच्या वेळी घेण्याबाबत रविला कडक धोरण स्वीकारता येत नव्हते ...कसाबसा खर्च भागत होता..कार्यकर्त्यांना मानधन देण्याची रवीची इच्छा असूनही त्याला ते शक्य होत नव्हते ..सेंटरला अनुदान मिळावे यासाठी आमचे सरकार दरबारी प्रयत्न सुरु होते ..परंतु तेथेही टक्केवारी ..भ्रष्टाचार ..चालतो ..प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांची डाळ शिजणे कठीणच असते ..एकदोन वेळा नाशिकला जावून आलो ..मानसीचा सारखा आग्रह चाललेला होता ..आम्हाला तेथे राहायला घेवून चला म्हणून ..मला मानधन मिळत नसल्याने ते शक्य नव्हते ....मला मानधन देण्याची रवीची इच्छा असूनही सगळा खर्च भागवणे दिवसेंदिवस अवघड होत चालले होते ..त्यामुळे मी देखील रविला काही पैसे मागणे टाळत होतो ..सगळी परिस्थिती पाहून मला रविला अजून त्रासात टाकणे योग्य वाटले नाही .

( बाकी पुढील भागात )

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें